Saturday, March 28, 2026

देव

*जय जय श्रीराम*

देव असतो मनात, देव वसतो हृदयात 
देव हसतो कानात ,देव जीवन चराचरा.. *रामचंद्र स्मरा*

देव भावाचा भुकेला,देव धावतो हाकेला
देव जागतो प्रेमाला,देव या जन्मी आसरा.. *श्रीराम स्मरा* 

देव नाही नुसता दगड, देव नाही रे थोतांड 
देव नाही कर्मकांड, नाही दानवास थारा.. *राजाराम स्मरा#*

देव मानला की दिसे, अन्यथा पोकळ वासे
देव जाणला की पिसे, देव चुकवी जन्मोजन्मीचा फेरा. *रघुवीर स्मरा*

देव मूर्त की अमूर्त,की देव कल्पना अद्भुत
देव आस्तिकासी अमृत,देव दिव्य दिगंतरा.. *राघवेंद्र स्मरा*

देव नित्य निरंजन ,देव अंतरीची आभा 
देव प्रत्येक कणात,देव नये हाती कासरा.. *रघुनाथ स्मरा* 

देव वसतो मनात,देव प्रकटे मंदिरात
देव रमतो अंतरी, रामराज्य यावे घरा..*दाशरथी श्रीराम स्मरा* .. 

*श्रीराम जयराम,रघुपती राघव राजाराम !!!*🙏

© सौ मंजूषा विवेक थावरे

राम जन्मला

राम जन्मला..
.
आपले ध्येय सर्वभूतस्थित रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे आणि सूक्ष्मरूपाने हृदयस्थ ईश्वर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी हे निर्गुण ब्रह्म सगुण रूप धारण करते. त्या सगुण रूपाला आधी जाणू या.
वाल्मीकींनी नारदांना प्रश्न केला, हे महर्षी, या वेळी या भूलोकावर गुणसंपन्न असा कोण आहे? वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, सदाचारी, विद्वान, समर्थ, प्रियदर्शन मनोनिग्रही, क्रोधाला जिंकलेला, तेजस्वी असा कोण आहे? हे जाणण्यास मी उत्सुक आहे. आपण तो सांगायला समर्थ आहात. तेव्हा नारदमुनी आनंदित होऊन म्हणाले, ‘इश्वाकुकुळात जन्मलेला राम आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिमान, वक्ता, वैभवशाली आणि शत्रुनाशक आहे. यानंतर नारदांनी अगोदर श्रीरामाचे वर्णन केले. त्यानंतर रामाच्या यौवराज्याभिषेकापासून ते राज्याभिषेकापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना कथन केल्या.
नारदांकडून हे रामचरित्र श्रवण केल्यावर वाल्मीकी माध्यान्ह स्नानासाठी तमसा नदीवर जात असताना त्यांना क्रौंचवधाचे ते दुष्कृत्य पाहायला मिळाले. त्यांच्या मनात करुणा आली आणि त्यांनी श्लोकबद्ध शापवाणी उच्चारली. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले,
.
‘हे वाल्मीकी, मम इच्छेने, जिव्हाग्रे सरस्वती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’ ब्रह्मदेव वदती।
.
‘तोच मनोहर धर्मात्मा तो, धीर, वीर जगती, 
आत्मसंयमी, जितेंद्रिय तो धर्माची मूर्ती 
कथिली तुजला देवर्षिने रामचरित महती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’ ब्रह्मदेव वदती।
.
रक्षणकर्ता धर्माचा तो, सत्यवचनी कीर्ती, 
कालाग्नि जणु क्रोधे, तरीही क्षमेत तो धरती,
महावीर तो शत्रुनाशक, करुणेची मूर्ती, 
वर्णन कर तू, रामचरित्रा, ब्रह्मदेव वदती।
.
विदीत होईल सर्व तुला ते करतलामलकवती,
सादर कर मग, रामकथेला, प्रासादिक अनुभूती,
जोवर पर्वत नद्या भूतली, श्रद्धा रामाप्रति,
वर्णन कर तू रामचरित्रा, ब्रह्मदेव वदती |
.
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी यथाविधी आचमन करून हात जोडून बसले असता योगधर्मामुळे श्रीरामचरित्राचे त्यांना ज्ञान होऊ लागले. वनवासात घडलेल्या घटनाही त्यांना करतलामलकवत म्हणजे करतळावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागल्या. याप्रमाणे संपूर्ण चरित्र अवलोकन केल्यावर त्यांनी रघुवंशामध्ये अवतीर्ण झालेल्या श्रीरामाचे चरित्र ग्रथित केले ते रामायण. 
दशरथ राजा प्रतापी होता, धर्मज्ञ होता, उदार अंत:करणाने युक्त होता. पण त्याला वंश चालविणारा पुत्र नव्हता. त्याने वसिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ चालू असताना अग्नीतून एक महापुरुष निघाला. त्याच्या हातात दिव्य पायसाने भरलेली थाळी होती. त्याने दशरथाला ते पायस (खीर) त्याच्या राण्यांना द्यायला सांगितले. त्याप्रमाणे दशरथ राजाने आपल्या राण्यांना ते पायस विभागून अर्पण केले. 
कौसल्येला पायसाचा अर्धा भाग दिला. सुमित्रेला अगोदर एक चतुर्थांश व नंतर पुन्हा एक अष्टमांश भाग दिला. कैकेयीला एक अष्टमांश भाग दिला. राण्यांनी ते पायस भक्षण केल्यावर त्यांना गर्भधारणा झाली.
अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर सहा ऋतू लोटल्यावर चैत्रातील शुद्ध नवमीला लोकांना पूज्य असा जगदीश्वर राम कौसल्येच्या ठिकाणी उत्पन्न झाला.
.
अश्वमेध यज्ञ पूर्ण, हो ऋतु सहा,
द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा, 
पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु,
कर्क राशी असती लग्नी, चंद्र नी गुरू,
कौसल्येस दिव्य असा पुत्र जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
.
विष्णुचा अवतार, इश्वाकुनंदन, 
लोहिताक्ष  महाबाहु, उच्च रोदन,
इंद्रवरे, तेजस्वी अदिती शोभते,
कौसल्या पुत्रयोगे तशीच भासते,
गगनातून सुमनांचा वर्षाव जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
.
या दिव्य बालकाचे नेत्र आणि ओठ लालसर, बाहू लांब असून ते बालक सर्व शुभचिन्हांनी युक्त होते. कौसल्येच्या या भागामध्ये भगवान विष्णूच्या शक्तीचा निम्मा भाग प्रकट होत होता. विष्णूने  अवतार घेतला..राम जन्मला...
.
.
सौ. शैलजा भा. शेवडे

ग्रेस


ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून जाणवण्याचीच गोष्ट आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की “कवीला काय म्हणायचंय?” असा शाळेत विचारलेला प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” असा असायला हवा. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की दर वेळी उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही, प्रश्नही रेंगाळू द्यावे मनात. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की ग्रेसच्या कवितेचे गूढरम्य प्रदेश फिरायचे तर हातात संगीताची मशाल हवी!

संगीतकारांना ग्रेसच्या कवितेचं प्रचंड आकर्षण वाटतं याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. संगीतकारांना ग्रेस हा आपला कवी वाटतो कारण त्यांची कविता ॲब्स्ट्रॅक्शन्समधे संवाद साधते. ही ॲब्स्ट्रॅक्शन्स संगीतात अनुवादित करताना संगीतकाराचा कसही लागतो आणि अपार आनंदही मिळतो! म्हणून ग्रेसच्या काव्याला बहुतेक संगीतकारांनी दिलेल्या चाली उत्तमच वाटतात! हृदयनाथ मंगेशकरांपासून श्रीधर फडकेंपर्यंत आणि आनंद मोडकांपासून नरेन्द्र भिडेपर्यंत सर्व संगीतकारांना ग्रेसची मोहिनी पडलेली आहे.

उन्हे उतरली
एक सावली
पुढे दिठीवर थेंब नवा
या वळणाशी
दुःख उराशी
सूर वितळतो जणू भगवा
ग्रेसच्या कवितेतली पहिली चित्तवेधक बाब म्हणजे चित्रमयता. उन्हं उतरणीला आगली आहेत आणि संध्याकाळीच दिसते अशी लांब सावली आपल्याला दिसतेच; पण पुढच्या तीन ओळी ॲब्स्ट्रॅक्ट असल्या तरीही ‘तो वितळणारा भगवा सूर’ आपल्याला अवकाशात दिसत राहतो. मला एक गंमत आढळली. मी केलेल्या ग्रेसच्या तीन कवितांच्या संगीतरचना करताना या तिन्ही कविता संध्याकाळच्या असूनही मी सकाळच्या रागांची धून वापरली आहे! हे असं अभावितपणे झालं असलं तरी त्याचं एक कारण आहे हे मला नंतर जाणवलं. ग्रेसच्या कवितेमध्ये एक अनामिक अशी बेचैनी आहे. बेचैनी जाणवते पण त्यावर बोट ठेवता येत नाही. आता संध्याकाळी तुम्ही मारवा किंवा पूर्वी ऐकलात तर तुम्हाला उदास वाटतं पण ही उदासी ‘डिफाइन्ड’ असते. त्यात संभ्रमावस्था नसते. परंतु संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळचा एखादा राग ऐका. तुम्हाला एक अनामिक बेचैनी जाणवेल. ते गलबलून येणं वेगळं असतं.

ग्रेसच्या कवितेला चाल देणं म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग काढण्यासारखं आहे. जसं दिसतं त्याला महत्त्व नसून जे दिसतंय त्याची जाणीव रेखाटायची.

स्वप्ने अपुली
कुणी सजविली
रंग तिरावर व्याकुळसा

नाद उगाळून
सांज बनातून
कळप गुरांचा निघे जसा
या कडव्याला चाल देताना मी फक्त सांगितीक रचनेचा फॉर्म डोक्यात ठेवला. तीन ओळींचा एक बंध – असे दोन बंध. पहिल्या तीन ओळींच्या बंधात मी आरोही सुरावट रेखाटली आणि पुढच्या तीन ओळींच्या बंधात त्याचीच मिरर इमेज असावी अशी अवरोही स्वराकृती रेखाटली आहे असं तुमच्या ध्यानात येईल.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा

देह अनावर
निज मातीवर
हिम वर्षावित ये वारा
आता लक्षात येतं की दिवसभराच्या कडक उन्हात प्रवास करून नंतर ही उन्हं उतरताना पाहिली आहेत. त्यामुळे कविता जे सांगते, तेच गाण्याची चाल परत सांगत नाही. चाल ही कवितेचा prequel आहे आणि sequel ही आहे. कविता सुरू होण्याआधी जे अस्तित्त्वात होतं आणि ती संपल्यानंतर जे अस्तित्त्वात राहणार ते गाण्यात आहे.

‘माझ्या वक्षी निजती पक्षी’ हे एका विलक्षण आत्मिक शांततेचं द्योतक आहे. ‘अतुल सुखाची ही धारा’ असं ग्रेस म्हणतात तेव्हा त्याला पहिल्या बंधातल्या ‘या वळणाशी, दुःख उराशी’ – त्या दुःखाची पूर्वपीठिका आहे हे लक्षात ठेवायला हवं. दुःख उरात ठेवून ते वळण पार केलं आणि एका प्रचंड मोठ्या प्रवासानंतर अनुभवलेली ही ‘अतुल सुखाची धारा’ आहे. हा प्रवास एका जन्माचा असेल किंवा अनेक जन्मांचा असेल. मला यात ‘धारा’ हा शब्दही महत्त्वाचा वाटतो. धारा ही वाहत असते. ती स्टॅटिक नसते. हे जिवंत, वाहतं सुख आहे. ‘निज मातीवर’ देह अनावर होतो आणि वारा हिम वर्षावित येणं म्हणजे सगळा दाह शांत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे गाणं परत धृवपदावर न येता केवळ सूर राहतात आणि शब्द वितळतात!

© कौशल इनामदार


Sunday, March 1, 2026

भाषा जास्त वापरली तर टिकते

#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली. 

मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”

तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली. 

त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे. 

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. 

मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.

वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
कौशल इनामदार

Tuesday, October 7, 2025

post 2

तुझी तू रहा

कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा. .

हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील
हसण्यावर,अश्रूंवर
तुझी सत्ता ठेवून रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा...

मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणा-या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा........

काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडणारीच
फुले वेचीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

उसने मुकुट कुणी
घालतील
जरी-अंगरखे पेहेरून
सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

मग कुठेतरी कमळे
फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत
तोवर तू गात रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा....

- संजीवनी बोकील

post 1

व.पु.काळे.
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.. साय म्हणजे गुलामी नव्हे.. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.. मैत्री तशी असावी.. दुधापेक्षा स्निग्ध.. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात..तसं मैत्रीचं घडावं.. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा....

Friday, September 12, 2025

लेख

हल्ली उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बेवारस वासरं पाळायचा दौर आलाय, अर्थात त्यांची घरं मोठी आहेत, त्यांच्या घराला मागे पुढे आवार आहेत. पण तरी हा विचार च किती सुंदर आहे. पण याचा प्राॅपगंडा कोणी करणार नाही.दोन वर्षांपूर्वी मी याच आशयाची एक कथा लिहीली होती, चांगला प्रतिसाद मिळाला होता किती जण चाँद सुरज ला पहायला सफाळ्याला जायला तयार होते. म्हणजे आपण ही असा विचार करू शकतो. दाक्षिणात्य अभिनेते तर गायींची सेवा आणि पूजा करतानाचे रील्स व्हायरल करतायत, जयपूर उदयपुर, कोटा, बुंदी अशा शहरात तर कधीपासून वासरं घरात पाळायला सुरुवात झाली. त्यांचा अनुभव असा वासरं लवकर शिस्त शिकतात त्यांच वेळापत्रक फार वक्तशीर असतं लाडात येऊन पिझ्झा बर्गर, गोड पदार्थ त्याना खायला द्यायचे नाहीत, चांगली शेकलेली भाकरी पोळी जरूर द्यावी पण चारा, भुईमूगाची टरफलं, शेंगा,कडबा हाच त्यांचा मुख्य आहार .वासरं ठराविक वयात दंगा करतात तेवढे चार पाच महिने जपावं लागतं मग एकदम शांत होतात 
या अशा घरात रमलेल्या गायींचे किस्से खूप ऐकण्या सारखे असतात. जयपूर जवळ एका गर्भश्रीमंत घरात असाच गायींचा कळप पाळला होता.काही कामा निमित्त घरचे कर्ते पुरुष बाहेर गावी कामा साठी गेले असताना त्यांच्या गाडीला जिवघेणा अपघात झाला बरोबर त्याच वेळी कळपातील काही गायी इतक्या अस्वस्थ झाल्या की घरचे त्यांचे विचित्र वर्तन बघून घाबरले.एक गाय तर देवघराच्या बंद दरवाजाला धडका देत होती.इतक्यात अपघाताची वार्ता समजली.पुढे ते दोघे बंधू शुध्दीवर येई पर्यंत या गायी व्रतस्थ राहिल्या. धोका टळल्याचं कळल्यावर एकच जल्लोष झाला तेव्हा या गायींना ताक मिश्रीत पाणी देण्यात आलं.पुढे त्यांची मानाची मिरवणूक ही निघाली कारण ज्या पध्दतीचा अपघात होता त्यात हे बंधू बचावणं असंभव होतं.
माझे मित्र म्हणाले कुत्रे मांजरं पाळण्या इतकच गायींना घरात स्थान देणं सोपं आहे.

© चंद्रशेखर गोखले

Tuesday, September 9, 2025

कथा १

आर आर आबांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने पार्थिवावर हंबरडा फोडला. खालच्या चार ओळी जरूर वाचा. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
.
एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
.
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
#कथाविश्व 
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...
.
'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
Fb group post 

Thursday, August 28, 2025

विचार पु ल देशपांडे १


माणसं, 'माणसं' केव्हा होतात? त्यांना एकमेकांना सांगावसं वाटतं, त्या वेळी ! "मनुष्य संपला"- असं आपण कधी म्हणतो? कोणाशी काही बोलावसं वाटत नाही - असं ज्या दिवशी वाटतं, त्या दिवशी मनुष्य संपला असं समजावं. मग त्याचं साठावं वर्ष असो वा पंचविसावं असो - त्यात काही फरक नाही.


पु. ल. देशपांडे

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला की ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते.

पु. ल. देशपांडे

"मी हसतो, मलाच हसतो. माझे वाचकप्रेक्षकही मग मला हसतात आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, आपण स्वतःलाच हसत आहोत. समाजाच्या एकूण तब्येतीस ते बरं असतं. माझ्या लेखनातून एवढंच हाती लागावं, ही अपेक्षा. नेपोलियननी जोसेफाइनला म्हटलं, "मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु मला तुझ्यावर याहून शतपटीने प्रेम करायचं आहे"- मलाही म्हणावंसं वाटतं, "मी साहित्यावर प्रेम करतो, परंतु मला साहित्यावर अजून शतपटीनं प्रेम करायचं आहे!"
पु. ल. देशपांडे

पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.


पु. ल. देशपांडे

हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा.

पु. ल. देशपांडे

आंघोळ ही देखील भुकेसारखी लागावी लागते. उठल्याबरोबर आंघोळ उरकायची ही नुसतीच सवय झाली. त्यात जाणीवयुक्त सौख्य नाही. साऱ्या शरीराचा जेव्हा 'आम्हाला आंघोळ घाला' असा रंध्रा रंध्रातून मुक आक्रोश सुरु होतो त्यावेळी घडते ते स्नान. एरवीचे अंग विसळणे झाले.


पु. ल. देशपांडे

नव्या वर्षाचं नवंपण ह्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.

पु. ल. देशपांडे


एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो. काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच 'आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर' असं म्हटलं आहे.

पु. ल. देशपांडे

पुस्तक वाचणारा माणूस हा जीवनात आनंदाच्या,
ज्ञानाच्या किंवा गेला बाजार इतरांना कसलाही उपद्रव
नसलेल्या विरंगुळ्याच्या शोधात असतो. पाचपन्नास
पानं वाचल्याशिवाय दिवस न घालवण्याची सवय
मला अगदी लहानपणापासूनंच जडली ती आजही
सुटली नाही. काहीतरी वाचल्याशिवाय दिवस गेला
तर, अंघोळ न करता गेलेल्या दिवसासारखं मला
वाटतं आणि अंघोळ करताना जसं आपण आपलं
आरोग्य चांगलं राहावं हा विचार मनात बाळगून अंघोळ
करतो असं नाही, अंघोळ या गोष्टीचाचं आनंद असतो
तसंच वाचनाचं आहे. कुठलं पुस्तक कुठल्या प्रकारचा
आनंद देऊन जाईल ते सांगता येत नाही.



पु. ल. देशपांडे


मला पाह्यला आवडतात माणसे ! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे - विशेषतः पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विटयाहून अष्टट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईंचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो - आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !



पु. ल. देशपांडे

I do not like being called a humorist. I don't sit down to manufacture humour. I write the way I love to write, and I am grateful to my readers when they notice the hidden tear. For me humour is a wonderful armour. I have used it occasionally as a weapon, but I have taken care to see that it does not hit anyone below the belt. Unfortunately, some people wear their belt a little too high! The humour that hurts is ugly, and art abhors ugliness.



पु. ल. देशपांडे

साहित्य, संगीत आणि नाटक मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला. जी जीवनदृष्टी मिळाली. मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग ! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आमचा जो स्नेह जडला, तीच माझी कमाई!

पु. ल. देशपांडे

ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते.


पु. ल. देशपांडे


शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.


पु. ल. देशपांडे

ज्या राज्यात अन्यायाचा निःपात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले.


पु. ल. देशपांडे

'हो'काराला सामर्थ्य नाही; 'न'काराला आहे. आपली आवड व्यक्त करणे हा भाबडेपणा झाला. नावड सांगण्याने व्यक्तिमत्त्वाला झळाळी येते.

पु. ल. देशपांडे


महागाईवर चर्चा चालू असताना पु.ल. आपल्या मित्राला म्हणाले, “या महागाईत टिकून राहायचं असेल, तर 'आर्थिक जादू' आत्मसात करायला हवी. हे आधुनिक अर्थशास्त्राचं एक तत्त्व आहे. पत्नी जेवढं खर्च करते त्यापेक्षा अधिक कमावणे या किमयेला 'आर्थिक जादू' म्हणतात!

पु. ल. देशपांडे

मन नेहमी मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या व्हेवलेंग्थ पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीच एकटा नसतो. त्याने तसे असूही नये.

पु. ल. देशपांडे

Sunday, August 24, 2025

Saturday, August 23, 2025

Thursday, August 21, 2025

लेख वामकुक्षी ते शतपावली

वामकुक्षी ते शतपावली

डॉ. प्रणिता अशोक

वामकुक्षी

काहींना दुपारी वामकुक्षी घेण्याची सवय असते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या बाजूस, डाव्या कुशीवर विश्राम करणे ! त्याचे

फायदेदेखील आहेत :

१. वामकुक्षी घेणे हे पोटासाठी, पचनासाठी चांगले असते. डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन-प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते.

२. दुपारी झोप घेतल्यास चिडचिडेपणा, मानसिक ताण कमी होतो. तसेच कामातील सतर्कता वाढते.

३. दुपारी थोडा वेळ झोप घेतल्यास स्मरणशक्ती चांगली राहते व मूड सुधारण्यास मदत मिळते.

४. अशा प्रकारची झोप घेतल्याने नैसर्गिक पद्धतीने मेंदू शांत होतो, थकवा दूर होतो. त्या वेळी चहा-कॉफीची गरज पडत नाही व त्याचे अतिसेवनही टाळले जाते.

हे लक्षात ठेवा

१. वामकुक्षी ही दुपारच्या जेवणानंतर १५ ते २० मिनिटे घ्यायची असते, रात्रीच्या जेवणानंतर नाही. त्यावेळी शतपावली (सावकाश चालणे) करावी.

२. ही झोप साधारण दुपारी १ ते ३ या वेळेत असावी व अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी.

चीनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात काही ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आरोग्याच्या आणि आकलनशक्ती-विषयक चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात दुपारी झोप घेतलेल्या व्यक्तीची आकलनशक्ती, एकाग्रता जास्त असल्याचे दिसून आले होते.

एक लक्षात घ्या की लहान पॉवर नॅप (साधारण ३० मिनिटे) सतर्कता वाढवू शकण्यास मदत करते. परंतु त्यापेक्षा अधिक काळ झोपल्यास लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगास कारणीभूत ठरू शकते. म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनशक्ती
चांगली असेल, चयापचय क्रिया योग्य पद्धतीने होत असेल, तर अनेक आजार दूर राहतात तसेच वजनावर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते.

शतपावली

रात्रीच्या जेवणानंतर (शक्य असल्यास दुपारीसुद्धा) शतपावली करणे शरीरासाठी महत्त्वाचे असते. आपले वाडवडीलही रात्रीच्या जेवणानंतर एकाच जागी न बसता थोडा वेळ चालण्याचा सल्ला देत असत. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे थोडा वेळ चालायला हवे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात :

१. पचनक्रिया सुधारते, तसेच बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या टाळता येतात.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण आणि आजार टाळणे शक्य होते.

३. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालणे हितकारक आहे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

४. वजन कमी करण्यासाठी चयापचय दर (मेटाबॉलिजम रेट) महत्त्वाचा असतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करावी. यामुळे मेटाबॉलिजम तर वाढतेच शिवाय मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात.

५. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने चांगली झोप लागते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि चांगली झोप घेता येते. शांत झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.
pranita76@gmail.com

साभार  :  कालनिर्णय २०२५   आरोग्य विषयक लेख  

Thursday, August 14, 2025

लोकमत सखी स्वप्न पहा शीतल महाजन

 स्वप्न पाहा, अडथळे येणारच. ते आले की विचारा स्वतःला, का?
आणि शोधा उत्तर.

भारतीय महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. साधनांची आणि संधीची कमतरता असली तरीही.  जे ठरवलं आहे ते करता येऊच शकतं !   पण मग आपण कमी कुठे पडतो  आपल्याला काय हवं ते ठरवण्यात. 

आपलं ध्येय निश्चित करण्यात आणि  त्यांचा पाठलाग करण्यात आपण कमी पडतो.

का?

समाज काहीतरी सांगतो महणून आमच्या अनेक मुली स्वप्नं ही बघत नाहीत. अमुक एक आपल्यासाठी नाही असं आपलं आपणच ठरवून टाकतात. 

मग कथी स्वतःला, तर कधी परिस्थितीला दोष देत असतात.

 माझे एक्च सांगणं आहे  , की आपल्याला हवी ती स्वप्नं बघा आणि ती सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी 

सर्वार्थाने प्रयत्न करा. अडथळे  येणारच. मात्र त्या अडथळ्यांना घाबरून जाऊ नका, अडथळ्यांचं स्वरूप वेगळं असू शकतं, मात्र अडथळे येणारच हे स्वीकारून पुढे जात राहिलं तर मार्ग सोपा होतो, तुमचे कसोशीचे प्रयत्न पाहिले की तुमच्या स्वप्नांना  होत असलेला इतरांचा विरोधही टप्प्याटप्प्यानं मावळत जाईल, मग बघा, यश आणि तुम्ही यात फार अंतर नसेल. 

का ? हा प्रश्न स्वतः लाच विचारायला शिका ! मला जेव्हा कळलं की कुठल्याही भारतीय स्त्रीने दोन्ही ध्रुवावर sky diving केलेले नाही .

तेव्हा मी स्वतः ला च विचारलं का ? आणि मग उत्तर मी शोधलं आणि ते स्वप्न पूर्ण ही केलं !


शीतल महाजन 

लोकमत सखी 

Tuesday, August 12, 2025

post 5 सुभाषित

ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः|
ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः||

ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य होत नाही; असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान [मिळवण्याचा प्रयत्न] कधीही सोडत नाहीत.

Saturday, August 9, 2025

Friday, August 1, 2025

Thursday, July 31, 2025