Monday, July 20, 2026

news

The Maharashtra Food and Drug Administration (FDA) has launched an AI-powered citizen complaint portal to make reporting food adulteration, fake medicines and substandard pharmaceutical products faster and easier. Announcing the initiative, FDA Commissioner Tukaram Mundhe said citizens can file complaints by speaking in Marathi, Hindi or English, and the AI system will automatically convert them into structured written complaints before forwarding them to the concerned officer. The portal also offers complaint tracking, real-time updates and an auto-escalation system to ensure timely action and greater transparency.

FDA Helpline: 1800 222 365

#PuneTimesMirror #TukaramMundhe #FDA #AI #FoodSafety


Sunday, July 19, 2026

मराठी शिक्षक आणि मुलांमधला अनुभव

मी बरीच वर्षे ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे क्लास घेत होते, दोन वर्षांपूर्वी काही वैयक्तिक अडचणींमुळे मी ते क्लास घेणे बंद केले. त्यावेळी मला काही पालकांचे फोनही आले होते "मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा मराठीचा क्लास सुरू करा." पण कधी कधी इतर कुणी तरी निर्माण करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं नको वाटतं. त्यामुळे मी 2020 नंतर ICSE बोर्डचे ऍडमिशन घेणे बंद केले. त्यादरम्यानच 2019 च्या  मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात अरव नावाच्या एका विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी अरव नववीत गेला होता. 

तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी त्याची फिस परत करून अरवची ऍडमिशन कॅन्सल करू शकत नव्हते. त्यामुळे नववी आणि दहावी हे दोन्ही वर्ष मी अरवला (एकट्याला) ऑनलाइन क्लास घेऊन शिकवले.

आज अरवचा दहावीचा रिझल्ट लागलाय. त्याच्या आईचा धन्यवाद म्हणून मेसेज आलाय! अरवने फोन करून सांगितलं, "मॅडम मला सगळ्यात जास्त गुण मराठी विषयात मिळाले आहेत" ऐकून फार बरं वाटलं.  इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी कायमच खूप अवघड वाटते त्यामुळे त्याला शुभेच्छा देतांना मी हसत हसत म्हणाले "आता इथून पुढच्या आयुष्यात तुझा कधीच मराठीशी संबंध येणार नाही, सुटलास तू!" त्यावेळी अरव आनंदाने उत्तरला "मॅडम घरात तर मराठीच बोलणार ना आणि मला ज्या विषयात सर्वाधिक  गुण मिळालेत ती भाषा मी सोडणार कशी! उलट मी पुढच्या पिढीला देखील ती भाषा शिकवेल" पंधरा वर्षाच्या अरवचे हे शब्द ऐकून क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. जुने दिवस आठवले. त्या मुलांचा गोंगाट, लेखनसराव करतांना शॉर्टकट्स मारून लिहिलेली त्यांची उत्तरं, त्यांचा पिज्जा पार्टीचा हट्ट, मी रागवले म्हणून कधीतरी त्यांनी मला लिहिलेली माफीची पत्रं... असं बरंच काही आठवत राहिलं. 

आज अरवच्या निमित्ताने ते सारं काही ऑफिशियली संपलं. यापुढे त्या जागेवर ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच मला मराठी शिकवता येणार नाही..! याची एक बोचरी जाणीवही झाली. खरंतर माणूस काही जागा नाईलाजाने सोडतो पण ती जागा सोडताना का होईना आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला...याचा आनंद खूप जास्त असतो. अर्थात याचं श्रेय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी माझ्यातील शिक्षक अधिकाधिक प्रगल्भ बनवला!

अभिनंदन अरव 🌹🌹🌹 
खूप खूप मोठा हो बाळा

@ ज्योती भारती

नाती तुटताना...

"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.

खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता. 

एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.

शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.

©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati

Friday, July 17, 2026

Tuesday, July 14, 2026

पन्नाशीच्या उंबरठयावर

अल्लडपणा पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो तेव्हा समजतं आपण पन्नाशीला आलो!! तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे ' पन्नाशी पार करताना.." हे वय म्हणजे अनेक अनुभवांची शिदोरी तुमच्या गाठीशी असते. व.पु. म्हणतात तसं, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.." हे देखील समजलेले असते. पुरुष असो किंवा स्त्री, नोकरीची जेमतेम आठ ते दहा वर्ष फक्त राहिलेली असतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षा पासून नोकरीला लागलेला तो जेव्हा पन्नाशीत स्थिरावतो तेव्हा तो अख्खा प्रवास किती कठीण होता, त्या वेळी किती स्थित्यंतरे अनुभवावी लागली हे त्याने जवळून पाहिलेलं असतं. स्त्रियांना देखील कष्ट चुकलेले नाही. नववधू म्हणून पाऊल टाकणारी ती खरं तर तितकी परिपक्व नसते. पण, व.पु. म्हणतात तसं, संसाराचा धूर डोळ्यात जाऊन तिला संसारातली मजा कळते. हे वय तसं म्हटलं तर कष्ट करण्याचं नाही. जरी पन्नाशी असली तरी, तरुण वयात जी धावपळ तुम्ही करता ती पन्नाशीत नाही करता येत. एक उदाहरण देते, समजा सकाळी ७.५० ची ट्रेन तुमच्या डोळ्यासमोर जात असेल तर तुम्ही ती धावत जाऊन पकडू शकता, कारण त्या वयात रक्त हे सळसळते असते,हेच पन्नाशीत आल्यावर काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी सतावतात..
 सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माणूस ओळखायला शिकलेले असता. स्त्रियांना तर एक गोष्ट चांगलीच माहित असते ती म्हणजे, नाती जपणं हे त्यांनी आत्मसात केलेलं असतं. व.पु. जसं म्हणतात, " कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते.." हे त्यांनी जाणलेले असते. हिच शिकवण त्या आपल्या मुलीला देतात. अहो आयुष्याची पन्नास वर्षे काढणं म्हणजे सोपं आहे का?? जे केस पांढरे होतात ते असेच होत नाही ना. त्या मागे अनेक उपेक्षेचे हुंदके असतात, नाईलाजास्तव कराव्या लागणाऱ्या तडजोडी असतात. न सांगता येणाऱ्या व्यथा असतात. मुला मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं याचा देखील विचार करावा लागतो. काही प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. शरीराला काहीसं जडत्व येतं. आपण सर्व मध्यमवर्गीय माणसं आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी, सुख शोधणारी. या वयात सुखद धक्के आनंद देतात पण वेदनांचा हुंकार नेहमीच मांडता येत नाही. हे वय म्हणजे मुला मुलींचे मित्र मैत्रिण व्हायचे वय असते. नव्याने संसार सुरू करणाऱ्या मुलीला तिची आई हीच एक चालती बोलती मैत्रीण असते. कारण, आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. सगळ्यात महत्वाचं इथे लिहायचं म्हणजे, या वयात एकमेकांचा सहवास हा फार महत्वाचा असतो. ' प्रथम तुज पाहता जीव वेडावला.' हे तरुणपणी म्हणून झालेलं असतं परंतु, आता ' तु अशी जवळी रहा..' हे म्हणावं लागतं. कारण, एकदा का मुलं मुलींची लग्न झाली की तेच दोघं एकमेकांसाठी असतात. आयुष्याची पुढची वर्ष ही जपणूकीसाठी असतात. कधीतरी त्याने चहा करणं, कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं. ती देखील तारुण्यात म्हणतेच की, ' बनात ये ना जवळ घे ना..' पण जशी तिची पन्नाशी उलटते तेव्हा ती देखील म्हणते,' घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे..' 
 हे वय म्हणजे आरामाची खऱ्या अर्थाने गरज असणारे वय. कुठेतरी थकलेल्या जीवाला विसाव्याची गरज असतेच ना!! पन्नास वर्षे जेव्हा तुम्ही आयुष्य जगता म्हणजे ते निव्वळ जगणे नसते तर कितीतरी वेळा स्वतःचं मन मारुन समोरच्याचं मन दत्तक घ्यावं लागतं. पुरुषांना देखील हे चुकलेलं नसतं. स्वतःच्या लग्नात आनंदात असणारी ती दोघं मुलीच्या लग्नात मात्र सनईचे सुर ऐकून हळवे होतात. खरंच, ही पन्नाशी म्हणजे आयुष्यातलं एक सोनेरी पान,तसंच अनेक आठवणींचे आणि अनुभवांचे नजराणे देतं हे मात्र खरे.. कारण, नेत्र हे पैलतीरावर पोहोचण्या आधी आयुष्याचा महोत्सव साजरा जर केला नाही तर काय उपयोग..
                                   .. मानसी देशपांडे 
                                                  विरार.

बुद्धीचा महिमा

बुद्धीचा महिमा 

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय ? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.

वेद किती आहेत ? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही , एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.

जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.

काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.

भारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेश्वराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.

नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत, संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असे एकही तत्त्व निःशंकपणे अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.

असे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. "बुद्धेःफलमनाग्रहः"- कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला "यथेच्छसि तथा कुरु" असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. "अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे" असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. "मनः पूतं समाचरेत्" या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तमुक तत्त्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.

-साने गुरुजी 
( भारतीय संस्कृती )



Friday, July 10, 2026

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र,

प्रिय सुधा...

त्या दिवशी थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणंजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपटप आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात नाही? मी खिडकीतू बाहीर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावर फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावंसाळा अजुन नाही सुरु झाला. होइल लवकरच. ढग दोन आले होते,रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळ्या आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणंजे विश्वंभराचे मुक भाव गीत आहे.! खिडकीतून मध्य रात्री माझ्या सारख्या कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गमतीच्या वाटतात.आज दादा नाहीत,वैनी नाहीत,परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच नाही? 

जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर,आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या रात्री आपल्या सभोवती आहेत. सांयकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटे व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वभंराचे भालदार चोपदार! अनंत रंगाची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चालु असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येउ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो!

रवीद्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्युचे स्मरण करुन द्यावयाच्या. जणू रोज सांयकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे,जगाचे थोडक्यात रुपात्मक नाटक बघत असतो...

सुधा,मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे परंतू आता हे शेवटचे साप्ताहीक पत्र. आता मी तुला केंव्हा तरी अधून मधून लिहीन. परंतु आता बंधन नको....!

तुझाच
आण्णा {सानेगुरुजी}
10 जून 1950

Sunday, July 5, 2026

लग्न व्यवस्था

लग्न आंधळं नसावं

आज लग्न जुळवताना बहुसंख्य लोकांची नजर सर्वप्रथम कशावर जाते?

घर किती पॉश आहे... 
दारात किती गाड्या उभ्या आहेत... 
बँक बॅलन्स किती आहे... 
वडिलांचा व्यवसाय किती मोठा आहे... 
लग्नात किती थाटमाट होणार आहे...

दुर्दैवाने अनेकांची मानसिकता अजूनही या तामझाम आणि श्रीमंतीला भाळते.

फार कमी लोक विचारतात...
हे वैभव प्रामाणिक मार्गाने उभं राहिलं आहे का? 
या घरात माणुसकी, संस्कार आणि विश्वास आहे का? 
मुलगा किंवा मुलगी रागावर नियंत्रण ठेवतात का? 
व्यसनं आहेत का? 
स्वभाव समंजस आहे का? 
मतभेद झाले तर संवाद साधतील की नातंच संपवतील?

कारण बाहेरून चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. 
संगमरवरी भिंती असल्या म्हणून घर सुखी असतंच असं नाही आणि साध्या घरातही आयुष्यभर पुरेल इतकी माणुसकी दडलेली असू शकते.

आज ज्या घटना समाजाला हादरवतात, त्या आपल्याला एकच धडा देतात—

लग्न करताना बँक बॅलन्स नव्हे, मनाचा बॅलन्स तपासा.
गाडीची किंमत नव्हे, माणसाची किंमत ओळखा.
बंगल्याचा आकार नव्हे, विचारांची उंची पाहा.

कारण संसार पैशाने उभा राहू शकतो... 
पण तो टिकतो फक्त स्वभाव, चारित्र्य, विश्वास आणि परस्पर आदरामुळे.

- अशोक मानकर


बरोबर पण आज काल भौतिक गोष्टीचा जास्त विचार केला जातो काहींना वाटत असावे त्यात सुख .. पण स्वभाव मन जुळली नसतील तर संसार टिकणे कठिणच !

Saturday, July 4, 2026

मृदुंग मसाला भजी..

मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे. 
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो. 
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली. 
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली. 
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले. 
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी. 
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा. 
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल. 

सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020

Sunday, June 28, 2026

आयुष्य सुंदर आहे


तुमच्यासाठी एक छोटी मराठी लघुकथा:

आयुष्य सुंदर आहे

एका गावात एक वृद्ध माणूस रोज सकाळी बागेत फिरायला जायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. एक तरुण त्याला रोज पाहायचा आणि एके दिवशी विचारलं,

"आजोबा, तुमच्या आयुष्यात कधी दुःख आलं नाही का?"

आजोबा हसले आणि म्हणाले, "दुःख तर खूप आलं. काही माणसं सोडून गेली, काही स्वप्नं अपुरी राहिली, काही संधी हातातून निसटल्या. पण मी प्रत्येक सकाळी एक निर्णय घेतला—आज जे आहे त्यात आनंद शोधायचा."

ते झाडाकडे बोट दाखवत म्हणाले, "हे झाड पाहिलंस? प्रत्येक शरद ऋतूत त्याची सगळी पानं गळून पडतात. पण ते कधी रडत नाही. कारण त्याला माहिती असतं की पुन्हा वसंत येणार आहे."

त्या दिवशी तरुणाला एक मोठा धडा मिळाला.

बोध: आयुष्य परिपूर्ण नसतं, पण योग्य दृष्टीकोन असेल तर ते नक्कीच सुंदर असतं. 🌿

Friday, June 26, 2026

Wednesday, June 24, 2026

Monday, June 22, 2026

वाचकांची प्रतिक्रिया

लोकप्रिय लेखक , कवी आणि तरूणाईचा लाडका चारोळीकार चन्द्रशेखर गोखले यांच्या " मनोवेधस " या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ८/१/२०२२ रोजी प्रकाशित झाली.शेखरची पत्नी सौ. उमा गोखले प्रकाशक असलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने .....१८ एप्रिल १९९० या दिवशी पारल्यातील दिक्षीत रोड वरील अनिरुध्द सोसायटीच्या गच्चीवर आमच्या शेखरच्या " मी माझा" या पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले..ज्येष्ठ लेखक , नाटककार आणि पत्रकार श्री. विजय तेंडुलकर यांच्या हस्ते..शेखरची 'नीलाताई ' या नात्याने त्या प्रकाशन सोहळ्यात माझा ही सहभाग होता. अल्पावधितच ' मी माझा ' ला प्रचंड यश आणि प्रसिध्दी मिळाली...शेखर तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला.
शेखर प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मी त्याच्या अंगी असलेले विविध गुण पारखत होते.माझ्याकडे तो काही विषय शिकण्यासाठी येत होता. परंतु शाळेतल्या अभ्सासापलिकडचा शेखर सतत माझं लक्ष वेधून घेत होता.
चित्रकार शेखर , लीलया नृत्याविष्कार करणारा शेखर आणि सतत काहीतरी वेगळा विचार करणारा....गोष्टी लिहिणारा शेखर...दबलेला...घाबरलेला शेखर...कारण त्या बालवयात ज्या गुणांसाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप त्याच्या घरातून मिळायला हवी होती ती नाही मिळाली ..त्या ऐवजी " धपाटे"च खावे लागले. ५० वर्षांपूर्वीचा काळ आणि मध्यमवर्गीय व्यवहारी विचारसरणी लक्षात घेता ती पालकांची चूक होती असेही म्हणता येणार नाही कारण ' याने तुझं पोट भरणार आहे का ? ' हा त्यांचा प्रश्ण परिस्थितीजन्य होता शिवाय ' बाल मानसशास्त्र आणि पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास ' हे विषय तर त्याकाळी कोसौ मैल दूर होते.....असो !!
   चार दिवसांपूर्वीच शेखरने मला त्याचे नुकतेच प्रकाशित झालेले " मनोवेधस " पाठवले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या....उगमापाशी नदीची बारीकशी धार असते
             प्रवाह पुढे पुढे जायला लागतो
   नदी अथांग सागराशी एकरूप होते
   तिचा प्रवास थांबतो....प्रवाह नाही...
जशी " मनोवेधस "ची सप्तरंगी कथा....मला खूप भावली ! तुम्हाला ही भावेल ! जरूर वाचा !!!!!
शेखर , उमा तुम्हा दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद !!   तुमची
                नीलाताई ( नीला रवीन्द्र )
                 १५/२/२०२६

Saturday, June 6, 2026

द लॉस्ट बॅलन्स कादंबरी



** दखल ** 
द लॉस्ट बॅलन्स..कादंबरी (अनघा प्रकाशन) 
1. ललित : रुक्ष विषयाला संवेदनशीलतेची जोड देणारी महत्वाची कादंबरी.
2. महाराष्ट्र टाइम्स : तोल ढळलेल्या माणसांची गोष्ट.
3. साप्ताहिक सकाळ :सुन्न अनुभव देणारी कादंबरी.
4. सामना :अर्थकारणाचा संमिश्र आलेख.
5. सकाळ अवतरण :एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन.
6. लोकमत : बँक विश्वातील कोलाहलाचा पंचनामा.
7. ठाणे वार्ता :समकालीन विषयाचा भयाण पट 
8. ठाणे वैभव :दुभंगलेल्या जाणिवांचा विस्तृत पट. 
9. महाराष्ट्र दिनमान : कथा एका आर्थिक घुसमटीची. 
10. समरसता साहित्य पत्रिका :झिरो बॅलन्सची शोकांतिका.
11. दखनी स्वराज्य :आर्थिक गर्तेत सापडलेल्या माणसांची कथा.
12. वृत्तप्रकाश : डेबिट पडलेल्या माणसांची कथा.
समस्त संपादकांचे, समीक्षकांचे मनापासून आभार. कादंबरी सवलतीत मिळवण्यासाठी फक्त फोन करा. 9869014319. धन्यवाद.


Thursday, June 4, 2026

मराठी emagazine नियतकालिक

साहित्यिक आणि कलावंत यांच्यासाठी -कला-आणि साहित्यास वाहिलेले "नियतकालिक अक्षर मराठी online"

-----------------------------------------

मराठी साहित्याचा प्रसार व्हावा आणि साहित्यिक ,कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ' ईअक्षरमन ' द्वारे नियतकालिक स्वरूपात ई-बुक प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तरी ज्या साहित्यिक आणि कलावंत यांना उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले साहित्य (प्रकाशित असेल तर काव्यसंग्रह किंवा कथासंग्रहाच नाव , अप्रकाशित असेल तर ब्लॉग लिंक or fb post लिंक ) पुढील पत्यावर ई-मेल द्वारे पाठवायचे आहे.

Email id : eaksharman@gmail.com

टीप : आपल्या साहित्यासोबत वाचकांना संपर्क साधण्यासाठी gmail id देणं जरुरी आहे .

विषय :

संपादकीय लेखन

शब्दोत्सव (एक कवी एक कविता )

काव्यतरंग (एक लेखक एक लेख )

ओळख साहित्यिकांची

कलादर्शन (Photography,Calligraphy,चित्रकला इत्यादी )

बोलीभाषा प्रशिक्षण उपक्रम

समाजकारण (राजकीय आर्थिक देश आणि राज्यातील घडामोडी )

देश-विदेश

पुस्तक परिचय : कथासंग्रह , काव्यसंग्रह (Hardcopy Books, Ebooks)

दिनविशेष

मैत्रीचा कट्टा (ओळखीच्या साहित्यिक मित्राचे साहित्या बद्दल लेख)

समाज प्रबोधन लेखन : सामाजिक उपक्रमाची माहिती

साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची माहिती (Event Updates)

मराठी संस्कृती (दशावतार ,कला , पोवाडा , गोंधळ , सण उत्सव इत्यादी )

लेखक-कवींच्या लेखन-प्रवास विषयक परिचय

महाराष्ट्र दर्शन : पुणे , कोल्हापूर , कोकण,अलिबाग , किल्ले इत्यादी ) लेख

---------------------------------------------

Blog @ https://eaksharman.blogspot.com




Tuesday, June 2, 2026

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातला चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर तो माणसांना जोडणारा एक धागा आहे.

पावसाळ्याची एखादी सकाळ. बाहेर नारळाच्या झाडांवर पावसाचे थेंब टपटपत असतात. अंगणात ओलसर मातीचा सुगंध दरवळत असतो. अशा वेळी आजीच्या हातचा उकळता चहा स्वयंपाकघरातून येतो. पितळेच्या भांड्यात उकळलेला, थोडी वेलची आणि भरपूर माया मिसळलेला.

गावात कोणाच्याही घरी गेलं की पहिला प्रश्न असायचा, "चहा घेणार ना?" त्या एका कपात आपुलकी, चौकशी, गप्पा आणि नात्यांचा गोडवा भरलेला असायचा. चहा पिताना शेजारच्या घरच्या बातम्या, समुद्राच्या लाटांच्या गोष्टी, आंब्याच्या बागेचे हिशेब आणि जुन्या आठवणी रंगत जायच्या.

संध्याकाळी समुद्रकिनारी बसून घेतलेला चहा तर अजूनच खास. समोर मावळणारा सूर्य, खाऱ्या वाऱ्याची झुळूक आणि हातात गरम चहाचा कप. त्या क्षणी आयुष्य खूप साधं आणि सुंदर वाटायचं.

आज शहरात अनेक प्रकारचे चहा मिळतात, पण कोकणातल्या त्या मातीच्या सुगंधासोबत, आजीच्या हाकेसोबत आणि पावसाच्या सरींसोबत मिळालेल्या चहाची चव अजूनही मनात ताजी आहे.

"कोकणातला चहा आणि त्याच्या आठवणी मनातून कधीच उतरत नाहीत." ☕🌴🌧️

@ eaksharman

Sunday, May 24, 2026

पुस्तक परिचय

आजच्या तरुण भारत, जळगाव आवृत्तीत समीक्षक, लेखक श्री किशोर कुलकर्णी यांनी माझ्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई ( अनघा प्रकाशन, ठाणे ) या पुस्तकावर लिहिलेलं पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कुलकर्णी सरांचे मनापासून आभार. सोबत परीक्षण टेक्स्ट स्वरूपात खाली दिले आहे. 

*झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत* 
राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. अनघा प्रकाशन यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.
सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी ४० छोट्या पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.
झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले, नियतीने कठोर वळण घेतले; पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

 जळगाव जिल्ह्यातील पारोळा भुईकोट किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा संबंध अत्यंत ऐतिहासिक, भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
लक्ष्मीबाईंचे आणि आपल्या कान्हदेशाचे अत्यंत भावनीक नाते आहे. पारोळा हे गाव केवळ ऐतिहासिक किल्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर झाशीच्या राणीच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेही विशेष ओळखले जाते. पारोळा येथील किल्ला नेवाळकर घराण्याचा होता. झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे नातेवाईक असलेल्या नेवाळकरांनी हा किल्ला उभारला होता. स्थानिक इतिहासानुसार राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तांबे कुटुंबही पारोळा परिसराशी जोडले गेले होते. त्यामुळे पारोळ्याला “झाशीच्या राणीचे मूळ गाव” अशीही ओळख मिळाली. संबंधातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणींचे दत्तक पुत्र दामोदरराव (जन्मनाव आनंदराव) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ रोजी पारोळ्यात झाल्याची नोंद आढळते. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. पुढे हाच आनंदराव झाशीच्या गादीचा दत्तक वारस बनला. 
आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली, तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही; तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

पुस्तक परिचय - किशोर कुळकर्णी, जळगाव. मो. ९४२०६०७०५९