Showing posts with label संग्रहित. Show all posts
Showing posts with label संग्रहित. Show all posts

Sunday, July 19, 2026

नाती तुटताना...

"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.

खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता. 

एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.

शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.

©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati

Friday, May 15, 2026

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...

'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत... 
'नाडकर्णी गेले' या मित्राच्या मेसेज नं दिवसाची सुरुवात झाली आणि एखादा दोर कापून आपल्याला अंधारात कुणीतरी अधांतरी केल्यागत झालं. 
आपापल्या डबक्यात रमलेल्या माणसांना आरोग्य आयुधांनी प्रवाही करणारा, मनावर ओझी असणाऱ्या माणसांनां नुसत्या गप्पांनी पिसागत हलकं वाटवणारा, आपल्या कोवळ्या आणि सैल मनानं कागदावर सुंदर 'आनंदरेषा' काढणारा, आणि महाराष्ट्राचं मानसिक आरोग्य जागेवर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारा, अतिशय मोलाचा माणूस आपण आज गमावला.  
  
'शहरी लोकांची थेरं' वाटणाऱ्या सायकोलॉजी ला त्यांनी भाषा, प्रांत, परिस्थिती यांच्या सीमारेषा तोडून 'मानसिक आरोग्य' करून मराठी समाजाच्या रोजच्या जगण्यात आणलं. ज्या काळात मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे 'वेड लागलंय' असा समज होता त्या काळात 'शहाण्यांचे डॉक्टर' म्हणून उपचार आणि समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोचेल यासाठी ते दिवसरात्र झटले.

काकांनी अस्थिर मनांना स्थिर केलं, गैरसमजात गुरफ़टलेल्याना डोळस केलं, कधी लोकांना बोलू दिलं, कधी फक्त वाहू दिलं, मोकळं होऊ दिलं, अनेक जीवांची परवड थांबवली तर अनेकांची अनेक वर्षांची खदखद संपवली. त्यांच्यामुळे उभ्या राहिलेल्या माणसांची आणि घरांची संख्या काढली तर ती सहज काही हजारात भरेल. यावरून त्यांच्या कामाची महती सहज लक्षात येईल.
 
संबंध महाराष्ट्रात जिथं आज खरात सारख्या बाबा बुवांनी समाजाला आंधळं करून अक्षरशः पाहिजे तसं नासवलंय तिथे डॉकटर नाडकर्णीं सारख्या 'डोळस' करणाऱ्या माणसाचं जाणं खरोखर जिव्हारी लागणारं. 

"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हि ओळ ज्यांच्याबाबतीत मी पाहिली, ज्यांच्याबरोबर अप्रतिम गप्पा, चर्चा करायची संधी मिळाली, ज्यांच्या सहवासानं,आपुलकीनं कायम अदृश्य आधार मिळाला, आणि ज्यांच्या मिश्किल उत्तरानी आयुष्यभराची वाट सापडली ते डॉक्टर नाडकर्णी आता नसणार आहेत, त्यांनी महाराष्ट्र्राच्या मनावर उमटवलेल्या 'आनंदरेषा' पुसू न देणं ही आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे.
अलविदा काका. तुम्ही जिथे असाल, वाऱ्यावर बसून तिथलं सुंदर स्केच काढत असाल हे नक्की!

♥️♥️🙏🙏🌼🌼

क्षितिज  पटवर्धन

अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी

*अथांग मनाचा समुद्र..*

आज मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने महाराष्ट्राने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. 

मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर हजारो लोकांना जगण्याची नवी दिशा दिली. 

मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अमूल्य राहिले. 

लेखन, व्याख्यानं, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आणि व्यसनमुक्तीच्या कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. 

त्यांची भाषा अभ्यासपूर्ण असूनही अत्यंत साधी आणि माणुसकीने भरलेली होती. म्हणूनच ते फक्त डॉक्टर नव्हते, तर अनेकांसाठी विश्वास देणारे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना मनःपूर्वक आदरांजली.

*“काही माणसं आयुष्य संपल्यानंतरही त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून सतत जिवंत राहतात…*

डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यापैकीच एक.”

आपलं मानसशास्त्र परिवारातर्फे या अथांग मनाच्या समुद्राला भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

@राकेश वरपे

#dranandnadkarni 

Sunday, May 3, 2026

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात

*पालकांचे मार्गदर्शन = भाग २०*

_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात?_

भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा खरंच आवश्यक आहेत का, हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात येतो. 

मुलांच्या विकासासाठी फक्त महागडी शाळा किंवा मोठी इमारत महत्त्वाची नसते. त्यापेक्षा शिकण्याचे वातावरण, शिक्षकांचा दृष्टिकोन आणि घरातील भावनिक आधार अधिक प्रभावी ठरतो.

मुलांच्या मेंदूचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास सुरक्षित, प्रेमळ आणि प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात अधिक चांगला होतो. 

काही वेळा मोठ्या शाळांमध्ये सुविधा चांगल्या असतात, पण त्यामुळेच मुलं अधिक यशस्वी होतील, असे नाही. 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं, मुलांना मिळणारे वैयक्तिक लक्ष आणि त्यांच्या प्रश्नांना दिलेले उत्तर याचा परिणाम शिक्षणावर जास्त होतो.

तसेच, जास्त फी असलेल्या शाळांमुळे पालकांवर आर्थिक ताण येऊ शकतो. हा ताण नकळत घरातील वातावरणावर परिणाम करतो.

आणि मुलांनाही त्याची जाणीव होते. 
त्यामुळे घरातील ताण, चिंता किंवा दबाव मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

मुलांना आत्मविश्वास, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी मोठ्या शाळेपेक्षा योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. 

साध्या शाळेतही चांगले शिक्षक आणि सकारात्मक वातावरण असेल, तर मुलं उत्तम प्रगती करू शकतात.

म्हणूनच, शाळा निवडताना फक्त फी किंवा ब्रँड बघण्यापेक्षा मुलांच्या गरजा, त्यांचा स्वभाव आणि त्यांना मिळणारे वातावरण यावर लक्ष देणे अधिक योग्य ठरते. 

शेवटी, मुलांच्या यशामागे शाळेपेक्षा त्यांची शिकण्याची आवड आणि पालकांनी दिलेला वेळ अधिक महत्त्वाचे असते.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

पालक-बालक संबंधित विषयावर तुम्हाला आणखीन काय वाचायला आवडेल मला नक्की सांगा. आजच्या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

योग्य वयात मुलांचे करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन करून घ्या. संशोधनानुसार ८ वी ते १२ वी हा मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. करिअर चाचण्यांसाठी ९१३७३००९२९ या क्रमांकावर फोन किंवा व्हाट्सअप करू शकता.

धन्यवाद!

*©️ राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ*

#rakeshvarpe #parenting

Sunday, April 19, 2026

पुस्तक परिचय

नमस्कार,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या #जगणं_होईल_हिरवंगार या माझ्या कवितासंग्रहावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. सावंत सरांचे आणि म.टा. संपादकांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌿

जगणं सुंदर करणारी कविता 
...........................................

एखाद्या साहित्यिकाचे एखाद्या वाङ्मयप्रकारांतील कार्य अधोरेखित झाले, की इतर वाङ्मयप्रकारांतील त्याचे लेखनकर्तृत्व झाकोळले जाते किंवा नजरेआड केले जाते. बालसाहित्यकारांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. एकदा का तुमच्यावर 'बालसाहित्यकार' असा शिक्का बसला, की मग तुमच्या उर्वरित वाङ्मयप्रकारांतील लेखनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकनाथ आव्हाड यांच्या बाबतीत हे विधान अगदी खरे आहे. खरं तर सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण एकनाथ आव्हाड यांना ती साध्य झाली आहे. एकनाथ आव्हाड हे अव्वल दर्जाचे बालसाहित्यकार आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या बालसाहित्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या कवितेकडे म्हणावे तसे लक्ष वेधले गेले नाही. एकनाथ आव्हाड यांच्या सहज सुंदर कवितेकडे साहित्यविश्वाचे लक्ष वेधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

एकनाथ आव्हाड हे गेली ३०-३५ वर्षे साहित्यसाधना करत आहेत, म्हणजे ते केवळ बालसाहित्यच लिहीत आहेत, असे नव्हे. त्यांनी इतर वाङ्मयप्रकारांतही लक्षणीय लेखन केले आहे. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेली कविता आता 'जगणं होईल हिरवंगार' ह्या संग्रहरूपात येत असली, तरी ते काही नवोदित कवी नाहीत. त्यांचा कवितेचा व्यासंग जुनाच आहे. त्यांना चांगली 'कविता' लिहिता येते, म्हणूनच त्यांची 'बालकविता' साहित्य अकादमीकडून सन्मानित झाली आहे. कवीला शब्दांचे सामर्थ्य समजलेले आहे. म्हणूनच कवीने
'कसं सांगू शब्दांनी
मला काय दिलं?
सच्चेपणा, निर्मळ मैत्री
माझं मन जागं केलं'.
ह्या शब्दांत शब्दांचे ऋण व्यक्त केले आहे.
हा कवी शब्दांचा ऋणाईत आहे. ही कविता अभिव्यक्तीच्या स्तरावर फारच प्रांजळ आहे. 'जगणं होईल हिरवंगार' ह्या शीर्षकातही एक अटळ विश्वास आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेकांच्या घागरी उताण्या पडल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी सर्वत्र वणवण चालली आहे. दुष्काळाच्या झळा ठाण मांडून बसल्या आहेत. गावाला आणि आयुष्याला विळखा घालून. राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता ह्या दु:खात आणखी भर घालते आहे. त्यामुळे अस्वस्थता, अस्थिरता आणि अशांतता व्यापून उरली आहे, घरात आणि मनातही! प्रत्येकाचे
'दोन्ही हात अडकलेत
वांझोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
निराशेचा काळोख
अधिकच गडद झालाय'.
असं भोवतालाचं गडद चित्र ही कविता उभे करते.

संगणकयुगात मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याची खंत ही कविता व्यक्त करते.
'इथे काहींच्या पायाला
भिंगरीसारखी चाकं
आणि काही फुटलीत अहंकाराची टोकं.'
अशा शब्दांत ही कविता समकाळावर अचूक भाष्य करते. आभासी दुनियेतली कुचंबणा ही कविता शब्दांत बांधते.
'ऑनलाईन' ह्या कवितेत कवीने आभासी जगाची मनोवस्था नेमकेपणाने पकडली आहे.
'फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे नातं सुरू
आणि अनफॉलो केलं म्हणजे शेवट
इतका सहज आणि भावनाशून्य झालाय
नात्यांचा व्यापार.
आजच्या डिजिटल जगात चमकणारी नाती
फॉलोअर्स वाढले की आनंद देतात
प्रतिसाद कमी होताच अस्वस्थता वाढवतात.
इथे अट एकच
ही आभासी नाती टिकवण्यासाठी
मनात ओलावा नसला तरी चालेल,
पण सतत ऑनलाईन मात्र असलं पाहिजे'.
ह्या कवितेत उपहास आहे आणि उपरोधही आहे. वास्तवाला भिडणारी ह्या कवितेची ताकद वाखाणण्यासारखी आहे.

कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डोक्यावरील पाटीतून भाजीपाला विकून मुलाला घडविणाऱ्या मातेबद्दल कवीला नितांत आदर आणि कृतज्ञता वाटणे स्वाभाविकच आहे. प्रस्तुत संग्रहातील आईविषयक १३ कविता म्हणजे कवीची आणि आईची नाळबंधाची कहाणीच आहे. यांतील काही कविता आईचे स्वभावचित्र रेखाटतात. 
'तिचे घरात पाऊल पडताच
सूर्यप्रकाशाची तिरीप आली घरात
आणि काळवंडलेला घराचा 
हळूहळू प्रकाशमान व्हायला लागला'
हा कवीचा अनुभव आहे. असे वळण घेत ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. 
कुठल्याही विद्यापीठात न गेलेली कवीची आई कवीला सोप्या सोप्या गोष्टींतून जगणं सोपं करून सांगत असते. आईने साध्यासुध्या गोष्टींतून कवीच्या मनावर कृतज्ञता हे मूल्य जाणीवपूर्वक बिंबवले आहे. त्यामुळे कवी कृतज्ञता हे जीवनमूल्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो. 

वठलेल्या झाडालाही पालवी फुटते. आंतरिक धडपडीतून नदीला तिचा स्वतंत्र मार्ग सापडतो. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षी आपले घरटे घडवतात. धरतीची व्याकूळता पाहून आभाळालाही पान्हा फुटतो. हे सगळे दाखले देऊन आई म्हणते
'आपल्यालाही असंच 
झाडासारखं रुजून येता आलं, 
नदीसारखं पुढे जाता आलं, 
आभाळासारखं विशाल होता आलं
अन् पाखरासारखं 
चिवटपणे जगण्याला तोंड देता आलं की
जगणंही आपल्याकडं हरखून पाहतं
अशा वेळी अंगावर धावणाऱ्या अंधारालाही
निक्षून परतवून लावता येतं' 
अशा प्रकारे जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी आणि प्रकाशाची वाट दाखविणारी श्रममूर्ती आई हे कवीच्या आयुष्यातील प्रकाशाचे बेट आहे. ह्या कवितेतली मातृप्रतिमा ही अतिशय उच्च कोटीतली आहे. 

हल्ली माणसा-माणसांतला संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत कवीची अशिक्षित आई कवीला म्हणते
'जगाशी बोलायला धावताना 
आधी स्वतःशी बोल, थोडा वेळ काढून 
आतला आवाज ऐक, अधीर होऊन. 
मग संवाद फुलून येईल आपसूक फुलासारखा'. 
इतका छान, आत्मसंवाद साधण्याचा सल्ला देणा-या आईला अशिक्षित कसे म्हणता येईल? 
जेव्हा कवी आपला पहिला पगार आईच्या हाती सोपवतो, तेव्हा हीच आई म्हणते, 
'कष्टाला अहंपणा चिकटू देऊ नकोस 
यश तेव्हाच शोभून दिसेल'. 
अहंपणाचा आणि कर्मफळाचा त्याग करायला शिकवणारी आई स्थितप्रज्ञ खरी! 
लेकरांची झोपमोड होऊ नये, त्यांची पहाटस्वप्नं कोमेजू नयेत, म्हणून घरात हळुवार काम करणारी आई दिवसरात्र कुटुंबासाठी राबत असते. म्हणून कवीला आपल्या आईची सावली डेरेदार झाडासारखी वाटते. एकनाथ आव्हाड यांची कविता सोप्या शब्दांत जगण्याचे मर्म सांगून जाते. 

ही आई एकदा म्हणते, 
'आयुष्याची वाट तुडवताना 
माणसानं जर वाटेत सौख्याच्या बिया पेरल्या ना
तर जगण्याचं समाधान लाभतं त्याला'. 
इतरांच्या वाटेवर सौख्याच्या बिया पेरण्याची शिकवण देणारी आई आभाळासारखी थोर असणार यात शंकाच नाही. आईच्या शिकवणीची उजळणी करताना कवीने लिहिले आहे :
'माझ्या प्रकृतीत तिची संस्कृती रुजवून
माझ्या बेढब मनाला ती आकार देत असते'. 
ह्या श्रमवंत आईची कथाच निराळी आहे. ती कष्टाचं रान तुडवत आशेची फुलं वेचायची. अंगात हत्तीचं बळ घेऊन पडेल त्या कामाला जुंपून घ्यायची. तिने चांदणं बरसणारा चंद्र दूर लोटून प्रकृतीला साद घालणारा सूर्य जाणीवपूर्वक पदरात बांधून घेतला होता. एकनाथ आव्हाड यांची कविता त्यांच्या स्वभावासारखीच शांत आणि संयत आहे. ती कधीही आक्रमक आणि आक्रस्ताळी होत नाही, तर वाचकमनाशी सहजसंवादी अशी ही कविता आहे. 

आई ही आपला पहिला गुरू असते, म्हणून कवीला आपल्या आईची शिकवण ही शिकवणीसारखी वाटत नाही, तर ते तिच्या अनुभवाचं संचित आहे, असे कवीला वाटते. ह्या अनुभवसंपन्न आईच्या मुखातून जीवनाचं तत्त्वज्ञानच झिरपते आहे. अशा १३ कवितांमधून कवीने आपल्या आईच्या आयुष्याची परवड, तिचे दु:ख, तिचे थोरपण, तिचे समर्पण, तिचा त्याग, तिची हिंमत आणि तिची जीवनाभिमुख शिकवण सांगितली आहे. ह्या कविता वाचत असताना कवी महन्मंगल मातृस्तोत्र गुणगुणतो आहे, असेच वाटत राहते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. कविसंमेलनांतून टाळ्या मिळवणारी ही कविता नाही, तर अतिशय चिंतनशील अशी ही कविता आहे. 

आईच्या शिकवणीतून जसे जगण्याचे तत्त्वज्ञान प्रगटले आहे, तसेच अन्य काही कवितांमधूनही ते वाचकांपर्यंत पोहोचले आहे. हल्ली 'समजूतदारपणाची गैरहजेरी' वाढली आहे. माणूस दिवसेंदिवस असमंजस आणि हिंस्र बनत चालला आहे. अशा परिस्थितीत कवीने लिहिले आहे :
'भांडणाचे रूपांतर मग वैरात
दुर्विचारांची विषवल्ली
फोफावते आयुष्यात
आणि मग
मनाचे कवाड
कुलूपबंद होऊन जाते
खरंच...
समजूतदारपणाची गैरहजेरी लागली की
सगळंच कसं भयंकर होऊन जातं'.
आणि हे भयंकर परिणाम टाळायचे असतील, तर समजूतदारपणाला पर्याय नाही, हेच कवीने यातून सूचित केले आहे.

मानवी जीवनात दु:ख सर्वव्यापी आहे, हे खरेच
पण दु:खालाही आपलंसं केलं,
दु:खातच सुख शोधलं, की
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं,
आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू.
तेव्हा सोपं होऊन जातं जगणं
आपण आपल्या लोभापायी, हट्टापायी
ते उगीचच अवघड करून टाकतो'.
ह्या कवितेत कवीने जणू जगणं सोपं करण्याचाच मूलमंत्र दिला आहे. ही कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मुक्तीचे मार्गही सुचविते. कवीची ही सकारात्मक जीवनदृष्टी मला फार महत्त्वाची वाटते. 

मानवी हव्यासाने हल्ली परमावधी गाठली आहे. सतत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे, फसव्या सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावाधाव केल्यामुळे अंतःकरणातील अंधार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कवी म्हणतो :
'हे दुष्टचक्र भेदण्यासाठी
आता एकच पर्याय उरलाय
प्रत्येकाने दीप व्हावे
आपल्या मनात उजेड भरून घ्यावा
अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविण्यासाठी'.
ही कविता म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या 'अत्त दीप भव' ह्या संदेशाचा विस्तार आहे, असे मला वाटते. ही कविता मनाच्या संकुचितपणाला हादरे देते आणि सद्विचारांना सामावून घेण्यासाठी मनाचा पैस निर्माण करते. 

माणूस निसर्गापासून दुरावत गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून कवीने त्यावर एक उपाय सुचवला आहे :
'माणसं झाडासारखी वागल्याशिवाय
खरं नाही त्यांचं काही आता
आणि पाखरंही तेव्हाच परत येतील
जेव्हा माणसात एक झाड उगवून येईल'.
माणसात झाड उगवून येण्याची कल्पना काव्यमय वाटत असली, तरी ती काळाची गरज आहे, यात काही शंकाच नाही.
कधीकधी 
'बाहू पसरून झाडे
घेती कवेत आभाळ
आभाळाच्या गळ्यात
सावळ्या मेघांची माळ'
अशा तरल शब्दांत ही कविता निसर्गचित्र रेखाटते.

घर म्हणजे केवळ दगड-विटांनी बांधलेला चार भिंतींचा आडोसा नसतो, तर ऊब, शांतता आणि मोकळा श्वास असतो. घर म्हणजे उत्साह, चैतन्य आणि ओढ असते. घर म्हणजे अस्तित्व, स्वभाव आणि त्याला सहवासाची जोड असते. घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग असते. घर म्हणजे आतुरता, आठवणी आणि थोडीशी तगमग असते. घर म्हणजे विश्वास, जिव्हाळा आणि निवांतपणाची जागा असते. घर म्हणजे ऋणानुबंधाचा हळवा, सचेतन धागा असते. घर म्हणजे थकलेल्या जीवांना आपुलकीचा आधार असते. घर म्हणजे आपल्या माणसांसाठी मनाचे सदैव उघडे द्वार असते. एकनाथ आव्हाड यांची ही कविता घराविषयीच्या सगळ्या हळव्या भावना उजागर करते आणि घराला घरपण बहाल करते. ह्या संपूर्ण कवितेत कवीच्या संवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. 

एकनाथ आव्हाड यांची कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर आहे. शिक्षकी पेशा हा केवळ कवीच्या उपजीविकेचे साधन नाही, तर तो कवीच्या पेशींचा अविभाज्य भाग बनला आहे. कवीचा श्वास बनला आहे. म्हणून त्यांच्या शाळा आणि शिक्षणविषयक कविता अतिशय प्रत्ययकारी उतरल्या आहेत.
'आता खूप वर्षांनंतर, 
ती शाळा पाहतो मी येता जाता
तेव्हा बाई तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं'.
शाळेचं देऊळ होऊन जातं, ही केवळ कविकल्पना नाही तर कवीच्या श्रद्धेचा भाग आहे. 'सविता पटेकर.... सतत गैरहजर' हे कथाकाव्यही त्या श्रद्धेतूनच उत्कट उतरले आहे. शाळेच्या चिरेबंदी वातावरणात बालकांचा जीव गुदमरतो, याचे सजीव चित्र 'स्वागतशील' ह्या कवितेत उमटले आहे.

एकनाथ आव्हाड यांची कविता ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या कवितेला प्रतिमा- प्रतीकांचा अजिबात सोस नाही. अलंकारांच्या मोहात न पडणारी ही अनलंकृत कविता आहे. भावगर्भता हाच ह्या कवितेचा अनमोल अलंकार आहे. ह्या कवितेच्या साधेपणातही एक अम्लान सौंदर्य आहे. काही कवितांमधून कालिया, मिजासखोर कंस, शिशुपाल, जरासंध, नरकासुर, द्रौपदी यांसारखे पौराणिक संदर्भ येतात. इतकेच. ही कविता शेती आणि शेतकरी, मित्र आणि मैत्री, शब्दांचे सामर्थ्य, मौन पाळण्याचे महत्त्व, पंढरी आणि पांडुरंगाचे भक्त, पुस्तकांचे श्रेष्ठत्व या विषयांवर जीवीच्या जिव्हाळ्याने बोलते. काळोखाला धीर द्यायला एक पणतीसुद्धा पुरते, असा विश्वास ही कविता व्यक्त करते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही विचार देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कविता आहे. जगणं सोपं आणि सुंदर करणारी ही कविता म्हणूनच मला महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार ( कवितासंग्रह )
कवी : एकनाथ आव्हाड 
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : १०० ,  किंमत : १६० रुपये 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
( सुप्रसिद्ध साहित्यिक)
sureshsawant2011@yahoo.com

Tuesday, April 7, 2026

गोष्ट १

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो ! 
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
#fbpost #share

Thursday, September 19, 2024

एका घराचं विसर्जन


एका घराचं विसर्जन

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

- डॉ. आनंद नाडकर्णी

सकाळ वृत्तसेवा

Updated on: 08 September 2024, 12:23 am IST

गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे 'कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.' हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा 'व्यवसाय-मित्र' म्हणजेच सायकिअॅट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

आमची मैत्री घट्ट होत गेली आणि त्या घरातली माझी झोपायची जागाही पक्की झाली ती पुढच्या चार दशकांसाठी. माझे वडील एकोणीसशे नव्वद सालच्या जानेवारी महिन्यामध्ये गेले आणि त्या टप्प्यावर अनिल हा मित्राच्या रूपातून माझ्यासाठी सुद्धा 'बाबा' झाला.

हळूहळू बाब्या, बाबडू आणि 'Babs by The Bay' अशी अनेक नामकरणे झाली त्याची. सुनंदा पुढे निघून गेल्यावर, बाबाची आई इंदुताई त्या घरात आली. बाबाच्या एकटेपणावर तिनं वीस वर्षे मायेची गोधडी घातली.

ह्या घरातल्या माझ्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांच्या मैत्रीवर मी लेख लिहिला होता. तो 'लेखकाचे घर' ह्या पुस्तकात मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंनी प्रसिद्ध केला आहे. तर ह्या घरातल्या मजेदार मायेच्या क्षणांची मला सवय होत गेली. मी पहाटेच्या साखरझोपेत असताना बाबाची जाग सुरू व्हायची.

तो डेस्कटॉप कॉम्प्युटरवर जाऊन बसायचा. सकाळी उठवायची जी वेळ मी सांगितली असेल त्या वेळी बासरी वाजवून, गाणे म्हणून मला उठवायचा. मग चहासोबत गप्पा. बाबासाठी ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातली महत्त्वाची इव्हेंट.

आजीने ट्रेनिंग दिलेली ज्योती ही मुलगी आजीनंतरची आठ वर्षे त्याच निगुतीने बाबाची काळजी घ्यायची. मस्त नाश्ता करून तयार झालो आणि घरातून बाहेर पडणार तर नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये बाबाला फोटो काढायची हुक्की यायची. अनेक व्यक्ती आणि घरांचा एकमेव, अधिकृत फोटोग्राफर होता तो.

संध्याकाळी कामे आटोपली की वेध लागायचे पुन्हा त्या घरी यायचे. रात्रीचे चारीठाव जेवण; साधे पण रुचकर. त्यानंतर ताजे ताक, मौसमी फळे आणि त्यानंतर चॉकलेट किंवा आइस्क्रीम किंवा केळी, पेरू अशा फळांचे मजेदार फ्रूट सॅलड. आम्हाला गप्पांना कोणतेही विषय पुरायचे. तत्त्वज्ञान ते गॉसिप, इतिहास ते राजकारणातील सद्य:स्थिती, साहित्य ते संगीत...

काहीही. बाबा जोक्स सांगायचा. किस्से आणि गाणी. एकमेकांचे लिहिलेले मजकूर एकमेकांना वाचायला देणे. रात्रीचे दहा-साडेदहा झाले की तो म्हणायचा, "चला, झोपण्याआधी आनंदला फोन करायची वेळ झाली." गेली पंचवीस-तीस वर्षे, दिवसातला शेवटचा फोन तो मला (किंवा मी त्याला) करायचो. प्रत्यक्ष समोर असलो की हा त्याचा आवडता डायलॉग,

आनंददायी क्षणांनी भरलेले दिवस. बाहेरचे तणाव, दुखे तिथेच ठेवून इथे विसाव्याला यायचे. माझी पत्नी सविता ह्या घराला म्हणायची, 'हे तुझे माहेर'. तर माहेरच्या सवयी सुटत नाहीत. फोटो, पेंटिंग, रेषाचित्र रसिकतेने नेमके कसे पाहायचे त्याची सवय इथे लागली.

सुरांना समजून कसे घ्यायचे ते समजले. स्वादाला निर्भयपणे उपभोगायला मिळाले आणि सवयीच्या बिछान्याचा स्पर्श... सकाळच्या सालंकृत पोहे-खिचडीचा सुवास. माझी ज्ञानेंद्रिये तेजतर्रार केली ह्या घरानं.

ह्या घरात बाबामुळे भेटलेल्या अनेक जणांमुळे माझी नात्यांची रेंज इतकी वाढली. बाबाचे काही मित्र पुढच्या काळात माझेही 'स्वतंत्रपणे' मित्र झाले. सदाशिव अमरापूरकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, कार्यकर्ता अरुण ठाकूर, सतारमय विदुर महाजन, लेखक उमाताई आणि निरुपाक्ष कुलकर्णी... किती नावे घेऊ.

ह्या घराने विचाराचा परीघ विस्तारायला केवढी मदत केली. सुमित्रा (भावे) मिळाली, सुनील (सुखटणकर) आला

आणि सिनेमामाध्यमाची द्वारे खुली झाली. ह्या सगळ्यामध्ये भर मुक्तांगण परिवारामधल्या आमच्या असंख्य पेशंट, कार्यकर्त्या मित्रांची.

सततचे जागते-खेळते घर. ऐतिहासिक दृष्टीने ह्या घराच्या दरवाजाला कधीही रात्रीची कडी लावली जात नसे. गेली अडीच वर्षे ह्या घरामध्ये महिन्याचे काही दिवस मी एकटाच असतो वसतीला. मीही घराची सवय मोडत नाही. ह्या घरातल्या बाबाच्या खोलीमध्ये मात्र मी आता जात नाही. मी त्या खोलीच्या दरवाजाबाहेरूनच कधी बाबाला साद घालतो.

अनेक घरांमध्ये असते तसे बाहेरच्या खोलीत एक कालनिर्णय टांगलेले असायचे. त्या कॅलेंडरवर माझ्या राहण्याचे दिवस 'मार्क' केलेले असत. ह्या काळात बाबा बाहेरचे कार्यक्रम घेत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा दोघांची नवी नवी रेस्टॉरंट्स शोधायची सवय मागे पडली होती. घरगुती अन्नाशी असलेली बांधिलकी वाढलेली होती.

बाबाला हुक्की यायची पिझ्झा खायची. मग आम्ही ती ऑर्डर देण्याचाही उत्सव करायचो. खाणारी तोंडे वाढली की अशी ऑर्डर करायला मजा यायची. मुक्ता, यशो ह्या मुली आणि त्यांची कुटुंबे आली की जोरदार अंगतपंगत व्हायची.

माझ्या गळ्यात घालायची स्लिंग बॅग असते चामड्याची. त्याचे डिझाइन आणि ती ऑर्डर करून घेणे हे बाबाचे काम. अनेक वर्षे तो मला अनेक गोष्टी पुरवायचा. त्याची रुपयातली किंमत त्याला विचारणे हा गुन्हाच असायचा.

माझा मुलगा कबीर छोटा असताना दर भेटीमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट चिवडा आणि श्रुजबेरी बिस्किटे ह्यांची भेटपाकिटे हजर असणारच. आजी होती तेव्हापर्यंत घरी केलेल्या खाऊचे डबे सवितासाठी म्हणून घेऊन यायचो. पुण्याला येण्यासाठी मी सकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या घरातून निघतो. साडेसात ते पावणेआठ ह्या दरम्यान बाबाचा पहिला फोन... "कुठपर्यंत?"

आयुष्यभर इतके भटकलेला बाबा. पण त्याला घराचे वेड होते. त्याच्या त्या राज्यात तो सुखी असायचा. भिंतीवर लावलेले त्याचे फोटो, त्याची आणि इतरांची पेंटिंग्ज, सहजच नजर वेधून घेणारी त्याची काष्ठशिल्पे, दिवाळी ते दिवाळी बदलला जाणारा दिवाणखान्यातला कंदील (अर्थात नाइटलॅम्प) अशा वस्तू घराला जिवंत करायच्या.

आजी आणि ज्योतीच्या व्यवस्थितपणाला न जुमानता स्वतःची 'पसारा' हौस बाबा पूर्ण करायचा तो त्याच्या खोलीत. हा अगदी केंद्रशासित प्रदेश. आमच्या नजरेला न दिसणाऱ्या अनेक वस्तू त्या 'पिसाऱ्या'तून त्याच्या हाताला अलगद लागायच्या. त्याच्या कपड्याच्या कपाटातल्या एका फळीचा अर्धा हिस्सा त्याने माझ्यासाठी ठेवलेला. माझे कपडे,

टॉवेल मात्र अगदी घडी घालून ठेवलेले. बाहेर घालायच्या कपड्यांचा सेट ठेवला तर तोही कडक इस्त्री करून सज्ज.

कोरोना महासाथीच्या काळातही मी नियमितपणे पुण्याला यायचो. मुक्तांगणचे काम, पुण्याच्या आय.पी.एच. संस्थेतली रुग्णसेवा असे काम चालायचे. ह्या कालावधीमध्ये बाबाकडे राहायला येणारा मीच असायचो, त्या पत्रकारनगर वसाहतीमध्ये,

त्या काळात त्या सोसायटीच्या समिती सदस्यांनीही मला 'रहिवासी' असा दर्जा दिल्याने माझे येणे-जाणे सोपे झाले होते. ह्या काळात आम्हाला गप्पांसाठी वेळही खूप मिळायचा, घरात बसूनच मैफील जमवायची. जुने हिंदी-इंग्रजी

चित्रपट पुन्हा पुन्हा चवीने पाहायचे. गॉडफादर तर बाबाला 'फ्रेम बाय फ्रेम' पाठ होता.

हिंदी मथले जॉली एलएलबी, रुस्तुम, पिंक असे चित्रपटही तो तुकड्यातुकड्यात पाहायचा. जेम्स बॉण्ड आणि

हिचकॉक ही आमची अगदी कॉमन प्रेमप्रकरणे. ह्या शिवाय बाबा ज्या लेखन विषयाने पछाडला जायचा त्यावरच्या गप्पा. दर जूनमध्ये असायची ती दिवाळी अंकांमध्ये तो लिहिणार त्या लेखांची चर्चा. लेखाचा खर्डा लिहून झाला की वाचन.

कोणता लेख कोणत्या दिवशी अंकाला द्यायचा ह्यावर पुन्हा चर्चा. ह्या तीन महिन्यांत त्याचे लेखन अगदी 'पीक'ला असायचे. खरिपाचा हा हंगाम संपला की स्वारी स्वतःच्या मनमौजी अभ्यासाला तयार. एखाद्या विषयाची त्याला भूल पडली की तो पूर्ण नादावून जायचा. अशा प्रत्येक विषयाचे रूपांतर लेखनात व्हायचेच असे नाही.

कोरोना मावळतीला लागला आणि जीवन गती घेऊ लागले तसे त्याचे प्लॅन सुरू झाले होते नव्या प्रवासाचे. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी असे झटकेही त्याला यायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 'दुरुस्ती' करणाऱ्यांचा त्याचा गटच होता. पुढेपुढे

हे सारे फोनही ज्योतीच करायची. बाबाच्या सकाळच्या मित्रांच्या भेटीसाठीच्या दैनंदिन प्रभातफेऱ्या पुन्हा चालू झाल्या आणि बावीस सालच्या

जानेवारीमध्ये घरातच पडण्याचे निमित्त झाले. त्यानंतर महिनाभरामध्ये ते घर रिकामे झाले ते कायमचेच. माझे वडील मला प्रत्यक्ष सहवासातून मिळाले बत्तीस वर्षे. ते गेले आणि त्यांची जागा घेणारा बाबा मिळाला तोही पुढची बत्तीस वर्षे.

त्या काळातच माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे डाव विस्कटले आणि फिस्कटले. नव्याने आयुष्याची मांडणी करण्याच्या प्रवासात ऊब होती ती ह्या घराची. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी आणि सविताने लग्न करायचे ठरवले, तेव्हा तिच्या आईवडिलांची अधिकृत कुटुंबभेट घडवून आणायची होती. तेव्हा माझ्या बाजूने पालक म्हणून बाबा होता आणि मानसमाता म्हणून ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा थत्ते. माझ्या आयुष्यातल्या हळव्या क्षणी, हरलेल्या काळात आणि हरखून जाण्याच्या प्रसंगांत हे घर माझ्यासोबत होते.

आता काही काळात ही कॉलनी जाणार पुनर्विकासाच्या वाटेने. गेले काही महिने आवराआवर सुरू आहे. मुक्तांगणला न्यायचे सामान, मित्रपरिवारात वाटायचे सामान अशी विभागणी सुरू आहे. बाबाचे सर्व कलासाहित्य व्यवस्थितपणे ठेवायच्या प्रकल्पात मुली यशो मुक्ता, भाची प्राजक्ता अशा साऱ्या मग्न आहेत.

दर पंधरा दिवसांनी मी आलो की एक नवा कोपरा रिकामा दिसतो, एक नवी भिंत ओकीबोकी असते. ज्या साऱ्याचे सर्जन होते त्या साऱ्याचे विसर्जन होते हा नियमच की सृष्टीचा. घरे तरी त्याला कशी अपवाद असणार.

मनाचे दरवाजे उघडे ठेवायला शिकवणारे हे घर आपली कात टाकणार आहे. टाकुनिया जीर्णजर्जर वस्त्रे... इथे नवीन वास्तूची निर्मिती होणार आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या वास्तव्याची शेवटची रात्र त्या घरात घालवली. सकाळी डोळे भरून सारे घर न्याहाळले. दाराला कुलूप लावले. एक किल्ली खांद्यावरच्या बॅगेत टाकली आणि किल्ल्यांचा एक संपूर्ण गुच्छ मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

संग्रहित

Link  : https://www.esakal.com/saptarang/psychiatrist-investigator-brown-sugar-problem-gard-book-rjs00

Friday, June 24, 2022

post 3

#fbshare  ! 
......
आता वर्क फ्रॉम होममुळे घरूनच काम असतं पण एका वेळेला तसं नव्हतं. सलग दोन, तीन, चार महिने पुण्यातच जायचे आणि मग घरची गावची आठवण यायला लागायची. कधीतरी MH०७ पासिंगची गाडी पुण्यात दिसली की एकदम बरं वाटायचं, कुठला का माणूस असेना, तो देवगडचा असेना कि बांद्याचा. आपण एकाच जिल्ह्यातले, आपल्या आवडीनिवडी एकच,  त्यालाही चायघावणे, आंबोळीचटणी आवडतच असणार, तोही माझ्यासारखाच काजीआंब्याला पिसाच असणार, देवळाचं पालखीचं जत्रेचं दशावताराचं त्यालाही माझ्यासारखंच अप्रूप असणार. "खयले तुम्ही" अशी हाक घातल्यावर तोही खुश होऊन उत्तर देणारच असं वाटत राहायचं. साधारण २०१४ मध्ये टिळक रोडच्या इथे गाडी थांबवून चहा पित असताना दोन मुलांनी बाईकची नंबरप्लेट बघून हाक मारली,  "काय ओ, खयचे तुम्ही". "मी कणकवलीचो, तुम्ही खयचे?", ह्यावर त्यांचं "आम्ही फोंड्याचे" असं उत्तर आलं, फक्त १४ किलोमीटर अंतर आमच्या गावात. म्हणजे आपलीच माणसं ती. एकदम हायसं वाटलं. 

एकदा विकेंडला संध्याकाळी झोपेतून उठलो तेव्हा रूमवर कोणीच नव्हतं, उठून बाहेर येऊन बसलं तरी काही हुरूप वाटत नव्हता. अरविंद गोखले कथा लिहायचे त्यातल्या काहूर मन:स्थितीसारखं वाटायला लागलं. जरा चालून येऊ म्हणून बाहेर पडलो तर वाटेत एक माणूस भेटला, बोलता बोलता समजलं कि ते सावंतवाडीचे गावडे आहेत. गाडी रुळावरून घसरावी तसं आम्ही पुढच्या क्षणाला मराठीवरून मालवणीवर घसरलो आणि मीही तिकडलाच म्हटल्यावर तेही उत्साहाने बोलू लागले. गप्पा होत गेल्या, पुढे चालता चालता वळणावर दत्त आश्रम आला तिथे ते या म्हणाले. तिथे गेलो तर लक्षात आलं कि इथे सिंधुदुर्गातले बरेच जण होते, त्यांच्या इकडच्या तिकडच्या गजाली ऐकता ऐकता मन गावातल्या तिठ्यावरून, सडयावरून, गोरवांच्या पाठीवरून, व्हाळातून धावायला लागलं आणि बघता बघता उगाचच काळवंडलेलं मन लख्ख दिव्यासारखं झालं. 

एसटी रात्रीच्याच असायच्या, एसटीत बसलं कि ती ह्या स्टॅन्डमधून त्या स्टॅन्डवर जात राहायची, फक्त पणजी गाडी असल्यामुळे गाडीत मालवणी, कोकणी ऐकू यायला लागायचं. मागे वळून बघितलं तर नऊवारीतल्या म्हाताऱ्या बायका दिसायच्या, टिपिकल ढगळ शर्टपॅन्ट घातलेले बाप्ये दिसायचे. वाटायचं कि आपली ओळख नसली तरी आपली भाषा सारखी आहे, भुकेला हात पसरला तरी कोणी नाही म्हणायचं नाही, "मका पण देवा जरा वायच " एवढं म्हटलं कि डबा सरकवला जाईल याची खात्री वाटायची. गाडी कात्रज, सातारा, कराड, कोल्हापूरमधून जाताना अध्येमध्ये झोप येत राहायची, मधेच जाग यायची पण एकदा का एसटी गगनबावडा घाट उतरली कि मग ओळखीच्या खुणा दिसायला लागायच्या, लाल माती दिसायला लागायची, डांबरी काळे रस्ते, त्याच्या बाजूला मळे, मळ्यातली तरव्यांची खुट, अध्येमध्ये लागणाऱ्या वाड्यांचे बोर्ड, डोक्यावर कौलं घेतलेली घरं, देवळं दिसायला लागली कि आपण आपल्या जागेत आलो याची खात्री पटायची, वाटायचं - एसटी थांबवून इथेच कुणाकडे उतरलं तरी आपल्या घरात आणि इथे काही जास्त फरक वाटणार नाही, आपण सगळे एकाच जमिनीवरचे आहोत. तेव्हा माझ्या लक्षात आलं कि अगदी काटा खोलवर रुतावा तसं कोकण माझ्यात रुतलेलं आहे. 

   © रोहित भिडे


Sunday, June 12, 2022

post 3

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


Monday, March 21, 2022

post 2

नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा 
खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद.... 
वाचण्यासारखं काहीतरी खास मेसेज... 

अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक 
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, 
आता सांगणार आहे ती . 
कावेरी — कोणती ती? 
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम 
करतो तुझ्यावर. 
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ? 
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं. 
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं. 
अप्पा — विचार. 
कावेरी — मला सवती किती होत्या! 
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर 
हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? 
पण तुला एक सांगतो, कावेरी, 
तुला सवत कुणीही नव्हती. 
होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. 
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ? 
अप्पा — तू बायको होतीस. 
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ? 
अप्पा — असू शकते, असतेही; पण 
मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. 
दिवाणखाना कमी असतो, 
पण देऊळ जास्त असते. 
आकाश कमी असते, 
पण पृथ्वी अधिक असते. 
थोडक्यात, 
बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं... 
अशी आहे बंदराची महती.... 
म्हणजे बायकोची!!!! 

लेखक : वि. वा. शिरवाडकर

Saturday, March 19, 2022

post 3

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत
गाण्याची मैफल रंगलेली असावी...सकाळी दहा वाजता उठून दोन
वेळा चहा झालेला असावा...हवा बेताची गार
असावी...हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून
टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी...
ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे...
आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद
घातल्यासारखा स्वाद घालावा...

दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी...आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे...यथेच्छ भोजन व्हावे...मस्त पान जमावे...इब्राहिमी जर्द्याचा तोंडात
गिलावा व्हावा...गार पाणी प्यावे...आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही.
त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की,
संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस
नवर्यासारखा फिरायलादेखील जातो; विश्वास
ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणीदेखील घेऊन देतो!

-पु.ल.
(माझे खाद्यजीवन : हसवणूक)

Saturday, February 26, 2022

स्वा सावरकर पुण्यतिथी

आजच्याच दिवशी भारत मातेला सोडून तिचा प्रिय पुत्र गेला तेव्हा ती ढसाढसा रडली. #स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे फक्त अनुसरण नाही तर अनुकरण करणारे स्वा. सावरकर. जसा सूर्य या जगातील अंधार दूर करतो नि सर्व प्राणिमात्रांना जगण्याची शक्ती देतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे #क्रांतीसूर्य. त्यांनी स्वतःच्या तेजाने लाखो तरुणांच्या मनात क्रांतीज्योतीची मशाल पेटविली. ती मशाल एवढी पेटली की त्याची धग इंग्रजांना सहन नाही झाली त्यांना येथून शेवटी हाकलून लावले गेले. पण आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले त्याग नि देशकार्य भारतातील काही लोकांना कळत नाही हे आपले दुर्भाग्य. मृत्यूला पण न घाबरणारे मृत्युंजय सावरकर. स्वतः तात्या म्हणतात की “मला मुसलमान नि ख्रिश्चनाची भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती हिंदुत्वाशी वैर असलेला हिंदूचीच. यांचीच प्रचिती त्यांना प्रत्यक्ष कार्य करताना वेळोवेळी आली. पण त्या गोष्टीला न जुमानता तात्यांनी आपले देशकार्य चालू ठेवले. यावर भिडे गुरुजींच्या एक श्लोक आठवतो. 
    असंख्यात गेले विरोधात लोक ।
    तरी घालणें ना यमालाही भीक ।। 
    जरी सागरा एवढे म्लेंच्छ आले ।
    ‘शिवाजी' आणि मावळे नाही भ्याले ।।

शेवटी एवढेच सांगतो जर संपूर्ण हिंदू समाजाने जर स्वा. सावरकर समजून जर फक्त अनुसरण न करता अनुकरण केले तर निश्चितच आपण तात्यांच्या मनातील इतिहासातील सातवे सोनेरी पान लिहू शकू. ते आज जरी आपल्यात नसले तरी ते त्यांच्या कार्याने नि पुस्तक रूपाने आपल्यात जीवित आहेत. 
  आजच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी प्रायोपवेशन करून त्यांनी आत्मार्पण केले. #हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन.



- विठ्ठल वाघ 

#हिंदु_संघटक_सावरकर #सावरकरी_विचाररत्ने #अखंड_हिंदुस्थान #सावरकर #vitthal_wagh #वीर_सावरकर #द्रष्टे_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर


Wednesday, August 4, 2021

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

 







तुमच्या दुकानात देव मिळेल कां? 
*******
पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका  किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला. 

दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला? 

त्या मुलाने दुकानदारास विचारले 
तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. 

तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला. 

प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत? 

मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ? 

प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे. 

तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? 
डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.
म्हणून मी देव शोधतो आहे बाबा. 
आहे ना तुमच्या दुकानांत देव? 

दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे? 

फक्त एक रुपया बाबा. 
बरं, नको काळजी करू.
एक रुपयात देखील देव भेटेल!

दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल. 

दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली. 

डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे. 

चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस,  तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. 
यालाच म्हणतात विश्वास ... 
देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो. 

तात्पर्य: 
भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!

सुनील इनामदार

Friday, July 2, 2021

शंख

शंख...पृथ्वीवर मिळणारं एक चमत्कारिक शास्त्र ..हो शास्त्रच म्हणावं लागेल.समुद्रमंथनात प्राप्त झालेल एक उत्तम रत्न आहे.शंखाला श्री लक्ष्मी देवींचा छोटा भाऊ मानला जातो.अथर्व वेदाच्या चौथ्या कांड मध्ये दहाव्या सुक्तामध्ये म्हटलं गेलं आहे की शंख हा अंतरिक्ष ,वायु,ज्योतिमंडल आणि स्वर्ण युक्त आहे.याचा ध्वनी शत्रूला म्हणजेच नकारात्मक उर्जेला निर्बल करतो,राक्षस /पिशाच्च यांना वाशीभूत करतो,अज्ञान व दारिद्रता,रोग निवारण करतो आणि आयुष्य वृद्धी करतो.
       शंख रोज वाजविणाऱ्या व्यक्तीची फुफ्फुसे खूप मजबूत असतात.अशी व्यक्ती दमा अस्थमाची शिकार होत नाही.शंख वाजविल्यानंतर शरीरातील पेशी आणि पेशी जागृत होतात.मेंदू जागृत होऊन मुक्ती स्थिती प्राप्त होते.शंखामध्ये गंधक,फॉस्फरस आणि कॅल्शियम आहेत.त्यामुळे शंखात पाणी भरले व ते प्यायले असता हे गुण आपल्याला मिळतात.शाखाचे पाणी किटानुनाशक आहे तसेच हे पाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.शंखनाद नियमित करणाऱ्याना यकृताची समस्या ,डोकेदुखी,कर्णबाधा होत नाही.याचा ध्वनी मानसिक तणाव दूर करतो व त्यामुळे कुंडलिनी जागृत होतो.लहान मुलांमध्ये वाणी समस्याच असल्यास मुलांना शंखजल दिल्यास ही समस्या दूर होते असे म्हणतात.
      जोरात शंखनाद केल्याने गॅस्ट्रिक आणि पोटाच्या समस्या दूर होतात.शंख वाजविल्याने छातीचे स्नायू बळकट होतात.गळ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.vocal cord आणि थायरॉइड संबंधित समस्या दूर होतात.शंख वाजवत अस्तनाशरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो,केस गळण्याची समस्या देखील दूर होते,चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून सुरकुत्या दूर होतात,रात्रभर पाणी ठेवलेले शंखजल त्वचारोगावर लावल्यास त्वचा रोग दूर होण्यास मदत होते,शंखजलामध्ये गुलाबपाणी मिसळून केस धुतल्याने ते काळे व मुलायम दाटही  होतात ,शंखजल मध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळे निरोगी होतात.शंखजल सकाळी 3च. घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.शंखनाद केल्याने प्रोस्टेट मसल्सना व्यायाम होतो,आंघोळीनंतर शंख त्वचेवर घासल्यास त्वचा उजळते व टवटवीत होते.
    माझा स्वतःचा अनुभव आहे की शरिरात उष्णता वाढल्यास शंख तळहातावर काही वेळ घासावा,म्हणजे शरीराचा दाह कमी होतो,शंखजलाने बीपी  नॉर्मल राहायला मदत होते.
       महाभारतातील श्री कृष्णांचा पांचजन्य शंख प्रसिद्ध आहे.तसेच अर्जुनाचा देवदत्त,भीमाचा पौंड्र ,युधिष्ठिराचा आनंतविजय ,नकुळाचा सुघोष व सहदेवचा मणीपुष्पक शंख प्रसिद्ध आहेत.शंखाचे एकूण तीन भाग आहेत1)पन्हळ 2)अग्र 3)मागील बाजू जिथे वलय असतात.
    शंखाच्या पृष्ठभागावर ब्रम्हा व अग्रभागात गंगा,यमुना आणि सरस्वतीचा वास आहे.दक्षिणावती शंखाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो तर मध्य भागाला वरुणाचा.शंखजल स्नान तिर्थसमान फळं देते.
     जिथे शंखनाद होतो तिथे ईश्वरकृपा होते.शंखध्वनी जिथवर पोहोचतो तिथवर सकारात्मक ऊर्जा पसरते.हवेतील काही घातक विषाणूदेखील शंखनादाने मरतात.आपण शंखाला कान लावला तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.शंख हा एक नादब्रम्ह आहे.शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामवर्ती व दक्षिणावर्ती हे प्रमुख.
   शंखनाद शुभ जरी असला तरी रात्रीच्या वेळी तसेच संध्या आरतीला शंख वाजवणे अशुभ मानले गेले आहे.तसेच गर्भवती महिलांनी शंखनाद करू नये,अन्यथा गर्भावर अवास्तव दबाव पडण्याची शक्यता असते.पूजेचा शंख वाजविण्यास वापरू नये.शंख नर व मादी देखील असतात.नर शंख उजवे(पोकळ बाजू उजवीकडे) तर मादी शंख दवे असतात.मादी शंख ध्वनी करत नाहीत.उजव्या शंखाना दक्षिणावर्ती तर डाव्या शंखाना वामवर्ती वा लक्ष्मी शंख म्हणतात.
      परिवारात ताळमेळ वाढविण्यासाठी शंख उपयुक्त आहे.
वास्तुशास्त्रमध्ये मध्ये देखील शंखाचे महत्त्व आहे.शंख नेहमी प्रातःकाळीच वाजवाव,शुभ फळं देतो.
   - तन्वी भोसले

Wednesday, June 30, 2021

नथुराम गोडसे आणि गांधी


३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली. 

ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे कागदपत्र वाचताना नथुराम गोडसेंच्या जबानीत मला असा एक एक उल्लेख आढळला की, “...जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी सुरु केलेला उपवास सोडण्यासाठी त्यांनी ज्या ७ अटी ठेवल्या होत्या त्या सर्व हिंदूविरोधी होत्या...” मला खूप विचार करूनही ह्या नेमक्या अटींपैकी एकही आठवली नाही. थोडंफार शोधूनही कुठेच काही मिळालं नाही. आपल्याला शाळेत (किंवा ‘सरकारी’!) इतिहास सांगताना ह्या अटी नेमक्या काय होत्या हे कधीच सांगितले गेले नाही. जानेवारी १९४८ मध्ये गांधी हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी उपासाद्वारे प्रयत्न करत होते वगैरे वरवरचे उल्लेखच सगळीकडे आहेत. अनेकांनी ते वाचलेही असतील. मग गोडसेंनी त्यांच्या जबानीत असं का सांगावं की त्या सर्व अटी हिंदूविरोधी होत्या? अश्या काय अटी होत्या त्या?

ब्रिटीश लायब्ररीत जुने न्यूजपेपर आर्काईव्झ शोधणं सुरु केलं. १९६६ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे ज्येष्ठ इतिहाससंशोधक आणि लेखक डॉ वासुदेव गोडबोलेही योगायोगाने नेमका हाच संदर्भ बराच काळ शोधत आहेत असे समजले. त्यांना मी ह्याबद्दल विचारणार इतक्यात त्यांचाच निरोपवजा हुकूम आला की ‘टाईम्स ऑफ इंडीया’ चे जानेवारी १९४८ मधले अंक पहा आणि ह्या ७ अटी काय ते शोधून कळवा. मग मात्र माझी खात्री झाली की आता हे प्रकरण तडीस न्यावेच लागेल.

पहिल्यांदा अर्थातच जानेवारी १९४८ चे ‘टाईम्स ऑफ इंडीया’ शोधायला घेतले. सुरुवात १२ जानेवारी १९४८ पासूनच्या अंकांनी केली. गांधींच्या उपवासाची सुरुवात - तब्येतीचे अपडेटस वगैरे सगळी माहीती होती पण त्यांनी उपास सोडण्यासाठी नेमक्या अटी काय ठेवल्या होत्या हे मात्र कुठेच नव्हते. १९ जानेवारी १९४८ च्या ‘टाईम्स ऑफ इंडीया’ मध्ये गांधींनी उपास सोडल्याची बातमी अगदी फ्रंट पेजवर होती आणि त्यात त्यांच्या त्या ७ अटी मान्य झाल्याची बातमीही होती. पण संपूर्ण पेपर शोधूनही त्या अटी मात्र काही सापडल्या नाहीत. गोडसे म्हणतात त्याप्रमाणे त्या खरंच हिंदूविरोधी होत्या का हे नेमकं समजायचा काही मार्ग नव्हता. मग आता काय करावं?

मग त्याच सुमाराचे सहज कुतूहल म्हणून बाकीचे जुने इंग्रजी न्यूजपेपर्स शोधायला सुरुवात केली. १९ जानेवारीच्या ‘डर्बी इव्हिनिंग टेलिग्राफ’ ह्या वर्तमानपत्रांत गांधींनी उपास सोडल्याची बातमी दिसली आणि सोबत हापण उल्लेख दिसला की त्या सात अटींपैकी एक अट ही होती की सप्टेंबर १९४७ च्या दंग्यानंतर दिल्लीतल्या ज्या ११७ मशीदी ज्यांची (हिंदू आणि शीखांनी) देवळं किंवा घरं बनवली होती त्यांच्या पुन्हा मशीदी बनवण्यात याव्यात. हे वाचून मला नाही म्हटलं तरी धक्काच बसला. एकतर कोणत्याही  भारतीय पेपरमध्ये ह्यातले कोणतेच उल्लेख नसावेत आणि ह्या सात अटी जर सगळ्याच अश्याच असतील तर मग?

मी इथले न्यूजपेपर आर्काईव्हज अजून जोमाने शोधू लागलो. ‘कोव्हेंट्री इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘डंडी इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘ग्लुस्टरशायर इको’, ‘द सिटीझन’, ‘बेलफास्ट न्यूज’, ‘बेलफास्ट टेलिग्राफ’, ‘बर्मिंगहॅम गॅझेट’, ‘द वेस्टर्न मॉर्निंग न्यूज’, ‘नॉटींघम इव्हिनिंग पोस्ट’, ‘हेराल्ड एक्सप्रेस’, ‘द स्कॉट्समन’, ‘लॅंकास्टर गार्डीयन’ वगैरे ह्या आणि अश्या फारश्या माहीत नसलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या आर्काईव्हजमध्येही गांधीच्या उपवासाबद्दल बातम्या आहेत. (ही सगळी कात्रणं आहेत बरं का माझ्याकडे!) पण शोधत असलेल्या सगळ्या ७ अटी मात्र कुठेच मिळत नव्हत्या.

हा शोध आता सोडून द्यावा असा विचार मनांत येत असतानाच ‘द यॉर्कशायर पोस्ट’ चा १९ जानेवारी १९४८ चा अंक पहाण्यात आला आणि त्यात ह्या ७ अटी एकदाच्या मिळाल्या. काय होत्या बरं ह्या अटी? खाली मी त्या अटी देतोय. हा अटींवरून ह्या अटी खरंच गोडसेंनी सांगितल्याप्रमाणे हिंदूविरोधी होत्या का हे ज्याचं त्याने ठरवावं. गांधींचे विचार चूक किंवा बरोबर हे ज्याचं त्याने ठरवावं. माझं मत मी सांगणार नाहीये. 

अट १ - दिल्लीजवळच्या मेहरौली येथे मुसलमानांना त्यांचा उरूस साजरा करायची परवानगी असावी. (मेहरौलीत ख्वाजा कुतुबुद्दीनची मशीद होती. दंग्यांत त्याची मोडतोड झाली होती. हिंदू आणि शीखांनी त्याच्या आजूबाजूच्या मुसलमानांना हाकलून लावलेले होते. ह्या ख्वाजा कुतुबुद्दीनचा उरूस २६ जानेवारी १९४८ रोजी व्हायचा होता. पण तो करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता होती. गांधींना हे नको होते.)

अट २ - दिल्लीतून पळून गेलेल्या मुसलमानांना सुरक्षितपणे परत येऊ द्यावे. 

अट ३ - दिल्लीतल्या ज्या ११८ मशीदींची देवळे बनवण्यात आलेली आहेत त्या मशीदी पुन्हा मुसलमानांना देऊन टाकण्यात याव्यात. 

अट ४ - संपूर्ण दिल्ली मुसलमानांसाठी सुरक्षित बनवण्यात यावी. 

अट ५ - रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुसलमानांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी. 

अट ६ - हिंदू आणि शीखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार मागे घेण्यात यावा. 

अट ७ - दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी वापरू नयेत. 

सोबत ह्या सगळ्या कात्रणांचे फोटोही पहाता येतील. जाताजाता रामायणातल्या एका श्लोकाची मात्र नक्की आठवण करून देऊ इच्छितो:

मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम् |
क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव || (रामायण ६ - १०९ - २५)

इत्यलम्!

- संकेत कुलकर्णी (लंडन)

Source : facebook

Friday, June 25, 2021

संग्रहित

विलक्षण योगायोगाची
एक भावुक सत्यकथा

💕❣️
 कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी..

 मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

     *~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 

चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

           ~ बी. रघुनाथ
✨✨✨

Saturday, June 12, 2021

पुलं

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख -

 'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... 

हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला मी हॉस्पिटलमधे गेलो होतो !

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... 

त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं.

एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्ती मागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) 

लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले.

डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... 

अशा विचारांतच मला झोप लागली...

मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! 
आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते ! की कळूनही उपयोग नव्हता ?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील ... अगदी कायमचीच !!!

#fbshare





Monday, February 1, 2021

स्वामी विवेकानंद जयंती

जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही

स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) निमित्त अभ्यास करता-करता एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी व स्वामी विवेकानंद ह्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील समानता.   कागदावर उतरविल्याशिवाय राहवत नाही इतकं साम्य अभ्यास करताना  दिसू लागलं  म्हणून हा लेखनप्रपंच.
समर्थांना लहानपणीच मारुतीरायाच्या भक्तीचे वेड लागले.  एकदा आठ-नऊ वर्षांचा ‘नारायण’ (समर्थांचे मूळ नाव) काही केल्या कुठे सापडेना.  सर्वत्र शोधाशोध झाली; पण नारायण काही मिळेना.  थोड्या वेळाने नारायण फडताळातून बाहेर आला आणि आईचा जीव भांड्यात पडला.  “कुठे होतास इतका वेळ?” ह्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण म्हणाला, “चिंता करितो विश्वाची.” लहान नरेंद्रनाथाचे वेडही काहीसे असेच होते.  माडीवर ध्यानस्थ बसण्याचे प्रयोग, त्याने अगदी लहान वयात सुरू केले.  एकदा नरेंद्राने रामायणाची कथा ऐकली व त्यातील हनुमानाच्या शक्तीचे वर्णन ऐकून तो भारावून गेला. कीर्तनकाराने उल्लेख केला की हनुमान वनात राहतो त्याला भेटण्याच्या उद्दीष्टाने छोटा नरेंद्र केळीच्या बनांत बराच काळ बसला; पण हनुमानाचे दर्शन झाले नाही म्हणून खटटू मनाने घरी आला. घडलेली कथा त्याने आईला सांगितली तेव्हा तिने त्याची समजूत घातली की हनुमान रामाचे काही काम करावयास गेला असेल म्हणून तुझी भेट झाली नाही.  हे स्पष्टीकरण छोट्या नरेंद्रला पटले.
ह्या दोन संन्याशांमध्ये ठाशीव साधर्म्य सापडते.  बालपणापासूनचे वैराग्य ही त्यातील सगळ्यात मोठी व पायाभूत समानता.  दोघांना घोड्यावर बसून रपेट करण्याची आवड होती.  समर्थ दासबोधात असे म्हणतात- ‘तुरंग (घोडा) शस्त्र दमून पाहिले’ म्हणजे घोडा घेण्यापूर्वी चालवून पहावा. छोट्या नरेंद्रचा किस्सा सांगतात, त्याला कुणीतरी विचारले, ” बाळ तू मोठेपणी काय करणार? ” त्यावर त्याचे उत्तर होते, ” मी घोडागाडी चालवणार.” हे उत्तर ऐकून सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या तसबीरीसमोर वडिलांनी नरेंद्रला उभे केले आणि सांगितले, “काही हरकत नाही, पण श्रीकृष्णास मान घोडागाडी चालव.”  आणि काय कौतुक वर्णावे, ह्या मुलाने पुढे अनेकांसाठी अध्यात्माचा रथ हाकला, मार्गदर्शन केले.
खेळांची आवड, त्यातील प्राविण्य, सळसळता उत्साह याच्या मूर्ती म्हणजे समर्थ व विवेकानंद होत. विवेकानंदांना फुटबॉल, मुष्ठीयुद्ध अत्यंत प्रिय होते. काही प्रसंगी दुबळ्या शरीरयष्टीच्या मित्रांकडे पाहून किंवा नुसत्या पुस्तकी किडे बनणाऱ्यांकडे पाहून ते म्हणत, “ती पुस्तके फेकून द्या आणि मैदानात उतरा.  उत्तम व्यायाम करा, धडधडीत शरीरसंपदा कमवा.”  हे दोन्ही संन्यासी संगीतात उत्तम गती असणारे होते.  जाणकार होते.  विवेकानंद सतार, तबला, पखावज वाजवित असत.  त्यांनी गाण्याचे बा-कायदा शिक्षण ‘वेणीमाधव अधिकारी’ व ‘दुसरे उस्ताद अहमदखाँ’ ह्यांच्याकडे घेतले.  ‘संगीत कल्पतरु’ नावाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या बावीस­तेवीसाव्या वर्षी लिहिला होता. पुढे तो १८७८ वर्षी ‘श्रीचंडीशरण बसाक’ यांनी आपल्या ‘आर्यपुस्तकालय’ या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केला. समर्थ संगीत कुठे शिकले हे माहीत नाही; पण त्यांचे संगीत विषयावरील भाष्य थक्क करून सोडणारे आहे.  जसे –
१. अजि कोई ‘काफी’ (हा एक राग आहे) गाओ रेऽ
राग में राग तो सारा केदार, मोहन तान कल्याण चलावे
ऐसा हे सारंग भाई ऽ पाहा कैसा शंकराभरणऽ भरण नव्हें इतरा मरण
आसावरी रागऽ आसावरी रागऽ आसावरी रंग माजे
२. ताळ मृदंग, उपांग यंत्र वीणे
धिगीकट धीगीकट तान तानें मानें धींग होतो,
असे रागांवर, तालांवर भाष्य केले आहे.
आता आपण ह्या दोन संन्याशांच्या इतर काही पैलूंवर नजर टाकूया. समर्थांच्या काही ओव्या आणि त्या संदर्भात विवेकानंदांच्या आयुष्यातील प्रसंग अशा क्रमाने हे पाहूया.
दुसऱ्याच्या दु:खाबद्दलची संवेदनशीलता
समर्थ म्हणतात,
दुसऱ्याच्या दु:खे दु:खावेऽ दुसऱ्याच्या सुखे सुखावेऽऽ
आवघेचि सुखी असावेऽ ऐसी वासना ऽऽ (अशी इच्छा)
अकरा सप्टेंबर १८९३ साली शिकागोत भरलेल्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी जगद्विख्यात शब्द उच्चारले, “अमेरिकेतील माझ्या बंधू­भगिनींनो” त्यादिवशी त्यांचा उदोउदो झाला.  भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या रात्री विवेकानंद घरी आले आणि बराच काळ त्यांना झोप येईना. झालेल्या कौतुकामुळे नव्हे, तर त्यांच्या मनातले विचार होते, ­’हे जगन्माते मला माझ्या देशबांधवांचे दु:ख दूर करण्याची शक्ती दे.  तसे काहीतरी कार्य माझे हातून घडू दे.  असे काही घडणार नसेल, तर असला मान­सन्मान, हार­तुरे, कौतुकसुमनें मला नकोत.’ ह्या विचारांची तीव्रता इतकी होती की डोळ्यातून घळघळा वाहणाऱ्या अश्रुंनी उशी भिजली.  यानंतर भारतात कार्य करीत असताना अनेकदा भारतीय जनतेचे दारिद्र्य, दु:ख पाहून त्यांचे अंत:करण पिळवटून निघे.  एका प्रसंगी त्यांनी असे उद्गार काढले आहेत की समाजसुधारणेसाठी, पीडितांची पीडा दूर करण्यासाठी हृदयातील रक्त शिंपडण्याइतकी तयारी हवी, त्यागवृत्ती हवी.
उपासना आणि संघटना बांधणी
उपासनेबाबत समर्थ अतिशय प्रभावी भाष्य करतात, दासबोधात म्हणतात,
अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग
लोक, समजोन मग आज्ञा इच्छिती
तसेच,
काही गल्बला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ
जेणेकरिता विश्रांती वेळ आपणांसी फावे
विवेकानंदांनी अनेकदा सखोल ध्यानमग्न स्थितीचा अनुभव घेतला. परदेशात वास्तव्य करीत असतां ‘थाऊजण्ड पार्क’ इथल्या वास्तव्यात त्यांनी खूप ध्यानधारणा केली. कन्याकुमारीच्या खडकावर तीन दिवस ध्यान व चिंतनात घालविले.  ‘कॅल्व्हे’ नावाच्या स्त्रीला मानसिक अस्थैर्याने ग्रासले होते. विवेकानंदांकडे ती आली तेव्हा त्यांनी स्वत:च्या बाजूला ध्यानास बसावयास सांगितले. त्यातून तिला अपूर्व शांतता लाभली. इतकी की नंतरचे कित्येक दिवस तो अनुभव ती इतरांना सांगत होती. कार्यव्याप सांभाळताना त्यांनी वैयक्तिक साधनेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
समर्थांच्या भाषेत मांडावयाचे झाले तर
जितुके होईल तितुके करावे
भगवत्कीर्तीने भरावे भूमंडळ
संघटना बांधणीचे अपूर्व कसब ह्या दोघांनी समाजाला स्वत:च्या कार्यातून दाखविले
समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे
समर्थांनी भारतभर हजारहून अधिक (जवळजवळ अठराशे) मठ उभे केले. महाराष्ट्रात त्यांनी स्थापलेले ११ मारुती अर्थात् मारुतीमंदिरे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. असंख्य रामदासी, संन्यासी निर्माण केले.  रामदासी संप्रदायाची ही परंपरा आजही टिकून आहे. इतर अनेक देवालयांची पुनर्बांधणी, नवनिर्माण त्यांनी केले.  समर्थांच्या मठाबद्दल परकीय प्रवासी ‘कॉस्मा दी ग्वार्द’ म्हणतो, “रामदासी संप्रदायाचे मठ स्वयंपूर्ण, स्वावलंबी व संपन्न होते.”
ख्रिस्ती मिशनरी चळवळ पाहूनच विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ ह्या नावाने चळवळ उभी केली. संन्याशांची संघटना बांधली. रामकृष्णांनी विवेकानंदांवर जबाबदारी दिली होती, ह्या तरुण संन्याशांपैकी एकही पुन्हा घराकडे, संसारी इच्छांकडे वळता कामा नये. विवेकानंदांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. अमेरिकेत त्यांनी वेदांताचे वर्ग चालविले. अनेकांना ध्यान-धारणा शिकविली. पत्रं लिहून प्रेरणा दिली, मार्गदर्शन. रामकृष्ण मिशनच्या बोधचिन्हामागे विवेकानंदांची आध्यात्मिक संकल्पना अशी होती – ‘पाण्याच्या लाटा म्हणजे कर्म, उमललेले कमलपुष्प म्हणजे भक्ती, हंस म्हणजे परमेश्वर, उगवता सूर्य म्हणजे ज्ञान. ह्या सर्वांना वेटोळे घालणारा नाग म्हणजे कुंडलीनी योग.’ विवेकानंदांच्या पश्चात अनेकांनी पुस्तके लिहिली. त्यातून विवेकानंदांचे संघटना बांधणीचे कौशल्य उमजून येते.
संन्याशाची निर्भीडता व अनेकांचा आधारस्तंभ
पवित्रतेच्या धारणेतून निर्भीडतेचा जन्म होतो.  भयाची भावना जवळपास फिरकतही नाही.
समर्थांचा एक शिष्य उद्धव गोसावी हा एका मठाचा मठाधिपती होता.  तेथील मुसलमान सुभेदार गोसावीबाबांना फार त्रास देऊ लागला.  समर्थांना हे कळल्यावर ते त्वरेने तेथे गेले व त्या सुभेदारास वेताच्या छडीने फोडून काढले.  ह्याबाबतचे समर्थांचे भाष्य मोठे मनोरंजक आहे.
म्हणोनि येके करा रे पाजी ताडिता उभ्याने मुततो काजी
तोबा तोबा हम नहीं जानो जी या अल्ला या खुदा म्हणतसेऽ
असाच तडफदार स्वभाव विवेकानंदांचा होता. कॉलेजात शिकत असताना, परीक्षेची फी भरण्याचीही आर्थिक स्थिती ‘हरिदास’ नावाच्या मित्राची नव्हती. राजकुमार नावाच्या कॉलेजच्या ज्येष्ठ लेखनिकाने त्यांची विनवणी धुडकावून लावली. ह्या राजकुमारला विवेकानंदांनी अफूच्या अड्डयावर धरले व सांगितले की ‘मी ह्याचा बोभाटा करेन.’ तेव्हा तो राजी झाला व हरिदासाचा मार्ग सुकर झाला. वराहनगरच्या मठात विवेकानंदांबरोबर काही संन्यासी राहत होते. एका सरकारी अधिकाऱ्याला हे संन्यासी इंग्रजविरोधी कारवाया करताहेत असा समज (गैरसमज) झाला. तो चौकशीसाठी मठात आला. विवेकानंदांनी आपल्या कार्याची ग्वाही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; पण अधिकारी काही बधेना. शेवटी विवेकानंदांनी खोलीचे दार लावून घेतले आणि अशा काही आवाजात सज्जड दम दिला की तो काय समजायचे ते समजून गेला.
अशाच एका प्रसंगात विवेकानंदांचे गुणविशेष प्रकर्षाने उल्लेखावेसे वाटतात. बोटीने परदेशी जात असतां, एका माणसाबरोबर हिंदुत्वाबद्दल होणाऱ्या चर्चेचे वादात रूपांतर झाले. समोरचा माणूस भारतीय देवी – देवतांबद्दल अपशब्द बोलू लागला, हे पाहता विवेकानंदांनी त्याची कॉलर पकडली व म्हणाले, “भल्या माणसा तू आता गप्प बसावंस ह्यातच तुझी भलाई आहे. अन्यथा तुला खाली पाण्यात फेकून देईन,” हे ऐकल्यावर तो गप्प झाला हे सांगणे न लागे.
समर्थांच्या भाषेत विवेकानंदांची कृती वर्णन करावयाची झाली तर ­
आधी गाजवावे तडाखे तरीच भूमंडळ धाके
किंवा
नीतीन्याये वाट रोधावी पाषांडांची
क्रांतिकारी संन्यस्त जीवन
दोघे क्रांतिकारी होते.  वेणाबार्इ नावाच्या तरुण स्त्रीच्या नशीबी विधवेचे जिणे आले. ती समर्थांची शिष्या बनली.  समर्थांनी तिचे नामकरण ‘वेणास्वामी’ केले आणि एका मठाची अधिकारी बनविले. इतकेच नव्हे तर तिला कीर्तन करावयास शिकविले. त्याकाळी कुठल्याही स्त्रीला संन्यास घेणे, मठाधिपती बनणे किंवा समाजप्रबोधन करणे असले अधिकार नव्हते. समर्थांनी स्वत:च्या अधिकारात हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले.  विवेकानंदांनी ‘सिस्टर निवेदिता’सारख्या परदेशी स्त्रीला भारतीय पद्धतीने संन्यास देऊ केला. तिने भारतात शाळा उघडल्या, समाजसेवा केली.
समर्थांचा दासबोध वाचताना जाणवते की त्यांचे भाष्य नाही असा जगातला एकही विषय नाही – राजकारण, महंतलक्षण, मूर्खाची लक्षणे, शहाण्याची लक्षणे, भक्तीचे प्रकार, अद्वैतवाद असे असंख्य विषय दासबोधात विस्तॄतरुपाने मांडले आहेत.
१९ डिसेंबर १९१५साली तुरीयानंदांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले आहे.  त्यात ते उल्लेख करतात, विवेकानंदांनी चप्पल शिवण्यापासून ते चण्डीपाठ कसा करावा अशा अनेक विषयांवर अनेकांना मार्गदर्शन केले. ह्या दोन महान व्यक्तींना कुठल्याही विषयाचा आवाका घेणे सहज जमत असे, मग ते विटा भाजण्याचे तंत्र असो, कागद बनविणे असो किंवा अजून काही इंग्लंडमधे फिरत असताना विवेकानंदांनी एका औद्योगिक प्रदर्शनाला देखील भेट दिली. ‘मी संन्यासी आहे, मला काय त्याचे’ अशी विचारधारा बिलकुल नव्हती. थोड्याशा अनवट वाटेने जाणारे हे महंत होते. समर्थ विडा खात असत तर विवेकानंदांनी काही काळ हुक्का किंवा पाईपचा आस्वादही घेतला.

विरक्तांचे परिव्राजक व्रत
संन्यासी हा प्रवासी असावा-‘नदी बहती भली, साधु चलता भला’ ह्या उक्तीप्रमाणे समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. विवेकानंदांनी तर देश आणि विदेश दोन्ही पालथे घातले.
समर्थ म्हणतात,
विरक्ते येकदेसी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे
विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्या परी
तसेच,
वैराग्याची बहु आवडी उदास वृत्तीची गोडी
विवेकानंदांनी दक्षिणेपासून उत्तरेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर भ्रमण केले. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत भ्रमण केले. व्याख्याने दिली’श्रीयुत गुडविन’सारखा शिष्य त्यांना या दरम्यान लाभला. पुढे तो त्यांचा लेखनिक बनला म्हणून विवेकानंद लिहू शकले. वेदांतावर ‘टीका’ करू शकले.
विवेकानंद परदेशी असताना भारतातील काही द्वेष्ट्यांनी त्यांच्याविषयी अपप्रचार केला.  इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल खोटे­नाटे लिहून वर्तमानपत्रात छापून आणले. इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून ते विदेशापर्यंत पोहोचविले. चारित्र्यावर शिंतोडे उडविले. ह्यामागील मुख्य व्यक्ती त्यांच्या वंग प्रांतातीलच ‘मुजुमदार’ नावाची होती. विवेकानंदांनी हे टीकेचे आसूड हृदयावर दगड ठेवून झेलले. ‘नीळकंठ’ बनून ते कडू विष प्राशन केले.  समर्थांच्या भाषेत व्यक्त करावयाचे तर,
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावें
परिव्राजक व्रत घेतलेल्या विवेकानंदांनी आपल्या भ्रमणकाळात एक कठोर व्रत घेऊन स्वत:ची परीक्षा घेतली होती.  व्रत असे होते – स्वत:हून कुणालाही अन्न मागावयाचे नाही. अगदीच आग्रह केला तर थोडेसे अन्न घ्यावयाचे; पण भुकेविषयी उल्लेखही करावयाचा नाही.
समर्थांनी पाण्यात उभे राहून साधना केली तेव्हा, मिळालेली भिक्षा पाण्यातून काढावी म्हणजे त्यातील रस, गंध, चव सगळे नष्ट होते, मग त्यातील एक भाग गायीला, एक भाग पाण्यातील जीवांना द्यावा व एक भाग (मुष्ठीभर) आपण घ्यावा. अशी बारा वर्षे साधना केली.  धन्य ते विरक्त लोक आणि धन्य ती तपश्चर्या!
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
समर्थांनी मृत्युचे भय घालविण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरणच दासबोधात लिहिले आहे.  मृत्युच्या पुढे कुणाचे काही चालत नाही.  मृत्यू न म्हणे हा राजा हा रंक, हा संन्यासी हा गृहस्थी असे विस्तॄत प्रबोधन केले आहे. जीवनातले शाश्वत तत्त्व अथवा सत्य म्हणजे मृत्यू हे समजवताना ते म्हणतात,
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात राहे
तसेच,
मना सांग पा रावणां काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वें बुडाले
मृत्युसंबंधी विवेकानंदांचे विचार आपल्याला अंतर्मुख करतात. एकदा जमलेल्या लोकांनी मृत्यु- बद्दलचा विषय छेडला तेव्हा विवेकानंद म्हणाले, “जेव्हा जेव्हा मृत्युचा विचार येतो तेव्हा माझ्या मनांतदुर्बलतेचा अंशही उरत नाही.” असे म्हणून विवेकानंदांनी दोन दगड उचलले व एकमेकांवर जोरात आपटले. पुढे ते म्हणाले,”माझं मन असं टणक होऊन जातं, जेव्हा मी मृत्यूबद्दल विचार करतो, याचं कारण मी परमेश्वराचं दर्शन घेतलं आहे.”
किती घनगंभीर विचार आहेत नाही!
अशा या दोन प्रकाशताऱ्यांच्या शिष्यांना आपल्या गुरुबद्दल जे काही वाटलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं. त्याचा अल्पसा उल्लेख करून हा प्रपंच इथेच थांबवितो.
रामदासांचा शिष्य उद्धव गोसावी ह्याने एका ओवीबद्ध काव्याची रचना केली. त्यात तो म्हणतो की बरें झाले मी लग्न नाही केले, ह्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी झालो आणि अनेक व्यापांतून मुक्त झालो. त्यातल्या शेवटच्या ओळीच फक्त इथे देतो,
धन्य धन्य महापुरुष तेचि ईश्वराचे अंश
शुकासारिखे उदास म्हणती त्यांसी
शिवरामाला तारिले ( उद्धवालाच शिवरामही म्हणत ) जन्मापासूनि मुक्त केले
भक्त लोक मुक्त झाले रामराजें
भगिनी निवेदिताने ‘दी मास्टर अ‍ॅज आय सॉ हिम्’ ह्या पुस्तकांत विवेकानंदांविषयी लिहून ठेवलंय, त्यांच्याकडून काय काय घेतलं, काय अनुभवलं, किती काय शिकली हे वाचनीय आहे.  शिष्याच्या दृष्टीतून दिसणारा गुरु बराच वेगळा जाणवतो.
अशा लोकांचे अनुभव, त्यांचे जीवन म्हणजे हीरे, माणिक, मोती आहेत. आपण त्यातले किती वेचावे, धारण करावे तेवढे थोडे आहे.
आयुष्य हेचि रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटीं
ईश्वरी अर्पूनिया लुटी आनंदाची करावीं
इतकेच काय ते म्हणू शकतो

– ©️ सचिन वि. उपाध्ये 



blog

sachinupadhye26@gmail.com

राऊळ महाराज

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
II श्री परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळमहाराज II
कोकण ही संतरत्नांची खाण म्हटले जाते.वैविध्यपुर्ण सौंदर्य संपन्न कोकणात बरेच संतमहात्मे होऊन गेले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव तसे कळसुत्री बाहुल्या, आणि ठाकर समाजाने जतन केलेल्या बर्याच लोककला मुळे प्रसिद्ध आहे.हेच गाव पिंगुळीतील थोर अवलिया संत राऊळ महाराजांमुळे प्रकाशझोतात आले.

सिंधुदूर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रम्हयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज. लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्‌गुरू नामस्मरणात रंगून जात. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्‌गत होती. ते १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत, एकावेळी २ ते ३ महिने काहीही प्राशन न करता करत असत. त्या काळात जगात ‘आई श्रेष्ठ’ याचेच प्रबोधन ते जास्त करत आणि तीच शिकवण परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आज भक्तजनांना देतात.

पिंगुळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी जांनी ज्या छोटया खोलीत ध्यानधारणा केली, तेथेच परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी राऊळबाबांचे समाधीमंदिर तेथेच उभारले आहे. या समाधीमंदिर व श्रीदेवी माउली मंदिर या दोघांच्या मध्ये उभा असलेला औदुंबर वॄक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या आजपपर्यंतच्या ५८ वर्षांचा आध्यात्मिक प्रवासाचा साक्षी आहे.

सर्वसामान्य माणसासारखे एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कृष्णा उर्फ आबा राऊळ पिंगुळी ग्रामदेवता रवळनाथ देवस्थानचे मानकरी होते.घरच्या गरबीमुळे ते नोकरीसाठी मुंबईला आले.त्याना भजन गाण्याचा छंद होता.ज्ञानेश्वर तुकारामादी संताचे अभंग मुखोद्गत होते.काम करताना आपल्या पहाडी आवाजात सतत मुखांने  अभंग गात असत.संसारात विरक्ती आली आणि ते विश्वात्मक वृत्तीतुन संसारी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करु लागले. शिक्षण कमी असले तरी त्यांचे पाठांतर चांगले असे.त्यानां ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती.त्यांनी भक्तांसाठी बरेच चमत्कार केले.भक्तांची संकटे दुर केली.

भक्तासाठी पंढरीच्या विठ्ठलाचे आपल्यात दर्शन घडवले.कित्येक भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचे करवी पारायणे करवुन घेतली.त्या़नी लावलेले औंदुबर वृक्षाचे रोप आज मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाले.त्यांचा भक्त संप्रदाय खुप मोठा आहे.मुंबई महाराष्ट्र,गोवा कर्नाटक या राज्यातुन आजही पिंगुळी गावी समाधी स्थानी भक्त मंडळी येतात.समाधीस्थानी नतमस्तक होतात.अशा या सद्गुरू राऊळ महाराजांनी इंचगिरीच्या गिरीमल्लेश्वर संप्रदायाच्या बाळकृष्ण महाराजांकडून शिष्यत्व पत्करले होते.

भजन त्यांच्या आवडीचे असल्याने ते स्वत:भजन गात आणि इतरांकडुनही भजन करवुन घेत.ते तपसाधनेसाठी कुठेही गेले नाही घरातच तासन् तास ध्यानाला बसत.असे हे सिद्ध अवलिया जरी आज आपल्यात नसले तरी पिंगुळी गावी समाधी स्थानी नतमस्तक झाल्यावर त्यांचे चिरंतन अस्तित्व जाणवते.त्यांच्या पश्र्चात त्यांचे पुतणे अण्णा महाराज त्यांचे कार्य सांभाळतात.

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@गणेश उर्फ ​​अभिजित कदम

Wednesday, December 30, 2020

मोठी त्याची सावली


मोठी त्याची सावली : भाग ७
- - - - - - -
प्रतिभेच्या उगमापाशी...

"तळ्याकाठचं गवत
तळ्याशी सलगीनं वागायचं
कारण त्याला जगायला
तळ्याचं पाणी लागायचं"
अशा शब्दांत जगाचा आपमतलबीपणा मांडताना "मिठी या शब्दात किती मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे", असा तरल शृंगारही चंद्रशेखर गोखले यांनी मांडला. त्यांच्या अर्थगर्भी चारोळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस नादावला. निर्मितीच्या यशानंतर चंद्रशेखर गोखले यांच्या वाट्याला आभाळभर मानसन्मान आला...! पण प्रतिभेच्या उगमापाशी होती पराकोटीची अवहेलना आणि अस्थिरता!
गोखलेंच्या काव्यातूनही त्यांचं सोसलेपण बोलकं होतं. आयुष्यानं पोरवयातच बरंच काही शिकवलं. आपण शिक्षणाच्या फळीवर फार काही करू शकणार नाही, ही बोचरी जाणीवदेखील! मात्र त्यांनी परिस्थितीचा निमूटपणे स्वीकार केला. आपणहूनच त्यानं वर्गाच्या अगदी शेवटच्या बाकावरला एक कोपरा धरला. पण दोन गोष्टी आतल्याआत सुरू होत्या 'चिंतन' आणि 'चित्रकारी'. भोवतालच्या घटनांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम व्यक्त व्हायला प्रवृत्त करायचा. मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबात जन्माला आलेला तो. तीन बहिणींच्या पाठीवर चौथा मुलगा. मुलांनी शिकण्याशिवाय तरणोपाय नाही, या विचाराशी बांधलेलं घर होतं त्याचं. कला बिला सगळं काही नंतर..! वडिलांचं एक वाक्य तो कायम स्मरणात ठेऊन होता, "शिकला नाहीस तर कॉलनीतल्या साठेंच्या किराणा दुकानात पुड्या बांधायला पाठवीन." तेव्हापासून साठ्यांच्या दुकानासमोरून जातानाही तो धास्तावलेला असायचा.
तो जे. जे. आर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाला. त्याचं कागदावर व्यक्त होणं घरात रुचायचं नाही फारसं. त्यातून वाद व्हायचे. पुढं पुढं कुरबुरी इतक्या वाढल्या की त्याचं हळुवार मन दुखावलं जायचं. अगदीच नाईलाज झाल्यानं एक दिवस घर सोडावं लागलं. मोठ्या बहिणीनं आश्रय दिला आणि सोबतच विचार आणि कृतीचं स्वातंत्र्यही! एकदा लहानग्या भाचीला अंघोळ घालून देताना तिच्या हातातली बाहुली पाण्याच्या टबात पडली. ताठरलेले हात-पाय...छताकडं लागलेले डोळे... आणि पाण्याच्या  पृष्ठभागावर विखुरलेले बाहुलीचे केस... निर्जीव बाहुलीच ती. पण ते दृश्य पाहून तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि आयुष्यातली पहिली चारोळी जन्माला आली...
"पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत"
घर सोडल्यानंतरचा प्रसंग. एका संध्याकाळी तो 'जेजे'तून बाहेर पडला. बाहेर पावसाची रिपरिप चालली होती. पुस्तकं डोक्यावर धरून पावसाचे थेंब अंगावर झेलत तो आपल्याच तंद्रीत घराकडे निघाला. पावलं वळतील तसा तसा! ती कुठं पडतायत हेही कळत नव्हतं त्याला. घराच्या फाटकापाशी आला आणि एकाएकी भान आलं. जे घर कधीचंच सोडलं आहे तिथं येऊन पोहोचलो आहोत आपण. पावलं थबकली आणि मागं वळली. सख्ख्या नात्यांमधली दरी जरा अधिकच रुंद भासली त्याला. डोळे डब्ब भरून आले आणि त्या भावनेनं एका अजरामर चारोळीचं रूप घेतलं...
"पुसणारं कुणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
रडणारंच कुणी नसेल तर
मरणही व्यर्थ आहे"
लग्न करायचंच नाही, हे त्याचं जवळपास ठरलं होतं. एक दिवस एका मित्रानं सांगितलं, "तुझ्या कवितांची एक चाहती आहे. तुला भेटायचं म्हणतेय ती." तिच्याशी भेट झाली. पुढे उलगडा झाला की तिला भेटायला आणताना मात्र "हे तुझ्याकरता आलेलं स्थळ आहे", असं सांगितलं गेलं होतं. रीतसर पसंती झाली आणि लग्न उरकलं. 'उमा' नावाची अत्यंत समजूतदार मुलगी आयुष्यात आली. "शेखर, तू लिहीत रहा. वाटल्यास मी लोकांसाठी भाजी- पोळ्या करून विकेन", असं म्हणणाऱ्या अर्धांगिनीनं त्यांच्या अडचणीच्या काळात आपला शब्द खरा केला. हा समंजसपणाचा भाव त्यांच्या एका कवितेतून असा उमटला..."घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं...एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं". आता चंद्रशेखर गोखले छानपैकी स्थिरावले आहेत. जगाच्या पाठीवर त्यांच्या चारोळ्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत करियरसाठी धडपडणाऱ्या होतकरूंचे मॉडेल को-ऑर्डीनेटर, मालिकांचे संवादलेखक, कथालेखक अशा विविध रुपांत ते आपल्याला भेटतात. सौभाग्यवती उमा गोखले मालिकांच्या जगातली प्रेमळ आई आणि समंजस काकू किंवा मावशीच्या रुपात बघायला मिळतात. मराठी कवितेच्या प्रांतात गोखल्यांनी इतिहास घडवला. "मी माझा"संग्रहाच्या लाखो प्रती खपल्या. इतर भाषेत रूपांतरित झाल्या. "मराठी चारोळीचा जनक" ही बिरुदावली ते विनयपूर्वक हसून अमान्य करतात, हे गोखलेंचं मोठेपण आहे. दिवस निघून जातात... जखमा साकळतात...उरलेले व्रण मात्र जन्माची सोबत करतात. अजूनही कधीतरी कातरवेळी जुन्या आठवांनी त्यांचा स्वर कापरा होतो... डोळे भरून येतात...काही क्षण निःशब्द जातात... पुन्हा चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंच्या चेहऱ्यावर हसू विलसतं... "मी माझा"संग्रहाच्या मुखपृष्ठावरच्या फोटोतल्यासारखं...!
© नितीन भट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3986990831386283&id=100002262164906