Thursday, May 21, 2026
गूढ कथा
पावसाळ्याची रात्र होती. कोकण मधल्या “भोरवाडी” गावावर काळे ढग दाटून आले होते. गावात वीज नव्हती. फक्त अधूनमधून चमकणारी वीज आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज.
गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता — “देशमुखांचा वाडा”. त्या वाड्याबद्दल गावात अनेक कथा सांगितल्या जायच्या. म्हणे, तिथे रात्री दिवा दिसतो… पण वाड्यात कोणी राहत नाही.
त्या गावात गणू नावाचा एक तरुण राहत होता. शहरातून शिक्षण करून तो नुकताच गावात परतला होता. गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर त्याचा विश्वास नव्हता.
एके रात्री चहाच्या टपरीवर चर्चा रंगली होती.
“गण्या, रात्री बारा नंतर त्या वाड्याकडं जाऊ नकोस,” म्हातारा तात्या कुजबुजला.
“का? भूत आहे का तिथं?” गणू हसत म्हणाला.
तात्याच्या डोळ्यांत अचानक भीती उतरली.
“भूत नाही रे… पण काहीतरी आहे.”
त्या रात्री गणूने ठरवलं — सत्य शोधायचंच.
हातात कंदील घेऊन तो वाड्याकडे निघाला. पाऊस रिमझिम कोसळत होता. वाड्याचं मोठं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. आत काळोख.
गणूने पाऊल टाकलं.
कर्कश्श आवाज करत दार मागून बंद झालं.
क्षणभर त्याचा श्वास अडकला.
वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता… टक… टक… टक…
गणूने कंदील वर केला.
भिंतीवर जुन्या चित्रांवर धूळ साचली होती. अचानक एका चित्रातील स्त्रीचे डोळे चमकले असे त्याला वाटले.
तो घाबरला. पण पुढे गेला.
वरच्या खोलीत मंद दिवा पेटलेला होता.
आत एक जुनी झुलती खुर्ची हळूहळू हालत होती…
पण तिथे कोणीच नव्हतं.
अचानक मागून आवाज आला —
“इतक्या वर्षांनी कोणी आलं…”
गणूने मागे वळून पाहिलं.
पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. चेहरा फिकट. डोळ्यांत विचित्र शांतता.
“तुम्ही… कोण?” गणूचा आवाज थरथरला.
ती हसली.
“मी या वाड्याची शेवटची मालकीण.”
गणू काही बोलणार इतक्यात वीज चमकली…
आणि त्या क्षणी त्याला दिसलं —
ती स्त्री जमिनीवर उभीच नव्हती.
ती हवेत तरंगत होती.
गणूच्या हातातून कंदील खाली पडला.
संपूर्ण खोली अंधारात बुडाली.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी…
गावकऱ्यांना गणू वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला.
तो जिवंत होता.
पण त्या दिवसानंतर त्याने कधीच “देशमुखांच्या वाड्या”बद्दल एक शब्दही काढला नाही.
फक्त कधी कधी रात्री तो झोपेत घाबरून ओरडायचा —
“ती अजून तिथंच आहे…”
@ eaksharman
समिक्षा लेखन
ही कविता केवळ निसर्गचित्र रंगवत नाही, तर मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि आध्यात्मिक प्रवासाला शब्दरूप देते. Ramdas Khare यांच्या “प्रकाश पाझरत जावा” या कवितेत वैराग्य, वेदना, करुणा आणि अमूर्ततेकडे जाणारी अंतर्मनाची ओढ अत्यंत चित्रमय पद्धतीने व्यक्त झाली आहे.
कवितेच्या सुरुवातीलाच “वैराग्याचे पलिते” आणि “क्षितिजावर पेटलेले” या प्रतिमा मनाला गूढ शांततेच्या प्रदेशात घेऊन जातात. येथे क्षितिज हे केवळ निसर्गाचे दृश्य राहत नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचे, आत्मशोधाचे प्रतीक बनते. लाटांवर उमटणारे नभाचे रंग जीवनातील बदलत्या भावनांचे प्रतीक वाटतात.
“ही निःशब्द शांतता कॅनव्हासमधून पाझरणारी” ही ओळ विशेष प्रभावी आहे. कवीने येथे चित्रकलेचा संदर्भ वापरून भावविश्व उभे केले आहे. शांतता ही फक्त ऐकू येत नसलेली गोष्ट नाही, तर ती रंग, रेषा आणि वेदनांमधून वाहणारी अनुभूती आहे. “रेषांशी डोळे भिडवणारी” या प्रतिमेत कलाकाराच्या आत्मसंवादाची झलक दिसते.
कवितेच्या पुढील भागात करुणेचा गडद अंधारही भयावह न वाटता आश्रयदायी भासतो. “निष्पर्ण झाडाच्या कडेला” शांत निजण्याची इच्छा ही जीवनातील थकव्याची आणि अंतिम शांततेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. निष्पर्ण झाड म्हणजे विरक्ती, एकाकीपणा आणि काळाच्या प्रवाहात उरलेली निर्विकार अवस्था.
शेवटच्या ओळींमध्ये कवितेचा गाभा सामावलेला आहे —
“अपूर्णतेकडून अमूर्तकडे प्रकाश असा पाझरत जावा”.
येथे “अपूर्णता” म्हणजे मानवी जीवनातील मर्यादा, वेदना आणि अपुरेपणा; तर “अमूर्त” म्हणजे भौतिकतेपलीकडील आध्यात्मिक उंची. कवीला या प्रवासातून प्रकाश जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. हा प्रकाश बाह्य नसून अंतर्मनाच्या जाणिवेचा आहे.
भाषेच्या दृष्टीने कविता अत्यंत चित्रमय, प्रतीकप्रधान आणि संवेदनशील आहे. प्रत्येक प्रतिमा वाचकाला विचारात बुडवते. कवितेचा लयबद्ध प्रवाह आणि गूढ शांतता तिच्या आशयाला अधिक प्रभावी बनवतात.
एकूणच, “प्रकाश पाझरत जावा” ही कविता मानवी वेदना, वैराग्य आणि आत्मशोध यांच्या संगमातून निर्माण झालेली एक चिंतनशील कलाकृती आहे. ती वाचकाला केवळ शब्दांचा अनुभव देत नाही, तर अंतर्मुख होण्यास भाग पाडते.
@ eaksharman
Saturday, May 16, 2026
डॉ आनंद नाडकर्णी
Friday, May 15, 2026
मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!
'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...
डॉ आनंद नाडकर्णी
डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.
सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024
“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
मानवी मन हे अथांग समुद्रासारखं आहे त्यात भावना आहेत, संघर्ष आहे, वेदना आहेत आणि आशेचे किरणही आहेत. या मनाच्या गूढ विश्वाला सहज, सोप्या आणि माणुसकीच्या भाषेत समजावून सांगणारा एक संवेदनशील आवाज आज कायमचा शांत झाला. ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, शरीराने दूर गेले तरी त्यांनी विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत कायम जिवंत राहणार आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते मन समजून घेणारे ‘माणूस’ होते. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. “मानसिक आजार हा काही वेगळा किंवा लाज वाटण्याचा विषय नाही; तोही इतर शारीरिक आजारांसारखाच आहे,” हा विचार त्यांनी सामान्य माणसांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत होती. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करणारी चळवळ उभारण्याची आणि त्या विचारातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात “आयपीएच” अर्थात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना झाली.
ही संस्था केवळ मानसिक रुग्णांपुरती मर्यादित राहिली नाही. आयुष्याच्या ताणतणावांनी थकलेल्या व्यक्तींपासून ते स्वतःचा स्व-विकास शोधणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकासाठी आयपीएचने आधाराचा हात दिला. उपचार, समुपदेशन यांसोबतच साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांसारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य अधिक मानवी आणि आनंददायी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वेगळा होता.
१९८० साली त्यांनी एमबीबीएस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रात एम.डी. पदवी प्राप्त केली. पण त्यांच्या नावामागील खरी ओळख पदव्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे निर्माण झाली. त्यांनी मनोविज्ञानाला पुस्तकांच्या चौकटीत न ठेवता ते थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडून दिलं.
लेखनक्षेत्रातही त्यांचा ठसा तितकाच गडद होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान लाभला. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’, ‘जन्मरहस्य’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्यांच्या लेखनात वैद्यकीय ज्ञान होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात माणसाच्या भावविश्वाची खोल समज होती.
त्यांची काही गाजलेली पुस्तकं आणि नाटकं आजही वाचकांना विचार करायला भाग पाडतात —
‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मनोगती’, ‘मनोविकास’, ‘हेही दिवस जातील!’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ अशी अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांच्या वैचारिक समृद्धीची साक्ष देतात.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली. त्यांनी लोकांना फक्त उपचार दिले नाहीत, तर जगण्याची नवी उमेद दिली. मनातील वेदनांना शब्द दिले. तणावग्रस्त मनाला समजून घेतलं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “मन मोकळं करणं ही कमजोरी नाही,” हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलं.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली मानसिक आरोग्याची जाणीव, माणुसकीची शिकवण आणि संवेदनशील विचारांची परंपरा कायम समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या जाण्याने मानसशास्त्र, साहित्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #डॉआनंदनाडकर्णी #श्रद्धांजली #मानसिकआरोग्य #मानसोपचारतज्ज्ञ #मानसशास्त्र #आयपीएच #InstituteForPsychologicalHealth
