Sunday, May 3, 2026

पालकत्व

*पालकांचे मार्गदर्शन - भाग २२*

_लहान मुलांच्या बलात्काराच्या घटना आणि पालकांची जबाबदारी._

लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार हा केवळ गुन्हा नाही, तर एक गंभीर मानसशास्त्रीय आणि सामाजिक समस्या आहे. भारतात बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या जास्त आहे आणि अनेक घटना अजूनही उघड होत नाहीत, कारण भीती, लाज आणि सामाजिक दबाव यामुळे मुलं बोलत नाहीत .

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, अशा घटनांचा मुलींच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यांना भीती, अपराधीपणा, कमी आत्मसन्मान, आणि दीर्घकालीन मानसिक आजार जसे की डिप्रेशन किंवा चिंता निर्माण होऊ शकते . 

अनेक वेळा मुलांना काय घडत आहे हे समजतही नाही, कारण त्यांची समज विकसित झालेली नसते. त्यामुळे ते स्वतःला दोष देतात किंवा शांत राहतात.

बहुतांश अत्याचार करणारे लोक अपरिचित नसतात, तर ओळखीचे, नातेवाईक किंवा विश्वासातील व्यक्ती असतात. त्यामुळे धोका बाहेरच नाही, तर घराच्या किंवा परिचित वातावरणातही असू शकतो . हे पालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे.

पालकांची जबाबदारी येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. सर्वात आधी, मुलांशी खुलेपणाने संवाद ठेवणे गरजेचे आहे. “गुड टच” आणि “बॅड टच” याबद्दल योग्य वयात समजावून सांगणे आवश्यक आहे. संशोधनात दिसते की अनेक पालक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे मुलं असुरक्षित राहतात .

तसेच, मुलांच्या वागण्यात अचानक बदल, भीती, एकटे राहण्याची इच्छा किंवा कोणत्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न दिसल्यास पालकांनी ते गंभीरपणे घ्यावे. मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, पालकांनी केवळ संरक्षणच नाही तर विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांना हे जाणवले पाहिजे की काहीही घडले तरी ते मोकळेपणाने सांगू शकतात. जागरूक पालकत्व हेच अशा घटनांना रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

#parentingtips #nasrapurvictim #rakeshvarpe

कथा

सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात

*पालकांचे मार्गदर्शन = भाग २०*

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात?_

भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा खरंच आवश्यक आहेत का, हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात येतो. 

मुलांच्या विकासासाठी फक्त महागडी शाळा किंवा मोठी इमारत महत्त्वाची नसते. त्यापेक्षा शिकण्याचे वातावरण, शिक्षकांचा दृष्टिकोन आणि घरातील भावनिक आधार अधिक प्रभावी ठरतो.

मुलांच्या मेंदूचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास सुरक्षित, प्रेमळ आणि प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात अधिक चांगला होतो. 

काही वेळा मोठ्या शाळांमध्ये सुविधा चांगल्या असतात, पण त्यामुळेच मुलं अधिक यशस्वी होतील, असे नाही. 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं, मुलांना मिळणारे वैयक्तिक लक्ष आणि त्यांच्या प्रश्नांना दिलेले उत्तर याचा परिणाम शिक्षणावर जास्त होतो.

तसेच, जास्त फी असलेल्या शाळांमुळे पालकांवर आर्थिक ताण येऊ शकतो. हा ताण नकळत घरातील वातावरणावर परिणाम करतो.

आणि मुलांनाही त्याची जाणीव होते. 
त्यामुळे घरातील ताण, चिंता किंवा दबाव मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

मुलांना आत्मविश्वास, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी मोठ्या शाळेपेक्षा योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. 

साध्या शाळेतही चांगले शिक्षक आणि सकारात्मक वातावरण असेल, तर मुलं उत्तम प्रगती करू शकतात.

म्हणूनच, शाळा निवडताना फक्त फी किंवा ब्रँड बघण्यापेक्षा मुलांच्या गरजा, त्यांचा स्वभाव आणि त्यांना मिळणारे वातावरण यावर लक्ष देणे अधिक योग्य ठरते. 

शेवटी, मुलांच्या यशामागे शाळेपेक्षा त्यांची शिकण्याची आवड आणि पालकांनी दिलेला वेळ अधिक महत्त्वाचे असते.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

पालक-बालक संबंधित विषयावर तुम्हाला आणखीन काय वाचायला आवडेल मला नक्की सांगा. आजच्या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

योग्य वयात मुलांचे करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन करून घ्या. संशोधनानुसार ८ वी ते १२ वी हा मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. करिअर चाचण्यांसाठी ९१३७३००९२९ या क्रमांकावर फोन किंवा व्हाट्सअप करू शकता.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

#rakeshvarpe #parenting

तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार

मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.

मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.

नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी  मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.

तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो. 

मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.

रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.

त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

Rajendra Kher

https://www.facebook.com/rajendra.kher.79

Saturday, May 2, 2026

सुमी... २७ ०४ २४

सुमी... २७ ०४ २४

सुमती जोग ही माझी चुलत बहीण. आधीची सुमती फडके, लग्नानंतर जोग. ती जवळपास माझ्यापेक्षा दहाएक वर्ष मोठी आहे, अजूनही अंतर तेवढंच बाकी आहे आमच्या वयातलं. हे तीच म्हणालीये. अतिशय हजरजबाबी, विनोदी, फटकळ आणि एकूणच बिनधास्त आहे ती. कोकणी मातीतले सगळे गुणावगुण तिच्यात ठासून भरलेले आहेत. माझ्या काकांची ती एकुलती एक मुलगी. वांड आणि आडदांड. मुलीच्या जन्माला आली म्हणून नाहीतर सुमंत फडकेच तो. काका तिला तशीच हाक मारायचे. गुणावगुणसुद्धा उपजत असतात काही. आम्ही कोळीस-याचे मूळ. चाफ्यावरून पुढे गेलात की आमचं गाव लागतं. शिकायला म्हणून बाहेर पडलेलो आम्ही शिकल्यावर नोकरी करत शहरातच राहिलो आणि गाव फक्त सुट्टीला, होळीला, गणपतीला जाण्यापुरतं उरलं. काही वर्षांनी तो सुद्धा इतिहास होईल कारण जाण्यासाठी गावात घर, नातेवाईक हवेत की. आमचंही आता गावात सुमी सोडल्यास कुणी नाही. सुमीसुद्धा एकटीच आहे तशी आता. आई, वडील, काका काकू कधीच गेले. ती ही आता पंचाहत्तरच्या जवळ आलीये. पण वर्षातून मी एकदा तरी जातोच गावाला. काम काही नसतं पण सुमी आहे म्हणून जातो.

ती वयाने वाढली पण अजून गुणावगुण सगळे तसेच आहेत. अजूनही कुणी तिच्या अंगणात पडलेला आंबा उचलायचं, जास्वंद काढायचं धाडस करणार नाही. भुतासारखी कुठून बघेल आणि झोड उठवेल हे कळणार नाही. सगळी फुलं ती काढणार आणि वाटणार पण तुम्ही काढलंत की संपलं. इतकी बोलेल की झक मारली आणि फूल तोडलं असं वाटलं पाहिजे तुम्हांला. सुमी आता एकटीच रहाते. जोग गेल्याला पण चारेक वर्ष झाली. समोरच्या वाडीत जोग रहायचे आणि इकडे फडके. तेंव्हाच ते लादलेलं लव्ह मॅरेज होतं. विद्याधर जोग म्हणजे अगदी शहाळ्यासारखा नरम आणि गोड माणूस, त्यांना घरी हाक मारायचं नाव मिलिंद उर्फ मिलू होतं. सुमी अठराची असेल तेंव्हा आणि जोग एकवीस. तसे दोघे एकाच शाळेत शिकलेले. घरी लग्नाचा विषय सुरु झाल्यावर सुमीने स्पष्ट सांगितलं, 'वसंतकाकांना विचारा, मला आवडतो मिलू. त्याला मी आवडते का माहित नाही'. काकू विचारात पडली ते कार्टीने प्रेमाचे चाळे काय केले असतील यामुळे नाही तर मिलू हो म्हणाला तर त्याचे किती हाल होतील याने. सगळे जोग मिटल्या तोंडाचे होते आणि ही बोलभांड. घरच्या आंबा, काजूच्या बागा होत्या दोन्हीकडे. दोघेही एकुलते एक. त्यांचं दुकान पण होतं बाजारात. जोग बी.ए. झाले होते आणि सुमी बारावी.

एके दिवशी काका आणि काकू वसंतरावांना भेटले आणि लग्न ठरवून आले. त्याचवेळी सुमी दुकानात गेली होती, हक्क दाखवायची पद्धत पण अफाट, 'ए मिलू, आईबाबा तुझ्या घरी गेले आहेत आपल्या लग्नाचं बोलायला, मीच सांगितलं त्यांना, तुझं कुठे काही झेंगट नाही ना, रत्नागिरीला कॉलेजला होतास म्हणून विचारलं'. जोग गल्ल्यावर आडवेच झाले. कसाबसा धीर एकवटून ते म्हणाले, 'ठरवायला म्हणजे? मी हो म्हणायला पाहिजे ना पण?' 'माझ्यात काय वाईट आहे सांग नाही म्हणायला? तुमच्या सगळ्यांपेक्षा गोरी आहे मी, सगळी कामं येतात, झाडावरून आंबे, काजू काढता येतात, वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक एकटी करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तू आवडतोस. नाही म्हण फक्त मग बघ तुझं तरी लग्न ठरू देतीये का ते. आलेल्या मुलीला सांगेन, माझं आणि याचं प्रकरण होतं म्हणून'. 'तू काहीही सांगशील, पुरावा हवा ना. आणि इथे दुकानात बोलायच्या गोष्टी आहेत का या? बोलतो मी आधी घरी'. 'हो, नाही, जे असेल ते उद्या संध्याकाळी सातला देवळात ये सांगायला, तेंव्हा नसतं कुणी'. जोगांनी कपाळावर हात मारून घेतला आणि कामाकडे वळले ते. सुमी घरी रीतसर सांगून देवळात गेली होती. 'मिलू येणारे सांगायला, हवं तर तू ही चल' असं ती काकूला म्हणाली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि 'जा तूच' म्हणाली.

लग्नाला सगळं गाव लोटलं होतं. भर लग्नात सुमी म्हणाली होती, 'गावक-यानू दोनदा जेवा, दोन्हीकडे आहेर दिलाय ना तुम्ही'. मी लहान होतो तेंव्हा पण गोरीपान सुमी अगदी पिवळी धम्मक दिसत होती दागिन्यांमुळे, ते आठवतंय. माहेर समोर आहे म्हणून ती कधीच उठसूट जायची नाही. कारण असेल तरच. तिचे मानापमान अगदी कोकणी होते. चार दिवस आधी मदतीला गेली आईला पण दिवाळसणाला रीतसर आमंत्रण दिल्यावर येईन म्हणाली. दिवाळीत चार दिवस जोग घर बंद करून फडक्यांकडे रहायला होते. नियम म्हणजे नियम. बोलभांड असली तरी ती प्रचंड मायाळू आहे, ते दिसू न देण्यासाठी सगळी धडपड असते तिची. लग्न झाल्यावर ती भरपूर आहे म्हणून बसून राहिली नाही. आंबे गावोगाव पाठवणे, आंब्या फणसाच्या पोळ्या, पल्प तिने गावात तयार करण्यासाठी छोटा कारखाना काढला आणि अनेक लोकांना रोजगार पण दिला. तिथेही मालकीण आहे की कामाला आहे कळणार नाही अशी उपस्थिती असायची तिची. ती ही बरोबरीने काम करायची इतर बायकांच्या. बाई गर्भार असेल तर चार तास काम आणि आठ तासाचा पगार असा तिचा कायदा होता. कुणी कुठे हात पसरले पैशासाठी हे समजलं तर ती चारचौघात त्याला झोडायची आणि पैसे द्यायची. आपल्याकडच्या माणसाने बाहेर पैसे मागावेत हा तिला अपमान वाटायचा. तिच्या दृष्टीने ते एक कुटुंब होतं आणि ती कुटुंबप्रमुख. तिच्याकडे काम करणा-या लोकांच्या मुलांनी, सुनांनीही काम केलं तिथे.

कुणालाही औषधाला, बाळंतपणाला, मुलीच्या लग्नाला, कळलं की पैसे ती न मागता द्यायची. ते परत देवोत न देवोत ती काहीही बोलायची नाही पण उसने घेतले असतील तर पठाणासारखी दारात जाऊन उभी रहायची मागायला. मुलाच्या लग्नाला मात्र पैसे द्यायचे नाही ती उसने, 'पोरग्याला कमवायला सांग मग लग्न कर म्हणावं', असं म्हणायची. एकूणच विचित्रं रसायन आहे ते. खोटेपणा, अस्वच्छता याचा तिला भयंकर राग. कामाला असलेल्या गड्याने अंगण नीट झाडलं नाही तर ती स्वतः त्याला कडेला उभा करून झाडून दाखवायची, झाडून होईस्तोवर त्याला तोंडाने झोडकाम चालू. रांगोळी म्हणजे फक्त 'श्रीराम' लिहायची, बाकी नाजूक काम तिला कधी जमलं नाही. झाडावर मात्र खारीसारखी चढायची अगदी. लग्न झाल्यावर सासूमुळे एकच बदल केला तिने. घरात किंवा बाहेर ती सगळ्यांसमोर मिलू म्हणायची नाही. 'ओ जोग' अशी खणखणीत हाक मारायची. एवढ्या सगळ्या सुखात तीट लावल्यासारखं एकच दुःखं होतं. तिला मुलबाळ काही झालं नाही. बरेच उपचार करून झाले. नवस वगैरे मी करणार नाही, दत्तक घेणार नाही हे तिने आधीच सांगितलं होतं. सासूने आणि तिच्या आईने केले नवस, उपास पण उपयोग झाला नाही काहीच. विषय निघाल्यावर तिने सगळ्यांसमोर विचारलं होतं, 'ओ जोग, तुम्हांला अपत्यासाठी दुसरं लग्न करायचं असेल तर करा बरं का, मी विनातक्रार समोर रहायला जाईन. अजिबात लुडबूड करणार नाही तुमच्या आयुष्यात पण घटस्फोटही देणार नाही, समोरून बघेन तुम्हांला'. जोग भरल्या गळ्याने म्हणाले होते, 'घरात तू एक लहान वांड बाळ आहेस ते पुरे आहे, आणखी नको कुणी मला'. आयुष्यात पहिल्यांदाच सुमी रडली असेल त्या दिवशी.

बोलणं सरळ म्हणून नाहीच कधी. एकदा असेच अंगण्यात बसलो होतो. एका म्हाता-याने जाताजाता अंगणात पडलेल्या बारक्या काटक्या सरपणासाठी गोळा केल्या. पुढचे संवाद नेहमीचे होते. 'रे मेल्या, माझंच अंगण दिसलं काय तुला? तुझ्यासाठी करतोयस का गोळा? गेलास तर लोकांना काळजी, स्वतःसाठी कशाला लाकडं गोळा करायला पाहिजेत'? 'अगो सुमे, तुझ्यासाठी पण ठेवेन गो बाय चार काटक्या तिथे'. 'मी इतक्यात नाही जायची. पोरगा कसा आहे रखमीचा?' 'चांगला हाये. तुझी आठवण काढली गो तिने, परवा गेलेलो ना तिच्या सासरी, निवलीला'. 'अरे बोलायचंस तरी, बस जरा. परवाच डिंकाचे लाडू केलेत ते देते चार तिच्यासाठी'. रखमी तिच्याकडे कामाला होती घरी लग्नाआधी. तिचा बाप दुकानात होता त्यांच्याच. ती बाळंतपणाला आलेली चार महिन्यामागे. सगळा खर्च सुमीचा. 'दात किती शाबूत आहेत तुझे?' 'छे गो, दोनचार हायेत, का ते'? 'लाडू रखमीसाठी दिलेत, तूला दात नाहीत म्हणजे पोचतील तिच्याकडे. आणि ती तुपाची बरणी पण ने. तिला म्हणावं लपवून खा हवंतर पण तब्येत सुधारू दे'. 'लाडू पोचिवतो, बरनी घरीच ठेवतो, आमच्या काय अंगी लागायचं नाय का तूप? आणि लगेच कुठून जाऊ परत. येष्टी काय आता सस्त -हायलीये काय?' 'तर तर, चार दिवस विड्या ओढू नकोस की, चहा घे हा. मी मागच्या जन्मीची देणेकरी आहे तुमची आणि हे पन्नास घे पण जाऊन ये उद्या तिच्याकडे'. म्हाता-याने डोळे पुसत वस्तू हातात घेतल्या आणि तो निघाला पण सुमी ती सुमीच. 'सरपण सोड ते आधी, जंगलात पडलंय ते आण, सगळं नुसतं फुकट हवं मेल्यांना'. म्हाता-याने दोन काड्या टाकल्या आणि तो हसत हसत निघून गेला.

काळ झटझट सरला. गावातली माणसं विरळ होत चालली. जवळपास पन्नासेक वर्षांचं तिचं सहजीवन एका रात्री संपलं. कुठलंही व्यसन नसलेले, आजार नसलेले जोग हार्ट अटॅक येऊन गेले. सुमीने एकदाच काय ते रडून घेतलं, कुणी हाक मारायला आल्यावर पाण्याच्या टिपूस काढला नाही. 'वय नव्हतं फार पण कोण कधी जाणार हे आपल्या हातात नसतं, दुःखं होतंच पण सतत रडून माणूस परत येणारे का?' असं तिचं स्पष्टं मत होतं. त्यानंतर तिने सगळे उद्योग विकून टाकले, जमिनी विकल्या, दागिने विकले आणि राहण्यापुरतं घर ठेवलं. तिच्या हयातीत व्याज आणि पश्चात रक्कम अनेक सेवाभावी संस्थांना मिळावी असं मृत्युपत्र तिने तयार करून ठेवलंय. शिक्षण नसेल फार पण तिचे विचार स्पष्ट होते, आतबाहेर काहीही नाही, कपट नाही, दुजाभाव नाही. एकदा असाच आमचा कशावरून तरी वाद झाला. मी रागाने म्हणालो, 'आता अजिबात येणार नाही तुला भेटायला'. 'नको येऊस, काही अडलं नाहीये माझंही'. मी ही रागाने निघालो तर दारात आडवी येऊन म्हणाली, 'थांब, परत येऊ नकोस असं म्हटलंय, आत्ता जा म्हटलंय का?' आणि हसत सुटली. मग मी ही दात काढले आणि भांडण मिटलं. तिचा कुणावर आणि कुणाचा तिच्यावर कायमस्वरूपी राग असणं शक्य नव्हतं. 

मी इतकी वर्ष जातो भेटायला पण कधीही कुणाबद्दल कुचेष्टेचं बोलणं नसतं, बोलण्यात कायम गंमतीजंमती असतात. अलीकडे जरा हळवी झालीये पण. आईवडील, सासूसासरे आणि तिचा मिलू यांच्याबद्दल जास्ती बोलते आताशा. एकदा म्हणालेली, 'तुला माहितीये जया, जोग मला काय म्हणाले होते लग्न झाल्यावर? सुम्या आहे तशीच रहा, मला पण तू त्यामुळेच आवडतेस पहिल्यापासून. पहिल्यापासून? म्हणजे मी मेलीने विचारलं नसतं तर या बाबाने सांगितलंच नसतं आणि आमचं लग्नही झालं नसतं. पण अत्यंत प्रेमळ माणूस रे, बोलायचा कमी पण माया त्याच्या त्या पिंग्या डोळ्यात बघावी. नुसता नजरेने बोलायचा तो. मी दहा वाक्य सांडेन पण तो महाचिकट. एखाद वाक्यं पुरायचं त्याचं. पण कधी माझा निर्णय चुकला ना तरी रात्री समजावून सांगायचा काय चुकलं ते. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं कधी तरी बोलायचा नाही'. सुमीही आता थकलीये, मलाही वरचेवर जायला होत नाही पण एकदा तरी जायलाच हवं वर्षातून. तिच्या इतक्या वर्षांच्या गंमती जंमती अजून अर्ध्याच ऐकून झाल्यात. येतोय हे कळवलं की वाट बघत असते अगदी पण दाखवत नाही तसं. पण जेवायला साग्रसंगीत करते दोन माणसांसाठीसुद्धा. दिवसभर दोघे खातपीत नुसत्या गप्पा झोडत असतो. निघताना रडत नाही पण चेहरा सांगतोच कितीही आव आणला तरी. पण बोलते मात्र 'असलास पुढच्या वर्षी तर ये परत' असं आणि हसण्याच्या आड डोळ्यातलं पाणी लपवते.

इतकं गोष्टीवेल्हाळ, मायेचं आणि नितळ मनाचं कुणी आपलं माणूस भेटणं आता या जगात दुर्मिळ आहे त्यामुळे आहे तोवर भेटायलाच हवं. सुमी जोग, आहेच तशी, खाष्ट तेवढीच प्रेमळ.

जयंत विद्वांस

'रविवारची रंगत'


'रविवारची रंगत'
'दृक काव्य' या अलीकडे प्रकाशित झालेल्या संग्रहातून.
व्हिज्युअल पोएट्री या विषयाचा अभ्यास करता करता 19 व्या शतकाच्या सुरुवातीला  Guillaume Apollinaire या फ्रेंच कवी आणि नाट्य लेखकाने त्याच्या 'कॅलिग्राम' या कवितासंग्रहात केलेला एक प्रयोग पाहण्यात, वाचण्यात आला.
जो कदाचित पहिल्यांदा झालेला असावा.
त्या पूर्ण संग्रहात प्रत्येक कवितेची अक्षररचना अशी केली आहे की त्यातून दृक अनुभव सुद्धा घेता येतो. ( जो  मी रविवारची रंगत या मालिकेत काही कवितांमधून सादर केला आहे)
ती कविताच अक्षर- दृक- काव्य झाली आहे.

 
असे कला प्रवाह अभ्यासता अभ्यासता मला त्यातलं भारतीयत्व जाणवलं ते रवींद्रनाथांच्या गिरगीट चित्रांमध्ये. असं म्हटलं जातं की कविता लिहिता लिहिता ते काही शब्द खोडत तर काही ओळीच्या ओळी सुद्धा गिरगिटवून खोडत.
त्या शब्द विरहित अवकाशाला गिरगीटण्यातून अमूर्त अशा विविध आकारांचे चित्ररूप मिळत गेले.  त्यांची ही 'पूरबी' ह्या हस्तलिखितातील गिरगिट चित्र जागतिक कला प्रवाहात सन्माननीय झाली. लिहिता लिहिता गिरगीटण्यातून चित्र दिसू लागली. 
अगदी या उलट मांडणी करत गेलो म्हणजे चित्रावर कविता उतरत असताना त्यातले शब्द त्या चित्राला त्याची स्पेस देत आहेत असं भासवू लागलो.
ह्या चित्रकाव्यात मांडण्याचा प्रयत्न.

Hemant Joshi

https://www.facebook.com/share/14dAXjJGj5o/

Wednesday, April 29, 2026

लवकर ये

- लवकर ये -
लहानपणी, वाढत्या वयात 
घराबाहेर पडताना 
खेळायला, शाळेत जाताना 
आईला ओरडूनच सांगायचो,
"आई मी गेलो गं" 
बाहेर पळताना सुद्धा 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा,
"गेलो म्हणू नये, येतो, म्हणावं".
तेव्हा अर्थाची अथांगता 
आकलनात आली नाही, 
पण आई सांगतेय नं, 
तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो 
"आई मी येतो गं". 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, 
"लवकर ये". 
मग महाविद्यालय, 
भारतमातेचा कार्यकर्ता असणं वगैरे 
संघटना, संगीत, सिनेमे, प्रवास, लेखन, समाजकार्य, खेळ 
सर्वच काही सहज समर्पणपूर्वक करताना 
"आई मी येतो गं" 
आणि 
"लवकर ये" 
रोजचंच झालं. नेहमीच झालं. 
रोज घरी परतेपर्यंत 
मध्यरात्री उलटून गेलेली असणं 
रोजचंच झालं, नेहमीच झालं. 
पण "आई मी येतो गं" आणि "लवकर ये"ची 
लय जरा सुद्धा हलली नाही. 
असाच एकदिवशी निघालो, 
"आई मी येतो गं". 
आई म्हणालीच, "लवकर ये". 
उंबरठ्यापलीकडे पडलेलं पाऊल 
मागे घेऊन आईला विचारलं, 
"आई, काय हे रोजचंच? माहितीय मला उशीर होणार आहे,
तरी तुझं आपलं, "लवकर ये". 
आई हसून म्हणाली, "लवकर ये". 
मी निघालो. 
वाटेवर वर्षानुवर्षं 
अखंड अंधार दाटलेला भेटत गेला. 
भविष्याच्या अनाकलनीय आकारांमध्ये 
जीव घुसमटत गेला, तेव्हा 
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या 
घंटेचा मंद घनगंभीर नाद
कानावर येत राहायचा,
"लवकर ये".
जगणंच झालं विश्वजननीच्या
वाटेवरची प्रार्थना,
"आई, मी येतो गं".
आणि जगदंबाही सांगत राहिली,
"लवकर ये!"

अविनाश धर्माधिकारी 

काव्य १

हर्षखेद ते मावळले
हास्य निमाले, 
अश्रु पळाले; 
कंटकशल्ये बोथटली, 
मखमालीची लव वठली; 
काही न दिसे दृष्टीला 
प्रकाश गेला, 
तिमिर हरपला; 
काय म्हणावे या स्थितिला ? 
-झपूर्झा ! गडे झपूर्झा !

हर्षशोक हे ज्या सगळे, 
त्या काय कळे? 
त्या काय वळे? 
हसतिल जरि ते आम्हांला, 
भय न धरू हे वदण्यालाः -
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे
तो त्यास दिसे
ज्या म्हणति पिसे;

त्या अर्थाचे बोल कसे? 
-झपूर्झा। गडे झपूर्झा !

ज्ञाताच्या कुंपणावरून, 
धीरत्व धरून, 
उड्डाण करून, 
चिद्घनचपला ही जाते, 
नाचत तेथे चकचकते; 
अंधुक आकृति तिस दिसती, 
त्या गाताती निगूढ गीती; 
त्या गीतीचे ध्वनि निघती-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

नांगरल्याविण भुई बरी 
असे किति तरी; 
पण शेतकरी 
सनदी तेथे कोण वदा? - 
'हजारांतुनी एखादा ! 
तरी न तेथुनि वनमाला 
आणायाला, 
अटक तुम्हांला, 
मात्र गात हा मंत्र चला - 
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

केशवसूत

Sunday, April 19, 2026

पुस्तक परिचय

नमस्कार,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या #जगणं_होईल_हिरवंगार या माझ्या कवितासंग्रहावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. सावंत सरांचे आणि म.टा. संपादकांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌿

जगणं सुंदर करणारी कविता 
...........................................

एखाद्या साहित्यिकाचे एखाद्या वाङ्मयप्रकारांतील कार्य अधोरेखित झाले, की इतर वाङ्मयप्रकारांतील त्याचे लेखनकर्तृत्व झाकोळले जाते किंवा नजरेआड केले जाते. बालसाहित्यकारांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. एकदा का तुमच्यावर 'बालसाहित्यकार' असा शिक्का बसला, की मग तुमच्या उर्वरित वाङ्मयप्रकारांतील लेखनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकनाथ आव्हाड यांच्या बाबतीत हे विधान अगदी खरे आहे. खरं तर सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण एकनाथ आव्हाड यांना ती साध्य झाली आहे. एकनाथ आव्हाड हे अव्वल दर्जाचे बालसाहित्यकार आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या बालसाहित्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या कवितेकडे म्हणावे तसे लक्ष वेधले गेले नाही. एकनाथ आव्हाड यांच्या सहज सुंदर कवितेकडे साहित्यविश्वाचे लक्ष वेधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

एकनाथ आव्हाड हे गेली ३०-३५ वर्षे साहित्यसाधना करत आहेत, म्हणजे ते केवळ बालसाहित्यच लिहीत आहेत, असे नव्हे. त्यांनी इतर वाङ्मयप्रकारांतही लक्षणीय लेखन केले आहे. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेली कविता आता 'जगणं होईल हिरवंगार' ह्या संग्रहरूपात येत असली, तरी ते काही नवोदित कवी नाहीत. त्यांचा कवितेचा व्यासंग जुनाच आहे. त्यांना चांगली 'कविता' लिहिता येते, म्हणूनच त्यांची 'बालकविता' साहित्य अकादमीकडून सन्मानित झाली आहे. कवीला शब्दांचे सामर्थ्य समजलेले आहे. म्हणूनच कवीने
'कसं सांगू शब्दांनी
मला काय दिलं?
सच्चेपणा, निर्मळ मैत्री
माझं मन जागं केलं'.
ह्या शब्दांत शब्दांचे ऋण व्यक्त केले आहे.
हा कवी शब्दांचा ऋणाईत आहे. ही कविता अभिव्यक्तीच्या स्तरावर फारच प्रांजळ आहे. 'जगणं होईल हिरवंगार' ह्या शीर्षकातही एक अटळ विश्वास आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेकांच्या घागरी उताण्या पडल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी सर्वत्र वणवण चालली आहे. दुष्काळाच्या झळा ठाण मांडून बसल्या आहेत. गावाला आणि आयुष्याला विळखा घालून. राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता ह्या दु:खात आणखी भर घालते आहे. त्यामुळे अस्वस्थता, अस्थिरता आणि अशांतता व्यापून उरली आहे, घरात आणि मनातही! प्रत्येकाचे
'दोन्ही हात अडकलेत
वांझोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
निराशेचा काळोख
अधिकच गडद झालाय'.
असं भोवतालाचं गडद चित्र ही कविता उभे करते.

संगणकयुगात मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याची खंत ही कविता व्यक्त करते.
'इथे काहींच्या पायाला
भिंगरीसारखी चाकं
आणि काही फुटलीत अहंकाराची टोकं.'
अशा शब्दांत ही कविता समकाळावर अचूक भाष्य करते. आभासी दुनियेतली कुचंबणा ही कविता शब्दांत बांधते.
'ऑनलाईन' ह्या कवितेत कवीने आभासी जगाची मनोवस्था नेमकेपणाने पकडली आहे.
'फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे नातं सुरू
आणि अनफॉलो केलं म्हणजे शेवट
इतका सहज आणि भावनाशून्य झालाय
नात्यांचा व्यापार.
आजच्या डिजिटल जगात चमकणारी नाती
फॉलोअर्स वाढले की आनंद देतात
प्रतिसाद कमी होताच अस्वस्थता वाढवतात.
इथे अट एकच
ही आभासी नाती टिकवण्यासाठी
मनात ओलावा नसला तरी चालेल,
पण सतत ऑनलाईन मात्र असलं पाहिजे'.
ह्या कवितेत उपहास आहे आणि उपरोधही आहे. वास्तवाला भिडणारी ह्या कवितेची ताकद वाखाणण्यासारखी आहे.

कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डोक्यावरील पाटीतून भाजीपाला विकून मुलाला घडविणाऱ्या मातेबद्दल कवीला नितांत आदर आणि कृतज्ञता वाटणे स्वाभाविकच आहे. प्रस्तुत संग्रहातील आईविषयक १३ कविता म्हणजे कवीची आणि आईची नाळबंधाची कहाणीच आहे. यांतील काही कविता आईचे स्वभावचित्र रेखाटतात. 
'तिचे घरात पाऊल पडताच
सूर्यप्रकाशाची तिरीप आली घरात
आणि काळवंडलेला घराचा 
हळूहळू प्रकाशमान व्हायला लागला'
हा कवीचा अनुभव आहे. असे वळण घेत ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. 
कुठल्याही विद्यापीठात न गेलेली कवीची आई कवीला सोप्या सोप्या गोष्टींतून जगणं सोपं करून सांगत असते. आईने साध्यासुध्या गोष्टींतून कवीच्या मनावर कृतज्ञता हे मूल्य जाणीवपूर्वक बिंबवले आहे. त्यामुळे कवी कृतज्ञता हे जीवनमूल्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो. 

वठलेल्या झाडालाही पालवी फुटते. आंतरिक धडपडीतून नदीला तिचा स्वतंत्र मार्ग सापडतो. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षी आपले घरटे घडवतात. धरतीची व्याकूळता पाहून आभाळालाही पान्हा फुटतो. हे सगळे दाखले देऊन आई म्हणते
'आपल्यालाही असंच 
झाडासारखं रुजून येता आलं, 
नदीसारखं पुढे जाता आलं, 
आभाळासारखं विशाल होता आलं
अन् पाखरासारखं 
चिवटपणे जगण्याला तोंड देता आलं की
जगणंही आपल्याकडं हरखून पाहतं
अशा वेळी अंगावर धावणाऱ्या अंधारालाही
निक्षून परतवून लावता येतं' 
अशा प्रकारे जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी आणि प्रकाशाची वाट दाखविणारी श्रममूर्ती आई हे कवीच्या आयुष्यातील प्रकाशाचे बेट आहे. ह्या कवितेतली मातृप्रतिमा ही अतिशय उच्च कोटीतली आहे. 

हल्ली माणसा-माणसांतला संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत कवीची अशिक्षित आई कवीला म्हणते
'जगाशी बोलायला धावताना 
आधी स्वतःशी बोल, थोडा वेळ काढून 
आतला आवाज ऐक, अधीर होऊन. 
मग संवाद फुलून येईल आपसूक फुलासारखा'. 
इतका छान, आत्मसंवाद साधण्याचा सल्ला देणा-या आईला अशिक्षित कसे म्हणता येईल? 
जेव्हा कवी आपला पहिला पगार आईच्या हाती सोपवतो, तेव्हा हीच आई म्हणते, 
'कष्टाला अहंपणा चिकटू देऊ नकोस 
यश तेव्हाच शोभून दिसेल'. 
अहंपणाचा आणि कर्मफळाचा त्याग करायला शिकवणारी आई स्थितप्रज्ञ खरी! 
लेकरांची झोपमोड होऊ नये, त्यांची पहाटस्वप्नं कोमेजू नयेत, म्हणून घरात हळुवार काम करणारी आई दिवसरात्र कुटुंबासाठी राबत असते. म्हणून कवीला आपल्या आईची सावली डेरेदार झाडासारखी वाटते. एकनाथ आव्हाड यांची कविता सोप्या शब्दांत जगण्याचे मर्म सांगून जाते. 

ही आई एकदा म्हणते, 
'आयुष्याची वाट तुडवताना 
माणसानं जर वाटेत सौख्याच्या बिया पेरल्या ना
तर जगण्याचं समाधान लाभतं त्याला'. 
इतरांच्या वाटेवर सौख्याच्या बिया पेरण्याची शिकवण देणारी आई आभाळासारखी थोर असणार यात शंकाच नाही. आईच्या शिकवणीची उजळणी करताना कवीने लिहिले आहे :
'माझ्या प्रकृतीत तिची संस्कृती रुजवून
माझ्या बेढब मनाला ती आकार देत असते'. 
ह्या श्रमवंत आईची कथाच निराळी आहे. ती कष्टाचं रान तुडवत आशेची फुलं वेचायची. अंगात हत्तीचं बळ घेऊन पडेल त्या कामाला जुंपून घ्यायची. तिने चांदणं बरसणारा चंद्र दूर लोटून प्रकृतीला साद घालणारा सूर्य जाणीवपूर्वक पदरात बांधून घेतला होता. एकनाथ आव्हाड यांची कविता त्यांच्या स्वभावासारखीच शांत आणि संयत आहे. ती कधीही आक्रमक आणि आक्रस्ताळी होत नाही, तर वाचकमनाशी सहजसंवादी अशी ही कविता आहे. 

आई ही आपला पहिला गुरू असते, म्हणून कवीला आपल्या आईची शिकवण ही शिकवणीसारखी वाटत नाही, तर ते तिच्या अनुभवाचं संचित आहे, असे कवीला वाटते. ह्या अनुभवसंपन्न आईच्या मुखातून जीवनाचं तत्त्वज्ञानच झिरपते आहे. अशा १३ कवितांमधून कवीने आपल्या आईच्या आयुष्याची परवड, तिचे दु:ख, तिचे थोरपण, तिचे समर्पण, तिचा त्याग, तिची हिंमत आणि तिची जीवनाभिमुख शिकवण सांगितली आहे. ह्या कविता वाचत असताना कवी महन्मंगल मातृस्तोत्र गुणगुणतो आहे, असेच वाटत राहते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. कविसंमेलनांतून टाळ्या मिळवणारी ही कविता नाही, तर अतिशय चिंतनशील अशी ही कविता आहे. 

आईच्या शिकवणीतून जसे जगण्याचे तत्त्वज्ञान प्रगटले आहे, तसेच अन्य काही कवितांमधूनही ते वाचकांपर्यंत पोहोचले आहे. हल्ली 'समजूतदारपणाची गैरहजेरी' वाढली आहे. माणूस दिवसेंदिवस असमंजस आणि हिंस्र बनत चालला आहे. अशा परिस्थितीत कवीने लिहिले आहे :
'भांडणाचे रूपांतर मग वैरात
दुर्विचारांची विषवल्ली
फोफावते आयुष्यात
आणि मग
मनाचे कवाड
कुलूपबंद होऊन जाते
खरंच...
समजूतदारपणाची गैरहजेरी लागली की
सगळंच कसं भयंकर होऊन जातं'.
आणि हे भयंकर परिणाम टाळायचे असतील, तर समजूतदारपणाला पर्याय नाही, हेच कवीने यातून सूचित केले आहे.

मानवी जीवनात दु:ख सर्वव्यापी आहे, हे खरेच
पण दु:खालाही आपलंसं केलं,
दु:खातच सुख शोधलं, की
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं,
आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू.
तेव्हा सोपं होऊन जातं जगणं
आपण आपल्या लोभापायी, हट्टापायी
ते उगीचच अवघड करून टाकतो'.
ह्या कवितेत कवीने जणू जगणं सोपं करण्याचाच मूलमंत्र दिला आहे. ही कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मुक्तीचे मार्गही सुचविते. कवीची ही सकारात्मक जीवनदृष्टी मला फार महत्त्वाची वाटते. 

मानवी हव्यासाने हल्ली परमावधी गाठली आहे. सतत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे, फसव्या सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावाधाव केल्यामुळे अंतःकरणातील अंधार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कवी म्हणतो :
'हे दुष्टचक्र भेदण्यासाठी
आता एकच पर्याय उरलाय
प्रत्येकाने दीप व्हावे
आपल्या मनात उजेड भरून घ्यावा
अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविण्यासाठी'.
ही कविता म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या 'अत्त दीप भव' ह्या संदेशाचा विस्तार आहे, असे मला वाटते. ही कविता मनाच्या संकुचितपणाला हादरे देते आणि सद्विचारांना सामावून घेण्यासाठी मनाचा पैस निर्माण करते. 

माणूस निसर्गापासून दुरावत गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून कवीने त्यावर एक उपाय सुचवला आहे :
'माणसं झाडासारखी वागल्याशिवाय
खरं नाही त्यांचं काही आता
आणि पाखरंही तेव्हाच परत येतील
जेव्हा माणसात एक झाड उगवून येईल'.
माणसात झाड उगवून येण्याची कल्पना काव्यमय वाटत असली, तरी ती काळाची गरज आहे, यात काही शंकाच नाही.
कधीकधी 
'बाहू पसरून झाडे
घेती कवेत आभाळ
आभाळाच्या गळ्यात
सावळ्या मेघांची माळ'
अशा तरल शब्दांत ही कविता निसर्गचित्र रेखाटते.

घर म्हणजे केवळ दगड-विटांनी बांधलेला चार भिंतींचा आडोसा नसतो, तर ऊब, शांतता आणि मोकळा श्वास असतो. घर म्हणजे उत्साह, चैतन्य आणि ओढ असते. घर म्हणजे अस्तित्व, स्वभाव आणि त्याला सहवासाची जोड असते. घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग असते. घर म्हणजे आतुरता, आठवणी आणि थोडीशी तगमग असते. घर म्हणजे विश्वास, जिव्हाळा आणि निवांतपणाची जागा असते. घर म्हणजे ऋणानुबंधाचा हळवा, सचेतन धागा असते. घर म्हणजे थकलेल्या जीवांना आपुलकीचा आधार असते. घर म्हणजे आपल्या माणसांसाठी मनाचे सदैव उघडे द्वार असते. एकनाथ आव्हाड यांची ही कविता घराविषयीच्या सगळ्या हळव्या भावना उजागर करते आणि घराला घरपण बहाल करते. ह्या संपूर्ण कवितेत कवीच्या संवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. 

एकनाथ आव्हाड यांची कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर आहे. शिक्षकी पेशा हा केवळ कवीच्या उपजीविकेचे साधन नाही, तर तो कवीच्या पेशींचा अविभाज्य भाग बनला आहे. कवीचा श्वास बनला आहे. म्हणून त्यांच्या शाळा आणि शिक्षणविषयक कविता अतिशय प्रत्ययकारी उतरल्या आहेत.
'आता खूप वर्षांनंतर, 
ती शाळा पाहतो मी येता जाता
तेव्हा बाई तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं'.
शाळेचं देऊळ होऊन जातं, ही केवळ कविकल्पना नाही तर कवीच्या श्रद्धेचा भाग आहे. 'सविता पटेकर.... सतत गैरहजर' हे कथाकाव्यही त्या श्रद्धेतूनच उत्कट उतरले आहे. शाळेच्या चिरेबंदी वातावरणात बालकांचा जीव गुदमरतो, याचे सजीव चित्र 'स्वागतशील' ह्या कवितेत उमटले आहे.

एकनाथ आव्हाड यांची कविता ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या कवितेला प्रतिमा- प्रतीकांचा अजिबात सोस नाही. अलंकारांच्या मोहात न पडणारी ही अनलंकृत कविता आहे. भावगर्भता हाच ह्या कवितेचा अनमोल अलंकार आहे. ह्या कवितेच्या साधेपणातही एक अम्लान सौंदर्य आहे. काही कवितांमधून कालिया, मिजासखोर कंस, शिशुपाल, जरासंध, नरकासुर, द्रौपदी यांसारखे पौराणिक संदर्भ येतात. इतकेच. ही कविता शेती आणि शेतकरी, मित्र आणि मैत्री, शब्दांचे सामर्थ्य, मौन पाळण्याचे महत्त्व, पंढरी आणि पांडुरंगाचे भक्त, पुस्तकांचे श्रेष्ठत्व या विषयांवर जीवीच्या जिव्हाळ्याने बोलते. काळोखाला धीर द्यायला एक पणतीसुद्धा पुरते, असा विश्वास ही कविता व्यक्त करते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही विचार देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कविता आहे. जगणं सोपं आणि सुंदर करणारी ही कविता म्हणूनच मला महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार ( कवितासंग्रह )
कवी : एकनाथ आव्हाड 
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : १०० ,  किंमत : १६० रुपये 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
( सुप्रसिद्ध साहित्यिक)
sureshsawant2011@yahoo.com

अक्षय्य तृतीया शुभेच्छापत्रे

अक्षय्य तृतीया


या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीने संपूर्ण वर्ष जावो !

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !

Saturday, April 18, 2026

मी माझा ६


मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा... ही कविता खरं तर मी माझा च्या कृष्ण धवल मुखपृष्टावर असणार होती, म्हणजे तसच ठरलं होतं 
यातून मी माझाची भूमिका स्पष्ट होते असं माझ्या एका मित्राचं म्हणणं होतं 
मित्र म्हणायचं  , नाहीतर आम्ही पार्ल्यातले एका शाळेतले म्हणून एकमेकाला माहीत होतो पण तेंडुलकर परीवार या पुस्तकात रस घेतोय म्हंटल्यावर तो कसा येऊन चिकटला मला समजलच नाही 
पण असं होतं कधी कधी , आपल्या लक्षात येत असतं पण आपण झटकू शकत नाही, एकतर कुणाचा उगाच अपमान करायचा आपला  स्वभाव नसतो
आणि आपण मान्य करत राहतो
मग अगदी पुस्तक छपाईला गेलं,  माईच्या मते फक्त चार ओळींची  एक कविता एका पानावर म्हणजे पान रिकामं दिसण्याचा धोका होता म्हणून माई म्हणाली प्रत्येक कवितेला एक चित्र काढ पण मग प्रिंटींगचा खर्च वाढत होता म्हणून सगळ्या कविताना एकच चित्र काढायचं ठरलं जे सगळ्या मूडना सूट होईल असं , म्हणून समुद्राकाठी खडकावर एकटी बसलेली व्यक्ती मी रेखाटली आणि ती प्रचंड जमून आली 
म्हणजे प्रिया दिदि म्हणाली की अरे हे चित्र नाही ही सुद्धा एक कविताच आहे 
असं सगळं जमून आलेलं असताना रात्री साधारण अकरा वाजता सुषमा तेंडुलकरचा माईला फोन गेला कारण  गोखल्यांचा फोन बंद होता 
माई घाबरली , इतक्या रात्री कुणाचा फोन 
सुषमा म्हणाली महत्वाचं सुचवायचं होतं म्हणून फोन केला 
ती म्हणाली मुखपृष्ठावरची कविता बदलुया 
का? माई चकीत होत म्हणाली 
सुषमा म्हणाली एक मास्टरपीस कविता आहे ज्या कडे आपलं लक्षच गेलं नाही 
कव्हर वर अशी कविता हवी जी सर्वाना अपील होईल, 
माई म्हणाली कुठली कविता ? सगळ्याच कविता छानच आहेत
सुषमा म्हणाली माई लगेच अगदी शेखरची बहीण होऊन बोलू नकोस, मी काय सांगते ऐक, मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा ही शेखरची भूमिका झाली 
पण त्या आधी पुस्तक हातात पडल्या पडल्या वाचकाची एक भूमिका तयार होणं गरजेचं आहे 
आणि मला वाटतं पुसणारं कोणी असेल
                        तर डोळे भरून यायला अर्थ आहे
ही कविता अल्टिमेट आहे, शेवटी साहित्यिकाची मुलगी होती ती, आणि माझ्या बद्दल किती आस्था होती बघा की तिच्या डोक्यात नाही मनात ते घोळत राहिलं  होतं , माईलाही ते पटलं 
तेंव्हा माई विजया बँकेत नोकरी करत होती सकाळी सात साडेसातला ती घर सोडायची , ती घरून निघाली ती सकाळी घरीच आली 
डोळे उघडल्या उघडल्या समोर माई आणि कानावर आलेलं पहिलं वाक्य शक्या आपण मुखपृष्टावरची  कविता बदलूया 
हादारायला होणं म्हणतात तसं झालं 
ती म्हणाली आवर लवकर आपण अत्ताच जाऊन सांगुया नाहीतर नेमकं तो कव्हरचं काम अत्ताच करायला घेईल
दात घासत अंघोळ केली आणि केस पुसत अंगावर कपडे चढवले 
आई दादा तसे उदासीन होते म्हणून त्यानी फार प्रश्न विचारले नाहीत
टेंशन ते नव्हतच , प्रींटर आमचा जरा तिरकस होता तो काय बोलेल ते ऐकावं लागणार होतं आम्ही प्रिंटरलाच प्रकाशक समजत होतो इतकं आमचं अगाध द्न्यान होतं 
आम्ही अगदी नऊ सव्वा नऊलाच त्याच्या प्रेसवर पोहोचलो
आणि कविता बदलायची सांगितलं  आणि गम्मत म्हणजे पुसणारं कोणी असेल तर ... ही कविता त्याने ऐकली आणि आपला तिरकस पणा बाजुला ठेवत त्याने मनापासून मान्य केलं  वा वा आता पुस्तकाला वजन येईल असं तो म्हणाला, त्या दिवशी लंचटाईम नंतर तो कव्हर करायला घेणारच होता 
मग तिथून बाहेर पडे पर्यंत माईच्या बँकेची वेळ टळून गेली 
मग आम्ही तिथेच सन्मान मधे काहीतरी पोटात ढकलायला गेलो तिथे नेमका माईचा चुलत दीर आला 
माईचा नोकरीला जाण्याचा एकूण उत्साह सगळ्याना माहीत होता
तो अगदी उलट तपासणी घ्यायच्या थाटात म्हणाला तू अत्ता इथे कशी ?
माई अगदी सहज म्हणाली लंच टाईम आहे
तो  घड्याळात बघत म्हणाला इतक्या लवकर?
माईकडे उत्तर तयार होतं ती म्हणाली मी आज रिक्वेस्ट करून मागून घेतला
त्यावर त्याने जे तोंड केलं ते मी काय माई काय तो दीर पण विसरला नसेल
लंच टाईम मागून घेतला हे काय उत्तर झालं ? तो गेल्यावर आम्ही खूप हसलो
पण एकूण त्या दिवशी केलेल्या धावपळीचं सार्थक झालं 
                   पुसणारं कोणी असेल तर 
                   डोळे भरून यायला अर्थ आहे
                   कुणाचे डोळे भरणार नसतील तर
                   मरण सुद्धा व्यर्थ आहे
ही कविता मुखपृष्ठावर आली आणि तिने इतिहास घडवला, कित्येकांच्या पत्रामधे हा उल्लेख  आवर्जून असायचा की मुखपृष्ठा वरची कविता वाचली आणि पुस्तक घेऊनच टाकलं , किंवा वाचतच राहिलो...
अगदी ट्रकच्या मागे सुद्धा या ओळी उमटल्या , कित्येक स्मशान भुमींच्या भिंतीवर त्या लिहिल्या गेल्या , किती रंगावली प्रदर्शनात मी माझाचं कव्हर चित्तरलं गेलं तिथे रसीक मोठ्याने या ओळी वाचत असल्याचं मी ऐकलय
आता बाबा नाहीत , सुषमालाही जाऊन आठ वर्ष झाली 
आई , प्रिया दिदि, राजू त्या आधीच गेले
पण मी माझा चा वाढदिवस जवळ आला की हे सगळे आपापली जागा घेऊन परत उभे राहतात आणि मी आठव्णींच्या पसार्‍यात बसून राहतो.

#चंगो

मी माझा ३

आधी दिवस महिने मोजायचो
मग वर्ष मोजायला सुरुवात झाली 
आता मी म्हणतो जाऊ दे!
ती घडून गेलेली बात झाली...खरच या ओळी माझ्याच आहेत आणि माझ्या वयाचं झालं की घडून गेलेल्या भल्या बुऱ्या गोष्टींबाबत आपण असेच उदासीन नाही, निर्विकार होत जातो. गुंतण्याची क्षमता क्षीण होत असावी किंवा आंतरीक वाटचाल मंदावत असावी पण मी माझा चा प्रकाशन सोहळा याला अपवाद आहे .मी माझा हे पहिलं पुस्तक असेल जे छापायचं ठरायच्या आधी त्याची प्रकाशन तारीख नक्की ठरली होती 
अठरा एप्रिल एकोणीस शे नव्वद गुरूवारी मी माझा चं प्रकाशन माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर विजय तेंडुलकरांच्या हस्ते अनिरुद्ध च्या गच्चीवर, साधेपणाने पार पडलं.ओळखीत पाच पन्नास कॉपीज संपतील, कशाला उगाच प्रकाशन सोहळा वगैरे म्हणणारे भोवती होते माझे वडील तर समारंभासाठी गच्चीत ही यायला तयार नव्हते.गच्चीत समारंभ करायचा तर सेक्रेटरी ला रीतसर पत्र द्यावं लागायचं वडील त्या करीता ही तयार नव्हते शेवटी संध्याकाळी मीच वेणू गोपाळ कडे गेलो आणि तोंडी निवेदन दिलं माझे वडील अशा समारंभासाठी तयार नाहीत हे ही सांगितलं पण वेणू गोपाळांनी पुस्तकाचं प्रकाशन म्हंटल्यावर उत्साहात परवानगी देऊन प्रोत्साहन च दिलं आणि पांडू ला गच्ची झाडायची सुचना दिली 
नीला ताई नी पुढाकार घेत सगळी सुत्र हातात घेतली आणि दृष्ट लागेल असा कार्यक्रम झाला.
झाली पस्तीस वर्ष,मी माझा ने इतिहास घडवला पण त्या प्रसिध्दीची झलक मला फेसबुकवर आल्यावर जाणवली तो पर्यंत मला एवढी कल्पना नव्हती.ती होऊन गेलेली बात दिपस्तंभा सारखी ठाम ठळक होत गेली आवळकाठी चघळत रहावी तशी त्याची गोडी वाढतेच आहे.आणि ती गोडी रसीक हो तुम्ही वाढवताय गेली दोन तीन वर्ष अठरा एप्रिल च्या आधी मी माझा, पून्हा मी माझा,माझे शब्द चा खप अचानक वाढतो या वर्षी तर शंभर च्या घरात मी माझा ची मागणी गेली आणि गहिवरून यावं अशी पेहेल संभाजी नगर च्या जयंत चतूर, दीपक भालेकर,वामन मेस्त्री, आणि पुष्कर गडकरी या मुलांनी घेतली.आज फोन करून त्यांनी आमची तारीख घेऊन टाकली.कधीची??
दोन हजार चाळीस बुधवारची.का?तर चाळीस साली 'मी माझा' ला पन्नास वर्ष पूर्ण होतायत.सहा प्रकाशकांनी नाकारलेल्या पुस्तकाचा लेखाजोखा रसीक असा उराशी जपून आहेत मग मी कसा काय या दिवसापासून या घटनेपासून त्या आठवणी पासून अलीप्त राहू शकेन?
चंगो 
(मी माझा १८ एप्रिल १९९०)

मी माझा ५

आज अठरा एप्रिल गुरूवार 
मी माझा प्रकाशित झालं तेव्हा ही अठरा एप्रिल ला गुरुवारच आला होता.
माईच्या वाढदिवसाला मी माझा प्रकाशित करायचं म्हणून खूप मोठी जंग लढावी लागली असं आता वाटतंय.
३४ वर्ष झाली, म्हणून मी माझा ची गोष्ट ३४वर्षांपूर्वी सुरू झाली असं नाही त्या आधी दोन वर्ष जेव्हा मी माई कडे रहात असून तेंडुलकरांकडे जास्त असायचो तिथून आहे.योग असतात तशा गोष्टी घडतात.तेव्हा प्रिया तेंडूलकर रजनी म्हणून फेमस होती.आणि मी तिच्या परिवारातला होतो म्हणून मला जरा वाव होता.तेव्हा दीदी खरच मला हर तर्हेने मदत करायला धडपडायची.तेंव्हा मॉडेल कोआर्डीनेशन हे माझं तग धरून रहायचं मुख्य साधन होतं, खूप पायपीट करावी लागायची हेलपाटे घालावे लागायचे तर वरळी नाका हा माझा तेव्हा चा पाया खालचा एरीया होता कारण बऱ्याचश्या ऍड एजन्सी त्या एरीयात होत्या.मग दिदी चं शुटींग जवळपास असलं तर दिदी मला शुटींग ला जाताना गाडीने तिथे सोडायची, यातायात वाचवायची तर मला भल्या सकाळी दीदी निघायच्या वेळी बद्रीधाम मधे दीदी समोर हजर व्हावं लागायचं आता जाणवतं किती चिडली रागावली तरी दीदी अर्धा पाऊण तास माझी वाट बघत थांबली आहे.तर तेव्हा एकदा माझ्या आयुष्यातील ती अमृत घटीका आली.मी वेळेवर बद्रीधाम मधे पोहोचलो पण दीदीचा मेकअप मन उशीरा आला होता म्हणून दीदीचा मेकअप सुरू होता.सगळं सगळ्याला जोडलेलं असतं फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते तसं झालं अचानक दीदी ने माझी समोर ठेवलेली बॅग स्वतः कडे खेचून घेतली. तशी ती अधे मधे माझी बॅग चेक करायचीच आई म्हणायची सिगरेट लायटर एखादी पूडी तर बॅगेत नाही ना?हे ती चेक करते कारण राजू फार लवकर स्मोक करायला लागला होता.तिला त्या झडतीत तसं काहीच मिळालं नाही पण अशक्यातली गोष्ट माझी कवितांची बंद वही मिळाली जी मी कधीच कधीच घरा बाहेर काढत नव्हतो.कवितेची वही इतर ठिकाणी थट्टेचा विषय ठरू शकतो पण तेंडुलकरांच्या घरचं वातावरण च वेगळं होतं दूनियाभर चे होतकरू तरुण बाबांना नाहीतर दीदीला त्यांच बाढ दाखवायला घेऊन यायचे आणि दोघांकडे पेशंस दांडगा होता दोघं मन लावून ऐकायचे चर्चा करायचे आई मुळे माझ्या दोन चार कथा बाबां पर्यंत पोहोचल्या होत्या पण माझं स्वतः चं धाडस कधी झालं नाही.त्या दिवशी सुध्दा ती बंद वही कशी बॅगेत बसून तिथपर्यंत आली आश्चर्य आहे 
पण तो योग होता ती घटीका ठरली होती त्या नुसार दीदी ने माझी झोळी उपडी केली आणि माझी बंद वही तिच्या समोर उघडी पडली.आणि माझं नशिब च उघडलं अनेक मार्ग उघडले 
भर दुपारी 
सावली 
वडा खाली 
धावली,

मी बुडताना गाव माझा
ओझरता पाहिला होता 
मला पहायला गाव माझा 
काठावर उभा राहिला होता 

उमलणं आणि फुलणं 
दोघात खूप अंतर आहे 
उमलणं अगदी स्वाभाविक आहे 
फुलणं त्या नंतर आहे 
दीदी एका मागे एक कविता झर झर वाचत गेली.एक इशारा करून तिने मेकअप कधीच थांबवला होता.तिने एक कटाक्ष माझ्या कडे टाकला तो कटाक्ष म्हणजे नव्या पर्वाची नांदी होती 
माझ्याशी बोलायच्या आधी तिने फोन जवळ ओढला आणि माझ्या आठवणी प्रमाणे आठ दहा फोन करून माझ्या कविता ऐकवल्या.लोकप्रभेच्या कार्यालयात ही मी दीदी ने पाठवलेला युवक म्हणून पोहोचलो.नाहीतर अशा साप्ताहिकाच्या कार्यालयात नवोदित कवीला कोण उभं करतंय 
पण मग लोकप्रभेने मला खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणला 
सातत्याने माझ्या कविता ना लोकप्रभेच्या अंकात दोन दोन तीन तीन पानं दिली.लोकप्रभा मधे कविता वाचून च सीमाताई देव गोखल्यांच घर शोधत विलेपार्ल्याला मला भेटायला आल्या ही माझ्या आयुष्यातील  दखल घ्यायला लावणारी पहिली घटना होती.मग दीदी ने माझी झोळी समोर उपडी केली ही माझा च्या गोष्टी ची सुरुवात धरायची का?
ती सुरुवात धरली तर त्या आधीची ही एक सुरूवात खुणावते आहे.तारीख साल वार काही आठवत नाही पण 
पाण्याचं वागणं 
किती विसंगत 
पोहोणाऱ्याला बुडवून 
प्रेताला ठेवतं तरंगत या ओळी सुचल्या त्या वेळी माझ्या कडे कवितेसाठी वही देखील नव्हती.ओळी चमकून गेल्या आणि मी त्या कशावर तरी उतरवून ठेवल्या 
पण त्याला नजाकत प्राप्त झाली ती माईच्या उस्फुर्त हरखून जाण्याने,तिने कसं आणि किती कौतुक केलं हे तपशीलवार आठवलं तरी मी शब्दात मांडू शकत नाही.मला आधी ही सुचत होतं आणि मी लिहीत ही होतो पण पाण्याचं वागणं मी अधोरेखीत केल्याने चार ओळींची कविता हा साचा तयार झाला
अडकलेला पतंग 
आधी काढायला बघतात 
आणि निघत नाही म्हंटल्यावर 
फाडायला निघतात 

देवळात जाऊन माणसं 
दुकानात गेल्यासारखी वागतात 
चार आठ आणे टाकून 
काही ना काही मागतात 

मरण दाराशी आल्यावर 
मी म्हटलं तुला शंभर वर्षं आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे 
अशा कविता सुचत होत्या आणि माई ने वही आणून दिल्यामुळे त्या एका सोबत एक जमत होत्या.मग ही सुरुवात धरायची तर मला अजून एक सुरूवात ठळकपणे आठवते 
तेंव्हा तर मी साडेतीन चार वर्षांचा होता.ढ मुलगा अशी माझी ओळख अजून ठरायची होती.चित्तरंजन रोड वरच्या जून्या घराच्या रम्य परीसरात मी निर्धास्त बागडत होतो 
आणि अकल्पित एक घटना बघून मी हबकून गेलो.
अंगणात आपली गोजिरवाणी चार पाच पिल्लं घेऊन एक कोंबडी पायाने माती हलवत दाणे टिपण्यात मग्न होती आणि ते मनोहरी दृश्य बघण्यात मी रमलो असताना अचानक एक अघटीत घडलं 
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी असं आपण म्हणतो पण या घारीचं लक्ष या कोंबडीच्या पिल्लांकडे होतं 
ती आली आणि झडप घालून एक पिल्लू तिने आकाशात नेलं 
माझा थरकाप उडाला माझ्या आयुष्यातील पहिला थरार.पण त्याची दखल माझ्या आईनेही घेतली क्षणात मला कडेवर घेत पोटाशी धरत ती म्हणाली हे असच असतं राजूल्या.यालाच जगरहाटी म्हणतात 
त्या क्षणी आईने मला उचलून घेतलं नसतं तर?माझी समजूत काढली नसती तर?माझा कोवळेपणा करपून गेला असता.जिवनातली विसंगती वेचण्याची कला दडपून गेली असती तर मला वाटतं ती खरी सुरुवात आहे 
नव्वद साली माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ती सुरुवात व्यापक बनली
आता त्या प्रवासातले बरेच जण गहाळ झाले कोणी हयात नाहीत कोणी जवळ नाहीत तर कोणी माझे राहिले नाहीत 
पण अठरा एप्रिल म्हंटलं की हे सगळं आठवतं आठवत राहणार.

#चंगो 
मी माझा चा वाढदिवस

मी माझा ४

मी माझा लोकंप्रिय होत असल्याची पावती तेंव्हा मला किती प्रकाराने मिळत होती, त्याची एक आठवण सांगतो. तेंव्हा आम्ही नुकते गोरेगावला गोकुळधामच्या वसाहतीत डेरेदाखल झालो होतो
भोवती कामगार वस्ती अधीक त्यामुळे हिरवळीत सदाफुलीचं रोप उठून दिसतं तसे आम्ही दोघे दिसत होतो त्यात आम्ही दोघे कायम एकत्र...साधी साखर संपली तरी साखर आणायला जोडीने बाहेर पडायचो.. कोणी आपणहून बोलायला यायचं नाही..पण एकदा वडाळकर नावाच्या इसमाने हिम्मत केली ..तेंव्हा मी एका वर्तमान पत्राच्या पुरवणीत दर रविवारी एक गोष्ट द्यायचो सोबत घरचा नंबर...गोष्ट वाचून खूप फोन यायचे त्यात याने फोन केला नंबरवरून याने ओळखलं याच एरियातला नंबर आहे.. मग त्याने फोनवर बोलून आमची ओळख करून घेतली एका हाँटेल वर तो ड्रायव्हर होता तुकाराम वडाळकर.. शिक्षण नाही अजिबात.. पण मिळेल ते वाचायचा, खूप वाचायचा... पहिल्या भेटीत मी त्याला ’मी माझा’ दिलं
त्याने ते चाळल्या सारखं करून खिषात ठेवलं...चार चार ओळी बघून त्याची थोडी निराषाच झाली असावी..
आणि दोन दिवसानी सकाळी तो आला आणि सांगितलं तर खोटं वाटेल पण असा रांगडा गडी उंबरठ्यात बसून ढसा ढसा रडायला लागला.. आम्ही नवे होतो त्या परिसरात पण तो तिथलाच रहिवासी होता त्यात आमचं घर तळमजल्यावर होतं... आम्ही गोंधळलो..कोणी बघितलं तर काय म्हणेल?.. बरं ! तो ढोंगही करत नव्हता.. त्याचा टाहो अगदी प्रामाणीक होता...
जरा शांत झाल्यावर तो म्हणाला माहीत नाही साहेब पण हे पुस्तक नेल्या पासनं धा दा हे पुस्तक वाचलं आणि असच उमाळा येऊन रडायला येतय बघा....आवरतच नाही.. पुस्तक खिशात नसल तर चुकल्या चुकल्या सारखं होतय बघा... मग आमची ओळख वाढली ,भेटी वाढल्या.एकदा त्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याच्या अंधार्‍या घरी गेलो, त्यानी एकजात सगळ्याना आमच्या पाया पडायला लावलं...
खरी कमाल त्याने नंतर केली.. त्याला दिलेली प्रत त्याने आळंदीला माऊलींच्या चरणाशी ठेवली.. हे मलाही सुचलं नाही.आणि हे आपणहून तो सांगायलाही आला नाही त्याच्या लेकीने सांगितलं म्हणून कळलं.
आणि खरी कमाल तर पुढेच आहे
एकदा तो हाँटेलची माणसं घेऊन खोपोलीला गेला होता तिथे एका ढाब्यावर त्याने पाहिलं एका ट्रकच्या मागे पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे... ही कविता लिहिलेली होती.. तो हरखून गेला. नक्की त्याला त्यात काय अलौकीक वाटलं कोणजाणे पण तो जाम खुष झाला....खरं तर तिथे तो फक्त त्या लोकांसोबत जेवणापुरता थांबला होता पण तेव्हढ्या वेळात त्याने सगळं जमवून आणलं...
तेंव्हा फोटो काढणं अत्ता सारखं इतकं सोपं नव्हतं जिकरीचंच होतं ...पण तरी त्या ट्रक वाल्याला थांबवून त्याने गावातून फोटोग्राफर आणला आणि त्याचा फोटो काढून घेतला... त्याची प्रत मिळवण्याची तजवीज केली.....कशासाठी हा खटाटोप? ही तळमळ मला खरच उमगत नाही... कधी कधी वाटतं आपण या निर्व्याज प्रेमाला लायकच नाही...
अत्ता अत्ता पर्यंत तो फोटॊ डोळ्यासमोर होता...असेलही नीट ठेवलेला पण सध्या जरा दिसेनासा झालाय....
 तुकाराम वडाळकर सुद्धा दोन वर्षापुर्वी कर्क रोगाने निधन पावला...कित्येक वर्षात आमची गाठ भेट नव्हती तो आजारी असल्याचं कळल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो पण त्याने भेट नाकारली.. त्याचा मुलगा म्हणाला पप्पानी इथूनच नमस्कार सांगितलाय...संपला संवाद !....... पण  काही माणसं हरवत नाहीत त्यातला तुकाराम वडाळकर होता....आहे...
#चंगो

मी माझा २

अठरा तारखेला मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतायत त्या प्रित्यर्थ मी माझाचे काही किस्से

मी माझाचे किस्से सांगतो
त्या दिवसात म्हणजे मी माझा नवा असताना निशिगंधा वाडचा पण एक काव्यसंग्रह येऊ घातला होता त्यासाठी तिने शांताबाई शेळक्यांवर प्रस्तावनेची जबाबदारी टाकली होती.. ठरल्याप्रमाणे शांताबाईनी प्रस्तावना लिहून दिली
निशिगंधाने ती प्रस्तावना वाचली तर तिची पंचायीत झाली.. कारण निशिगंधाच्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना शांताबाईनी पूर्ण मी माझाचंच कौतूक केलं होतं ... निशिगंधाने नम्रपणे ही गफलत बाईंच्या लक्षात आणून दिल्यावर बाई मनमोकळं हासत म्हणाल्या अगं काय करू, या पुस्तकानी मला झपाटूनच टाकलय.(शांताबाईंकडून मी माझा साठी हे उद्गार म्हणजे मी माझा बहुमानच समजतो)
.हा किस्सा मला स्वत: निशिगंधानेच सांगितला
विजय केंकरे जेंव्हा पु लंचा असा मी असा मी नाट्यस्वरूपात बसवत होता तेंव्हाकाही नव्या कलाकरांच्या निवडीसाठी त्याने मुलाखती ठेवल्या होत्या तेंव्हा एकदोघे महाभाग असे होते की असा मी असा मी ला ते मी माझा समजले.. एकज्ण तर विजयला म्हणाला असा मी असा मी तर माझं तोंडपाठ आहे विजयला आष्चर्य वाटलं असा मी असा मी तोंडपाठ आहे?काही म्हणून दाखव.. तो घडा घडा मी माझा मधल्या कविता म्हणायला लागला...
एक किस्सा तर भारीच आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत मुलगी बघण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत व्हायचे कांदेपोहे विणकाम भरतकाम या बरोबरीनेच मुली गाणं येतं का विचारणारे कोणीतरी असायचेच तर शैलजा कान्हेरे नावाची मुलगी होती तिने पत्राद्वारे हा किस्सा कळवला
तिला दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेंव्हा तिला गाण्यासाठी विचारलं गेलं ती उत्साहात म्हणाली मला गाता येत नाही पण मी तुम्हाला काही कविता म्हणून दाखवते..
आणि तिने मी माझाचं पारायण सुरू केलं सगळ्यानी एंजाय केलं...
दोनच दिवसा नंतर तो मुलगा एका पुस्तक प्रदर्शनाला गेला तिथे त्याला मी माझा सापडलं ... त्याने होकार कळवताना मी माझाची मदत घेतली.."हो"'असं मोठ्या अक्षरात मी माझाच्या पहिल्या पानावर लिहून प्रत तिच्या घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली...किती छान नाsss..
गेल्या पंचवीस वर्षात असे कितीतरी किस्से जमा होत गेलेत...

#चंगो

मी माझा

#मीमाझा
सहा प्रकाशकानी नाकारलेलं माझं कवितांच बाड
या दिवशी पुस्तक रूपाने प्रकाशित झालं 
आजी सोनियाचा दिनू म्हणावा तसाच तो दिवस होता अठरा अेप्रील अेकोणीसशे नव्वद, गुरूवार होता 
बाबांच्या शुभहस्ते प्रकाशन झालं होतं
बाबा पुस्तकाला प्रस्तावनाही द्यायला तयार होते 
मिच अगाअूपणा केला प्रस्तावना नको म्हणालो 
कुणाचा राग कुणावर काढला 
तेंव्हा बाबानी कलती मान करत अुंचावलेल्या भुवया अजून आठवतात ,बाबा म्हणजे 'विजय तेंडुलकर '
आठवताना काही 
वगळून चालत नाही 
आणि सांगताना  सगळं
अुगाळून चालत नाही 
असं मिच म्हणालो असलो तरी अठरा अेप्रील म्हंटलं की माझा सगळा दिवस अुगाळण्यातच जातो 
३० वर्षां पूर्वीचा हा दिवस मी पून्हा अुद्या चोवीस तास जगेन
डोळ्या समोर सगळं लख्ख आहे 
आणि जवळ तेंव्हाचं कोणी नाही 
असा विरोधाभास आहे 
'विरोधाभास 'हा गोखल्यांच्या कवितेचा स्थायीभाव  आहे असं समिक्षक तेंव्हा म्हणायचे
जे त्याना तेंव्हा जाणवलं ते मला अत्ता जाणवतय 
तसही सगळं मला अुशीराच समजतं 
काही काही गोष्टी तर समजतच नाहीत 
म्हणूनच असेल...
माझ्याकडे प्रश्नाचं अुत्तर नसतं 
तेंव्हा मी फक्त हसतो 
पण त्या मुळे कायम 
मी हसतानाच दिसतो 
ही माझी व्यथा नाही 'मी माझ्या'ची कथा आहे.
#चंगो

Thursday, April 16, 2026

पीडित पुरुषांसाठी संघटना हवी

पीडित पुरुषां साठी  महाराष्ट्रात संघटना हवी!

आज काल लग्न झाल्यावर बायका नवऱ्या सोबत संसार करायचा नसेल तर त्याच्या वर त्याच्या कुटूंबावर केस करतात काही बायका तर खोट्या केस करून आई वडिलां सोबत न राहता नवीन जोडीदार शोधतात लग्न न करता living relationship मध्ये राहतात आणि स्वतः आई असल्यामुळे मुलां ना सुद्धा जोडीदारा पासून लांब करतात!

#मनमुक्ता

Wednesday, April 15, 2026

श्रावणबाळ

शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !

मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.

मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.

परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.


— ग. ह. पाटील

Monday, April 13, 2026

आशा ..

दिल है छोटा सा
छोटी सी 'आशा'
​सात सुरों के आंगन में, 
यही नाम तो था 
प्यारा सा।

कभी चंचलता
कभी सादगी 
वो चेहरा मानो 
नाज़ुक फूलों का
पाला था

वो नन्हीं जान 
बड़ा हौसला 
लेकर चली थी 
हथेली पर 
बालिवुड के इस 
महाकुंभ ने
उसको झट 
पहचाना था

​वो "झुमका गिरा रे 
बरेली के बाज़ार में"
की खनक निराली,
उस "दम मारो दम" की 
मस्ती दुनियाभर ने
खूब सराही थी

कैबरे डिस्को 
ठुमरी दादरा 
हर रंग में खुद को 
ढाला था
"पिया तू अब तो आजा" 
कह कर, 
हर महफ़िल को 
खूब संभाला था

​कभी "इन आँखों की 
मस्ती के" मस्ताने 
हज़ारों देखे थे 
तो कभी "दिल 
चीज़ क्या है" में, 
वफ़ाओं के क्या खूब 
नज़ारे बोए थे 

जब "चुरा लिया है 
तुमने जो दिल को" 
गुनगुनाया था,
हर जवां दिल को
धड़कना जैसे, 
उस गीत ने ही 
तो सिखाया था।

​वो "परदे में रहने दो"
का अंदाज़ अब 
कहीं खो गया,
"रात अकेली है" 
गाते-गाते, जैसे 
सूरज सो गया।

"दो लफ्जों की है
दिल की कहानी" 
कह कर वो 
चुप हो गईं,
न जाने कितनी 
अनकही बातें,
वक्त के गर्त में 
खो गई।

बर्मन दा की 
धुनों पर जब जब 
इस आवाज़ ने 
सुर की चादर 
तानी थी
बन गई हर प्रेमी के 
दिल की, वो अमर 
प्रेम कहानी थी

"मेरा कुछ सामान" 
मांगती वो आवाज़, 
न जाने क्यों अचानक 
खामोश हो गई,
संगीत की दुनिया की 
छोटी सी 'आशा'
शायद मां की गोद में 
जाकर सो गई....
स्त्रीrang - सुजाता #RIPLegend #PadamShree #guinessbookofworldrecords 
#ashabhosle #merakuchsaman #emotions #April2026 #sahityatak #azeebdastanhaiyeh Akb #Song #dolfzonkihaidilkikahani #hindipoet