लोकप्रिय लेखक , कवी आणि तरूणाईचा लाडका चारोळीकार चन्द्रशेखर गोखले यांच्या " मनोवेधस " या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ८/१/२०२२ रोजी प्रकाशित झाली.शेखरची पत्नी सौ. उमा गोखले प्रकाशक असलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने .....१८ एप्रिल १९९० या दिवशी पारल्यातील दिक्षीत रोड वरील अनिरुध्द सोसायटीच्या गच्चीवर आमच्या शेखरच्या " मी माझा" या पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले..ज्येष्ठ लेखक , नाटककार आणि पत्रकार श्री. विजय तेंडुलकर यांच्या हस्ते..शेखरची 'नीलाताई ' या नात्याने त्या प्रकाशन सोहळ्यात माझा ही सहभाग होता. अल्पावधितच ' मी माझा ' ला प्रचंड यश आणि प्रसिध्दी मिळाली...शेखर तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला.
शेखर प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मी त्याच्या अंगी असलेले विविध गुण पारखत होते.माझ्याकडे तो काही विषय शिकण्यासाठी येत होता. परंतु शाळेतल्या अभ्सासापलिकडचा शेखर सतत माझं लक्ष वेधून घेत होता.
चित्रकार शेखर , लीलया नृत्याविष्कार करणारा शेखर आणि सतत काहीतरी वेगळा विचार करणारा....गोष्टी लिहिणारा शेखर...दबलेला...घाबरलेला शेखर...कारण त्या बालवयात ज्या गुणांसाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप त्याच्या घरातून मिळायला हवी होती ती नाही मिळाली ..त्या ऐवजी " धपाटे"च खावे लागले. ५० वर्षांपूर्वीचा काळ आणि मध्यमवर्गीय व्यवहारी विचारसरणी लक्षात घेता ती पालकांची चूक होती असेही म्हणता येणार नाही कारण ' याने तुझं पोट भरणार आहे का ? ' हा त्यांचा प्रश्ण परिस्थितीजन्य होता शिवाय ' बाल मानसशास्त्र आणि पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास ' हे विषय तर त्याकाळी कोसौ मैल दूर होते.....असो !!
चार दिवसांपूर्वीच शेखरने मला त्याचे नुकतेच प्रकाशित झालेले " मनोवेधस " पाठवले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या....उगमापाशी नदीची बारीकशी धार असते
प्रवाह पुढे पुढे जायला लागतो
नदी अथांग सागराशी एकरूप होते
तिचा प्रवास थांबतो....प्रवाह नाही...
जशी " मनोवेधस "ची सप्तरंगी कथा....मला खूप भावली ! तुम्हाला ही भावेल ! जरूर वाचा !!!!!
शेखर , उमा तुम्हा दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद !! तुमची
नीलाताई ( नीला रवीन्द्र )

0 comments:
Post a Comment