Friday, April 10, 2026

काव्य ७ माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
@eaksharman
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले भोळाभाबडा शालीन भाव शब्दावीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे
भात वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

बा. भ. बोरकर

काव्य ८ एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा

निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

@eaksharman
असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.

बा. भ. बोरकर

काव्य २ इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी 
लागली समाधी, ज्ञानेशाची


ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव 
नाचती वैष्णव, मागेपुढे


मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड 
अंगणात झाड कैवल्याचे


@eaksharman

उजेडी राहिले उजेड होऊन 
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई


ग. दि. माडगूळकर


काव्य ९ निळा पक्षी

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.

प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
@eaksharman

असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.

तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.

याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.

याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.


विंदा करंदीकर

निळा पक्षी

काव्य ६ देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥

तेच डोळे देखणे, जे कोंडीती साऱ्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥

देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥
@eaksharman

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्म रेखिती ॥

देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥

देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे ॥

देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥

बा. भ. बोरकर

काव्य ५ अर्थेविण पाठांतर कासया करावें

अर्थेविण पाठांतर कासया करावें । 
व्यर्थचि मरावें घोकूनियां ।। 

घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । 
अर्थरूप राहे होऊनियां ।। 

@eaksharman

तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी । 
नाहीं तरी गोष्टी बोलों नका ।।

संत तुकाराम
#eaksharman

काव्य ४ छोटेसे बहीणभाऊ

छोटेसे बहीणभाऊ 
उद्याला मोठाले होऊ 
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला 
नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा
होतील सुंदर बागा 
शेतांना, मळ्यांना, फुलांना, 
फळांना नवीन बहार देऊ

@eaksharman

मोकळ्या आभाळी जाऊ 
मोकळ्या गळ्याने गाऊ 
निर्मळ मनाने, आनंदभराने 
आनंद देऊ अन् घेऊ

प्रेमाने एकत्र राहू 
नवीन जीवन पाहू 
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे 
अनेक एकच होऊ

वसंत बापट
#eaksharman

 

Tuesday, April 7, 2026

गोष्ट १

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो ! 
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
#fbpost #share

Wednesday, April 1, 2026

काव्यरंग शाळा

आठवते मला ती शाळा,
आठवतो तो फळा,

आठवते शाळेत
जाण्यासाठी होणारी घाई,

उशिरा आल्यावर
ओरडणाऱ्या बाई,

आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे
दिलेले ते रट्टे,

शाळेतले ते कट्टे .....

आठवते मधल्या सुट्टीची ती बेल,

खेळून कसा जायचा तो वेळ,

आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,

अभ्यासाचा वाटणारा तो कळस,

आठवते ती घरी जाण्याची घाई,

आपली घरी वाट
पाहणारी ती आई...

अनामिक

काव्य ३ चारोळ्या


माझी गोष्ट नेहमीची...
तुम्हाला साधी सुद्धा वाटेल
कारण जे तुम्हाला ऐकायचय
सांगताना तेच माझ्या हातनं सुटेल

सुखी माणसाच्या मनात कायम
दू:ख गाठेल ही भीती
मग मला सांगा जगामध्ये
सुखी माणसं किती? 

आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....

@eaksharman
सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

#चंगो

Saturday, March 28, 2026

देव

*जय जय श्रीराम*

देव असतो मनात, देव वसतो हृदयात 
देव हसतो कानात ,देव जीवन चराचरा.. *रामचंद्र स्मरा*

देव भावाचा भुकेला,देव धावतो हाकेला
देव जागतो प्रेमाला,देव या जन्मी आसरा.. *श्रीराम स्मरा* 

देव नाही नुसता दगड, देव नाही रे थोतांड 
देव नाही कर्मकांड, नाही दानवास थारा.. *राजाराम स्मरा#*

देव मानला की दिसे, अन्यथा पोकळ वासे
देव जाणला की पिसे, देव चुकवी जन्मोजन्मीचा फेरा. *रघुवीर स्मरा*

देव मूर्त की अमूर्त,की देव कल्पना अद्भुत
देव आस्तिकासी अमृत,देव दिव्य दिगंतरा.. *राघवेंद्र स्मरा*

देव नित्य निरंजन ,देव अंतरीची आभा 
देव प्रत्येक कणात,देव नये हाती कासरा.. *रघुनाथ स्मरा* 

देव वसतो मनात,देव प्रकटे मंदिरात
देव रमतो अंतरी, रामराज्य यावे घरा..*दाशरथी श्रीराम स्मरा* .. 

*श्रीराम जयराम,रघुपती राघव राजाराम !!!*🙏

© सौ मंजूषा विवेक थावरे

राम जन्मला

राम जन्मला..
.
आपले ध्येय सर्वभूतस्थित रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे आणि सूक्ष्मरूपाने हृदयस्थ ईश्वर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी हे निर्गुण ब्रह्म सगुण रूप धारण करते. त्या सगुण रूपाला आधी जाणू या.
वाल्मीकींनी नारदांना प्रश्न केला, हे महर्षी, या वेळी या भूलोकावर गुणसंपन्न असा कोण आहे? वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, सदाचारी, विद्वान, समर्थ, प्रियदर्शन मनोनिग्रही, क्रोधाला जिंकलेला, तेजस्वी असा कोण आहे? हे जाणण्यास मी उत्सुक आहे. आपण तो सांगायला समर्थ आहात. तेव्हा नारदमुनी आनंदित होऊन म्हणाले, ‘इश्वाकुकुळात जन्मलेला राम आत्मसंयमी, महावीर्यवान, तेजस्वी, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिमान, वक्ता, वैभवशाली आणि शत्रुनाशक आहे. यानंतर नारदांनी अगोदर श्रीरामाचे वर्णन केले. त्यानंतर रामाच्या यौवराज्याभिषेकापासून ते राज्याभिषेकापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना कथन केल्या.
नारदांकडून हे रामचरित्र श्रवण केल्यावर वाल्मीकी माध्यान्ह स्नानासाठी तमसा नदीवर जात असताना त्यांना क्रौंचवधाचे ते दुष्कृत्य पाहायला मिळाले. त्यांच्या मनात करुणा आली आणि त्यांनी श्लोकबद्ध शापवाणी उच्चारली. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले,
.
‘हे वाल्मीकी, मम इच्छेने, जिव्हाग्रे सरस्वती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’ ब्रह्मदेव वदती।
.
‘तोच मनोहर धर्मात्मा तो, धीर, वीर जगती, 
आत्मसंयमी, जितेंद्रिय तो धर्माची मूर्ती 
कथिली तुजला देवर्षिने रामचरित महती,
वर्णन कर तू रामचरित्रा,’ ब्रह्मदेव वदती।
.
रक्षणकर्ता धर्माचा तो, सत्यवचनी कीर्ती, 
कालाग्नि जणु क्रोधे, तरीही क्षमेत तो धरती,
महावीर तो शत्रुनाशक, करुणेची मूर्ती, 
वर्णन कर तू, रामचरित्रा, ब्रह्मदेव वदती।
.
विदीत होईल सर्व तुला ते करतलामलकवती,
सादर कर मग, रामकथेला, प्रासादिक अनुभूती,
जोवर पर्वत नद्या भूतली, श्रद्धा रामाप्रति,
वर्णन कर तू रामचरित्रा, ब्रह्मदेव वदती |
.
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी यथाविधी आचमन करून हात जोडून बसले असता योगधर्मामुळे श्रीरामचरित्राचे त्यांना ज्ञान होऊ लागले. वनवासात घडलेल्या घटनाही त्यांना करतलामलकवत म्हणजे करतळावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागल्या. याप्रमाणे संपूर्ण चरित्र अवलोकन केल्यावर त्यांनी रघुवंशामध्ये अवतीर्ण झालेल्या श्रीरामाचे चरित्र ग्रथित केले ते रामायण. 
दशरथ राजा प्रतापी होता, धर्मज्ञ होता, उदार अंत:करणाने युक्त होता. पण त्याला वंश चालविणारा पुत्र नव्हता. त्याने वसिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ चालू असताना अग्नीतून एक महापुरुष निघाला. त्याच्या हातात दिव्य पायसाने भरलेली थाळी होती. त्याने दशरथाला ते पायस (खीर) त्याच्या राण्यांना द्यायला सांगितले. त्याप्रमाणे दशरथ राजाने आपल्या राण्यांना ते पायस विभागून अर्पण केले. 
कौसल्येला पायसाचा अर्धा भाग दिला. सुमित्रेला अगोदर एक चतुर्थांश व नंतर पुन्हा एक अष्टमांश भाग दिला. कैकेयीला एक अष्टमांश भाग दिला. राण्यांनी ते पायस भक्षण केल्यावर त्यांना गर्भधारणा झाली.
अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर सहा ऋतू लोटल्यावर चैत्रातील शुद्ध नवमीला लोकांना पूज्य असा जगदीश्वर राम कौसल्येच्या ठिकाणी उत्पन्न झाला.
.
अश्वमेध यज्ञ पूर्ण, हो ऋतु सहा,
द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा, 
पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु,
कर्क राशी असती लग्नी, चंद्र नी गुरू,
कौसल्येस दिव्य असा पुत्र जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
.
विष्णुचा अवतार, इश्वाकुनंदन, 
लोहिताक्ष  महाबाहु, उच्च रोदन,
इंद्रवरे, तेजस्वी अदिती शोभते,
कौसल्या पुत्रयोगे तशीच भासते,
गगनातून सुमनांचा वर्षाव जाहला,
जगदीश्वर, पूजनीय राम जन्मला।
.
या दिव्य बालकाचे नेत्र आणि ओठ लालसर, बाहू लांब असून ते बालक सर्व शुभचिन्हांनी युक्त होते. कौसल्येच्या या भागामध्ये भगवान विष्णूच्या शक्तीचा निम्मा भाग प्रकट होत होता. विष्णूने  अवतार घेतला..राम जन्मला...
.
.
सौ. शैलजा भा. शेवडे

ग्रेस


ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून जाणवण्याचीच गोष्ट आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की “कवीला काय म्हणायचंय?” असा शाळेत विचारलेला प्रश्न निरर्थक असून खरा प्रश्न “कवितेला काय म्हणायचंय?” असा असायला हवा. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की दर वेळी उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही, प्रश्नही रेंगाळू द्यावे मनात. ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की ग्रेसच्या कवितेचे गूढरम्य प्रदेश फिरायचे तर हातात संगीताची मशाल हवी!

संगीतकारांना ग्रेसच्या कवितेचं प्रचंड आकर्षण वाटतं याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. संगीतकारांना ग्रेस हा आपला कवी वाटतो कारण त्यांची कविता ॲब्स्ट्रॅक्शन्समधे संवाद साधते. ही ॲब्स्ट्रॅक्शन्स संगीतात अनुवादित करताना संगीतकाराचा कसही लागतो आणि अपार आनंदही मिळतो! म्हणून ग्रेसच्या काव्याला बहुतेक संगीतकारांनी दिलेल्या चाली उत्तमच वाटतात! हृदयनाथ मंगेशकरांपासून श्रीधर फडकेंपर्यंत आणि आनंद मोडकांपासून नरेन्द्र भिडेपर्यंत सर्व संगीतकारांना ग्रेसची मोहिनी पडलेली आहे.

उन्हे उतरली
एक सावली
पुढे दिठीवर थेंब नवा
या वळणाशी
दुःख उराशी
सूर वितळतो जणू भगवा
ग्रेसच्या कवितेतली पहिली चित्तवेधक बाब म्हणजे चित्रमयता. उन्हं उतरणीला आगली आहेत आणि संध्याकाळीच दिसते अशी लांब सावली आपल्याला दिसतेच; पण पुढच्या तीन ओळी ॲब्स्ट्रॅक्ट असल्या तरीही ‘तो वितळणारा भगवा सूर’ आपल्याला अवकाशात दिसत राहतो. मला एक गंमत आढळली. मी केलेल्या ग्रेसच्या तीन कवितांच्या संगीतरचना करताना या तिन्ही कविता संध्याकाळच्या असूनही मी सकाळच्या रागांची धून वापरली आहे! हे असं अभावितपणे झालं असलं तरी त्याचं एक कारण आहे हे मला नंतर जाणवलं. ग्रेसच्या कवितेमध्ये एक अनामिक अशी बेचैनी आहे. बेचैनी जाणवते पण त्यावर बोट ठेवता येत नाही. आता संध्याकाळी तुम्ही मारवा किंवा पूर्वी ऐकलात तर तुम्हाला उदास वाटतं पण ही उदासी ‘डिफाइन्ड’ असते. त्यात संभ्रमावस्था नसते. परंतु संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळचा एखादा राग ऐका. तुम्हाला एक अनामिक बेचैनी जाणवेल. ते गलबलून येणं वेगळं असतं.

ग्रेसच्या कवितेला चाल देणं म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग काढण्यासारखं आहे. जसं दिसतं त्याला महत्त्व नसून जे दिसतंय त्याची जाणीव रेखाटायची.

स्वप्ने अपुली
कुणी सजविली
रंग तिरावर व्याकुळसा

नाद उगाळून
सांज बनातून
कळप गुरांचा निघे जसा
या कडव्याला चाल देताना मी फक्त सांगितीक रचनेचा फॉर्म डोक्यात ठेवला. तीन ओळींचा एक बंध – असे दोन बंध. पहिल्या तीन ओळींच्या बंधात मी आरोही सुरावट रेखाटली आणि पुढच्या तीन ओळींच्या बंधात त्याचीच मिरर इमेज असावी अशी अवरोही स्वराकृती रेखाटली आहे असं तुमच्या ध्यानात येईल.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा

देह अनावर
निज मातीवर
हिम वर्षावित ये वारा
आता लक्षात येतं की दिवसभराच्या कडक उन्हात प्रवास करून नंतर ही उन्हं उतरताना पाहिली आहेत. त्यामुळे कविता जे सांगते, तेच गाण्याची चाल परत सांगत नाही. चाल ही कवितेचा prequel आहे आणि sequel ही आहे. कविता सुरू होण्याआधी जे अस्तित्त्वात होतं आणि ती संपल्यानंतर जे अस्तित्त्वात राहणार ते गाण्यात आहे.

‘माझ्या वक्षी निजती पक्षी’ हे एका विलक्षण आत्मिक शांततेचं द्योतक आहे. ‘अतुल सुखाची ही धारा’ असं ग्रेस म्हणतात तेव्हा त्याला पहिल्या बंधातल्या ‘या वळणाशी, दुःख उराशी’ – त्या दुःखाची पूर्वपीठिका आहे हे लक्षात ठेवायला हवं. दुःख उरात ठेवून ते वळण पार केलं आणि एका प्रचंड मोठ्या प्रवासानंतर अनुभवलेली ही ‘अतुल सुखाची धारा’ आहे. हा प्रवास एका जन्माचा असेल किंवा अनेक जन्मांचा असेल. मला यात ‘धारा’ हा शब्दही महत्त्वाचा वाटतो. धारा ही वाहत असते. ती स्टॅटिक नसते. हे जिवंत, वाहतं सुख आहे. ‘निज मातीवर’ देह अनावर होतो आणि वारा हिम वर्षावित येणं म्हणजे सगळा दाह शांत होण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे गाणं परत धृवपदावर न येता केवळ सूर राहतात आणि शब्द वितळतात!

© कौशल इनामदार


Sunday, March 1, 2026

भाषा जास्त वापरली तर टिकते

#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली. 

मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”

तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली. 

त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे. 

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. 

मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.

वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
कौशल इनामदार

Tuesday, October 7, 2025

post 2

तुझी तू रहा

कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा. .

हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील
हसण्यावर,अश्रूंवर
तुझी सत्ता ठेवून रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा...

मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणा-या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा........

काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडणारीच
फुले वेचीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

उसने मुकुट कुणी
घालतील
जरी-अंगरखे पेहेरून
सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

मग कुठेतरी कमळे
फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत
तोवर तू गात रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा....

- संजीवनी बोकील

post 1

व.पु.काळे.
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.. साय म्हणजे गुलामी नव्हे.. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.. मैत्री तशी असावी.. दुधापेक्षा स्निग्ध.. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात..तसं मैत्रीचं घडावं.. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा....

Friday, September 12, 2025

लेख

हल्ली उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बेवारस वासरं पाळायचा दौर आलाय, अर्थात त्यांची घरं मोठी आहेत, त्यांच्या घराला मागे पुढे आवार आहेत. पण तरी हा विचार च किती सुंदर आहे. पण याचा प्राॅपगंडा कोणी करणार नाही.दोन वर्षांपूर्वी मी याच आशयाची एक कथा लिहीली होती, चांगला प्रतिसाद मिळाला होता किती जण चाँद सुरज ला पहायला सफाळ्याला जायला तयार होते. म्हणजे आपण ही असा विचार करू शकतो. दाक्षिणात्य अभिनेते तर गायींची सेवा आणि पूजा करतानाचे रील्स व्हायरल करतायत, जयपूर उदयपुर, कोटा, बुंदी अशा शहरात तर कधीपासून वासरं घरात पाळायला सुरुवात झाली. त्यांचा अनुभव असा वासरं लवकर शिस्त शिकतात त्यांच वेळापत्रक फार वक्तशीर असतं लाडात येऊन पिझ्झा बर्गर, गोड पदार्थ त्याना खायला द्यायचे नाहीत, चांगली शेकलेली भाकरी पोळी जरूर द्यावी पण चारा, भुईमूगाची टरफलं, शेंगा,कडबा हाच त्यांचा मुख्य आहार .वासरं ठराविक वयात दंगा करतात तेवढे चार पाच महिने जपावं लागतं मग एकदम शांत होतात 
या अशा घरात रमलेल्या गायींचे किस्से खूप ऐकण्या सारखे असतात. जयपूर जवळ एका गर्भश्रीमंत घरात असाच गायींचा कळप पाळला होता.काही कामा निमित्त घरचे कर्ते पुरुष बाहेर गावी कामा साठी गेले असताना त्यांच्या गाडीला जिवघेणा अपघात झाला बरोबर त्याच वेळी कळपातील काही गायी इतक्या अस्वस्थ झाल्या की घरचे त्यांचे विचित्र वर्तन बघून घाबरले.एक गाय तर देवघराच्या बंद दरवाजाला धडका देत होती.इतक्यात अपघाताची वार्ता समजली.पुढे ते दोघे बंधू शुध्दीवर येई पर्यंत या गायी व्रतस्थ राहिल्या. धोका टळल्याचं कळल्यावर एकच जल्लोष झाला तेव्हा या गायींना ताक मिश्रीत पाणी देण्यात आलं.पुढे त्यांची मानाची मिरवणूक ही निघाली कारण ज्या पध्दतीचा अपघात होता त्यात हे बंधू बचावणं असंभव होतं.
माझे मित्र म्हणाले कुत्रे मांजरं पाळण्या इतकच गायींना घरात स्थान देणं सोपं आहे.

© चंद्रशेखर गोखले

Tuesday, September 9, 2025

कथा १

आर आर आबांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने पार्थिवावर हंबरडा फोडला. खालच्या चार ओळी जरूर वाचा. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
.
एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
.
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
#कथाविश्व 
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...
.
'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
Fb group post