#मीमाझा
सहा प्रकाशकानी नाकारलेलं माझं कवितांच बाड
या दिवशी पुस्तक रूपाने प्रकाशित झालं
आजी सोनियाचा दिनू म्हणावा तसाच तो दिवस होता अठरा अेप्रील अेकोणीसशे नव्वद, गुरूवार होता
बाबांच्या शुभहस्ते प्रकाशन झालं होतं
बाबा पुस्तकाला प्रस्तावनाही द्यायला तयार होते
मिच अगाअूपणा केला प्रस्तावना नको म्हणालो
कुणाचा राग कुणावर काढला
तेंव्हा बाबानी कलती मान करत अुंचावलेल्या भुवया अजून आठवतात ,बाबा म्हणजे 'विजय तेंडुलकर '
आठवताना काही
वगळून चालत नाही
आणि सांगताना सगळं
अुगाळून चालत नाही
असं मिच म्हणालो असलो तरी अठरा अेप्रील म्हंटलं की माझा सगळा दिवस अुगाळण्यातच जातो
३० वर्षां पूर्वीचा हा दिवस मी पून्हा अुद्या चोवीस तास जगेन
डोळ्या समोर सगळं लख्ख आहे
आणि जवळ तेंव्हाचं कोणी नाही
असा विरोधाभास आहे
'विरोधाभास 'हा गोखल्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे असं समिक्षक तेंव्हा म्हणायचे
जे त्याना तेंव्हा जाणवलं ते मला अत्ता जाणवतय
तसही सगळं मला अुशीराच समजतं
काही काही गोष्टी तर समजतच नाहीत
म्हणूनच असेल...
माझ्याकडे प्रश्नाचं अुत्तर नसतं
तेंव्हा मी फक्त हसतो
पण त्या मुळे कायम
मी हसतानाच दिसतो
ही माझी व्यथा नाही 'मी माझ्या'ची कथा आहे.
#चंगो

0 comments:
Post a Comment