Tuesday, August 24, 2010

रक्षाबंधन


रक्षाबंधन 

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.


स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.


रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.


बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.


भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.


बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.


देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.


रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.


''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.


समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

SOURCE:RAKSHA BANDHAN

Sunday, August 22, 2010

मैत्री

सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...
-अनामिक 

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्य दिन 


स्वातंत्र्य दिन 

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्टीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातन्त्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने सम्पूर्ण भारताचे शासन काबीज केले.


१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.


१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

Sunday, August 8, 2010

Sunday, August 1, 2010