Showing posts with label व्यक्तिचित्र लेखन. Show all posts
Showing posts with label व्यक्तिचित्र लेखन. Show all posts

Saturday, May 2, 2026

सुमी... २७ ०४ २४

सुमी... २७ ०४ २४

सुमती जोग ही माझी चुलत बहीण. आधीची सुमती फडके, लग्नानंतर जोग. ती जवळपास माझ्यापेक्षा दहाएक वर्ष मोठी आहे, अजूनही अंतर तेवढंच बाकी आहे आमच्या वयातलं. हे तीच म्हणालीये. अतिशय हजरजबाबी, विनोदी, फटकळ आणि एकूणच बिनधास्त आहे ती. कोकणी मातीतले सगळे गुणावगुण तिच्यात ठासून भरलेले आहेत. माझ्या काकांची ती एकुलती एक मुलगी. वांड आणि आडदांड. मुलीच्या जन्माला आली म्हणून नाहीतर सुमंत फडकेच तो. काका तिला तशीच हाक मारायचे. गुणावगुणसुद्धा उपजत असतात काही. आम्ही कोळीस-याचे मूळ. चाफ्यावरून पुढे गेलात की आमचं गाव लागतं. शिकायला म्हणून बाहेर पडलेलो आम्ही शिकल्यावर नोकरी करत शहरातच राहिलो आणि गाव फक्त सुट्टीला, होळीला, गणपतीला जाण्यापुरतं उरलं. काही वर्षांनी तो सुद्धा इतिहास होईल कारण जाण्यासाठी गावात घर, नातेवाईक हवेत की. आमचंही आता गावात सुमी सोडल्यास कुणी नाही. सुमीसुद्धा एकटीच आहे तशी आता. आई, वडील, काका काकू कधीच गेले. ती ही आता पंचाहत्तरच्या जवळ आलीये. पण वर्षातून मी एकदा तरी जातोच गावाला. काम काही नसतं पण सुमी आहे म्हणून जातो.

ती वयाने वाढली पण अजून गुणावगुण सगळे तसेच आहेत. अजूनही कुणी तिच्या अंगणात पडलेला आंबा उचलायचं, जास्वंद काढायचं धाडस करणार नाही. भुतासारखी कुठून बघेल आणि झोड उठवेल हे कळणार नाही. सगळी फुलं ती काढणार आणि वाटणार पण तुम्ही काढलंत की संपलं. इतकी बोलेल की झक मारली आणि फूल तोडलं असं वाटलं पाहिजे तुम्हांला. सुमी आता एकटीच रहाते. जोग गेल्याला पण चारेक वर्ष झाली. समोरच्या वाडीत जोग रहायचे आणि इकडे फडके. तेंव्हाच ते लादलेलं लव्ह मॅरेज होतं. विद्याधर जोग म्हणजे अगदी शहाळ्यासारखा नरम आणि गोड माणूस, त्यांना घरी हाक मारायचं नाव मिलिंद उर्फ मिलू होतं. सुमी अठराची असेल तेंव्हा आणि जोग एकवीस. तसे दोघे एकाच शाळेत शिकलेले. घरी लग्नाचा विषय सुरु झाल्यावर सुमीने स्पष्ट सांगितलं, 'वसंतकाकांना विचारा, मला आवडतो मिलू. त्याला मी आवडते का माहित नाही'. काकू विचारात पडली ते कार्टीने प्रेमाचे चाळे काय केले असतील यामुळे नाही तर मिलू हो म्हणाला तर त्याचे किती हाल होतील याने. सगळे जोग मिटल्या तोंडाचे होते आणि ही बोलभांड. घरच्या आंबा, काजूच्या बागा होत्या दोन्हीकडे. दोघेही एकुलते एक. त्यांचं दुकान पण होतं बाजारात. जोग बी.ए. झाले होते आणि सुमी बारावी.

एके दिवशी काका आणि काकू वसंतरावांना भेटले आणि लग्न ठरवून आले. त्याचवेळी सुमी दुकानात गेली होती, हक्क दाखवायची पद्धत पण अफाट, 'ए मिलू, आईबाबा तुझ्या घरी गेले आहेत आपल्या लग्नाचं बोलायला, मीच सांगितलं त्यांना, तुझं कुठे काही झेंगट नाही ना, रत्नागिरीला कॉलेजला होतास म्हणून विचारलं'. जोग गल्ल्यावर आडवेच झाले. कसाबसा धीर एकवटून ते म्हणाले, 'ठरवायला म्हणजे? मी हो म्हणायला पाहिजे ना पण?' 'माझ्यात काय वाईट आहे सांग नाही म्हणायला? तुमच्या सगळ्यांपेक्षा गोरी आहे मी, सगळी कामं येतात, झाडावरून आंबे, काजू काढता येतात, वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक एकटी करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तू आवडतोस. नाही म्हण फक्त मग बघ तुझं तरी लग्न ठरू देतीये का ते. आलेल्या मुलीला सांगेन, माझं आणि याचं प्रकरण होतं म्हणून'. 'तू काहीही सांगशील, पुरावा हवा ना. आणि इथे दुकानात बोलायच्या गोष्टी आहेत का या? बोलतो मी आधी घरी'. 'हो, नाही, जे असेल ते उद्या संध्याकाळी सातला देवळात ये सांगायला, तेंव्हा नसतं कुणी'. जोगांनी कपाळावर हात मारून घेतला आणि कामाकडे वळले ते. सुमी घरी रीतसर सांगून देवळात गेली होती. 'मिलू येणारे सांगायला, हवं तर तू ही चल' असं ती काकूला म्हणाली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि 'जा तूच' म्हणाली.

लग्नाला सगळं गाव लोटलं होतं. भर लग्नात सुमी म्हणाली होती, 'गावक-यानू दोनदा जेवा, दोन्हीकडे आहेर दिलाय ना तुम्ही'. मी लहान होतो तेंव्हा पण गोरीपान सुमी अगदी पिवळी धम्मक दिसत होती दागिन्यांमुळे, ते आठवतंय. माहेर समोर आहे म्हणून ती कधीच उठसूट जायची नाही. कारण असेल तरच. तिचे मानापमान अगदी कोकणी होते. चार दिवस आधी मदतीला गेली आईला पण दिवाळसणाला रीतसर आमंत्रण दिल्यावर येईन म्हणाली. दिवाळीत चार दिवस जोग घर बंद करून फडक्यांकडे रहायला होते. नियम म्हणजे नियम. बोलभांड असली तरी ती प्रचंड मायाळू आहे, ते दिसू न देण्यासाठी सगळी धडपड असते तिची. लग्न झाल्यावर ती भरपूर आहे म्हणून बसून राहिली नाही. आंबे गावोगाव पाठवणे, आंब्या फणसाच्या पोळ्या, पल्प तिने गावात तयार करण्यासाठी छोटा कारखाना काढला आणि अनेक लोकांना रोजगार पण दिला. तिथेही मालकीण आहे की कामाला आहे कळणार नाही अशी उपस्थिती असायची तिची. ती ही बरोबरीने काम करायची इतर बायकांच्या. बाई गर्भार असेल तर चार तास काम आणि आठ तासाचा पगार असा तिचा कायदा होता. कुणी कुठे हात पसरले पैशासाठी हे समजलं तर ती चारचौघात त्याला झोडायची आणि पैसे द्यायची. आपल्याकडच्या माणसाने बाहेर पैसे मागावेत हा तिला अपमान वाटायचा. तिच्या दृष्टीने ते एक कुटुंब होतं आणि ती कुटुंबप्रमुख. तिच्याकडे काम करणा-या लोकांच्या मुलांनी, सुनांनीही काम केलं तिथे.

कुणालाही औषधाला, बाळंतपणाला, मुलीच्या लग्नाला, कळलं की पैसे ती न मागता द्यायची. ते परत देवोत न देवोत ती काहीही बोलायची नाही पण उसने घेतले असतील तर पठाणासारखी दारात जाऊन उभी रहायची मागायला. मुलाच्या लग्नाला मात्र पैसे द्यायचे नाही ती उसने, 'पोरग्याला कमवायला सांग मग लग्न कर म्हणावं', असं म्हणायची. एकूणच विचित्रं रसायन आहे ते. खोटेपणा, अस्वच्छता याचा तिला भयंकर राग. कामाला असलेल्या गड्याने अंगण नीट झाडलं नाही तर ती स्वतः त्याला कडेला उभा करून झाडून दाखवायची, झाडून होईस्तोवर त्याला तोंडाने झोडकाम चालू. रांगोळी म्हणजे फक्त 'श्रीराम' लिहायची, बाकी नाजूक काम तिला कधी जमलं नाही. झाडावर मात्र खारीसारखी चढायची अगदी. लग्न झाल्यावर सासूमुळे एकच बदल केला तिने. घरात किंवा बाहेर ती सगळ्यांसमोर मिलू म्हणायची नाही. 'ओ जोग' अशी खणखणीत हाक मारायची. एवढ्या सगळ्या सुखात तीट लावल्यासारखं एकच दुःखं होतं. तिला मुलबाळ काही झालं नाही. बरेच उपचार करून झाले. नवस वगैरे मी करणार नाही, दत्तक घेणार नाही हे तिने आधीच सांगितलं होतं. सासूने आणि तिच्या आईने केले नवस, उपास पण उपयोग झाला नाही काहीच. विषय निघाल्यावर तिने सगळ्यांसमोर विचारलं होतं, 'ओ जोग, तुम्हांला अपत्यासाठी दुसरं लग्न करायचं असेल तर करा बरं का, मी विनातक्रार समोर रहायला जाईन. अजिबात लुडबूड करणार नाही तुमच्या आयुष्यात पण घटस्फोटही देणार नाही, समोरून बघेन तुम्हांला'. जोग भरल्या गळ्याने म्हणाले होते, 'घरात तू एक लहान वांड बाळ आहेस ते पुरे आहे, आणखी नको कुणी मला'. आयुष्यात पहिल्यांदाच सुमी रडली असेल त्या दिवशी.

बोलणं सरळ म्हणून नाहीच कधी. एकदा असेच अंगण्यात बसलो होतो. एका म्हाता-याने जाताजाता अंगणात पडलेल्या बारक्या काटक्या सरपणासाठी गोळा केल्या. पुढचे संवाद नेहमीचे होते. 'रे मेल्या, माझंच अंगण दिसलं काय तुला? तुझ्यासाठी करतोयस का गोळा? गेलास तर लोकांना काळजी, स्वतःसाठी कशाला लाकडं गोळा करायला पाहिजेत'? 'अगो सुमे, तुझ्यासाठी पण ठेवेन गो बाय चार काटक्या तिथे'. 'मी इतक्यात नाही जायची. पोरगा कसा आहे रखमीचा?' 'चांगला हाये. तुझी आठवण काढली गो तिने, परवा गेलेलो ना तिच्या सासरी, निवलीला'. 'अरे बोलायचंस तरी, बस जरा. परवाच डिंकाचे लाडू केलेत ते देते चार तिच्यासाठी'. रखमी तिच्याकडे कामाला होती घरी लग्नाआधी. तिचा बाप दुकानात होता त्यांच्याच. ती बाळंतपणाला आलेली चार महिन्यामागे. सगळा खर्च सुमीचा. 'दात किती शाबूत आहेत तुझे?' 'छे गो, दोनचार हायेत, का ते'? 'लाडू रखमीसाठी दिलेत, तूला दात नाहीत म्हणजे पोचतील तिच्याकडे. आणि ती तुपाची बरणी पण ने. तिला म्हणावं लपवून खा हवंतर पण तब्येत सुधारू दे'. 'लाडू पोचिवतो, बरनी घरीच ठेवतो, आमच्या काय अंगी लागायचं नाय का तूप? आणि लगेच कुठून जाऊ परत. येष्टी काय आता सस्त -हायलीये काय?' 'तर तर, चार दिवस विड्या ओढू नकोस की, चहा घे हा. मी मागच्या जन्मीची देणेकरी आहे तुमची आणि हे पन्नास घे पण जाऊन ये उद्या तिच्याकडे'. म्हाता-याने डोळे पुसत वस्तू हातात घेतल्या आणि तो निघाला पण सुमी ती सुमीच. 'सरपण सोड ते आधी, जंगलात पडलंय ते आण, सगळं नुसतं फुकट हवं मेल्यांना'. म्हाता-याने दोन काड्या टाकल्या आणि तो हसत हसत निघून गेला.

काळ झटझट सरला. गावातली माणसं विरळ होत चालली. जवळपास पन्नासेक वर्षांचं तिचं सहजीवन एका रात्री संपलं. कुठलंही व्यसन नसलेले, आजार नसलेले जोग हार्ट अटॅक येऊन गेले. सुमीने एकदाच काय ते रडून घेतलं, कुणी हाक मारायला आल्यावर पाण्याच्या टिपूस काढला नाही. 'वय नव्हतं फार पण कोण कधी जाणार हे आपल्या हातात नसतं, दुःखं होतंच पण सतत रडून माणूस परत येणारे का?' असं तिचं स्पष्टं मत होतं. त्यानंतर तिने सगळे उद्योग विकून टाकले, जमिनी विकल्या, दागिने विकले आणि राहण्यापुरतं घर ठेवलं. तिच्या हयातीत व्याज आणि पश्चात रक्कम अनेक सेवाभावी संस्थांना मिळावी असं मृत्युपत्र तिने तयार करून ठेवलंय. शिक्षण नसेल फार पण तिचे विचार स्पष्ट होते, आतबाहेर काहीही नाही, कपट नाही, दुजाभाव नाही. एकदा असाच आमचा कशावरून तरी वाद झाला. मी रागाने म्हणालो, 'आता अजिबात येणार नाही तुला भेटायला'. 'नको येऊस, काही अडलं नाहीये माझंही'. मी ही रागाने निघालो तर दारात आडवी येऊन म्हणाली, 'थांब, परत येऊ नकोस असं म्हटलंय, आत्ता जा म्हटलंय का?' आणि हसत सुटली. मग मी ही दात काढले आणि भांडण मिटलं. तिचा कुणावर आणि कुणाचा तिच्यावर कायमस्वरूपी राग असणं शक्य नव्हतं. 

मी इतकी वर्ष जातो भेटायला पण कधीही कुणाबद्दल कुचेष्टेचं बोलणं नसतं, बोलण्यात कायम गंमतीजंमती असतात. अलीकडे जरा हळवी झालीये पण. आईवडील, सासूसासरे आणि तिचा मिलू यांच्याबद्दल जास्ती बोलते आताशा. एकदा म्हणालेली, 'तुला माहितीये जया, जोग मला काय म्हणाले होते लग्न झाल्यावर? सुम्या आहे तशीच रहा, मला पण तू त्यामुळेच आवडतेस पहिल्यापासून. पहिल्यापासून? म्हणजे मी मेलीने विचारलं नसतं तर या बाबाने सांगितलंच नसतं आणि आमचं लग्नही झालं नसतं. पण अत्यंत प्रेमळ माणूस रे, बोलायचा कमी पण माया त्याच्या त्या पिंग्या डोळ्यात बघावी. नुसता नजरेने बोलायचा तो. मी दहा वाक्य सांडेन पण तो महाचिकट. एखाद वाक्यं पुरायचं त्याचं. पण कधी माझा निर्णय चुकला ना तरी रात्री समजावून सांगायचा काय चुकलं ते. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं कधी तरी बोलायचा नाही'. सुमीही आता थकलीये, मलाही वरचेवर जायला होत नाही पण एकदा तरी जायलाच हवं वर्षातून. तिच्या इतक्या वर्षांच्या गंमती जंमती अजून अर्ध्याच ऐकून झाल्यात. येतोय हे कळवलं की वाट बघत असते अगदी पण दाखवत नाही तसं. पण जेवायला साग्रसंगीत करते दोन माणसांसाठीसुद्धा. दिवसभर दोघे खातपीत नुसत्या गप्पा झोडत असतो. निघताना रडत नाही पण चेहरा सांगतोच कितीही आव आणला तरी. पण बोलते मात्र 'असलास पुढच्या वर्षी तर ये परत' असं आणि हसण्याच्या आड डोळ्यातलं पाणी लपवते.

इतकं गोष्टीवेल्हाळ, मायेचं आणि नितळ मनाचं कुणी आपलं माणूस भेटणं आता या जगात दुर्मिळ आहे त्यामुळे आहे तोवर भेटायलाच हवं. सुमी जोग, आहेच तशी, खाष्ट तेवढीच प्रेमळ.

जयंत विद्वांस