Sunday, August 2, 2026
पुस्तक परिचय
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या साईड इफेक्ट्स ( डिंपल पब्लिकेशन ) या गूढकथा संग्रहाचे पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कवयित्री, अनुवादक प्रा सुजाता राऊत आणि म.टाइम्सचे संपादक यांचे मनापासून आभार. संपूर्ण परीक्षण text स्वरूपात खाली दिले आहे.
** मनाच्या डोहातील गूढ तरंग **
मानवी मनाचे पदर अनाकलनीय अतर्क्य व अथांग आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड Mystery म्हणजे गूढ याविषयी बोलताना म्हणतो खरं गूढ हे बाह्य गोष्टीत नसून मनाच्या आतच दडलेलं आहे व हा मनाचा प्रवास थक्क करणारा आहे.
लेखक, चित्रकार, कवी रामदास खरे यांच्या साईड इफेक्ट्स या गूढ कथासंग्रहाचे वाचन करताना आपल्याला याचा प्रत्यय येतो. मराठीत रहस्यकथा,भयकथा, गूढकथा यांना सहसा एकच मापदंड लावला जातो. पण या तीनही कथाप्रकारांची स्वतःची अशी शक्तीस्थळं आहेत. त्यातही गूढकथेचा आवाका मोठा आहे. फक्त रहस्य उलगडणे किंवा वाचकाच्या मनात थरार निर्माण करणे यापुरतीच गूढकथा सीमित नाही.
उत्कृष्ट साहित्यरचनेसाठी आवश्यक असणारे काही घटक असतात ज्यामध्ये पात्रनिर्मिती,वातावरण भवतालाचे तपशील व मुख्य म्हणजे मनाचा प्रवास असतो. प्रस्तुत गूढकथासंग्रहात हे सर्व घटक संतुलित पद्धतीने आले आहेत.म्हणूनच या कथा परिणामकारक ठरतात. या सर्व कथांमध्ये प्रथमपुरुषी किंवा तृतीयपुरुषी निवेदन आहे. त्यातून कथा उलगडत जातात. गूढकथा आहेत म्हणजे सतत भीतीची काळीशार सावली जाणवत राहील असा लेखकाचा कुठेही प्रयत्न नाही. उलट अगदी सहज नेहमीच्या संवादातून या कथा उलगडतात.
सरप्राईज ही कथा मैथिली व मिलिंद या दांपत्याची आहे. भर पावसाळ्यातल्या दिवशी मैथिलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद सरप्राईज देणार असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? कोणतं सरप्राईज मिळतं हे उत्तम रीतीने लेखकाने हाताळलेलं आहे. ड्रीमलँड या कथेतला नायक व त्याचा मित्र जगू या दोघांच्या संवादातून उलगडत जाते. जगूला पडणाऱ्या स्वप्नांनी नायकाबरोबरच आपणही अस्वस्थ होतो. पण शेवटी जगूच्या आयुष्यात काय घडतं? हे मुळातून वाचलं पाहिजे.
मानवी आयुष्याचा प्रवास हा सरळ रेषेसारखा नाही. नियतीचं अतर्क्य असं गूढ त्यामध्ये दडलेलं आहे. मुख्य म्हणजे मनाच्या या डोहामागे काय अद्भुत गहन तरंग लपलेले आहेत याचा अंदाज आपण लावू शकत नाही. रामदास खरे यांच्या सर्वच कथांमध्ये हे समान सूत्र दिसतं.
कोंड ही यातील एक उत्कृष्ट कथा आहे. गावच्या जमिनीचा व्यवहार बघायला आलेला मध्यमवयीन नायक,तिथे भेटलेली नाजूक पावलांची राधा, तिच्या आयुष्यातला पेच हे साकारत जातं. या कथेचा शेवट अगदी वेगळा व कथेला उंचीवर नेणारा आहे. लेखकाचे संवाद नेमके व सहज आहेत आणि भाषा चित्र समोर उभी करणारी आहे. शब्दांचा वापर अचूक आहे. उदाहरणार्थ “आठवणींचा आग्यामोहोळ फुटलेला. माझ्या कृश गात्रांच्या फांद्यावर हट्टाने चिकटून बसलेला आठवणींचा सनातन थर. घाटांची आवर्तन सुरू झालीयेत” अशा पद्धतीचे वर्णन व निवेदन अनेक कथांमध्ये आढळते. अबाधित या कथेतील देवचाराचे वर्णन खिळवून टाकेल असे आहे. या कथेत व इतरही काही कथांमध्ये कोकणचे, तिथल्या भवतालाचे संदर्भ व वर्णन येते. गूढ फक्त घटनांमध्ये नसते, ते भवतालात, चराचरात, आसमंतात भरलेले असते. मनाच्या आतल्या प्रदेशात तर असतेच असते. कोकणची ही पार्श्वभूमी काही कथांमध्ये एखादे मुख्य पात्र असल्यासारखी समोर येते. “निळभोर आभाळ ,विस्तीर्ण नदीकाठ, हिरव्या गर्द डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेली. झाडांच्या उलट्या सावल्या पाण्यात विरघळत चालल्यात शांतपणे. कसलीही घाई नाहीये .सगळं कसं निस्तब्ध निवांत. पेंटिंग साठी पोषक वातावरण” हे कोंड या कथेतील वर्णन.
काळीशार गर्द सावली, जाळं, नेक्स्ट अशा अनेक कथांमध्ये पात्रांचा भवताल व घटना त्यातील नाट्य फुलवलेले आहे. अनेक कथांचा शेवट हा सूचक आहे. त्यातील गूढ वाचकांना खुणावत राहतं. काही कथांमध्ये बरेच तपशील येतात. उदाहरणार्थ नेक्स्ट ही कथा. पण कथेची घडण होण्यासाठी ते आवश्यक वाटतात. या कथा फक्त घटना समोर ठेवत नाहीत तर त्यामध्ये गुंतलेल्या माणसांचे मनोव्यापारही समोर येतात. या सर्व कथांची गुंफण सहज आहे. रहस्य समोर ठेवायचं, वाचकाला भयाने गारद करावं किंवा उगाच संमोहाच्या आवर्तात ठेवावं अशी कुठलीही भूमिका नाही. उलट प्रवाही निवेदनात कथा समोर येतात. काही कथांचा पैस मोठा आहे. उदाहरणार्थ डायरी, मुक्ती या कथा. त्यासाठी अधिक विस्तृत स्वरूपात खोल आशय या कथा नक्कीच व्यक्त करू शकतात.यापुढे लेखकाने अशा पद्धतीच्या दीर्घकथा लेखनाकडे वळावं असं वाटतं.
डिंपल प्रकाशनाने त्यांच्या परंपरेला साजेशी अशी पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजचे महत्त्वाचे कथालेखक व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी समर्पक शब्दात पुस्तकाची पाठराखण केली आहे. लेखकानेच या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. त्यातील गडद लाल,केशरी काळ्या रंगात या कथांचे साईड इफेक्ट चित्रित झालेले आहेत. मनाला संमोहित करणारे गूढ अनुभव देणारे हे पुस्तक वाचताना आपण मानवी मनाच्या गूढगर्द अरण्यात प्रवेश करतो व रमून जातो.
– सुजाता राऊत, ठाणे.
साईड इफेक्ट्स (गूढकथा )
रामदास खरे
डिंपल पब्लिकेशन,वसई.
पृष्ठे :१२२, मूल्य रू.२००/
Saturday, July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांचं कार्य
शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे....
चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान RSS चे आजीवन कार्यकर्ते होते, ज्यांनी ओडिशामध्ये भाजपाचा पाया घातला!
ओडिशामध्ये भाजपाला उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता! 1998 मध्ये देवेंद्र प्रधान देवगड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री बनले!
धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात ABVP मधून केली आणि 2004 मध्ये वडिलांनी आपली जागा मुलाला दिली आणि धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले!
प्रधान कुटुंबाने सलग दोन पिढ्या संघाच्या विचारधारेला या भागात पसरवून भाजपाला मजबूत केले आहे आणि ओडिशाच्या आदिवासी भागात धर्मांतर रोखण्यासाठी खूप काम केले आहे!
मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली! शिक्षणमंत्री झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांच्या पुनरावलोकनाचे काम सुरू केले!
परदेशी आक्रमणकर्त्यांना नायकांऐवजी खलनायक म्हणून दाखवले आणि भारतीय महापुरुषांना नायक म्हणून स्थापित केले, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत!
धर्मेंद्र प्रधान जी यांच्या कार्यकाळातील प्रमुख सुधारणा, कामगिरी आणि धोरणांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.
NEP 2020 संरचनात्मक सुधारणा
नवीन रचना: 3 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी "10+2" रचना बदलून "5+3+3+4" प्रणाली लागू केली.
प्राथमिक शिक्षण: पायाभूत शिक्षण (वय 3-8 वर्षे) आणि व्यावहारिक अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला.
पीएम श्री शाळा: 13,000 पेक्षा जास्त शाळांना स्मार्ट क्लासरूम, ICT आणि विज्ञान प्रयोगशाळांनी अपग्रेड केले.
एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट: विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्रीसह शिक्षण मधेच सोडून पुन्हा सुरू करण्याची सुविधा दिली!
आंतरराष्ट्रीयीकरण आणि तांत्रिक शिक्षण
जागतिक कॅम्पस: परदेशी विद्यापीठांना (जसे डीकिन, वोलोंगोंग) भारतात प्रवेश दिला आणि IIT चे परदेशात विस्तार केला.
भाषिक प्रवेश: B.Tech ची पाठ्यपुस्तके आणि तांत्रिक अभ्यासक्रम 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले.
प्रवेश परीक्षा: NEET, JEE आणि CUET 12 भाषांमध्ये तर CTET 19 भाषांमध्ये घेण्यास सुरुवात केली.
भाषा आणि पायाभूत साक्षरता उपक्रम
निपुण भारत: इयत्ता 3 च्या अखेरीस सर्व मुलांसाठी सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष्य ठेवले.
भारतीय भाषा उत्सव: दरवर्षी 4 ते 11 डिसेंबर दरम्यान होणारा भाषा उत्सव सुरू केला.
समर कॅम्प: एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकण्यासाठी 4.7 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडले.
संस्थात्मक पाठबळ: UGC, CBSE आणि NCERT स्तरावर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली.
अभ्यासक्रम आणि उत्तरदायित्व सुधारणा
अभ्यासक्रमात बदल: आणीबाणी आणि सर्जिकल स्ट्राइकवर धडे समाविष्ट केले; प्रादेशिक राजघराण्यांना प्राधान्य दिले.
सामग्री हटवणे: स्थानिक आणि राष्ट्रीय नायकांना प्राधान्य देण्यासाठी मुघल इतिहासाची सामग्री कमी केली.
झिरो टॉलरन्स: पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचे धोरण स्वीकारले.
संस्थात्मक सुधारणा: वैयक्तिक घटनांऐवजी शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि मोठ्या सुधारणांवर लक्ष केंद्रित केले.
NEET चा पेपर लीक झाला तेव्हा 13 गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकले, आणि 1 महिन्यातच पूर्ण ताकदीने NEET ची परीक्षा पुन्हा घेतली आणि ती यशस्वी झाली.
स्वातंत्र्यानंतरपासूनच शिक्षण विभाग मौलानांऐवजी, एखाद्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्यक्तीच्या हात द्यायला हवा होता, तर आपला इतिहास काही वेगळा असता.
पण आज दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला आहे..
मित्रांनो आपले वैचारिक मतभेद काहीही असुद्या...पण आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक अमूल्य हिरा गमावलेला आहे.
जय हिंद!🇮🇳
जय श्री राम!🚩
-Mahesh Kawale
Wednesday, July 22, 2026
कवी गोविंद
गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद
(जन्म: ९ फेब्रुवारी, १८७४ – मृत्यू :२८ फेब्रुवारी,१९२६)
मराठी काव्यविश्वात असे काही कवी होऊन गेले, ज्यांच्या लेखणीने केवळ रसिकांची मने जिंकली नाहीत, तर समाजात जागृतीही निर्माण केली. अशाच एका ओजस्वी कवीचे नाव म्हणजे गोविंद त्र्यंबक दरेकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र "कवी गोविंद" या नावाने ओळखतो. त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्यलढा धगधगीत ठेवण्याचे काम केले.
९ फेब्रुवारी १८७४ रोजी नाशिक येथे जन्मलेल्या कवी गोविंद यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. कवि गोविंद अवघे चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील निधन पावले. या दुःखातून सावरत असतानाच त्यांना तीव्र ताप आला आणि त्या आजाराने त्यांचे दोन्ही पाय कायमचे लुळे झाले.
शारीरिक हालअपेष्टा आणि शिक्षणाच्या संधी न मिळाल्यामुळे अनेक अडचणी आल्या, पण त्यांच्या मनातील काव्यशक्ती अडथळे ओलांडून पुढे जात राहिली.
कवी गोविंद यांनी आपल्या लेखनाची सुरुवात लावण्यांनी केली होती. साध्या, सोप्या पण भावनिक ओढ निर्माण करणाऱ्या त्यांच्या लावण्यांना रसिकांनी दाद दिली. पण त्यांना खरी दिशा मिळाली ती १९०० मध्ये, स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांच्याशी झालेल्या परिचयाने.
सावरकरांनी स्थापन केलेल्या 'मित्र मेळा' या तरुण क्रांतिकारक संघटनेशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि त्यांच्या लेखणीचा नवा प्रवास सुरू झाला. आता त्यांचे शब्द केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते देशभक्तीचा अंगार बनले. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' यांसारख्या कवितांनी क्रांतीची ज्योत तेवत ठेवली.
गोविंद यांच्या कविता फक्त शब्द नव्हते, तर त्या क्रांतीची हाक होती. शिवाजी, तानाजी आणि रामदास यांसारख्या पराक्रमी व्यक्तींवर आधारित त्यांच्या रचनांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची आग पेटवली. 'स्वातंत्र्याचा पालना', 'स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव', 'भारतप्रशस्ती' यांसारख्या त्यांच्या रचनांनी तर देशप्रेमाच्या भावना अधिक तीव्र केल्या.
त्यांच्या कविता इतक्या प्रभावी होत्या की ब्रिटिश सरकारने त्यांचे साहित्य धोकादायक साहित्य म्हणून जप्त केले. मात्र, त्या नष्ट होऊ शकल्या नाहीत. सावरकर कुटुंबातील महिलांनी या कविता वाचून तरुण क्रांतिकारकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
कवी गोविंद काही काळ सावरकर बंधूंसोबत राहिले आणि 'मित्र मेळा' संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभागी झाले. पुढे हीच संस्था 'अभिनव भारत' म्हणून ओळखली जाऊ लागली, आणि गोविंद या संघटनेतील महत्त्वाचे सदस्य झाले. त्यांच्या कविता आणि विचारांनी अनेक तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले.
२८ फेब्रुवारी १९२६ रोजी कवी गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांची कविता आजही जिवंत आहेत. १९३० मध्ये ‘गोविंदांच्या कविता’ या नावाने त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला.
कवी गोविंद यांचे जीवन म्हणजे कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कसा टिकवायचा याचा आदर्श आहे. त्यांचे शब्द आजही देशभक्ती जागवतात, प्रेरणा देतात आणि आपल्याला स्मरण करून देतात की स्वातंत्र्य ही एक सतत जपण्याची आणि संघर्ष करून टिकवण्याची मूल्यवान गोष्ट आहे.
त्यांची कविता म्हणजे शब्दांनी पेटलेली क्रांती, जी आजही स्वातंत्र्याच्या गाथेत तेजाने झळकत आहे!
कवी गोविंद यांना पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #गोविंदत्र्यंबकदरेकर #स्वातंत्र्यशाहीरगोविंद #kavigovind
Monday, July 20, 2026
news
The Maharashtra Food and Drug Administration (FDA) has launched an AI-powered citizen complaint portal to make reporting food adulteration, fake medicines and substandard pharmaceutical products faster and easier. Announcing the initiative, FDA Commissioner Tukaram Mundhe said citizens can file complaints by speaking in Marathi, Hindi or English, and the AI system will automatically convert them into structured written complaints before forwarding them to the concerned officer. The portal also offers complaint tracking, real-time updates and an auto-escalation system to ensure timely action and greater transparency.
FDA Helpline: 1800 222 365
#PuneTimesMirror #TukaramMundhe #FDA #AI #FoodSafety
Sunday, July 19, 2026
मराठी शिक्षक आणि मुलांमधला अनुभव
मी बरीच वर्षे ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे क्लास घेत होते, दोन वर्षांपूर्वी काही वैयक्तिक अडचणींमुळे मी ते क्लास घेणे बंद केले. त्यावेळी मला काही पालकांचे फोनही आले होते "मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा मराठीचा क्लास सुरू करा." पण कधी कधी इतर कुणी तरी निर्माण करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं नको वाटतं. त्यामुळे मी 2020 नंतर ICSE बोर्डचे ऍडमिशन घेणे बंद केले. त्यादरम्यानच 2019 च्या मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात अरव नावाच्या एका विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी अरव नववीत गेला होता.
तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी त्याची फिस परत करून अरवची ऍडमिशन कॅन्सल करू शकत नव्हते. त्यामुळे नववी आणि दहावी हे दोन्ही वर्ष मी अरवला (एकट्याला) ऑनलाइन क्लास घेऊन शिकवले.
आज अरवचा दहावीचा रिझल्ट लागलाय. त्याच्या आईचा धन्यवाद म्हणून मेसेज आलाय! अरवने फोन करून सांगितलं, "मॅडम मला सगळ्यात जास्त गुण मराठी विषयात मिळाले आहेत" ऐकून फार बरं वाटलं. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी कायमच खूप अवघड वाटते त्यामुळे त्याला शुभेच्छा देतांना मी हसत हसत म्हणाले "आता इथून पुढच्या आयुष्यात तुझा कधीच मराठीशी संबंध येणार नाही, सुटलास तू!" त्यावेळी अरव आनंदाने उत्तरला "मॅडम घरात तर मराठीच बोलणार ना आणि मला ज्या विषयात सर्वाधिक गुण मिळालेत ती भाषा मी सोडणार कशी! उलट मी पुढच्या पिढीला देखील ती भाषा शिकवेल" पंधरा वर्षाच्या अरवचे हे शब्द ऐकून क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. जुने दिवस आठवले. त्या मुलांचा गोंगाट, लेखनसराव करतांना शॉर्टकट्स मारून लिहिलेली त्यांची उत्तरं, त्यांचा पिज्जा पार्टीचा हट्ट, मी रागवले म्हणून कधीतरी त्यांनी मला लिहिलेली माफीची पत्रं... असं बरंच काही आठवत राहिलं.
आज अरवच्या निमित्ताने ते सारं काही ऑफिशियली संपलं. यापुढे त्या जागेवर ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच मला मराठी शिकवता येणार नाही..! याची एक बोचरी जाणीवही झाली. खरंतर माणूस काही जागा नाईलाजाने सोडतो पण ती जागा सोडताना का होईना आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला...याचा आनंद खूप जास्त असतो. अर्थात याचं श्रेय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी माझ्यातील शिक्षक अधिकाधिक प्रगल्भ बनवला!
अभिनंदन अरव 🌹🌹🌹
खूप खूप मोठा हो बाळा
@ ज्योती भारती
नाती तुटताना...
"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.
खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता.
एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.
शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.
©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati
Friday, July 17, 2026
Tuesday, July 14, 2026
पन्नाशीच्या उंबरठयावर
अल्लडपणा पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो तेव्हा समजतं आपण पन्नाशीला आलो!! तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे ' पन्नाशी पार करताना.." हे वय म्हणजे अनेक अनुभवांची शिदोरी तुमच्या गाठीशी असते. व.पु. म्हणतात तसं, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.." हे देखील समजलेले असते. पुरुष असो किंवा स्त्री, नोकरीची जेमतेम आठ ते दहा वर्ष फक्त राहिलेली असतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षा पासून नोकरीला लागलेला तो जेव्हा पन्नाशीत स्थिरावतो तेव्हा तो अख्खा प्रवास किती कठीण होता, त्या वेळी किती स्थित्यंतरे अनुभवावी लागली हे त्याने जवळून पाहिलेलं असतं. स्त्रियांना देखील कष्ट चुकलेले नाही. नववधू म्हणून पाऊल टाकणारी ती खरं तर तितकी परिपक्व नसते. पण, व.पु. म्हणतात तसं, संसाराचा धूर डोळ्यात जाऊन तिला संसारातली मजा कळते. हे वय तसं म्हटलं तर कष्ट करण्याचं नाही. जरी पन्नाशी असली तरी, तरुण वयात जी धावपळ तुम्ही करता ती पन्नाशीत नाही करता येत. एक उदाहरण देते, समजा सकाळी ७.५० ची ट्रेन तुमच्या डोळ्यासमोर जात असेल तर तुम्ही ती धावत जाऊन पकडू शकता, कारण त्या वयात रक्त हे सळसळते असते,हेच पन्नाशीत आल्यावर काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी सतावतात..
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माणूस ओळखायला शिकलेले असता. स्त्रियांना तर एक गोष्ट चांगलीच माहित असते ती म्हणजे, नाती जपणं हे त्यांनी आत्मसात केलेलं असतं. व.पु. जसं म्हणतात, " कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते.." हे त्यांनी जाणलेले असते. हिच शिकवण त्या आपल्या मुलीला देतात. अहो आयुष्याची पन्नास वर्षे काढणं म्हणजे सोपं आहे का?? जे केस पांढरे होतात ते असेच होत नाही ना. त्या मागे अनेक उपेक्षेचे हुंदके असतात, नाईलाजास्तव कराव्या लागणाऱ्या तडजोडी असतात. न सांगता येणाऱ्या व्यथा असतात. मुला मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं याचा देखील विचार करावा लागतो. काही प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. शरीराला काहीसं जडत्व येतं. आपण सर्व मध्यमवर्गीय माणसं आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी, सुख शोधणारी. या वयात सुखद धक्के आनंद देतात पण वेदनांचा हुंकार नेहमीच मांडता येत नाही. हे वय म्हणजे मुला मुलींचे मित्र मैत्रिण व्हायचे वय असते. नव्याने संसार सुरू करणाऱ्या मुलीला तिची आई हीच एक चालती बोलती मैत्रीण असते. कारण, आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. सगळ्यात महत्वाचं इथे लिहायचं म्हणजे, या वयात एकमेकांचा सहवास हा फार महत्वाचा असतो. ' प्रथम तुज पाहता जीव वेडावला.' हे तरुणपणी म्हणून झालेलं असतं परंतु, आता ' तु अशी जवळी रहा..' हे म्हणावं लागतं. कारण, एकदा का मुलं मुलींची लग्न झाली की तेच दोघं एकमेकांसाठी असतात. आयुष्याची पुढची वर्ष ही जपणूकीसाठी असतात. कधीतरी त्याने चहा करणं, कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं. ती देखील तारुण्यात म्हणतेच की, ' बनात ये ना जवळ घे ना..' पण जशी तिची पन्नाशी उलटते तेव्हा ती देखील म्हणते,' घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे..'
हे वय म्हणजे आरामाची खऱ्या अर्थाने गरज असणारे वय. कुठेतरी थकलेल्या जीवाला विसाव्याची गरज असतेच ना!! पन्नास वर्षे जेव्हा तुम्ही आयुष्य जगता म्हणजे ते निव्वळ जगणे नसते तर कितीतरी वेळा स्वतःचं मन मारुन समोरच्याचं मन दत्तक घ्यावं लागतं. पुरुषांना देखील हे चुकलेलं नसतं. स्वतःच्या लग्नात आनंदात असणारी ती दोघं मुलीच्या लग्नात मात्र सनईचे सुर ऐकून हळवे होतात. खरंच, ही पन्नाशी म्हणजे आयुष्यातलं एक सोनेरी पान,तसंच अनेक आठवणींचे आणि अनुभवांचे नजराणे देतं हे मात्र खरे.. कारण, नेत्र हे पैलतीरावर पोहोचण्या आधी आयुष्याचा महोत्सव साजरा जर केला नाही तर काय उपयोग..
.. मानसी देशपांडे
विरार.
बुद्धीचा महिमा
बुद्धीचा महिमा
भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय ? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.
वेद किती आहेत ? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही , एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.
जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.
काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.
भारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेश्वराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.
नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत, संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असे एकही तत्त्व निःशंकपणे अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.
असे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. "बुद्धेःफलमनाग्रहः"- कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला "यथेच्छसि तथा कुरु" असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. "अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे" असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. "मनः पूतं समाचरेत्" या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तमुक तत्त्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.
-साने गुरुजी
( भारतीय संस्कृती )
Friday, July 10, 2026
सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र
सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र,
प्रिय सुधा...
त्या दिवशी थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणंजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपटप आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात नाही? मी खिडकीतू बाहीर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावर फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावंसाळा अजुन नाही सुरु झाला. होइल लवकरच. ढग दोन आले होते,रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळ्या आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणंजे विश्वंभराचे मुक भाव गीत आहे.! खिडकीतून मध्य रात्री माझ्या सारख्या कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?
जुन्या आठवणी गमतीच्या वाटतात.आज दादा नाहीत,वैनी नाहीत,परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच नाही?
जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर,आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या रात्री आपल्या सभोवती आहेत. सांयकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटे व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वभंराचे भालदार चोपदार! अनंत रंगाची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चालु असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येउ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो!
रवीद्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्युचे स्मरण करुन द्यावयाच्या. जणू रोज सांयकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे,जगाचे थोडक्यात रुपात्मक नाटक बघत असतो...
सुधा,मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे परंतू आता हे शेवटचे साप्ताहीक पत्र. आता मी तुला केंव्हा तरी अधून मधून लिहीन. परंतु आता बंधन नको....!
तुझाच
आण्णा {सानेगुरुजी}
10 जून 1950
Sunday, July 5, 2026
लग्न व्यवस्था
लग्न आंधळं नसावं
आज लग्न जुळवताना बहुसंख्य लोकांची नजर सर्वप्रथम कशावर जाते?
घर किती पॉश आहे...
दारात किती गाड्या उभ्या आहेत...
बँक बॅलन्स किती आहे...
वडिलांचा व्यवसाय किती मोठा आहे...
लग्नात किती थाटमाट होणार आहे...
दुर्दैवाने अनेकांची मानसिकता अजूनही या तामझाम आणि श्रीमंतीला भाळते.
फार कमी लोक विचारतात...
हे वैभव प्रामाणिक मार्गाने उभं राहिलं आहे का?
या घरात माणुसकी, संस्कार आणि विश्वास आहे का?
मुलगा किंवा मुलगी रागावर नियंत्रण ठेवतात का?
व्यसनं आहेत का?
स्वभाव समंजस आहे का?
मतभेद झाले तर संवाद साधतील की नातंच संपवतील?
कारण बाहेरून चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते.
संगमरवरी भिंती असल्या म्हणून घर सुखी असतंच असं नाही आणि साध्या घरातही आयुष्यभर पुरेल इतकी माणुसकी दडलेली असू शकते.
आज ज्या घटना समाजाला हादरवतात, त्या आपल्याला एकच धडा देतात—
लग्न करताना बँक बॅलन्स नव्हे, मनाचा बॅलन्स तपासा.
गाडीची किंमत नव्हे, माणसाची किंमत ओळखा.
बंगल्याचा आकार नव्हे, विचारांची उंची पाहा.
कारण संसार पैशाने उभा राहू शकतो...
पण तो टिकतो फक्त स्वभाव, चारित्र्य, विश्वास आणि परस्पर आदरामुळे.
- अशोक मानकर
बरोबर पण आज काल भौतिक गोष्टीचा जास्त विचार केला जातो काहींना वाटत असावे त्यात सुख .. पण स्वभाव मन जुळली नसतील तर संसार टिकणे कठिणच !
Saturday, July 4, 2026
मृदुंग मसाला भजी..
मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे.
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो.
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली.
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली.
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले.
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी.
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा.
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल.
सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020
Sunday, June 28, 2026
आयुष्य सुंदर आहे
तुमच्यासाठी एक छोटी मराठी लघुकथा:
आयुष्य सुंदर आहे
एका गावात एक वृद्ध माणूस रोज सकाळी बागेत फिरायला जायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. एक तरुण त्याला रोज पाहायचा आणि एके दिवशी विचारलं,
"आजोबा, तुमच्या आयुष्यात कधी दुःख आलं नाही का?"
आजोबा हसले आणि म्हणाले, "दुःख तर खूप आलं. काही माणसं सोडून गेली, काही स्वप्नं अपुरी राहिली, काही संधी हातातून निसटल्या. पण मी प्रत्येक सकाळी एक निर्णय घेतला—आज जे आहे त्यात आनंद शोधायचा."
ते झाडाकडे बोट दाखवत म्हणाले, "हे झाड पाहिलंस? प्रत्येक शरद ऋतूत त्याची सगळी पानं गळून पडतात. पण ते कधी रडत नाही. कारण त्याला माहिती असतं की पुन्हा वसंत येणार आहे."
त्या दिवशी तरुणाला एक मोठा धडा मिळाला.
बोध: आयुष्य परिपूर्ण नसतं, पण योग्य दृष्टीकोन असेल तर ते नक्कीच सुंदर असतं. 🌿
