Friday, May 15, 2026

मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!


मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!

 डॉ.आनंद नि मी आम्ही दोघे महाविद्यालयीन मित्र. असंख्य वेळा भेटलेलो. अगदी पहिल्यापासून. समोरच्या व्यक्तीवर जीव लावून प्रेम करणारा. निखळ   आनंदाच्या बिया पेरीत  , स्वतःची दुःखे दूर ठेवून ,"जगाला प्रेम  अर्पावे" ही उक्ती जगणारा सर्वांचा मित्र, डॉ.आनंद नाडकर्णी! सर्वार्थाने  अजातशत्रू असलेले हे व्यक्तिमत्त्व ! स्नेहसंमेलनापासून ते वक्तृत्वस्पर्धेपर्यंत एकत्र प्रवास  महाविद्यालयीन  काळात झाला. त्यांचे वडील हे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते डॉ.म द.नाडकर्णी. अत्यंत तत्वनिष्ठ आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. त्यांच्या सत्वगुणांचा वारसा त्यांच्या बुद्धिमत्ते बरोबर आनंदला मिळाला होता. 
पुढे 'वेध' च्या माध्यमातून डॉ.नाडकर्णी यांनी लक्षावधी मनांना सावरण्याचे कार्य केले. अहंकाराचा, पदाचा आणि  सर्वस्पर्शी  प्रतिभेचा अंशभर अहंकार नसलेला, केवळ आनंद देणे हाच धर्म मानणारा आमचा मित्र आज मात्र ह्या जगाला दुःख देऊन गेला.
खरा विज्ञान आनंदयोगी हरपला! त्यांच्या अनेक मनोवैज्ञानिक पुस्तकांच्या निमित्ताने आणि वेध या संस्थेच्या रूपाने आनंद आपल्यात कायम असणारच आहे. अत्यंत व्यथित मन झाले आहे,ह्या माझ्या विचारवंत मित्राला निरोप देताना..माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रवीण दवणे 

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत... 
'नाडकर्णी गेले' या मित्राच्या मेसेज नं दिवसाची सुरुवात झाली आणि एखादा दोर कापून आपल्याला अंधारात कुणीतरी अधांतरी केल्यागत झालं. 
आपापल्या डबक्यात रमलेल्या माणसांना आरोग्य आयुधांनी प्रवाही करणारा, मनावर ओझी असणाऱ्या माणसांनां नुसत्या गप्पांनी पिसागत हलकं वाटवणारा, आपल्या कोवळ्या आणि सैल मनानं कागदावर सुंदर 'आनंदरेषा' काढणारा, आणि महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य जागेवर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारा, अतिशय मोलाचा माणूस आपण आज गमावला.  
  
'शहरी लोकांची थेरं' वाटणाऱ्या सायकोलॉजी ला त्यांनी भाषा, प्रांत, परिस्थिती यांच्या सीमारेषा तोडून 'मानसिक आरोग्य' करून मराठी समाजाच्या रोजच्या जगण्यात आणलं. ज्या काळात मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे 'वेड लागलंय' असा समज होता त्या काळात 'शहाण्यांचे डॉक्टर' म्हणून उपचार आणि समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोचेल यासाठी ते दिवसरात्र झटले.

काकांनी अस्थिर मनांना स्थिर केलं, गैरसमजात गुरफ़टलेल्याना डोळस केलं, कधी लोकांना बोलू दिलं, कधी फक्त वाहू दिलं, मोकळं होऊ दिलं, अनेक जीवांची परवड थांबवली तर अनेकांची अनेक वर्षांची खदखद संपवली. त्यांच्यामुळे उभ्या राहिलेल्या माणसांची आणि घरांची संख्या काढली तर ती सहज काही हजारात भरेल. यावरून त्यांच्या कामाची महती सहज लक्षात येईल.
 
संबंध महाराष्ट्रात जिथं आज खरात सारख्या बाबा बुवांनी समाजाला आंधळं करून अक्षरशः पाहिजे तसं नासवलंय तिथे डॉकटर नाडकर्णीं सारख्या 'डोळस' करणाऱ्या माणसाचं जाणं खरोखर जिव्हारी लागणारं. 

"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हि ओळ ज्यांच्याबाबतीत मी पाहिली, ज्यांच्याबरोबर अप्रतिम गप्पा, चर्चा करायची संधी मिळाली, ज्यांच्या सहवासानं,आपुलकीनं कायम अदृश्य आधार मिळाला, आणि ज्यांच्या मिश्किल उत्तरानी आयुष्यभराची वाट सापडली ते डॉक्टर नाडकर्णी आता नसणार आहेत, त्यांनी महाराष्ट्र्राच्या मनावर उमटवलेल्या 'आनंदरेषा' पुसू न देणं ही आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे.
अलविदा काका. तुम्ही जिथे असाल, वाऱ्यावर बसून तिथलं सुंदर स्केच काढत असाल हे नक्की!

♥️♥️🙏🙏🌼🌼

क्षितिज  पटवर्धन

डॉ आनंद नाडकर्णी

डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‌‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‌‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‌‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.

सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
मानवी मन हे अथांग समुद्रासारखं आहे त्यात भावना आहेत, संघर्ष आहे, वेदना आहेत आणि आशेचे किरणही आहेत. या मनाच्या गूढ विश्वाला सहज, सोप्या आणि माणुसकीच्या भाषेत समजावून सांगणारा एक संवेदनशील आवाज आज कायमचा शांत झाला. ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, शरीराने दूर गेले तरी त्यांनी विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत कायम जिवंत राहणार आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते मन समजून घेणारे ‘माणूस’ होते. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. “मानसिक आजार हा काही वेगळा किंवा लाज वाटण्याचा विषय नाही; तोही इतर शारीरिक आजारांसारखाच आहे,” हा विचार त्यांनी सामान्य माणसांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत होती. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करणारी चळवळ उभारण्याची आणि त्या विचारातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात “आयपीएच” अर्थात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना झाली.
ही संस्था केवळ मानसिक रुग्णांपुरती मर्यादित राहिली नाही. आयुष्याच्या ताणतणावांनी थकलेल्या व्यक्तींपासून ते स्वतःचा स्व-विकास शोधणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकासाठी आयपीएचने आधाराचा हात दिला. उपचार, समुपदेशन यांसोबतच साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांसारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य अधिक मानवी आणि आनंददायी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वेगळा होता.

१९८० साली त्यांनी एमबीबीएस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रात एम.डी. पदवी प्राप्त केली. पण त्यांच्या नावामागील खरी ओळख पदव्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे निर्माण झाली. त्यांनी मनोविज्ञानाला पुस्तकांच्या चौकटीत न ठेवता ते थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडून दिलं.
लेखनक्षेत्रातही त्यांचा ठसा तितकाच गडद होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान लाभला. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’, ‘जन्मरहस्य’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्यांच्या लेखनात वैद्यकीय ज्ञान होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात माणसाच्या भावविश्वाची खोल समज होती.
त्यांची काही गाजलेली पुस्तकं आणि नाटकं आजही वाचकांना विचार करायला भाग पाडतात —
‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मनोगती’, ‘मनोविकास’, ‘हेही दिवस जातील!’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ अशी अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांच्या वैचारिक समृद्धीची साक्ष देतात.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली. त्यांनी लोकांना फक्त उपचार दिले नाहीत, तर जगण्याची नवी उमेद दिली. मनातील वेदनांना शब्द दिले. तणावग्रस्त मनाला समजून घेतलं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे  “मन मोकळं करणं ही कमजोरी नाही,” हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलं.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली मानसिक आरोग्याची जाणीव, माणुसकीची शिकवण आणि संवेदनशील विचारांची परंपरा कायम समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या जाण्याने मानसशास्त्र, साहित्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #डॉआनंदनाडकर्णी #श्रद्धांजली #मानसिकआरोग्य #मानसोपचारतज्ज्ञ #मानसशास्त्र #आयपीएच #InstituteForPsychologicalHealth

https://www.facebook.com/shrikantjoshiofficial

डॉ आनंद नाडकर्णी

भावपूर्ण श्रद्धांजली: मानसिक आरोग्याचा 'आनंद' वाटणारा दीपस्तंभ हरपला!

आपल्या शब्दांनी आणि उपचारांनी हजारो नैराश्यग्रस्तांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मा​नसिक आजार किंवा नैराश्य या विषयावर समाजात उघडपणे बोलणे जेव्हा टाळले जायचे, अशा काळात त्यांनी याविषयीची भीती दूर करून "मनाची मशागत" करण्याची चळवळ उभारली. त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

डॉ. नाडकर्णी यांचे जीवन आणि करिअर अत्यंत बहुआयामी होते. २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (IPH) या संस्थेची स्थापना केली, जिथे आज ७० हून अधिक तज्ज्ञ कार्यरत आहेत. केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता त्यांनी कला, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्तीचा 'स्व-विकास' साधला. यासोबतच, तरुणांना आणि पालकांना करिअर व जगण्याची योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी 'वेध' (VEDH) हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम सुरू केला. तसेच, पुण्यातील प्रसिद्ध 'मुक्तांगण पुनर्वसन केंद्रा'चे संस्थापक-विश्वस्त म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक मानले जाते.

वैद्यकीय कार्याव्यतिरिक्त डॉ. नाडकर्णी हे एक उत्तम लेखक, नाटककार आणि संवेदनशील विचारवंत होते. त्यांनी मराठीत १७ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली, ज्यामध्ये 'मनोगती', 'आत्मभान', 'सोबत संगतीची' आणि 'मनातलं माणसाचं' या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे; त्यांच्या दर्जेदार लेखनाची दखल घेऊन इयत्ता ९ वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातही त्यांच्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय-राज्य पुरस्कार प्राप्त 'देवराई' व 'कदाचित' यांसारख्या चित्रपटांसाठी मानसोपचार सल्लागार म्हणून मोलाचे योगदान दिले होते.

हिंदू तत्त्वज्ञान, इतिहास, संगीत आणि ताणतणाव व्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास असलेले डॉ. नाडकर्णी "मानसिक आजार असणे म्हणजे वेडे असणे नव्हे, तर मनाला झालेली ती एक जखम आहे जी उपचाराने बरी होऊ शकते," हा दृढ विश्वास त्यांनी समाजात निर्माण केला. डॉ. आनंद नाडकर्णी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली 'आयपीएच'ची संस्था आणि त्यांचे विचारप्रवर्तक साहित्य लाखो लोकांना सदैव मार्ग दाखवत राहील. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचा दिवा लावणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!


बातमी

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणसाच्या मनाचा वेध घेणारा, मानसिक आरोग्याबद्दल समाजात संवेदनशील संवाद घडवून आणणारा आवाज आज हरपला. त्यांच्या लेखनातून, विचारांतून आणि कामातून अनेकांना स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली. 

समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

डॉ आनंद नाडकर्णी

स्वत:च्या मनाशी मैत्री करायला शिकवणारे व्यक्तिमत्व हरपले 

​ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि शेकडो आयुष्यांना दिशा देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन ही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. आपल्या वाणीने आणि लेखणीने त्यांनी मानसिक आरोग्याचा विषय घराघरात पोहोचवला.  

भावपूर्ण श्रद्धांजली!
Ravindra Chavhan

अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी

*अथांग मनाचा समुद्र..*

आज मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने महाराष्ट्राने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. 

मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर हजारो लोकांना जगण्याची नवी दिशा दिली. 

मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अमूल्य राहिले. 

लेखन, व्याख्यानं, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आणि व्यसनमुक्तीच्या कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. 

त्यांची भाषा अभ्यासपूर्ण असूनही अत्यंत साधी आणि माणुसकीने भरलेली होती. म्हणूनच ते फक्त डॉक्टर नव्हते, तर अनेकांसाठी विश्वास देणारे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना मनःपूर्वक आदरांजली.

*“काही माणसं आयुष्य संपल्यानंतरही त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून सतत जिवंत राहतात…*

डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यापैकीच एक.”

आपलं मानसशास्त्र परिवारातर्फे या अथांग मनाच्या समुद्राला भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

@राकेश वरपे

#dranandnadkarni 

वेध डॉ आनंद नाडकर्णी

'वेध' च्या माध्यमातून ज्यांनी स्व च्या पलीकडे जगणाऱ्या असंख्य माणसांचा वेध घेत आयुष्य समृद्ध केलेच पण त्यांच्याशी मैत्री निर्माण होत त्यांच्या कार्याशी जुळवून दिले असे वेध चे सर्वेसर्वा आनंद नाडकर्णी सर आज पहाटे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. सरांना कधी प्रत्यक्षात भेटता आले नाही याची खंत मनात कायमस्वरूपी असेलच पण त्यांच्यामुळे सारंग गोसावी, अमृत देशमुख, स्वप्नील कुंभोजकर, धनश्री लेले, विशुद्धानंद भारती अर्थात भारती ठाकूर ताई आणि नि.मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी  या सगळ्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आनंद नाडकर्णी सर यांना सद्गती लाभो आणि कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. ॐ शान्ति 🙏🌹

डॉ आनंद नाडकर्णी आठवण

45 वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : मुंबईच्या केईएम् रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासाठी मनोविकारशास्त्राची पंधरा नंबरची ओपीडी. 
प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असणारे, हसमुख चेहऱ्याचे एक तरुण डॉक्टर कोणत्याही इरिटेशन शिवाय पेशंट तपासत असतात. 

त्यांच्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची ते विलक्षण आस्थेने चौकशी करत असतात. त्याचं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 

एक मध्यमवयीन पुरुष त्यांच्याकडे तपासणीसाठी येतो. डॉक्टर विचारतात, ‘कोणकोणते त्रास होत आहेत तुम्हाला ..सांगू शकाल?’’ 

‘‘झोप लागत नाही..दचकून जाग येते. विनाकारण धडधड होते अचानक.. सारखी भीती वाटत राहाते. जबाबदाऱ्या खूप आहेत हो. कमावणारा मी एकटा..’’, चेहऱ्यावरची रया गेलेला काळजीने ग्रासलेला आणि भवितव्याच्या चिंतेने त्रस्त झालेला अशक्त इसम खोल गलेल्या आवाजात उत्तरला. 

त्याच्या उत्तराने डॉक्टर हेलावून जातात. स्तब्ध होतात. 
तो काळ होता मुंबईचा कुख्यात गिरणी संप सुरू झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरचा! त्यामुळे अशा थकलेल्या हारलेल्या पेशंटचा तिथे भडिमार होता. 
 
आणि नेमक्या त्याच काळात मनोविकारशास्त्रामध्ये एम्.डी.चे शिक्षण घेण्यासाठी त्या डॉक्टरांनी 'केईएम'मध्ये सुरुवात केली होती. 

निवासी डॉक्टर म्हणून ते तिथे काम करत होते. केईएम हे गिरणगावच्या वेशीवर वसलेले असल्याने गिरणी कामगारांचा संप सुरु झाला तेव्हा कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागली. घरातले कर्ते पुरुष सैरभैर झाले, स्त्रिया कोलमडून पडल्या. 

संप चिघळत गेला. घरं कोसळत गेली. घरातली सगळी माणसं चिंता आणि निराशेच्या खोल गर्तेत बुडून गेली. मरणाच्या दारात उभं राहिलेलं परवडलं, अशा मानसिक अवस्थेत तिथली माणसं जगत होती.     

त्या दिवशी डॉक्टरांच्या समोर उभा असलेला पराभूत देहबोलीचा तो इसम त्याचं काम प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाची देखभाल निगुतीने करत असणार, या बाबतीत त्यांच्या मनात जराही शंका नव्हती. 
  
भांबावून गेलेल्या त्या माणसाशी ते आत्मीयतेने बोलले. त्यांनी त्याला थोडासा धीर दिला. त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू केले असले तरी खुद्द डॉक्टरच मनातून हलले होते. त्या माणसाचा शून्यात हरवलेला चेहरा सतत त्यांच्या डोळ्यापुढे येत होता.

गिरणगावातला हा संप म्हणजे सगळ्या मुंबईला हलवून टाकणारा प्रकार आहे, आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णां मधल्या या अशा संपकरी कामगारांचा आणि कुटुंबीयांचा आपण अभ्यास केला पाहिजे, असं त्यांना मनोमन वाटलं. 

त्यासाठी त्यांचे अध्यापक प्रोफेसर डॉ. एल्.पी. शहा यांच्याकडून त्यांनी होकार मिळवला. सरांनी हिरवा झेंडा दाखवला. डॉक्टर निष्ठेने कामाला लागले. पुढच्या काही महिन्यांमध्ये अशा पार्श्वभूमीच्या तिसाहून अधिक ‘कहाण्या‘ मिळाल्या.

त्यांच्यावर संशोधन करताना ‘केसेस मिळाल्या’ हा शब्द डॉक्टरांनी मुद्दाम टाळला. अशा पेशंट्सचा त्यांनी अभ्यास केला आणि मनोविकारशास्त्रातला त्यांचा पहिलावहिला संशोधन निबंध लिहिला.  

‘गिरणी संपाचे, कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’ हे त्याचे शीर्षक होते.  मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा, तो आपला पहिलावहिला प्रयत्न होता असं डॉक्टरांना वाटलं. या डॉक्टरांचे नाव डॉक्टर आनंद नाडकर्णी!

विवेकवादी विचारांचा ऋजू आवाज! हारलेल्या अनेक जिवांना उभारी देणारा आधारवड! आपल्या लेखनातून नवा आशेचा प्रकाशमार्ग दाखवणारा दीपस्तंभ! मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांना सावरणारा ऊर्जास्त्रोत!    

लोक म्हणतात की, ते अतिशय प्रभावी मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, वक्ते आणि समुपदेशक होते! नक्कीच! मात्र त्याहून अधिक ते एक सहृदयी, संवेदनशील, सृजन, मानवतावादी हळवे व्यक्ती होते! 

आनंद नाडकर्णी आजही आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यात राहतील; धीर खचलेल्या लोकांसाठी तर त्यांची पुस्तके पाथफाइंडरचे काम करत राहतील. 

‘आता सारे संपलेय, खूप कठीण काळ आलाय आणि आपला निभाव लागणार नाही..‘ असे ज्याला कुणालाही वाटते त्याने डॉक्टर नाडकर्णी यांचे 'हेही दिवस जातील' हे पुस्तक आवर्जून वाचावे! त्यांची मनस्थिती बदलेल, याची हमी!    

'Everyone is good at something', प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्ये असतात, काहीतरी चांगली गोष्ट असतेच! ह्या गृहितकावर त्यांची अपार श्रद्धा होती आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा हा प्लसपॉईंट शोधून काढून त्याला चेतना देण्याचे काम ते करत! 

अशी माणसं आताच्या काळात दुर्मिळ झालीत, त्यांच्या एकाएकी जाण्याने समाजाची शब्दांतीत हानी होते. सध्याच्या नाउमेदीच्या, बेकीच्या काळात अशी माणसं भोवताली असणं हाही एक आधार असतो! त्यांची एक्झिट अधिक चटका लावून गेली..              
                     
- समीर गायकवाड


Wednesday, May 13, 2026

मराठी टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा का ?

मराठीचा टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा?

महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी मातृभाषा मराठीत अनुत्तीर्ण झाले हे वृत्त सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाले आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, की आपली एकंदर शिक्षण आणि समाजव्यवस्था अनुत्तीर्ण झाली, त्याचा शोध कुणीही घेत नाही. मुले जे सतत ऐकतात, पाहतात ,भाषेच्या ज्या पर्यावरणात ती  नांदतात, तेच त्यांच्या लेखणीतून उतरते .आज भवतालातून मातृभाषा मराठी खरोखर तेवढ्या कसदार पद्धतीने बोलली जाते का?
 विविध वाहिन्यातून, कथेतील व्यक्तिरेखांतून, निवेदनातून, जाहिरातीतून बोलली आणि लिहिली जाणारी होणारी मराठी  खरोखर कसदार मराठी असते का?
" केवळ भावना पोचल्या म्हणजे झाले ..,
एवढेच भाषेचे कार्य" हाभाषा विघातक संदेश समाजाला जेव्हा दिला गेला, तेव्हा अधोगतीला सुरुवात झाली. 
जगायचे असेल तर मराठी आले नाही तरी चालेल, परंतु परभाषा आली पाहिजे, हा मातृभाषा मराठीच्या मुळावर उठलेला विचार विद्यार्थ्यांनी मांडलेला नाही, की मराठीच्या शिक्षकांनी!
 मग केवळ शालांत परीक्षेत मराठीत एक लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,याचा दोष केवळ भाषेच्या शिक्षकांना आणि  विद्यार्थ्यांना जातो का? 
 शाळेतून पुरवणी वाचन, ग्रंथालय आणि ग्रंथपालाचे महत्त्व , हद्दपार झाले आहे. बाह्यवाचन हेच खरे आंतरिक वाचन असते; हेच  आज मान्य होत नाही. शब्दांना आपण संपदा म्हणतो. ती शब्दसंपदा मुलांच्या  खजिन्यात असावी ,असे पालकांना आणि शिक्षणव्यवस्थेला वाटते का? मराठीचे टिपण इंग्रजीतून उतरवणारी पिढी  मराठी प्रश्न पत्रिकेतील दीर्घ उत्तरे कशी लिहिणार? 
निबंधासाठी कल्पनाशक्तीची, मनातला विचार विस्ताराने मांडण्याची क्षमता आवश्यक असते .कल्पना करण्याचा आज अवकाशच नाही . आजची पिढी सतत डोळ्यांपुढे विविध माध्यमातून चित्र पाहूनच आपले आयुष्य  भरून टाकत आहे.  अशावेळी निबंधासाठी, केवळ गुगलवरून कॉपीपेस्ट केलेला आयता मजकूर 
घोकंपट्टी करून, विद्यार्थी मांडत आहेत. गुण मिळतात ते पाठांतराला. चिंतन मननाला नाहीत.  मजकूर आठवून उतरवणे हीच शोकांतिका उरली आहे. पत्रलेखनासाठी आंतरिक हुरहुर आणि ओढ लागते ती एसएमएसच्या वातावरणात कुठून मिळणार आहे ?
तेव्हा परीक्षेत ऐनवेळी पत्र लेखन करणार कसे? आयुष्यात कधी पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र पाहिलेलेच नाही अशीच पिढी निर्माण केली ना? सविस्तर लेखनाची,( तीही  स्वतःच्या हाताने) क्षमता क्षीण झाली आहे.
 एक शब्द ,दीड वाक्य, हीच काय ती उत्तरे ! अशाप्रकारे भरपूर गुण; नव्हे,मार्क्स देणारी 'एज्युकेशन सिस्टीम ' आणि , त्यातून बुद्धिमत्ता आजमावणे, यातून आपण काय हरवले आहे, याचा विचार या क्षणी तरी गांभीर्याने कोणी करणार आहे का? 
चर्चा केवळ एक दोन दिवसापुरता होणार,आणि पुन्हा पुढच्या वर्षी दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,यावर चर्चा होईल. फक्त चर्चा !
कृती कुठे आहे ?
काहीच प्रामाणिक नाही, हेच एक सत्य आहे.
 मराठी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण; एवढ्या पुरताच हा  विषय नाही.
हा संकेत आहे,आपल्या महाराष्ट्रातून नव्या पिढीच्या जिव्हेवरची मराठी दूर जात आहे.  हीच धोक्याची खूण आहे.  केवळ मराठीच्या शिक्षकांना दोष देऊ नका. 
आजही ग्रामीण भागात, तसेच अनेक ठिकाणी प्रयोगशील मराठीचे शिक्षक मी पाहतो आहे. वाचन प्रसारासाठी स्वतः पदरमोड करून मुलांना पुस्तके वाटणारी अध्यापकांची तरुण पिढी माझ्या संपर्कात आहे .सुक्याबरोबर ओले जाळू नका ही विनंती.
पालकांचां मातृभाषा मराठीत उत्तीर्ण होण्याचा आग्रह आणि बाहेरचे वातावरणही तपासून बघा. अर्थात जमले तर...!
नाहीतर उद्या चर्चेसाठी वेगळा विषय येतोच आहे.
            *
                  प्रवीण दवणे 

(हा एक विचार आहे, आपल्या वैचारिक समूहावर पाठवू शकता)

Saturday, May 9, 2026

समिक्षा लेखन ८

मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही,
डाव तुझ्या हाती दिला 
तरी जिंकता तुला  येत नाही.

चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत नात्यातील संघर्ष, अहंकार आणि असमर्थ विजय यांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण दिसते. “मला माझी हार मान्य आहे” या ओळीत कवीचा प्रामाणिक स्वीकार दिसतो; परंतु हा स्वीकार पूर्ण पराभवाचा नसून अंतर्मनातील एक शांत जाणीव आहे. हार मानणारा माणूस कधी कधी अधिक प्रगल्भ असतो, हे या ओळीतून जाणवते.

“म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही” या पुढील ओळीत नात्यांतील विजय-पराजयाची संकल्पना प्रश्नांकित केली आहे. एखाद्याने माघार घेतली म्हणून दुसरा खऱ्या अर्थाने जिंकतोच असे नाही, कारण नात्यांमध्ये जिंकण्यासाठी केवळ संधी पुरेशी नसते; त्यासाठी समज, संवेदना आणि सामर्थ्यही लागते.

“डाव तुझ्या हाती दिला / तरी जिंकता तुला येत नाही” या शेवटच्या ओळींमध्ये कवीने अत्यंत प्रभावी उपरोध वापरला आहे. येथे “डाव” हा शब्द नात्यांचा, भावनांचा किंवा आयुष्याच्या खेळाचा प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतो. समोरच्याला पूर्ण संधी देऊनही तो नातं टिकवू शकत नाही किंवा मन जिंकू शकत नाही, ही खंत यात दडलेली आहे.

या चारोळीची भाषा साधी, थेट आणि संवादात्मक आहे; पण तिच्या आशयात खोल मानसिक संघर्ष दडलेला आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडण्याची चंद्रशेखर गोखले यांची शैली येथे प्रभावीपणे जाणवते.

@ eaksharman

समिक्षा लेखन ७

तुला शांत निजलेली बघितलं की
मी निवांत होतो मनातल्यामनात
वाटतं हीच सूखाची सावली आहे
पसरलेल्या रणरणत्या उन्हात...

चंद्रशेखर गोखले 


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अतिशय साध्या शब्दांत प्रेम, शांतता आणि मानसिक निवांतपणाची गहिरी अनुभूती व्यक्त करतात. प्रिय व्यक्तीच्या शांत झोपलेल्या रूपाकडे पाहताना कवीच्या मनात निर्माण होणारा निवांतपणा हा केवळ क्षणिक आनंद नसून जीवनातील कठीण, उष्ण आणि थकवणाऱ्या वास्तवातून मिळालेली एक सुखद सावली आहे.

“तुला शांत निजलेली बघितलं की / मी निवांत होतो मनातल्यामनात” या ओळींमध्ये प्रेमाची कोमलता आणि नात्यातील निःशब्द जिव्हाळा सुंदरपणे उमटतो. येथे संवाद नाही, मोठे भावनिक उद्गार नाहीत; तरीही केवळ प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वातून कवीला मिळणारा आधार अत्यंत प्रभावीपणे जाणवतो. “मनातल्यामनात” हा शब्दप्रयोग अंतर्मनातील शांत भावविश्व अधिक अधोरेखित करतो.

“वाटतं हीच सुखाची सावली आहे / पसरलेल्या रणरणत्या उन्हात...” या ओळी जीवनाच्या प्रतीकात्मकतेने समृद्ध आहेत. “रणरणतं ऊन” हे जीवनातील संघर्ष, ताण, वेदना किंवा एकाकीपणाचे प्रतीक ठरते; तर प्रिय व्यक्तीचे अस्तित्व “सुखाची सावली” बनून त्या कठीण वास्तवात दिलासा देतं. ही तुलना अत्यंत प्रभावी आणि भावस्पर्शी आहे.

या कवितेची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे. अलंकारिक भाषेचा अतिरेक न करता, सहज आणि मितकथन शैलीत कवीने प्रेमातील शांत आधाराची अनुभूती जिवंत केली आहे. वाचकाच्या मनात हळुवार ऊब निर्माण करणारी ही कविता प्रेमाच्या नाजूक भावविश्वाचे सुंदर चित्र उभे करते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ६


तू दिलेले क्षण...
किती अपरिचीत होते
असं काही ते.......
मी स्वप्नातच धरत होते...

चंद्रशेखर गोखले समिक्षा लेखन


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा, गूढ आणि अंतर्मुख करणारा स्वर ऐकू येतो. “तू दिलेले क्षण...” या ओळीतून कवीने नात्यातील काही अमूल्य क्षणांची आठवण जागवली आहे. ते क्षण इतके अनपेक्षित आणि विलक्षण होते की, त्यांची अनुभूती वास्तवापेक्षा स्वप्नासारखी वाटते.

“किती अपरिचीत होते” या शब्दांत त्या भावनांची नवीनता आणि अनोखेपणा दडलेला आहे. आयुष्यात काही भेटी, काही भावना अशा असतात की त्या आधी कधी अनुभवलेल्या नसतात. म्हणूनच त्या मनात खोलवर ठसतात. पुढील ओळीत “मी स्वप्नातच धरत होते...” म्हणताना कवयित्रीसारखी संवेदनशील मनःस्थिती व्यक्त होते. ज्या गोष्टी वास्तवात मिळतील असे कधी वाटले नव्हते, त्या अचानक आयुष्यात येतात आणि मग त्या क्षणांवर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण होतं.

या चारोळीची भाषा अत्यंत साधी असली तरी तिच्या आशयात गहिरं भावविश्व दडलेलं आहे. अल्प शब्दांत प्रेम, आश्चर्य, स्वप्न आणि आठवणींचं सुंदर मिश्रण कवीने उभं केलं आहे. ही चारोळी वाचताना प्रत्येक वाचकाला आपल्या आयुष्यातील एखादा खास क्षण नकळत आठवतो, हेच तिचं खरं यश आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ५

वाटते तितकी साधी नसते
ही दिवस ढळण्याची वेळ
कुणाला दिसेनासं होण्याची घाई
आणि आपल्या जीवाशी खेळ

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेच समिक्षा लेखन

चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत संध्याकाळ ही केवळ दिवस संपण्याची वेळ राहत नाही, तर ती मानवी आयुष्यातील भावनिक अस्थिरतेचे आणि नात्यांतील हरवण्याचे प्रतीक बनते. “वाटते तितकी साधी नसते / ही दिवस ढळण्याची वेळ” या ओळींमधून कवीने अत्यंत साध्या प्रतिमेतून गहन अर्थ उलगडला आहे. दिवस मावळणे म्हणजे फक्त प्रकाश कमी होणे नसून, कुणाच्या आयुष्यातून कुणी हळूहळू दूर जाण्याची वेळ असते, अशी जाणीव या कवितेत प्रकर्षाने दिसते.

“कुणाला दिसेनासं होण्याची घाई / आणि आपल्या जीवाशी खेळ” या ओळींत मानवी नात्यांतील अस्वस्थता आणि आतल्या वेदनेचा उत्कट आविष्कार आहे. एखादी व्यक्ती दूर जात असताना तिची घाई दिसते, पण त्या प्रक्रियेत दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो, याची तिला जाणीव नसते. “जीवाशी खेळ” हा शब्दप्रयोग भावनिक तडफड आणि असहायता प्रभावीपणे व्यक्त करतो.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सूचकता. कुठेही मोठमोठे शब्द नाहीत, अतिनाट्य नाही; पण प्रत्येक ओळ मनात खोल उतरते. संध्याकाळच्या प्रतिमेतून कवीने विरह, एकाकीपणा आणि नात्यांच्या नाजूक अवस्थेचे अत्यंत संवेदनशील चित्र रेखाटले आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडणे, ही चंद्रशेखर गोखले यांच्या लेखनाची ताकद या चारोळीत पुन्हा जाणवते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ४



काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो
आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो
चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अल्प शब्दांत मानवी अनुभवांचा खोल आशय मांडतात.

“काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो...”

या ओळी जीवनातील अपूर्ण नात्यांची, अधांतरी राहिलेल्या स्वप्नांची आणि न सांगितलेल्या भावनांची जाणीव करून देतात. प्रत्येक गोष्टीचा शेवट स्पष्ट आणि ठाम असतोच असे नाही; काही कथा काळाच्या प्रवाहात विरून जातात, पण मनातून मात्र कधीच संपत नाहीत. कवीने “कथा” हा शब्द वापरून मानवी आयुष्यालाच एक रूपक दिले आहे.

“आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो”

या ओळीत अनुभवातून आलेली स्वीकाराची भावना दिसते. आयुष्याने दिलेल्या जखमा, तुटलेली नाती किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यामुळे मन अधिक वास्तववादी बनते. पूर्वी अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी आता सहज पटू लागतात. ही केवळ निराशा नाही, तर जीवन समजून घेतल्याची एक शांत जाणीव आहे.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची साधी भाषा आणि खोल भावविश्व. कोणताही अलंकारिक आव आणत नाही, तरी ती थेट मनाला भिडते. अपूर्णतेतही सत्य असते आणि काही कथा शेवटाशिवायही आयुष्यभर जगत राहतात, हा अत्यंत सूक्ष्म विचार कवीने प्रभावीपणे मांडला आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ३

नेहमीच डोक्याने विचार करु नये
कधी भावनानाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेवर समिक्षा लेखन

यांच्या या चार ओळी साध्या वाटल्या तरी त्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा अतिशय कोमल आणि संतुलित दृष्टिकोन दडलेला आहे. माणूस नेहमी तर्क, विचार आणि व्यवहार यांच्या चौकटीत जगत असतो; पण कवी येथे सांगतो की जीवन केवळ बुद्धीने जगायचं नसतं. भावनांनाही तितकाच सन्मान आणि मोकळेपणा मिळायला हवा.

“नेहमीच डोक्याने विचार करु नये” या ओळीतून कवीने आधुनिक जीवनातील कोरडेपणावर सूचक भाष्य केले आहे. सतत हिशोब, शंका आणि तर्क यांच्या आधारे घेतलेले निर्णय माणसाला भावनिकदृष्ट्या रिकामं करू शकतात. म्हणूनच “कधी भावनानाही वाव द्यावा” ही ओळ मनाच्या नैसर्गिक स्पंदनांना स्वीकारण्याचा सल्ला देते. येथे भावना म्हणजे केवळ हळवेपणा नसून संवेदनशीलतेचा स्वीकार आहे.

“आसुसलेल्या डोळ्यांना / स्वप्नांचा गाव द्यावा” या प्रतिमेत कवीची कल्पनाशक्ती आणि आशावाद सुंदरपणे व्यक्त होतो. ‘आसुसलेले डोळे’ ही प्रतिमा अपूर्ण इच्छा, आतुरता आणि जगण्यातील उरलेली आशा दर्शवते. अशा डोळ्यांना ‘स्वप्नांचा गाव’ देणे म्हणजे माणसाला पुन्हा जगण्याची उमेद देणे होय. येथे ‘गाव’ हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे; कारण तो केवळ स्वप्न नव्हे तर त्या स्वप्नांना आसरा, आपलेपणा आणि विस्तार देतो.

या कवितेची भाषा अत्यंत सहज आणि प्रवाही आहे. अलंकारिक शब्दांचा अतिरेक न करता कवीने थेट मनाला स्पर्श करणारा आशय मांडला आहे. थोडक्यात, ही कविता बुद्धी आणि भावना यांच्यातील समतोल साधण्याचा सुंदर संदेश देते. जगण्यात स्वप्न, संवेदना आणि मनाचा ओलावा जिवंत ठेवण्याची प्रेरणा या चार ओळी वाचकाला देतात.

@ eaksharman