Tuesday, May 5, 2026

कविता

ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे 
उमटले कळीवर 
पाय दवाचे... ओले...

मी ओंजळ माझी 
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....

न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...

मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!

वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा... 
नादला एकदा आषाढाचा 'झाला' 
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला

शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता 
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता... 

तू वेध घेतला 
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?

आकाश तरंगे
उंचावरती दूर 
मातीच्या हृदयी 
झुरणीचे काहूर 
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून
http://malabhavalelyakavita.blogspot.in/2010/07/blog-post_17.html

0 comments: