Sunday, July 5, 2026

लग्न व्यवस्था

लग्न आंधळं नसावं

आज लग्न जुळवताना बहुसंख्य लोकांची नजर सर्वप्रथम कशावर जाते?

घर किती पॉश आहे... 
दारात किती गाड्या उभ्या आहेत... 
बँक बॅलन्स किती आहे... 
वडिलांचा व्यवसाय किती मोठा आहे... 
लग्नात किती थाटमाट होणार आहे...

दुर्दैवाने अनेकांची मानसिकता अजूनही या तामझाम आणि श्रीमंतीला भाळते.

फार कमी लोक विचारतात...
हे वैभव प्रामाणिक मार्गाने उभं राहिलं आहे का? 
या घरात माणुसकी, संस्कार आणि विश्वास आहे का? 
मुलगा किंवा मुलगी रागावर नियंत्रण ठेवतात का? 
व्यसनं आहेत का? 
स्वभाव समंजस आहे का? 
मतभेद झाले तर संवाद साधतील की नातंच संपवतील?

कारण बाहेरून चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. 
संगमरवरी भिंती असल्या म्हणून घर सुखी असतंच असं नाही आणि साध्या घरातही आयुष्यभर पुरेल इतकी माणुसकी दडलेली असू शकते.

आज ज्या घटना समाजाला हादरवतात, त्या आपल्याला एकच धडा देतात—

लग्न करताना बँक बॅलन्स नव्हे, मनाचा बॅलन्स तपासा.
गाडीची किंमत नव्हे, माणसाची किंमत ओळखा.
बंगल्याचा आकार नव्हे, विचारांची उंची पाहा.

कारण संसार पैशाने उभा राहू शकतो... 
पण तो टिकतो फक्त स्वभाव, चारित्र्य, विश्वास आणि परस्पर आदरामुळे.

- अशोक मानकर


बरोबर पण आज काल भौतिक गोष्टीचा जास्त विचार केला जातो काहींना वाटत असावे त्यात सुख .. पण स्वभाव मन जुळली नसतील तर संसार टिकणे कठिणच !

Saturday, July 4, 2026

मृदुंग मसाला भजी..

मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे. 
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो. 
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली. 
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली. 
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले. 
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी. 
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा. 
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल. 

सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020