Showing posts with label कौशल इनामदार. Show all posts
Showing posts with label कौशल इनामदार. Show all posts

Saturday, March 28, 2026

ग्रेस


ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून जाणवण्याचीच गोष्ट आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की “कवीला काय म्हणायचंय?” असा शाळेत विचारलेला प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” असा असायला हवा. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की दर वेळी उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही, प्रश्नही रेंगाळू द्यावे मनात. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की ग्रेसच्या कवितेचे गूढरम्य प्रदेश फिरायचे तर हातात संगीताची मशाल हवी!

संगीतकारांना ग्रेसच्या कवितेचं प्रचंड आकर्षण वाटतं याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. संगीतकारांना ग्रेस हा आपला कवी वाटतो कारण त्यांची कविता ॲब्स्ट्रॅक्शन्समधे संवाद साधते. ही ॲब्स्ट्रॅक्शन्स संगीतात अनुवादित करताना संगीतकाराचा कसही लागतो आणि अपार आनंदही मिळतो! म्हणून ग्रेसच्या काव्याला बहुतेक संगीतकारांनी दिलेल्या चाली उत्तमच वाटतात! हृदयनाथ मंगेशकरांपासून श्रीधर फडकेंपर्यंत आणि आनंद मोडकांपासून नरेन्द्र भिडेपर्यंत सर्व संगीतकारांना ग्रेसची मोहिनी पडलेली आहे.

उन्हे उतरली
एक सावली
पुढे दिठीवर थेंब नवा
या वळणाशी
दुःख उराशी
सूर वितळतो जणू भगवा
ग्रेसच्या कवितेतली पहिली चित्तवेधक बाब म्हणजे चित्रमयता. उन्हं उतरणीला आगली आहेत आणि संध्याकाळीच दिसते अशी लांब सावली आपल्याला दिसतेच; पण पुढच्या तीन ओळी ॲब्स्ट्रॅक्ट असल्या तरीही ‘तो वितळणारा भगवा सूर’ आपल्याला अवकाशात दिसत राहतो. मला एक गंमत आढळली. मी केलेल्या ग्रेसच्या तीन कवितांच्या संगीतरचना करताना या तिन्ही कविता संध्याकाळच्या असूनही मी सकाळच्या रागांची धून वापरली आहे! हे असं अभावितपणे झालं असलं तरी त्याचं एक कारण आहे हे मला नंतर जाणवलं. ग्रेसच्या कवितेमध्ये एक अनामिक अशी बेचैनी आहे. बेचैनी जाणवते पण त्यावर बोट ठेवता येत नाही. आता संध्याकाळी तुम्ही मारवा किंवा पूर्वी ऐकलात तर तुम्हाला उदास वाटतं पण ही उदासी ‘डिफाइन्ड’ असते. त्यात संभ्रमावस्था नसते. परंतु संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळचा एखादा राग ऐका. तुम्हाला एक अनामिक बेचैनी जाणवेल. ते गलबलून येणं वेगळं असतं.

ग्रेसच्या कवितेला चाल देणं म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग काढण्यासारखं आहे. जसं दिसतं त्याला महत्त्व नसून जे दिसतंय त्याची जाणीव रेखाटायची.

स्वप्ने अपुली
कुणी सजविली
रंग तिरावर व्याकुळसा

नाद उगाळून
सांज बनातून
कळप गुरांचा निघे जसा
या कडव्याला चाल देताना मी फक्त सांगितीक रचनेचा फॉर्म डोक्यात ठेवला. तीन ओळींचा एक बंध – असे दोन बंध. पहिल्या तीन ओळींच्या बंधात मी आरोही सुरावट रेखाटली आणि पुढच्या तीन ओळींच्या बंधात त्याचीच मिरर इमेज असावी अशी अवरोही स्वराकृती रेखाटली आहे असं तुमच्या ध्यानात येईल.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा

देह अनावर
निज मातीवर
हिम वर्षावित ये वारा
आता लक्षात येतं की दिवसभराच्या कडक उन्हात प्रवास करून नंतर ही उन्हं उतरताना पाहिली आहेत. त्यामुळे कविता जे सांगते, तेच गाण्याची चाल परत सांगत नाही. चाल ही कवितेचा prequel आहे आणि sequel ही आहे. कविता सुरू होण्याआधी जे अस्तित्त्वात होतं आणि ती संपल्यानंतर जे अस्तित्त्वात राहणार ते गाण्यात आहे.

‘माझ्या वक्षी निजती पक्षी’ हे एका विलक्षण आत्मिक शांततेचं द्योतक आहे. ‘अतुल सुखाची ही धारा’ असं ग्रेस म्हणतात तेव्हा त्याला पहिल्या बंधातल्या ‘या वळणाशी, दुःख उराशी’ – त्या दुःखाची पूर्वपीठिका आहे हे लक्षात ठेवायला हवं. दुःख उरात ठेवून ते वळण पार केलं आणि एका प्रचंड मोठ्या प्रवासानंतर अनुभवलेली ही ‘अतुल सुखाची धारा’ आहे. हा प्रवास एका जन्माचा असेल किंवा अनेक जन्मांचा असेल. मला यात ‘धारा’ हा शब्दही महत्त्वाचा वाटतो. धारा ही वाहत असते. ती स्टॅटिक नसते. हे जिवंत, वाहतं सुख आहे. ‘निज मातीवर’ देह अनावर होतो आणि वारा हिम वर्षावित येणं म्हणजे सगळा दाह शांत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे गाणं परत धृवपदावर न येता केवळ सूर राहतात आणि शब्द वितळतात!

© कौशल इनामदार


Sunday, March 1, 2026

भाषा जास्त वापरली तर टिकते

#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली. 

मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”

तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली. 

त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे. 

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. 

मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.

वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
कौशल इनामदार