Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचं कार्य

शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे.... 
चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान RSS चे आजीवन कार्यकर्ते होते, ज्यांनी ओडिशामध्ये भाजपाचा पाया घातला!

ओडिशामध्ये भाजपाला उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता! 1998 मध्ये देवेंद्र प्रधान देवगड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री बनले!

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात ABVP मधून केली आणि 2004 मध्ये वडिलांनी आपली जागा मुलाला दिली आणि धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले!

प्रधान कुटुंबाने सलग दोन पिढ्या संघाच्या विचारधारेला या भागात पसरवून भाजपाला मजबूत केले आहे आणि ओडिशाच्या आदिवासी भागात धर्मांतर रोखण्यासाठी खूप काम केले आहे!

मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली! शिक्षणमंत्री झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांच्या पुनरावलोकनाचे काम सुरू केले!

परदेशी आक्रमणकर्त्यांना नायकांऐवजी खलनायक म्हणून दाखवले आणि भारतीय महापुरुषांना नायक म्हणून स्थापित केले, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत!
धर्मेंद्र प्रधान जी यांच्या कार्यकाळातील प्रमुख सुधारणा, कामगिरी आणि धोरणांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.

NEP 2020 संरचनात्मक सुधारणा  
नवीन रचना: 3 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी "10+2" रचना बदलून "5+3+3+4" प्रणाली लागू केली.

प्राथमिक शिक्षण: पायाभूत शिक्षण (वय 3-8 वर्षे) आणि व्यावहारिक अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला.

पीएम श्री शाळा: 13,000 पेक्षा जास्त शाळांना स्मार्ट क्लासरूम, ICT आणि विज्ञान प्रयोगशाळांनी अपग्रेड केले.

एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट: विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्रीसह शिक्षण मधेच सोडून पुन्हा सुरू करण्याची सुविधा दिली!

आंतरराष्ट्रीयीकरण आणि तांत्रिक शिक्षण  
जागतिक कॅम्पस: परदेशी विद्यापीठांना (जसे डीकिन, वोलोंगोंग) भारतात प्रवेश दिला आणि IIT चे परदेशात विस्तार केला.

भाषिक प्रवेश: B.Tech ची पाठ्यपुस्तके आणि तांत्रिक अभ्यासक्रम 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले.

प्रवेश परीक्षा: NEET, JEE आणि CUET 12 भाषांमध्ये तर CTET 19 भाषांमध्ये घेण्यास सुरुवात केली.

भाषा आणि पायाभूत साक्षरता उपक्रम  
निपुण भारत: इयत्ता 3 च्या अखेरीस सर्व मुलांसाठी सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष्य ठेवले.

भारतीय भाषा उत्सव: दरवर्षी 4 ते 11 डिसेंबर दरम्यान होणारा भाषा उत्सव सुरू केला.

समर कॅम्प: एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकण्यासाठी 4.7 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडले.

संस्थात्मक पाठबळ: UGC, CBSE आणि NCERT स्तरावर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली.

अभ्यासक्रम आणि उत्तरदायित्व सुधारणा  
अभ्यासक्रमात बदल: आणीबाणी आणि सर्जिकल स्ट्राइकवर धडे समाविष्ट केले; प्रादेशिक राजघराण्यांना प्राधान्य दिले.

सामग्री हटवणे: स्थानिक आणि राष्ट्रीय नायकांना प्राधान्य देण्यासाठी मुघल इतिहासाची सामग्री कमी केली.

झिरो टॉलरन्स: पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचे धोरण स्वीकारले.

संस्थात्मक सुधारणा: वैयक्तिक घटनांऐवजी शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि मोठ्या सुधारणांवर लक्ष केंद्रित केले.

NEET चा पेपर लीक झाला तेव्हा 13 गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकले, आणि 1 महिन्यातच पूर्ण ताकदीने NEET ची परीक्षा पुन्हा घेतली आणि ती यशस्वी झाली.

स्वातंत्र्यानंतरपासूनच शिक्षण विभाग मौलानांऐवजी, एखाद्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्यक्तीच्या हात द्यायला हवा होता, तर आपला इतिहास काही वेगळा असता.
पण आज दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला आहे..

मित्रांनो आपले वैचारिक मतभेद काहीही असुद्या...पण आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक अमूल्य हिरा गमावलेला आहे.

जय हिंद!🇮🇳
जय श्री राम!🚩

-Mahesh Kawale

Wednesday, July 22, 2026

कवी गोविंद

गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद 
(जन्म: ९ फेब्रुवारी, १८७४ – मृत्यू :२८ फेब्रुवारी,१९२६)
मराठी काव्यविश्वात असे काही कवी होऊन गेले, ज्यांच्या लेखणीने केवळ रसिकांची मने जिंकली नाहीत, तर समाजात जागृतीही निर्माण केली. अशाच एका ओजस्वी कवीचे नाव म्हणजे गोविंद त्र्यंबक दरेकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र "कवी गोविंद" या नावाने ओळखतो. त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्यलढा धगधगीत ठेवण्याचे काम केले. 
९ फेब्रुवारी १८७४ रोजी नाशिक येथे जन्मलेल्या कवी गोविंद यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. कवि गोविंद अवघे चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील निधन पावले. या दुःखातून सावरत असतानाच त्यांना तीव्र ताप आला आणि त्या आजाराने त्यांचे दोन्ही पाय कायमचे लुळे झाले.
शारीरिक हालअपेष्टा आणि शिक्षणाच्या संधी न मिळाल्यामुळे अनेक अडचणी आल्या, पण त्यांच्या मनातील काव्यशक्ती अडथळे ओलांडून पुढे जात राहिली.
कवी गोविंद यांनी आपल्या लेखनाची सुरुवात लावण्यांनी केली होती. साध्या, सोप्या पण भावनिक ओढ निर्माण करणाऱ्या त्यांच्या लावण्यांना रसिकांनी दाद दिली. पण त्यांना खरी दिशा मिळाली ती १९०० मध्ये, स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांच्याशी झालेल्या परिचयाने.
सावरकरांनी स्थापन केलेल्या 'मित्र मेळा' या तरुण क्रांतिकारक संघटनेशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि त्यांच्या लेखणीचा नवा प्रवास सुरू झाला. आता त्यांचे शब्द केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते देशभक्तीचा अंगार बनले. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' यांसारख्या कवितांनी क्रांतीची ज्योत तेवत ठेवली.
गोविंद यांच्या कविता फक्त शब्द नव्हते, तर त्या क्रांतीची हाक होती. शिवाजी, तानाजी आणि रामदास यांसारख्या पराक्रमी व्यक्तींवर आधारित त्यांच्या रचनांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची आग पेटवली. 'स्वातंत्र्याचा पालना', 'स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव', 'भारतप्रशस्ती' यांसारख्या त्यांच्या रचनांनी तर देशप्रेमाच्या भावना अधिक तीव्र केल्या.
त्यांच्या कविता इतक्या प्रभावी होत्या की ब्रिटिश सरकारने त्यांचे साहित्य  धोकादायक साहित्य म्हणून जप्त केले. मात्र, त्या नष्ट होऊ शकल्या नाहीत. सावरकर कुटुंबातील महिलांनी या कविता वाचून तरुण क्रांतिकारकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
कवी गोविंद काही काळ सावरकर बंधूंसोबत राहिले आणि 'मित्र मेळा' संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभागी झाले. पुढे हीच संस्था 'अभिनव भारत' म्हणून ओळखली जाऊ लागली, आणि गोविंद या संघटनेतील महत्त्वाचे सदस्य झाले. त्यांच्या कविता आणि विचारांनी अनेक तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले.
२८ फेब्रुवारी १९२६ रोजी कवी गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांची कविता आजही जिवंत आहेत. १९३० मध्ये ‘गोविंदांच्या कविता’ या नावाने त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला.
कवी गोविंद यांचे जीवन म्हणजे कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कसा टिकवायचा याचा आदर्श आहे. त्यांचे शब्द आजही देशभक्ती जागवतात, प्रेरणा देतात आणि आपल्याला स्मरण करून देतात की स्वातंत्र्य ही एक सतत जपण्याची आणि संघर्ष करून टिकवण्याची मूल्यवान गोष्ट आहे.
त्यांची कविता म्हणजे शब्दांनी पेटलेली क्रांती, जी आजही स्वातंत्र्याच्या गाथेत तेजाने झळकत आहे!
कवी गोविंद यांना पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार 
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #गोविंदत्र्यंबकदरेकर #स्वातंत्र्यशाहीरगोविंद #kavigovind

Monday, July 20, 2026

news

The Maharashtra Food and Drug Administration (FDA) has launched an AI-powered citizen complaint portal to make reporting food adulteration, fake medicines and substandard pharmaceutical products faster and easier. Announcing the initiative, FDA Commissioner Tukaram Mundhe said citizens can file complaints by speaking in Marathi, Hindi or English, and the AI system will automatically convert them into structured written complaints before forwarding them to the concerned officer. The portal also offers complaint tracking, real-time updates and an auto-escalation system to ensure timely action and greater transparency.

FDA Helpline: 1800 222 365

#PuneTimesMirror #TukaramMundhe #FDA #AI #FoodSafety


Sunday, July 19, 2026

मराठी शिक्षक आणि मुलांमधला अनुभव

मी बरीच वर्षे ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे क्लास घेत होते, दोन वर्षांपूर्वी काही वैयक्तिक अडचणींमुळे मी ते क्लास घेणे बंद केले. त्यावेळी मला काही पालकांचे फोनही आले होते "मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा मराठीचा क्लास सुरू करा." पण कधी कधी इतर कुणी तरी निर्माण करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं नको वाटतं. त्यामुळे मी 2020 नंतर ICSE बोर्डचे ऍडमिशन घेणे बंद केले. त्यादरम्यानच 2019 च्या  मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात अरव नावाच्या एका विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी अरव नववीत गेला होता. 

तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी त्याची फिस परत करून अरवची ऍडमिशन कॅन्सल करू शकत नव्हते. त्यामुळे नववी आणि दहावी हे दोन्ही वर्ष मी अरवला (एकट्याला) ऑनलाइन क्लास घेऊन शिकवले.

आज अरवचा दहावीचा रिझल्ट लागलाय. त्याच्या आईचा धन्यवाद म्हणून मेसेज आलाय! अरवने फोन करून सांगितलं, "मॅडम मला सगळ्यात जास्त गुण मराठी विषयात मिळाले आहेत" ऐकून फार बरं वाटलं.  इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी कायमच खूप अवघड वाटते त्यामुळे त्याला शुभेच्छा देतांना मी हसत हसत म्हणाले "आता इथून पुढच्या आयुष्यात तुझा कधीच मराठीशी संबंध येणार नाही, सुटलास तू!" त्यावेळी अरव आनंदाने उत्तरला "मॅडम घरात तर मराठीच बोलणार ना आणि मला ज्या विषयात सर्वाधिक  गुण मिळालेत ती भाषा मी सोडणार कशी! उलट मी पुढच्या पिढीला देखील ती भाषा शिकवेल" पंधरा वर्षाच्या अरवचे हे शब्द ऐकून क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. जुने दिवस आठवले. त्या मुलांचा गोंगाट, लेखनसराव करतांना शॉर्टकट्स मारून लिहिलेली त्यांची उत्तरं, त्यांचा पिज्जा पार्टीचा हट्ट, मी रागवले म्हणून कधीतरी त्यांनी मला लिहिलेली माफीची पत्रं... असं बरंच काही आठवत राहिलं. 

आज अरवच्या निमित्ताने ते सारं काही ऑफिशियली संपलं. यापुढे त्या जागेवर ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच मला मराठी शिकवता येणार नाही..! याची एक बोचरी जाणीवही झाली. खरंतर माणूस काही जागा नाईलाजाने सोडतो पण ती जागा सोडताना का होईना आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला...याचा आनंद खूप जास्त असतो. अर्थात याचं श्रेय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी माझ्यातील शिक्षक अधिकाधिक प्रगल्भ बनवला!

अभिनंदन अरव 🌹🌹🌹 
खूप खूप मोठा हो बाळा

@ ज्योती भारती

नाती तुटताना...

"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.

खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता. 

एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.

शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.

©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati

Friday, July 17, 2026

Tuesday, July 14, 2026

पन्नाशीच्या उंबरठयावर

अल्लडपणा पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो तेव्हा समजतं आपण पन्नाशीला आलो!! तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे ' पन्नाशी पार करताना.." हे वय म्हणजे अनेक अनुभवांची शिदोरी तुमच्या गाठीशी असते. व.पु. म्हणतात तसं, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.." हे देखील समजलेले असते. पुरुष असो किंवा स्त्री, नोकरीची जेमतेम आठ ते दहा वर्ष फक्त राहिलेली असतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षा पासून नोकरीला लागलेला तो जेव्हा पन्नाशीत स्थिरावतो तेव्हा तो अख्खा प्रवास किती कठीण होता, त्या वेळी किती स्थित्यंतरे अनुभवावी लागली हे त्याने जवळून पाहिलेलं असतं. स्त्रियांना देखील कष्ट चुकलेले नाही. नववधू म्हणून पाऊल टाकणारी ती खरं तर तितकी परिपक्व नसते. पण, व.पु. म्हणतात तसं, संसाराचा धूर डोळ्यात जाऊन तिला संसारातली मजा कळते. हे वय तसं म्हटलं तर कष्ट करण्याचं नाही. जरी पन्नाशी असली तरी, तरुण वयात जी धावपळ तुम्ही करता ती पन्नाशीत नाही करता येत. एक उदाहरण देते, समजा सकाळी ७.५० ची ट्रेन तुमच्या डोळ्यासमोर जात असेल तर तुम्ही ती धावत जाऊन पकडू शकता, कारण त्या वयात रक्त हे सळसळते असते,हेच पन्नाशीत आल्यावर काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी सतावतात..
 सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माणूस ओळखायला शिकलेले असता. स्त्रियांना तर एक गोष्ट चांगलीच माहित असते ती म्हणजे, नाती जपणं हे त्यांनी आत्मसात केलेलं असतं. व.पु. जसं म्हणतात, " कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते.." हे त्यांनी जाणलेले असते. हिच शिकवण त्या आपल्या मुलीला देतात. अहो आयुष्याची पन्नास वर्षे काढणं म्हणजे सोपं आहे का?? जे केस पांढरे होतात ते असेच होत नाही ना. त्या मागे अनेक उपेक्षेचे हुंदके असतात, नाईलाजास्तव कराव्या लागणाऱ्या तडजोडी असतात. न सांगता येणाऱ्या व्यथा असतात. मुला मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं याचा देखील विचार करावा लागतो. काही प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. शरीराला काहीसं जडत्व येतं. आपण सर्व मध्यमवर्गीय माणसं आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी, सुख शोधणारी. या वयात सुखद धक्के आनंद देतात पण वेदनांचा हुंकार नेहमीच मांडता येत नाही. हे वय म्हणजे मुला मुलींचे मित्र मैत्रिण व्हायचे वय असते. नव्याने संसार सुरू करणाऱ्या मुलीला तिची आई हीच एक चालती बोलती मैत्रीण असते. कारण, आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. सगळ्यात महत्वाचं इथे लिहायचं म्हणजे, या वयात एकमेकांचा सहवास हा फार महत्वाचा असतो. ' प्रथम तुज पाहता जीव वेडावला.' हे तरुणपणी म्हणून झालेलं असतं परंतु, आता ' तु अशी जवळी रहा..' हे म्हणावं लागतं. कारण, एकदा का मुलं मुलींची लग्न झाली की तेच दोघं एकमेकांसाठी असतात. आयुष्याची पुढची वर्ष ही जपणूकीसाठी असतात. कधीतरी त्याने चहा करणं, कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं. ती देखील तारुण्यात म्हणतेच की, ' बनात ये ना जवळ घे ना..' पण जशी तिची पन्नाशी उलटते तेव्हा ती देखील म्हणते,' घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे..' 
 हे वय म्हणजे आरामाची खऱ्या अर्थाने गरज असणारे वय. कुठेतरी थकलेल्या जीवाला विसाव्याची गरज असतेच ना!! पन्नास वर्षे जेव्हा तुम्ही आयुष्य जगता म्हणजे ते निव्वळ जगणे नसते तर कितीतरी वेळा स्वतःचं मन मारुन समोरच्याचं मन दत्तक घ्यावं लागतं. पुरुषांना देखील हे चुकलेलं नसतं. स्वतःच्या लग्नात आनंदात असणारी ती दोघं मुलीच्या लग्नात मात्र सनईचे सुर ऐकून हळवे होतात. खरंच, ही पन्नाशी म्हणजे आयुष्यातलं एक सोनेरी पान,तसंच अनेक आठवणींचे आणि अनुभवांचे नजराणे देतं हे मात्र खरे.. कारण, नेत्र हे पैलतीरावर पोहोचण्या आधी आयुष्याचा महोत्सव साजरा जर केला नाही तर काय उपयोग..
                                   .. मानसी देशपांडे 
                                                  विरार.

बुद्धीचा महिमा

बुद्धीचा महिमा 

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय ? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.

वेद किती आहेत ? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही , एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.

जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.

काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.

भारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेश्वराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.

नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत, संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असे एकही तत्त्व निःशंकपणे अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.

असे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. "बुद्धेःफलमनाग्रहः"- कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला "यथेच्छसि तथा कुरु" असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. "अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे" असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. "मनः पूतं समाचरेत्" या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तमुक तत्त्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.

-साने गुरुजी 
( भारतीय संस्कृती )



Friday, July 10, 2026

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र,

प्रिय सुधा...

त्या दिवशी थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणंजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपटप आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात नाही? मी खिडकीतू बाहीर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावर फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावंसाळा अजुन नाही सुरु झाला. होइल लवकरच. ढग दोन आले होते,रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळ्या आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणंजे विश्वंभराचे मुक भाव गीत आहे.! खिडकीतून मध्य रात्री माझ्या सारख्या कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गमतीच्या वाटतात.आज दादा नाहीत,वैनी नाहीत,परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच नाही? 

जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर,आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या रात्री आपल्या सभोवती आहेत. सांयकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटे व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वभंराचे भालदार चोपदार! अनंत रंगाची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चालु असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येउ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो!

रवीद्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्युचे स्मरण करुन द्यावयाच्या. जणू रोज सांयकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे,जगाचे थोडक्यात रुपात्मक नाटक बघत असतो...

सुधा,मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे परंतू आता हे शेवटचे साप्ताहीक पत्र. आता मी तुला केंव्हा तरी अधून मधून लिहीन. परंतु आता बंधन नको....!

तुझाच
आण्णा {सानेगुरुजी}
10 जून 1950

Sunday, July 5, 2026

लग्न व्यवस्था

लग्न आंधळं नसावं

आज लग्न जुळवताना बहुसंख्य लोकांची नजर सर्वप्रथम कशावर जाते?

घर किती पॉश आहे... 
दारात किती गाड्या उभ्या आहेत... 
बँक बॅलन्स किती आहे... 
वडिलांचा व्यवसाय किती मोठा आहे... 
लग्नात किती थाटमाट होणार आहे...

दुर्दैवाने अनेकांची मानसिकता अजूनही या तामझाम आणि श्रीमंतीला भाळते.

फार कमी लोक विचारतात...
हे वैभव प्रामाणिक मार्गाने उभं राहिलं आहे का? 
या घरात माणुसकी, संस्कार आणि विश्वास आहे का? 
मुलगा किंवा मुलगी रागावर नियंत्रण ठेवतात का? 
व्यसनं आहेत का? 
स्वभाव समंजस आहे का? 
मतभेद झाले तर संवाद साधतील की नातंच संपवतील?

कारण बाहेरून चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. 
संगमरवरी भिंती असल्या म्हणून घर सुखी असतंच असं नाही आणि साध्या घरातही आयुष्यभर पुरेल इतकी माणुसकी दडलेली असू शकते.

आज ज्या घटना समाजाला हादरवतात, त्या आपल्याला एकच धडा देतात—

लग्न करताना बँक बॅलन्स नव्हे, मनाचा बॅलन्स तपासा.
गाडीची किंमत नव्हे, माणसाची किंमत ओळखा.
बंगल्याचा आकार नव्हे, विचारांची उंची पाहा.

कारण संसार पैशाने उभा राहू शकतो... 
पण तो टिकतो फक्त स्वभाव, चारित्र्य, विश्वास आणि परस्पर आदरामुळे.

- अशोक मानकर


बरोबर पण आज काल भौतिक गोष्टीचा जास्त विचार केला जातो काहींना वाटत असावे त्यात सुख .. पण स्वभाव मन जुळली नसतील तर संसार टिकणे कठिणच !

Saturday, July 4, 2026

मृदुंग मसाला भजी..

मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे. 
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो. 
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली. 
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली. 
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले. 
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी. 
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा. 
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल. 

सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020

Sunday, June 28, 2026

आयुष्य सुंदर आहे


तुमच्यासाठी एक छोटी मराठी लघुकथा:

आयुष्य सुंदर आहे

एका गावात एक वृद्ध माणूस रोज सकाळी बागेत फिरायला जायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. एक तरुण त्याला रोज पाहायचा आणि एके दिवशी विचारलं,

"आजोबा, तुमच्या आयुष्यात कधी दुःख आलं नाही का?"

आजोबा हसले आणि म्हणाले, "दुःख तर खूप आलं. काही माणसं सोडून गेली, काही स्वप्नं अपुरी राहिली, काही संधी हातातून निसटल्या. पण मी प्रत्येक सकाळी एक निर्णय घेतला—आज जे आहे त्यात आनंद शोधायचा."

ते झाडाकडे बोट दाखवत म्हणाले, "हे झाड पाहिलंस? प्रत्येक शरद ऋतूत त्याची सगळी पानं गळून पडतात. पण ते कधी रडत नाही. कारण त्याला माहिती असतं की पुन्हा वसंत येणार आहे."

त्या दिवशी तरुणाला एक मोठा धडा मिळाला.

बोध: आयुष्य परिपूर्ण नसतं, पण योग्य दृष्टीकोन असेल तर ते नक्कीच सुंदर असतं. 🌿

Friday, June 26, 2026

Wednesday, June 24, 2026

Monday, June 22, 2026

वाचकांची प्रतिक्रिया

लोकप्रिय लेखक , कवी आणि तरूणाईचा लाडका चारोळीकार चन्द्रशेखर गोखले यांच्या " मनोवेधस " या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ८/१/२०२२ रोजी प्रकाशित झाली.शेखरची पत्नी सौ. उमा गोखले प्रकाशक असलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने .....१८ एप्रिल १९९० या दिवशी पारल्यातील दिक्षीत रोड वरील अनिरुध्द सोसायटीच्या गच्चीवर आमच्या शेखरच्या " मी माझा" या पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले..ज्येष्ठ लेखक , नाटककार आणि पत्रकार श्री. विजय तेंडुलकर यांच्या हस्ते..शेखरची 'नीलाताई ' या नात्याने त्या प्रकाशन सोहळ्यात माझा ही सहभाग होता. अल्पावधितच ' मी माझा ' ला प्रचंड यश आणि प्रसिध्दी मिळाली...शेखर तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला.
शेखर प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मी त्याच्या अंगी असलेले विविध गुण पारखत होते.माझ्याकडे तो काही विषय शिकण्यासाठी येत होता. परंतु शाळेतल्या अभ्सासापलिकडचा शेखर सतत माझं लक्ष वेधून घेत होता.
चित्रकार शेखर , लीलया नृत्याविष्कार करणारा शेखर आणि सतत काहीतरी वेगळा विचार करणारा....गोष्टी लिहिणारा शेखर...दबलेला...घाबरलेला शेखर...कारण त्या बालवयात ज्या गुणांसाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप त्याच्या घरातून मिळायला हवी होती ती नाही मिळाली ..त्या ऐवजी " धपाटे"च खावे लागले. ५० वर्षांपूर्वीचा काळ आणि मध्यमवर्गीय व्यवहारी विचारसरणी लक्षात घेता ती पालकांची चूक होती असेही म्हणता येणार नाही कारण ' याने तुझं पोट भरणार आहे का ? ' हा त्यांचा प्रश्ण परिस्थितीजन्य होता शिवाय ' बाल मानसशास्त्र आणि पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास ' हे विषय तर त्याकाळी कोसौ मैल दूर होते.....असो !!
   चार दिवसांपूर्वीच शेखरने मला त्याचे नुकतेच प्रकाशित झालेले " मनोवेधस " पाठवले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या....उगमापाशी नदीची बारीकशी धार असते
             प्रवाह पुढे पुढे जायला लागतो
   नदी अथांग सागराशी एकरूप होते
   तिचा प्रवास थांबतो....प्रवाह नाही...
जशी " मनोवेधस "ची सप्तरंगी कथा....मला खूप भावली ! तुम्हाला ही भावेल ! जरूर वाचा !!!!!
शेखर , उमा तुम्हा दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद !!   तुमची
                नीलाताई ( नीला रवीन्द्र )
                 १५/२/२०२६

Saturday, June 6, 2026

द लॉस्ट बॅलन्स कादंबरी



** दखल ** 
द लॉस्ट बॅलन्स..कादंबरी (अनघा प्रकाशन) 
1. ललित : रुक्ष विषयाला संवेदनशीलतेची जोड देणारी महत्वाची कादंबरी.
2. महाराष्ट्र टाइम्स : तोल ढळलेल्या माणसांची गोष्ट.
3. साप्ताहिक सकाळ :सुन्न अनुभव देणारी कादंबरी.
4. सामना :अर्थकारणाचा संमिश्र आलेख.
5. सकाळ अवतरण :एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन.
6. लोकमत : बँक विश्वातील कोलाहलाचा पंचनामा.
7. ठाणे वार्ता :समकालीन विषयाचा भयाण पट 
8. ठाणे वैभव :दुभंगलेल्या जाणिवांचा विस्तृत पट. 
9. महाराष्ट्र दिनमान : कथा एका आर्थिक घुसमटीची. 
10. समरसता साहित्य पत्रिका :झिरो बॅलन्सची शोकांतिका.
11. दखनी स्वराज्य :आर्थिक गर्तेत सापडलेल्या माणसांची कथा.
12. वृत्तप्रकाश : डेबिट पडलेल्या माणसांची कथा.
समस्त संपादकांचे, समीक्षकांचे मनापासून आभार. कादंबरी सवलतीत मिळवण्यासाठी फक्त फोन करा. 9869014319. धन्यवाद.


Thursday, June 4, 2026

मराठी emagazine नियतकालिक

साहित्यिक आणि कलावंत यांच्यासाठी -कला-आणि साहित्यास वाहिलेले "नियतकालिक अक्षर मराठी online"

-----------------------------------------

मराठी साहित्याचा प्रसार व्हावा आणि साहित्यिक ,कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ' ईअक्षरमन ' द्वारे नियतकालिक स्वरूपात ई-बुक प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तरी ज्या साहित्यिक आणि कलावंत यांना उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले साहित्य (प्रकाशित असेल तर काव्यसंग्रह किंवा कथासंग्रहाच नाव , अप्रकाशित असेल तर ब्लॉग लिंक or fb post लिंक ) पुढील पत्यावर ई-मेल द्वारे पाठवायचे आहे.

Email id : eaksharman@gmail.com

टीप : आपल्या साहित्यासोबत वाचकांना संपर्क साधण्यासाठी gmail id देणं जरुरी आहे .

विषय :

संपादकीय लेखन

शब्दोत्सव (एक कवी एक कविता )

काव्यतरंग (एक लेखक एक लेख )

ओळख साहित्यिकांची

कलादर्शन (Photography,Calligraphy,चित्रकला इत्यादी )

बोलीभाषा प्रशिक्षण उपक्रम

समाजकारण (राजकीय आर्थिक देश आणि राज्यातील घडामोडी )

देश-विदेश

पुस्तक परिचय : कथासंग्रह , काव्यसंग्रह (Hardcopy Books, Ebooks)

दिनविशेष

मैत्रीचा कट्टा (ओळखीच्या साहित्यिक मित्राचे साहित्या बद्दल लेख)

समाज प्रबोधन लेखन : सामाजिक उपक्रमाची माहिती

साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची माहिती (Event Updates)

मराठी संस्कृती (दशावतार ,कला , पोवाडा , गोंधळ , सण उत्सव इत्यादी )

लेखक-कवींच्या लेखन-प्रवास विषयक परिचय

महाराष्ट्र दर्शन : पुणे , कोल्हापूर , कोकण,अलिबाग , किल्ले इत्यादी ) लेख

---------------------------------------------

Blog @ https://eaksharman.blogspot.com




Tuesday, June 2, 2026

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातला चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर तो माणसांना जोडणारा एक धागा आहे.

पावसाळ्याची एखादी सकाळ. बाहेर नारळाच्या झाडांवर पावसाचे थेंब टपटपत असतात. अंगणात ओलसर मातीचा सुगंध दरवळत असतो. अशा वेळी आजीच्या हातचा उकळता चहा स्वयंपाकघरातून येतो. पितळेच्या भांड्यात उकळलेला, थोडी वेलची आणि भरपूर माया मिसळलेला.

गावात कोणाच्याही घरी गेलं की पहिला प्रश्न असायचा, "चहा घेणार ना?" त्या एका कपात आपुलकी, चौकशी, गप्पा आणि नात्यांचा गोडवा भरलेला असायचा. चहा पिताना शेजारच्या घरच्या बातम्या, समुद्राच्या लाटांच्या गोष्टी, आंब्याच्या बागेचे हिशेब आणि जुन्या आठवणी रंगत जायच्या.

संध्याकाळी समुद्रकिनारी बसून घेतलेला चहा तर अजूनच खास. समोर मावळणारा सूर्य, खाऱ्या वाऱ्याची झुळूक आणि हातात गरम चहाचा कप. त्या क्षणी आयुष्य खूप साधं आणि सुंदर वाटायचं.

आज शहरात अनेक प्रकारचे चहा मिळतात, पण कोकणातल्या त्या मातीच्या सुगंधासोबत, आजीच्या हाकेसोबत आणि पावसाच्या सरींसोबत मिळालेल्या चहाची चव अजूनही मनात ताजी आहे.

"कोकणातला चहा आणि त्याच्या आठवणी मनातून कधीच उतरत नाहीत." ☕🌴🌧️

@ eaksharman

Sunday, May 24, 2026

पुस्तक परिचय

आजच्या तरुण भारत, जळगाव आवृत्तीत समीक्षक, लेखक श्री किशोर कुलकर्णी यांनी माझ्या मर्दानी राणी लक्ष्मीबाई ( अनघा प्रकाशन, ठाणे ) या पुस्तकावर लिहिलेलं पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कुलकर्णी सरांचे मनापासून आभार. सोबत परीक्षण टेक्स्ट स्वरूपात खाली दिले आहे. 

*झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत* 
राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. अनघा प्रकाशन यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.
सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी ४० छोट्या पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.
झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले, नियतीने कठोर वळण घेतले; पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

 जळगाव जिल्ह्यातील पारोळा भुईकोट किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा संबंध अत्यंत ऐतिहासिक, भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
लक्ष्मीबाईंचे आणि आपल्या कान्हदेशाचे अत्यंत भावनीक नाते आहे. पारोळा हे गाव केवळ ऐतिहासिक किल्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर झाशीच्या राणीच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेही विशेष ओळखले जाते. पारोळा येथील किल्ला नेवाळकर घराण्याचा होता. झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे नातेवाईक असलेल्या नेवाळकरांनी हा किल्ला उभारला होता. स्थानिक इतिहासानुसार राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तांबे कुटुंबही पारोळा परिसराशी जोडले गेले होते. त्यामुळे पारोळ्याला “झाशीच्या राणीचे मूळ गाव” अशीही ओळख मिळाली. संबंधातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणींचे दत्तक पुत्र दामोदरराव (जन्मनाव आनंदराव) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ रोजी पारोळ्यात झाल्याची नोंद आढळते. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. पुढे हाच आनंदराव झाशीच्या गादीचा दत्तक वारस बनला. 
आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली, तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही; तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

पुस्तक परिचय - किशोर कुळकर्णी, जळगाव. मो. ९४२०६०७०५९


Thursday, May 21, 2026

गूढ कथा

पावसाळ्याची रात्र होती. कोकण मधल्या “भोरवाडी” गावावर काळे ढग दाटून आले होते. गावात वीज नव्हती. फक्त अधूनमधून चमकणारी वीज आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज.

गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता — “देशमुखांचा वाडा”. त्या वाड्याबद्दल गावात अनेक कथा सांगितल्या जायच्या. म्हणे, तिथे रात्री दिवा दिसतो… पण वाड्यात कोणी राहत नाही.

त्या गावात गणू नावाचा एक तरुण राहत होता. शहरातून शिक्षण करून तो नुकताच गावात परतला होता. गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर त्याचा विश्वास नव्हता.

एके रात्री चहाच्या टपरीवर चर्चा रंगली होती.

“गण्या, रात्री बारा नंतर त्या वाड्याकडं जाऊ नकोस,” म्हातारा तात्या कुजबुजला.

“का? भूत आहे का तिथं?” गणू हसत म्हणाला.

तात्याच्या डोळ्यांत अचानक भीती उतरली.

“भूत नाही रे… पण काहीतरी आहे.”

त्या रात्री गणूने ठरवलं — सत्य शोधायचंच.

हातात कंदील घेऊन तो वाड्याकडे निघाला. पाऊस रिमझिम कोसळत होता. वाड्याचं मोठं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. आत काळोख.

गणूने पाऊल टाकलं.

कर्कश्श आवाज करत दार मागून बंद झालं.

क्षणभर त्याचा श्वास अडकला.

वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता… टक… टक… टक…

गणूने कंदील वर केला.

भिंतीवर जुन्या चित्रांवर धूळ साचली होती. अचानक एका चित्रातील स्त्रीचे डोळे चमकले असे त्याला वाटले.

तो घाबरला. पण पुढे गेला.

वरच्या खोलीत मंद दिवा पेटलेला होता.

आत एक जुनी झुलती खुर्ची हळूहळू हालत होती…

पण तिथे कोणीच नव्हतं.

अचानक मागून आवाज आला —

“इतक्या वर्षांनी कोणी आलं…”

गणूने मागे वळून पाहिलं.

पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. चेहरा फिकट. डोळ्यांत विचित्र शांतता.

“तुम्ही… कोण?” गणूचा आवाज थरथरला.

ती हसली.

“मी या वाड्याची शेवटची मालकीण.”

गणू काही बोलणार इतक्यात वीज चमकली…

आणि त्या क्षणी त्याला दिसलं —

ती स्त्री जमिनीवर उभीच नव्हती.

ती हवेत तरंगत होती.

गणूच्या हातातून कंदील खाली पडला.

संपूर्ण खोली अंधारात बुडाली.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी…

गावकऱ्यांना गणू वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला.

तो जिवंत होता.

पण त्या दिवसानंतर त्याने कधीच “देशमुखांच्या वाड्या”बद्दल एक शब्दही काढला नाही.

फक्त कधी कधी रात्री तो झोपेत घाबरून ओरडायचा —

“ती अजून तिथंच आहे…”


@ eaksharman

मराठी भाषेत फलक हवेत

महाराष्ट्र राज्यात हिंदी तिसरी भाषा नको म्हणून विरोध करणारे. इंग्रजी च्या अश्या पाट्यांचा कधी विरोध करणार.

मराठी फलक असावेत की प्रत्येक ठिकाणी इंग्रजी कशाला हवी.

@ eaksharman

समिक्षा लेखन



ही कविता केवळ निसर्गचित्र रंगवत नाही, तर मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि आध्यात्मिक प्रवासाला शब्दरूप देते. Ramdas Khare यांच्या “प्रकाश पाझरत जावा” या कवितेत वैराग्य, वेदना, करुणा आणि अमूर्ततेकडे जाणारी अंतर्मनाची ओढ अत्यंत चित्रमय पद्धतीने व्यक्त झाली आहे.

कवितेच्या सुरुवातीलाच “वैराग्याचे पलिते” आणि “क्षितिजावर पेटलेले” या प्रतिमा मनाला गूढ शांततेच्या प्रदेशात घेऊन जातात. येथे क्षितिज हे केवळ निसर्गाचे दृश्य राहत नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचे, आत्मशोधाचे प्रतीक बनते. लाटांवर उमटणारे नभाचे रंग जीवनातील बदलत्या भावनांचे प्रतीक वाटतात.

“ही निःशब्द शांतता कॅनव्हासमधून पाझरणारी” ही ओळ विशेष प्रभावी आहे. कवीने येथे चित्रकलेचा संदर्भ वापरून भावविश्व उभे केले आहे. शांतता ही फक्त ऐकू येत नसलेली गोष्ट नाही, तर ती रंग, रेषा आणि वेदनांमधून वाहणारी अनुभूती आहे. “रेषांशी डोळे भिडवणारी” या प्रतिमेत कलाकाराच्या आत्मसंवादाची झलक दिसते.

कवितेच्या पुढील भागात करुणेचा गडद अंधारही भयावह न वाटता आश्रयदायी भासतो. “निष्पर्ण झाडाच्या कडेला” शांत निजण्याची इच्छा ही जीवनातील थकव्याची आणि अंतिम शांततेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. निष्पर्ण झाड म्हणजे विरक्ती, एकाकीपणा आणि काळाच्या प्रवाहात उरलेली निर्विकार अवस्था.

शेवटच्या ओळींमध्ये कवितेचा गाभा सामावलेला आहे — “अपूर्णतेकडून अमूर्तकडे प्रकाश असा पाझरत जावा”.
येथे “अपूर्णता” म्हणजे मानवी जीवनातील मर्यादा, वेदना आणि अपुरेपणा; तर “अमूर्त” म्हणजे भौतिकतेपलीकडील आध्यात्मिक उंची. कवीला या प्रवासातून प्रकाश जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. हा प्रकाश बाह्य नसून अंतर्मनाच्या जाणिवेचा आहे.

भाषेच्या दृष्टीने कविता अत्यंत चित्रमय, प्रतीकप्रधान आणि संवेदनशील आहे. प्रत्येक प्रतिमा वाचकाला विचारात बुडवते. कवितेचा लयबद्ध प्रवाह आणि गूढ शांतता तिच्या आशयाला अधिक प्रभावी बनवतात.

एकूणच, “प्रकाश पाझरत जावा” ही कविता मानवी वेदना, वैराग्य आणि आत्मशोध यांच्या संगमातून निर्माण झालेली एक चिंतनशील कलाकृती आहे. ती वाचकाला केवळ शब्दांचा अनुभव देत नाही, तर अंतर्मुख होण्यास भाग पाडते.


@ eaksharman



Saturday, May 16, 2026

डॉ आनंद नाडकर्णी


मागच्या वर्षी The Lost Supper या डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेल्या नाटकाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. वाचनाच्या, तालमींच्या, म्यूझिक रेकॉर्डिंगच्या निमित्ताने अनेक प्रदीर्घ भेटी आणि फोन कॉल्स झाले. त्या आधी ‘डॉ.आनंद नाडकर्णी’ या नावाभोवती  असलेल्या प्रभावळीशी परिचित होतो आणि खूप आदरयुक्त उत्सुकता सुद्धा होती त्यांना भेटण्या बद्दल. प्रत्यक्ष भेटल्यावर त्या प्रभावळीच्या केंद्रस्थानी असलेलं अफ़लातून व्यक्तिमत्व अनुभवायला मिळालं. सकारात्मक कार्यशीलता, संघटन कौशल्य अशा अनेक गोष्टींचा अर्थ समजला. सहजपणाने हसत बोलत वागणारी एक व्यक्ती समाजात किती खोलवर प्रभाव पाडू शकते हे लक्षात आलं. स्वतःचं नाव सार्थ करणारे डॉ.आनंद नाडकर्णी सतत आठवत राहतील.

Friday, May 15, 2026

मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!


मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!

 डॉ.आनंद नि मी आम्ही दोघे महाविद्यालयीन मित्र. असंख्य वेळा भेटलेलो. अगदी पहिल्यापासून. समोरच्या व्यक्तीवर जीव लावून प्रेम करणारा. निखळ   आनंदाच्या बिया पेरीत  , स्वतःची दुःखे दूर ठेवून ,"जगाला प्रेम  अर्पावे" ही उक्ती जगणारा सर्वांचा मित्र, डॉ.आनंद नाडकर्णी! सर्वार्थाने  अजातशत्रू असलेले हे व्यक्तिमत्त्व ! स्नेहसंमेलनापासून ते वक्तृत्वस्पर्धेपर्यंत एकत्र प्रवास  महाविद्यालयीन  काळात झाला. त्यांचे वडील हे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते डॉ.म द.नाडकर्णी. अत्यंत तत्वनिष्ठ आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. त्यांच्या सत्वगुणांचा वारसा त्यांच्या बुद्धिमत्ते बरोबर आनंदला मिळाला होता. 
पुढे 'वेध' च्या माध्यमातून डॉ.नाडकर्णी यांनी लक्षावधी मनांना सावरण्याचे कार्य केले. अहंकाराचा, पदाचा आणि  सर्वस्पर्शी  प्रतिभेचा अंशभर अहंकार नसलेला, केवळ आनंद देणे हाच धर्म मानणारा आमचा मित्र आज मात्र ह्या जगाला दुःख देऊन गेला.
खरा विज्ञान आनंदयोगी हरपला! त्यांच्या अनेक मनोवैज्ञानिक पुस्तकांच्या निमित्ताने आणि वेध या संस्थेच्या रूपाने आनंद आपल्यात कायम असणारच आहे. अत्यंत व्यथित मन झाले आहे,ह्या माझ्या विचारवंत मित्राला निरोप देताना..माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रवीण दवणे 

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत... 
'नाडकर्णी गेले' या मित्राच्या मेसेज नं दिवसाची सुरुवात झाली आणि एखादा दोर कापून आपल्याला अंधारात कुणीतरी अधांतरी केल्यागत झालं. 
आपापल्या डबक्यात रमलेल्या माणसांना आरोग्य आयुधांनी प्रवाही करणारा, मनावर ओझी असणाऱ्या माणसांनां नुसत्या गप्पांनी पिसागत हलकं वाटवणारा, आपल्या कोवळ्या आणि सैल मनानं कागदावर सुंदर 'आनंदरेषा' काढणारा, आणि महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य जागेवर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारा, अतिशय मोलाचा माणूस आपण आज गमावला.  
  
'शहरी लोकांची थेरं' वाटणाऱ्या सायकोलॉजी ला त्यांनी भाषा, प्रांत, परिस्थिती यांच्या सीमारेषा तोडून 'मानसिक आरोग्य' करून मराठी समाजाच्या रोजच्या जगण्यात आणलं. ज्या काळात मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे 'वेड लागलंय' असा समज होता त्या काळात 'शहाण्यांचे डॉक्टर' म्हणून उपचार आणि समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोचेल यासाठी ते दिवसरात्र झटले.

काकांनी अस्थिर मनांना स्थिर केलं, गैरसमजात गुरफ़टलेल्याना डोळस केलं, कधी लोकांना बोलू दिलं, कधी फक्त वाहू दिलं, मोकळं होऊ दिलं, अनेक जीवांची परवड थांबवली तर अनेकांची अनेक वर्षांची खदखद संपवली. त्यांच्यामुळे उभ्या राहिलेल्या माणसांची आणि घरांची संख्या काढली तर ती सहज काही हजारात भरेल. यावरून त्यांच्या कामाची महती सहज लक्षात येईल.
 
संबंध महाराष्ट्रात जिथं आज खरात सारख्या बाबा बुवांनी समाजाला आंधळं करून अक्षरशः पाहिजे तसं नासवलंय तिथे डॉकटर नाडकर्णीं सारख्या 'डोळस' करणाऱ्या माणसाचं जाणं खरोखर जिव्हारी लागणारं. 

"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हि ओळ ज्यांच्याबाबतीत मी पाहिली, ज्यांच्याबरोबर अप्रतिम गप्पा, चर्चा करायची संधी मिळाली, ज्यांच्या सहवासानं,आपुलकीनं कायम अदृश्य आधार मिळाला, आणि ज्यांच्या मिश्किल उत्तरानी आयुष्यभराची वाट सापडली ते डॉक्टर नाडकर्णी आता नसणार आहेत, त्यांनी महाराष्ट्र्राच्या मनावर उमटवलेल्या 'आनंदरेषा' पुसू न देणं ही आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे.
अलविदा काका. तुम्ही जिथे असाल, वाऱ्यावर बसून तिथलं सुंदर स्केच काढत असाल हे नक्की!

♥️♥️🙏🙏🌼🌼

क्षितिज  पटवर्धन

डॉ आनंद नाडकर्णी

डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‌‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‌‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‌‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.

सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!

“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
मानवी मन हे अथांग समुद्रासारखं आहे त्यात भावना आहेत, संघर्ष आहे, वेदना आहेत आणि आशेचे किरणही आहेत. या मनाच्या गूढ विश्वाला सहज, सोप्या आणि माणुसकीच्या भाषेत समजावून सांगणारा एक संवेदनशील आवाज आज कायमचा शांत झाला. ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, शरीराने दूर गेले तरी त्यांनी विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत कायम जिवंत राहणार आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते मन समजून घेणारे ‘माणूस’ होते. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. “मानसिक आजार हा काही वेगळा किंवा लाज वाटण्याचा विषय नाही; तोही इतर शारीरिक आजारांसारखाच आहे,” हा विचार त्यांनी सामान्य माणसांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत होती. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करणारी चळवळ उभारण्याची आणि त्या विचारातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात “आयपीएच” अर्थात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना झाली.
ही संस्था केवळ मानसिक रुग्णांपुरती मर्यादित राहिली नाही. आयुष्याच्या ताणतणावांनी थकलेल्या व्यक्तींपासून ते स्वतःचा स्व-विकास शोधणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकासाठी आयपीएचने आधाराचा हात दिला. उपचार, समुपदेशन यांसोबतच साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांसारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य अधिक मानवी आणि आनंददायी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वेगळा होता.

१९८० साली त्यांनी एमबीबीएस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रात एम.डी. पदवी प्राप्त केली. पण त्यांच्या नावामागील खरी ओळख पदव्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे निर्माण झाली. त्यांनी मनोविज्ञानाला पुस्तकांच्या चौकटीत न ठेवता ते थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडून दिलं.
लेखनक्षेत्रातही त्यांचा ठसा तितकाच गडद होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान लाभला. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’, ‘जन्मरहस्य’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्यांच्या लेखनात वैद्यकीय ज्ञान होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात माणसाच्या भावविश्वाची खोल समज होती.
त्यांची काही गाजलेली पुस्तकं आणि नाटकं आजही वाचकांना विचार करायला भाग पाडतात —
‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मनोगती’, ‘मनोविकास’, ‘हेही दिवस जातील!’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ अशी अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांच्या वैचारिक समृद्धीची साक्ष देतात.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली. त्यांनी लोकांना फक्त उपचार दिले नाहीत, तर जगण्याची नवी उमेद दिली. मनातील वेदनांना शब्द दिले. तणावग्रस्त मनाला समजून घेतलं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे  “मन मोकळं करणं ही कमजोरी नाही,” हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलं.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली मानसिक आरोग्याची जाणीव, माणुसकीची शिकवण आणि संवेदनशील विचारांची परंपरा कायम समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या जाण्याने मानसशास्त्र, साहित्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #डॉआनंदनाडकर्णी #श्रद्धांजली #मानसिकआरोग्य #मानसोपचारतज्ज्ञ #मानसशास्त्र #आयपीएच #InstituteForPsychologicalHealth

https://www.facebook.com/shrikantjoshiofficial

डॉ आनंद नाडकर्णी

भावपूर्ण श्रद्धांजली: मानसिक आरोग्याचा 'आनंद' वाटणारा दीपस्तंभ हरपला!

आपल्या शब्दांनी आणि उपचारांनी हजारो नैराश्यग्रस्तांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मा​नसिक आजार किंवा नैराश्य या विषयावर समाजात उघडपणे बोलणे जेव्हा टाळले जायचे, अशा काळात त्यांनी याविषयीची भीती दूर करून "मनाची मशागत" करण्याची चळवळ उभारली. त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

डॉ. नाडकर्णी यांचे जीवन आणि करिअर अत्यंत बहुआयामी होते. २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (IPH) या संस्थेची स्थापना केली, जिथे आज ७० हून अधिक तज्ज्ञ कार्यरत आहेत. केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता त्यांनी कला, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्तीचा 'स्व-विकास' साधला. यासोबतच, तरुणांना आणि पालकांना करिअर व जगण्याची योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी 'वेध' (VEDH) हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम सुरू केला. तसेच, पुण्यातील प्रसिद्ध 'मुक्तांगण पुनर्वसन केंद्रा'चे संस्थापक-विश्वस्त म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक मानले जाते.

वैद्यकीय कार्याव्यतिरिक्त डॉ. नाडकर्णी हे एक उत्तम लेखक, नाटककार आणि संवेदनशील विचारवंत होते. त्यांनी मराठीत १७ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली, ज्यामध्ये 'मनोगती', 'आत्मभान', 'सोबत संगतीची' आणि 'मनातलं माणसाचं' या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे; त्यांच्या दर्जेदार लेखनाची दखल घेऊन इयत्ता ९ वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातही त्यांच्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय-राज्य पुरस्कार प्राप्त 'देवराई' व 'कदाचित' यांसारख्या चित्रपटांसाठी मानसोपचार सल्लागार म्हणून मोलाचे योगदान दिले होते.

हिंदू तत्त्वज्ञान, इतिहास, संगीत आणि ताणतणाव व्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास असलेले डॉ. नाडकर्णी "मानसिक आजार असणे म्हणजे वेडे असणे नव्हे, तर मनाला झालेली ती एक जखम आहे जी उपचाराने बरी होऊ शकते," हा दृढ विश्वास त्यांनी समाजात निर्माण केला. डॉ. आनंद नाडकर्णी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली 'आयपीएच'ची संस्था आणि त्यांचे विचारप्रवर्तक साहित्य लाखो लोकांना सदैव मार्ग दाखवत राहील. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचा दिवा लावणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!


बातमी

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणसाच्या मनाचा वेध घेणारा, मानसिक आरोग्याबद्दल समाजात संवेदनशील संवाद घडवून आणणारा आवाज आज हरपला. त्यांच्या लेखनातून, विचारांतून आणि कामातून अनेकांना स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली. 

समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

डॉ आनंद नाडकर्णी

स्वत:च्या मनाशी मैत्री करायला शिकवणारे व्यक्तिमत्व हरपले 

​ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि शेकडो आयुष्यांना दिशा देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन ही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. आपल्या वाणीने आणि लेखणीने त्यांनी मानसिक आरोग्याचा विषय घराघरात पोहोचवला.  

भावपूर्ण श्रद्धांजली!
Ravindra Chavhan

अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी

*अथांग मनाचा समुद्र..*

आज मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने महाराष्ट्राने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. 

मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर हजारो लोकांना जगण्याची नवी दिशा दिली. 

मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अमूल्य राहिले. 

लेखन, व्याख्यानं, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आणि व्यसनमुक्तीच्या कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. 

त्यांची भाषा अभ्यासपूर्ण असूनही अत्यंत साधी आणि माणुसकीने भरलेली होती. म्हणूनच ते फक्त डॉक्टर नव्हते, तर अनेकांसाठी विश्वास देणारे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना मनःपूर्वक आदरांजली.

*“काही माणसं आयुष्य संपल्यानंतरही त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून सतत जिवंत राहतात…*

डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यापैकीच एक.”

आपलं मानसशास्त्र परिवारातर्फे या अथांग मनाच्या समुद्राला भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

@राकेश वरपे

#dranandnadkarni 

वेध डॉ आनंद नाडकर्णी

'वेध' च्या माध्यमातून ज्यांनी स्व च्या पलीकडे जगणाऱ्या असंख्य माणसांचा वेध घेत आयुष्य समृद्ध केलेच पण त्यांच्याशी मैत्री निर्माण होत त्यांच्या कार्याशी जुळवून दिले असे वेध चे सर्वेसर्वा आनंद नाडकर्णी सर आज पहाटे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. सरांना कधी प्रत्यक्षात भेटता आले नाही याची खंत मनात कायमस्वरूपी असेलच पण त्यांच्यामुळे सारंग गोसावी, अमृत देशमुख, स्वप्नील कुंभोजकर, धनश्री लेले, विशुद्धानंद भारती अर्थात भारती ठाकूर ताई आणि नि.मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी  या सगळ्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आनंद नाडकर्णी सर यांना सद्गती लाभो आणि कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. ॐ शान्ति 🙏🌹

डॉ आनंद नाडकर्णी आठवण

45 वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : मुंबईच्या केईएम् रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासाठी मनोविकारशास्त्राची पंधरा नंबरची ओपीडी. 
प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असणारे, हसमुख चेहऱ्याचे एक तरुण डॉक्टर कोणत्याही इरिटेशन शिवाय पेशंट तपासत असतात. 

त्यांच्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटची ते विलक्षण आस्थेने चौकशी करत असतात. त्याचं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 

एक मध्यमवयीन पुरुष त्यांच्याकडे तपासणीसाठी येतो. डॉक्टर विचारतात, ‘कोणकोणते त्रास होत आहेत तुम्हाला ..सांगू शकाल?’’ 

‘‘झोप लागत नाही..दचकून जाग येते. विनाकारण धडधड होते अचानक.. सारखी भीती वाटत राहाते. जबाबदाऱ्या खूप आहेत हो. कमावणारा मी एकटा..’’, चेहऱ्यावरची रया गेलेला काळजीने ग्रासलेला आणि भवितव्याच्या चिंतेने त्रस्त झालेला अशक्त इसम खोल गलेल्या आवाजात उत्तरला. 

त्याच्या उत्तराने डॉक्टर हेलावून जातात. स्तब्ध होतात. 
तो काळ होता मुंबईचा कुख्यात गिरणी संप सुरू झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरचा! त्यामुळे अशा थकलेल्या हारलेल्या पेशंटचा तिथे भडिमार होता. 
 
आणि नेमक्या त्याच काळात मनोविकारशास्त्रामध्ये एम्.डी.चे शिक्षण घेण्यासाठी त्या डॉक्टरांनी 'केईएम'मध्ये सुरुवात केली होती. 

निवासी डॉक्टर म्हणून ते तिथे काम करत होते. केईएम हे गिरणगावच्या वेशीवर वसलेले असल्याने गिरणी कामगारांचा संप सुरु झाला तेव्हा कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागली. घरातले कर्ते पुरुष सैरभैर झाले, स्त्रिया कोलमडून पडल्या. 

संप चिघळत गेला. घरं कोसळत गेली. घरातली सगळी माणसं चिंता आणि निराशेच्या खोल गर्तेत बुडून गेली. मरणाच्या दारात उभं राहिलेलं परवडलं, अशा मानसिक अवस्थेत तिथली माणसं जगत होती.     

त्या दिवशी डॉक्टरांच्या समोर उभा असलेला पराभूत देहबोलीचा तो इसम त्याचं काम प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाची देखभाल निगुतीने करत असणार, या बाबतीत त्यांच्या मनात जराही शंका नव्हती. 
  
भांबावून गेलेल्या त्या माणसाशी ते आत्मीयतेने बोलले. त्यांनी त्याला थोडासा धीर दिला. त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू केले असले तरी खुद्द डॉक्टरच मनातून हलले होते. त्या माणसाचा शून्यात हरवलेला चेहरा सतत त्यांच्या डोळ्यापुढे येत होता.

गिरणगावातला हा संप म्हणजे सगळ्या मुंबईला हलवून टाकणारा प्रकार आहे, आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णां मधल्या या अशा संपकरी कामगारांचा आणि कुटुंबीयांचा आपण अभ्यास केला पाहिजे, असं त्यांना मनोमन वाटलं. 

त्यासाठी त्यांचे अध्यापक प्रोफेसर डॉ. एल्.पी. शहा यांच्याकडून त्यांनी होकार मिळवला. सरांनी हिरवा झेंडा दाखवला. डॉक्टर निष्ठेने कामाला लागले. पुढच्या काही महिन्यांमध्ये अशा पार्श्वभूमीच्या तिसाहून अधिक ‘कहाण्या‘ मिळाल्या.

त्यांच्यावर संशोधन करताना ‘केसेस मिळाल्या’ हा शब्द डॉक्टरांनी मुद्दाम टाळला. अशा पेशंट्सचा त्यांनी अभ्यास केला आणि मनोविकारशास्त्रातला त्यांचा पहिलावहिला संशोधन निबंध लिहिला.  

‘गिरणी संपाचे, कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’ हे त्याचे शीर्षक होते.  मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा, तो आपला पहिलावहिला प्रयत्न होता असं डॉक्टरांना वाटलं. या डॉक्टरांचे नाव डॉक्टर आनंद नाडकर्णी!

विवेकवादी विचारांचा ऋजू आवाज! हारलेल्या अनेक जिवांना उभारी देणारा आधारवड! आपल्या लेखनातून नवा आशेचा प्रकाशमार्ग दाखवणारा दीपस्तंभ! मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेकांना सावरणारा ऊर्जास्त्रोत!    

लोक म्हणतात की, ते अतिशय प्रभावी मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, वक्ते आणि समुपदेशक होते! नक्कीच! मात्र त्याहून अधिक ते एक सहृदयी, संवेदनशील, सृजन, मानवतावादी हळवे व्यक्ती होते! 

आनंद नाडकर्णी आजही आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यात राहतील; धीर खचलेल्या लोकांसाठी तर त्यांची पुस्तके पाथफाइंडरचे काम करत राहतील. 

‘आता सारे संपलेय, खूप कठीण काळ आलाय आणि आपला निभाव लागणार नाही..‘ असे ज्याला कुणालाही वाटते त्याने डॉक्टर नाडकर्णी यांचे 'हेही दिवस जातील' हे पुस्तक आवर्जून वाचावे! त्यांची मनस्थिती बदलेल, याची हमी!    

'Everyone is good at something', प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्ये असतात, काहीतरी चांगली गोष्ट असतेच! ह्या गृहितकावर त्यांची अपार श्रद्धा होती आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा हा प्लसपॉईंट शोधून काढून त्याला चेतना देण्याचे काम ते करत! 

अशी माणसं आताच्या काळात दुर्मिळ झालीत, त्यांच्या एकाएकी जाण्याने समाजाची शब्दांतीत हानी होते. सध्याच्या नाउमेदीच्या, बेकीच्या काळात अशी माणसं भोवताली असणं हाही एक आधार असतो! त्यांची एक्झिट अधिक चटका लावून गेली..              
                     
- समीर गायकवाड


Wednesday, May 13, 2026

मराठी टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा का ?

मराठीचा टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा?

महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी मातृभाषा मराठीत अनुत्तीर्ण झाले हे वृत्त सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाले आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, की आपली एकंदर शिक्षण आणि समाजव्यवस्था अनुत्तीर्ण झाली, त्याचा शोध कुणीही घेत नाही. मुले जे सतत ऐकतात, पाहतात ,भाषेच्या ज्या पर्यावरणात ती  नांदतात, तेच त्यांच्या लेखणीतून उतरते .आज भवतालातून मातृभाषा मराठी खरोखर तेवढ्या कसदार पद्धतीने बोलली जाते का?
 विविध वाहिन्यातून, कथेतील व्यक्तिरेखांतून, निवेदनातून, जाहिरातीतून बोलली आणि लिहिली जाणारी होणारी मराठी  खरोखर कसदार मराठी असते का?
" केवळ भावना पोचल्या म्हणजे झाले ..,
एवढेच भाषेचे कार्य" हाभाषा विघातक संदेश समाजाला जेव्हा दिला गेला, तेव्हा अधोगतीला सुरुवात झाली. 
जगायचे असेल तर मराठी आले नाही तरी चालेल, परंतु परभाषा आली पाहिजे, हा मातृभाषा मराठीच्या मुळावर उठलेला विचार विद्यार्थ्यांनी मांडलेला नाही, की मराठीच्या शिक्षकांनी!
 मग केवळ शालांत परीक्षेत मराठीत एक लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,याचा दोष केवळ भाषेच्या शिक्षकांना आणि  विद्यार्थ्यांना जातो का? 
 शाळेतून पुरवणी वाचन, ग्रंथालय आणि ग्रंथपालाचे महत्त्व , हद्दपार झाले आहे. बाह्यवाचन हेच खरे आंतरिक वाचन असते; हेच  आज मान्य होत नाही. शब्दांना आपण संपदा म्हणतो. ती शब्दसंपदा मुलांच्या  खजिन्यात असावी ,असे पालकांना आणि शिक्षणव्यवस्थेला वाटते का? मराठीचे टिपण इंग्रजीतून उतरवणारी पिढी  मराठी प्रश्न पत्रिकेतील दीर्घ उत्तरे कशी लिहिणार? 
निबंधासाठी कल्पनाशक्तीची, मनातला विचार विस्ताराने मांडण्याची क्षमता आवश्यक असते .कल्पना करण्याचा आज अवकाशच नाही . आजची पिढी सतत डोळ्यांपुढे विविध माध्यमातून चित्र पाहूनच आपले आयुष्य  भरून टाकत आहे.  अशावेळी निबंधासाठी, केवळ गुगलवरून कॉपीपेस्ट केलेला आयता मजकूर 
घोकंपट्टी करून, विद्यार्थी मांडत आहेत. गुण मिळतात ते पाठांतराला. चिंतन मननाला नाहीत.  मजकूर आठवून उतरवणे हीच शोकांतिका उरली आहे. पत्रलेखनासाठी आंतरिक हुरहुर आणि ओढ लागते ती एसएमएसच्या वातावरणात कुठून मिळणार आहे ?
तेव्हा परीक्षेत ऐनवेळी पत्र लेखन करणार कसे? आयुष्यात कधी पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र पाहिलेलेच नाही अशीच पिढी निर्माण केली ना? सविस्तर लेखनाची,( तीही  स्वतःच्या हाताने) क्षमता क्षीण झाली आहे.
 एक शब्द ,दीड वाक्य, हीच काय ती उत्तरे ! अशाप्रकारे भरपूर गुण; नव्हे,मार्क्स देणारी 'एज्युकेशन सिस्टीम ' आणि , त्यातून बुद्धिमत्ता आजमावणे, यातून आपण काय हरवले आहे, याचा विचार या क्षणी तरी गांभीर्याने कोणी करणार आहे का? 
चर्चा केवळ एक दोन दिवसापुरता होणार,आणि पुन्हा पुढच्या वर्षी दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,यावर चर्चा होईल. फक्त चर्चा !
कृती कुठे आहे ?
काहीच प्रामाणिक नाही, हेच एक सत्य आहे.
 मराठी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण; एवढ्या पुरताच हा  विषय नाही.
हा संकेत आहे,आपल्या महाराष्ट्रातून नव्या पिढीच्या जिव्हेवरची मराठी दूर जात आहे.  हीच धोक्याची खूण आहे.  केवळ मराठीच्या शिक्षकांना दोष देऊ नका. 
आजही ग्रामीण भागात, तसेच अनेक ठिकाणी प्रयोगशील मराठीचे शिक्षक मी पाहतो आहे. वाचन प्रसारासाठी स्वतः पदरमोड करून मुलांना पुस्तके वाटणारी अध्यापकांची तरुण पिढी माझ्या संपर्कात आहे .सुक्याबरोबर ओले जाळू नका ही विनंती.
पालकांचां मातृभाषा मराठीत उत्तीर्ण होण्याचा आग्रह आणि बाहेरचे वातावरणही तपासून बघा. अर्थात जमले तर...!
नाहीतर उद्या चर्चेसाठी वेगळा विषय येतोच आहे.
            *
                  प्रवीण दवणे 

(हा एक विचार आहे, आपल्या वैचारिक समूहावर पाठवू शकता)

Saturday, May 9, 2026

समिक्षा लेखन ८

मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही,
डाव तुझ्या हाती दिला 
तरी जिंकता तुला  येत नाही.

चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत नात्यातील संघर्ष, अहंकार आणि असमर्थ विजय यांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण दिसते. “मला माझी हार मान्य आहे” या ओळीत कवीचा प्रामाणिक स्वीकार दिसतो; परंतु हा स्वीकार पूर्ण पराभवाचा नसून अंतर्मनातील एक शांत जाणीव आहे. हार मानणारा माणूस कधी कधी अधिक प्रगल्भ असतो, हे या ओळीतून जाणवते.

“म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही” या पुढील ओळीत नात्यांतील विजय-पराजयाची संकल्पना प्रश्नांकित केली आहे. एखाद्याने माघार घेतली म्हणून दुसरा खऱ्या अर्थाने जिंकतोच असे नाही, कारण नात्यांमध्ये जिंकण्यासाठी केवळ संधी पुरेशी नसते; त्यासाठी समज, संवेदना आणि सामर्थ्यही लागते.

“डाव तुझ्या हाती दिला / तरी जिंकता तुला येत नाही” या शेवटच्या ओळींमध्ये कवीने अत्यंत प्रभावी उपरोध वापरला आहे. येथे “डाव” हा शब्द नात्यांचा, भावनांचा किंवा आयुष्याच्या खेळाचा प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतो. समोरच्याला पूर्ण संधी देऊनही तो नातं टिकवू शकत नाही किंवा मन जिंकू शकत नाही, ही खंत यात दडलेली आहे.

या चारोळीची भाषा साधी, थेट आणि संवादात्मक आहे; पण तिच्या आशयात खोल मानसिक संघर्ष दडलेला आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडण्याची चंद्रशेखर गोखले यांची शैली येथे प्रभावीपणे जाणवते.

@ eaksharman

समिक्षा लेखन ७

तुला शांत निजलेली बघितलं की
मी निवांत होतो मनातल्यामनात
वाटतं हीच सूखाची सावली आहे
पसरलेल्या रणरणत्या उन्हात...

चंद्रशेखर गोखले 


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अतिशय साध्या शब्दांत प्रेम, शांतता आणि मानसिक निवांतपणाची गहिरी अनुभूती व्यक्त करतात. प्रिय व्यक्तीच्या शांत झोपलेल्या रूपाकडे पाहताना कवीच्या मनात निर्माण होणारा निवांतपणा हा केवळ क्षणिक आनंद नसून जीवनातील कठीण, उष्ण आणि थकवणाऱ्या वास्तवातून मिळालेली एक सुखद सावली आहे.

“तुला शांत निजलेली बघितलं की / मी निवांत होतो मनातल्यामनात” या ओळींमध्ये प्रेमाची कोमलता आणि नात्यातील निःशब्द जिव्हाळा सुंदरपणे उमटतो. येथे संवाद नाही, मोठे भावनिक उद्गार नाहीत; तरीही केवळ प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वातून कवीला मिळणारा आधार अत्यंत प्रभावीपणे जाणवतो. “मनातल्यामनात” हा शब्दप्रयोग अंतर्मनातील शांत भावविश्व अधिक अधोरेखित करतो.

“वाटतं हीच सुखाची सावली आहे / पसरलेल्या रणरणत्या उन्हात...” या ओळी जीवनाच्या प्रतीकात्मकतेने समृद्ध आहेत. “रणरणतं ऊन” हे जीवनातील संघर्ष, ताण, वेदना किंवा एकाकीपणाचे प्रतीक ठरते; तर प्रिय व्यक्तीचे अस्तित्व “सुखाची सावली” बनून त्या कठीण वास्तवात दिलासा देतं. ही तुलना अत्यंत प्रभावी आणि भावस्पर्शी आहे.

या कवितेची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे. अलंकारिक भाषेचा अतिरेक न करता, सहज आणि मितकथन शैलीत कवीने प्रेमातील शांत आधाराची अनुभूती जिवंत केली आहे. वाचकाच्या मनात हळुवार ऊब निर्माण करणारी ही कविता प्रेमाच्या नाजूक भावविश्वाचे सुंदर चित्र उभे करते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ६


तू दिलेले क्षण...
किती अपरिचीत होते
असं काही ते.......
मी स्वप्नातच धरत होते...

चंद्रशेखर गोखले समिक्षा लेखन


चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा, गूढ आणि अंतर्मुख करणारा स्वर ऐकू येतो. “तू दिलेले क्षण...” या ओळीतून कवीने नात्यातील काही अमूल्य क्षणांची आठवण जागवली आहे. ते क्षण इतके अनपेक्षित आणि विलक्षण होते की, त्यांची अनुभूती वास्तवापेक्षा स्वप्नासारखी वाटते.

“किती अपरिचीत होते” या शब्दांत त्या भावनांची नवीनता आणि अनोखेपणा दडलेला आहे. आयुष्यात काही भेटी, काही भावना अशा असतात की त्या आधी कधी अनुभवलेल्या नसतात. म्हणूनच त्या मनात खोलवर ठसतात. पुढील ओळीत “मी स्वप्नातच धरत होते...” म्हणताना कवयित्रीसारखी संवेदनशील मनःस्थिती व्यक्त होते. ज्या गोष्टी वास्तवात मिळतील असे कधी वाटले नव्हते, त्या अचानक आयुष्यात येतात आणि मग त्या क्षणांवर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण होतं.

या चारोळीची भाषा अत्यंत साधी असली तरी तिच्या आशयात गहिरं भावविश्व दडलेलं आहे. अल्प शब्दांत प्रेम, आश्चर्य, स्वप्न आणि आठवणींचं सुंदर मिश्रण कवीने उभं केलं आहे. ही चारोळी वाचताना प्रत्येक वाचकाला आपल्या आयुष्यातील एखादा खास क्षण नकळत आठवतो, हेच तिचं खरं यश आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ५

वाटते तितकी साधी नसते
ही दिवस ढळण्याची वेळ
कुणाला दिसेनासं होण्याची घाई
आणि आपल्या जीवाशी खेळ

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेच समिक्षा लेखन

चंद्रशेखर गोखले यांच्या या चारोळीत संध्याकाळ ही केवळ दिवस संपण्याची वेळ राहत नाही, तर ती मानवी आयुष्यातील भावनिक अस्थिरतेचे आणि नात्यांतील हरवण्याचे प्रतीक बनते. “वाटते तितकी साधी नसते / ही दिवस ढळण्याची वेळ” या ओळींमधून कवीने अत्यंत साध्या प्रतिमेतून गहन अर्थ उलगडला आहे. दिवस मावळणे म्हणजे फक्त प्रकाश कमी होणे नसून, कुणाच्या आयुष्यातून कुणी हळूहळू दूर जाण्याची वेळ असते, अशी जाणीव या कवितेत प्रकर्षाने दिसते.

“कुणाला दिसेनासं होण्याची घाई / आणि आपल्या जीवाशी खेळ” या ओळींत मानवी नात्यांतील अस्वस्थता आणि आतल्या वेदनेचा उत्कट आविष्कार आहे. एखादी व्यक्ती दूर जात असताना तिची घाई दिसते, पण त्या प्रक्रियेत दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो, याची तिला जाणीव नसते. “जीवाशी खेळ” हा शब्दप्रयोग भावनिक तडफड आणि असहायता प्रभावीपणे व्यक्त करतो.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सूचकता. कुठेही मोठमोठे शब्द नाहीत, अतिनाट्य नाही; पण प्रत्येक ओळ मनात खोल उतरते. संध्याकाळच्या प्रतिमेतून कवीने विरह, एकाकीपणा आणि नात्यांच्या नाजूक अवस्थेचे अत्यंत संवेदनशील चित्र रेखाटले आहे. कमी शब्दांत मोठा भावार्थ मांडणे, ही चंद्रशेखर गोखले यांच्या लेखनाची ताकद या चारोळीत पुन्हा जाणवते.


@ eaksharman

समिक्षा लेखन ४



काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो
आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो
चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांच्या या चार ओळी अल्प शब्दांत मानवी अनुभवांचा खोल आशय मांडतात.

“काही कथांना सुरुवात असते
पण शेवट नसतो...”

या ओळी जीवनातील अपूर्ण नात्यांची, अधांतरी राहिलेल्या स्वप्नांची आणि न सांगितलेल्या भावनांची जाणीव करून देतात. प्रत्येक गोष्टीचा शेवट स्पष्ट आणि ठाम असतोच असे नाही; काही कथा काळाच्या प्रवाहात विरून जातात, पण मनातून मात्र कधीच संपत नाहीत. कवीने “कथा” हा शब्द वापरून मानवी आयुष्यालाच एक रूपक दिले आहे.

“आणि आता अशा गोष्टींवर
माझा सहज विश्वास बसतो”

या ओळीत अनुभवातून आलेली स्वीकाराची भावना दिसते. आयुष्याने दिलेल्या जखमा, तुटलेली नाती किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यामुळे मन अधिक वास्तववादी बनते. पूर्वी अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी आता सहज पटू लागतात. ही केवळ निराशा नाही, तर जीवन समजून घेतल्याची एक शांत जाणीव आहे.

या चारोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची साधी भाषा आणि खोल भावविश्व. कोणताही अलंकारिक आव आणत नाही, तरी ती थेट मनाला भिडते. अपूर्णतेतही सत्य असते आणि काही कथा शेवटाशिवायही आयुष्यभर जगत राहतात, हा अत्यंत सूक्ष्म विचार कवीने प्रभावीपणे मांडला आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन ३

नेहमीच डोक्याने विचार करु नये
कधी भावनानाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा

चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेवर समिक्षा लेखन

यांच्या या चार ओळी साध्या वाटल्या तरी त्यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा अतिशय कोमल आणि संतुलित दृष्टिकोन दडलेला आहे. माणूस नेहमी तर्क, विचार आणि व्यवहार यांच्या चौकटीत जगत असतो; पण कवी येथे सांगतो की जीवन केवळ बुद्धीने जगायचं नसतं. भावनांनाही तितकाच सन्मान आणि मोकळेपणा मिळायला हवा.

“नेहमीच डोक्याने विचार करु नये” या ओळीतून कवीने आधुनिक जीवनातील कोरडेपणावर सूचक भाष्य केले आहे. सतत हिशोब, शंका आणि तर्क यांच्या आधारे घेतलेले निर्णय माणसाला भावनिकदृष्ट्या रिकामं करू शकतात. म्हणूनच “कधी भावनानाही वाव द्यावा” ही ओळ मनाच्या नैसर्गिक स्पंदनांना स्वीकारण्याचा सल्ला देते. येथे भावना म्हणजे केवळ हळवेपणा नसून संवेदनशीलतेचा स्वीकार आहे.

“आसुसलेल्या डोळ्यांना / स्वप्नांचा गाव द्यावा” या प्रतिमेत कवीची कल्पनाशक्ती आणि आशावाद सुंदरपणे व्यक्त होतो. ‘आसुसलेले डोळे’ ही प्रतिमा अपूर्ण इच्छा, आतुरता आणि जगण्यातील उरलेली आशा दर्शवते. अशा डोळ्यांना ‘स्वप्नांचा गाव’ देणे म्हणजे माणसाला पुन्हा जगण्याची उमेद देणे होय. येथे ‘गाव’ हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे; कारण तो केवळ स्वप्न नव्हे तर त्या स्वप्नांना आसरा, आपलेपणा आणि विस्तार देतो.

या कवितेची भाषा अत्यंत सहज आणि प्रवाही आहे. अलंकारिक शब्दांचा अतिरेक न करता कवीने थेट मनाला स्पर्श करणारा आशय मांडला आहे. थोडक्यात, ही कविता बुद्धी आणि भावना यांच्यातील समतोल साधण्याचा सुंदर संदेश देते. जगण्यात स्वप्न, संवेदना आणि मनाचा ओलावा जिवंत ठेवण्याची प्रेरणा या चार ओळी वाचकाला देतात.

@ eaksharman

समिक्षा लेखन २

चंद्रशेखर गोखले यांच्या —

 “सरतेशेवटी....
काही उरत नाही,
तरी माझ्यासारखी माणसं
तो शेवट धरत नाहीत”

या ओळी जीवनाच्या गूढ तत्त्वज्ञानाला स्पर्श करणाऱ्या आहेत. अत्यंत साध्या शब्दांत कवीने मानवी मनातील आशा, जिद्द आणि न संपणाऱ्या जगण्याच्या प्रवृत्तीचे प्रभावी चित्रण केले आहे.

“सरतेशेवटी काही उरत नाही” ही ओळ जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देते. माणूस आयुष्यभर नाती, स्वप्ने, संपत्ती, आठवणी यांच्यामागे धावत राहतो; पण शेवटी सर्व काही क्षणभंगुर ठरते. जीवनाचा शेवट रिकामेपणातच विलीन होतो, ही अस्तित्ववादी जाणीव कवीने अत्यंत संयतपणे मांडली आहे.

मात्र पुढील ओळीत कवितेला एक वेगळाच आशय प्राप्त होतो — “तरी माझ्यासारखी माणसं तो शेवट धरत नाहीत.” येथे कवीचा आशावादी आणि जिद्दी स्वभाव प्रकट होतो. अंतिम निरर्थकतेची जाणीव असूनही जगण्यावर प्रेम करणारी, स्वप्नांना कवटाळणारी आणि सतत पुढे चालत राहणारी माणसं समाजात असतात. ही ओळ मानवी मनाच्या अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक ठरते.

या कवितेतील विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिची अंतर्मुख शांतता. यात आक्रोश नाही, नाट्यमयता नाही; पण जीवनाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. “शेवट धरत नाहीत” हा प्रयोग अत्यंत अर्थपूर्ण आहे. तो केवळ मृत्यू नाकारण्याचा नाही, तर निराशेला शरण न जाण्याचा संकेत देतो.

कवितेची भाषा साधी, प्रवाही आणि सहज आहे. अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याची ताकद ही चंद्रशेखर गोखले यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यांच्या कवितेत तत्त्वज्ञान आहे, पण ते बोजड नाही; उलट ते वाचकाच्या मनात हळूहळू झिरपत राहते.

एकंदरीत, ही कविता जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देतानाच माणसाच्या आशावादी वृत्तीचा गौरव करते. निराशेच्या सावलीतही जगण्याचा धागा न सोडणाऱ्या मनाचा हा अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक आविष्कार आहे.

@ eaksharman

समिक्षा लेखन १

चंद्रशेखर गोखले यांच्या —

“आकाशभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कोणाला अधिक
तर कुणाला उणे....”

या चार ओळी अत्यंत साध्या वाटल्या तरी त्यामागे जीवनातील विषमता, स्पर्धा आणि अस्तित्वाची वेदना दडलेली आहे. कवीने “आकाशभर पाखरं” या प्रतिमेतून समाजातील असंख्य जीवांचे चित्र उभे केले आहे. प्रत्येकाला जगायचे आहे, उंच भरारी घ्यायची आहे; पण “मुठभर दाणे” ही प्रतिमा साधनसंपत्तीच्या मर्यादित उपलब्धतेकडे निर्देश करते.

कवितेतील मुख्य आशय म्हणजे जीवनातील असमतोल. काहींना भरपूर संधी, संपत्ती आणि सुख लाभते, तर काहींना मूलभूत गरजाही अपुऱ्या पडतात. “कोणाला अधिक तर कुणाला उणे” या ओळीत समाजरचनेतील विषमता अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. ही केवळ आर्थिक तफावत नसून प्रेम, मान्यता, संधी आणि नशिबातील फरकही सूचित करते.

या कवितेचे सौंदर्य तिच्या अल्पाक्षरीपणात आहे. फार मोठे भाष्य न करता कवी थेट वास्तव मांडतो. “पाखरं” आणि “दाणे” या सहजसुंदर प्रतिमा वापरून मानवी संघर्षाचे तत्त्वज्ञान उलगडले आहे. यात कुठलाही आक्रोश नाही, पण एक शांत वेदना आहे.

कवितेतून समाजातील स्पर्धेची झलकही दिसते. सर्वांना जगण्यासाठी धडपड करावी लागते; परंतु साधने मर्यादित असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला सारखे काही येत नाही. ही जाणीव वाचकाला अंतर्मुख करते.

एकंदरीत, ही कविता मानवी जीवनातील विषमता आणि संघर्षाचे अत्यंत प्रभावी, सूचक आणि चिंतनशील चित्रण करते. साध्या शब्दांत मोठा सामाजिक आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य चंद्रशेखर गोखले यांच्या लेखणीत स्पष्टपणे दिसून येते.

@ eaksharman

Friday, May 8, 2026

Thursday, May 7, 2026

भावमेघ पुस्तक प्रकाशन

नमस्कार, 10 जानेवारी 2026 रोजी माझ्या भावमेघ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. माझ्यासाठी हा सोहळा एखाद्या अपत्यजन्मा सारखा खूप महत्वाचा होता..नवीन ओळख मिळवून देणारा आहे. खरंतर पोस्ट ला थोडा दोन तीन दिवस उशीरच झाला आहे, पण ही phase माझ्यासाठी खूपच नवीन आहे..नव्याने स्वतःशी ओळख झाल्यासारखे वाटते आहे..माझा आनंद, माझे भारलेपण तुमच्या समोर मांडायचे आहे म्हणून ही पोस्ट..

सारस्वतांच्या सोबतीने
सोहळा कवितांचा रंगला
रंगवूनी रसिक मनांना
अंतर्नाद जणू निनादला
कापरापरी उडून वेळ
कसा अचानक संपला
पण स्मृतींच्या रूपाने
मनावर कायम ठसला

असेच काहीसे  वाटते आहे...
देव कधीकधी अशा क्षणांचे दान पदरात देतो, वाटतं खरंच आपण पात्र आहोत का ह्या सगळ्याला... शनिवार पासून सगळीकडून कौतुकाची, प्रेमळ शब्दांची पखरण माझ्यावर होत आहे...मन इतक भरून आलं आहे.
त्याच भरल्या मनाने आईला फोन केला, तिला विचारलं, " मला खूप दडपण आलं आहे... कारण माहित नाही , ह्या सगळ्यासाठी खरंच मी योग्य आहे का.. " तेव्हा तिचे उत्तर फार महत्वाचे होते, "आपण चांगले माणूस असल्याची ही पावती असते, ती स्वीकारून पुढच्या प्रत्येक पावलावर त्याची जाणीव ठेवून जबाबदारी वाढवणारी  असते ही कौतुकाची प्रेमाची थाप..आज तुला ह्या प्रसंगात तुझ्या ज्या चुका , उणिवा किंवा कमतरता दिसत आहेत त्या पुढच्या वेळी तू दूर करण्याचा प्रयत्न कर. पण हा क्षण अभिमानाने जग, तो तुझा स्वतःचा आहे."

मी लहानपणा पासून आईबाबांना कोणतही काम करताना सचोटी आणि  प्रामाणिकपणे करताना पाहिलं आहे..ते अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे. तुमच्या सगळ्यांच्या शब्दांनी खूप भारावून गेले आहे. ... धन्यवाद सर्वांचे.. देवाचे सर्वात जास्त आभार कारण मी ह्या सर्व सोहळ्याचा भाग असण्याची सुतराम शक्यता नव्हती.

मी साधारण कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्या भावना कवितेत मांडते आहे, फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये माहित असलेली ही गोष्ट, मी साधारण 2013 पासून फेसबुक, ब्लॉग आणि विविध social media platform वर हळूहळू मांडायला लागले. मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या नाहीत..बऱ्याचश्या कविता मुक्तछंदात आहेत.. माझ्या मनातील विचार मांडायचा केलेला प्रयत्न आहे..माझ्या नवऱ्याने दिपक सावंत Deepak Sawant ह्याने फार आग्रहाने आणि कौतुकाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.. माझा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह..ह्याआधी माझ्या कविता 3 वेगवेगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून छापून आल्या आहेत, एक दोनदा कथाही छापून आल्या आहेत..

गीतकाव्य ह्या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान सतीश दादा आणि परेश दादा ह्यांनी सुद्धा माझ्या पुस्तक निर्मितीसाठी आग्रह धरला होता. त्यांचेही आभार. Sateesh Ranade  Paresh Koli
माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझ्या धाकट्या लेकीने प्राची दिपक सावंत( वय वर्ष 13) हिने काढले आहे..thank you Prachi.. Love you प्राची आणि पूर्वा..

पुस्तकाची उत्तम प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक Satish Solankurkar  सोळांकुरकर सरांनी लिहिली आहे त्यांचेही आभार... आणि पुस्तकाच्या पाठी लिहिलेली मा प्रा कविवर्य अशोक बागवे सरांची पाठराखण म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे.. Ashok Bagwe सर धन्यवाद...

गीतकाव्य आणि भावनांची चंची ह्या दोन काव्यसंग्रहासोबत पुण्यात 10 जानेवारीला भावमेघ चे प्रकाशन झाले.. अंतर्नाद काव्यमंच ह्यांनी Velvet Kavisha Publications  Varsha Vishal Thukrul  सोबत फार सुंदर सोहळा आयोजित केला होता..दोन्ही संस्थांचे आभार..

आणि माझी आई Shilpa Samant , माझा दादा Harshad Samant आणि माझे सगळे जिवलग जे मनात इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत त्या सगळ्यांचे आभार.. माझ्या बाबांना मी सर्वात जास्त miss करते आहे..त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत..ते जाणवतात.🙏
आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतकाचेही आभार, सदिच्छा पाठीशी असल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही..

आणि भावमेघ बरोबर प्रकाशित झालेल्या भावनांची चंची या काव्यसंग्रहाच्या कवयित्री Saru Pawar ताई तुमचेही अभिनंदन..आणि गीतकाव्य ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट 26 कवी कवयित्रींचेही अभिनंदन...
आणि माझे माहेरचे सर्व सामंत कुटुंबीय, आजोळचे नाईक कुटुंबीय आणि सासरचे सावंत कुटुंबीय ह्या सर्वांचे आभार

माझ्या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी नक्की कळवा. वाचून आवर्जून अभिप्राय द्या..
इतक्या उघडपणे अभिमानाने माझ्या कविता मिरवताना फार छान वाटलं..धन्यवाद @Deepak Sawant.
मेघना

https://www.facebook.com/meghanadeepaksawant