Wednesday, May 13, 2026

मराठी टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा का ?

मराठीचा टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा?

महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी मातृभाषा मराठीत अनुत्तीर्ण झाले हे वृत्त सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाले आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, की आपली एकंदर शिक्षण आणि समाजव्यवस्था अनुत्तीर्ण झाली, त्याचा शोध कुणीही घेत नाही. मुले जे सतत ऐकतात, पाहतात ,भाषेच्या ज्या पर्यावरणात ती  नांदतात, तेच त्यांच्या लेखणीतून उतरते .आज भवतालातून मातृभाषा मराठी खरोखर तेवढ्या कसदार पद्धतीने बोलली जाते का?
 विविध वाहिन्यातून, कथेतील व्यक्तिरेखांतून, निवेदनातून, जाहिरातीतून बोलली आणि लिहिली जाणारी होणारी मराठी  खरोखर कसदार मराठी असते का?
" केवळ भावना पोचल्या म्हणजे झाले ..,
एवढेच भाषेचे कार्य" हाभाषा विघातक संदेश समाजाला जेव्हा दिला गेला, तेव्हा अधोगतीला सुरुवात झाली. 
जगायचे असेल तर मराठी आले नाही तरी चालेल, परंतु परभाषा आली पाहिजे, हा मातृभाषा मराठीच्या मुळावर उठलेला विचार विद्यार्थ्यांनी मांडलेला नाही, की मराठीच्या शिक्षकांनी!
 मग केवळ शालांत परीक्षेत मराठीत एक लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,याचा दोष केवळ भाषेच्या शिक्षकांना आणि  विद्यार्थ्यांना जातो का? 
 शाळेतून पुरवणी वाचन, ग्रंथालय आणि ग्रंथपालाचे महत्त्व , हद्दपार झाले आहे. बाह्यवाचन हेच खरे आंतरिक वाचन असते; हेच  आज मान्य होत नाही. शब्दांना आपण संपदा म्हणतो. ती शब्दसंपदा मुलांच्या  खजिन्यात असावी ,असे पालकांना आणि शिक्षणव्यवस्थेला वाटते का? मराठीचे टिपण इंग्रजीतून उतरवणारी पिढी  मराठी प्रश्न पत्रिकेतील दीर्घ उत्तरे कशी लिहिणार? 
निबंधासाठी कल्पनाशक्तीची, मनातला विचार विस्ताराने मांडण्याची क्षमता आवश्यक असते .कल्पना करण्याचा आज अवकाशच नाही . आजची पिढी सतत डोळ्यांपुढे विविध माध्यमातून चित्र पाहूनच आपले आयुष्य  भरून टाकत आहे.  अशावेळी निबंधासाठी, केवळ गुगलवरून कॉपीपेस्ट केलेला आयता मजकूर 
घोकंपट्टी करून, विद्यार्थी मांडत आहेत. गुण मिळतात ते पाठांतराला. चिंतन मननाला नाहीत.  मजकूर आठवून उतरवणे हीच शोकांतिका उरली आहे. पत्रलेखनासाठी आंतरिक हुरहुर आणि ओढ लागते ती एसएमएसच्या वातावरणात कुठून मिळणार आहे ?
तेव्हा परीक्षेत ऐनवेळी पत्र लेखन करणार कसे? आयुष्यात कधी पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र पाहिलेलेच नाही अशीच पिढी निर्माण केली ना? सविस्तर लेखनाची,( तीही  स्वतःच्या हाताने) क्षमता क्षीण झाली आहे.
 एक शब्द ,दीड वाक्य, हीच काय ती उत्तरे ! अशाप्रकारे भरपूर गुण; नव्हे,मार्क्स देणारी 'एज्युकेशन सिस्टीम ' आणि , त्यातून बुद्धिमत्ता आजमावणे, यातून आपण काय हरवले आहे, याचा विचार या क्षणी तरी गांभीर्याने कोणी करणार आहे का? 
चर्चा केवळ एक दोन दिवसापुरता होणार,आणि पुन्हा पुढच्या वर्षी दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ,यावर चर्चा होईल. फक्त चर्चा !
कृती कुठे आहे ?
काहीच प्रामाणिक नाही, हेच एक सत्य आहे.
 मराठी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण; एवढ्या पुरताच हा  विषय नाही.
हा संकेत आहे,आपल्या महाराष्ट्रातून नव्या पिढीच्या जिव्हेवरची मराठी दूर जात आहे.  हीच धोक्याची खूण आहे.  केवळ मराठीच्या शिक्षकांना दोष देऊ नका. 
आजही ग्रामीण भागात, तसेच अनेक ठिकाणी प्रयोगशील मराठीचे शिक्षक मी पाहतो आहे. वाचन प्रसारासाठी स्वतः पदरमोड करून मुलांना पुस्तके वाटणारी अध्यापकांची तरुण पिढी माझ्या संपर्कात आहे .सुक्याबरोबर ओले जाळू नका ही विनंती.
पालकांचां मातृभाषा मराठीत उत्तीर्ण होण्याचा आग्रह आणि बाहेरचे वातावरणही तपासून बघा. अर्थात जमले तर...!
नाहीतर उद्या चर्चेसाठी वेगळा विषय येतोच आहे.
            *
                  प्रवीण दवणे 

(हा एक विचार आहे, आपल्या वैचारिक समूहावर पाठवू शकता)

0 comments: