Monday, July 14, 2014

जी एंच्या कथांची तोंडओळख

जी एंच्या कथांची तोंडओळख


शब्दांजली(marathi katha,gadya)  orkut


आपण सर्वांनी इथे जी एं च्या कथांची ओळख करून द्यायची का ?
मी सुरुवात करतो.. माझ्याकडे त्यांचे सर्व संग्रह आहेत. कुणाला रेफ़रंस हवा असेल तर संपर्क करा.


===============
कथा : गिधाडे , संग्रह : हिरवे रावे
गिधाडे : बापू काळुस्कर : म्युनिसिपल क्लार्क. दुसर्‍याचे पैसे घेऊन जात असता मोहात पडतो आणि मुंबईला पोचतो. पैसे संपवून घरी येतो आणि सारे आयुष्य अपमानित जगत असतानाच...
... त्याला एक असाच अफ़रातफ़र करणारा माणूस दिसतो ... आणि बापू त्याला छळायला निघतो.
वैशिष्ट्य : मोह, आकर्षण ही मानवी सहज प्रवृत्ती असण्याचं जी ए प्रणित तत्त्वज्ञान. त्या एका क्षणासाठी उर्वरित आयुष्य छळ सहन करण्याची साहजिकता. आणि दुसर्‍याला छळण्याची सहज प्रवृत्ती
आवडलेली वाक्यं : आपल्या अशक्त मुलीला फ़्रॉक नाही म्हणून स्वतःचा शर्ट देतानाची :
त्याने हळूच तिच्या पोटाला हात लावला तेव्हा झगा टाकून अशक्त हातांनी अंग बांधून शैलू हुळहुळून हसली. ’डुरमी गं बाई , ढमाबाई !’ बापू म्हणला व त्याने तिला एकदम जवळ घेतले. ती एकदम एवढीशी, कानवल्या एवढी. ती त्याच्या छातीला अगदी चिकटून राहिली, आणि हातात चिमणी धरल्यासारखी तिच्या उराची धडधड त्याच्या अंगाला जाणवली. त्याला एकाएकी फ़ार अपराधी वाटले . आपण आयुश्यात हिलाच फ़ार मोठॊ शिक्षा दिली हे जाणवले. आणखि अठरावीस वर्षांनी कशी असेल शैलू ? स्वतःच्या घरी ? सुखी ? की अशक्त, निराश अंगात मन कणाकणाने झिजत, इतरांच्या आयुष्याकडे दुरुनच पहात ?


(गिधाडे : हिरवे रावे )


===
कथा : शिक्षा, संग्रह : हिरवे रावे
शिक्षा : शोभाची कथा. एकेकाळच्या श्रीमंत बापाची आता शिक्षिकेची नोकरी करणारी तरूण मुलगी. एक पानवाला तिची छेड काढतो आणि पोलिस केस झाल्यावर उलट तिच्यावरच नाहि नाही ते आरोप करतो. गांवभर चर्चा होऊन तिलाच अपराधी असल्यासरखं होतं. प्रियकरही सोडून जातो. शेवटी तो मवाली शिक्षा भोगून सुटून येतो. पण हिची अपमानित जगण्याची शिक्षा सुरुच रहाते.
वैशिष्ट्य : कथेचं वातावरण, व्यक्तीरेखा अत्यंत सजीव. पण कुठेही ढोबळपण नाही. प्रत्येकच जण आपापली शिक्षा भोगतो आहे.
आवडलेली वाक्यं : (शोभाने लावलेल्या फ़ुलझाडाची कुंडी तिच्या आईच्या हातून पडून फ़ुटते)... कुणाच्याही हातून तसे झाले असते. शिवाय झाडाला तर धक्कासुद्धा लागला नव्हता. पण सारा दिवसभर तिने शोभाकडे अशा कुत्र्यासरख्या दीन ओलसर डोळ्यांनी पाहिले की शोभाला भडभडून आले. ती कुंडी तिच्या वाटेत ठेवल्याबद्दल स्वतःच्याच तोंडात मारून घ्यावे असे तिला वाटले. निव्वळ कपडे धुण्यासाठी परटाला दोन काळीभोर नदीकाठ राने देऊन टाकणार्‍या देसाई घराण्यातील आपली आई. पण चार पाच वर्षे घरचे सारे काम स्वतः करू लागली होती. पहिली घागर ओढली त्यावेळि ती एकटीच तासभर हातांवर फ़ुंकर घालत बसली होती. पण आता झगडण्याची तिची सारी इच्छाच गेली होती. शेवटी शांतपणे पसरण्यापुर्वी तिचे आयुष्य बसकू लागले होते.
================
कथा : तुती , संग्रह : हिरवे रावे
तुती : हिरवे रावे
(ही कथा मी आजवर शंभर एक वेला वाचली असेल. तरीही पुन्हा वाचताना अनावर होतो.)
एका कुटुंबाच्या वाताह्तीची कथा एका मुलाच्या नजरेतून. वडलांना घरभाडे झेपेना, म्हणुन घर बदलले. बहिणीला दुसरेपणाचा (पहिली बायको हुंड्यापायी मेलेली) नवरा पाहिला म्हणून भाऊ घर सोडून जातो. आणि बहिण लग्नानंतर वर्षभरात विहीरीत जीव देते. वडलांना अर्धांगवायू होतो.


वैशिष्ट्य : यातून समाजत्ल्या भयाण वास्तवाची, मध्यमवर्गाच्या संस्कारांची, आंबट,कडू गोड सारी चव येते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद, निष्ठा दिसतात. तुतीच्या चवीचा आस्वाद घ्यायला गरिबी आड येत नाहि. आणि कितीही उपास घडले तरी भाकड गायीला चारा देण्यात कुचराई होत नाही. अशा छोट्या गोष्टीतून व्यक्ती , कुटुंब, समाज यांच्या भावभावनांचं आणि मूल्यांचं नेमकं टिपण जीएंनी काढलं आहे. याच्याच दुसर्‍या भागाचं नाव आहे ’कैरी’ .. ज्यावर नंतर अमोल पालेकरांनी सिनेमा काढला.


आवडलेला भाग : या कथेतला प्रत्येकच शब्द जीवघेणा आहे. पण सांगायचाच तर हा भाग:
आई मुलगा शाळेत पास जाल्यावर म्हणते, ”कारट्या , तू बी ए हो अगर होऊ नकोस. पण आतून बाहेरून मात्र अगदी दगड हो !,” तिने माझ्या छातीवर टिचकी मारली, व ती पुन्हा म्हणाली, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ !”


====================
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
तो ज्या गांवाला जायचंय त्याचं नांव विसरतो. आणि मग स्वतःचंही नांव विसरतो. आणि एका अनोळखी रस्त्यावर स्मृतिभ्रंश होऊन अडकतो. त्याला सोबत असते एका वेडसर म्हातार्‍याची. आनि मग स्वतःला आलेलं फ़्र्स्ट्रेशन तो त्या म्हातार्‍यावर काढतो. त्याची मालकाची वाट बघण्याच्या आशेची अखेर करतो. आणि त्या म्हातार्‍याला कोलमडताना बघतो. आनंदित होतो.
वैशिष्ट्य : मी ही कथा जीवनमुल्यांच्या संदर्भात वाचली. आयुष्य़भर जपलेल्या मुल्यांबाबतच कधी कधी प्रश्नचिन्ह उभं रहातं. आपण आजवर केलेलं सगळं व्यर्थ होतं असा भास होतो. भिती वाटते. अशावेळी इतरांचंही जीवन तितकंच व्यर्थ आहे हा विचार मनाला दिलासा देतो.
जी एंच्या कथांतून वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. वाचणार्‍याच्या पिंडाप्रमाणे. हेच त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य. पण याचा अर्थ जी ए सारं काही वाचकावर सोपवतात असंही नाही. त्यांची स्वतःची विचारसरणी प्रत्येक कथेच्या पार्श्वभुमीला असतेच. nihilistic , deterministic existentialist.
आवडलेलं वाक्य : ...म्हातारा अडखळत घोगरेपणाने म्हणाला. दूध नासल्याप्रमाणे त्याचे सारेच अंग बिघडून ताठर झाले...तो निर्जीव ओठांनी पुटपुटला...त्याने वठलेल्या हाताने पत्र्याचा खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, परंतू आखडून वाकड्या चोचीसारखी झालेली बोटे कशावरच स्थीर झाली नाहीत,...
... वीष उतरल्याप्रमाणे त्याचे अघोरी समाधान उतरले.
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
या कथे वरून एक द्विपात्री एकांकिकाही बनली आहे. आणि ती दोन तीन वर्षांपुर्वी सर्वोत्कृष्ट म्हणुन गौरवली गेली.
====================
स्वामी : कथासंग्रह: पिंगळावेळ
या कथेवर अख्खं एक पुस्तक लिहीता येईल अशी एक भव्य कथा. शेकडो वेगवेगळे अर्थ काढता येतील...
गोष्ट अशी आहे : आपल्या मुळ गांवी गेलेला एक माणुस रात्र काढण्यासाठी एका मठात जातो. आणि तिथला प्रमुख स्वामीच बनतो. पण कसा ? एका तळघरात कोंडून ठेवून. त्याला सुग्रास खाणं पिणं मिळतं. पण जिवंतपणा नाही. गाठभेट नाही. आणि त्याच्या नांवावर तो मठ चालवला जातो. भजनं चालतात. स्वामी फ़क्त नांवाला जिवंत.
पण स्वामी मात्र या निर्जीवतेवर मात करतो. आणि एक वेल लावतो. जीवन वेल. आणि ती वाढवताना स्वतःचा जीव अर्पण करतो. प्राणवायू त्या वेलीला देऊन.
वैशिष्ट्य : काहींना हि कथा साम्यवादी शासनप्रणालिवरचं भाष्य वाटलं. तर काहींना अध्यात्माच्या नावाने चालणार्‍या व्यापारावरचं. काहींना मानवी दडपशाहीला गांधीवादी उत्तर वाटलं तर काहींना यात निराशा आणि आशा यांतला संघर्ष. काहींना यात existentialist determinism ची विकसीत सूत्रं दिसली. काहींना यात फ़्रिड्रीश नित्शेची छाया आढळली. तर काहींना मायावाद. मला तर प्रत्येक वेळी ही कथा वेगळीच भावते.
मला या कथेवर इतरांची मतं ऐकायला आवडेल.
आवडलेला भाग : मरतेसमयी स्वामीचं झाडाच्या कोंबाशी संभाषण...
==============
तू असाच वर जा
अंधार्‍या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणार्‍या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सुर्यप्रकाशाला भेट दे
तुला जर फ़ुले येतील-
आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फ़ुले यावीत आणि त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.
तुला जर फ़ुले येतील, तर अशा सहस्त्र फ़ुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.
तुला जर फ़ळे येतील-
आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फ़ळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदावा.
तुला जर फ़ळे येतील , तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.
मग तुझ्या बीजाची फ़ळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणा एवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.
त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे.
आभाळात एखादे लहान पाखरू दिसले तर त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.
जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले, व पानाचा आरसा केला, किंवा कधी तुझे पिवळे फ़ूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखुन घेतली, अगर तुझे एक लाल फ़ुल खुडुन ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला , तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
कारण, कुणास ठाउक, अब्जांमध्येच एक असे आढळणारे ते मूल असेल, ते देखील भोवतालच्या अंधार्‍या अजस्त्र भिंती फ़ोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.
आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.
म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही.
एक फ़ूल गेल्याने तुझे सौंदर्य उणॆ भासणार नाही.
एक फ़ळ गेल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.
इतके तुला वैभव आहे. इतके तुला वैभव मिळो !
=========
या सार्‍यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणुन तु म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हे देखिल इतरांना कळू दे.
म्हणून तू असाच वर जा....कथा : स्वामी :: कथासंग्रह: पिंगळावेळ


==========================
कथा : राणी :: संग्रह : निळासावळा
एक अंध आजोबा.अंथरुणाला खिळून. खोलीबाहेर जाणं नाही. विधुर. दोनच आधार. एक, पत्नीची आठवण, दुसरी, गोडशी नात , राणी.
एकदा आठवडाभराच्या बेशुद्धीतून बाहेर येतात. आठवडाभर बेशुद्ध असल्याचीही शुद्ध नाही. अचानक आघात होतो, राणी गेल्याच्या बातमीचा. मन टाहो फ़ोडत असतं. त्याच वेळी एक बाहेरचा माणुस घरात आल्याची चाहूल. घरात काही कुजबुज. त्या माणसाला धक्का बसतो. तोही कळ्वळतो, आणि एक वाक्य निघतं. ’देवाची ईच्छा. म्हातार्‍याला उदंड आयुष्य आहे. आणि सोनकेळी सारखी मुलगी वाया गेली’. हे ऐकताच आजोबांचा टाहो विरून जातो. राहते ती अपार वेदना. वाचकाचे डोळे ओलावणारी.
वैशिष्ट्य : जी एं च्या कथांतून एक वेदना, असहायता, नियतीशी लढताना मानवाची शक्तीहीनता यांचं दर्शन सतत होतच असतं. या कथेत मानवी संबंधातलं असहाय्यपण, अभावितपणे दुसर्‍याला दुखावणं, चिंतेच्या अनंत छटा, प्रेमाच्या छटा... इतक्या विविध प्रकारे आल्या आहेत ... मन निःस्त्ब्ध होतं...
आवडलेला भाग : राणि गेल्याचं कळल्यावर आजोबा पत्नीला उद्देशून स्वतःशीच बोलतात ....‘ तू ज्यावेळी गेलीस त्याच वेळी मीही आलो असतो तर बरं झालं असतंबघ--- ”ते पुटपुटले “ फ़ार बरं झालं असतं ! मला जगण्याची बिलकुल हौस नव्हती गं ! मी इथे भणंग होत चालल्याप्रमाणे शेवटचे क्षण या घड्याळापुढे अगदी एकेक वाजवून परत परत देत बसलो, आणि फ़ुंकर मात्र पडली ती त्या पोरीवर. राणी,, मला जगायचं नव्हतं. मला एक दिवसाचं सुद्धा आयुष्य नको होतं.जर माझ्या रक्तानं तुझ्या अंगठीच्या बोटाला मेंदी चढली असती, तर मी माझं रक्त तुला दिलं असतं. पोरी, मला उदंड आयुअष्य नको होतं . सपथ देवाची, तुझी, तुझ्या आजीची ! --- मला जगायचं नव्हतं ग... मला जगायचं नव्हतं. ...”
-----
कथा : राणी :: संग्रह : निळासावळा
===========================
कथा : खुळा बाळ्या :: संग्रह : ओंजळधारा
मनोरंजक कथा. एक खुळाबाळ्या असतो. कायम वेडसरपणाची कृत्यं करून गांवात हसण्याचा विषय बनतो. त्याने केलेल्ल्या एक एक करामतींसमोर (Mr Bean type) आपणही हसून हसून लोटपोट होतो. अशातच त्याचे लग्न होते आणि मग बायकोही निघून जाते. पण त्याच्यावर माया करणारी त्याची आई मात्र तशीच त्याच्या बरं होण्याची वाट बघत रहाते.
एक दिवस एक साधू येतो. तो त्याला बरं करण्याचं आश्वासन देतो. पण एक किंमत मागतो. तिने तिचं उरलेलं आयुष्य त्या साधूला द्यावं. लगेच स्वतःचं प्राणार्पण करून.
आईच ती. लगेच तयार होते. मुलगा बरा होतो. आणि आई संन्याशाकडे जाते. प्राणार्पणाला. संन्याशी मात्र नकार देतो. पुढचं मुळातच वाचावं असं त्याचं भाषण आहे.
वैशिष्ट्य : जी एंच्या इतर कथांपेक्षा वेगळ्या कथा ओंजळधारामध्ये आहेत. ही कथा तर आशादायक, सुखांत. पण जी एं चं तत्त्वज्ञान मात्र इथेही तेवढ्याच ताकदीने येतं
आवडलेला भाग : (आई आयुष्य द्यायला येते तेव्हा साधू नकार देतो घ्यायला ... आणि म्हणतो) : “मी भ्रमाने आंधळा झालो होतो. म्हणून कुणाचे तरी उरलेल्या आयुष्याची भीक मागत होतो. परंतु आता माझेदेखिल डोळे स्वच्छ झाले आहेत. माझे आयुष्य संपणार याचेच मला समाधान आहे. माझे तुझ्यावर उपकार नाहीत. तु पुर्णपणे ऋणमुक्त आहेस. उलट , तुझेच माझ्यावर उपकार आहेत, कारण आता मी माझ्या शेवटच्या क्षणाकडे , हत्येसाठी ओढून नेत असलेल्या पशूप्रमाणे भेदरून असहाय्पणे जात नाही , तर, निर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी पायर्‍या उतरत पाण्यात जावं त्याप्रमाणे निरामय शांतीने जात आहे. तुझ्या भेटीआधी तसे घडले नसते. आयुष्याच्या लक्तरांना आसक्तीने, ईर्ष्येने, चिकटून राहण्याचा उपदेश देणारे गुरु , रानातील भोकरफ़ळांप्रमाणे उदंड असतात. पण पोक्तपणे मृत्युला सामोरे जाण्याचे शिकवणारे गुरु दुर्मिळ. आणि तसला एक, शेवटी शेवटी का होईना, मला भेटला , हेच माझे यश आहे.”
कथा : खुळा बाळ्या :: संग्रह : ओंजळधारा
========================
कथा : पेरू :: कथासंग्रह : ओंजळधारा
एका बाजारात एक पेरूवाला पेरू विकत असतो. त्याच्याकडे एक साधू एक पेरू फ़ुकट मागतो. पेरूवाला देत नाही. तेव्हा तो साधू एक बी मधून पेरूचे झाड लावतो आणि क्षणात त्याला पेरू येतात ते सर्वांना वाटून टाकतो. तेव्हढ्यत त्याला पेरू देणार्‍या शिपायाला बढतीही मिळते. सगळे लोक आनंदाने नाचतात. आणि पेरूवाल्याचा मात्र एक पायच लाकडाचा होऊन जातो.
वैशिष्ट्य : म्हटलं तर ही एक बालकथा. म्हटलं तर एक हितोपदेश. पण त्यातही जी ए टच आहेच. त्यांची मिथ्यावादाची बैठक येतेच. एक पेरू द्यायला काय जातं... किंवा पोलिस शिपाई फ़ौजदार होतो... यातून दिसणारं माणसाचं बाहुला असणं त्यांच्या मूळ विचाराचीच बैठक आहे.
आवडलेला भाग : त्यांची कल्पनारम्यता. पेरूवाल्याच्या डोक्याचा पेरू होणं आणि त्याला दाताशिवाय पेरू खायला मिळणं...


कथा : पेरू :: कथासंग्रह : ओंजळधारा
====================
कथा : छोट्या किकोसचा मृत्यु ::: संग्रह : अमृतफ़ळे
एका गावात एका माण्साला तीन मुली असतात. त्यातली मोठी पाणी आणायला विहीरीवर जाते. तिथे तिला एक झाड दिसते. आणि ती विचार करते. जेव्हा कधी माझे लग्न होईल आणि मला मुलगा होईल तो या झाडावर चढेल. आणि तिथीन तो खाली पडेल. तेव्हा खडकावर आपटून मरेल. या विचाराने ति रडत सुटते. तिचे ऐकून एकेक बहीण व आई येतात आणि त्याही भाचा आणि नातवाचा मृत्य़ू ऐकून रडायला लागतात. तिथून एक घोडेस्वार येतो. आणि त्या नातवाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून गांवजेवण घालायला सांगतो.
जेव्हा त्या मुलींचे वडील घरी येतात तेव्हा गांवजेवण झालेले असते. तेव्हा चिडून वडील बाहेर पडतात. तर त्यांना वाटेत त्या घोडेस्वाराची बायको भेटते. आणि आपल्या गरातले सारे पैसे आणि घोडा आपल्या आईला (स्वर्गात) पोचवण्याची विनंती करते. तेव्हा तो माणूस या जगातल्या मुर्खांची गणती पाहून हसतो आणि परत येतो.
वैशिष्ट्य. : Leon surmeleun यांच्या कथेचा हा अनुवाद. मानवी मुर्खपणा आणि भाबडेपणा आणि त्यावर पोसलेल्या लबाडांची ही कथा. तशी गंमत. तशी खोलवर मनुष्यस्वभाव सांगणारी. आपण यात कुठे असतो ते आठवून पहावे. पण आपण सहजासहजी स्वतःला ना मुर्ख म्हणू शकत ना लबाड. पण यातला एक ना एक रोल आपण आपल्या नकळत सदोदित करत असतो.


कथा : छोट्या किकोसचा मृत्यु ::: संग्रह : अमृतफ़ळे

==================
जी एंच्या कथांची तोंडओळख ~ सुनील सामंत

http://orkut.google.com/c1818478-t334e4824146c3090.html

Friday, July 11, 2014

ई साहित्य कथाकथन

ई साहित्य कथाकथन 

--------------------------------

स्टेशन डायरी सौंदर्या
January 26, 2014 
--------------------------------
रेवण जाधव यांच्या वेगवान शैलीतून उतरलेल्या दोन जबरदस्त कथा.
पोलीस स्टेशनवरच्या सत्य घटनेवर आधारित : स्टेशन डायरी.
सौंदर्य हाच शाप बनलेल्या एका युवतीची चटका लावणारी कथा : सौंदऱ्या
You cant afford to miss these stories.
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @

--------------------------------


--------------------------------
रक्षा ~ डॉ स्मिता दामले  
June 5, 2014
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/raksha_smita.pdf
---------------
अगदी पहिल्याच ‘ क्षणभंगुर’ या कथेपासून मनाची पकड घेणारी अशी स्मिता दामले यांची शैली जाणवत रहाते. विशेष म्हणजे ही शैली कथेला अनुकूल असे रागरंग धारण करते. पहिल्या कथेतील अत्यंत सधन आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत अशा नानासाहेबांनी आपल्या संपत्तीचा केलेला विनिमय मनाच्या श्रीमंतीबरोबरच वैराग्याचा साक्षात्कार घडवणारा आहे. नानासाहेबांच्या घरातील ऐश्वर्याचं , आयुष्यातील अद्भुत घटनांचं , विचारांचं वर्णन पकड घेणाऱ्या प्रतिमांच्या वापरातून लेखिका करते.
‘घर सर्व दागिने उतरवून ठेवलेल्या श्रीमंत सुंदरीसारखं साधं दिसत होतं ‘’.. एकाच वाक्यात केवढातरी आशय लखाखून जातो. कथेचा शेवट एखाद्या रंगलेल्या मैफिलीसारखा मनात रेंगाळत रहातो..

----------------------


बळी 
July 11, 2014
विद्यापीठ नामांतराच्या पार्श्वभूमीवरील, मराठवाड्यातील ग्रामीण बोलीतली कथा.
एक काळजाला चटका देणारा अनुभव...
लेखक : मच्छिंद्रनाथ माळी
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
--------------------------------
ई साहित्य
www.esahity.com
esahity@gmail.com

Thursday, July 10, 2014

Wednesday, July 9, 2014

आषाढी एकादशी

                                          सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, June 27, 2014

परछाई




जेव्हा बुलंद करणे जमले स्वतःस नाही
परछाई मी स्वतःची करतो बुलंद आहे

क्षितिजाशी सुर्य जाता परछाई होत मोठी
पण हाय दो क्षणांनी जाते पुसून आहे

जाता दिव्यासमीप होतेच तीही मोठी
जवळीक जास्त करता चटकाच येत आहे

परछाई होय परकी मग कोण होय जवळी
आशा कुणाकुणाची मी बाळगून आहे
~ नाम
fb@ https://www.facebook.com/naamagumjaayegaa
Blog ~ http://marathikavyanama.blogspot.com

Wednesday, June 25, 2014

चारोळी

मधे..
थोडं अंतर राहुदे
क्षणभर तुला
डोळेभरून पाहुदे

============

तसा वाद नेहमीचा...
माझा माझ्याशी चालणारा
तुझा निसटता कटाक्ष...
मनाला छळणारा…

======

तू...
कानात सांगितलेली गोष्ट
मला अजून
ऐकू येते स्पष्ट…

============

कोणी विचारलं तू कसा आहेस?...
तर काय उत्तर द्यायचं मला कळत नाही
कळत नाही म्हणण्या पेक्षा या प्रश्नाचं उत्तर
मलाच कधी मिळत नाही…
==================

आभाळभर पाखरं
आणि ओंजळभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे…

===============

तू म्हणालीस आपण पाहिलेली स्वप्नं
उधार राहिली तुझ्यावर....
मी म्हटलं ठीक आहे हे ही ओझं
ठेऊन देईन आठवणीन्च्या ओझ्यावर.

===============

मनाची तहान....
पाण्याने भागत नाही
हे बरं की मनाची तहान
सगळ्यांनाच लागत नाही.

=================

आपलंच मन असून आपल्याला
मनापर्यंत पोहोचता येत नाही
ते कसं आपल्याला सारखी बोच लावतं
तसं त्याला जाऊन काही टोचता येत नाही

=================
 चंद्रशेखर गोखले 
fb @ https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7

Tuesday, June 24, 2014

जीवन




जीवन

मरगळलेले शब्द नसावे
सळसळणारे गीत असो
नफ़ा फ़ायदा सोडून देऊन
कळवळणारी प्रीत असो

विलक्षणावर प्रेम असावे
ऐरे गैरे साथ नसो
जिवंत उत्साहात मरावे
कोमेजून शंभरी नको

सदा सजन आकाश दिसावे
पंखावर काजळी नको
भुषण येवो दूषण येवो
मार्गावर कुंपणे नको

जाईन आज किंवा मी उद्या
उरेल ना काही माघारी
पण जे जगलो क्षणभर त्याचा
किंचित पश्चात्ताप नको



- नाम गुम जायेगा
उर्फ सुनील सामंत
https://www.facebook.com/naamagumjaayegaa

Thursday, April 10, 2014

चेहरा

चेहरा
-----------

चेहऱ्यावरी चेहरा
न जाणे त्यावर किती मुखवटे

विश्वास अविश्वासाच्या
साऱ्या खुणाचं भासती

कधी हास्यामागे
आक्रंदने लपवती

खळी खुलताच
चेहरे नटती

कधी अभिनयाचे पाढे दिसती
कधी नाटकांचे प्रयोग रंगती

डोळे मात्र बोलके
अंतरीचे भाव सांगती …

~ विद्या 

Saturday, February 8, 2014

Saturday, January 11, 2014

मस्त रहावं कसं ? ~ शिवराज गोर्ले

मस्त रहावं कसं ? ~ शिवराज गोर्ले 
विचार विवेक म्हणजे ANTI UN HAPPINESS FORMULA


जगात चांगलं वाईट असं काहीच नसतंच , आपणच आपल्या विचारांनी हे चांगलं हे वाईट ठरवत असतो .. शेक्सपिअर 

नकारात्मक भावनांचा उगम माणसांच्या दृढ समजुतीत असतो ..

विवेकनिष्ठ विचारसरणीच महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या अनेक रूढ कल्पनांना ,प्रस्थापित समजांना चांगलंच धक्का देणारी आहे .
वर्षानुवर्षे आपल्यावर जे संस्कार केले जातात कित्येकदा काळात नकळत , आपल्या विचारांवर जे प्रभाव पडत राहतात त्या संस्कारांना व प्रभावांकाहीसं आव्हान देणारी अशी हि पद्धती आहे .

“प्रत्येकानं लोकांच्या नजरेत भरेल ,असं यश मिळवायलाच हवं का ?” “माणसाला प्रेमाची किती गरज असते ?”
“प्रेमाशिवाय तो पुरेशा सुख समाधानानं राहूच शकत नाही का ?” अश्या आशयाचे सडेतोड प्रश्न ’विचारविवेका’ त विचारले जातात . 


आयुष्यात आनंद असणार तसंच दु:ख ही असणार


 
रसेल म्हणतो 
“हे सारं आयुष्यात आवश्यक हि असतं कारण माणसाची मानसिक शारीरिक जडण घडण अशी आहे कि जीवनासाठी किमान झगडा दिल्याशिवाय तो ठणठणीत राहू शकत नाही तेव्हा हे निसर्गदत्त वास्तव स्वीकारून प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदात राहील तोच खरा शहाणा ”

कळत नकळत आपल्या आनंदाच्या मार्गातील हे अडथळे हे व्यत्यय आपणच निर्माण केलेले असतात .
अनावश्यक चिंता ,ताण,दु:ख आपण टाळू शकतो .

HAPPINESS IS NOT SOMETHING TO ACHIEVE IT HAS TO BE EXPERIENCED.


----------------

असा मी असा मी 

माणूस असण्याचा सर्वात महत्वाचा फायदा तुम्ही कसा विचार करावा हे ठरवू शकता - डॉ . अल्बर्ट एलिस

Sunday, January 5, 2014

आयुष्य बहरताना ~ प्रवीण दवणे

आयुष्य बहरताना ~ प्रवीण दवणे

मानवी जन्म आणि त्यातही तारुण्य पुन्हा पुन्हा मिळत नाही .याच वयात मुलाचं नातं पृथ्वीतल्या स्पर्श ,रस , रूप , गंधाशी जोडून सूर्याशी हस्तांदोलन करा . बघा ,आपल्यातून फुलण्या साठी अधीर असलेली फुलं सहज फुलून येतील .
फुलपाखरं नंतर आनंदित होतील ,आधी झाड आनंदी व्हायला हवं, त्या साठी 'मुळातली ' साधना हवी ; त्यावर ठरेल ,आयुष्य सुफळ कि निष्फळ !

Tuesday, December 31, 2013

कादंबरी

कादंबरी 




धांडोळा ~ विक्रम भागवत
-----------------------------------------
एक जबरदस्त कथानक आहे.
आशू काळसेकर. एका अग्रगण्य वृत्तसमूहासाठी फ़्री लान्स काम करणारी एक जर्नलिस्ट. तिच्यावर एक खास जबाबदारी सोपवली जाते. एका सस्पेंडेड पोलिस अधिकार्याची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यावर स्टोरी करण्यासाठी ती बाहेर पडते. प्रेमानंद हिर्लेकर हा तो ए टि एस चा अधिकारी, encounter specialist म्हणून प्रसिद्ध, एका सामान्य नागरिकाच्या encounter साठी suspend झालेला. ती कामाला सुरूवात करते. या कामात ती एका कल्पनातीत भयंकर वादळात सापडते. व्यक्तीगत भावनांच्या आणि सामाजिक राजकीय हितसंबंधांच्या... कथानक एखाद्या वावटळीसारखं वाचकाला वेगवेगळ्या जगांत नेतं. त्यात भेटतात एकसे एक जबरदस्त व्यक्ती ...एका अतिरेक्याचा बाप अब्दुल मसूद... एका संस्कृत महापंडिताचा मुलगा शरद गोखले... आणि अशा व्यक्तीरेखांतून वेगवान वळणं घेत कथानक थेट दिल्लीच्या साऊथ ब्लॉकपाशी जाऊन धडकतं. सत्तेची केंद्रं हादरतात. या वादळाच्या वावटळीत हकनाक सापडतो वृत्तपत्रांचा संपादक पसरिचा. आणि त्या आशू काळसेकरचा प्रवास अखेर रमाई झोपडपट्टीपर्यंत जाऊन पोहोचतो. रमाई झोपडपट्टी ते साऊथ ब्लॉकची भव्य ऑफ़िसेस. एक विस्तृत कॅनव्हास. गडद त्रिमितीय व्यक्तीरेखा. वास्तवाची जळजळीत जाणिव करून देणारी कादंबरी. धांडोळा. लेखक विक्रम भागवत.
श्री. विक्रम भागवत हे नांव तसं वाचकांच्या परिचयाचं आहे. ’अफ़लातून’ ’एक शून्य रडते आहे’, ’ घनदाट’, ’शोध’ ’एक लफ़डं विसरता न येणारं’ , आदी गाजलेल्या नाटकांचे नाटककार, आणि ’एक शून्य शून्य ’,”चाळ नांवाची वाचाळ वस्ती ’ अशा गाजलेल्या सिरियल्सचे ते सुप्रसिद्ध लेखक आहेत. वेगवान कथानक आणि मनाची घट्ट पकड घेणार्या व्यक्तीरेखा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं. त्यांची “धांडॊळा” ही पहिलीच कादंबरी. फ़क्त ई स्वरूपातच उपलब्ध आहे. तीही विनामूल्य. फ़क्त ई साहित्य प्रतिष्ठानच्या वाचकांसाठी. सुसाट गतीमान घटनाक्रम आणि श्वास रोखून धरायला लावणारे कथानक या मुळे ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर संपवल्याशिवाय सुटत नाही. आणि वाचून संपल्यावरदेखिल संवेदनशील मनाला ही कादंबरी बरेच दिवस अस्वस्थ करून सोडते. आजवर ज्या ज्या वाचकांनी ती वाचली त्यांना या कादंबरीने मंत्रमुग्ध करून सोडलं आहे. काही समीक्षकांनी या कादंबरीचं वर्णन “ मराठी साहित्यातील एक विशेष टप्पा” असं केलं आहे. ज्या ज्या वाचकांनी ही कादंबरी वाचली त्यांनी ती एकाच बैठकीत संपवली. एका भन्नाट अनुभावाला सामोरे गेले.
-----------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
-----------------------------



गालातल्या गालात... ~ विनित वैद्य
------------------------
संग्रहातून ...
आता मी वृंदा नाव धारण करून हातावर तुरी देणारी किंवा देणारा इसम कोण असेल याची शोध मोहिम सुरु केली. पहिल्यांदा एक चार दोन दिवसांनी त्या नंबर वर फोन करून रिंग वाजायची पण उचलणे नसायचे. मग कदाचित माझा नंबर पाहून उचलत नसेल म्हणून दुसऱ्या नंबरवरून प्रयत्न चालू ठेवला. अचानक एके दिवशी फोन उचलला. समोरचा आवाज मुलीचाच होता. पण मी ओळख लपवून बोलू लागलो. तेव्हा समोरून म्हणावे अशी प्रतिक्रिया आली नाही. तोडके मोडके हिंदी शब्द कानावर पडले. खरेतर मीच उल्लू बनलो होतो. काही दिवसांनी तो नंबरच बंद लागला. काहीच सुचेना
इथेच पूर्णविराम नको होता. मी प्रत्येक मैत्रिणीकडे आणि तायालोकांवर संशयाने पाहत होतो.
-------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------


नवरा : एक खोज' ~ प्रियंका जोशी
------------------------


'नवरा : एक खोज' हे पुस्तक आगळे-वेगळे असून आजच्या 'उमेदवार' तरुण-तरुणींना नक्कीच मार्गदर्शक ठरावे. लेखिका नुसतीच सुशिक्षित नसून कर्तबगार देखील आहे -हे प्रत्येक प्रसंग कथनावरून ध्यानी आले. घरचे (म्हणजे माहेरचे) वातावरण मोकळे व विचारवंतांचे असल्यामुळे 'शोध' करण्यामधील 'बोध' उपयुक्त ठरला तरी 'पसंती' शंभर टक्के लेखिकेने ठरवलेली असल्याचे ध्यानी आले अणि घडलेले 'शुभमंगल' नक्कीच आनंददायी झाले असल्यामुळेच हे पुस्तक लिहिणे घडले असे मी समजतो. आयुष्यात बरेच वेळा जन्माचा साठी निवडण्यासाठी खडतर वाट चालावी लागते परंतु क्वचित प्रसंगी 'जादूची कांडी' फिरावी त्याप्रमाणे एखादी व्यक्ती क्षणार्धात हृदयात जाऊन बसते -तसेच कांहीसे घडले असावे व ते जर उभयपक्षी झाले तर दुधात साखर. लेखिकेने तर त्याची बासुंदी केलेली आहे -हे विशेष आहे. अभिनंदन!

असे असून देखील लेखनात (अगदी शीर्षकापासून) अनावश्यक इंग्रजी शब्द वापरलेले पाहून खेद झाला. लेखिका शब्दसंपन्न आहे हे जागोजागी दिसूनही 'हे असे कां?' हा प्रश्न किमान प्रकाशकांनी तरी विचारायला हवा होता.
रोजच्या व्यवहारात सामोरी आलेली एखादी व्यक्ती मुखदुर्बळ निघाली की 'खेळ खलास' असे माझ्या बाबतीत सतत घडते -त्यामुळे लेखिकेची काय परिस्थिती घडली असावी ते मी जाणून आहे. हुशारी व व्यवहारज्ञान यांचे 'लग्न' स्वतःच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी घडायला हवे व तसे सहसा दृष्टीस पडत नाही, हे एक सत्य असून पुस्तकातील बहुतेक प्रसंग तेच तर दर्शवतात. बोध घेण्यासाठी देखील 'विचारवंत' आवश्यक असत्तात, हे 'उमेदवार' मंडळींनी लक्षात घ्यावे -हे मी काढलेले तात्पर्य!
बालमोहन, अमेरिका
-------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------



पैशाचा पाऊस : सुषमा जाधव
-----------------------------

एक जळजळीत वास्तव. आधीच नाडल्या गेलेल्या गरीब स्त्रियांच्या असहायतेचा फ़ायदा घेऊन भाबड्या अंधश्रद्धांच्या जाळ्यात त्यांना फ़सवून पैसे आणि इतर बरेच काही मिळवणार्या नराधमांची कथा. मध्यमवर्गीय समाजाच्या अगदी शेजारीच चाललेला हा अघोरी धंदा. मध्यंतरी या विषयावर वर्तमानपत्रांतून बातम्याही आल्या. एका निर्जन ठिकाणी काही बळी सापडले. त्यावरून काही काळ गदारोळही माजला. पण या नराधमांचे हात इतके बळकट आहेत की काही थातूर मातूर शिक्षा होऊन त्यातले काही सुटले. काही पकडले गेलेच नाहीत. आणि त्या सर्व प्रकाराची समूळ चौकशी कधीच झाली नाही.
या कादंबरीच्या लेखिका सुषमा जाधव या आताच्या तरूण फ़ळीतील कार्यकर्त्या आणि कवयित्री. त्यांची ही पहिलीच कादंबरी. त्यांची सशक्त भाषा आणि वास्तवाला आमने सामने भिडताना हातचे काही राखून न ठेवता सामना करणारी त्यांची लेखणी. त्यांच्या कादंबरी मागचे त्यांचे कवीमन. या सर्व गोष्टी कादंबरी वाचताना जाणवतीलच. ही कादंबरी कच्च्या दिलाच्या माणसांना वाचताना झेपेल कि नाही याची शंका आहे. पण वास्तवाच्या विस्तवाशी दोन हात करण्याची धमक असणार्या वाचकांनी ही कादंबरी वाचायलाच हवी. आपल्या शायनिंग समाजाच्या गुळगुळीत कार्पेटखाली कसली भयानक कीड लपली आहे याची जाणीव समाजाला व्हायलाच हवी. त्यासाठी अशा सशक्त सामाजिक लेखकांची गरज आहे. आणि असे लेखक पुढे यायला हवेत, तर त्यासाठी वाचकांच्या प्रतिसादाची गरज आहे.
--------------------------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------








मन तळ्यात मळ्यात : अदिती कापडी
-----------------------------

संग्रहातून .....

दादाने पाणीपुरीचे पैसे दिले आणि आम्ही निघालो.. एव्हाना एक तास उलटला होता. प्रसन्न स्टोअर्सच्या शेजारून टर्न घेतला.. आणि आम्ही नेहमीच्या रस्त्याला लागलो. मी माझ्याच गुंगीत असताना दादा एकदम म्हणाला-
''शारदा.. तो बघ.. तो राकेशच आहे ना''
मी ते दृश्य बघून चाट पडले.. मला शॉक बसला.. तो राकेशच होता..
'' हो दादा..त्- तो.. तो राकेशच.. आहे..''
-----------------------------

Free download #eBook copy @
-----------------------------


सासू ~ प्रियंका जोशी
----------

"पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि तिथे खूप पाट्या असतात"...एवढी आणि एवढीच माहिती असलेल्या दोन मुलींनी एकदा पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश केला. आणि त्याचबरोबर पेईंग गेस्ट म्हणून एका पुणेरी घरामध्येही प्रवेश केला. तेव्हा त्यांना या माहेरच्या घरा


तला सा-सु-रवास काय असतो तेही बघायला मिळालं.
त्यांच्या पुणेरी "पाहुणचारा"ची कथा लवकरच येत आहे...
सा. सू. ---
लेखिका प्रियंका जोशी....

( ही कथा पूर्णतः काल्पनिक असून त्यातील स्थळे, व्यक्ती, घटना,कुत्रा यांचे कोणाही जीवित अथवा मृत व्यक्तींशी (किंवा स्थळ, घटना कुत्रा यांच्याशी) साधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ आणि निव्वळ ( आणि निव्वळच) योगायोग समजावा अशी लेखिकेची विनंती आहे. तसेच यातील विनोद मनाला लावून घेऊन स्वतःला सुधारण्याच्या फ़ंदात कोणी पडू नये —

---------------
Free download #eBook copy @

------------





खोड ~ किरण कुलकर्णी
--------

भयकथा

-----------------------------
Free download #eBook copy @
------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com




Friday, November 1, 2013

कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१३

Kalaavishkaar_E-Diwali Magazine_November_2013






कलाविष्कार - ई दिवाळी अंक 
--------------- 
प्रथमश सुरेश शिरसाट 
संपादक आणि प्रकाशक 
Fb page @ https://www.facebook.com/kalavishkaar.ediwaliank
Fb Profile @ http://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988