Showing posts with label साहित्य - संस्कृती. Show all posts
Showing posts with label साहित्य - संस्कृती. Show all posts

Thursday, September 3, 2026

साहित्य - संस्कृती डॉ.महेश केळुसकर

पुढारी/ रविवार विशेष / ३० ऑगस्ट २०२६
--
साहित्य -  संस्कृती/ डॉ.महेश केळुसकर 
------------------
           कोकण साहित्यरत्न प्र.श्री.
          ****************************
        पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातील आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या नेरूर या गावी १४ फेब्रुवारी १९२२ रोजी प्रभाकर श्रीधर नेरुरकर उर्फ 'प्रश्री' यांचा जन्म झाला आणि २८ जून १९९८ रोजी ते परलोकवासी झाले. ७६ वर्षांच्या आपल्या आयुष्य प्रवासामध्ये प्रश्रींचा प्रत्येक श्वास आणि ध्यास फक्त कोकण आणि कोकणच होता. सिंधुदुर्गात,'रत्नागिरीत आणि मुंबईत त्यांच्या-माझ्या अनेक गाठीभेटी झाल्या, साहित्य चर्चा झाल्या, त्यातून मला हे कळलं की प्रश्री हे कोकणच्या साहित्य आणि संस्कृतीशी कायमची नाळ जोडून असलेले आणि नवीन लेखक- कवींना सतत उमेद आणि प्रोत्साहन देणारे मोठे साहित्यिक आहेत. 
           ' मुलांचे मासिक', 'बालसन्मित्र',  ' सुमनोद्यान',  आदी नियतकालिकांमधून शालेय जीवनापासून प्रश्रींचं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं. पुढे ते कथा लिहू लागले आणि त्या  'धनुर्धारी', ' हंस ',  'वसंत' मधून प्रसिद्ध होऊ लागल्या.  मराठी आणि इंग्रजी भाषांमधून त्यांनी मुक्त पत्रकारिता केली. सु. पाच दशकं सातत्यानं मराठी आणि इंग्रजी नियतलकालिकांमधून  त्यांचं समीक्षा लेखन गाजत राहिलं.  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि गोमंतक मुक्ती लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. साहित्यिकांच्या आणि विचारवंतांच्या अर्थपूर्ण मुलाखती घेण्याचा आगळावेगळा प्रयोग त्यांनी अनेक वर्षे केला. आपलं सुरुवातीचं ललित लेखन 'मौज'  सारख्या प्रतिष्ठित साप्ताहिककातून येण्यावर  त्यांनी कटाक्ष ठेवला.  आचार्य अत्रे संपादित 'दैनिक मराठा'चे गोवा सरहद्दीवरील अधिकृत वार्ताहर म्हणून त्यांनी गोमंतक मुक्ती संग्राम काळात काम केलं. नवी दिल्ली येथील 'सेंचुरी' या इंग्रजी साप्ताहिकात प्रश्रीनी मराठी साहित्य व साहित्य प्रकारांवर दहा वर्ष इंग्रजीतून लेखन केलं. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा 'सेंचुरी','लोटस' , 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि अन्य परदेशी नियतकालिकांमधून इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. प्रगत व दलित साहित्य चळवळीमध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील १९६०ते १९८० पर्यंतच्या वाटचालीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. 
विविध विषयांमध्ये रुची असलेल्या प्रश्रींनी १९६७ साली, महाराष्ट्राचे सर्कस महर्षी नारायणराव वालावलकर यांच्या 'दि ग्रेट रॉयल सर्कस' बरोबर पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस बेटावर मुक्काम केला होता.   मॉरिशस बेटावरील भारतीय जीवनावर आणि विशेषतः तिथे दीडशे वर्ष स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा आणि तिथल्या प्रचलित 'मोरस' मराठी भाषेचा संशोधन पूर्व समग्र शोध घेणारं लेखन प्रश्रींनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी आणि कुडाळी लोकबोलीतील लोकसाहित्यावर संशोधन आणि कोकणी लोकगीतांचं सभाष्य संकलन करण्यामध्ये प्रश्रींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचा 'कोकणी लोकगीते' हा ग्रंथ प्रकाशित केला. प्रश्रींची आणखी एक महत्त्वाची सांस्कृतिक कामगिरी म्हणजे अमेरिकेतील व आफ्रिकेतील ब्लॅक कवी आणि लेखकांच्या वाङ्मयाचा व्यापक अभ्यास तसंच 'Black Verse ' (काळी कविता) चा मराठीत विपुल अनुवाद. व्हिएतनामचे अध्यक्ष हो ची मिन्ह यांच्या इंग्रजी कवितांचा तसंच पाब्लो नेरूदाच्या कवितांचा त्यांनी केलेला मराठी अनुवादही गाजला.
               डायरी लेखन हे सुद्धा कोणत्याही भाषेतील साहित्याचं महत्त्वाचं आणि ऐतिहासिक अंग असतं,  असं प्रश्री यांचं म्हणणं होतं. ते स्वतः एक सर्जनशील 'डायरी लेखक' होते. आपल्या स्वतःच्या डायरी लेखनाबद्दल प्रश्री म्हणतात की "मला असं जाणवत आलं आहे की आपल्या जीवनातील जागृतीच्या काळात , जगत आणि धडपडत असताना आपली रिकाम्या पोत्यासारखी अवस्था झालेली असते. कधी ते पोतं भरतं ,'कधी भरतच नाही. त्याला छिद्रं आणि भोकं पडलेली असतात. ते टोकाटोकांनी उसवलेलं सुद्धा असतं आणि जेवढी काही अल्प स्वल्प त्या दिवसाची कमाई त्या पोत्यात भरायला जातो, तिच्यातील बराचसा भाग गळून गेलेला असतो. अशावेळी आंतरव्यापी जाणवणारी पोकळी डायरी भरून काढू शकते की काय हे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी मी डायरी लिहितो.खरं म्हणजे माझं डायरी लेखन हा मी केलेला एक प्रकारे आत्मगत लेखन प्रयोगच असतो. हे लेखन आत्मचिंतन, आत्म प्रकटन, आत्मशोध, आत्मपलायन आणि आत्मसंवाद असू शकतो." 
          कथा, कादंबरी, लघु निबंध, प्रवास वर्णन इत्यादी स्वरूपाचं विपुल लेखन केलं .आणि साहित्य हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्यांचा खरा पिंड शिक्षकाचा होता. मुंबईत आल्यावर प्रारंभी ते छबीलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले आणि पुढे वरळीच्या जनता हायस्कूलमध्ये आले आणि तिथेच १९८० मध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९७८ साली शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार लाभला .
लेखक म्हणून स्वतःची जडणघडण करत असताना आणि पुढे येत असताना,  प्रश्री नेरूरकर यांनी अनेक नवोदित लेखकांनाही घडवलं. दलित साहित्यातील आघाडीचे लेखक बाबुराव बागुल, दया पवार,  नामदेव ढसाळ,  अर्जुन डांगळे आणि नव्या उमेदीनं लेखन करणारे सुरेश कदम, पांडुरंग कदम, प्रकाश आणि शंकर खरात, उर्मिला पवार इत्यादींना नेरुरकरांचं मार्गदर्शन ऋण विसरता येण्यासारखं नाही. 
        दुसरी नेरूळकर तेही आपले गुरुवर्य रामभाऊ बर्वे यांचं रूम विसरले नाही रामभाऊंनी आपल्यावर साहित्याचे संस्कार केले आणि पुढे लेखक म्हणून आपल्याला दिशा मिळाली अशी नोंद त्यांनी करून ठेवली आहे रामभाऊ बर्वे आपल्या विद्यार्थ्यांना विशेषतः प्रश्रींना मराठी साहित्याची नवनवी पुस्तक आणून देत असत तसंच त्यांचे शिक्षक सिताराम प्रभू वालावल गावातील नारायणाच्या देवळाजवळ टोपीवाला वाचनालयाचे ग्रंथपाल ही होते ते आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणून वाचायला देत प्रतिभा साजण हे पुस्तक इंग्रजी तिसरीत असताना प्रश्न यांनी वाचलं विद्यार्थी तसेच असतानाच कश्रींनी वीस खांडेकर लक्ष्मणराव सरदेसाई विभाग कृष्ण कोल्हटकर वामन मल्हार जोशी अनंत काणेकर या आघाडीच्या लेखकांची पुस्तकं वाचली रवींद्रनाथ टागोरांची हरिभाऊ आपटे यांनी मराठीत अनुवाद दिलेली गीतांजली ही याच काळात त्यांनी वाचली हरिभाऊंच्या पण लक्षात कोण घेतो गड आला पण सिंह गेला उषःकाल या कादंबऱ्या वाचून ते झपाटून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस लेखक व्हायचं आणि तसे ते झाले.
*********