Friday, October 11, 2024
रतन टाटा .. हृयशल्य
हृदयशल्य!
तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही....मायेची सावली लागते माणसाला.
आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती,ज्ञानदेव,सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती..याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं.
आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.
नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.
पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला..स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा,राजबिंडा तरुण. सालस,सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे,शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही,सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं......त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.
तो आला तसा इथलाच झाला. आजी,धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले..पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती.
कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना.....लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.
लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.
काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या...पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला....त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता...ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते!
अगदी तसंच झालं.....देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.
नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात,त्यांची झाडं होतात,त्यांना बहर येतो,कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं.....अनेकांचं आश्रयस्थान बनतं.
हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले...नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.
आपल्या मनातील प्रेमाच्या,त्यागाच्या,समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं....त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही....! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.
तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली...एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला....हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.
रतनजी टाटा....नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत....विश्व जाले वन्ही....संते आपण व्हावे पाणी....हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले....भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!
(संभाजी बबन गायके. 9881298260.)
माहिती समाज माध्यमांतून साभार.
या लेखाचे भाववाचन सौ.सुवर्णा बोडस (आकाशवाणी निवेदिका) यांनी खूप छान केले आहे. त्याची link हवी असल्यास पाठवेन.
रतन टाटा ....
"रतन टाटा" यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी- लेखक - मनश्री पाठक।
१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता... साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं... एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी , त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती...
२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते... सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली... `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं...
३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले... आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला... काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली... तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला... `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या...चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´... केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले
४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला... एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही...बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली... अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या... त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली... शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-
`टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´ ... बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं -
`टॅक्सी´से जाते है... स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच... शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला
५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं... माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता... काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते... समोरुन टाटांचं पार्थिव गेलं , पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते...डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या...
६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता... ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले... तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले... भेट झालीच नाही
७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला... हा पण तिथला लहानसा उद्योजकच... मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला
८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला... एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली... यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात...या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती... रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं
९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच...पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला... त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली...
१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता... आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन
`टाटांचंच पाणी´ पुरवत होता...
Manshree Pathak।।।।
आपल्या देशाचा खरा मान, सन्मान, अभिमान आता हरपला आहे!.. देशावर देशातील लहान थोर जनतेवर निस्वार्थी आणि निस्सीम प्रेम करणारे मौल्यवान रत्न आपल्यातून दूर निघून गेले. आपल्या औद्योगिक कौशल्याने आपल्या देशाचं नाव साता-समूद्रा पलीकडे नेणारे देशातील लाखो जनतेचा आधार, खरे देशभक्त आपल्यापासून दूर निघून गेले. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारी अत्यंत दुःखद घटना. 😢
अशा प्रेमळ, थोर, पद्मविभूषण "श्री. रतनजी टाटा साहेब" यांना हृदयाच्या खोल अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली..!! 🇮🇳 🌹🙏