Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020

Sunday, February 16, 2025

छावा चित्रपट

छावा 


एक उत्कृष्ट कलाकृती, 

सगळंच उत्तम जमून आलेय... 

अभिनय, कॅमेरा वर्क, दिग्दर्शन, संवाद, संगीत, सेट्स म्हणजे सगळंच... 👌👌


दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे विशेष कौतुक की, त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता 20% का होईना छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील ते शेवटचे दिवस, वेदना, यातना, संभाजी महाराजांची मृत्युला सामोरे जाण्याची खुमखूमी, त्यांच्यावर केलेले ते अत्याचार दाखवले... 

थंड रक्ताचा पण तेवढाच कपटी, क्रूर आणि खुनशी औरंग्या तर बाप रंगवलाय... 

विकी कौशल अक्षरशः ती भूमिका जगलाय... फायटिंग सिनच्या वेळी त्याच्या त्या गर्जना हृदयाची धडधड वाढवीत होत्या. एका युवराजांची आणि राजाची मानसिकता, देहबोली हुबेहूब वठवलीये... 

काही सिन टाकता आले असते. पण एकाच चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ती तेजस्वी आणि वादळी कारकीर्द दाखवूच शकत  नाही... 

पण छत्रपती संभाजी महाराजांवर एवढ्या मोठ्या स्केलवर फिल्म बनली. पूर्ण जगासमोर आणली... यासाठी विशेष अभिनंदन...

दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टीचाही मर्यादित वापर केला आहे. 

फक्त ज्या काही लढाया दाखवल्या त्यांचा स्क्रिनवर फक्त नामोल्लेख केला असता तरी चालला असता... 


छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा शेवटचा सिन तर केवळ अप्रतिम...👌👌


किती ओपनिंग मिळाली, किती कोटी कमावले हे दुय्यम...

फिल्म संपल्यावरही लोकं बसूनच होती... हेच या चित्रपटाचं यश... 


बाकी व्यक्तिगत मत विचाराल तर "केवळ निःशब्द"


यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।

लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।

ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।

त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।


-: मनु :- 


@highlight #chhava #vickykaushal #sambhajimaharaj #viralchallenge #films


Eaksharman

आपलं माणूस

आपलं माणूस

चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या

‘‘आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता, पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला.. आपलं माणूस कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही..’’ तिला वाटून गेलं. सुप्रसिद्ध कवी चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या..

 

तो आज घराची किल्ली न्यायची विसरला. आणि नेमका तिला आज यायला उशीर होणार होता.
बंद दाराशी जरा वैतागून बसल्यावर जरा वेळाने त्याला मनापासून आपलं घर पाठीशी उभं असल्यासारखं वाटायला लागलं. तिची वाट बघता बघता तिचा राग यायच्या ऐवजी त्याला त्या दोघांचं सवयीचं झालेलं नातं नव्यानं उमगलं..
तिचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरत होतं, आतासुद्धा ती फक्त आपलाच विचार करीत असेल, या विचारानं तो सुखावला आणि खंतावलाही, कधी कधी एकांतात आपल्याला स्वत:जवळ कबुली देणं सोपं जातं तसं त्याचं झालं. आपण तिला फार गृहीत धरतो याची त्याला नव्यानं जाणीव झाली आणि उगीचच बोच लागून राहिली..
‘लवकर ये भूक लागली आहे.’, ‘लवकर ये मला चीक चीक होतंय. घरात जाता येत नाहीए.’ असे एक-दोन मेसेज पाठवून झाले होते. आता त्यानं मेसेज केला.. ‘सावकाश ये. उगीच जिवाची तगमग करून येऊ नकोस. आठच वाजतायत..’ नेमका तो मेसेज तिला जात नव्हता.
त्याला उगाचच उत्साह आल्यासारखं झालं. इतक्या दिवसांत कधी घराभोवतीच्या बागेत तो फिरला नव्हता. साधं लक्षही द्यायला त्याला जमलं नव्हतं. ‘हौस त्याची आणि मेहनत तिची’ या तत्त्वावर ती घराभोवतीची बाग फुलली होती. अनंत, मोगरा, दहा जातीचे गुलाब आणि त्याने गावाहून आणलेला कृष्णकमळाचा वेल हे तिच्या मेहनतीनं बहरून आलेलं वैभव बघायचं तर दिवे लावणं गरजेचं होतं..
बागेत तसे दोन दिवे होते, पण ते लावायचे तर घरात जायला हवं होतं. या विचाराने तो अधिकच घरी जायला आतुर झाला.
ही आज सकाळी आपल्या आधी गेली, नाही तर ती घरी असताना किल्लीशिवाय आपण बाहेर पडलोच नसतो.. आता आल्या आल्या ती ओटय़ाशी उभी राहील, चहा करते म्हणेल. आपण घरी असतो तर चहा केला असता, निदान तिच्या वॉशसाठी गिझर तरी ऑन केला असता.. चार वर्षांत काय केलंय आपण यातलं?
‘आता शक्य नाही म्हणून पुळका आलाय..’ त्यानं परखडपणे स्वत:वरच केलेल्या आरोपानं तोच पेटून उठला. काही करून ती घरात शिरायच्या आत घरात शिरायचंच.
कसं शक्य होतं ते..
त्यानं घराला दोन प्रदक्षिणा घातल्या. आणि देवघराच्या खिडकीची व्हेंटिलेटर्स त्याला उघडी दिसली. त्या खिडकीला ग्रील नाहीये. हे लक्षात आल्यावर तो अंधारातच वर चढला. अंग तिरपं करून, हात वाकडा करून त्याने दाराचा एक बोल्ड उघडला, मग खिडकी उघडली, मग बुटांसह देवघरात प्रवेश केला म्हणून देवाची क्षमा मागितली आणि आधी जाऊन त्यानं बूट काढले. परत देवासमोर उभा राहिला. त्याला हात जोडले. ‘सॉरी’ म्हटलं. देवाचे आभार मानले. या घरानं, या देवानं आपल्याला खूप सुखात ठेवलंय या जाणिवेनं त्याला उभारी आली. त्यानं गॅस पेटवला. तोही सिलेंडर खालून बंद असताना खटपट करून डोकं चालवून तो गॅस पेटवण्यात यशस्वी झाला. त्याने दोघांचा तीन कप चहा ठेवला, कारण चहाबरोबर मस्का खारी असली की चहा जास्त लागतो इतकं त्याला माहीत झालं होतं आणि कालच ती मस्का खारी घेऊन आली होती.
इथे हा रंगात असताना ती घरापाशी पोहोचली. गल्लीच्या तोंडाशी आल्या आल्या तिला तिचं टुमदार घर दिसायचं. रिक्षातूनच तिनं नोटीस केलं. किचनचा दिवा लागलाय म्हणजे आज आपण दिवा विसरलो? कसं शक्य आहे? का हा जाऊन ताईकडून किल्ली घेऊन आला. इतक्यात तिला त्याचा मेसेज मिळाला, ‘सावकाश ये. जिवाची तगमग करत येऊ नकोस..’ क्षणभर त्या मेसेजेची दखल घेण्यात गेला.. मेसेज वाचताना तो तिला चक्क डोळ्यांसमोर बोलताना दिसला. ‘सावकाश ये’ म्हणताना त्याचा स्वर, त्याचा आविर्भाव तिला प्रत्यक्ष जाणवून गेला. त्याच्या मिठीतून सुटताना जशी तिची तारांबळ उडायची तसंच काहीसं आता झालं..
ती दाराशी आली तर मेन डोअर, सेफ्टी डोअर, दोन्ही बंद. कुलूप जसंच्या तसं. आणि घरात तर खुडबुड सुरू.. ही प्रचंड घाबरली. भोवतीचा नीरव परिसर तिच्या अंगावर आल्यासारखं तिला झालं.. हाक मारायची तरी कुणाला..आणि कोण येईल धावून? तिनं त्याला फोन केला तर लागेचना. तिनं धीर करून पोलिसांत फोन लावला. त्यांना सांगितलं, मी एकटी बाहेर उभी आहे आणि घरात कोणी तरी शिरलंय. मी सेफ आहे पण घरात कोण शिरलंय याची कल्पना नाही. तत्परतेने पोलीस आले.
..आणि पोलीस म्हणजे कोण?
जो पोलिसात आहे म्हणून तिने ज्याला नकार दिला होता, तो सावळा, दणकट अभिजित नानल.. त्याचा फोटो बघताच तिला तो आवडला होता. सावळा, भरगच्च मिश्या असलेल्या त्याच्या भुवयाही नाकाशी जुळत होत्या. हसताना त्याचा तुटका दात उघडय़ावर पडल्यासारखा दिसायचा. एका क्षणात तिने त्याला या सर्व तपशिलासह न्याहाळलं, याला नाकारलं आपण? तिने स्वत:लाच प्रश्न केला. त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तोही तिला तसाच न्याहाळत राहिला, ती समोर असून तिला शोधत राहिला.. तिचा नकार मिळाल्यावर त्याने एकदा भेटायची इच्छाच व्यक्त केली होती, पण ती त्यालाही नाहीच म्हणाली होती. त्याही परिस्थितीत तो हलकंसं हसत म्हणाला, ‘शेवटी असे भेटणार होतो आपण.’ त्याने बरोबरच्या हवालदारांना सूचना केल्या. त्यांना पोझिशन घ्यायला सांगितलं.
..आणि तिला धीर देत म्हणाला, ‘‘तुम्ही अगदी सेफ आहात. आता दरवाजा उघडा. ज्या अर्थी आत वावरल्याचा आवाज येतोय त्या अर्थी तो बेसावध आहे. आवाजावरून तरी एकच व्यक्ती असावी, असं वाटतंय.. तुमचे मिस्टरच नसतील ना?’’ त्याने शंका व्यक्त केली.
तिने लगेच त्याचे आलेले मेसेज दाखवले. ‘ओ. के.’ म्हणत तो कारवाईला सज्ज झाला. तिने दार उघडलं. दाराचा आवाज आल्याबरोब्बर तो तसाच टॉवेलवर उघडाबंब बाहेर आला. तो ‘ढाण टॅडाण’ करायच्या बेतात असताना तिच्याबरोबर पोलीस बघून त्याचंच ‘ढाण टॅडाण’ व्हायची वेळ आली. तो गोंधळला.. पोलीस?
तीही गोंधळली, ‘‘तू तू तू घरात कसा शिरलास?’’ अभिजितही लक्ष देऊन ऐकत होता. मग त्यानेसुद्धा थॉट प्रोसेससह सगळा घटनाक्रम सांगितला. हा वेडू आहे याचा अंदाज तिला होताच, आज खात्री पटली. थोडं हसून बोलून झालं आणि तिनेही आपण अभिजितला आधीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. अभिजितने हवालदारांना परत जायला सांगितलं आणि तो त्याच्या आग्रहाखातर चहासाठी थांबला.
त्याने तिला अभिजितशी बोलत बसायला सांगितलं आणि अनायसे केलेला तिसरा कप तो बाहेर घेऊन निघाला. तो जेव्हा या दोघांसमोर आला तेव्हा त्याच्या कानावर पडलं, ती अवघडून विचारत होती, ‘‘तुम्ही लग्न केलंत की नाही?’’
अभिजित हसून म्हणत होता, ‘‘आमच्याशी कोण करणार लग्न? आम्ही पडलो पोलिसातले. मुलींना वाटतं आम्ही काही कामाचे नाहीत..’’ ती उगीचच खजील झाल्यासारखी झाली.
तो चहा घेऊन आल्यावर ती काहीच व्यक्त झाली नाही. पण दोघे समोर बसल्यावर तुलना होणारच आणि तुलनेत आता तोही पूर्ण मार्काने पास झाला होता. ताई तेव्हा सांगत होती, केवळ पोलिसात आहे म्हणून नाही म्हणायचं याला काही अर्थ नाही. तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू स्वत: विचार कर. तिने स्वत: विचार केला आणि तिला सेफ लाइफ योग्य वाटली होती. सेफ लाइफची व्याख्या तेव्हा कुठे माहीत होती. मग तिचं गप्पांतलं लक्षच उडालं. पद्धतीचे चार शब्द बोलून तो गेला आणि तिच्या जवळ बसत यानं विचारलं, ‘‘तू त्याला लग्नासंबंधी का विचारत होतीस?’’ ती चपापली, ते त्याच्या लक्षातही आलं नाही. आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकतं याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो अगदी सहज होता आणि ती? ती सहज नव्हती. मुंग्यांची एका लयीत जाणारी रांग विस्कटली की पुन्हा सलग व्हायला जसा वेळ लागतो, तसं तिचं झालं. ती त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाच त्यानं तिच्यासमोर चहा धरला.. ‘‘काय झालं?’’ असं खुणेनच विचारलं.
ती काही बोलत नाही म्हटल्यावर तोच म्हणाला, ‘‘आपल्या उजूसाठी विचार करतेस का त्याचा?’’ उजू म्हणजे त्याची धाकटी बहीण. ‘‘पण बघ बुवा पोलिसातला आहे. उजूला चालेल का?’’
ती फणकाऱ्यात म्हणाली, ‘‘नं चालायला काय झालं, पोलिसात असला म्हणून काय झालं?’’ पुढेही ती दोन-तीन वाक्यं सलग बोलली पण मनातून याविरुद्धच बोलत होती.
कोणत्याही संदर्भाने तो आता नकोच आपल्या आयुष्यात, असं ती मनाशी घोकत राहिली. भोवती जे आहे ते आपलं आहे आणि ते किती छान आहे. ते छान तिला नेहमीपेक्षा अधिकच छान वाटायला लागलं, मग तोही अधिकच छान. नुसता छान नाही खूप जवळचा हक्काचा वाटायला लागला. हा किती विसंबून आहे माझ्यावर, याला बोलून दाखवता येत नाही, पण याचं आयुष्य पूर्ण आपल्या भोवतीच फिरत असतं.
आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला. तुलना करणं स्वाभाविक आहे पण त्यानंतर आपलं माणूस आपल्याला कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही.
अतीव सुखाच्या जाणिवेने तिला हुंदकाच फुटला. त्याच्या गळ्यात पडून ती मुसमुसायला लागली आणि तो त्याच्या परीनं, त्याच्या पद्धतीनं तिची समजूत काढण्यात रमला. त्यात..बागेतले दिवे लावायचे राहून गेले..

फार थोडं अंतर असतं
तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी
पण मधे बराच वेळ जातो
येण्याचं कारण सुचण्यासाठी
लांबलचक रात्रीनंतर
येणारा दिवस चिमटीत मावणारा
त्यात माझा तोळाभर जीव
तुला पाहण्यासाठी धावणारा
तू भोवती वावरल्याचा भास
दर दोन क्षणांमागे होतो
कितीही सावध राहिलं तरी
तो क्षण दोन क्षणांमागून येतो
बघावं तेंव्हा ती..
फुलं वेचत असते
सर्वामते बघावं तेंव्हा
मला कविता सुचत असते
तुझं बघणं पुरेसं असतं
जगण्यासाठी
आणि जगणं जरुरी होऊन बसतं
केवळ तुझ्या बघण्यासाठी.
chandrashekhargokhale18@gmail.com

Friday, February 14, 2025

प्रेम

प्रेम हा विषय खरंतर ऊहापोह करण्याचा नव्हेच. शब्दांची, चर्चांची गरजच नसते या भावनेला. ‘शब्दांवाचून कळले सारे’ अशीच ही अनुभूती.  प्रेमाकडं वेगळ्या नजरेनं पाहणारा हा विशेष लेख खास आजच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त...

सुरवातीपासून आपल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीचा पगडा आहे. अगदी ‘पडोसन’ चित्रपट गाजला आणि त्यात सायरा बानू मैत्रिणींचा मेळा सोबत घेऊन ‘मै चली मै चली’ करत सायकलवरून हुंदडली. लगेच मुलींचे गट तेव्हा ठिकठिकाणी सायकलवरून हुंदडताना दिसायला लागले होते. ‘बंदीश’मध्ये हेमा मालिनीनं पायातलं पैंजण हातात अडकवलं होतं, त्याचंही अनुकरण काही दिवस चाललं.

‘व्हॅलेंटाइन्स डे’चंही असंच. हा ‘प्रेमदिवस’ साधारणतः १९९३-९४ च्या काळात आपल्याकडं साजरा केला जाऊ लागला. मला वाटतं ‘कुछ कुछ होता है’नं हे फॅड आणलं आणि तरुणाईपेक्षा व्यापारीवर्गानं आणि मीडियानं ते टिकवलं. आपल्यावर तर काय चित्रपटांचा पगडा सुरवातीपासून होताच. ‘दिल चाहता है’मध्ये नायिका नायकाला सारखी मारत असते. त्याचंही अनुकरण बरेच दिवस इथं-तिथं भर रस्त्यात पाहायला मिळत होतं; मग व्हॅलेंटाइन्स डे हा तर खास प्रेमीजनांनी, प्रेमीजनांना वाहिलेला... मग त्याचं गारुड दिवसेंदिवस वाढेल नाहीतर काय? त्यात संस्कृती, परंपरा यांचा विचार येतच नाही. विचार करायचाच तर त्या आदिम, अलौकिक भावनेचा करू या.. जिला चित्रपटसृष्टीमुळेच काहीसं सवंग रूप आलं आहे. ही भावना म्हणजे अर्थातच प्रेम!
तुझ्यासाठी श्वास घेऊ शकत नाही
हीसुद्धा माझ्यासाठी उणीव आहे
तुझ्यावरचं प्रेम हीच फक्त
माझ्या जगण्याची जाणीव आहे...
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.. 

अशी उत्कटता  ही ज्या भावनेचं सामर्थ्य आहे... ज्या भावनेत फक्त समर्पण आहे, तिला प्रदर्शनाची गरज पडावीच का? आमचे एक सर होते. आंबेकर सर. ही गोष्ट आहे साधारणतः ३५-४० पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची. त्या काळी व्हॅलेंटाइनचं नावही फारसं कुणाला माहीत नव्हतं. त्या काळात आमचे हे सर असाच एक दिवस साजरा करायचे... ज्या दिवशी त्यांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला, ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या ‘सौ’ला पहिल्यांदा बघितलं, तो दिवस त्यांच्यासाठी उत्सवाचा दिवस असे आणि त्या दोघांनी तो जन्मभर साजरा केला. दोघं खूप आनंदात असायचे. नवे कपडे, नवे दागिने, जे आहे त्यात ते दोघं तो दिवस आनंदात घालवायचे. सर खाऊन-पिऊन सुखी होते आणि आपल्या मनाजोगत्या जोडीदाराबरोबर आनंदीही होते...
प्रेम साजरं करता येत नाही, आनंद साजरा करता येतो आणि आनंद साजरा करायला ठराविक दिवसाचं बंधन कशाला?
तू फक्त समोर यायचा अवकाश
की माझ्यापुरता काळ सरतो
संथ, मुलायम आणि सावकाश...
असा हा क्षणाक्षणानं फुलणारा आनंद आहे. त्याचा नेमका दिवस ठरवून त्या आनंदालाही नियम घालून टाकण्यात आले आहेत! नियमानं परंपरा तयार होतात आणि पुन्हा परंपरा नियमानुसार पाळल्या जातात...परंपरा पाळल्या जातात...पद्धती पाळल्या जातात. पण खरंच, प्रेमाची अलौकिक जादू या सोपस्कारात जाणवत नाही.
तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी तू हरवलास तर
अरे, पण मी मागे राहीनच कशी
तू माझ्यापास्नं दुरावलास तर? 
असे निरुत्तर करणारे प्रश्‍न फक्त या भावनेपोटीच पडू शकतात.
हात धरून रस्ता अडवत नाहीस
पण नजरेचा गुंताही सोडवत नाहीस
तुझं प्रत्येक स्वप्न साकार होताना पाहायचंय
अन्‌ तुझं साकार झालेलं स्वप्न बनून
कायम तुझ्या सोबत राहायचंय... 

अशी पूर्णतेकडे नेणारी भावना म्हणजे प्रेम आहे. ज्याला ही भावना उमगली, तो खरा रंगला!
आणि खरी रंगलेले गडीच मग वेडेपणा करतात.. प्रेमाचे दोन प्रकार आहेत ः वेड्यासारखं प्रेम करणं आणि प्रेमात वेडं होणं...! आणि व्हॅलेंटाइन्स डेला हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात!

संजय दत्तनं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चाच मुहूर्त साधून रिया पिल्लईशी लग्न केलं होतं. घरातून निघताना त्याला कल्पनाही नव्हती की आपण आज चतुर्भुज होऊ.. त्यानंतर तो वेगळ्या प्रकारे अनेकदा अनेक कारणांसाठी ‘चतुर्भुज’ झाला; पण त्याचं ते व्हॅलेंटाइन्स डेला चतुर्भुजं होणं हे अनोखं होतं! त्याच्याबाबतीत बहुतांश प्रतिक्रिया अशा होत्या की ‘काय हा मूर्खपणा आहे?’  

पण मी म्हणतो, ते म्हणतात ना ‘बुरा ना मानो होली है...’ तसंच या प्रेमाचंही असतं! त्या प्रेमात रंगलेले जे असतात, ते तो क्षण फार उत्कटतेनं जगत असतात. संजय-रियाचं लग्न टिकलं नाही हा भाग वेगळा; पण त्या क्षणाला त्यांनी ‘न्याय’ दिला होता! पण अशा क्षणांची अखंड मालिका म्हणजेच आयुष्य आहे...आणि ते भिरकावून देता येत नाही.. झुगारून चालत नाही. ते निभावावं लागतं आणि प्रेम बरेचदा तेच बळ देतं...

१९८० च्या दशकातली बी ग्रेडच्या चित्रपटांमधली एक नायिका होती; म्हणजे ती अजूनही आहे; पण आता ती वृद्धा आहे. तेव्हा ती नायिका होती. तिचा अशाच एका स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकावर जीव जडला, तेव्हा तो तिच्याकडं सोय म्हणून बघत होता आणि ती मात्र पुरती गुंतली होती. व्हायचं तेच झालं. ती गरोदर राहिली आणि हा दिग्दर्शक बिथरला.. एक से एक लव्हस्टोरी त्याच्या डोक्‍यात घोळत असताना त्याला त्याची स्वतःची लव्हस्टोरी लक्षातच येत नव्हती...!
मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हेही खरं की कुणाचं होऊन जाणं
मनापासून यायला हवं.. 

हे अस्सल प्रेमातलं गमक त्या दिग्दर्शकाच्या लक्षातच आलं नाही. यथावकाश त्या नायिकेनं-प्रेमिकेनं एका मुलीला जन्म दिला आणि अभिनय सोडून ती डबिंग करायला लागली. त्यात तिनं खूप नाव-पैसा कमावला. मुलीला तिनं छान सांभाळलं. दिग्दर्शकही जरा नावारूपाला आला; मग दोघं परत आमनेसामने आले. तो इतकी वर्षे बघत होता... तिनं कधीही त्याच्याबद्दल अपशब्द उच्चारला नव्हता की त्याला शिव्या-शाप दिले नव्हते. मग आपल्या लहानग्या मुलीला बघून त्यालाही पाझर फुटला असेल. त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्या नायिकेसमोर. वाटलं की ती आता लगेच होकार देईल; पण तसं झालं नाही. तिनं जगावेगळी मागणी केली. ती म्हणाली ः ‘‘आता अजून एक बाळ दे; मग लग्न करू. नाहीतर मोठीला उगाच कॉम्प्लेक्‍स येईल!’’ तेव्हासुद्धा अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या, ‘काय मूर्ख बाई आहे!’ ही मागणी ऐकून तो दिग्दर्शकही हैराण झाला होता... मात्र, प्रेमाची हीदेखील एक छटा आहे. असते. जोडीदाराच्या भरवशावर बेफिकीर होऊन जायचं. व्हॅलेंटाइन्स डेसारखा दिवस या अशा वेड्यांनाच शोभून दिसतो! त्या दिग्दर्शकानं त्या नायिकेची-प्रेमिकेची ती अट मान्य केली. मधल्या काळात त्याचं एक ठरलेलं लग्न मोडलं होतं... तो पुन्हा मनापासून या नायिकेत-प्रेमिकेत रमायचा प्रामाणिक प्रयत्न करायला लागला आणि त्याला जाणावलं, की तसा प्रयत्न करायची गरजच नाही. आपण मनपासून हिच्यातच रमलो होतो म्हणूनच आपले सूर दुसरीकडं कुठं जुळलेच नाहीत. मग त्यांना दुसरी मुलगी झाली. मग त्यांनी लग्न केलं. आता त्या दोघांची मोठी लेक जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये धमाल करतेय...
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली.. 
अशी कृतार्थ भावना त्या दोघांना नक्कीच जाणवत असेल.

प्रेमाची सार्थकता असं कृतार्थ वाटण्यातच आहे आणि कृतार्थ असं उगीचच वाटत नाही. त्यासाठी अथांग होण्याची क्षमता असावी लागते.. माफ करा; पण हल्ली बरेचदा अशी क्षमता युगुलांमध्ये दिसून येत नाही...त्यांचे व्हॅलेंटाइन्स डेचे बेत ऐकतानासुद्धा हेच जाणवतं. जी गोष्ट निर्मळपणे व्यक्त करण्याची आहे ती गोष्ट, ती भावना ते सिद्ध करायचा अट्टहास करत असतात! पण सरसकट असं विधान करून मी मोकळा होत नाहीये..नाहीतर माझीच कविता मलाच लागू पडायची. मी एका कवितेत म्हटलंय ः
आपण नदीकाठी बसायचो
तिथे अजूनही तो खडक आहे
पण हल्ली बसणाऱ्यांचं
वागणंच जरा भडक आहे...
मित्रांनो, हा ऊहापोह न संपणारा आहे.
मुळात प्रेम हा विषय ऊहापोह करायचा विषयच नाही; पण व्हॅलेंटाइन्स डेची जादूच अशी आहे, की न चाहते हुए भी सब उस की लपेट मे आ जाते है ।
पण तरी खऱ्या प्रेमाचं खरं गमक सांगू?
आधी कळायला वेळ लागतो
मग मान्य करायला वेळ लागतो
तुला माहीत आहे? 
इथे जिंकण्यापेक्षा हरायला वेळ लागतो...

चंद्रशेखर गोखले 

Tuesday, January 21, 2025

भक्ति

तुम्ही अशा एखाद्या चमत्कारी व्यक्तीला ओळखता का.? कि.. कॅमेरा मध्ये त्यांचा फोटो टिपला असता, ते फोटोमध्ये दिसतच नसत. विशेष म्हणजे.. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या व्यक्ती, फोटोमध्ये अगदी स्पष्ट दिसत असत. आज आपण अशाच एका संत महात्म्याची ओळख करून घेणार आहोत. 

इसवीसन अठराशे साठ ते सत्तरचं दशक.. पब्लिक वर्क डिपार्टमेंट इंजीनियरिंग ऑफिस ठिकाण दानापूर.
ऑफिस मधील एक क्लार्क बाबु..  इंग्रज ऑफिसरच्या ऑफिस बाहेर थांबून विचारतात, सर मी आतमध्ये येऊ का.? आतमधुन कसलाच आवाज न आल्याने क्लार्कने त्या सगळ्या फाईली आतमध्ये जाऊन टेबलावर ठेवल्या, आणि तो गुपचूप बाहेर निघून आला. 
थोड्या वेळाने क्लार्कने साहेबांना आवाज दिला, त्यावर साहेब म्हणाले.. आज माझं कामात मन लागत नाहीये तुम्ही जाऊ शकता. क्लार्कने साहेबांना पुन्हा विचारलं तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे.? मला झेपेल असं काही काम असेल तर सांगा.

साहेब म्हणाले.. इंग्लंड वरून पत्र आलं आहे, माझी बायको भयंकर आजारी आहे. समजत नाहीये मी काय करू.? तिकडे असतो, तर किमान तिची देखभाल तरी केली असती.

क्लार्क म्हणाला.. तरीच मी विचार करत होतो, की साहेब फाईलला हात का लावत नसतील.? असू देत मी थोड्या वेळाने परत येतो.
क्लार्कशी बोलून झाल्यावर इंग्रज साहेब थोडे ताजेतावणे झाले. ऑफिसमधील सगळे बाबू या क्लार्क बाबुला.. 

" पगला बाबू म्हणत असत "

हे बाबू नेहेमी आपल्याच धुणकीत असायचे, त्यांचा चेहरा देखील सतत हसतमुख असायचा. त्यामुळे काही लोकं यांना.. " आनंदमग्न बाबू " असं देखील म्हणत, कारण ते नेहेमी आनंदात बुडालेले असत. त्यांना कसल्याच गोष्टीची चिंता नसायची.
तितक्यात ते इंग्रज अधिकारी बाहेर आले आणि म्हणाले.. आज मी कसलंच काम करणार नाही, जे काही काम असेल ते आपण उद्या पाहुयात.
साहेबांचं बोलून झाल्यावर.. क्लार्क बाबू त्यांना म्हणाले,
साहेब आपण निश्चिंत राहा.. मेमसाब अगदी ठीक झाल्या आहेत. आजच्या तारखेला त्या तुम्हाला पत्र देखील लिहीत आहेत, काही दिवसातच तुम्हाला त्यांचं पत्र मिळेल. इतकच नाही, तर तिकीट मिळाल्यावर त्या इंग्लंडहुन पुढील जहाजाने भारताकडे रवाना देखील होणार आहेत.

इकडे क्लार्क बाबू बोलत होते, तर दुसरीकडे इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करत होते. साहेब म्हणाले.. तुम्ही तर असं बोलताय, जसे की तुम्ही माझ्या बायकोला भेटून आले असावेत. 
ते काहीही असो, पण.. पगला बाबू तुमच्या या बोलण्याने माझ्या मनाला भरपूर आनंद दिला आहे. ईश्वर करो आणि तुमचे बोल खरे होवोत.

पगला बाबू म्हणजेच.. " श्यामाचरण लाहिरी महाशय "

साहेबांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास केला नाही. पण त्यांना तरी काय माहित, कि मधील काळात नेमकं काय घडलं आहे.? वेळ आल्यावर ते नक्कीच चकित होणार होते.

एका महिन्यानंतर एके दिवशी इंग्रज साहेबाचा शिपाई लाहिरी महाराजांपाशी आला आणि म्हणाला, साहेबांनी तुमची आठवण काढली आहे. लाहिरी महाशय साहेबांकडे गेले.. त्यावेळी साहेब त्यांना म्हणाले, पगला बाबू तुम्ही कमालीचे व्यक्ती आहात.. तुम्ही ज्योतिषी वगैरे आहात कि काय.? तुम्ही म्हणालात ते सगळं खरं झालं.. 
लाहिरी महाराजांनी मुद्दाम वेड्याचं सोंग घेतलं आणि म्हणाले.. तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात.?
त्यावेळी साहेब म्हणाले.. माझी बायको आता बिलकुल ठीक आहे, आणि ती भारतात यायला रवाना देखील झाली आहे. आजच तिचं पत्र माझ्या हातात पडलं, मी खरोखर खूप आनंदी आहे, माझी बायको भारतात आल्यावर मी तुमची आणि तिची भेट घडवून आणेल.

विसेक दिवसांनी.. पगला बाबू यांना साहेबाच्या घरी बोलावणं आलं. घरी गेल्यावर पगला बांबूना साहेब म्हणाले.. आतमध्ये या, हे पहा इंग्लंड वरून माझी बायको आली आहे. आणि ते बायकोला त्यांची ओळख करून देणार.. तितक्यात, त्या मॅडम त्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या..एकदम खडबडून खुर्चीवरून उठल्या आणि म्हणाल्या.. 

माय गॉड..

साहेब देखील हैराण झाले आणि म्हणाले..का, काय झालं.?
त्यावर त्या मॅडम पगला बांबूना म्हणाल्या.. तुम्ही कधी आलात.?
साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. तू हे काय बोलत आहेस, पगला बाबू कधी आले म्हणजे काय.? 
हे सगळं घडल्यावर..मंद स्मित करत पगला बाबू तेथून गुपचूप बाहेर पडले.

त्यानंतर साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. हा नेमका काय प्रकार आहे.? त्यावेळी त्यांची बायको बोलती झाली.. मला असं वाटतंय मी काहीतरी चमत्कार पाहत आहे. 
ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये होते त्यावेळी.. एकेदिवशी हेच महाशय, माझ्या बेडशेजारी उभं राहून, माझ्या मस्तकावरून हात फिरवत होते. मला आश्चर्याचा धक्का बसला.. कि हा अपरिचित व्यक्ती माझ्या घरात आलाच कसा.?
पण दुसऱ्याच क्षणी यांनी मला अंथरुणावरून उठवत बसतं केलं, त्यावेळी अचानकपणे माझ्या शरीरातील सगळे आजार आपोआप नाहीसे झाले. मला सगळं काही अगदी अजब वाटत होतं, आणि हे महाशय मला म्हणाले.. 
बेटी तू आता अगदी ठीक झाली आहेस. आता तुला कसलाच त्रास होणार नाही,  तिकडे तुझे मिस्टर फार चिंतेत आहेत. आजच त्यांना तू पत्र लिहायला घे.. आणि ताबडतोब जाऊन भारतात जाण्यासाठी जहाजाचं एक तिकीट बुक करून घे. लवकर जा. नाहीतर साहेब नोकरी सोडून इकडे निघून येतील. येवढं बोलून मी काही विचारायच्या आत, अचानक हा माणूस त्या ठिकाणाहून अदृश्य झाला.

लाहिरी महाशयांनी त्यांच्या जीवनात असे असंख्य चमत्कार दाखवले..
लाहिरी महाशय यांचा जन्म, ३० सप्टेंबर १८२८ मध्ये, बिहार मधील घुरणी गावातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. यांच्या वडिलांचं नाव, श्री. गौरमोहन लाहिरी, आणि आईचं नाव.. मुक्तकेशी देवी असं होतं. लाहिरी महाशय यांचे आईवडील अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या वडिलांचा संपूर्ण दिवस.. धार्मिक चर्चेतच निघून जात असे, तर दुसरीकडे त्यांची आई देखील फार मोठी शिवभक्त होती. रोज सकाळी शिवलिंगावर अभिषेक केल्याशिवाय त्या पाणी देखील ग्रहण करत नसत. त्यांच्या आईवडिलांनी यांचं शामाचरण नाव ठेवण्यामागे हेच कारण होतं, कि मुलाचं नाव घेताना आपल्याला मुखातून परमेश्वराचं नाव यावं. श्री शामाचरण हे लहानपणापासूनच धार्मिक विचारांचे होते, त्यांची आई जेंव्हा पूजा अर्चना करायची, त्यावेळी ते अगदी शांतपणे सगळी पूजा मन लाऊन ऐकत असत.

काही वर्षानंतर.. त्यांच्या गावात नदीला फार मोठा पूर आला, आणि नेमकं नदीकिनारीच त्यांचं घर असल्याने, त्या पुरामध्ये त्यांचं राहतं घर आणि शेत देखील वाहून गेलं. या आघाता नंतर, त्यांच्या वडिलांनी आपलं गाव सोडलं आणि ते बनारसला निघून आले.
लाहिरी महाशय यांचे वडील शिक्षित असल्याने.. त्यांनी यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिलं. त्यांनी आपल्या मुलाला, बनारस मधील सरकारी संस्कृत शाळेत घातलं.
शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी.. बंगाली, परशियन, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांवर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं. याचबरोबर त्यांनी.. संस्कृत मधील ग्रंथाचा देखील बराच अभ्यास केला.

कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना.. वयाच्या अठराव्या वर्षी, बनारस येथील.. पंडित देवनारायण सान्याल वाचस्पती यांची मुलगी काशीमणी हिच्यासोबत त्यांचा विवाह जुळून आला. काही वर्षात लाहिरी महाशय यांना.. दोन मुलं आणि तीन मुली झाल्या.
वयाच्या तिसाव्या वर्षी.. लाहिरी महाशय यांना, मिलिटरी इंजिनियरिंग विभागात क्लार्कची नोकरी मिळाली. ज्यामुळे त्यांची बदली भारतातील विविध भागात होऊ लागली. सुरवातीची काही वर्ष त्यांनी बनारस येथे काम केलं. पण त्यानंतर त्यांची बदली.. हिमालय पर्वत शृंखलेच्या जवळ असणाऱ्या राणीखेत या गावात झाली. याठिकाणी ते हेडक्लार्क म्हणून रुजू झाल्याने, त्यांच्या पगारात देखील बरीच वाढ झाली होती.

एके दिवशी ते राणीखेत येथील कार्यालयात निघाले असता.. त्यावेळी त्यांच्या नावाने आवाज देऊन त्यांना कोणीतरी बोलवत होतं. त्यांनी हिमालयाच्या पाहाडावर पाहिलं असता, एक संन्यासी त्यांना बोलवत असताना दिसले. ते संन्यासी अत्यंत वेगाने त्यांच्याकडे आले.. हे संन्यासी अगदी धष्टपुष्ट असे आजाणूबाहू व्यक्ती होते. त्यांच्या शांत दृष्टीमध्ये विचित्र असं आकर्षण होतं. त्यांच्या चेहेऱ्यावर एक मधुर हास्य होतं. ते संन्यासी त्यांना म्हणाले..घाबरू नकोस शामाचरण, मला माहित होतं, कि तू याच रस्त्याने जाशील, मी तुझी वाटच पाहात होतो. आणि ते संन्यासी महाराज त्यांना घेऊन आपल्या गुफेत गेले. लाहिरी महाशय यांना आपल्या गुरुदेवांची भेट झाली, या भेटीदरम्यान गुरुदेवांनी ( बाबाजी ) त्यांना आपल्या शक्तीने निर्माण केलेल्या हिमालयातील शांग्रीला महालात क्रिया योग शिकवला, त्या जादूई महालात बऱ्याच महान संत विभूतींचं त्यांना दर्शन मिळालं. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार.. त्यांनी समस्त जणांना क्रिया योग शिकवला, आजही समस्त भारत वर्षात.. क्रिया योग केला आणि शिकवला जातो. 

लाहिरी महाशयांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात असे अनेक चमत्कार दाखवले, २६ सप्टेंबर १८९५ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या नश्वर देहाचा त्याग करून इहलोकीची यात्रा संपवली, आणि ते अनंतात विलीन झाले. 
बनारस येथे दशाश्वमेध घाटाशेजारी त्यांच्या राहत्या घरात, त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. लाहिरी महाशय आजही आपल्या कित्येक भक्तांना याची देहा दर्शन देत असतात.!!

आज लाहिरी महाशय यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांचा स्मरणार्थ हा लेख लिहावयास घेतला. 
लाहिरी महाशय यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.!!

( लाहिरी महाशय यांच्या आज्ञेनुसार काढण्यात आलेला हा एकमेव फोटो आहे. )

©️ #PΔΠDIT_PΩTTΣR

Monday, December 23, 2024

मैत्री

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज ~ चंद्रशेखर गोखले
-----------------
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.

मैत्री ही एक प्रामाणिक आणि तरल संकल्पना. जिथे आपलं मत व्यक्त करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं तीच खरी मैत्री. प्रत्येकाने मैत्रीचं वेगवेगळं रुप पाहिलं आहे. जीवाला जीव देणारा घनिष्ठ मित्र असावा असं प्रत्येकालाच वाटतं. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं समर्पण मैत्रीमध्ये अभिप्रेत असतं. 'मी माझा' हा माझा चारोळी संग्रह खूप गाजला. या चारोळ्या लिहिल्या तेव्हा मी खूप एकटा पडलो होतो. वाईट प्रसंगांमध्ये साथ देणारं कुणीच नव्हतं. तेव्हा मनात बरेच चित्रविचित्र विचार यायचे. मी बराच वेळ चितन, मनन करण्यात घालवायचो. मी तेव्हा खूप उदास आणि निराश झालो होतो. त्यावेळीच मैत्रीचं खरं मूल्य कळलं आणि मनातले विचार कागदावर उतरवले.

माझ्या आयुष्यातील मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर पत्नी ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आजपर्यंत पावलोपावली तिने मला साथ दिली आहे. आपल्याला समजून घेणारी व्यक्तीच खरा मित्र बनू शकते हे मी अनुभवलं आहे. आयुष्यातली सगळी नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात. मैत्रीचं एकच नातं निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळे आपला जिवलग मित्र कसा असावा हे ठरवता येतं. मैत्री ही खूप छान भावना आहे असं मला वाटतं. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधनं नसतात. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्री जितकी जुनी आणि दणकट तितकीच नाजूकही असते. त्यामुळे ती काळजीपूर्वक जपावी लागते. माझ्या मते पती-पत्नीची मैत्री हे सर्वोच्च नातं ठरू शकतं. कारण पती-पत्नी एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेणारे असतील तर सध्या अस्तित्वात आलेली विभक्त कुटुंबपद्धती लुप्त होईल आणि सशक्त समाज निर्माण होईल.

आजकालच्या चित्रपटांमध्ये मैत्रीची बरीच छान रुपं पहायला मिळतात. 'अजब प्रेम की गजब कहानी', 'वेक अप सिद' अशा चित्रपटांमधून मैत्रीचं सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून घनिष्ठ मैत्रीची उत्तम उदाहरणं पहायला मिळतात. आजच्या पिढीमध्ये मैत्री खोल रुजलेली आहे. पूर्वी मैत्री करण्यासाठी तितकसं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. आजच्या पिढीला ते स्वातंत्र्य मिळालं आहे आणि तरुणाई त्याचा उपभोगही घेत आहे. आजकाल मुलामुलींमध्ये निकोप आणि निखळ मैत्री पहायला मिळते. समाजानेही त्यांच्या मैत्रीला मान्यता दिली आहे. काही ओंगळ प्रकार सोडले तर मैत्रीचं फुललेलं नातं पहायला मिळतं. मैत्री केवळ आनंद आणि समाधान देणारी असते असे नव्हे तर मैत्रीतून बरंच काही शिकायला मिळतं. दृष्टी विस्तारित होते. विचारांच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे मैत्री हे आयुष्याचं सर्वस्व आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

आजकाल मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मैत्री निभावणं सोपं झालं आहे असं म्हणता येईल. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्कात राहता येतं. अशा मनमोकळ्या आणि निकोप मैत्रीची सुरूवात घरापासूनच झाली तर किती मजा येईल ! 'जीवाला जीव देणारे मित्र' असा शब्दप्रयोग बरेचदा केला जातो. पण, ती मैत्री खरोखरच इतकी अतूट आहे का याचा विचार करणंही आवश्यक असतं. 'नुसतं बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही' हे सूत्र मैत्रीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. कारण केवळ एकत्र वावरणारी मुलं-मुली मैत्री निभावू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये मैत्रीचे सूर जुळणं आवश्यक असतं. मैत्री ही निर्व्याजच असली पाहिजे. त्यामध्ये काही स्वार्थ असेल तर त्याला मैत्री म्हणताच येणार नाही. चोवीस तास एकत्र राहिलं म्हणजे मैत्री झाली असं म्हणता येणार नाही. तो केवळ सहवास ठरू शकतो. याउलट वर्षानुवर्षे एकमेकांना न भेटणार्‍या मित्रांमध्येही अतूट नातं टिकून असतं. मी माझ्या बर्‍याच मित्रांना वर्षा-दोन वर्षांनी भेटतो. पण, या कालावधीत आमच्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडलेला नसतो. एकमेकांना भेटण्यातील आतुरता आणि आपुलकी तितकीच टिकून असते. मनामध्ये मैत्रीचा अंश कायम असतो. त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही.

लहानपणापासून केल्या गेलेल्या संस्कारांनुसार 'पोटात माया असली पाहिजे' असं म्हटलं जातं. मैत्रीच्या बाबतीत मात्र हे गणित थोडं वेगळं आहे. मैत्रीमध्ये प्रवाही रहायचं असेल तर ती व्यक्त झालीच पाहिजे. ती व्यक्त केल्याने भावनांना मूर्त स्वरुप प्राप्त होतं. मैत्री अनेक पद्धतींनी व्यक्त करता येते. आपण कोणती पद्धत अवलंबतो यावर मैत्रीचं पुढचं गणित अवलंबून असतं. पूर्वीच्या आणि आताच्या मैत्रीत बराच फरक आहे. वाङमयात आणि साहित्यात मैत्रीच्या कथा वाचायला मिळत असल्या तरी पूर्वीच्या मैत्रीमध्ये थोडा मोजकेपणा होता. मैत्री जपून केली जायची. मैत्री करण्याआधी बर्‍याच बंधनांचा विचार करावा लागायचा, मोकळं होण्याची मुभाही नव्हती. मैत्रीमध्ये मात्र मोकळं होणंच अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने आजची मैत्री खर्‍या अर्थाने आदर्श ठरते. ती उथळ झाली आहे असं काही जणांचं म्हणणं असतं. पण, उथळपणाचं हे प्रमाण नगण्य आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप खूप दंगा घालायचा, मस्ती करायचा. 'झुकझुक गाडी' म्हणून हा ग्रुप प्रसिद्ध होता. आम्ही एका टाळीने सगळ्या मित्र-मैत्रिणींना गोळा करायचो आणि एकमेकांना धरून सगळीकडे झुकझुक गाडीप्रमाणे पळायचो. तेव्हा लोक आम्हाला नावं ठेवायचे. पण, आमच्यासाठी ती एन्जॉयमेंट होती. अभ्यास, असाईनमेंट यासाठी सगळे मित्र-मैत्तिणी एकमेकांवर अवलंबून असायचे. सुख-दु:ख, आनंद अशा कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. म्हणूनच आमच्यामध्ये सशक्त बंध निर्माण झाले. आजकाल अशीच सशक्त मैत्री पहायला मिळते. मुलं-मुली एकमेकांबरोबर मोकळेपणाने वावरतात. इतर लोक त्यांना नावं ठेवत असले तरी एकमेकांच्या मैत्रीची महती केवळ त्यांनाच माहिती असते. शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यापैकी कोणती बाजू निवडायची हे आपल्यावर अवलंबून असतं. स्वातंत्र्य मिळालं र जबाबदारी पार पाडता यायला हवी आणि जबाबदारी अंगावर घेतली तर स्वातंत्र्यही अनुभवता आलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचा दृष्टीकोन संस्कारांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने मैत्रीचं भावविश्व उलगडता येतं. हा दिवस साजरा करावा की नाही, याबाबत बराच उहापोह केला जातो. पण, तो साजरा करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. वास्तविक वर्षाचे ३६५ दिवस मैत्रीचेच असतात. पण तरीही एखाद्या विशिष्ट दिवसाला मैत्री दिन मानायला काय हरकत आहे? मैत्रीचं स्वरुप खूप सुंदर असलं तरी काही ठिकाणी ते खटकतंही. भारत-पाकिस्तान संबंधांबाबत असंच काहीसं म्हणता येईल. हे दोन देश वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यांच्यामध्ये ओढून-ताणून मैत्री निर्माण केली जात आहे. वास्तविक मुळातच जिथे द्वेष असेल तिथे मैत्री होणं शक्य नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तानसारखे दोन शत्रू मित्र होऊ शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे.

(अद्वैत फीचर्स)

चंगो

Sunday, December 15, 2024

सफलता

हम जीतकर रो क्यों देते हैं । वह आंखे,जो हमेशा लक्ष्य पर टिकी होती हैं । जब लक्ष्य को प्राप्त करती हैं, तो छलक क्यों पड़ती है । मुझे जीतने के बाद झरते आँसुओं में छिपे इंसान को देखने का शौक रहा है । मैं इन आंसुओं में गूंथे उसके संघर्ष को देखता हूँ । उसने इसे पाने के लिए क्या क्या नही किया होगा । ज़िन्दगी का सारा संघर्ष,इन आँसुओं के साथ बह उठता है । जब कोई जीतकर रोता है, तब उसकी जीत में छिपी सच्चाई सामने आकर,उसकी गवाही देती है ।
गुकेश डी ने एक सपना देखा और उसके लिए टूटकर संघर्ष किया । बड़ी ही कम उम्र में,सफ़लता का झंडा गाड़ दिया । गुकेश को देखकर, उसकी जीत,उसकी जीत से भीगी आंखे देखकर तबियत बड़ी खुश हुई । मुबाकबाद है उसकी इस विजय को मगर हमें ख़ुद को यहीं टटोलना होगा । गुकेश कि जीत गुकेश के ख़ुद के सपनो की जीत है । वह सपना,जो उसने ख़ुद देखा था । बस यहीं उस फ़र्क़ को पकड़ना है ।

बहुत से लोग गुकेश के सपने को अपने मन में रोप देंगे और यहीं से वह अपने बच्चों में रोप देंगे । फिर एक बेतहाशा भीड़ उछाल मारेगी,ऐसी सफलताओं को अपनी दहलीज़ तक लाने के लिए,बस यहीं पर हमें अपनी सोच को सही रखना है । गुकेश कि तरह अपने बच्चों को खुद अपने सपने बुनने दीजिए । उसे पूरा करने के लिये उसके सारथी बनिये । जब आपका बच्चा अपने सपने को पूरा करेगा,तो उसकी आँखों में भी ऐसे ही तो आंसू होंगे मगर दोस्त,उसकी आँखों में अपना सपना मत बो देना ।

बच्चे की आंखों में परिवार का बोया सपना बड़ा भारी होता है । वह सपना बच्चे को बूढ़ा कर देता है । उसे थका देता है । दूसरों का सपना,सबसे पहले बचपन चट कर जाता है । बस इतना कीजिये, दूसरों की सफलता पर अपने बच्चों की सफ़लता जैसी खुशी प्रकट कीजिये । अपने बच्चे की सफलता,असफलता या रास्ते पर चलने का ऐसे ही आनंद लीजिए,जैसे उसका रास्ता,सिर्फ उसका है और उसने उसपर चलना शुरू कर दिया,चलते रहना भी तो एक सफलता ही है ।

गुकेश की जीत,हम सबके लिए खुशी का पल है । इस जीत की खुशी घर घर पहुँचे मगर यही लक्ष्य,सब दहलीज़ पर न पहुँचे । ज़िन्दगी के हज़ार रँग,हज़ार सफलताएँ हैं । जिस काम को पूरा करने में आपकी आंखों में आँसू आ जाए,वह काम और गुकेश कि सफ़लता एक जैसी है । बस एक के आंसू ख़बर हैं, दूसरे के नही मगर बहते आंसू तो काम एक सा करते हैं ।।आपको थोड़ा हल्का कर देते हैं.... गुकेश को शुभकामनाएं..
#hashtag #हैशटैग

बुद्धीबळ

बुद्धीबळ जिंकण्याच श्रेय पहिलं पालकांना जातं !
Science मध्ये DNA Genes ज्ञान आहे.

दुसरं जिंकणाऱ्याच्या आणि कुटूंबाच्या मेहनतीला ! 

#Gukesh अभिनंदन ✌️👏👏👏

गुकेश वडील सर्जन आणि आई microbiologist आहे!
शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं बुद्धिबळ उत्तम खेळतो म्हणून चवथी पर्यंत शाळा झाली !

बाकी कुटूंब घरात शिक्षण देतच फक्त certificate शाळेत   मिळत  तर कधी समाजात एवढंच!

Sunday, December 8, 2024

Tuesday, November 5, 2024

कलाविष्कार दिवाळी अंक मोफत उपलब्ध

नमस्कार,

आपल्या सर्वांच्या महत्त्वपुर्ण योगदानामुळे आज बलिप्रतिप्रदेच्या म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी कलाविष्कारची दिवाळी ई-अंकाची १५ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

आपण केलेल्या साहित्यरुपी सहभागसाठी मी आणि कलाविष्कार आपला कायम ऋणी राहू.खालील लिंकवर क्लिक करुन आपण कलाविष्कार, दिवाळी ई अंक, ऑक्टोबर- २०२४ नि:शुल्क डाऊनलोड करू शकता.

https://tinyurl.com/Kalaavishkaar-2024

आपल्याला कोणाला हा दिवाळी ई अंक पाठवयाचा असल्यास आपण कृपया लिंकच द्यावी जेणेकरुन एकुण किती जणांपर्यंत कलाविष्कार पोहोचला याची नोंद घेणं सोपं जाईल.

पुढील वर्षीही आपण असाच भरघोस प्रतिसाद द्याल आणि कलाविष्कार  दिवाळी ई अंकाच्या जडणघडणीत आपले मोलाचे साहित्यरुपी योगदान द्याल हीच अपेक्षा !

धन्यवाद !

🪔 卐 शुभ दिपावली  卐  🪔

Monday, November 4, 2024

Monday, October 28, 2024

वसुबारस

वसुबारस !! 

वसुबारस ! अर्थात गोवत्स द्वादशी. नुकतेच नवरात्र संपले आणि बघता बघता सर्वत्र आनंद उत्साह घेऊन दिवाळी आली सुद्धा. दिवाळी ही सणांची राणी म्हणता येईल. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतच्या महोत्सवास आपल्याकडे दिवाळी म्हणतात. हिंदू संस्कृतीत गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानून तिला आपण मातेचा दर्जा दिला. फार पूर्वी पासून गोधनावरून राजेमहाराजांची श्रीमंती ठरवली जायची. गोमातेच्या पावित्र्यामुळे देवादिकांनीही तिला जवळचे स्थान दिले आहे. त्यामुळे सवत्स धेनूपूजनाने दिवाळीची सुरुवात होणे संयुक्तिकच म्हणावे लागेल. 

ततः सर्वमये देवि सर्व देवैः अलंकृते ।
मातः मम अभिलषित सफलं कुरू नंदिनी ॥

म्हणजे हे सर्वात्मिक आणि सर्व देवांनी शोभित अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ पूर्ण कर.

खरंच आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत त्याची रचना पण ज्यापद्धतीने आपल्या पूर्वजांनी केली आहे की त्याबद्दल विचार केला तरी कायमच कुतूहल वाटतं. वसु म्हणजे द्रव्य, धन. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून स्त्रिया दिवसभर उपास करुन संध्याकाळी यथोचित सवत्स धेनूपुजन करतात. बाजरीची भाकरी, गवारीची भाजी इ. चा नैवेद्य दाखवून गाईला खाऊ घालतात. काही लोक यादिवशी  गहू, मूग दुधापासूनचे पदार्थ खात नाहीत.

मानवाप्रमाणेच पशुपक्षांनाही मानाने जगण्याचा अधिकार आहे. हाच तर आजचा खरा संदेश आहे. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य, सुख लाभावे म्हणून केलेली ही गोधनाची कृतज्ञतापूजा असंच म्हणता येईल. अनेकप्रकारे उपयुक्त असलेल्या गोमातेप्रति सहिष्णुता, मानवता व्यक्त करण्याची ही सुसंधी त्याचेच तर प्रतीक आहे. म्हणूनच आज कृतीतून गोरक्षणाचा निश्चय करुया कारण हे सुरक्षित असतील तरच संस्कृती अधिक समृद्ध राहील. 

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.. ✨🌟🎆🎇

सर्वेश

शुभ दिपावली

शुभ दिपावली! 
सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! - अशी माझी ‘शुभ दिपावली’ची शुभेच्छा! 

या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे .

आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी ‘सौंदर्य’ हा शब्द वापरतो आहे. दीपावलीच्या शुभेच्छासुद्धा व्यक्त करायच्या झाल्या तर त्या आहेत ‘शुभ’ दीपावली. अलीकडं पाश्चात्यीकरण, त्यातले ‘इंग्रजाळलेले’, भाषेचं, जाणिवांचं आणि त्यामुळं संस्कृतीचं ‘इंग्रजीकरण’ करणारे आणि त्यापायी आपलं ‘आत्मभान (self-awareness)’ हरवलेले, आपण कोण, आपण कोणत्या मातीत रुजलेलो आहोत, आपली आई कोण, आपण कुठून उगवून आलो या सगळ्याचा जणू विसर पडल्यासारखं आपण जोरजोरात ‘हॅपी दिवाली’ म्हणतो! 

‘हॅपी’ दिवाली! गोष्ट आनंदाचीच आहे, की दीपावली आनंदमय जावो. पण अर्थ आणि त्यामागची भावना, विचार समजल्यामुळं आता अनेक वर्षं मी संज्ञा वापरतो - ‘शुभ’ दिपावली! हा शब्द विलक्षण अर्थपूर्ण आहे. कारण ही दिवाळी ‘आनंदी (हॅपी)’ तर असोच; पण खरा आनंद कशात आहे? कुणाला जर वाटलं ‘हॅपी’ दिवाली म्हणजे सिगरेट-दारू-तंबाखू…’हॅपी दिवाली’ म्हणजे बदललेल्या काळात फटाक्यांमुळं होणारं प्रदूषण. (की जे ‘भारतीय मन’ लक्षात घेतं. भांडायला, खून-खराबा करायला उठत नाही. आपणहून मान्य करून ठरवतं की बदललेला काळ, पर्यावरणाची समस्या पाहता आपण फटाक्यांवर खर्च तरी करायला नको किंवा तो कमी करूया. हा आतून येणारा बदल आहे.) म्हणून ती ‘हॅपी दिवाली’ तर आहेच; पण ती ‘शुभ दीपावली’ आहे. 

भविष्यात आपल्याशी भारतीय संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांवर संवाद करताना कधीतरी अर्थशास्त्र या विषयावर सविस्तर बोलेन. मात्र दीपावलीच्या प्रकाशात आज फक्त ‘शुभ लाभ’ ही संज्ञा सांगतोय. 

पाडव्याच्या दिवशी, बलिप्रतिपदेला नवसंवत सुरू होतं. या दिवशी आपला व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराच्या वह्या-पुस्तकांची पूजा करतो. व्यवसाय सात्विक भावनेनं करायचा आहे, हे त्यामागचं अर्थपूर्ण पावित्र्य. ज्यात मी हिशोब ठेवतो तेच माझे सात्विक, पवित्र धर्मग्रंथ आहेत. या दिवशी व्यापारीबंधू त्या वहीवर स्वस्तिक काढतो आणि ओल्या कुंकवात खाली शब्द लिहितो - शुभ लाभ!

हा फार महत्वाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहे. अर्थशास्त्रात नफा कमावणं (profit maximization) हा हेतू सांगितला जातो. कोणत्याही व्यवसायात हा नफा वाढत गेला पाहिजे. माझ्या मते, हे अर्थशास्त्र ऍडम स्मिथपासून, जॉन मार्शल लॉर्ड केन्स, मिल्टन फ्रीडमन आणि कालपर्यंत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यांनी मांडलेलं पाश्चिमात्य अर्थशास्त्र आहे. हा नफा कमावत असताना मी कुणाचं शोषण करतो आहे का, कुणाचं नुकसान होत आहे का, अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झाल्यास व्यापारातून भरमसाठ नफा कमावताना त्याची किंमत पर्यावरण चुकती करत आहे का? हा नफा आहे; मात्र तो ‘शुभ लाभ’ नाही. व्यवसाय चालवायचा असेल तर ‘लाभ’ म्हणजे नफा हवाच. मात्र तो दुसऱ्याला लुटून, त्याचं शोषण करून, खोटं बोलून, फसवून नाही. व्यापार करणं किंवा जीवन जगणं ही win win situation असायला हवी. ग्राहक म्हणून मी तुला वस्तू किंवा सेवा दिली, त्यातून तुझं आणि माझंही घर चालायला हवं. म्हणून त्या व्यवसायातून नफा म्हणजे लाभ आवश्यक आहे; पण तो ‘शुभ लाभ’ असायला हवा. तशी दीपावलीची ही शुभेच्छा - ‘शुभ’ दीपावली!

मला हे म्हणायला आवडतं, कारण ती माझ्या हृदयातली खरीखुरी भावना आहे की मुळातच - सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! या अवस्थेत मी मुख्यतः जगतो. अशा ‘सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा’ कायमच्याच आहेत; मात्र दिवाळी हे त्या व्यक्त करण्याचं एक चांगलं निमित्त. म्हणून ‘शुभ दिपावली’. आपल्या सर्वांना सुख, समाधान, यश, आनंदा लाभो. येणारं नवं संवत, आपलं जीवन सुख, समाधान आणि आनंदानं भरून जावं. आपल्यातून समाज, देश, विश्व आणि निसर्गसुद्धा सुख, समाधान आणि आनंदानं भरला, भारला जावो.
© Avinash Dharmadhikari sir

****

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा  💐