Sunday, May 3, 2026

तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार

मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.

मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.

नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी  मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.

तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो. 

मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.

रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.

त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

Rajendra Kher

https://www.facebook.com/rajendra.kher.79

0 comments: