Sunday, May 24, 2026

पुस्तक परिचय

आजच्या तरुण भारत, जळगाव आवृत्तीत समीक्षक, लेखक श्री किशोर कुलकर्णी यांनी माझ्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई ( अनघा प्रकाशन, ठाणे ) या पुस्तकावर लिहिलेलं पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कुलकर्णी सरांचे मनापासून आभार. सोबत परीक्षण टेक्स्ट स्वरूपात खाली दिले आहे. 

*झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत* 
राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. अनघा प्रकाशन यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.
सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी ४० छोट्या पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.
झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले, नियतीने कठोर वळण घेतले; पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

 जळगाव जिल्ह्यातील पारोळा भुईकोट किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा संबंध अत्यंत ऐतिहासिक, भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
लक्ष्मीबाईंचे आणि आपल्या कान्हदेशाचे अत्यंत भावनीक नाते आहे. पारोळा हे गाव केवळ ऐतिहासिक किल्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर झाशीच्या राणीच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेही विशेष ओळखले जाते. पारोळा येथील किल्ला नेवाळकर घराण्याचा होता. झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे नातेवाईक असलेल्या नेवाळकरांनी हा किल्ला उभारला होता. स्थानिक इतिहासानुसार राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तांबे कुटुंबही पारोळा परिसराशी जोडले गेले होते. त्यामुळे पारोळ्याला “झाशीच्या राणीचे मूळ गाव” अशीही ओळख मिळाली. संबंधातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणींचे दत्तक पुत्र दामोदरराव (जन्मनाव आनंदराव) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ रोजी पारोळ्यात झाल्याची नोंद आढळते. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. पुढे हाच आनंदराव झाशीच्या गादीचा दत्तक वारस बनला. 
आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली, तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही; तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

पुस्तक परिचय - किशोर कुळकर्णी, जळगाव. मो. ९४२०६०७०५९


Thursday, May 21, 2026

गूढ कथा

पावसाळ्याची रात्र होती. कोकण मधल्या “भोरवाडी” गावावर काळे ढग दाटून आले होते. गावात वीज नव्हती. फक्त अधूनमधून चमकणारी वीज आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज.

गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता — “देशमुखांचा वाडा”. त्या वाड्याबद्दल गावात अनेक कथा सांगितल्या जायच्या. म्हणे, तिथे रात्री दिवा दिसतो… पण वाड्यात कोणी राहत नाही.

त्या गावात गणू नावाचा एक तरुण राहत होता. शहरातून शिक्षण करून तो नुकताच गावात परतला होता. गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर त्याचा विश्वास नव्हता.

एके रात्री चहाच्या टपरीवर चर्चा रंगली होती.

“गण्या, रात्री बारा नंतर त्या वाड्याकडं जाऊ नकोस,” म्हातारा तात्या कुजबुजला.

“का? भूत आहे का तिथं?” गणू हसत म्हणाला.

तात्याच्या डोळ्यांत अचानक भीती उतरली.

“भूत नाही रे… पण काहीतरी आहे.”

त्या रात्री गणूने ठरवलं — सत्य शोधायचंच.

हातात कंदील घेऊन तो वाड्याकडे निघाला. पाऊस रिमझिम कोसळत होता. वाड्याचं मोठं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. आत काळोख.

गणूने पाऊल टाकलं.

कर्कश्श आवाज करत दार मागून बंद झालं.

क्षणभर त्याचा श्वास अडकला.

वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता… टक… टक… टक…

गणूने कंदील वर केला.

भिंतीवर जुन्या चित्रांवर धूळ साचली होती. अचानक एका चित्रातील स्त्रीचे डोळे चमकले असे त्याला वाटले.

तो घाबरला. पण पुढे गेला.

वरच्या खोलीत मंद दिवा पेटलेला होता.

आत एक जुनी झुलती खुर्ची हळूहळू हालत होती…

पण तिथे कोणीच नव्हतं.

अचानक मागून आवाज आला —

“इतक्या वर्षांनी कोणी आलं…”

गणूने मागे वळून पाहिलं.

पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. चेहरा फिकट. डोळ्यांत विचित्र शांतता.

“तुम्ही… कोण?” गणूचा आवाज थरथरला.

ती हसली.

“मी या वाड्याची शेवटची मालकीण.”

गणू काही बोलणार इतक्यात वीज चमकली…

आणि त्या क्षणी त्याला दिसलं —

ती स्त्री जमिनीवर उभीच नव्हती.

ती हवेत तरंगत होती.

गणूच्या हातातून कंदील खाली पडला.

संपूर्ण खोली अंधारात बुडाली.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी…

गावकऱ्यांना गणू वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला.

तो जिवंत होता.

पण त्या दिवसानंतर त्याने कधीच “देशमुखांच्या वाड्या”बद्दल एक शब्दही काढला नाही.

फक्त कधी कधी रात्री तो झोपेत घाबरून ओरडायचा —

“ती अजून तिथंच आहे…”


@ eaksharman

मराठी भाषेत फलक हवेत

महाराष्ट्र राज्यात हिंदी तिसरी भाषा नको म्हणून विरोध करणारे. इंग्रजी च्या अश्या पाट्यांचा कधी विरोध करणार.

मराठी फलक असावेत की प्रत्येक ठिकाणी इंग्रजी कशाला हवी.

@ eaksharman

समिक्षा लेखन



ही कविता केवळ निसर्गचित्र रंगवत नाही, तर मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि आध्यात्मिक प्रवासाला शब्दरूप देते. Ramdas Khare यांच्या “प्रकाश पाझरत जावा” या कवितेत वैराग्य, वेदना, करुणा आणि अमूर्ततेकडे जाणारी अंतर्मनाची ओढ अत्यंत चित्रमय पद्धतीने व्यक्त झाली आहे.

कवितेच्या सुरुवातीलाच “वैराग्याचे पलिते” आणि “क्षितिजावर पेटलेले” या प्रतिमा मनाला गूढ शांततेच्या प्रदेशात घेऊन जातात. येथे क्षितिज हे केवळ निसर्गाचे दृश्य राहत नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचे, आत्मशोधाचे प्रतीक बनते. लाटांवर उमटणारे नभाचे रंग जीवनातील बदलत्या भावनांचे प्रतीक वाटतात.

“ही निःशब्द शांतता कॅनव्हासमधून पाझरणारी” ही ओळ विशेष प्रभावी आहे. कवीने येथे चित्रकलेचा संदर्भ वापरून भावविश्व उभे केले आहे. शांतता ही फक्त ऐकू येत नसलेली गोष्ट नाही, तर ती रंग, रेषा आणि वेदनांमधून वाहणारी अनुभूती आहे. “रेषांशी डोळे भिडवणारी” या प्रतिमेत कलाकाराच्या आत्मसंवादाची झलक दिसते.

कवितेच्या पुढील भागात करुणेचा गडद अंधारही भयावह न वाटता आश्रयदायी भासतो. “निष्पर्ण झाडाच्या कडेला” शांत निजण्याची इच्छा ही जीवनातील थकव्याची आणि अंतिम शांततेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. निष्पर्ण झाड म्हणजे विरक्ती, एकाकीपणा आणि काळाच्या प्रवाहात उरलेली निर्विकार अवस्था.

शेवटच्या ओळींमध्ये कवितेचा गाभा सामावलेला आहे — “अपूर्णतेकडून अमूर्तकडे प्रकाश असा पाझरत जावा”.
येथे “अपूर्णता” म्हणजे मानवी जीवनातील मर्यादा, वेदना आणि अपुरेपणा; तर “अमूर्त” म्हणजे भौतिकतेपलीकडील आध्यात्मिक उंची. कवीला या प्रवासातून प्रकाश जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. हा प्रकाश बाह्य नसून अंतर्मनाच्या जाणिवेचा आहे.

भाषेच्या दृष्टीने कविता अत्यंत चित्रमय, प्रतीकप्रधान आणि संवेदनशील आहे. प्रत्येक प्रतिमा वाचकाला विचारात बुडवते. कवितेचा लयबद्ध प्रवाह आणि गूढ शांतता तिच्या आशयाला अधिक प्रभावी बनवतात.

एकूणच, “प्रकाश पाझरत जावा” ही कविता मानवी वेदना, वैराग्य आणि आत्मशोध यांच्या संगमातून निर्माण झालेली एक चिंतनशील कलाकृती आहे. ती वाचकाला केवळ शब्दांचा अनुभव देत नाही, तर अंतर्मुख होण्यास भाग पाडते.


@ eaksharman



Saturday, May 16, 2026

डॉ आनंद नाडकर्णी


मागच्या वर्षी The Lost Supper या डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेल्या नाटकाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. वाचनाच्या, तालमींच्या, म्यूझिक रेकॉर्डिंगच्या निमित्ताने अनेक प्रदीर्घ भेटी आणि फोन कॉल्स झाले. त्या आधी ‘डॉ.आनंद नाडकर्णी’ या नावाभोवती  असलेल्या प्रभावळीशी परिचित होतो आणि खूप आदरयुक्त उत्सुकता सुद्धा होती त्यांना भेटण्या बद्दल. प्रत्यक्ष भेटल्यावर त्या प्रभावळीच्या केंद्रस्थानी असलेलं अफ़लातून व्यक्तिमत्व अनुभवायला मिळालं. सकारात्मक कार्यशीलता, संघटन कौशल्य अशा अनेक गोष्टींचा अर्थ समजला. सहजपणाने हसत बोलत वागणारी एक व्यक्ती समाजात किती खोलवर प्रभाव पाडू शकते हे लक्षात आलं. स्वतःचं नाव सार्थ करणारे डॉ.आनंद नाडकर्णी सतत आठवत राहतील.

Friday, May 15, 2026

मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!


मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!

 डॉ.आनंद नि मी आम्ही दोघे महाविद्यालयीन मित्र. असंख्य वेळा भेटलेलो. अगदी पहिल्यापासून. समोरच्या व्यक्तीवर जीव लावून प्रेम करणारा. निखळ   आनंदाच्या बिया पेरीत  , स्वतःची दुःखे दूर ठेवून ,"जगाला प्रेम  अर्पावे" ही उक्ती जगणारा सर्वांचा मित्र, डॉ.आनंद नाडकर्णी! सर्वार्थाने  अजातशत्रू असलेले हे व्यक्तिमत्त्व ! स्नेहसंमेलनापासून ते वक्तृत्वस्पर्धेपर्यंत एकत्र प्रवास  महाविद्यालयीन  काळात झाला. त्यांचे वडील हे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते डॉ.म द.नाडकर्णी. अत्यंत तत्वनिष्ठ आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. त्यांच्या सत्वगुणांचा वारसा त्यांच्या बुद्धिमत्ते बरोबर आनंदला मिळाला होता. 
पुढे 'वेध' च्या माध्यमातून डॉ.नाडकर्णी यांनी लक्षावधी मनांना सावरण्याचे कार्य केले. अहंकाराचा, पदाचा आणि  सर्वस्पर्शी  प्रतिभेचा अंशभर अहंकार नसलेला, केवळ आनंद देणे हाच धर्म मानणारा आमचा मित्र आज मात्र ह्या जगाला दुःख देऊन गेला.
खरा विज्ञान आनंदयोगी हरपला! त्यांच्या अनेक मनोवैज्ञानिक पुस्तकांच्या निमित्ताने आणि वेध या संस्थेच्या रूपाने आनंद आपल्यात कायम असणारच आहे. अत्यंत व्यथित मन झाले आहे,ह्या माझ्या विचारवंत मित्राला निरोप देताना..माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रवीण दवणे 

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत... 
'नाडकर्णी गेले' या मित्राच्या मेसेज नं दिवसाची सुरुवात झाली आणि एखादा दोर कापून आपल्याला अंधारात कुणीतरी अधांतरी केल्यागत झालं. 
आपापल्या डबक्यात रमलेल्या माणसांना आरोग्य आयुधांनी प्रवाही करणारा, मनावर ओझी असणाऱ्या माणसांनां नुसत्या गप्पांनी पिसागत हलकं वाटवणारा, आपल्या कोवळ्या आणि सैल मनानं कागदावर सुंदर 'आनंदरेषा' काढणारा, आणि महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य जागेवर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारा, अतिशय मोलाचा माणूस आपण आज गमावला.  
  
'शहरी लोकांची थेरं' वाटणाऱ्या सायकोलॉजी ला त्यांनी भाषा, प्रांत, परिस्थिती यांच्या सीमारेषा तोडून 'मानसिक आरोग्य' करून मराठी समाजाच्या रोजच्या जगण्यात आणलं. ज्या काळात मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे 'वेड लागलंय' असा समज होता त्या काळात 'शहाण्यांचे डॉक्टर' म्हणून उपचार आणि समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोचेल यासाठी ते दिवसरात्र झटले.

काकांनी अस्थिर मनांना स्थिर केलं, गैरसमजात गुरफ़टलेल्याना डोळस केलं, कधी लोकांना बोलू दिलं, कधी फक्त वाहू दिलं, मोकळं होऊ दिलं, अनेक जीवांची परवड थांबवली तर अनेकांची अनेक वर्षांची खदखद संपवली. त्यांच्यामुळे उभ्या राहिलेल्या माणसांची आणि घरांची संख्या काढली तर ती सहज काही हजारात भरेल. यावरून त्यांच्या कामाची महती सहज लक्षात येईल.
 
संबंध महाराष्ट्रात जिथं आज खरात सारख्या बाबा बुवांनी समाजाला आंधळं करून अक्षरशः पाहिजे तसं नासवलंय तिथे डॉकटर नाडकर्णीं सारख्या 'डोळस' करणाऱ्या माणसाचं जाणं खरोखर जिव्हारी लागणारं. 

"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हि ओळ ज्यांच्याबाबतीत मी पाहिली, ज्यांच्याबरोबर अप्रतिम गप्पा, चर्चा करायची संधी मिळाली, ज्यांच्या सहवासानं,आपुलकीनं कायम अदृश्य आधार मिळाला, आणि ज्यांच्या मिश्किल उत्तरानी आयुष्यभराची वाट सापडली ते डॉक्टर नाडकर्णी आता नसणार आहेत, त्यांनी महाराष्ट्र्राच्या मनावर उमटवलेल्या 'आनंदरेषा' पुसू न देणं ही आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे.
अलविदा काका. तुम्ही जिथे असाल, वाऱ्यावर बसून तिथलं सुंदर स्केच काढत असाल हे नक्की!

♥️♥️🙏🙏🌼🌼

क्षितिज  पटवर्धन

डॉ आनंद नाडकर्णी

डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‌‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‌‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‌‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.

सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
मानवी मन हे अथांग समुद्रासारखं आहे त्यात भावना आहेत, संघर्ष आहे, वेदना आहेत आणि आशेचे किरणही आहेत. या मनाच्या गूढ विश्वाला सहज, सोप्या आणि माणुसकीच्या भाषेत समजावून सांगणारा एक संवेदनशील आवाज आज कायमचा शांत झाला. ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, शरीराने दूर गेले तरी त्यांनी विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत कायम जिवंत राहणार आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते मन समजून घेणारे ‘माणूस’ होते. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. “मानसिक आजार हा काही वेगळा किंवा लाज वाटण्याचा विषय नाही; तोही इतर शारीरिक आजारांसारखाच आहे,” हा विचार त्यांनी सामान्य माणसांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत होती. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करणारी चळवळ उभारण्याची आणि त्या विचारातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात “आयपीएच” अर्थात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना झाली.
ही संस्था केवळ मानसिक रुग्णांपुरती मर्यादित राहिली नाही. आयुष्याच्या ताणतणावांनी थकलेल्या व्यक्तींपासून ते स्वतःचा स्व-विकास शोधणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकासाठी आयपीएचने आधाराचा हात दिला. उपचार, समुपदेशन यांसोबतच साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांसारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य अधिक मानवी आणि आनंददायी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वेगळा होता.

१९८० साली त्यांनी एमबीबीएस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रात एम.डी. पदवी प्राप्त केली. पण त्यांच्या नावामागील खरी ओळख पदव्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे निर्माण झाली. त्यांनी मनोविज्ञानाला पुस्तकांच्या चौकटीत न ठेवता ते थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडून दिलं.
लेखनक्षेत्रातही त्यांचा ठसा तितकाच गडद होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान लाभला. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’, ‘जन्मरहस्य’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्यांच्या लेखनात वैद्यकीय ज्ञान होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात माणसाच्या भावविश्वाची खोल समज होती.
त्यांची काही गाजलेली पुस्तकं आणि नाटकं आजही वाचकांना विचार करायला भाग पाडतात —
‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मनोगती’, ‘मनोविकास’, ‘हेही दिवस जातील!’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ अशी अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांच्या वैचारिक समृद्धीची साक्ष देतात.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली. त्यांनी लोकांना फक्त उपचार दिले नाहीत, तर जगण्याची नवी उमेद दिली. मनातील वेदनांना शब्द दिले. तणावग्रस्त मनाला समजून घेतलं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे  “मन मोकळं करणं ही कमजोरी नाही,” हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलं.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली मानसिक आरोग्याची जाणीव, माणुसकीची शिकवण आणि संवेदनशील विचारांची परंपरा कायम समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या जाण्याने मानसशास्त्र, साहित्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #डॉआनंदनाडकर्णी #श्रद्धांजली #मानसिकआरोग्य #मानसोपचारतज्ज्ञ #मानसशास्त्र #आयपीएच #InstituteForPsychologicalHealth

https://www.facebook.com/shrikantjoshiofficial

डॉ आनंद नाडकर्णी

भावपूर्ण श्रद्धांजली: मानसिक आरोग्याचा 'आनंद' वाटणारा दीपस्तंभ हरपला!

आपल्या शब्दांनी आणि उपचारांनी हजारो नैराश्यग्रस्तांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मा​नसिक आजार किंवा नैराश्य या विषयावर समाजात उघडपणे बोलणे जेव्हा टाळले जायचे, अशा काळात त्यांनी याविषयीची भीती दूर करून "मनाची मशागत" करण्याची चळवळ उभारली. त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

डॉ. नाडकर्णी यांचे जीवन आणि करिअर अत्यंत बहुआयामी होते. २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (IPH) या संस्थेची स्थापना केली, जिथे आज ७० हून अधिक तज्ज्ञ कार्यरत आहेत. केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता त्यांनी कला, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्तीचा 'स्व-विकास' साधला. यासोबतच, तरुणांना आणि पालकांना करिअर व जगण्याची योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी 'वेध' (VEDH) हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम सुरू केला. तसेच, पुण्यातील प्रसिद्ध 'मुक्तांगण पुनर्वसन केंद्रा'चे संस्थापक-विश्वस्त म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक मानले जाते.

वैद्यकीय कार्याव्यतिरिक्त डॉ. नाडकर्णी हे एक उत्तम लेखक, नाटककार आणि संवेदनशील विचारवंत होते. त्यांनी मराठीत १७ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली, ज्यामध्ये 'मनोगती', 'आत्मभान', 'सोबत संगतीची' आणि 'मनातलं माणसाचं' या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे; त्यांच्या दर्जेदार लेखनाची दखल घेऊन इयत्ता ९ वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातही त्यांच्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय-राज्य पुरस्कार प्राप्त 'देवराई' व 'कदाचित' यांसारख्या चित्रपटांसाठी मानसोपचार सल्लागार म्हणून मोलाचे योगदान दिले होते.

हिंदू तत्त्वज्ञान, इतिहास, संगीत आणि ताणतणाव व्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास असलेले डॉ. नाडकर्णी "मानसिक आजार असणे म्हणजे वेडे असणे नव्हे, तर मनाला झालेली ती एक जखम आहे जी उपचाराने बरी होऊ शकते," हा दृढ विश्वास त्यांनी समाजात निर्माण केला. डॉ. आनंद नाडकर्णी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली 'आयपीएच'ची संस्था आणि त्यांचे विचारप्रवर्तक साहित्य लाखो लोकांना सदैव मार्ग दाखवत राहील. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचा दिवा लावणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!


बातमी

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणसाच्या मनाचा वेध घेणारा, मानसिक आरोग्याबद्दल समाजात संवेदनशील संवाद घडवून आणणारा आवाज आज हरपला. त्यांच्या लेखनातून, विचारांतून आणि कामातून अनेकांना स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली. 

समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

डॉ आनंद नाडकर्णी

स्वत:च्या मनाशी मैत्री करायला शिकवणारे व्यक्तिमत्व हरपले 

​ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि शेकडो आयुष्यांना दिशा देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन ही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. आपल्या वाणीने आणि लेखणीने त्यांनी मानसिक आरोग्याचा विषय घराघरात पोहोचवला.  

भावपूर्ण श्रद्धांजली!
Ravindra Chavhan

अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी

*अथांग मनाचा समुद्र..*

आज मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने महाराष्ट्राने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. 

मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर हजारो लोकांना जगण्याची नवी दिशा दिली. 

मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अमूल्य राहिले. 

लेखन, व्याख्यानं, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आणि व्यसनमुक्तीच्या कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. 

त्यांची भाषा अभ्यासपूर्ण असूनही अत्यंत साधी आणि माणुसकीने भरलेली होती. म्हणूनच ते फक्त डॉक्टर नव्हते, तर अनेकांसाठी विश्वास देणारे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना मनःपूर्वक आदरांजली.

*“काही माणसं आयुष्य संपल्यानंतरही त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून सतत जिवंत राहतात…*

डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यापैकीच एक.”

आपलं मानसशास्त्र परिवारातर्फे या अथांग मनाच्या समुद्राला भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

@राकेश वरपे

#dranandnadkarni 

वेध डॉ आनंद नाडकर्णी

'वेध' च्या माध्यमातून ज्यांनी स्व च्या पलीकडे जगणाऱ्या असंख्य माणसांचा वेध घेत आयुष्य समृद्ध केलेच पण त्यांच्याशी मैत्री निर्माण होत त्यांच्या कार्याशी जुळवून दिले असे वेध चे सर्वेसर्वा आनंद नाडकर्णी सर आज पहाटे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. सरांना कधी प्रत्यक्षात भेटता आले नाही याची खंत मनात कायमस्वरूपी असेलच पण त्यांच्यामुळे सारंग गोसावी, अमृत देशमुख, स्वप्नील कुंभोजकर, धनश्री लेले, विशुद्धानंद भारती अर्थात भारती ठाकूर ताई आणि नि.मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी  या सगळ्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आनंद नाडकर्णी सर यांना सद्गती लाभो आणि कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. ॐ शान्ति 🙏🌹

डॉ आनंद नाडकर्णी आठवण

45 वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : मुंबईच्या केईएम् रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासाठी मनोविकारशास्त्राची पंधरा नंबरची ओपीडी. 
प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असणारे, हसमुख चेहऱ्याचे एक तरुण डॉक्टर कोणत्याही इरिटेशन शिवाय पेशंट तपासत असतात. 

त्यांच्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची ते विलक्षण आस्थेने चौकशी करत असतात. त्याचं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 

एक मध्यमवयीन पुरुष त्यांच्याकडे तपासणीसाठी येतो. डॉक्टर विचारतात, ‘कोणकोणते त्रास होत आहेत तुम्हाला ..सांगू शकाल?’’ 

‘‘झोप लागत नाही..दचकून जाग येते. विनाकारण धडधड होते अचानक.. सारखी भीती वाटत राहाते. जबाबदाऱ्या खूप आहेत हो. कमावणारा मी एकटा..’’, चेहऱ्यावरची रया गेलेला काळजीने ग्रासलेला आणि भवितव्याच्या चिंतेने त्रस्त झालेला अशक्त इसम खोल गलेल्या आवाजात उत्तरला. 

त्याच्या उत्तराने डॉक्टर हेलावून जातात. स्तब्ध होतात. 
तो काळ होता मुंबईचा कुख्यात गिरणी संप सुरू झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरचा! त्यामुळे अशा थकलेल्या हारलेल्या पेशंटचा तिथे भडिमार होता. 
 
आणि नेमक्या त्याच काळात मनोविकारशास्त्रामध्ये एम्.डी.चे शिक्षण घेण्यासाठी त्या डॉक्टरांनी 'केईएम'मध्ये सुरुवात केली होती. 

निवासी डॉक्टर म्हणून ते तिथे काम करत होते. केईएम हे गिरणगावच्या वेशीवर वसलेले असल्याने गिरणी कामगारांचा संप सुरु झाला तेव्हा कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागली. घरातले कर्ते पुरुष सैरभैर झाले, स्त्रिया कोलमडून पडल्या. 

संप चिघळत गेला. घरं कोसळत गेली. घरातली सगळी माणसं चिंता आणि निराशेच्या खोल गर्तेत बुडून गेली. मरणाच्या दारात उभं राहिलेलं परवडलं, अशा मानसिक अवस्थेत तिथली माणसं जगत होती.     

त्या दिवशी डॉक्टरांच्या समोर उभा असलेला पराभूत देहबोलीचा तो इसम त्याचं काम प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाची देखभाल निगुतीने करत असणार, या बाबतीत त्यांच्या मनात जराही शंका नव्हती. 
  
भांबावून गेलेल्या त्या माणसाशी ते आत्मीयतेने बोलले. त्यांनी त्याला थोडासा धीर दिला. त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू केले असले तरी खुद्द डॉक्टरच मनातून हलले होते. त्या माणसाचा शून्यात हरवलेला चेहरा सतत त्यांच्या डोळ्यापुढे येत होता.

गिरणगावातला हा संप म्हणजे सगळ्या मुंबईला हलवून टाकणारा प्रकार आहे, आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णां मधल्या या अशा संपकरी कामगारांचा आणि कुटुंबीयांचा आपण अभ्यास केला पाहिजे, असं त्यांना मनोमन वाटलं. 

त्यासाठी त्यांचे अध्यापक प्रोफेसर डॉ. एल्.पी. शहा यांच्याकडून त्यांनी होकार मिळवला. सरांनी हिरवा झेंडा दाखवला. डॉक्टर निष्ठेने कामाला लागले. पुढच्या काही महिन्यांमध्ये अशा पार्श्वभूमीच्या तिसाहून अधिक ‘कहाण्या‘ मिळाल्या.

त्यांच्यावर संशोधन करताना ‘केसेस मिळाल्या’ हा शब्द डॉक्टरांनी मुद्दाम टाळला. अशा पेशंट्सचा त्यांनी अभ्यास केला आणि मनोविकारशास्त्रातला त्यांचा पहिलावहिला संशोधन निबंध लिहिला.  

‘गिरणी संपाचे, कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’ हे त्याचे शीर्षक होते.  मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा, तो आपला पहिलावहिला प्रयत्न होता असं डॉक्टरांना वाटलं. या डॉक्टरांचे नाव डॉक्टर आनंद नाडकर्णी!

विवेकवादी विचारांचा ऋजू आवाज! हारलेल्या अनेक जिवांना उभारी देणारा आधारवड! आपल्या लेखनातून नवा आशेचा प्रकाशमार्ग दाखवणारा दीपस्तंभ! मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांना सावरणारा ऊर्जास्त्रोत!    

लोक म्हणतात की, ते अतिशय प्रभावी मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, वक्ते आणि समुपदेशक होते! नक्कीच! मात्र त्याहून अधिक ते एक सहृदयी, संवेदनशील, सृजन, मानवतावादी हळवे व्यक्ती होते! 

आनंद नाडकर्णी आजही आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यात राहतील; धीर खचलेल्या लोकांसाठी तर त्यांची पुस्तके पाथफाइंडरचे काम करत राहतील. 

‘आता सारे संपलेय, खूप कठीण काळ आलाय आणि आपला निभाव लागणार नाही..‘ असे ज्याला कुणालाही वाटते त्याने डॉक्टर नाडकर्णी यांचे 'हेही दिवस जातील' हे पुस्तक आवर्जून वाचावे! त्यांची मनस्थिती बदलेल, याची हमी!    

'Everyone is good at something', प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्ये असतात, काहीतरी चांगली गोष्ट असतेच! ह्या गृहितकावर त्यांची अपार श्रद्धा होती आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा हा प्लसपॉईंट शोधून काढून त्याला चेतना देण्याचे काम ते करत! 

अशी माणसं आताच्या काळात दुर्मिळ झालीत, त्यांच्या एकाएकी जाण्याने समाजाची शब्दांतीत हानी होते. सध्याच्या नाउमेदीच्या, बेकीच्या काळात अशी माणसं भोवताली असणं हाही एक आधार असतो! त्यांची एक्झिट अधिक चटका लावून गेली..              
                     
- समीर गायकवाड


Wednesday, May 13, 2026

मराठी टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा का ?

मराठीचा टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा?

महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी मातृभाषा मराठीत अनुत्तीर्ण झाले हे वृत्त सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाले आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, की आपली एकंदर शिक्षण आणि समाजव्यवस्था अनुत्तीर्ण झाली, त्याचा शोध कुणीही घेत नाही. मुले जे सतत ऐकतात, पाहतात ,भाषेच्या ज्या पर्यावरणात ती  नांदतात, तेच त्यांच्या लेखणीतून उतरते .आज भवतालातून मातृभाषा मराठी खरोखर तेवढ्या कसदार पद्धतीने बोलली जाते का?
 विविध वाहिन्यातून, कथेतील व्यक्तिरेखांतून, निवेदनातून, जाहिरातीतून बोलली आणि लिहिली जाणारी होणारी मराठी  खरोखर कसदार मराठी असते का?
" केवळ भावना पोचल्या म्हणजे झाले ..,
एवढेच भाषेचे कार्य" हाभाषा विघातक संदेश समाजाला जेव्हा दिला गेला, तेव्हा अधोगतीला सुरुवात झाली. 
जगायचे असेल तर मराठी आले नाही तरी चालेल, परंतु परभाषा आली पाहिजे, हा मातृभाषा मराठीच्या मुळावर उठलेला विचार विद्यार्थ्यांनी मांडलेला नाही, की मराठीच्या शिक्षकांनी!
 मग केवळ शालांत परीक्षेत मराठीत एक लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,याचा दोष केवळ भाषेच्या शिक्षकांना आणि  विद्यार्थ्यांना जातो का? 
 शाळेतून पुरवणी वाचन, ग्रंथालय आणि ग्रंथपालाचे महत्त्व , हद्दपार झाले आहे. बाह्यवाचन हेच खरे आंतरिक वाचन असते; हेच  आज मान्य होत नाही. शब्दांना आपण संपदा म्हणतो. ती शब्दसंपदा मुलांच्या  खजिन्यात असावी ,असे पालकांना आणि शिक्षणव्यवस्थेला वाटते का? मराठीचे टिपण इंग्रजीतून उतरवणारी पिढी  मराठी प्रश्न पत्रिकेतील दीर्घ उत्तरे कशी लिहिणार? 
निबंधासाठी कल्पनाशक्तीची, मनातला विचार विस्ताराने मांडण्याची क्षमता आवश्यक असते .कल्पना करण्याचा आज अवकाशच नाही . आजची पिढी सतत डोळ्यांपुढे विविध माध्यमातून चित्र पाहूनच आपले आयुष्य  भरून टाकत आहे.  अशावेळी निबंधासाठी, केवळ गुगलवरून कॉपीपेस्ट केलेला आयता मजकूर 
घोकंपट्टी करून, विद्यार्थी मांडत आहेत. गुण मिळतात ते पाठांतराला. चिंतन मननाला नाहीत.  मजकूर आठवून उतरवणे हीच शोकांतिका उरली आहे. पत्रलेखनासाठी आंतरिक हुरहुर आणि ओढ लागते ती एसएमएसच्या वातावरणात कुठून मिळणार आहे ?
तेव्हा परीक्षेत ऐनवेळी पत्र लेखन करणार कसे? आयुष्यात कधी पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र पाहिलेलेच नाही अशीच पिढी निर्माण केली ना? सविस्तर लेखनाची,( तीही  स्वतःच्या हाताने) क्षमता क्षीण झाली आहे.
 एक शब्द ,दीड वाक्य, हीच काय ती उत्तरे ! अशाप्रकारे भरपूर गुण; नव्हे,मार्क्स देणारी 'एज्युकेशन सिस्टीम ' आणि , त्यातून बुद्धिमत्ता आजमावणे, यातून आपण काय हरवले आहे, याचा विचार या क्षणी तरी गांभीर्याने कोणी करणार आहे का? 
चर्चा केवळ एक दोन दिवसापुरता होणार,आणि पुन्हा पुढच्या वर्षी दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,यावर चर्चा होईल. फक्त चर्चा !
कृती कुठे आहे ?
काहीच प्रामाणिक नाही, हेच एक सत्य आहे.
 मराठी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण; एवढ्या पुरताच हा  विषय नाही.
हा संकेत आहे,आपल्या महाराष्ट्रातून नव्या पिढीच्या जिव्हेवरची मराठी दूर जात आहे.  हीच धोक्याची खूण आहे.  केवळ मराठीच्या शिक्षकांना दोष देऊ नका. 
आजही ग्रामीण भागात, तसेच अनेक ठिकाणी प्रयोगशील मराठीचे शिक्षक मी पाहतो आहे. वाचन प्रसारासाठी स्वतः पदरमोड करून मुलांना पुस्तके वाटणारी अध्यापकांची तरुण पिढी माझ्या संपर्कात आहे .सुक्याबरोबर ओले जाळू नका ही विनंती.
पालकांचां मातृभाषा मराठीत उत्तीर्ण होण्याचा आग्रह आणि बाहेरचे वातावरणही तपासून बघा. अर्थात जमले तर...!
नाहीतर उद्या चर्चेसाठी वेगळा विषय येतोच आहे.
            *
                  प्रवीण दवणे 

(हा एक विचार आहे, आपल्या वैचारिक समूहावर पाठवू शकता)

Saturday, May 9, 2026

समिक्षा लेखन ८

मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही,
डाव तुझ्या हाती दिला 
तरी जिंकता तुला  येत नाही.

चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत नात्यातील संघर्ष, अहंकार आणि असमर्थ विजय यांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण दिसते. “मला माझी हार मान्य आहे” या ओळीत कवीचा प्रामाणिक स्वीकार दिसतो; परंतु हा स्वीकार पूर्ण पराभवाचा नसून अंतर्मनातील एक शांत जाणीव आहे. हार मानणारा माणूस कधी कधी अधिक प्रगल्भ असतो, हे या ओळीतून जाणवते.

“म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही” या पुढील ओळीत नात्यांतील विजय-पराजयाची संकल्पना प्रश्नांकित केली आहे. एखाद्याने माघार घेतली म्हणून दुसरा खऱ्या अर्थाने जिंकतोच असे नाही, कारण नात्यांमध्ये जिंकण्यासाठी केवळ संधी पुरेशी नसते; त्यासाठी समज, संवेदना आणि सामर्थ्यही लागते.

“डाव तुझ्या हाती दिला / तरी जिंकता तुला येत नाही” या शेवटच्या ओळींमध्ये कवीने अत्यंत प्रभावी उपरोध वापरला आहे. येथे “डाव” हा शब्द नात्यांचा, भावनांचा किंवा आयुष्याच्या खेळाचा प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतो. समोरच्याला पूर्ण संधी देऊनही तो नातं टिकवू शकत नाही किंवा मन जिंकू शकत नाही, ही खंत यात दडलेली आहे.

या चारोळीची भाषा साधी, थेट आणि संवादात्मक आहे; पण तिच्या आशयात खोल मानसिक संघर्ष दडलेला आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडण्याची चंद्रशेखर गोखले यांची शैली येथे प्रभावीपणे जाणवते.

@ eaksharman

समिक्षा लेखन ७

तुला शांत निजलेली बघितलं की
मी निवांत होतो मनातल्यामनात
वाटतं हीच सूखाची सावली आहे
पसरलेल्या रणरणत्या उन्हात...

चंद्रशेखर गोखले 


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अतिशय साध्या शब्दांत प्रेम, शांतता आणि मानसिक निवांतपणाची गहिरी अनुभूती व्यक्त करतात. प्रिय व्यक्तीच्या शांत झोपलेल्या रूपाकडे पाहताना कवीच्या मनात निर्माण होणारा निवांतपणा हा केवळ क्षणिक आनंद नसून जीवनातील कठीण, उष्ण आणि थकवणाऱ्या वास्तवातून मिळालेली एक सुखद सावली आहे.

“तुला शांत निजलेली बघितलं की / मी निवांत होतो मनातल्यामनात” या ओळींमध्ये प्रेमाची कोमलता आणि नात्यातील निःशब्द जिव्हाळा सुंदरपणे उमटतो. येथे संवाद नाही, मोठे भावनिक उद्गार नाहीत; तरीही केवळ प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वातून कवीला मिळणारा आधार अत्यंत प्रभावीपणे जाणवतो. “मनातल्यामनात” हा शब्दप्रयोग अंतर्मनातील शांत भावविश्व अधिक अधोरेखित करतो.

“वाटतं हीच सुखाची सावली आहे / पसरलेल्या रणरणत्या उन्हात...” या ओळी जीवनाच्या प्रतीकात्मकतेने समृद्ध आहेत. “रणरणतं ऊन” हे जीवनातील संघर्ष, ताण, वेदना किंवा एकाकीपणाचे प्रतीक ठरते; तर प्रिय व्यक्तीचे अस्तित्व “सुखाची सावली” बनून त्या कठीण वास्तवात दिलासा देतं. ही तुलना अत्यंत प्रभावी आणि भावस्पर्शी आहे.

या कवितेची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे. अलंकारिक भाषेचा अतिरेक न करता, सहज आणि मितकथन शैलीत कवीने प्रेमातील शांत आधाराची अनुभूती जिवंत केली आहे. वाचकाच्या मनात हळुवार ऊब निर्माण करणारी ही कविता प्रेमाच्या नाजूक भावविश्वाचे सुंदर चित्र उभे करते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ६


तू दिलेले क्षण...
किती अपरिचीत होते
असं काही ते.......
मी स्वप्नातच धरत होते...

चंद्रशेखर गोखले समिक्षा लेखन


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा, गूढ आणि अंतर्मुख करणारा स्वर ऐकू येतो. “तू दिलेले क्षण...” या ओळीतून कवीने नात्यातील काही अमूल्य क्षणांची आठवण जागवली आहे. ते क्षण इतके अनपेक्षित आणि विलक्षण होते की, त्यांची अनुभूती वास्तवापेक्षा स्वप्नासारखी वाटते.

“किती अपरिचीत होते” या शब्दांत त्या भावनांची नवीनता आणि अनोखेपणा दडलेला आहे. आयुष्यात काही भेटी, काही भावना अशा असतात की त्या आधी कधी अनुभवलेल्या नसतात. म्हणूनच त्या मनात खोलवर ठसतात. पुढील ओळीत “मी स्वप्नातच धरत होते...” म्हणताना कवयित्रीसारखी संवेदनशील मनःस्थिती व्यक्त होते. ज्या गोष्टी वास्तवात मिळतील असे कधी वाटले नव्हते, त्या अचानक आयुष्यात येतात आणि मग त्या क्षणांवर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण होतं.

या चारोळीची भाषा अत्यंत साधी असली तरी तिच्या आशयात गहिरं भावविश्व दडलेलं आहे. अल्प शब्दांत प्रेम, आश्चर्य, स्वप्न आणि आठवणींचं सुंदर मिश्रण कवीने उभं केलं आहे. ही चारोळी वाचताना प्रत्येक वाचकाला आपल्या आयुष्यातील एखादा खास क्षण नकळत आठवतो, हेच तिचं खरं यश आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ५

वाटते तितकी साधी नसते
ही दिवस ढळण्याची वेळ
कुणाला दिसेनासं होण्याची घाई
आणि आपल्या जीवाशी खेळ

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेच समिक्षा लेखन

चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत संध्याकाळ ही केवळ दिवस संपण्याची वेळ राहत नाही, तर ती मानवी आयुष्यातील भावनिक अस्थिरतेचे आणि नात्यांतील हरवण्याचे प्रतीक बनते. “वाटते तितकी साधी नसते / ही दिवस ढळण्याची वेळ” या ओळींमधून कवीने अत्यंत साध्या प्रतिमेतून गहन अर्थ उलगडला आहे. दिवस मावळणे म्हणजे फक्त प्रकाश कमी होणे नसून, कुणाच्या आयुष्यातून कुणी हळूहळू दूर जाण्याची वेळ असते, अशी जाणीव या कवितेत प्रकर्षाने दिसते.

“कुणाला दिसेनासं होण्याची घाई / आणि आपल्या जीवाशी खेळ” या ओळींत मानवी नात्यांतील अस्वस्थता आणि आतल्या वेदनेचा उत्कट आविष्कार आहे. एखादी व्यक्ती दूर जात असताना तिची घाई दिसते, पण त्या प्रक्रियेत दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो, याची तिला जाणीव नसते. “जीवाशी खेळ” हा शब्दप्रयोग भावनिक तडफड आणि असहायता प्रभावीपणे व्यक्त करतो.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सूचकता. कुठेही मोठमोठे शब्द नाहीत, अतिनाट्य नाही; पण प्रत्येक ओळ मनात खोल उतरते. संध्याकाळच्या प्रतिमेतून कवीने विरह, एकाकीपणा आणि नात्यांच्या नाजूक अवस्थेचे अत्यंत संवेदनशील चित्र रेखाटले आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडणे, ही चंद्रशेखर गोखले यांच्या लेखनाची ताकद या चारोळीत पुन्हा जाणवते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ४



काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो
आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो
चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अल्प शब्दांत मानवी अनुभवांचा खोल आशय मांडतात.

“काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो...”

या ओळी जीवनातील अपूर्ण नात्यांची, अधांतरी राहिलेल्या स्वप्नांची आणि न सांगितलेल्या भावनांची जाणीव करून देतात. प्रत्येक गोष्टीचा शेवट स्पष्ट आणि ठाम असतोच असे नाही; काही कथा काळाच्या प्रवाहात विरून जातात, पण मनातून मात्र कधीच संपत नाहीत. कवीने “कथा” हा शब्द वापरून मानवी आयुष्यालाच एक रूपक दिले आहे.

“आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो”

या ओळीत अनुभवातून आलेली स्वीकाराची भावना दिसते. आयुष्याने दिलेल्या जखमा, तुटलेली नाती किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यामुळे मन अधिक वास्तववादी बनते. पूर्वी अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी आता सहज पटू लागतात. ही केवळ निराशा नाही, तर जीवन समजून घेतल्याची एक शांत जाणीव आहे.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची साधी भाषा आणि खोल भावविश्व. कोणताही अलंकारिक आव आणत नाही, तरी ती थेट मनाला भिडते. अपूर्णतेतही सत्य असते आणि काही कथा शेवटाशिवायही आयुष्यभर जगत राहतात, हा अत्यंत सूक्ष्म विचार कवीने प्रभावीपणे मांडला आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ३

नेहमीच डोक्याने विचार करु नये
कधी भावनानाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेवर समिक्षा लेखन

यांच्या या चार ओळी साध्या वाटल्या तरी त्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा अतिशय कोमल आणि संतुलित दृष्टिकोन दडलेला आहे. माणूस नेहमी तर्क, विचार आणि व्यवहार यांच्या चौकटीत जगत असतो; पण कवी येथे सांगतो की जीवन केवळ बुद्धीने जगायचं नसतं. भावनांनाही तितकाच सन्मान आणि मोकळेपणा मिळायला हवा.

“नेहमीच डोक्याने विचार करु नये” या ओळीतून कवीने आधुनिक जीवनातील कोरडेपणावर सूचक भाष्य केले आहे. सतत हिशोब, शंका आणि तर्क यांच्या आधारे घेतलेले निर्णय माणसाला भावनिकदृष्ट्या रिकामं करू शकतात. म्हणूनच “कधी भावनानाही वाव द्यावा” ही ओळ मनाच्या नैसर्गिक स्पंदनांना स्वीकारण्याचा सल्ला देते. येथे भावना म्हणजे केवळ हळवेपणा नसून संवेदनशीलतेचा स्वीकार आहे.

“आसुसलेल्या डोळ्यांना / स्वप्नांचा गाव द्यावा” या प्रतिमेत कवीची कल्पनाशक्ती आणि आशावाद सुंदरपणे व्यक्त होतो. ‘आसुसलेले डोळे’ ही प्रतिमा अपूर्ण इच्छा, आतुरता आणि जगण्यातील उरलेली आशा दर्शवते. अशा डोळ्यांना ‘स्वप्नांचा गाव’ देणे म्हणजे माणसाला पुन्हा जगण्याची उमेद देणे होय. येथे ‘गाव’ हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे; कारण तो केवळ स्वप्न नव्हे तर त्या स्वप्नांना आसरा, आपलेपणा आणि विस्तार देतो.

या कवितेची भाषा अत्यंत सहज आणि प्रवाही आहे. अलंकारिक शब्दांचा अतिरेक न करता कवीने थेट मनाला स्पर्श करणारा आशय मांडला आहे. थोडक्यात, ही कविता बुद्धी आणि भावना यांच्यातील समतोल साधण्याचा सुंदर संदेश देते. जगण्यात स्वप्न, संवेदना आणि मनाचा ओलावा जिवंत ठेवण्याची प्रेरणा या चार ओळी वाचकाला देतात.

@ eaksharman

समिक्षा लेखन २

चंद्रशेखर गोखले यांच्या —

 “सरतेशेवटी....
काही उरत नाही,
तरी माझ्यासारखी माणसं
तो शेवट धरत नाहीत”

या ओळी जीवनाच्या गूढ तत्त्वज्ञानाला स्पर्श करणाऱ्या आहेत. अत्यंत साध्या शब्दांत कवीने मानवी मनातील आशा, जिद्द आणि न संपणाऱ्या जगण्याच्या प्रवृत्तीचे प्रभावी चित्रण केले आहे.

“सरतेशेवटी काही उरत नाही” ही ओळ जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देते. माणूस आयुष्यभर नाती, स्वप्ने, संपत्ती, आठवणी यांच्यामागे धावत राहतो; पण शेवटी सर्व काही क्षणभंगुर ठरते. जीवनाचा शेवट रिकामेपणातच विलीन होतो, ही अस्तित्ववादी जाणीव कवीने अत्यंत संयतपणे मांडली आहे.

मात्र पुढील ओळीत कवितेला एक वेगळाच आशय प्राप्त होतो — “तरी माझ्यासारखी माणसं तो शेवट धरत नाहीत.” येथे कवीचा आशावादी आणि जिद्दी स्वभाव प्रकट होतो. अंतिम निरर्थकतेची जाणीव असूनही जगण्यावर प्रेम करणारी, स्वप्नांना कवटाळणारी आणि सतत पुढे चालत राहणारी माणसं समाजात असतात. ही ओळ मानवी मनाच्या अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक ठरते.

या कवितेतील विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिची अंतर्मुख शांतता. यात आक्रोश नाही, नाट्यमयता नाही; पण जीवनाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. “शेवट धरत नाहीत” हा प्रयोग अत्यंत अर्थपूर्ण आहे. तो केवळ मृत्यू नाकारण्याचा नाही, तर निराशेला शरण न जाण्याचा संकेत देतो.

कवितेची भाषा साधी, प्रवाही आणि सहज आहे. अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याची ताकद ही चंद्रशेखर गोखले यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यांच्या कवितेत तत्त्वज्ञान आहे, पण ते बोजड नाही; उलट ते वाचकाच्या मनात हळूहळू झिरपत राहते.

एकंदरीत, ही कविता जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देतानाच माणसाच्या आशावादी वृत्तीचा गौरव करते. निराशेच्या सावलीतही जगण्याचा धागा न सोडणाऱ्या मनाचा हा अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक आविष्कार आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन १

चंद्रशेखर गोखले यांच्या —

“आकाशभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कोणाला अधिक
तर कुणाला उणे....”

या चार ओळी अत्यंत साध्या वाटल्या तरी त्यामागे जीवनातील विषमता, स्पर्धा आणि अस्तित्वाची वेदना दडलेली आहे. कवीने “आकाशभर पाखरं” या प्रतिमेतून समाजातील असंख्य जीवांचे चित्र उभे केले आहे. प्रत्येकाला जगायचे आहे, उंच भरारी घ्यायची आहे; पण “मुठभर दाणे” ही प्रतिमा साधनसंपत्तीच्या मर्यादित उपलब्धतेकडे निर्देश करते.

कवितेतील मुख्य आशय म्हणजे जीवनातील असमतोल. काहींना भरपूर संधी, संपत्ती आणि सुख लाभते, तर काहींना मूलभूत गरजाही अपुऱ्या पडतात. “कोणाला अधिक तर कुणाला उणे” या ओळीत समाजरचनेतील विषमता अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. ही केवळ आर्थिक तफावत नसून प्रेम, मान्यता, संधी आणि नशिबातील फरकही सूचित करते.

या कवितेचे सौंदर्य तिच्या अल्पाक्षरीपणात आहे. फार मोठे भाष्य न करता कवी थेट वास्तव मांडतो. “पाखरं” आणि “दाणे” या सहजसुंदर प्रतिमा वापरून मानवी संघर्षाचे तत्त्वज्ञान उलगडले आहे. यात कुठलाही आक्रोश नाही, पण एक शांत वेदना आहे.

कवितेतून समाजातील स्पर्धेची झलकही दिसते. सर्वांना जगण्यासाठी धडपड करावी लागते; परंतु साधने मर्यादित असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला सारखे काही येत नाही. ही जाणीव वाचकाला अंतर्मुख करते.

एकंदरीत, ही कविता मानवी जीवनातील विषमता आणि संघर्षाचे अत्यंत प्रभावी, सूचक आणि चिंतनशील चित्रण करते. साध्या शब्दांत मोठा सामाजिक आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य चंद्रशेखर गोखले यांच्या लेखणीत स्पष्टपणे दिसून येते.

@ eaksharman

Friday, May 8, 2026

Thursday, May 7, 2026

भावमेघ पुस्तक प्रकाशन

नमस्कार, 10 जानेवारी 2026 रोजी माझ्या भावमेघ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. माझ्यासाठी हा सोहळा एखाद्या अपत्यजन्मा सारखा खूप महत्वाचा होता..नवीन ओळख मिळवून देणारा आहे. खरंतर पोस्ट ला थोडा दोन तीन दिवस उशीरच झाला आहे, पण ही phase माझ्यासाठी खूपच नवीन आहे..नव्याने स्वतःशी ओळख झाल्यासारखे वाटते आहे..माझा आनंद, माझे भारलेपण तुमच्या समोर मांडायचे आहे म्हणून ही पोस्ट..

सारस्वतांच्या सोबतीने
सोहळा कवितांचा रंगला
रंगवूनी रसिक मनांना
अंतर्नाद जणू निनादला
कापरापरी उडून वेळ
कसा अचानक संपला
पण स्मृतींच्या रूपाने
मनावर कायम ठसला

असेच काहीसे  वाटते आहे...
देव कधीकधी अशा क्षणांचे दान पदरात देतो, वाटतं खरंच आपण पात्र आहोत का ह्या सगळ्याला... शनिवार पासून सगळीकडून कौतुकाची, प्रेमळ शब्दांची पखरण माझ्यावर होत आहे...मन इतक भरून आलं आहे.
त्याच भरल्या मनाने आईला फोन केला, तिला विचारलं, " मला खूप दडपण आलं आहे... कारण माहित नाही , ह्या सगळ्यासाठी खरंच मी योग्य आहे का.. " तेव्हा तिचे उत्तर फार महत्वाचे होते, "आपण चांगले माणूस असल्याची ही पावती असते, ती स्वीकारून पुढच्या प्रत्येक पावलावर त्याची जाणीव ठेवून जबाबदारी वाढवणारी  असते ही कौतुकाची प्रेमाची थाप..आज तुला ह्या प्रसंगात तुझ्या ज्या चुका , उणिवा किंवा कमतरता दिसत आहेत त्या पुढच्या वेळी तू दूर करण्याचा प्रयत्न कर. पण हा क्षण अभिमानाने जग, तो तुझा स्वतःचा आहे."

मी लहानपणा पासून आईबाबांना कोणतही काम करताना सचोटी आणि  प्रामाणिकपणे करताना पाहिलं आहे..ते अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे. तुमच्या सगळ्यांच्या शब्दांनी खूप भारावून गेले आहे. ... धन्यवाद सर्वांचे.. देवाचे सर्वात जास्त आभार कारण मी ह्या सर्व सोहळ्याचा भाग असण्याची सुतराम शक्यता नव्हती.

मी साधारण कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्या भावना कवितेत मांडते आहे, फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये माहित असलेली ही गोष्ट, मी साधारण 2013 पासून फेसबुक, ब्लॉग आणि विविध social media platform वर हळूहळू मांडायला लागले. मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या नाहीत..बऱ्याचश्या कविता मुक्तछंदात आहेत.. माझ्या मनातील विचार मांडायचा केलेला प्रयत्न आहे..माझ्या नवऱ्याने दिपक सावंत Deepak Sawant ह्याने फार आग्रहाने आणि कौतुकाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.. माझा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह..ह्याआधी माझ्या कविता 3 वेगवेगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून छापून आल्या आहेत, एक दोनदा कथाही छापून आल्या आहेत..

गीतकाव्य ह्या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान सतीश दादा आणि परेश दादा ह्यांनी सुद्धा माझ्या पुस्तक निर्मितीसाठी आग्रह धरला होता. त्यांचेही आभार. Sateesh Ranade  Paresh Koli
माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझ्या धाकट्या लेकीने प्राची दिपक सावंत( वय वर्ष 13) हिने काढले आहे..thank you Prachi.. Love you प्राची आणि पूर्वा..

पुस्तकाची उत्तम प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक Satish Solankurkar  सोळांकुरकर सरांनी लिहिली आहे त्यांचेही आभार... आणि पुस्तकाच्या पाठी लिहिलेली मा प्रा कविवर्य अशोक बागवे सरांची पाठराखण म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे.. Ashok Bagwe सर धन्यवाद...

गीतकाव्य आणि भावनांची चंची ह्या दोन काव्यसंग्रहासोबत पुण्यात 10 जानेवारीला भावमेघ चे प्रकाशन झाले.. अंतर्नाद काव्यमंच ह्यांनी Velvet Kavisha Publications  Varsha Vishal Thukrul  सोबत फार सुंदर सोहळा आयोजित केला होता..दोन्ही संस्थांचे आभार..

आणि माझी आई Shilpa Samant , माझा दादा Harshad Samant आणि माझे सगळे जिवलग जे मनात इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत त्या सगळ्यांचे आभार.. माझ्या बाबांना मी सर्वात जास्त miss करते आहे..त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत..ते जाणवतात.🙏
आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतकाचेही आभार, सदिच्छा पाठीशी असल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही..

आणि भावमेघ बरोबर प्रकाशित झालेल्या भावनांची चंची या काव्यसंग्रहाच्या कवयित्री Saru Pawar ताई तुमचेही अभिनंदन..आणि गीतकाव्य ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट 26 कवी कवयित्रींचेही अभिनंदन...
आणि माझे माहेरचे सर्व सामंत कुटुंबीय, आजोळचे नाईक कुटुंबीय आणि सासरचे सावंत कुटुंबीय ह्या सर्वांचे आभार

माझ्या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी नक्की कळवा. वाचून आवर्जून अभिप्राय द्या..
इतक्या उघडपणे अभिमानाने माझ्या कविता मिरवताना फार छान वाटलं..धन्यवाद @Deepak Sawant.
मेघना

https://www.facebook.com/meghanadeepaksawant




Wednesday, May 6, 2026

S. N. Inamdar

S. N. Inamdar (6th May 1945 - 18th July 2024)

eminent tax consultant, advocate and designated senior counsel of the Bombay High Court

the Income Tax Appellate Tribunal carried a feature about him in their magazine. I am giving the link in the next tweet.

https://itatonline.org/digest/articles/my-lineage-how-i-was-moulded-an-inspiring-journey-of-s-n-inamdar-senior-advocate/

शब्दरंग

सकाळी वॉकला गेले असता वॉकिंग  ट्रॅकवर एक आजी दिसल्या. समोरुन येताना दिसल्या त्याच क्षणी मला यांच्या बद्दल कुतूहल वाटले. वयाच्या मानाने लहान वगैरे काही दिसत नव्हत्या पण वयाला लाजवेल एवढा उत्साह मात्र नक्की होता.
 वेशभूषा नक्कीच तरुणांसारखी होती. सर्वप्रथम त्यांना पाहिल्यावर या वॉकिंगला आल्या आहेत की ट्रीपला हेच लक्षात येईना.
     ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, गॉगल आणि कॅप.. तयारी तर सगळी ट्रीपला निघाल्यासारखीच होती. त्यांचा फोटो काढण्याची मनोमन इच्छा झाली. पण त्यांना हे आवडेल की नाही? फोटो साठी कसे विचारावे .... असा विचार करत मी पुढे चालू लागले. थोड्यावेळाने गणपती मंदिराजवळ थोडावेळ बसून परत एखादा राऊंड मारावा असा विचार करून मी गणपतीच्या मंदिराजवळ आले तर समोरच आजी उभ्या. स्वतःहून माझ्याशी काहीतरी बोलल्या. संवादाचा हाच धागा पकडत मी त्यांना विचारले, " आजी, वय काय हो 
तुमचे? "
      खरे तर त्यांच्याकडे बघून त्यांना आजी म्हणावं की नाही हाच प्रश्न होता. " सांगा बर किती असेल? "..... आजींनी मलाच प्रतिप्रश्न केला. "तुमचा उत्साह बघून नक्की तुमचे वय कळत नाहीये म्हणूनच विचारते आहे ".... असे मी म्हणताच...." 81 "... आजी उत्तरल्या.
      वयाच्या 81 व्या वर्षी इतका उत्साह! 
 "आजी, तुमचा एक फोटो काढायचा होता. काढू का?".... मी विचारले.
 तसे खुश होत आजी म्हणाल्या," अरे वा... काढा की. कुठे उभी राहू सांगा. "
 मी म्हणाले... " वॉकिंग  ट्रॅकवर उभ्या रहा." 
 तर आजी म्हणतात कशा.... " अहो, थांबा.. थांबा. जरा केस नीट करते आणि घाम पुसते. "
 बोलता बोलता आजींनी रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि केस व्यवस्थित केले.
 डोळ्यावर पुन्हा गॉगल चढवला आणि डोक्यावर कॅप. त्यादिवशी मी नेमकी चष्मा घरी विसरले होते. त्यामुळे फोटो काढताना मलाच थोडी सर्कस करावी लागली. मी म्हणाले... "आजी, माझे मिस्टर फोटो छान काढतात. इथेच कुठेतरी ट्रॅक वर फिरत आहेत. " तर म्हणतात कशा...  "अहो,मग शिट्टी मारा की... येतील ते लगेच."
 असे म्हणून त्या स्वतःचा हसू  लागल्या. आजींच्या आतले खट्याळ लहान मूल अजूनही जागे होते.
     फोटो काढून झाल्यावर मला म्हणाल्या,  "आता हा फोटो मला कसा मिळणार? "
 मी तुमचा फोन नंबर द्या म्हणाल्यावर लगेच माझे नाव आशा शहा आहे म्हणाल्या व मोबाईल नंबर सांगितला. मी काढलेला त्यांचा फोटो बघून तो कसा क्रॉप केला पाहिजे वगैरे सूचना द्यायला आजी विसरल्या नाहीत.
 पाच-दहा मिनिटांच्या भेटीमध्ये आजींनी स्वतःबद्दल बरीच माहिती सांगितली. तरुणपणी प्राध्यापक असणाऱ्या आजी पंधरा-वीस  वर्षे अमेरिकेत राहून आल्या होत्या. 
" आयुष्यात मी बराच स्ट्रगल केला आहे ".... हे सांगायला आजी विसरल्या नाहीत. 
 म्हणजे आजींचं आयुष्य अगदी सरळ साधं नव्हतं तर. पण तरीही आजींनी स्वतः मधलं लहान मूल जपलं होतं हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून कळत होते.
 तरी मला आता पहिल्यासारखे काम जमत नाही म्हणाल्या. 
 मी काही म्हणण्यापूर्वीच " तुम्हाला भेटून छान वाटले. नवीन ओळख झाली. ".... असे आजींनी मलाच सांगितले.
 खरे तर आजींना भेटून माझी दिवसाची सुरुवात छान झाली होती. 
 पुन्हा भेटण्याचे आणि आजींविषयी मी लिहिलेली पोस्ट त्यांना पाठवण्याचे आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
 आजींकडे बघून... Age is just a number... याचा  प्रत्यय आला. 
 म्हातारपण असावं तर आजींसारखं असं मनातल्या मनात म्हणत मी घरी आले.
 त्या दिवशी दिवसभर राहून राहून सारख्या आजी डोळ्यासमोर येत होत्या. 
 आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस आपल्याला नक्कीच काहीतरी देऊन जातो हे नक्की.

©️®️स्मिता मुंगळे.

Tuesday, May 5, 2026

कविता

ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे 
उमटले कळीवर 
पाय दवाचे... ओले...

मी ओंजळ माझी 
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....

न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...

मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!

वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा... 
नादला एकदा आषाढाचा 'झाला' 
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला

शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता 
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता... 

तू वेध घेतला 
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?

आकाश तरंगे
उंचावरती दूर 
मातीच्या हृदयी 
झुरणीचे काहूर 
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून
http://malabhavalelyakavita.blogspot.in/2010/07/blog-post_17.html

Monday, May 4, 2026

स्वामी विवेकानंद

सध्या स्वामी विवेकानंद यांचे भारतीय व्याख्याने वाचनात आहे. मद्रास येथील "भारताचा भावी काळ" हे व्याख्यान वाचले. खरंतर स्वामीजींचे प्रत्येक व्याख्यान सकारात्मक विचार  प्रदान करणारे आहे. भारताचा भावी काळ यात स्वामीजी म्हणतात, 

" जेव्हा अशी एखादी प्रभावी व्यक्ती निर्माण होते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे तिचे विचार आपल्यापैकी पुष्कळांच्या मनात उत्पन्न होतात व अशाप्रकारे आपण सामर्थ्यसंपन्न होतो. संघटना ह्या एवढ्या शक्तिशाली, कशामुळे होत असतात ? संघटना ही काही जड वस्तू नव्हे. उदाहरणच द्यावयाचे तर, चार कोटी इंग्रज लोक येथील तीस कोटी लोकांवर राज्य कसे करू शकतात ? याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण कसे कराल ? हे चार कोटी लोक आपली इच्छाशक्ती एकत्र करतात व त्यामुळे अपार सामर्थ्य निर्माण होते, आणि तुम्हा तीस कोटी लोकांपैकी प्रत्येकाची इच्छाशक्ती वेगवेगळ्या रीतीने कार्य करीत असते. म्हणून, भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तीचे परस्पर सहकार्य यांतच साठलेले आहे.

याच वेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या मनात येत आहे:
सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे ..." (१०-१९१-२)

हा मंत्र आपल्याला सांगतो, "तुम्ही सर्वजण मनाने एक व्हा, तुमचे विचार एक असोत, कारण विचाराने एक असल्यामुळेच पूर्वी देव यज्ञातील हविर्भाग घेऊ शकत असत. मनुष्याकडून उपासना ग्रहण करण्यास देव योग्य होते, कारण ते एका विचाराचे होते". मनाने एक होणे यात समाजाच्या स्थैर्याचे रहस्य आहे. आणि जर तुम्ही आर्य-द्रविड, ब्राह्मण- अब्राह्मण यांसारख्या क्षुल्लक प्रश्नांवरून कलह माजवीत बसाल, तर भारताचे भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिसंचयास तुम्ही मुकाल. कारण, लक्षात ठेवा की, भारताचे भविष्य सर्वस्वी ह्या गोष्टीवरच अवलंबून आहे. इच्छाशक्तींचे संमीलन, त्यांचे परस्पर सहकार्य व त्यांचे केंद्रीकरण हेच रहस्य होय."

बहुत काय लिहीणे..४ मे ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी असल्याचा दिवस आहे. गंगा - गंगासागर- माँ काली-अनन्य भक्त ठाकूर- माँ शारदा, स्वामीजी, या साऱ्या आणि सार्धशती वर्ष असणाऱ्या वंदे मातरम् या महामंत्राची संपूर्ण शक्ती एकवटली आणि क्रांतिभूमीतून परिवर्तन अद्भुत अविस्मरणीय ठरले आहे.. जय माँ..🚩🙌

-  सर्वेश फडणवीस

Sunday, May 3, 2026

पालकत्व

*पालकांचे मार्गदर्शन - भाग २२*

_लहान मुलांच्या बलात्काराच्या घटना आणि पालकांची जबाबदारी._

लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार हा केवळ गुन्हा नाही, तर एक गंभीर मानसशास्त्रीय आणि सामाजिक समस्या आहे. भारतात बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या जास्त आहे आणि अनेक घटना अजूनही उघड होत नाहीत, कारण भीती, लाज आणि सामाजिक दबाव यामुळे मुलं बोलत नाहीत .

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, अशा घटनांचा मुलींच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यांना भीती, अपराधीपणा, कमी आत्मसन्मान, आणि दीर्घकालीन मानसिक आजार जसे की डिप्रेशन किंवा चिंता निर्माण होऊ शकते . 

अनेक वेळा मुलांना काय घडत आहे हे समजतही नाही, कारण त्यांची समज विकसित झालेली नसते. त्यामुळे ते स्वतःला दोष देतात किंवा शांत राहतात.

बहुतांश अत्याचार करणारे लोक अपरिचित नसतात, तर ओळखीचे, नातेवाईक किंवा विश्वासातील व्यक्ती असतात. त्यामुळे धोका बाहेरच नाही, तर घराच्या किंवा परिचित वातावरणातही असू शकतो . हे पालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे.

पालकांची जबाबदारी येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. सर्वात आधी, मुलांशी खुलेपणाने संवाद ठेवणे गरजेचे आहे. “गुड टच” आणि “बॅड टच” याबद्दल योग्य वयात समजावून सांगणे आवश्यक आहे. संशोधनात दिसते की अनेक पालक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे मुलं असुरक्षित राहतात .

तसेच, मुलांच्या वागण्यात अचानक बदल, भीती, एकटे राहण्याची इच्छा किंवा कोणत्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न दिसल्यास पालकांनी ते गंभीरपणे घ्यावे. मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, पालकांनी केवळ संरक्षणच नाही तर विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांना हे जाणवले पाहिजे की काहीही घडले तरी ते मोकळेपणाने सांगू शकतात. जागरूक पालकत्व हेच अशा घटनांना रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

#parentingtips #nasrapurvictim #rakeshvarpe

कथा

सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात

*पालकांचे मार्गदर्शन = भाग २०*

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात?_

भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा खरंच आवश्यक आहेत का, हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात येतो. 

मुलांच्या विकासासाठी फक्त महागडी शाळा किंवा मोठी इमारत महत्त्वाची नसते. त्यापेक्षा शिकण्याचे वातावरण, शिक्षकांचा दृष्टिकोन आणि घरातील भावनिक आधार अधिक प्रभावी ठरतो.

मुलांच्या मेंदूचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास सुरक्षित, प्रेमळ आणि प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात अधिक चांगला होतो. 

काही वेळा मोठ्या शाळांमध्ये सुविधा चांगल्या असतात, पण त्यामुळेच मुलं अधिक यशस्वी होतील, असे नाही. 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं, मुलांना मिळणारे वैयक्तिक लक्ष आणि त्यांच्या प्रश्नांना दिलेले उत्तर याचा परिणाम शिक्षणावर जास्त होतो.

तसेच, जास्त फी असलेल्या शाळांमुळे पालकांवर आर्थिक ताण येऊ शकतो. हा ताण नकळत घरातील वातावरणावर परिणाम करतो.

आणि मुलांनाही त्याची जाणीव होते. 
त्यामुळे घरातील ताण, चिंता किंवा दबाव मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

मुलांना आत्मविश्वास, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी मोठ्या शाळेपेक्षा योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. 

साध्या शाळेतही चांगले शिक्षक आणि सकारात्मक वातावरण असेल, तर मुलं उत्तम प्रगती करू शकतात.

म्हणूनच, शाळा निवडताना फक्त फी किंवा ब्रँड बघण्यापेक्षा मुलांच्या गरजा, त्यांचा स्वभाव आणि त्यांना मिळणारे वातावरण यावर लक्ष देणे अधिक योग्य ठरते. 

शेवटी, मुलांच्या यशामागे शाळेपेक्षा त्यांची शिकण्याची आवड आणि पालकांनी दिलेला वेळ अधिक महत्त्वाचे असते.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

पालक-बालक संबंधित विषयावर तुम्हाला आणखीन काय वाचायला आवडेल मला नक्की सांगा. आजच्या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

योग्य वयात मुलांचे करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन करून घ्या. संशोधनानुसार ८ वी ते १२ वी हा मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. करिअर चाचण्यांसाठी ९१३७३००९२९ या क्रमांकावर फोन किंवा व्हाट्सअप करू शकता.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

#rakeshvarpe #parenting

तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार

मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.

मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.

नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी  मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.

तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो. 

मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.

रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.

त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

Rajendra Kher

https://www.facebook.com/rajendra.kher.79

Saturday, May 2, 2026

सुमी... २७ ०४ २४

सुमी... २७ ०४ २४

सुमती जोग ही माझी चुलत बहीण. आधीची सुमती फडके, लग्नानंतर जोग. ती जवळपास माझ्यापेक्षा दहाएक वर्ष मोठी आहे, अजूनही अंतर तेवढंच बाकी आहे आमच्या वयातलं. हे तीच म्हणालीये. अतिशय हजरजबाबी, विनोदी, फटकळ आणि एकूणच बिनधास्त आहे ती. कोकणी मातीतले सगळे गुणावगुण तिच्यात ठासून भरलेले आहेत. माझ्या काकांची ती एकुलती एक मुलगी. वांड आणि आडदांड. मुलीच्या जन्माला आली म्हणून नाहीतर सुमंत फडकेच तो. काका तिला तशीच हाक मारायचे. गुणावगुणसुद्धा उपजत असतात काही. आम्ही कोळीस-याचे मूळ. चाफ्यावरून पुढे गेलात की आमचं गाव लागतं. शिकायला म्हणून बाहेर पडलेलो आम्ही शिकल्यावर नोकरी करत शहरातच राहिलो आणि गाव फक्त सुट्टीला, होळीला, गणपतीला जाण्यापुरतं उरलं. काही वर्षांनी तो सुद्धा इतिहास होईल कारण जाण्यासाठी गावात घर, नातेवाईक हवेत की. आमचंही आता गावात सुमी सोडल्यास कुणी नाही. सुमीसुद्धा एकटीच आहे तशी आता. आई, वडील, काका काकू कधीच गेले. ती ही आता पंचाहत्तरच्या जवळ आलीये. पण वर्षातून मी एकदा तरी जातोच गावाला. काम काही नसतं पण सुमी आहे म्हणून जातो.

ती वयाने वाढली पण अजून गुणावगुण सगळे तसेच आहेत. अजूनही कुणी तिच्या अंगणात पडलेला आंबा उचलायचं, जास्वंद काढायचं धाडस करणार नाही. भुतासारखी कुठून बघेल आणि झोड उठवेल हे कळणार नाही. सगळी फुलं ती काढणार आणि वाटणार पण तुम्ही काढलंत की संपलं. इतकी बोलेल की झक मारली आणि फूल तोडलं असं वाटलं पाहिजे तुम्हांला. सुमी आता एकटीच रहाते. जोग गेल्याला पण चारेक वर्ष झाली. समोरच्या वाडीत जोग रहायचे आणि इकडे फडके. तेंव्हाच ते लादलेलं लव्ह मॅरेज होतं. विद्याधर जोग म्हणजे अगदी शहाळ्यासारखा नरम आणि गोड माणूस, त्यांना घरी हाक मारायचं नाव मिलिंद उर्फ मिलू होतं. सुमी अठराची असेल तेंव्हा आणि जोग एकवीस. तसे दोघे एकाच शाळेत शिकलेले. घरी लग्नाचा विषय सुरु झाल्यावर सुमीने स्पष्ट सांगितलं, 'वसंतकाकांना विचारा, मला आवडतो मिलू. त्याला मी आवडते का माहित नाही'. काकू विचारात पडली ते कार्टीने प्रेमाचे चाळे काय केले असतील यामुळे नाही तर मिलू हो म्हणाला तर त्याचे किती हाल होतील याने. सगळे जोग मिटल्या तोंडाचे होते आणि ही बोलभांड. घरच्या आंबा, काजूच्या बागा होत्या दोन्हीकडे. दोघेही एकुलते एक. त्यांचं दुकान पण होतं बाजारात. जोग बी.ए. झाले होते आणि सुमी बारावी.

एके दिवशी काका आणि काकू वसंतरावांना भेटले आणि लग्न ठरवून आले. त्याचवेळी सुमी दुकानात गेली होती, हक्क दाखवायची पद्धत पण अफाट, 'ए मिलू, आईबाबा तुझ्या घरी गेले आहेत आपल्या लग्नाचं बोलायला, मीच सांगितलं त्यांना, तुझं कुठे काही झेंगट नाही ना, रत्नागिरीला कॉलेजला होतास म्हणून विचारलं'. जोग गल्ल्यावर आडवेच झाले. कसाबसा धीर एकवटून ते म्हणाले, 'ठरवायला म्हणजे? मी हो म्हणायला पाहिजे ना पण?' 'माझ्यात काय वाईट आहे सांग नाही म्हणायला? तुमच्या सगळ्यांपेक्षा गोरी आहे मी, सगळी कामं येतात, झाडावरून आंबे, काजू काढता येतात, वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक एकटी करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तू आवडतोस. नाही म्हण फक्त मग बघ तुझं तरी लग्न ठरू देतीये का ते. आलेल्या मुलीला सांगेन, माझं आणि याचं प्रकरण होतं म्हणून'. 'तू काहीही सांगशील, पुरावा हवा ना. आणि इथे दुकानात बोलायच्या गोष्टी आहेत का या? बोलतो मी आधी घरी'. 'हो, नाही, जे असेल ते उद्या संध्याकाळी सातला देवळात ये सांगायला, तेंव्हा नसतं कुणी'. जोगांनी कपाळावर हात मारून घेतला आणि कामाकडे वळले ते. सुमी घरी रीतसर सांगून देवळात गेली होती. 'मिलू येणारे सांगायला, हवं तर तू ही चल' असं ती काकूला म्हणाली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि 'जा तूच' म्हणाली.

लग्नाला सगळं गाव लोटलं होतं. भर लग्नात सुमी म्हणाली होती, 'गावक-यानू दोनदा जेवा, दोन्हीकडे आहेर दिलाय ना तुम्ही'. मी लहान होतो तेंव्हा पण गोरीपान सुमी अगदी पिवळी धम्मक दिसत होती दागिन्यांमुळे, ते आठवतंय. माहेर समोर आहे म्हणून ती कधीच उठसूट जायची नाही. कारण असेल तरच. तिचे मानापमान अगदी कोकणी होते. चार दिवस आधी मदतीला गेली आईला पण दिवाळसणाला रीतसर आमंत्रण दिल्यावर येईन म्हणाली. दिवाळीत चार दिवस जोग घर बंद करून फडक्यांकडे रहायला होते. नियम म्हणजे नियम. बोलभांड असली तरी ती प्रचंड मायाळू आहे, ते दिसू न देण्यासाठी सगळी धडपड असते तिची. लग्न झाल्यावर ती भरपूर आहे म्हणून बसून राहिली नाही. आंबे गावोगाव पाठवणे, आंब्या फणसाच्या पोळ्या, पल्प तिने गावात तयार करण्यासाठी छोटा कारखाना काढला आणि अनेक लोकांना रोजगार पण दिला. तिथेही मालकीण आहे की कामाला आहे कळणार नाही अशी उपस्थिती असायची तिची. ती ही बरोबरीने काम करायची इतर बायकांच्या. बाई गर्भार असेल तर चार तास काम आणि आठ तासाचा पगार असा तिचा कायदा होता. कुणी कुठे हात पसरले पैशासाठी हे समजलं तर ती चारचौघात त्याला झोडायची आणि पैसे द्यायची. आपल्याकडच्या माणसाने बाहेर पैसे मागावेत हा तिला अपमान वाटायचा. तिच्या दृष्टीने ते एक कुटुंब होतं आणि ती कुटुंबप्रमुख. तिच्याकडे काम करणा-या लोकांच्या मुलांनी, सुनांनीही काम केलं तिथे.

कुणालाही औषधाला, बाळंतपणाला, मुलीच्या लग्नाला, कळलं की पैसे ती न मागता द्यायची. ते परत देवोत न देवोत ती काहीही बोलायची नाही पण उसने घेतले असतील तर पठाणासारखी दारात जाऊन उभी रहायची मागायला. मुलाच्या लग्नाला मात्र पैसे द्यायचे नाही ती उसने, 'पोरग्याला कमवायला सांग मग लग्न कर म्हणावं', असं म्हणायची. एकूणच विचित्रं रसायन आहे ते. खोटेपणा, अस्वच्छता याचा तिला भयंकर राग. कामाला असलेल्या गड्याने अंगण नीट झाडलं नाही तर ती स्वतः त्याला कडेला उभा करून झाडून दाखवायची, झाडून होईस्तोवर त्याला तोंडाने झोडकाम चालू. रांगोळी म्हणजे फक्त 'श्रीराम' लिहायची, बाकी नाजूक काम तिला कधी जमलं नाही. झाडावर मात्र खारीसारखी चढायची अगदी. लग्न झाल्यावर सासूमुळे एकच बदल केला तिने. घरात किंवा बाहेर ती सगळ्यांसमोर मिलू म्हणायची नाही. 'ओ जोग' अशी खणखणीत हाक मारायची. एवढ्या सगळ्या सुखात तीट लावल्यासारखं एकच दुःखं होतं. तिला मुलबाळ काही झालं नाही. बरेच उपचार करून झाले. नवस वगैरे मी करणार नाही, दत्तक घेणार नाही हे तिने आधीच सांगितलं होतं. सासूने आणि तिच्या आईने केले नवस, उपास पण उपयोग झाला नाही काहीच. विषय निघाल्यावर तिने सगळ्यांसमोर विचारलं होतं, 'ओ जोग, तुम्हांला अपत्यासाठी दुसरं लग्न करायचं असेल तर करा बरं का, मी विनातक्रार समोर रहायला जाईन. अजिबात लुडबूड करणार नाही तुमच्या आयुष्यात पण घटस्फोटही देणार नाही, समोरून बघेन तुम्हांला'. जोग भरल्या गळ्याने म्हणाले होते, 'घरात तू एक लहान वांड बाळ आहेस ते पुरे आहे, आणखी नको कुणी मला'. आयुष्यात पहिल्यांदाच सुमी रडली असेल त्या दिवशी.

बोलणं सरळ म्हणून नाहीच कधी. एकदा असेच अंगण्यात बसलो होतो. एका म्हाता-याने जाताजाता अंगणात पडलेल्या बारक्या काटक्या सरपणासाठी गोळा केल्या. पुढचे संवाद नेहमीचे होते. 'रे मेल्या, माझंच अंगण दिसलं काय तुला? तुझ्यासाठी करतोयस का गोळा? गेलास तर लोकांना काळजी, स्वतःसाठी कशाला लाकडं गोळा करायला पाहिजेत'? 'अगो सुमे, तुझ्यासाठी पण ठेवेन गो बाय चार काटक्या तिथे'. 'मी इतक्यात नाही जायची. पोरगा कसा आहे रखमीचा?' 'चांगला हाये. तुझी आठवण काढली गो तिने, परवा गेलेलो ना तिच्या सासरी, निवलीला'. 'अरे बोलायचंस तरी, बस जरा. परवाच डिंकाचे लाडू केलेत ते देते चार तिच्यासाठी'. रखमी तिच्याकडे कामाला होती घरी लग्नाआधी. तिचा बाप दुकानात होता त्यांच्याच. ती बाळंतपणाला आलेली चार महिन्यामागे. सगळा खर्च सुमीचा. 'दात किती शाबूत आहेत तुझे?' 'छे गो, दोनचार हायेत, का ते'? 'लाडू रखमीसाठी दिलेत, तूला दात नाहीत म्हणजे पोचतील तिच्याकडे. आणि ती तुपाची बरणी पण ने. तिला म्हणावं लपवून खा हवंतर पण तब्येत सुधारू दे'. 'लाडू पोचिवतो, बरनी घरीच ठेवतो, आमच्या काय अंगी लागायचं नाय का तूप? आणि लगेच कुठून जाऊ परत. येष्टी काय आता सस्त -हायलीये काय?' 'तर तर, चार दिवस विड्या ओढू नकोस की, चहा घे हा. मी मागच्या जन्मीची देणेकरी आहे तुमची आणि हे पन्नास घे पण जाऊन ये उद्या तिच्याकडे'. म्हाता-याने डोळे पुसत वस्तू हातात घेतल्या आणि तो निघाला पण सुमी ती सुमीच. 'सरपण सोड ते आधी, जंगलात पडलंय ते आण, सगळं नुसतं फुकट हवं मेल्यांना'. म्हाता-याने दोन काड्या टाकल्या आणि तो हसत हसत निघून गेला.

काळ झटझट सरला. गावातली माणसं विरळ होत चालली. जवळपास पन्नासेक वर्षांचं तिचं सहजीवन एका रात्री संपलं. कुठलंही व्यसन नसलेले, आजार नसलेले जोग हार्ट अटॅक येऊन गेले. सुमीने एकदाच काय ते रडून घेतलं, कुणी हाक मारायला आल्यावर पाण्याच्या टिपूस काढला नाही. 'वय नव्हतं फार पण कोण कधी जाणार हे आपल्या हातात नसतं, दुःखं होतंच पण सतत रडून माणूस परत येणारे का?' असं तिचं स्पष्टं मत होतं. त्यानंतर तिने सगळे उद्योग विकून टाकले, जमिनी विकल्या, दागिने विकले आणि राहण्यापुरतं घर ठेवलं. तिच्या हयातीत व्याज आणि पश्चात रक्कम अनेक सेवाभावी संस्थांना मिळावी असं मृत्युपत्र तिने तयार करून ठेवलंय. शिक्षण नसेल फार पण तिचे विचार स्पष्ट होते, आतबाहेर काहीही नाही, कपट नाही, दुजाभाव नाही. एकदा असाच आमचा कशावरून तरी वाद झाला. मी रागाने म्हणालो, 'आता अजिबात येणार नाही तुला भेटायला'. 'नको येऊस, काही अडलं नाहीये माझंही'. मी ही रागाने निघालो तर दारात आडवी येऊन म्हणाली, 'थांब, परत येऊ नकोस असं म्हटलंय, आत्ता जा म्हटलंय का?' आणि हसत सुटली. मग मी ही दात काढले आणि भांडण मिटलं. तिचा कुणावर आणि कुणाचा तिच्यावर कायमस्वरूपी राग असणं शक्य नव्हतं. 

मी इतकी वर्ष जातो भेटायला पण कधीही कुणाबद्दल कुचेष्टेचं बोलणं नसतं, बोलण्यात कायम गंमतीजंमती असतात. अलीकडे जरा हळवी झालीये पण. आईवडील, सासूसासरे आणि तिचा मिलू यांच्याबद्दल जास्ती बोलते आताशा. एकदा म्हणालेली, 'तुला माहितीये जया, जोग मला काय म्हणाले होते लग्न झाल्यावर? सुम्या आहे तशीच रहा, मला पण तू त्यामुळेच आवडतेस पहिल्यापासून. पहिल्यापासून? म्हणजे मी मेलीने विचारलं नसतं तर या बाबाने सांगितलंच नसतं आणि आमचं लग्नही झालं नसतं. पण अत्यंत प्रेमळ माणूस रे, बोलायचा कमी पण माया त्याच्या त्या पिंग्या डोळ्यात बघावी. नुसता नजरेने बोलायचा तो. मी दहा वाक्य सांडेन पण तो महाचिकट. एखाद वाक्यं पुरायचं त्याचं. पण कधी माझा निर्णय चुकला ना तरी रात्री समजावून सांगायचा काय चुकलं ते. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं कधी तरी बोलायचा नाही'. सुमीही आता थकलीये, मलाही वरचेवर जायला होत नाही पण एकदा तरी जायलाच हवं वर्षातून. तिच्या इतक्या वर्षांच्या गंमती जंमती अजून अर्ध्याच ऐकून झाल्यात. येतोय हे कळवलं की वाट बघत असते अगदी पण दाखवत नाही तसं. पण जेवायला साग्रसंगीत करते दोन माणसांसाठीसुद्धा. दिवसभर दोघे खातपीत नुसत्या गप्पा झोडत असतो. निघताना रडत नाही पण चेहरा सांगतोच कितीही आव आणला तरी. पण बोलते मात्र 'असलास पुढच्या वर्षी तर ये परत' असं आणि हसण्याच्या आड डोळ्यातलं पाणी लपवते.

इतकं गोष्टीवेल्हाळ, मायेचं आणि नितळ मनाचं कुणी आपलं माणूस भेटणं आता या जगात दुर्मिळ आहे त्यामुळे आहे तोवर भेटायलाच हवं. सुमी जोग, आहेच तशी, खाष्ट तेवढीच प्रेमळ.

जयंत विद्वांस

'रविवारची रंगत'


'रविवारची रंगत'
'दृक काव्य' या अलीकडे प्रकाशित झालेल्या संग्रहातून.
व्हिज्युअल पोएट्री या विषयाचा अभ्यास करता करता 19 व्या शतकाच्या सुरुवातीला  Guillaume Apollinaire या फ्रेंच कवी आणि नाट्य लेखकाने त्याच्या 'कॅलिग्राम' या कवितासंग्रहात केलेला एक प्रयोग पाहण्यात, वाचण्यात आला.
जो कदाचित पहिल्यांदा झालेला असावा.
त्या पूर्ण संग्रहात प्रत्येक कवितेची अक्षररचना अशी केली आहे की त्यातून दृक अनुभव सुद्धा घेता येतो. ( जो  मी रविवारची रंगत या मालिकेत काही कवितांमधून सादर केला आहे)
ती कविताच अक्षर- दृक- काव्य झाली आहे.

 
असे कला प्रवाह अभ्यासता अभ्यासता मला त्यातलं भारतीयत्व जाणवलं ते रवींद्रनाथांच्या गिरगीट चित्रांमध्ये. असं म्हटलं जातं की कविता लिहिता लिहिता ते काही शब्द खोडत तर काही ओळीच्या ओळी सुद्धा गिरगिटवून खोडत.
त्या शब्द विरहित अवकाशाला गिरगीटण्यातून अमूर्त अशा विविध आकारांचे चित्ररूप मिळत गेले.  त्यांची ही 'पूरबी' ह्या हस्तलिखितातील गिरगिट चित्र जागतिक कला प्रवाहात सन्माननीय झाली. लिहिता लिहिता गिरगीटण्यातून चित्र दिसू लागली. 
अगदी या उलट मांडणी करत गेलो म्हणजे चित्रावर कविता उतरत असताना त्यातले शब्द त्या चित्राला त्याची स्पेस देत आहेत असं भासवू लागलो.
ह्या चित्रकाव्यात मांडण्याचा प्रयत्न.

Hemant Joshi

https://www.facebook.com/share/14dAXjJGj5o/

Wednesday, April 29, 2026

लवकर ये

- लवकर ये -
लहानपणी, वाढत्या वयात 
घराबाहेर पडताना 
खेळायला, शाळेत जाताना 
आईला ओरडूनच सांगायचो,
"आई मी गेलो गं" 
बाहेर पळताना सुद्धा 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा,
"गेलो म्हणू नये, येतो, म्हणावं".
तेव्हा अर्थाची अथांगता 
आकलनात आली नाही, 
पण आई सांगतेय नं, 
तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो 
"आई मी येतो गं". 
आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, 
"लवकर ये". 
मग महाविद्यालय, 
भारतमातेचा कार्यकर्ता असणं वगैरे 
संघटना, संगीत, सिनेमे, प्रवास, लेखन, समाजकार्य, खेळ 
सर्वच काही सहज समर्पणपूर्वक करताना 
"आई मी येतो गं" 
आणि 
"लवकर ये" 
रोजचंच झालं. नेहमीच झालं. 
रोज घरी परतेपर्यंत 
मध्यरात्री उलटून गेलेली असणं 
रोजचंच झालं, नेहमीच झालं. 
पण "आई मी येतो गं" आणि "लवकर ये"ची 
लय जरा सुद्धा हलली नाही. 
असाच एकदिवशी निघालो, 
"आई मी येतो गं". 
आई म्हणालीच, "लवकर ये". 
उंबरठ्यापलीकडे पडलेलं पाऊल 
मागे घेऊन आईला विचारलं, 
"आई, काय हे रोजचंच? माहितीय मला उशीर होणार आहे,
तरी तुझं आपलं, "लवकर ये". 
आई हसून म्हणाली, "लवकर ये". 
मी निघालो. 
वाटेवर वर्षानुवर्षं 
अखंड अंधार दाटलेला भेटत गेला. 
भविष्याच्या अनाकलनीय आकारांमध्ये 
जीव घुसमटत गेला, तेव्हा 
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या 
घंटेचा मंद घनगंभीर नाद
कानावर येत राहायचा,
"लवकर ये".
जगणंच झालं विश्वजननीच्या
वाटेवरची प्रार्थना,
"आई, मी येतो गं".
आणि जगदंबाही सांगत राहिली,
"लवकर ये!"

अविनाश धर्माधिकारी 

काव्य १

हर्षखेद ते मावळले
हास्य निमाले, 
अश्रु पळाले; 
कंटकशल्ये बोथटली, 
मखमालीची लव वठली; 
काही न दिसे दृष्टीला 
प्रकाश गेला, 
तिमिर हरपला; 
काय म्हणावे या स्थितिला ? 
-झपूर्झा ! गडे झपूर्झा !

हर्षशोक हे ज्या सगळे, 
त्या काय कळे? 
त्या काय वळे? 
हसतिल जरि ते आम्हांला, 
भय न धरू हे वदण्यालाः -
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे
तो त्यास दिसे
ज्या म्हणति पिसे;

त्या अर्थाचे बोल कसे? 
-झपूर्झा। गडे झपूर्झा !

ज्ञाताच्या कुंपणावरून, 
धीरत्व धरून, 
उड्डाण करून, 
चिद्घनचपला ही जाते, 
नाचत तेथे चकचकते; 
अंधुक आकृति तिस दिसती, 
त्या गाताती निगूढ गीती; 
त्या गीतीचे ध्वनि निघती-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

नांगरल्याविण भुई बरी 
असे किति तरी; 
पण शेतकरी 
सनदी तेथे कोण वदा? - 
'हजारांतुनी एखादा ! 
तरी न तेथुनि वनमाला 
आणायाला, 
अटक तुम्हांला, 
मात्र गात हा मंत्र चला - 
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

केशवसूत

Sunday, April 19, 2026

पुस्तक परिचय

नमस्कार,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या #जगणं_होईल_हिरवंगार या माझ्या कवितासंग्रहावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. सावंत सरांचे आणि म.टा. संपादकांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌿

जगणं सुंदर करणारी कविता 
...........................................

एखाद्या साहित्यिकाचे एखाद्या वाङ्मयप्रकारांतील कार्य अधोरेखित झाले, की इतर वाङ्मयप्रकारांतील त्याचे लेखनकर्तृत्व झाकोळले जाते किंवा नजरेआड केले जाते. बालसाहित्यकारांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. एकदा का तुमच्यावर 'बालसाहित्यकार' असा शिक्का बसला, की मग तुमच्या उर्वरित वाङ्मयप्रकारांतील लेखनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकनाथ आव्हाड यांच्या बाबतीत हे विधान अगदी खरे आहे. खरं तर सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण एकनाथ आव्हाड यांना ती साध्य झाली आहे. एकनाथ आव्हाड हे अव्वल दर्जाचे बालसाहित्यकार आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या बालसाहित्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या कवितेकडे म्हणावे तसे लक्ष वेधले गेले नाही. एकनाथ आव्हाड यांच्या सहज सुंदर कवितेकडे साहित्यविश्वाचे लक्ष वेधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

एकनाथ आव्हाड हे गेली ३०-३५ वर्षे साहित्यसाधना करत आहेत, म्हणजे ते केवळ बालसाहित्यच लिहीत आहेत, असे नव्हे. त्यांनी इतर वाङ्मयप्रकारांतही लक्षणीय लेखन केले आहे. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेली कविता आता 'जगणं होईल हिरवंगार' ह्या संग्रहरूपात येत असली, तरी ते काही नवोदित कवी नाहीत. त्यांचा कवितेचा व्यासंग जुनाच आहे. त्यांना चांगली 'कविता' लिहिता येते, म्हणूनच त्यांची 'बालकविता' साहित्य अकादमीकडून सन्मानित झाली आहे. कवीला शब्दांचे सामर्थ्य समजलेले आहे. म्हणूनच कवीने
'कसं सांगू शब्दांनी
मला काय दिलं?
सच्चेपणा, निर्मळ मैत्री
माझं मन जागं केलं'.
ह्या शब्दांत शब्दांचे ऋण व्यक्त केले आहे.
हा कवी शब्दांचा ऋणाईत आहे. ही कविता अभिव्यक्तीच्या स्तरावर फारच प्रांजळ आहे. 'जगणं होईल हिरवंगार' ह्या शीर्षकातही एक अटळ विश्वास आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेकांच्या घागरी उताण्या पडल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी सर्वत्र वणवण चालली आहे. दुष्काळाच्या झळा ठाण मांडून बसल्या आहेत. गावाला आणि आयुष्याला विळखा घालून. राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता ह्या दु:खात आणखी भर घालते आहे. त्यामुळे अस्वस्थता, अस्थिरता आणि अशांतता व्यापून उरली आहे, घरात आणि मनातही! प्रत्येकाचे
'दोन्ही हात अडकलेत
वांझोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
निराशेचा काळोख
अधिकच गडद झालाय'.
असं भोवतालाचं गडद चित्र ही कविता उभे करते.

संगणकयुगात मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याची खंत ही कविता व्यक्त करते.
'इथे काहींच्या पायाला
भिंगरीसारखी चाकं
आणि काही फुटलीत अहंकाराची टोकं.'
अशा शब्दांत ही कविता समकाळावर अचूक भाष्य करते. आभासी दुनियेतली कुचंबणा ही कविता शब्दांत बांधते.
'ऑनलाईन' ह्या कवितेत कवीने आभासी जगाची मनोवस्था नेमकेपणाने पकडली आहे.
'फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे नातं सुरू
आणि अनफॉलो केलं म्हणजे शेवट
इतका सहज आणि भावनाशून्य झालाय
नात्यांचा व्यापार.
आजच्या डिजिटल जगात चमकणारी नाती
फॉलोअर्स वाढले की आनंद देतात
प्रतिसाद कमी होताच अस्वस्थता वाढवतात.
इथे अट एकच
ही आभासी नाती टिकवण्यासाठी
मनात ओलावा नसला तरी चालेल,
पण सतत ऑनलाईन मात्र असलं पाहिजे'.
ह्या कवितेत उपहास आहे आणि उपरोधही आहे. वास्तवाला भिडणारी ह्या कवितेची ताकद वाखाणण्यासारखी आहे.

कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डोक्यावरील पाटीतून भाजीपाला विकून मुलाला घडविणाऱ्या मातेबद्दल कवीला नितांत आदर आणि कृतज्ञता वाटणे स्वाभाविकच आहे. प्रस्तुत संग्रहातील आईविषयक १३ कविता म्हणजे कवीची आणि आईची नाळबंधाची कहाणीच आहे. यांतील काही कविता आईचे स्वभावचित्र रेखाटतात. 
'तिचे घरात पाऊल पडताच
सूर्यप्रकाशाची तिरीप आली घरात
आणि काळवंडलेला घराचा 
हळूहळू प्रकाशमान व्हायला लागला'
हा कवीचा अनुभव आहे. असे वळण घेत ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. 
कुठल्याही विद्यापीठात न गेलेली कवीची आई कवीला सोप्या सोप्या गोष्टींतून जगणं सोपं करून सांगत असते. आईने साध्यासुध्या गोष्टींतून कवीच्या मनावर कृतज्ञता हे मूल्य जाणीवपूर्वक बिंबवले आहे. त्यामुळे कवी कृतज्ञता हे जीवनमूल्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो. 

वठलेल्या झाडालाही पालवी फुटते. आंतरिक धडपडीतून नदीला तिचा स्वतंत्र मार्ग सापडतो. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षी आपले घरटे घडवतात. धरतीची व्याकूळता पाहून आभाळालाही पान्हा फुटतो. हे सगळे दाखले देऊन आई म्हणते
'आपल्यालाही असंच 
झाडासारखं रुजून येता आलं, 
नदीसारखं पुढे जाता आलं, 
आभाळासारखं विशाल होता आलं
अन् पाखरासारखं 
चिवटपणे जगण्याला तोंड देता आलं की
जगणंही आपल्याकडं हरखून पाहतं
अशा वेळी अंगावर धावणाऱ्या अंधारालाही
निक्षून परतवून लावता येतं' 
अशा प्रकारे जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी आणि प्रकाशाची वाट दाखविणारी श्रममूर्ती आई हे कवीच्या आयुष्यातील प्रकाशाचे बेट आहे. ह्या कवितेतली मातृप्रतिमा ही अतिशय उच्च कोटीतली आहे. 

हल्ली माणसा-माणसांतला संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत कवीची अशिक्षित आई कवीला म्हणते
'जगाशी बोलायला धावताना 
आधी स्वतःशी बोल, थोडा वेळ काढून 
आतला आवाज ऐक, अधीर होऊन. 
मग संवाद फुलून येईल आपसूक फुलासारखा'. 
इतका छान, आत्मसंवाद साधण्याचा सल्ला देणा-या आईला अशिक्षित कसे म्हणता येईल? 
जेव्हा कवी आपला पहिला पगार आईच्या हाती सोपवतो, तेव्हा हीच आई म्हणते, 
'कष्टाला अहंपणा चिकटू देऊ नकोस 
यश तेव्हाच शोभून दिसेल'. 
अहंपणाचा आणि कर्मफळाचा त्याग करायला शिकवणारी आई स्थितप्रज्ञ खरी! 
लेकरांची झोपमोड होऊ नये, त्यांची पहाटस्वप्नं कोमेजू नयेत, म्हणून घरात हळुवार काम करणारी आई दिवसरात्र कुटुंबासाठी राबत असते. म्हणून कवीला आपल्या आईची सावली डेरेदार झाडासारखी वाटते. एकनाथ आव्हाड यांची कविता सोप्या शब्दांत जगण्याचे मर्म सांगून जाते. 

ही आई एकदा म्हणते, 
'आयुष्याची वाट तुडवताना 
माणसानं जर वाटेत सौख्याच्या बिया पेरल्या ना
तर जगण्याचं समाधान लाभतं त्याला'. 
इतरांच्या वाटेवर सौख्याच्या बिया पेरण्याची शिकवण देणारी आई आभाळासारखी थोर असणार यात शंकाच नाही. आईच्या शिकवणीची उजळणी करताना कवीने लिहिले आहे :
'माझ्या प्रकृतीत तिची संस्कृती रुजवून
माझ्या बेढब मनाला ती आकार देत असते'. 
ह्या श्रमवंत आईची कथाच निराळी आहे. ती कष्टाचं रान तुडवत आशेची फुलं वेचायची. अंगात हत्तीचं बळ घेऊन पडेल त्या कामाला जुंपून घ्यायची. तिने चांदणं बरसणारा चंद्र दूर लोटून प्रकृतीला साद घालणारा सूर्य जाणीवपूर्वक पदरात बांधून घेतला होता. एकनाथ आव्हाड यांची कविता त्यांच्या स्वभावासारखीच शांत आणि संयत आहे. ती कधीही आक्रमक आणि आक्रस्ताळी होत नाही, तर वाचकमनाशी सहजसंवादी अशी ही कविता आहे. 

आई ही आपला पहिला गुरू असते, म्हणून कवीला आपल्या आईची शिकवण ही शिकवणीसारखी वाटत नाही, तर ते तिच्या अनुभवाचं संचित आहे, असे कवीला वाटते. ह्या अनुभवसंपन्न आईच्या मुखातून जीवनाचं तत्त्वज्ञानच झिरपते आहे. अशा १३ कवितांमधून कवीने आपल्या आईच्या आयुष्याची परवड, तिचे दु:ख, तिचे थोरपण, तिचे समर्पण, तिचा त्याग, तिची हिंमत आणि तिची जीवनाभिमुख शिकवण सांगितली आहे. ह्या कविता वाचत असताना कवी महन्मंगल मातृस्तोत्र गुणगुणतो आहे, असेच वाटत राहते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. कविसंमेलनांतून टाळ्या मिळवणारी ही कविता नाही, तर अतिशय चिंतनशील अशी ही कविता आहे. 

आईच्या शिकवणीतून जसे जगण्याचे तत्त्वज्ञान प्रगटले आहे, तसेच अन्य काही कवितांमधूनही ते वाचकांपर्यंत पोहोचले आहे. हल्ली 'समजूतदारपणाची गैरहजेरी' वाढली आहे. माणूस दिवसेंदिवस असमंजस आणि हिंस्र बनत चालला आहे. अशा परिस्थितीत कवीने लिहिले आहे :
'भांडणाचे रूपांतर मग वैरात
दुर्विचारांची विषवल्ली
फोफावते आयुष्यात
आणि मग
मनाचे कवाड
कुलूपबंद होऊन जाते
खरंच...
समजूतदारपणाची गैरहजेरी लागली की
सगळंच कसं भयंकर होऊन जातं'.
आणि हे भयंकर परिणाम टाळायचे असतील, तर समजूतदारपणाला पर्याय नाही, हेच कवीने यातून सूचित केले आहे.

मानवी जीवनात दु:ख सर्वव्यापी आहे, हे खरेच
पण दु:खालाही आपलंसं केलं,
दु:खातच सुख शोधलं, की
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं,
आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू.
तेव्हा सोपं होऊन जातं जगणं
आपण आपल्या लोभापायी, हट्टापायी
ते उगीचच अवघड करून टाकतो'.
ह्या कवितेत कवीने जणू जगणं सोपं करण्याचाच मूलमंत्र दिला आहे. ही कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मुक्तीचे मार्गही सुचविते. कवीची ही सकारात्मक जीवनदृष्टी मला फार महत्त्वाची वाटते. 

मानवी हव्यासाने हल्ली परमावधी गाठली आहे. सतत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे, फसव्या सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावाधाव केल्यामुळे अंतःकरणातील अंधार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कवी म्हणतो :
'हे दुष्टचक्र भेदण्यासाठी
आता एकच पर्याय उरलाय
प्रत्येकाने दीप व्हावे
आपल्या मनात उजेड भरून घ्यावा
अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविण्यासाठी'.
ही कविता म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या 'अत्त दीप भव' ह्या संदेशाचा विस्तार आहे, असे मला वाटते. ही कविता मनाच्या संकुचितपणाला हादरे देते आणि सद्विचारांना सामावून घेण्यासाठी मनाचा पैस निर्माण करते. 

माणूस निसर्गापासून दुरावत गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून कवीने त्यावर एक उपाय सुचवला आहे :
'माणसं झाडासारखी वागल्याशिवाय
खरं नाही त्यांचं काही आता
आणि पाखरंही तेव्हाच परत येतील
जेव्हा माणसात एक झाड उगवून येईल'.
माणसात झाड उगवून येण्याची कल्पना काव्यमय वाटत असली, तरी ती काळाची गरज आहे, यात काही शंकाच नाही.
कधीकधी 
'बाहू पसरून झाडे
घेती कवेत आभाळ
आभाळाच्या गळ्यात
सावळ्या मेघांची माळ'
अशा तरल शब्दांत ही कविता निसर्गचित्र रेखाटते.

घर म्हणजे केवळ दगड-विटांनी बांधलेला चार भिंतींचा आडोसा नसतो, तर ऊब, शांतता आणि मोकळा श्वास असतो. घर म्हणजे उत्साह, चैतन्य आणि ओढ असते. घर म्हणजे अस्तित्व, स्वभाव आणि त्याला सहवासाची जोड असते. घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग असते. घर म्हणजे आतुरता, आठवणी आणि थोडीशी तगमग असते. घर म्हणजे विश्वास, जिव्हाळा आणि निवांतपणाची जागा असते. घर म्हणजे ऋणानुबंधाचा हळवा, सचेतन धागा असते. घर म्हणजे थकलेल्या जीवांना आपुलकीचा आधार असते. घर म्हणजे आपल्या माणसांसाठी मनाचे सदैव उघडे द्वार असते. एकनाथ आव्हाड यांची ही कविता घराविषयीच्या सगळ्या हळव्या भावना उजागर करते आणि घराला घरपण बहाल करते. ह्या संपूर्ण कवितेत कवीच्या संवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. 

एकनाथ आव्हाड यांची कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर आहे. शिक्षकी पेशा हा केवळ कवीच्या उपजीविकेचे साधन नाही, तर तो कवीच्या पेशींचा अविभाज्य भाग बनला आहे. कवीचा श्वास बनला आहे. म्हणून त्यांच्या शाळा आणि शिक्षणविषयक कविता अतिशय प्रत्ययकारी उतरल्या आहेत.
'आता खूप वर्षांनंतर, 
ती शाळा पाहतो मी येता जाता
तेव्हा बाई तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं'.
शाळेचं देऊळ होऊन जातं, ही केवळ कविकल्पना नाही तर कवीच्या श्रद्धेचा भाग आहे. 'सविता पटेकर.... सतत गैरहजर' हे कथाकाव्यही त्या श्रद्धेतूनच उत्कट उतरले आहे. शाळेच्या चिरेबंदी वातावरणात बालकांचा जीव गुदमरतो, याचे सजीव चित्र 'स्वागतशील' ह्या कवितेत उमटले आहे.

एकनाथ आव्हाड यांची कविता ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या कवितेला प्रतिमा- प्रतीकांचा अजिबात सोस नाही. अलंकारांच्या मोहात न पडणारी ही अनलंकृत कविता आहे. भावगर्भता हाच ह्या कवितेचा अनमोल अलंकार आहे. ह्या कवितेच्या साधेपणातही एक अम्लान सौंदर्य आहे. काही कवितांमधून कालिया, मिजासखोर कंस, शिशुपाल, जरासंध, नरकासुर, द्रौपदी यांसारखे पौराणिक संदर्भ येतात. इतकेच. ही कविता शेती आणि शेतकरी, मित्र आणि मैत्री, शब्दांचे सामर्थ्य, मौन पाळण्याचे महत्त्व, पंढरी आणि पांडुरंगाचे भक्त, पुस्तकांचे श्रेष्ठत्व या विषयांवर जीवीच्या जिव्हाळ्याने बोलते. काळोखाला धीर द्यायला एक पणतीसुद्धा पुरते, असा विश्वास ही कविता व्यक्त करते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही विचार देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कविता आहे. जगणं सोपं आणि सुंदर करणारी ही कविता म्हणूनच मला महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार ( कवितासंग्रह )
कवी : एकनाथ आव्हाड 
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : १०० ,  किंमत : १६० रुपये 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
( सुप्रसिद्ध साहित्यिक)
sureshsawant2011@yahoo.com