Sunday, October 30, 2016

Friday, October 14, 2016

वपु

नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं नजर व स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता याशिवाय होत नाही...!! 
#वपु

एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही.जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं.इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात.आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते.आवडली नाही तरी.पण नवा विचार स्वीकारणं ही खुप मोठी घटना आहे......वपुर्झा

"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो, की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबुन राहायचे नाही. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दयायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
~ वपु काळे | तप्तपदी

Wednesday, October 12, 2016

‘सर्जकिल स्ट्राईक’ केल्याचा शरद पवार यांचा दावा चुकीचा

यापूर्वीही चार वेळा ‘सर्जकिल स्ट्राईक’ केल्याचा शरद पवार यांचा दावा चुकीचा असून, भारताने अशाप्रकारे प्रथमच पाकिस्तानात जाऊन कारवाई केलेली असल्याने अशावेळी चुकीची विधाने करून आमच्या जवानांचा अपमान करू नये, अशी टीका महाराष्ट्र माजी सनिक संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन (निवृत्त) उदाजीराव निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
भारताने यापूर्वी चार वेळा ‘सर्जकिल स्ट्राईक’ केले असल्याच्या पवारांच्या विधानाचा समाचार घेताना कॅप्टन निकम म्हणाले, की पाकिस्तानविरुद्ध प्रथमच अशाप्रकारे अचूक कारवाई झाली आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात आला आहे. यामुळे त्याला भरीव यश आले आहे. अशा वेळी सैन्याच्या मागे उभे राहण्याऐवजी अशी विधाने करून राजकीय नेते त्यांचा अपमान करत आहेत. काश्मीरमधील उरी हल्ल्यामध्ये आमचे अनेक जवान धारातीर्थी पडले. याचे भारतीय सैन्याला शल्य होते. दरवेळी खोडी काढणाऱ्या या पाकिस्तानला तसेच कडक उत्तर देणे अपेक्षित होते. या पाश्र्वभूमीवर भारतीय सैन्याने प्रथमच पाकिस्तान हद्दीत घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवत अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. भारतीय सैन्याची ही आजवरची सर्वात मोठी कामगिरी होती. अशा वेळी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी ‘असे सर्जकिल स्ट्राईक यापूर्वीही आमच्या काळात आम्ही केले होते’ अशी कुचेष्टेची विधाने करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा विधानांमधून आपण आमच्याच जवानांचे मनोबल खच्ची करत आहोत. हुतात्म्यांचा अपमान करत आहोत हेही या नेत्यांना ठाऊक नसते. ही सर्व विधाने पाहिली तर हे राजकीय नेते भारताच्या बाजूने आहेत, की पाकिस्तानच्या हेच कळेनासे झाले आहे. आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीनंतरही ‘अशी कामगिरी पूर्वी केली होती’ असे सांगत जवानांच्या कामगिरीला अशा पद्धतीने कमी लेखणे सर्वथा चुकीचे आणि निषेधार्ह असल्याची टीका कॅ. निकम यांनी केली
http://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-comment-on-surgical-strike-1316705/

Saturday, October 1, 2016

मीरा

मीरा
मीरा होणं कठीण की राधा..
हे कोणीच नाही ठरवू शकणार...
दोघींची तुलना करण्याचा प्रयत्नही करू नये कोणी..
पण तरीही कधी वाटतं, राधेला थोडंतरी झुकतं माप मिळालं दैवाकडून..
आयुष्याच्या एका टप्प्यावर, काही काळ का होईना,
कृष्णानं राधेची प्रीत स्वीकारली.
त्याच्या मुग्धमधुर लीला राधेच्याच नशिबी....!
पण मीरा.. तिच्या प्रेमाची रीतच न्यारी..!
कधीही न भेटलेल्या त्या सावळ्यासाठी
तिनं आयुष्यभराचं व्रत घेतलं..
प्रेमाचं महाकठीण व्रत.. जे फक्त तिलाच पेललं..
त्या मीरेला समर्पित..
#अनामिक

पितृपूजन आणि कर्मकांड



पितृपूजन आणि कर्मकांड

चांद्र कालगणनेप्रामाणे सध्या चालू असणारा भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितृपक्ष अथवा पितृपंधरवडा या नावाने ओळखला जातो. या पंधरा दिवसांच्या काळात बहुसंख्य हिंदुधर्मीय आपापल्या पितरांच्या तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आदी विधी करतात. मृत व्यक्ती शरीराने आपल्या सोबत नसली, तरी ती अशरीरी अवस्थेत आपल्या सोबत आहे, ही कल्पना फार प्राचीन काळीच मानवी मनात उद्भवली आहे. यातूनच अनेकदा भूतप्रेतादी अमानवी योनी आणि त्यांनी एखाद्या माणसाचे भले-वाईट केल्याच्या गोष्टी देखील प्रसृत होतात. ज्याप्रमाणे देवता प्रसन्न होऊन मनोवांछित फळ देतात, किंवा रागावून माणसाचे अहित करतात, त्याचप्रमाणे पितरे देखील माणसाचे बरे वाईट करू शकतात, असे सांगितले जाते.

एकदा आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट गोस्ठींचा संबंध दैवी आपत्तीशी लावला की, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्नही माणसे करू लागतात. कोणीतरी पितरांची अवकृपा झाल्याचे, अगर पितृदोष असल्याचे सांगून निरनिराळे विधी करण्यास सुचवतात. मग माणूस त्या कर्मकांडात ओढला जातो. ही पितरे म्हणजे आपलेच पूर्वज असतील, तर ती आपले वाईट का करू इच्छितील, असा प्रश्न वास्तविक पडला पाहिजे.

अशी कथा आहे, की वैदिक परंपरेप्रमाणे सर्वप्रथम मृत्यू पावलेली व्यक्ती म्हणजे यम. साहिजकच तो सर्वात आधी पितृलोकी गेला. त्यामुळे तेथील राजेपद त्याला मिळाले. याठिकाणी पुढील मृत व्यक्ती गेल्यानंतर यम त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे स्थान देऊ लागला. त्या लोकी कोणत्याही अन्न-पेय आदी वस्तू स्वातंत्रपाने उपलब्ध नसल्याने ही पितरे त्याकरिता त्यांच्या जिवंत वंशजांवर अवलंबून असतात. ज्या मृताचे वंशज नसतील अगर असूनही पितरांकरिता श्राद्धविधी करत नसतील, त्या पितरांना पितृलोकी उपाशी राहावे लागते. या कल्पनेवरूनच मराठीत ‘पाप्याचे पितर’ हा वाक्यप्रयोग आला आहे. सामान्यपणे हडकुळ्या अगर दुबळ्या व्यक्तीस ‘पाप्याचे पितर’ असे संबोधले जाते. पापी व्यक्ती पापाचरण करणारी, आणि म्हणून धार्मिक आचरण न करणारी मानली जाते. अशी व्यक्ती आपल्या पितारांकरिता श्राद्ध करत नसणारच. मग भरण-पोषण न मिळाल्याने त्या व्यक्तीची पितरे यमलोकी अगदी दुबळी आणि लुकडी होत असणार. याउलट जो श्राद्धविधी करतो, त्याची पितरे मात्र सुदृढ शरीराची असली पाहिजेत.

वंश टिकला तरच आपल्याला अन्नपान मिळत राहील, ही पितरांची काळजी कालिदासाने ‘शाकुंतला’त व्यक्त केली आहे. राजा दुष्यंतास मुल नसल्याने त्याची पितरे दुष्यंताच्या मृत्यूनंतर आपल्याला पिंडदान कोण करणार, या विचाराने रडवेली होत. राजाने अर्पण केलेल्या जलाने आपले अश्रू धुवून मग उरलेले जल ती प्राशन करीत. (धौताश्रु-शेषमुदकं पितर: पिबन्ति).

अशा परिस्थितीत धार्मिकदृष्ट्या बघितले तरी पितरे आपले वाईट करतील असा विचार करणे तितकेसे योग्य नाही. उलट त्यांच्याबद्दल आदरभाव राखला जावा. कुटुंबातील हयात जेष्ठांचा आदार करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपले आई-वडील जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अगर त्यांचा अपमान करणे, त्यांची काळजी न घेणे आणि मृत्युनंतर मात्र पितरांचा त्रास होऊ नये म्हणून निरनिराळी कर्मकांडे करणे व्यर्थ होय. मातृदेवो भव, पितृदेवो भव असा उपदेश संस्कृतीने केला आहे. त्याकडे दुर्लक्ष कारायचे आणि पितृपक्षात कर्मकांड करायचे, हे तर्कसंगत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, जेष्ठांचा आदर करणे सर्वात म्हत्वाचे आहे. अर्थातच ज्यांची कोणाची श्रद्धा असेल, तर त्यांनी श्राद्धकर्मे जरूर करावीत. श्राद्ध आणि महालयासारखे दरवर्षी करावयाचे विधी श्रद्धेने केल्यास त्याद्वारे सर्व पितरांची तृप्ती होत असल्याने इतर कोणत्याही कर्मकांडाच्या मागे लागण्याची गरजही भासणार नाही.

— अंबरीष खरे (सगुण निर्गुण, मटा. २६ सप्टेंबर २०१६)

(लेखक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि भारतविद्या विभागात संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर, अभ्यासक आणि संशोधक आहेत.)