Thursday, October 10, 2024

मुलाखत

१) आपण लिहू शकतो याची जाणीव कधी झाली?

लहानपणापासूनच घरामध्ये काहीसे अलिप्त राहिलेले आणि कुणोही मार्ग न दाखवता न शिकवता श्री साईबाबांवर गाढ निष्ठा ठेवून आयुष्याची वाटचाल करत अनेक टक्केटोणपे खाऊन ही लेखनाच्या क्षेत्रात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर गोखले यांच्याशी शर्वरी प्रधान यानी साधलेला मनमोकळा संवाद.

अगदी अडीच तीन वर्षांचा असल्यापासून सतत काहीतरी सुचत असे. काहीतरी रचून गडबड चालू असायची असं आई सांगते, एक होती मनीमाऊ, तिला हवा होता खाऊ अशी बरीच बडबडगीतं स्वतःच रचून बोलत असे. लिखाण करणे म्हणजे भिकेचे डोहाळे असंच तेव्हा वातावरण होतं, 'किशोर आणि चांदोबा' मासिके प्रसिद्ध होती. सुसंस्कृत लोकं आवर्जून आणत, किशोर, मी १०-१२ वर्षाचा असताना किशोरमध्ये माझ्या काही गोष्टी छापून आल्या होत्या. मी एकटाच दादरला जाऊन, दादर ते वरळीला चालत जाऊन लिखाण देऊन यायचो, ज्ञानदा नाईकांचं पत्र आलं, की तुझ्यात लेखक दडलाय त्याला वाव मिळू दे असं त्यांनी कौतुक केलं होतं. माधव मनोहर एका लग्नात भेटले नीला-रवींद्रच्या लग्नात. ते म्हणाले, 'ओ चंद्रशेखर गोखले म्हणजे किशोरमध्ये गोष्ट तू लिहीलीय', हो म्हटल्यावर ते इतकं भरभरून बोलले. गोष्ट आवडल्याचं सांगून त्यांनी माधव गडकरींना भेटायला सांगितलं.

२) पहिली चारोळी कशी सुचली, ती कोणती? पाण्याचं वागणं... मोठ्या बहिणीकडे राहत होतो. तिची मुलगी २ ते ३ वर्षांची होती. तिची बाहुली पाण्याच्या बादलीत पडली. तेव्हा मला अचानक वाटलं, बापरे! असं निर्जीव होवून तरंगणं किती भयंकर आहे. तिथे पहिली चारोळी सुचली. मी बहिणीला ऐकवली. मग लिखाण सुरूच झालं. बहिणीने माईने नीट जपून ठेवलं.

३) समाजातली कोणती गोष्ट बदलाची असं वाटतं?

समाजातल्या जुनाट परंपरा, कालबाह्य रूढी बदलाव्याशा वाटतात. कारण त्यामुळे समाजातील दांभिकता वाढते. हे सभ्य संस्कार सोडून समाजाने भानावर यावे असे वाटते.

४) नवोदित लेखक किंवा कवी यांना काय मार्गदर्शन कराल? 
सुचेल तेव्हा, सुचेल तसं लिहा. प्रसिद्धीसाठी लिहीण्यापेक्षा मनाला समाधान मिळण्यासाठी लिहा, स्वतःसाठी लिहा. 

५) आपल्या विचार-आचारांवर कोणाचा प्रभाव आहे?

ईश्वरावर श्रध्दा अपार, त्याचाच प्रभाव लहानपणापासून. साईबाबांवर अपरंपार श्रद्धा, या श्रद्धे वरचं आयुष्य तरलं गेलं. 

 ६) मालिका लिहीताना आलेले बरे-वाईट अनुभव ?

चटका देणारा आहे. तेव्हा मी जनसहायची मालिका  डीडी १ ला लिहीत होतो. त्यात 'दिलीप धवन' होता. तो गेल्याची बातमी आली. तेव्हा त्याच्यासाठी लिहीलेला एपिसोड मला ते दुःख दाबून ठेवून संपूर्ण एपिसोड लिहावा लागला. तेव्हा मला जागीव झाली की आपण किती व्यवहारी वागतो आणि भावनाशून्य होऊन आपण आपली प्रतिभा जागृत ठेवून लिखाण केल्याची खूपच विचित्र भावना मनात होती.

७) फुरसतीचे क्षण कसे व्यतीत करता?

पत्नीबरोबर भरपूर गण्या मारतो. गाणी ऐकतो, रेसिपीचे कार्यक्रम बघायला मला खूप आवडतात, डिस्करहरी चैनल आवडतं. नाटक बघायला, सिरीयल लिहायला आणि चित्रपटांवर चर्चा करायला आवडतं. 

८) शोभा डे यांच्या स्वतंत्र मुंबईच्या वक्तव्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ?

ही फैशनच झाली आहे. काहीही बिनबुडाचं बोला आणि प्रसिद्धी मिळवा. हा त्यातलाच प्रकार आहे. याकडे चक्क दुर्लक्ष करावं.

९ ) डान्सबारबंदीवर आपलं काय मत ?

विकृतीला मान्याता देऊच नये. बंदी घातलीच पाहिजे. शंभरापैकी दहाजण तरी या वाममार्गाला लागून त्यातले पाच तरी आयुष्यातून उठतात, चाणक्यनीती नुसार मद्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना वयाची अट असे. त्याच्या हावभाव, हातवाऱ्यांना मर्यादा असे. अशा मद्यालयांना दुप्पट तिप्पट कर आकारला जात असे.

१०) सध्याच्या राजकारणाबाबत काय सांगाल ?

उदासीन आहे. बीट, कळस, उबग येतो. काहीही आशावादी चित्र नाही, बऱ्याच राजकारणी लोकांना वैयक्तिक पातळीवर ओळखतो. ते खूप छान असतात. त्यांना चांगलं बोलायची, चांगलं ऐकायची, चांगले वागायची आवड असतेच पण. राजकारण म्हटलं की यांना काय होतं काही कळत नाही. 

११) खास नवीन सुचलेली चारोळी
मी कधीचा सोडून दिलेला एक प्रश्न
पुन्हा माझ्यासमोर येवून ठाकलाय
कोण जाणे मी माझा रस्ता चुकलो
की तो त्याचा रस्ता चुकलाय.
'अजिंक्य महाराष्ट्र ' ला माझ्या शुभेच्छा. हा पेपर सर्वांना आपलासा वाटू दे
घेतला वसा टाकू नये, पत्रकारिता हे धाडस आहे. हे तुम्हाला छान जमू दे.

#मुलाखत


0 comments: