Monday, January 18, 2016

अखेरी इथुनीच आरंभ होतो



अखेरी इथुनीच आरंभ होतो
पुन्हा त्याच चक्रात गुंतून जातो
नको वाटतो कोंडमारा  जीवाचा
तरी परतुनी जीव गर्भात येतो
अजन्म्या त्या  एकदा भेत्न्यासी
न  जाने कितीदा  मी जन्मास येतो
उरे तोच तो   एक प्रश्नार्थ कोहम
पुन्हा मी स्वतःचा खुला शोध घेतो
अखेरी इथूनीच आरंभ होतो
~ रेश्मा कारखानीस
मी शून्य काव्यसंग्रह 

Thursday, January 14, 2016

जो जे वांछिल तो ते लिहो

जो जे वांछिल तो ते लिहो
ज्ञानेश्वर मुळे
म.टा
ख्यातनाम लेखक-कवी आणि भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे यांची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषेच्या भवितव्याबरोबरच जगभरातील बदलत्या वाचनसंस्कृतीचा त्यांनी केलेला हा ऊहापोह... 
आज पुस्तकांचं स्वरूप आमूलाग्र बदललं आहे. वाचनाचं स्वरूपही बदललं आहे. पूर्वी पुस्तकं वाचनालयातून किंवा मित्रांच्या घरातून आणावी लागत. पुस्तकं चोरूनही लोक वाचायचे. आज किंडल नावाचं माध्यम आहे, ज्याच्यामार्फत तुम्ही पुस्तकं चाळू शकता, साठवू शकता, वाचू शकता आणि विकत घेऊ शकता. पुस्तकांबरोबरच वृत्तपत्रे, मासिके अन्य प्रकारची वाचन सामग्रीही उपलब्ध आहे. जगभर साधारण दोनेक कोटी लोक आज ई-वाचक आहेत आणि किंडल आणि तत्सम उपकरणे महिन्याला वीसेक लाख पुस्तकं विकतात. पुण्यात ई-साहित्य नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं शेकडो मराठी पुस्तकांचं ई-मेलद्वारे मोफत वितरण केलं आहे. मीही त्यांचा वाचक आहे. पूर्वी पुस्तकं कोल्हापुरातून कॅलिफोर्नियात एका क्षणात पाठवणं शक्य नव्हतं. आज मात्र अनेक पुस्तकं एका क्षणार्धात मला इंटरनेट उपलब्ध करून देतं. 
डिजिटल आशयाने मुद्रित अक्षरावर बऱ्याच अंशी विजय मिळवला आहे. मटापासून पुढारीपर्यंत सगळी मराठी वृत्तपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. पुस्तक उद्योगात इलेक्ट्रॉनिक पुस्तकांची वाढ सर्वाधिक आहे. अॅमॅझॉन डॉट कॉम कंपनी पारंपरिक पुस्तकांचे आणि ई पुस्तकांचे वितरण करते. त्यांच्या एकूण पुस्तकांपैकी ३० टक्के पुस्तके आता ई पुस्तकांच्या स्वरूपात वितरित केली जाताहेत. अॅमॅझॉन कंपनीने आतापर्यंत करोडो पुस्तकांचे वितरण केले आहे. 
पण या नवीन क्रांतीने नव्या संधी आणि नवी आव्हाने उभी केली आहेत. अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकानांची संख्या चार हजारवरून दोन हजारावर आली आहे. पारंपरिक दुकाने आता फक्त एकूण पुस्तकांच्या दहा टक्के पुस्तके विकतात. या व्यवस्थेमुळे पूर्वीच्या तुलनेने पुस्तक वितरणातील नोकऱ्या जवळजवळ ६६ टक्के कमी झाल्या आहेत. 
व्यक्तिश: ई-पुस्तकांचा फायदा मला होत असला तरी पुस्तकांच्या दृश्य स्वरूपात होणारा हा बदल मला खूप अस्वस्थ करतो. पुस्तक हातात घेण्यातलं सुख, ते आई-वडिलांना, मुलांना किंवा मित्र-मैत्रिणींना वाचून दाखवण्यातली गंमत, कवितांच्या ओळी वहीत लिहून पाठवण्यातला आनंद दिवसेंदिवस घटत चाललाय. आजकाल ई-मेल, व्हॉटस्अॅप, सायबर, फेसबुक आणि फेस टाइमच्या जमान्यात देखण्या देवालासुद्धा लोक संगणकावर किंवा स्मार्ट फोनवर दंडवत घालतात. 
याचे काही फायदेसुद्धा आहेत. आज इंटरनेटवर विश्वसाहित्यातील शेक्सपिअर, मिल्टनपासून मराठीतील अनेक पुस्तकं वाचायला मोफत उपलब्ध आहेत. पत्रव्यवहार करता येतो, भाषा शिकता येतात, जगभरच्या साहित्यिकांची माहिती एका क्लिकवरती मिळते आणि क्षणभरात संपूर्ण जगाशी संपर्क साधता येतो. 
पण मला भीती वाटते ती, गायब होत चाललेल्या मानवी स्पर्शाची. कोल्हापुरात असताना करवीर नगर वाचन मंदिराबरोबर आमचं एक नातं जुळलं होतं. तिथली कपाटातली पुस्तकं, तिथं ऐकलेली व्याख्यानं, तिथं रंगलेली कविसंमेलनं आणि भाषणस्पर्धा, तिथली बाकडी सगळं आजही स्पष्ट आठवतं. असंच नातं अजब पुस्तकालय, महाराष्ट्र ग्रंथ भांडार या पुस्तकांच्या दुकानांशी होतं. तिथं जाऊन कधी दुरून तर कधी जवळून नवीन पुस्तकांकडे बघणं हा आनंद होता. पुस्तकांच्या मदतीनं अत्यंत शिताफीनं पत्रांची किंवा मोरपिसांची देवाणघेवाणही ग्रंथालयातच व्हायची. पूर्वी चित्रपटात नायक-नायिका हमखास ग्रंथालयातच भेटायचे. कारण ग्रंथ 'कबाब में हड्डी' होत नाहीत. लुडबुड आणि फालतू चौकशा करत नाहीत. पण सर्वंकष प्रेमाचे सेतू बांधतात. पुस्तकांचे आणि ग्रंथालयांचे हे मनोरम उपयोग आता इतिहासजमा होणार याची मला भीती वाटतेय. 
खरंतर ग्रंथालयांविषयीची अनास्था मला विदीर्ण करून टाकते. आमच्या गावात जर सुभाष वाचनालय नसतं तर मी घडलो नसतो. मी मॉस्कोतील लेनिन वाचनालयात जात असे. ते इतके विशाल आहे की, धावती भेट घ्यायची तरी दोन तास लागतील आणि प्रत्येक पुस्तकाच्या कपाटाला पाच मिनिटं द्यायची ठरवली तरी कित्येक वर्षं जातील. जगातल्या पहिल्या तीस वाचनालयात आपल्या देशातील एकही वाचनालय नाही. प्रथम क्रमांकावर १७ कोटी पुस्तकांचे ब्रिटिश ग्रंथालय आहे. आपला देशाभिमान आपण सर्वांसाठी स्वच्छतागृहे व वाचनालये बांधण्यात खर्च केला तर केवढे सुंदर होईल? वाचन संस्कृतीला प्रोत्साहन म्हणजेच मानवी प्रतिभेला खतपाणी आहे हे आपण का विसरतो? 
आपल्या साहित्याचं प्रयोजन काय असावं, हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रयोजन नसलं तरी चालेल कारण तोही लेखनस्वातंत्र्याचा भाग आहे. 'जो जे वांछिल तो ते लिहो' हे एकदा आपण मान्य केलं तर त्यापुढे वाद घालण्यात अर्थ नाही. पण हेही खरं की लेखन स्वातंत्र्य अमर्याद आहे पण ते अनिर्बंध नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि संविधानिक चौकट आहे. जसं साहित्यिकाला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच वाचकाला वाचण्याचं, न वाचण्याचं आणि संविधानिक मार्गांनी टीका करण्याचा किंवा निषेध करण्याचा अधिकार आहे. 
सहिष्णुतेची सध्या चर्चा सुरू आहे. सहिष्णुता हे सुसंस्कृतपणाचं आद्य लक्षण आहे. असहिष्णुतासुद्धा इतिहासपूर्व काळापासून आढळते. त्यातून भांडणे, विनाश, नरसंहार उद्भवलेत. प्राचीन काळापासून भारताने सहिष्णुतेचा स्वीकार आणि असहिष्णुतेचा धिक्कार केला आहे. असहिष्णू तत्त्वे जगात सर्वत्र आढळतात, तशी ती आपल्याकडेही कधी कधी डोके वर काढतात. या तत्त्वांना भारतीय संस्कृतीत स्थान नाही. म्हणूनच जगभरात भारताचा गौरव होतो. 
मी सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतो. या शहराला अनेक लोक जगातील सर्वात गतीशील, कल्पक आणि सर्जनशील शहर मानतात. हे शहर म्हणजे जगातल्या प्रतिभावंतांसाठीचा चुंबक आहे. असं काय आहे या शहरात त्यामुळे शहराला असं स्वरूप मिळालं? कशासाठी दरवर्षी पाच कोटी लोक या शहरात पर्यटनाला येतात? याची मला समजलेली तीन कारणं सांगावीशी वाटतात. 
पहिली गोष्ट म्हणजे या शहरात ८०० विविध भाषा बोलणारे लोक राहतात. इथल्या सरकारी शाळांमध्ये १७६ भाषांची मातृभाषा म्हणून नोंद आहे आणि सर्वाधिक विविधतेनं भरलेल्या इथल्या क्वीन्स भागात १३८ भाषा बोलल्या जातात. तुम्ही जगभरच्या 'भाषा' आपल्या मानता तेव्हाच प्रतिभेचा विस्फोट होतो. सर्जकतेला मूर्तिमंत रूप येतं. 
मराठी माणसाने आपल्या अस्मितेची नवीन व्याख्या तयार करण्याची वेळ आली आहे. मराठीची सीमा महाराष्ट्रापुरती नको. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून महाराष्ट्र धर्म वाढवला. सागरी आरमाराची स्थापना करून नवीन दृष्टी दिली. आपण मात्र घोषणाबाजीत अडकून मराठीच्या अवकाशाची गळचेपी करत आहोत. इतरांना आपल्या संस्कृतीत प्रवेश नाकारण्याऐवजी आमच्या संस्कृतीचा झेंडा अटकेपार फडकावणं अधिक रोमांचक आणि सार्थक नाही का? 

Saturday, January 9, 2016

पाय कुठे चालले


पाय कुठे चालले 
वाट काय बोलते 
एक दिशा बोलवते 
अन मागे ही ओढते ।

माया की छाया ही
जोजवते सावली 
पंखांना बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

पंथ दिला ओढ दिली 
वाट तूच दाखवली
मायेतून गुंतवले 
तूच पुन्हा साद दिली।

जन्माच्या चक्राची
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

नाव तुझे सुर तुझा
कंठातुन दाटला
भक्तिचा सोहळा मी 
डोईवर थाटला।

माऊली।
लेकराच्या डोळी
भोळ्या विठ्ठलाची बाहुली
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली। 
~ गजर चित्रपट
‪#‎वारी‬



Wednesday, January 6, 2016

आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस.......

आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस


खरा तो सात तारखेला साजरा होतो पण एकदा तेंडुलकर आईने सांगितल्याचं आठवतय की बाबांचा खरा ज्न्मदिवस सहाच आहे.. शाळेत सात तारीख लागली
बाबा गेले तेंव्हा मी तरुणभारत या दैनिकासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा लेख लिहिला होता..
प्रिया तेंडुलकरची ’रजनी’ ही दूरदर्शन मालिका अैन प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रिया तेंडुलकरने डी. डी. -१ साठी स्वयंसिद्धा या दूरदर्शन मालिकेची निर्मिती करायला घेतली आणि मॉडेल को-आर्डीनेटर म्हणून तेंडुलकरांच्या प्रशस्त आणि मोकळ्या घरात मी प्रवेश केला.
पण योग असा की माझ्याकडचा अेकही कलाकार प्रिया दिदीच्या कुठल्याच मालिकेत कधीही चमकला नाही तरी मला तेंडुलकरांच्या घरात ’चंद्रशेखर गोखले’ म्हणून आश्रय मिळाला.
विजय तेंडुलकरांची माझी ओळख झाली ते प्रियादिदीचे बाबा म्हणूनच. त्यामुळे लेखक, नाटककार, पत्रकार, पटकथाकार या सगळ्या बाबांच्या ओळखी माझ्या दृष्टीने कायम दुय्यम स्थानावरच राहिल्या. ते बाबा आणि मी शेखर आमचं हे नातं माझ्या दृष्टीने खरं आणि माझ्यापुरतं पुरेसं राहिलं.
मी तेंडुलकरांच्या घरात प्रवेश मिळवला तेंव्हा माझ्या आधी कितीतरी निराधार जीव या घरात आश्रय मिळवून होते. पंख तुटलेली घार, जायबंदी झालेली कोकीळा, घरटं मोडलेल्या चिमण्या, दृष्टी गेलेले कासव असे जीव या घराने सामावून घेतले होते. मी हाती पायी धड होतो पण घरातून बाहेर पडलेला होतो. माअीकडे राहत होतो म्हणून निराधार नव्हतो अेवढच.
माझं तेंडुकलरांच्या घरी स्थान पक्क झालं ते आअीमुळे. सीमा, सुषमा, प्रिया, राजू अितकाच मोकळा संवाद आअीने माझ्याशी ठेवला त्यामुळे त्या घरात माझं रेंगाळणं सुरू झालं.
बाबांची तेव्हा मला जाणवलेली खासियत अशी की बाबा कायम निटनेटके आणि प्रसन्न असायचे.
तमाम तेंडुलकर परिवार गाडीघोड्याशिवाय फिरत नसताना बाबा मात्र सपासप रस्ता काटत स्टेशन गाठायचे आणि अगदी सहज रेल्वेच्या सेकंड क्लासच्या गर्दीत शिरायचे. त्यांचं ते चालण मला आता जरा जास्तच ठळक आठवतंय.
तसं बाबांची एक गोष्ट मला खूप आवडायची म्हणजे घरी परत आल्या आल्या ते आअीला शोधत(शोधावं लागण्या इतकं मोठं घर बाबांच होतं) आअीसमोर जायचे. अगदी तिच्याशी बोलतील असे नाही पण तिला बघायचे, तिचं लक्ष गेलं तर हसायचे आणि आपल्या खोलीकडे वळायचे. तेव्हा त्यांच्याकडे टायसन नावाचा निरागस आल्सेशियन कुत्रा होता. त्याला थोपटल्याशिवाय आणि त्याच्या पाणी प्यायच्या भांड्यात पाणी आहे की नाही हे पाहिल्याशिवाय ते खोलीत जात नसत.
मी थोडफार लिहितो हे त्यांनी माझ्या बोलण्यावरून ओळखलं होतं. "काय काय वाचतोस?" बाबांनी विचारलं. मी वाचत नाही हे शब्दात सांगायच्या अैवजी ’नाही’ अशी मी मान हलवली. त्यावर "जे मनाला रुचेल ते वाचत जा", असे ते म्हणाले.
आणि खरंच बाबांच्या खोलीत असंख्य विषयांवरची असंख्य पुस्तकं निटस पद्धतीने मांडलेली असायची. बाबांची खोली पर्यायाने छोटी पण मोठी सुबक होती. मला बाबांच्या खोलीत बसायला आवडायचं आणि त्याच बरोबर दडपण ही यायचं.
अठरा पगडची माणसं बाबांना भेटायला येत आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अवधान राखून तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाची ओळख बाबा आवर्जून करून द्यायचे. ओम पुरी, गोविंद निहलानी, गिरिश कर्नाड, श्याम बेनेगल अश्या कितीतरी मान्यवर लोकांची ओळख त्याच घरात झाली.
मान्यवरांवरून एक आठवलं, अशीच एक चित्रपट क्षेत्रातील मान्यवर हस्ती अेकदा बाबांकडे आली होती. मेन डोर मधून बाबांच्या खोलीत जायचं तर हॉल पासनं जरा प्रवास करत जावं लागायचं. स्वैपाकघर, मग पॅसेज, मग राजूची खोली, मग उजवीकडे गेल्यावर बाबांची खोली असा प्रवास असायचा. तर हे महाशय बाबांच्या मागून अगदी अदबीने चालले होते तेवढ्यात टायसन मधे आला. टायसन जातीने आल्सेशियन होता. देहाने गब्दूल होता. पण त्याच्या उरात सशाचं काळीज होतं… एकदम दहा माणसं घरात शिरली तर आमचा टायसन कॉटखाली जाऊन बसायचा आणि एखाद दुसरा पाहुणा असेल तर हा बहादुर मागे दौडायचा(बहादूर हा बाबांकडचा इमानी नोकर) हा इसम आला तेव्हा टायसन पॅसेज मधे होता आणि बहादुर कडे धावायच्या नादात तो या पाहुण्यांच्या पायात आला… तुच्छतेने त्या पाहुण्याने आमच्या टायसनला लाथेने दूर लोटलं… माझ्या लक्षात आलं तसच ते बाबांच्याही लक्षात आलं. त्या क्षणी बाबांची बनलेली तीक्ष्ण नजर… मीच काय तो पाहुणाही विसरला नसेल.
पाहुण्यांवरून आणखी एक किस्सा आठवला. एकदा फ्रांस वरून बाबांची मुलाखत घ्यायला काही पत्रकार आले होते. तेव्हा हॉलमधे एक नक्षीदार पार्टीशन होतं… पार्टीशनच्या अलीकडे मी जेवायला बसलो होतो. पलिकडे बाबा त्या पत्रकारांशी बोलत होते.
बहादुर मला जेवायला वाढत होता मुळात मी उशीरा आलो होतो आई दुपारची पडली होती मी बहादुर कडे पोळी मागितली. त्याला दोन हात आणि दहा कामं त्यामुळे पोळी मागूनही दोन चार मिनिटं झाली तरी बहादुर येईना…
आणि पत्रकारांशी बोलणारे बाबा अनपेक्षितपणे अुठले, आत गेले आणि माझ्या ताटात पोळी वाढून पुन्हा बाहेर जाऊन त्या पत्रकारांच्या संभाषणात सहज सहभागी झाले. मी अवाक होऊन पहातच राहिलो. आपण काही केल्याचा आविर्भाव नाही. कसला आव नाही. मला सुद्धा या घटनेतलं वर्म कालांतराने अधिक तीव्रतेने जाणवलं.
तसे अेकदा त्यांच्या नातवाने कुठून तरी रातराणीची फांदी कुंडीत आणून खोवली. नशिबाने ती तगली तर त्याचंही बाबांना किती कौतुक. त्यांचे जवळचे कोणी स्नेही आले की ते त्यांना आवर्जून ती फांदी दाखवत. आदित्य मनोमन खूश होऊन जायचा… पाहुणे फांदी बघत असताना बाबा आदित्यचा मोहरलेला चेहरा बघत रहायचे. त्यांचा तो आनंद होता. त्यांनी आपल्या मुलांना "सध्या काय चाललंय?" असा सरधोपट प्रश्न कधीच विचारला नाही पण त्यांना जाणून घ्यायला आवडायचं.
मी तेंडुलकरांकडे प्रवेश मिळवला त्या आधिच, तनुजाचं लग्न झालं होतं. ती तिच्याघरी छान रमलेली होती. त्यामुळे तिचं जाणं येणं कमी असायचं. सुषमाने काम करण जवळ जवळ थांबवलं होतं. तर प्रिया मराठी, गुजराथी आणि हिंदी चित्रपटात बिझी होती.
तू सुषमाला पुन्हा काम करायला तयार कर. एकदा रात्री ते मला म्हणाले. त्या वाक्यातला स्वर त्यातील आर्तता अेवढी विलक्षण होती. राजू सुद्धा काहीबाही लिहायचा पण बाबांना दाखवायचा नाही. आणि विरोधाभास असा की जगभर चे तरूण कथा, पटकथा घेऊन बाबांचं मत घ्यायला त्यांच्या समोर येऊन बसायचे.
तासंतास त्यांच्याशी चर्चा करायचे...
बाहेरगावाहून आलेली मंडळी जेवल्याशिवाय तेंडुलकरांच्या घरातून जायची नाहीत. आअी स्वयंपाक छान करायचीच पण राजूच्या बायकोच्या हातालाही छान चव होती. जेवायला खायला घालायाला तेंडुलकर परिवार सदैव तत्पर असायचा. अेकदा पायनॅपलचं आअिस्क्रीम कोणीतरी पाठवलं होतं…. तर आअी म्हणाली खातांना बाबांनी दोनदा सांगितलं थोडं शेखरला ठेव त्याला आअिस्क्रीम खूप आवडतं.
स्वतः बाबांना खाण्या पिण्याच्या बाबतीत अेवढा अिंटरेस्ट नसायचा. जरा अगोड असा चहा आणि हलकसं बटर लावलेले ब्रेडचे दोन स्लाअिस असा नाष्टा घेताना मी त्यांना बरेचदा बघितलंय.
शहाळ्याचं पाणी आवडीने प्यायचे,गोड कधी विशेष खाताना बघितलं नाही पण देशाविदेशात फिरलेले असल्याकारणाने अनेक विविध पदार्थांच्या चवी बाबांनी चाखल्या होत्या.्तसच फोर्ट मधले इराणी पदार्थ त्याना आठवायचे
मार्निंग वॉक बाबत सुद्धा ते तसेच आग्रही होते. स्वतःचं रूटीन ते स्वतःच सांभाळायचे. त्यामुळे कुणाला त्यांचा त्रास व्हायचा नाही. पहाटे साडेपाच पावणेसहाला ते सरळ बाहेर पडायचे आणि सपासप चालून घरी यायचे. म्हणजे अगदी राजू अकाली गेला तरी त्यांच्या या नियमात फरक पडला नाही. मला वाटतं दुसऱ्या दिवशीच ते सकाळी मॉर्नींग वॉकला जाताना लोकांना दिसले. याचा अर्थ ते मनाने कोरडे होते असा नाही पण विशिष्ट अवस्थेत स्वतःपासून अलिप्त होण्याची किमया त्यांना साध्य होती.
मधे सांगलीला पुरस्कार घेण्यासाठी त्यांना जायचं होतं. हो नाही हो नाही करताना शेवटी बाबा गेलेच नाही. त्यावरून बराच अुहापोह झाला. पण बाबा तेंव्हाही अलिप्तच होते… शांत… स्तब्धं.
मी थोडेफार लिहितो याची त्यांना कल्पना होती पण प्रियादिदीच्या हाती माझी चार ओळींची बंद वही लागली आणि जणु सारं जग माझ्यासाठी खुलं झालं… बाबा तेंव्हा मला कौतुकाने शेखरशंभू म्हणाल्याचं आठवतंय. १८ अेप्रिल १९९० ला ’मी माझा’चं औपचारिक प्रकाशन झालं त्यावेळी प्रियादिदी माझ्याशी बोलत नव्हती, ती मला शिरिष पैं कडे नेणार होती. प्रकाशनासाठी तिला बोलावणार होतो. पण शेवटी ते जाणं राहिलंच तेंव्हा मी घराबाहेर राहत होतो. माझ्या तिघी बहिणी सोडल्या तर या पुस्तकाबद्दल ना कुणाला खात्री होती ना अुत्साह. अशावेळी प्रकाशनासाठी कुणाला बोलवायचं?… सुषमा म्हणाली मी बाबांना आणते आणि खरंच अगदी सहज बाबा आले त्या आधी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना हवी असं समजून सुषमा ने बाबाना गळ घातली बाबा तयारही झाले पण मला कोणाचीच प्रस्तावना नको होती मी घाई घाईने म्हणालो नको नको प्रस्तावना नको त्यावेळी बाबानी कलती केलेली मान आणि ओंचावलेल्या भुवया मी अजूनही विसरलेलो नाही तरीही बाबा आले आणि ’मी माझा’चं प्रकाशन करून गेले. कुठे आढेवेढे नाहीत की… तेंव्हा ते सहज बोलल्यासारखे आअीला म्हणाले… शेखरला घराबाहेर का ठेवलंय? आअी म्हणाली त्याचा तोच गेला. बाबा म्हणाले… "शेखर आअीसाठी घरी जा!", अेवढ्या व्यक्तिगत बाबतीत लक्ष घालताना मी बाबांना प्रथमच बघत होतो. मी त्यांचं अैकलं आणि घरी गेलो. घरी काही मनापासून स्वागत झालं नाही पण आता मी बाबांच्या शेजारीच रहायला आलो.
मी लग्न जमवलं तेव्हा बरेच दिवसासाठी बाबा यूरोप दौऱ्यावर जायचे होते. त्या गडबडीत बाबांनी मला अुमाला घेअुन यायला सांगितलं. मला बाहेर बसवुन तासभर ते तिच्याशी काय बोलले हे अजून मला कळलेलं नाही. पण ज्या अर्थी चौदावर्ष आमचा सुखाचा संसार सुरु आहे त्याअर्थी काहीतरी कानमंत्रच दिला असणार हे नक्की.
आमच्या लग्नालाही बाबा आवर्जून आले. आम्ही दोघे पाया पडल्यावर आम्हाला आशिर्वादही भरभरून दिला. नाहीतर अेरवी पाया पडलेलं मनापासून त्यांना आवडत नसे.
राजू गेला आणि बाबांचं घर रिकामं झालं. पिंजरे रिकामे झाले, फिशटँक्स रिकाम्या झाल्या, कासवं नाहीशी झाली. प्रिया दिदी आणि आअी दोघींचं आजारपण सुरू झालं. मग आअी जाणार असे वाटत असताना प्रियादिदीच गेली…
त्यानंतर बाबांना भेटायचं धाडस माझ्यात नव्हतं.. पण तरी संध्याकाळी मी आअीला भेटायला म्हणून गेलो. सांजवेळ झाली होती… घर अंधारलं तरी दिवे लावले नव्हते… बहादुर ने दार उघडलं आणि त्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिवे लावले… पहिल्यांदा बाबांच्या घरातला प्रकाश मला मलूल वाटला… फरशीवरचं जाजम गुंडाळून ठेवलं होतं… आअी अडखळते… बदाहुरने खुलासा केला आणि आता टायसन ही नाही तो निर्विकार पणे म्हणाला म्हणजे?… मी विचारलं.
बाबा म्हणायचे… नुसत्या फरशीवर चालून कुत्र्यांना संधिवात होतो म्हणून हर जगह कारपेट डाला था…
टायसन गेला? अुमाने विचारलं. हो म्हणत त्याने उत्तर द्यायचं टाळलं… आअीचा या संभाषणाशी, त्यातल्या तपशीलाशी काही संबंध नव्हता… तिच्या दृष्टीने प्रिया पन्हाळ्याला शुटींग करत होती. राजू ग्यान सहाय च्या शुटींग मधे बिझी होता आणि आमच्या दोघांचं अजून लग्न व्हायचं होतं… तिचं म्हणणं खरं मानून हे संदर्भ लक्षात घेत तिच्याशी बोलणं खूप जड जात होतं. प्रियाचं लांड्रीवाल्याशी भांडण झालं, राजू पहाटे घरी येअून परत दुपारी गेला. त्याच्यासाठी रावसाचं तेलतीखं केलं पण जेवलाच नाही… बापरे! जगातून नाहीशी झालेली माणसं अजून तिच्या परिघात होती… खरंच आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या मानण्यावर असतं. मी घर सोडताना माझे वडील मला म्हणाले होते… तू आमच्यासाठी मेलास. या वाक्यातील दाहकता तेव्हा मला कळली.
बहादुर ने चहा समोर आणून ठेवला म्हणून जाताही येअीना आणि तेवढ्यात बाबा आले थोडे थकल्यासारखे वाटले. पण बाकी काही त्यांच्यात विशेष बदल नव्हता… त्यांच्याकडून कळलं सुषमा पुण्याला असते. सीमा दुसरीकडे राहते आणी बंटी आणखीन तिसरीकडे. बाबा नेहमी प्रमाणे खोलीत गेले नाहीत ते तिथेच बसले. आअीच्या सगळ्या (निरर्थक) प्रश्नांना प्रमाणिक उत्तर देत होते.
तेव्हाच मला कळलं बाबांनी बद्रीधाम मधलं प्रशस्त घर आता विकायला काढलं होतं… मला अेकदा बाबांची ती छोटीशी खोली डोळेभरून पहावीशी वाटली. मी अभावितपणे तिथे जायला लागलो. बहादुर घाअिने म्हणाला अुधर कुछ नही है.
मी बाबांकडे बघीतलं, आम्ही बाहेर पडलो. तेव्हा त्यांच्या पाया पडायला हवं होतं असं आता वाटतंय. कारण नंतर अशी भेट झालीच नाही. मधे माटुंग्याला यशवंतराव नाट्यगृह पाशी भर पावसात ते बाल रंगभूमीच्या बाजुने आंदोलनासाठी अुभे होते तेव्हा मी त्यांना बघीतलं, भेटलो नाही.
त्या आधी आअी गेल्याचं कळल्यावर मी शेरे पंजाब च्या हिलटन टॉवर कडे धावलो होतो. पण त्या घराला कुलूप होतं.
मग प्रसिद्ध व्यक्तीच्या बातम्या कानावर येत राहतात तश्या येत राहील्या. कधी कुठल्या क्लिपींग मधे बाबा दिसत राहीले.
.. आणि आज आत्ता बाबा गेल्याचं कळल्यावर डोळ्यांना त्यांना बघायची तहान लागली. "मी माझा" या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहावर बाबांची प्रस्तावना मी नको म्हटल्यावर बाबांनी खट्याळपणे अुंचावलेल्या भुवया आठवताहेत.
मी घरी राहायला आल्यावर मॉर्निंग वॉक वरून परतताना माझ्याघरी येअुन माझ्या वडिलांना शेखर कसा आहे? विचारणारे बाबा आठवताहेत. बाहेर पडायचं असताना आदित्य बरोबर तन्मयतेने टॉम अॅंड जेरी पाहणारे बाबा, फोटो काढण्यात रमलेले बाबा, वाचनात दंग झालेले बाबा, टायसन शी खेळणारे, आदित्यशी खेळणारे, कुणाशी म्हणजे अगदी कुणाशीही बोलायला सदैव तत्पर असणारे बाबा मला आठवतात आणि आठवत राहणार.
त्यांचं असं शांत निश्चल रूप मला पाहायचंच नव्हतं. आपलं अस्तित्व जर दुसऱ्याच्या मानण्यावर अवलंबून राहणार असेल तर माझ्या दृष्टीने तेंडुलकर बाबा अजून आहेत, मी असे पर्यंत बाबा राहणारच…
विजय तेंडुलकरांविषयी तर आता सारंच जग बोलेल, त्यांचं कर्तुत्वही तसंच आहे. पण आमच्या बाबांविषयी बोलायचं तर त्यानी आपलं झपाटलेपण लिलया पचवलं होतं म्हणूनच आमचे बाबा खरच ग्रेट होते, स्वतःच्या कथेचे हिरो होते........... आधी ते परीपूर्ण माणूस होते आणि मग बाकी सगळे काही होते. .....
~ चंद्रशेखर गोखले