45 वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : मुंबईच्या केईएम् रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासाठी मनोविकारशास्त्राची पंधरा नंबरची ओपीडी.
प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असणारे, हसमुख चेहऱ्याचे एक तरुण डॉक्टर कोणत्याही इरिटेशन शिवाय पेशंट तपासत असतात.
त्यांच्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची ते विलक्षण आस्थेने चौकशी करत असतात. त्याचं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
एक मध्यमवयीन पुरुष त्यांच्याकडे तपासणीसाठी येतो. डॉक्टर विचारतात, ‘कोणकोणते त्रास होत आहेत तुम्हाला ..सांगू शकाल?’’
‘‘झोप लागत नाही..दचकून जाग येते. विनाकारण धडधड होते अचानक.. सारखी भीती वाटत राहाते. जबाबदाऱ्या खूप आहेत हो. कमावणारा मी एकटा..’’, चेहऱ्यावरची रया गेलेला काळजीने ग्रासलेला आणि भवितव्याच्या चिंतेने त्रस्त झालेला अशक्त इसम खोल गलेल्या आवाजात उत्तरला.
त्याच्या उत्तराने डॉक्टर हेलावून जातात. स्तब्ध होतात.
तो काळ होता मुंबईचा कुख्यात गिरणी संप सुरू झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरचा! त्यामुळे अशा थकलेल्या हारलेल्या पेशंटचा तिथे भडिमार होता.
आणि नेमक्या त्याच काळात मनोविकारशास्त्रामध्ये एम्.डी.चे शिक्षण घेण्यासाठी त्या डॉक्टरांनी 'केईएम'मध्ये सुरुवात केली होती.
निवासी डॉक्टर म्हणून ते तिथे काम करत होते. केईएम हे गिरणगावच्या वेशीवर वसलेले असल्याने गिरणी कामगारांचा संप सुरु झाला तेव्हा कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागली. घरातले कर्ते पुरुष सैरभैर झाले, स्त्रिया कोलमडून पडल्या.
संप चिघळत गेला. घरं कोसळत गेली. घरातली सगळी माणसं चिंता आणि निराशेच्या खोल गर्तेत बुडून गेली. मरणाच्या दारात उभं राहिलेलं परवडलं, अशा मानसिक अवस्थेत तिथली माणसं जगत होती.
त्या दिवशी डॉक्टरांच्या समोर उभा असलेला पराभूत देहबोलीचा तो इसम त्याचं काम प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाची देखभाल निगुतीने करत असणार, या बाबतीत त्यांच्या मनात जराही शंका नव्हती.
भांबावून गेलेल्या त्या माणसाशी ते आत्मीयतेने बोलले. त्यांनी त्याला थोडासा धीर दिला. त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू केले असले तरी खुद्द डॉक्टरच मनातून हलले होते. त्या माणसाचा शून्यात हरवलेला चेहरा सतत त्यांच्या डोळ्यापुढे येत होता.
गिरणगावातला हा संप म्हणजे सगळ्या मुंबईला हलवून टाकणारा प्रकार आहे, आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णां मधल्या या अशा संपकरी कामगारांचा आणि कुटुंबीयांचा आपण अभ्यास केला पाहिजे, असं त्यांना मनोमन वाटलं.
त्यासाठी त्यांचे अध्यापक प्रोफेसर डॉ. एल्.पी. शहा यांच्याकडून त्यांनी होकार मिळवला. सरांनी हिरवा झेंडा दाखवला. डॉक्टर निष्ठेने कामाला लागले. पुढच्या काही महिन्यांमध्ये अशा पार्श्वभूमीच्या तिसाहून अधिक ‘कहाण्या‘ मिळाल्या.
त्यांच्यावर संशोधन करताना ‘केसेस मिळाल्या’ हा शब्द डॉक्टरांनी मुद्दाम टाळला. अशा पेशंट्सचा त्यांनी अभ्यास केला आणि मनोविकारशास्त्रातला त्यांचा पहिलावहिला संशोधन निबंध लिहिला.
‘गिरणी संपाचे, कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’ हे त्याचे शीर्षक होते. मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा, तो आपला पहिलावहिला प्रयत्न होता असं डॉक्टरांना वाटलं. या डॉक्टरांचे नाव डॉक्टर आनंद नाडकर्णी!
विवेकवादी विचारांचा ऋजू आवाज! हारलेल्या अनेक जिवांना उभारी देणारा आधारवड! आपल्या लेखनातून नवा आशेचा प्रकाशमार्ग दाखवणारा दीपस्तंभ! मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांना सावरणारा ऊर्जास्त्रोत!
लोक म्हणतात की, ते अतिशय प्रभावी मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, वक्ते आणि समुपदेशक होते! नक्कीच! मात्र त्याहून अधिक ते एक सहृदयी, संवेदनशील, सृजन, मानवतावादी हळवे व्यक्ती होते!
आनंद नाडकर्णी आजही आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यात राहतील; धीर खचलेल्या लोकांसाठी तर त्यांची पुस्तके पाथफाइंडरचे काम करत राहतील.
‘आता सारे संपलेय, खूप कठीण काळ आलाय आणि आपला निभाव लागणार नाही..‘ असे ज्याला कुणालाही वाटते त्याने डॉक्टर नाडकर्णी यांचे 'हेही दिवस जातील' हे पुस्तक आवर्जून वाचावे! त्यांची मनस्थिती बदलेल, याची हमी!
'Everyone is good at something', प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्ये असतात, काहीतरी चांगली गोष्ट असतेच! ह्या गृहितकावर त्यांची अपार श्रद्धा होती आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा हा प्लसपॉईंट शोधून काढून त्याला चेतना देण्याचे काम ते करत!
अशी माणसं आताच्या काळात दुर्मिळ झालीत, त्यांच्या एकाएकी जाण्याने समाजाची शब्दांतीत हानी होते. सध्याच्या नाउमेदीच्या, बेकीच्या काळात अशी माणसं भोवताली असणं हाही एक आधार असतो! त्यांची एक्झिट अधिक चटका लावून गेली..
- समीर गायकवाड