"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.
खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता.
एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.
शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.
©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati

0 comments:
Post a Comment