Friday, December 28, 2018

दादा आता आई बाबा माझ्याकडे राहतील

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावेत मी ही त्यांचा मुलगा आहे.माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष सेवा करत आहे.आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या कुटूंबियांना ही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे. व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे.माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने अत्यंत चांगला सांभाळ केला आहे.

पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई- वडिलांना सांभाळन्यासाठी दोनों भाऊ कोर्टात भांडत आहेत। हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळना-या नालायक अवलादीच्या गालफडात लावलेली जबरदस्त चपरा आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवनारा जमाना आला आहे. तेथे हे श्रावणबाळ कसे जन्माला आले. जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले आपली काय ईच्छा आहे.तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.

तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले.तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावनार याचे खुप दु:ख झाले. धन्य ते आई वडिल ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले.या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणा-या व आईची मान कापना-या परशुरामांची अवलादी जन्माला आल्या आहेत. आईवडिलांना वृदाश्रमात ठेवनारे आयआयटी पास नालायक आहेत. सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्च भ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवन्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करना-यां न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.

या देशात शिकून परदेशात नोकरी करनारे महाभाग आहेत. ज्यांनी देशसेवा करायची सोडून परकियांची नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अवस्था निपुत्रिका सारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतील पण आईवडिलांना सांभाळतील. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरिल कथा आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतिय संस्कृती ची सर्वात मोठी अधोगती आहे.


एका माझ्या मित्राच्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी पुण्यात गेलो असता मुलगी स्पष्ट म्हणाली लग्नानंतर मुलाचे आईवडिलांना आमच्या सोबत राहता येणार नाही ही माझी पहीली अट आहे


धन्य आहे पुणेकरांची हिंदु संस्कृतीचे माहेरघर पुणे असलेल्या परिसरात सर्वात जास्त वृध्दाश्रम आहेत. अशी भावंडं हवीत. सलाम त्यांना. तुम्ही पण तुमच्या आई-बाबा वर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा. धन्यवाद..!

http://meemarathi.in


Tuesday, December 25, 2018

Tuesday, December 18, 2018

नज्म

नज्म

मुझसे इक नज़्म का वादा है,
मिलेगी मुझको
डूबती नब्ज़ों में,
जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिए चाँद,
उफ़क़ पर पहुंचे
दिन अभी पानी में हो,
रात किनारे के क़रीब
न अँधेरा, न उजाला हो,
यह न रात, न दिन
ज़िस्म जब ख़त्म हो
और रूह को जब सांस आए
मुझसे इक नज़्म का वादा है मिलेगी मुझको....
#गुलजार #hindi #poem #eaksharman

सौंदर्य साधने आणि स्त्रिया


Destroy The Makeup आणि आपण भारतीय स्त्रिया

By: कविता ननवरे, लेखिका 

समाजाच्या मुख्य प्रवाहाने ठरवून दिलेल्या कोणत्याही मापदंडांमध्ये सामील होण्यासाठी प्रवाहाबाहेरील वर्गाला जेवढी ऊर्जा खर्च करावी लागते तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ऊर्जा त्या मापदंडांविरोधात बंड उभं करण्यासाठी लागते. आणि निर्भिडपणे या बंडाचा झेंडा हाती घेणे स्त्रियांसाठी तर कधीच सोपे नसते. जगव्यापी मीटू चळवळीच्या यशस्वीतेनंतर दक्षिण कोरीयात एक नवी चळवळ बाळसे धरत आहे ती म्हणजे Escape The Corset. मेन स्ट्रीममधील बाह्य सौंदर्यविषक संकल्पनांच्या बळी ठरत असलेल्या कोरीयातील महिला खोट्या सौंदर्यविषयक संकल्पनांना फाट्यावर मारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

जून २०१८ मध्ये लीना बेई नावाच्या कोरीयन ब्यूटी ब्लॉगरने यू ट्यूब या सोशल नेटवर्कींग साईटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला. काही तासातच या व्हिडीओला लाखो हिट्स आणि व्ह्यूज मिळाले. काय वेगळं होतं या व्हिडीओत? 'प्रत्येक स्त्रीने मेकअप केलाच पाहिजे. तिने प्रेझेंटेबल दिसलेच पाहिजे' अशी रिस्ट्रीक्शन असणाऱ्या देशात लीना बेईने चेहऱ्यावर लावलेले मेकअपचे थर पूसून टाकत "मी जशी आहे तशीच बरी आहे." म्हणण्याचं धाडस दाखवलं होतं. काही दशकांपूर्वी परंपरावादी भारत देशातील स्त्रीने मंगळसूत्र घालायला, कुंकू लावयला दिलेला नकार इथल्या समाजासाठी जितका धक्कादायक होता तितकचं कोरीयन लोकांसाठी धक्कादायक होतं लिना बेईचं चेहऱ्याला करण्यात येणाऱ्या रंगरंगोटीला नकार देणं. तिच्या अशा स्टेटमेंटनं नाइलाज म्हणून आपला अमूल्य वेळ आणि पैसा मेकअपवर खर्च करणाऱ्या कोरियातील अनेक स्त्रिया प्रभावीत झाल्या. त्यांनी EscapeThe Corset हा हॅशटॅग वापरून मेकअपविरूद्ध बंड पुकारलं. आपापल्या मेकअपच्या किट्स डिस्ट्रॉय करतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले. सोळाव्या शतकात साऊथ कोरियामध्ये शरीर व्यवस्थित शेपमध्ये बसविण्यासाठी स्त्रियांकरता कोरसेट नावाच्या कंपनीने काही पट्टे बाजारात आणले होते. कोरीयन स्त्रियांचं सौंदर्याच्या चुकीच्या मापदंडांना बळी पडणं तिथूनच सुरू झालं म्हणून या चळवळीला हे नाव दिलं गेलं. महिलांनी डायरेक्ट कॉस्मेटीक वापरायलाच नकार दिल्यानं जगातील आठव्या नंबरची कॉस्मेटीकची मोठी इंडस्ट्री असणाऱ्या साऊथ कोरीयातील व्यापारी वर्गाचं धाबं दणाणलं नसेल तर नवलंच.

सतत सुंदर दिसण्यासाठी कोणतीही किंमत चुकवणाऱ्या स्त्रियांनी या चळवळीला का पाठिंबा दिला असावा? या प्रश्नाच्या मुळाशी जाताना काही मूलभूत गोष्टी समोर येतात ज्यांचा अतिरेक या चळवळीला कारणीभूत ठरला असं खात्रीने म्हणता येऊ शकतं. आपल्या न्याय-हक्कांसाठी जागृत झालेल्या स्त्रीचा अजूनही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच वापर होतोय हे नुकत्याच येवून गेलेल्या metoo चळवळीच्या वादळावरून कळलेच आहे. ही चळवळच Escape The Corset ची प्रेरणा आहे. प्रसारमाध्यमांमधून स्त्रीचा जो काही वापर केला जातोय त्याचा अर्थही 'Woman is only An OBJECT' असाच होतो. पुरूषांची मक्तेदारी असलेली प्रसारमाध्यमं स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या ठरवून देतात आणि त्या व्याख्येत स्वतःला फिट बसवण्यासाठी स्त्री स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शक्ती खर्च करते. स्त्रीचं खरं सौंदर्य हे 'सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानेच सिद्ध होतं' असा बुद्धीभेद प्रसाधन उत्पादकांनी सुरू केला. आणि स्त्री त्याला बळी पडली. या कंपन्यांनी आधी समाजातील वरच्या वर्गातील महिलांना टार्गेट केलं. तुम्हांला सुंदर दिसायचं असेल तर सौंदर्य प्रसाधनं वापरायलाच हवीत असा अपप्रचार करत त्यांना आपला कायमचा ग्राहक बनवलं. वरच्या वर्गातील स्त्रीयांप्रमाणे सुंदर दिसण्याचा हट्ट खालच्या वर्गातील स्त्रिया धरू लागल्या व त्या प्रसाधनांच्या वापरांकडे वळल्या. त्यावर वाट्टेल तितका पैसा उधळू लागल्या. आपण जशा आहोत त्यापेक्षा पुरूषांना आपण कशा दिसायला हव्या आहोत याचा विचार स्त्रिया अधिक करतात हे म्हणणं धाडसाचं असलं तरी खरं आहे.

'सुंदर दिसणाऱ्या, सुंदर नसल्या तरी मेकअपचे थरावर थर लावून सुंदर दिसू पाहणाऱ्या, सतत अप टू डेट राहणाऱ्या स्त्रीलाच समाजात मान प्रतिष्ठा आहे. तुम्ही तशा नसाल तर तुमच्यातल्या टॅलेंटला कुणी विचारत नाही. 'हे आजचं जगभरातलं वास्तव चित्र आहे. हे चित्र निर्माण व्हायला जेवढी पुरूषप्रधान संस्कृती जबाबदार आहे तेवढंच जबाबदार आहे स्त्रीवर्गाचं आंधळेपणानं भांडवलशाहीने तयार केलेले कोणतेही चुकीचे ट्रेंड फॉलो करणं. सौंदर्याचा वापर करून हवं ते काबीज करता येतं, जिंकता येतं हे स्त्रियांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे.

स्वतःतला सिद्ध करण्यासाठी आपलं सौंदर्य विकणाऱ्या स्त्रिया आहेत. ते विकत घेणारी बाजारपेठही आहे कारण कोणतीही वस्तू विकायची असेल तर बाजारपेठ चलनी नाणं म्हणून स्त्रीचा वापर करते मग ती वस्तू पुरूषाने वापरायचीही असू देत अथवा स्त्रीने. पण हा ट्रेंडकाही स्त्रियांनी सेट केला नाही तर प्रसारमाध्यमांचे दोर हाती असणाऱ्या पुरूषवर्गानं केला.

त्वचेला व एकूणच शरीराला हानीकारक असणाऱ्या प्रसाधनांचा मारा करून आपल्याला केवळ एक वस्तू म्हणून मार्केटमध्ये उभं केलं जातय. ही भांडवलशाहीची गल्लेभरू चाल स्त्रियांच्या लक्षात येत नाही का? तर येते. काही स्त्रियांना या सौंदर्याच्या बाजारात आपली शोभेचे बाहुली होऊच द्यायची असते, आत्मसन्मान गहाण टाकून आर्थिक कमाई करायची असते तर काहींना सेट असलेल्या ट्रेंडचा मनस्वी तिटकाराही असतो. पण मुख्य प्रवाहात राहायचं असेल तर त्या प्रवाहाचा ट्रेंड फॉलो करणं त्यांना भाग असतं. काही ज्या बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया असतात त्या हे कायदे-कानून, नियम धुडकावून लावतात. इतर स्त्रियांनाही हे करायला भाग पाडतात. मुख्य प्रवाहाचे सगळे नियम धाब्यावर बसवून आपला आत्मसन्मान जपू पाहणारी ती कधी अलिसा मिलानो (मीटू चळवळीची उद्गाती) असते तर कधी लीना बेई असते. पुरूषांना सेवा देणारी आपण केवळ एक उपभोग्य वस्तू होतोय हे त्यांच्या ध्यानात आलेलं असतं. आपल्या शरीराचा उपभोग घेतला जातोय , घातक उत्पादनांचे आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतात याबद्दल त्या अवेअर झालेल्या असतात. शिवाय आपण जशा आहोत तसं स्वीकारण्यासाठी त्यांचं शरीर आणि मनही आनंदानं तयार झालेलं असतं.

आपल्या भारतीय स्त्रियांनीही स्वतःच्या न्यायहक्कांसाठी मोठी चळवळी उभी केली. कधी ती सनातन संस्कृतीविरूद्ध होती, कधी तथाकथित पुरूषी वर्चस्वाविरूद्ध , कधी स्त्री-पुरूष असमानतेविरूद्ध तर कधी आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाविरूद्ध होती. आज सर्व क्षेत्रांत स्त्रीचा जो मुक्तसंचार आहे तो त्यांनी केलेल्या या चळवळींमुळेच आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मीटू चळवळतही भारतीय स्त्रियांनी हिरीरीने भाग घेतला. आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात इथल्या बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं. उशीरा का होईना हे धाडस दाखवणारी भारतीय स्त्री कौतुकाचा विषय ठरली. सध्यातरी दक्षिण कोरीयातलं 'Escape The Corset' चं वारं आपल्याकडे येणार नाही हे नक्की. पण कधीच येणार नाही का? कॉस्मेटीक साधनांची आयात करणाऱ्या देशांत भारत देशही काही मागे नाही. मागच्या काही वर्षात भारतातील स्त्रियांकडून सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रचंड वाढला आहे हे विविध सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. स्त्री नोकरी करणारी असो अथवा गृहिणी असो किंवा शाळकरी मुलगी असो त्यांचे ड्रेसिंग टेबल कॉस्मेटीकच्या साहित्यांनी खचाखच भरलेले असतात. त्यातल्या किती वस्तू खरंच गरजेच्या असतात?

साऊथ कोरीयात जे सौंदर्याचे मापदंड आहेत तितके काटेकोर मापदंड भलेही सध्या भारतात नसतील पण भारतीय स्त्रीचं वरचेवर होणारं वस्तूकरण बघता येणाऱ्या दिवसात भारताचं साऊथ कोरीया होणार नाही कशावरून? बाह्यसौंदर्यातला तकलादूपणा, पुरूषी वर्चस्ववाद्यांकडून ऐनकेनप्रकारे घेतला जाणारा उपभोग, आपलं वरचेवर होणारं वस्तुकरण तासाभराच्या एखाद्या इव्हेंटसाठी हजारो-लाखो रूपये मेकअपवर खर्च करणाऱ्या स्त्रियांच्या जोवर नीटपणे लक्षात येत नाही तोवर त्यांचे टेबल्स, त्यांच्या पर्स आरोग्याला हानी पोहचवणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांनी ओसंडून वाहणार आहेत.आणि ' Woman is only An OBJECT' यावर वारंवार शिक्कामोर्तब होणार आहे.

- कविता ननवरे.
https://abpmajha.abplive.in/blog/destroy-the-makeup-and-indian-womens-kavita-nanavares-blog/amp

विनम्र

विनम्र असणं तुमच्या आरोग्यासाठीही चांगलं, पण कसं?

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे.

By ऑनलाइन लोकमत 

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये थॅंक्स गिवींग डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे संवेदशीलतेचं महत्त्व जाणून घेणे, दुसऱ्यांचे आभार मानने, मदत करे, विनम्र होणे आणि संवेदलशीलता शिकवतात. पण विनम्र असण्याची अनेक फायदे होताना बघायला मिळतात. विनम्र असणे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ विनम्र असण्याचे फायदे.

१) तणावापासून बचाव
विनम्र किंवा संवेदनशील असण्याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वत:ला शांत ठेवू शकता आणि या कारणाने तुमचा ताणही वाढत नाही. क्लिनिकल सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात ही बाब स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या लोकांनी वागणूक विनम्र असते, त्यांचे खूपसारे मित्र असतात. सोबतच या लोकांना एकटेपणा आणि तणाव कमी जाणवतो. 
२) मूड राहतो चांगला
लोक म्हणतात की, कर्म करा फळाची चिंता करु नका. पण हेच कर्म तुमच्या कामी येतं. जेव्हा तुम्ही लोकांसोबत चांगलं वागता, त्या बदलत्यात समोरची लोकंही तुमच्याशी चांगलं वागतात. यातून तुम्हाला तुमचं महत्त्व आणि प्रेमाची जाणीव होते. जेव्हा आपण दुसऱ्यांप्रति दया दाखवतो तेव्हा आपला मेंदु एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्याचा संकेत देतो. या हार्मोन्समुळे आनंदी आणि चांगलं जाणवतं. सोबतच सेरोटेनिन केमिकलचीही निर्मिती होते, जे तुम्हाला संतुष्ट झाल्याची जाणीव करुन देतं.  
३) ब्लड प्रेशरवर नियंत्रण
विनम्र असण्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावरही दिसतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकोफिजिओलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक इतरांना सामाजिक रुपाने सपोर्ट करतात, त्यांचं ब्लड प्रेशर इतर लोकांच्या तुलनेत कमी असतं. म्हणजे विनम्र असल्याने तुमचा तणाव वाढत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. 
४) जास्त आयुष्य
विनम्र असण्याचा मोठा फायदा असाही आहे की, तुम्ही जास्त आयुष्य जगता. काही शोधांमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोक दुसऱ्यांप्रति संवेदनशील असतात ते जास्त आयुष्य जगतात. कारण विनम्र लोकांना आनंदी कसं रहावं याचीही कल्पना अधिक असते, ते फार जास्त तणाव घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्याचं आयुष्य वाढतं. 
५) समाजात प्रतिष्ठा
विनम्र आणि संवेदनशील लोकांना समाजात नेहमीच चांगलं म्हटलं जातं. त्यांना लोकांकडून फार महत्त्व मिळतं. कोणत्याही मोठा निर्णय घेताना त्यांना सल्ला विचारला जातो. तसेच त्यांच्याकडे मदतीसाठी सर्वातआधी धाव घेतली जाते. त्यामुळे त्यांची समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा तयार होते. 


http://m.lokmat.com/relationship/manners-being-polite-helpful-and-healthy/

Sunday, December 16, 2018

लावायचा आहे छोटासा दिवा.

लावायचा आहे छोटासा दिवा...


नीरजा

माझ्याच प्रतिबिंबाशेजारी बसून मी साधू पाहते आहे आज संवाद माझ्याशी. शोध घेते आहे मला हव्याशा वाटलेल्या पण न सापडलेल्या गोष्टींचा. अपेक्षित नसलेल्या, पण अचानक समोर उभ्या ठाकलेल्या अन् सारं आयुष्य व्यापून राहिलेल्या घटनांनी, गच्च भरलेल्या जगात डोकावून पाहते आहे.
कुठल्या तरी थांब्यावरून सुरू करतो आपण आपलं आयुष्य, तेव्हा कुठे नेऊन सोडायचं या पायात घुटमळणाऱ्या पोराला, हेही माहीत नसतं आपल्याला. खरं तर ठरवलेल्या असतात अनेक गोष्टी मनातल्या मनात, पण हे पोर तिथे जाईलच याची खात्री नाही देता येत. आपण ढकलू पाहतो त्याला आपल्याला हव्या त्या रस्त्यावर; पण ते फिरत राहतं, कधी गोल गोल स्वत:भोवती तर कधी डोळा चुकवून भलत्याच वाटेला घेऊन जाऊ लागतं.
जगण्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागला नाही मला. पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगताना समोर उभ्या ठाकलेल्या संकटांना तोंड देणाऱ्या आईवडिलांना पाहातच लहानाची मोठी झाले मी. सारं कुटुंब सांभाळताना आणि मुंबई व मालेगाव-मनमाड असे दोन संसार करताना होणारी आर्थिक कोंडी आणि ती फोडताना आईबाबांची होणारी दमछाक समजावून घेण्याइतका समजूतदारपणा होता आम्हा सगळ्या बहिणींमध्ये. त्यामुळेच कदाचित अतिशय मर्यादित स्वप्नं पाहिली आम्ही.
मला लेखक वगैरे तर नव्हतंच व्हायचं. डॉक्टर व्हावं असं वाटायचं लहानपणी. तेही उगाचच, सर्वाना वाटतं म्हणून. पण दहावीपर्यंत लक्षात आलं की हे आपलं काम नाही. घरात मराठी पुस्तकांचा खजिना असल्यानं, मराठी साहित्याची गोडी लागली आणि शाळेतही इंग्रजीचा पाया भक्कम करून घेणाऱ्या वैद्य मॅडम (आताच्या बक्षी मॅडम) असल्यानं, पुढे इंग्रजीचीही गोडी लागली. त्या काळात इतर पुस्तकांबरोबरच रहस्यकथाही बऱ्याच वाचल्या. त्यामुळे अधूनमधून इन्स्पेक्टर वगैरे व्हावंसंही वाटायला लागलं. विशेषत: रस्त्यात किंवा गर्दीत कोणा पुरुषानं शरीराला स्पर्श केला तर त्याच्या त्या हाताच्या चिंधडय़ा कराव्याशा वाटायच्या, हातात रिव्हॉल्व्हर वगैरे घेऊन. तेव्हा तर तोच एक पर्याय वाटायचा. पण मी यातलं काहीच केलं नाही. हे जे काही वाटत होतं ते होण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते नाही केले. दिवसभर ‘विविधभारती’ ऐकायचं आणि हाताला जे लागेल ते वाचत राहायचं. त्यामुळे केवळ एक अधाशी श्रोता आणि अधाशी वाचक याउप्पर मला स्वत:ला दुसरी ओळख नव्हती. आणि ती मिळेल असं वाटतही नव्हतं. दहावीला मराठी आणि इंग्रजीमध्ये सारखेच गुण मिळाले आणि ‘घरात सगळ्यांनीच मराठी घेतलं आहे, तर तू इंग्रजी घेऊन पदवी घे’, असा आईनं हट्ट केल्यानं, इंग्रजी घेतलं आणि एम.ए. झाले. पुढे बारावीनंतर कधी तरी लिहायला लागले, तेही वर्डस्वर्थने म्हटल्याप्रमाणे ‘ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स’ वगैरे झाल्याने.
मन भरून वाहायला लागलं की अस्वस्थ व्हायला लागतो आपण. दुथडी भरून वाहणारं मन पुराच्या शक्यता घेऊन येतं. असे पूर रोजच यायला लागले आणि मग शब्दांशिवाय पर्याय उरला नाही. वाचणं जेवढं प्रिय होतं तेवढंच लिहिणंही होत गेलं हळूहळू. कविता, कथा, ललित आणि चक्क नाटकही. मी लिहिलेली ‘अदृष्टाच्या वाटेवर’ ही एकांकिका ‘कल्पना एक आविष्कार अनेक’च्या अंतिम फेरीत आली होती. कुसुमाग्रज यांच्या ‘पायरीचा पाषाण’ या रूपक कथेवर आधारित लिहायचं होतं. जे काही लिहिलं ते बरं झालं असावं. त्यामुळे हुरूप येऊन दोन नाटकंही लिहिली आणि चक्क विजय तेंडुलकर यांनाच वाचायला दिली. त्यांनी वाचली. ‘चांगली झाली आहेत पण नाटकाचं तंत्रही समजून घे’, असं म्हणाले तेव्हा त्यांना काय सुचवायचं होतं हे कळलं आणि लक्षात आलं प्रत्येक गोष्ट जमतेच असं नाही.
मी लिहायला सुरुवात केली त्या दिवसापासून आजपर्यंतच्या प्रवासावर नजर टाकली तर खूप मोठा पट डोळ्यांसमोर येतो. या प्रवासात काय काय मिळवलं आणि काय काय निसटून गेलं हातून ते असं नाही सांगता यायचं. मनात उसळलेला कल्लोळ व्यक्त करण्यासाठी शब्द हाती लागले आणि मग आधारच होऊन गेले कायमचे. वाचन करताना मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा मार्ग माझा मीच शोधून काढला. कधी माझ्या मनातलं बोलू लागली माझी पात्र, तर कधी व्यक्त करू लागली माझी घुसमट. आणि हो, लिहिता लिहिता हेही जाणवत गेलं की आपलं आपलं म्हणून जे काही जगणं असतं त्यापलीकडंही एक मोठं जग असतं. आपल्याला भेटलेली माणसं ही केवळ आपल्या रोजच्या जगातली असतात असं नाही, तर ती आपण वाचलेल्या कथा-कादंबऱ्या, आपण पाहिलेली नाटकं, चित्रपट यांमधली देखील असतात. त्या काळात मला गौरी देशपांडे, सानिया यांच्या नायिकांनी भुरळ पाडली होती. अ‍ॅना कॅरेनिना, मादाम बोव्हारी यांनी अस्वस्थ केलं होतं. ‘उंबरठा’मधल्या नायिकेनं बळ दिलं होतं, ‘कमला’मधल्या नायिकेसारखे प्रश्न पडायला लागले होते. खरं तर त्याग आणि समर्पणाच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांतील नायिका किंवा जोत्स्ना देवधरांच्या ‘कल्याणी’सारखी आदर्श स्त्री लहानपणी माझ्याही डोक्यात फिट्ट बसली होती. पण पुढे या अशा, सर्वस्व उधळून देणाऱ्या, आपल्या जगण्याचा, आपल्या स्वत्वाचा विचार करणाऱ्या नायिका आयुष्यात आल्या आणि त्यांची अस्वस्थता माझ्या आत कधी शिरली मलाही कळलं नाही. सानेगुरुजींचा शाम आणि त्याची आई आदर्शच होते माझ्यासाठी. पण अल्बर्ट कामूचा ‘मेरसॉ’ भेटला आणि मूर्तीतून दगड होण्याची प्रक्रिया सुरू झाली. निर्थकाचे पक्षी आकाशात उडू लागले, परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी प्रश्न पडू लागले. परंपरांच्या नावाखाली काय काय लादलं आहे आपल्यावर याची जाणीव व्हायला लागली आणि वेगळी ‘नीरजा’ घडायला लागली.
हा एका दिवसात झालेला बदल नव्हता. खूप काळ जावा लागला त्यासाठी. खरं तर मी माझ्याच कोशात रमणारी मुलगी होते. थोडी संकोचीही. जमेल तसं व्यक्त व्हायचं आणि बाबांना दाखवायचं. मला खास वाटणारं सगळंच बाबांना नव्हतं वाटत. पण त्यांनी तासलेल्या माझ्या शब्दांनी मला श्रेयसाकडे नेण्याचा मार्ग दाखवला. ते नसते तर कदाचित लिहिलेल्या प्रत्येक शब्दाच्या प्रेमात पडले असते मी. पुरस्कार, शाबासकीच्या थापेनं हुरळून गेले असते. मंचावरील माझ्या छबीवर खूश झाले असते. पण बाबांमुळे कायम जमिनीवर राहिले मी. आपण लिहिलेला प्रत्येक शब्द हा शेवटचा असतो असं म्हणणारे लोक आजूबाजूला असण्याच्या या काळात वाटतं, आपलं बरं आहे. ज्याची नजर आपण लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर असते असा ‘म. सु. पाटील’ यांच्यासारखा बाप आपल्याकडे आहे. त्यामुळे शब्द तासून घेण्याची धडपड तरी करत राहते.
कवी हा आपल्या आणि इतरांच्याही जगण्याविषयी लिहीत असतो. ज्या समाजात तो राहात असतो त्या समाजाच्या चौकटींनी बद्ध असला तरी त्या मोडण्याची तीव्र आस त्याच्यात असते. अन्याय, शोषण यांच्या विरोधात कोणताही संवेदनशील माणूस बोलत असतोच आणि कवी तर याबाबतीत जास्त संवेदनशील असतो. जगण्याच्या साऱ्या अंगांना तो भिडत असतो, मग ते प्रेम असेल नाहीतर वेगवेगळ्या आघाडय़ांवर करावी लागणारी लढाई असेल. पण तो जे लिहील त्याला काव्यमूल्य हवं. कवी संमेलनात जायला काहीच हरकत नाही पण लोकानुनय करू नये, जशा सामाजिक चौकटी मोडायला हव्यात तशाच जुन्या लेखक-कवींनी घालून दिलेल्या चौकटी मोडून वाचकांना आणि श्रोत्यांना नवं काही तरी द्यायला हवं, असं बाबांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळेच कदाचित मागणी आहे म्हणून खरडली कविता आणि दिली मासिकांना असं झालं नाही.
माझी कविता आणि कथा वाचकांना आवडू लागली तसा माझा एकटीचा कोनाडा सोडून मी बाहेरच्या जगात वावरायला लागले. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. कविता कथा यांविषयी बोलू लागले. हळूहळू हेही प्रिय वाटायला लागलं. पण हे असं वाटणं हा थांबा होता श्रेयसाकडे नेणाऱ्या वाटेवरचा.
कार्यक्रमांच्या निमित्तानं माझा बाहेरच्या जगातला वावर सुरू झाला आणि त्यातूनच ‘ग्रंथाली’, ‘सानेगुरुजी स्मारक ट्रस्ट’ यांसारख्या संस्थांना मी जोडले गेले. कवयित्री उषा मेहता मला घेऊन गेल्या दोन्ही ठिकाणी. आणि मी तिथली झाले. ‘ग्रंथाली’चं विश्वस्तपद घ्यावं असं दिनकर गांगलकाकांनी सुचवलं तेव्हा सुरुवातीला ‘नाही बुवा’ असंच म्हणाले. बाबांचा तर ठाम नकार होता या सगळ्या गोष्टींना. ‘तुझी कविता हरवून जाईल’, असं म्हणायचे ते. पण नंतर मी स्वीकारलं ते. त्याला कारणंही तशीच होती. सत्तर ऐंशीच्या दशकात साहित्य, संस्कृती आणि समाज या सगळ्यांतच एक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या या माणसांना जवळून पाहिल्यावर मी भारावून गेले होते. बाबा मनमाडला असताना अनेक लेखक कवींना ऐकायला मिळालं, त्यांचा सहवास लाभला. पण त्या काळात मुंबईत ज्या विविध चळवळी चालू होत्या त्याचा भाग मात्र होता आलं नव्हतं. आता माझ्याभोवती वावरणाऱ्या मंडळींत सेवा दलातील माणसं होती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि पुढे आणीबाणीत सक्रिय सहभाग घेतलेली माणसं होती.  ग्रंथाली वाचक चळवळीचा भाग झालेली माणसं होती. जवळपास चाळिशीत पोचल्यावर ही विविध चळवळींत भाग घेतलेली माणसं भेटली. ती भेटेपर्यंत मीही माझ्या कवितेतून माझं असं एक विधान करत होते हे माझ्या डोक्यातही नव्हतं. कारण कवीनं ठरवून एखाद्या विचारसरणीचं मुखपत्र व्हावं आणि कवितेला अशा एका चौकटीत बांधून घ्यावं असं मला कधी वाटत नव्हतं. माणसाला, त्याच्या जगण्यासकट कवितेनं सामावून घ्यायला हवं. कोणत्याही कवीच्या कवितेतून ज्याप्रमाणे त्याचे विभ्रम, त्याची अस्वस्थता, त्याचे दुभंगलेपण, त्याची घुसमट, त्याचे आनंद आणि उद्वेग व्यक्त होत असतात त्याचप्रमाणे आजूबाजूचं सामाजिक, राजकीय वास्तवही प्रवाहित होत असतं. ते तसं व्हायला हवंच पण ठरवून नाही तर अगदी सहज तुमच्या जगण्याचा एक भाग होऊन ते वाहायला हवं. कविता त्याचं स्वत:चं आणि समष्टीचं जगणं विस्कटून दाखवते आणि आपसूकच आपलं असं एक विधान करत जाते. मीही ऐन पंचविशीत ते केलं होतंच की,
दानात पडलेले आयुष्य
शेवटच्या क्षणापर्यंत
निर्थक जगायचे
हा आपला अस्तित्ववादी बाणा.
परमेश्वर लापता,
संस्कृती बेजार,
आपले हात आपणच छाटलेले,
गंज चढलेले शब्द.
अशा वेळी
कोणत्या ताऱ्याचा आधार घ्यायचा
ऐन वादळात
या भरकटलेल्या चेहऱ्यांनी?
मला माझ्या स्वत:च्या अशा भूमिका होत्या. मार्क्‍सवादातील वर्गाधिष्ठित समानता, स्त्रीवादातील सर्व पातळीवरील स्त्रीपुरुष समानता, महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, आंबेडकरांचा जातीयवादाविरोधातील लढा, त्यांनी केलेलं मनुस्मृतीचं दहन आणि बुद्धाच्या करुणेचा केलेला स्वीकार हे माझ्या जगण्याचे भागच होते. ते लहानपणापासून घडत गेले होते. सानेगुरुजींचा जगाला प्रेम अर्पिण्याचा पाठ तर सकाळी प्रार्थनेसोबतच घेत होते. पण मी स्वत:ला कोणत्याही वादाच्या चौकटीत बांधून घेतलेलं नव्हतं.
अनेकदा या चौकटीत जीव घुसमटत जातो आपला आणि आपण केवळ प्रवक्त्यासारखे त्याविषयी तेच ते बोलत राहतो. एकूणच जगण्यात आणि वागण्यात एकारलेपण येत जातं. काळाच्या ओघात प्रश्न बदलले नसले तरी त्यांचं स्वरूप बदलत जातं. अशा वेळी या विचारसरणींचं पुनर्लेखन करण्याची, पुनर्बाधणी करण्याची गरज भासू लागते हे आपण विसरून जातो.
माझ्या ज्या काही राजकीय वा सामाजिक भूमिका तयार झाल्या होत्या त्या भूमिकांशी सुसंगत असा विचार करणारी माणसं मला भेटली आणि मी हळूहळू त्यांच्यातली एक होऊन गेले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकानं आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संवादात मी इंदिरा गोस्वामी यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी माणगाव येथील छत्तीस एकरांत उभ्या राहिलेल्या छोटय़ाशा कौलारू घरानं आणि त्याच्या बाजूला असलेल्या पुरातन वडाच्या वृक्षानं मला त्याच्या सावलीत घेतलं आणि मला एक नवा परिवार मिळाला. ‘अपना बाजार’ चळवळीचे संस्थापक सदस्य असलेले गजानन खातू, सामाजिक कार्यकर्त्यां आणि विचारवंत पुष्पा भावे, गांधीमय झालेले आणि अनुवाद सुविधा केंद्राची कल्पना मांडणारे लेखक-प्रकाशक रामदास भटकळ अशा लोकांचा सहवास लाभला. खातूभाई आणि पुष्पाबाई यांना ऐकण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. सतत नवा विचार करणारे आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजावून घेताना समाजवादाच्याही जुन्या चौकटी मोडू पाहणारे आणि नव्यानं मांडणी करणारे खातूभाई मला माझे जवळचे मित्र वाटायला लागले.
आज जे काही शोषितांच्या, मग ते दलित असोत, स्त्रिया असोत की आर्थिकदृष्टय़ा पिडला गेलेला कामगार किंवा मजूर, अदिवासीवर्ग असो, यांच्या बाजूनं उभे राहणारे कायदे तयार करण्यासाठी ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यामागे आज ज्यांची पुरोगामी किंवा डावे, अथवा समाजवादी म्हणून खिल्ली उडवली जाते त्यांचंच योगदान अधिक आहे हे लक्षात आलं. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी चळवळी उभ्या केल्याचं फारसं ऐकिवात नाही. त्यांनी समाजासाठी कामं केली पण ती मदतीच्या स्वरूपात. ज्यांना मदत केली त्या लोकांना आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ दिल्याचे फारसे ऐकिवात नाही. कारण कायम स्टेटस्को राखण्याकडे त्यांचा कल होता. समाजात आमूलाग्र बदल आणण्यासाठी काही करावं हा त्यांचा विचार कधीच नव्हता. ज्या संस्कृतीविषयी आपण अभिमान बाळगतो ती प्रवाही असते, नवनव्या धारा ती आत सामावून घेत असते हे अनेकांच्या गावीही नव्हतं. परंपरांना चिटकून बसणाऱ्या आणि हीच आपली संस्कृती आहे म्हणून डांगोरा फिटण्यात समाधान मानणाऱ्या या विचारसरणीला बदल कधीच अपेक्षित नव्हते याची जाणीव व्हायला लागली. आणि मग विज्ञाननिष्ठ, बुद्धीप्रामाण्यवादी, शोषणविरहित अशा समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या विविध चळवळींत मी प्रत्यक्षपणे ओढले गेले.
मला वाटतं माझा हा सगळा प्रवास प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाण्याचाच होता.
आज मागे वळून पाहताना एवढंच वाटतं, माझी कथा, कविता, माझं लेखन मला माझी ओळख देतं आहे, पण त्याचबरोबर मला ठामपणे व्यक्त होण्याचं बळही देतं आहे. एखादा पुरस्कार तुम्हाला प्रेयसाकडे घेऊन जातो पण शब्दांतून मी जेव्हा या समाजाशी स्वत:ला जोडून घेते तेव्हा ते शब्द मला त्या श्रेयसाकडे घेऊन जातात. त्यामुळेच कदाचित मी वारंवार व्यक्त करू शकते एक ‘निरंतर आशा’ माझ्या कवितेतून आणि म्हणू शकते,
नरसंहारानंतर अक्राळविक्राळ हसणारी माणसं
आजूबाजूला असण्याच्या काळात
मलाही लावायचा आहे छोटासा दिवा
या घनदाट अरण्यात.
कोणत्या झाडाच्या पानात लपले असतील
शब्द
बुद्धाच्या मुखातून उमटलेले
ते शोधून काढायला हवं आता.
कदाचित त्या शब्दांनी उजळून निघेल
हे सावटलेलं आभाळ
आणि
सुसह्य़ होईल जगणं
या काळातही.
 neerajan90@yahoo.co.in

Saturday, December 15, 2018

किती गृहीत धराल घरातल्या बाईला?... नीरजा

माझं बोलणं संपल्यावर माझ्याबरोबर असलेले कविमित्र माझ्यावर गरजले ः "झालं बोलून पुरुषांच्या विरोधात? किती दिवस तेच ते बोलणार? तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत? अर्धा वेळ केवळ पुरुषांच्या विरोधातच बोलत होतीस तू. फक्त शोषणच होत असतं का बाईचं? बाकी काही नसतंच का तिच्या आयुष्यात?... आम्हीही बायकांच्या सोसण्याविषयी लिहितोच की..' वगैरे वगैरे... 

कसला शोध घेत आहेत आजच्या लेखिका? स्वतःचा की त्यापलीकडं जाऊन साऱ्या जगण्याचा? माणसाच्या अंतरंगाचा की बाईच्या शोषणाचा? बाईच्या सोसण्याविषयी बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि तिच्या प्रश्‍नांची चर्चा करणाऱ्या या लेखिकांचा आणि तिला न्याय मिळावा म्हणून भांडणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा सूर नेमका कसा लागला आहे? स्त्री प्रश्‍नांची चर्चा करताना, स्त्रीकडं करुणेनं पाहताना त्यांच्या मनाचं पारडं कुठल्या बाजूला झुकतंय नेमकं? पुरुष बादच करून टाकत आहेत का त्या आता? किंवा त्याचेही काही प्रश्‍न असू शकतात, असा विचार करण्याचं सोडून दिलं आहे त्यांनी? स्त्री-पुरुष समानतेचा हा प्रवास कुठंतरी एकाच रेषेत चालला आहे, असं काहींना वाटू लागल्यामुळं असेल कदाचित; पण आता लोक म्हणतात ः "फार झालं; आता किती दिवस दळणार आहात तेच ते दळण? दुःख कुणाला नाही? पुरुष असो की बाई असो; वेदनेचा प्रवास तर प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. फक्त त्याचे रंग वेगळे असतात, त्याचा पोत वेगळा असतो. बाकी सारं सारखंच तर असतं आणि आता तर जग बदलतं आहे, पुरुष बदलत आहेत. त्यांची मानसिकता बदलते आहे. बाईनं तिला हवं ते सारंच मिळवलं आहे. अजून काय हवं आहे तिला? कशासाठी हा टाहो, हा आकांत, हा आक्रोश?'

ज्या काळात बाई स्वतःच्या भाव-भावनांविषयी एखादा शब्द उच्चारायचंही धाडस करू शकत नव्हती, त्या काळात विभावरी शिरूरकर यांनी "कळ्यांचे निःश्‍वास' लोकांपर्यंत पोचवले होते. त्याआधीच कधी तरी ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेवर आसूड ओढले होते. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटले होते आणि र. धों. कर्वे यांनी तर बाईच्या रतिप्रेरणांचाही उच्चार केला होता. थोड्या प्रमाणात का असेना, पण बाईकडं माणूस म्हणून पाहायला लागले होते लोक; पण तरी ज्या प्रमाणात हा आवाज उठायला हवा होता, त्या प्रमाणात तो उठत नव्हता. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता हे शब्द रूढ होत गेले, ते सिमॉन द बोव्हाचं "सेकंड सेक्‍स' हे पुस्तक पाश्‍चात्त्य देशांतून आपल्याकडं पोचल्यावर. 1970 च्या दशकात स्त्रीवादाचं वारं आपल्याकडं येऊन थडकल्यावर आपल्याही जगण्याचा विचार केला जाऊ शकतो, हे कळलेल्या बायका मग स्वतःकडं वळून पाहायला लागल्या आणि अचानक जाग आल्यासारख्या स्वतःच्या जगण्याविषयी बोलू लागल्या. आपल्या शोषणाविषयी बोलताना त्यांचा आवाज हळूहळू एवढा वाढत गेला, की पुरुषांना त्यात लपलेला आकांत ऐकू न येता त्यातला कर्कशपणा जाणवायला लागला. त्यांनी कानावर हात ठेवले. अगदी दोन्ही अर्थांनी! गेली 40-50 वर्षं कधी व्यासपीठावरून, तर कधी लेखनातून सतत बोलणाऱ्या बायकांच्या आक्रंदनानं अस्वस्थ होण्याऐवजी त्यांची चीड येऊ लागली. त्या का बोलत आहेत, कशासाठी बोलत आहेत, हे समजून न घेता "किती गोंगाट हा,' अशा नजरेनं लोक पाहू लागले त्यांच्याकडं. केवळ लोकच नव्हे; तर स्वतःला संवेदनशील म्हणवणारे आमचे लेखक-कवीही कंटाळले. "सगळ्या कवयित्री एकाच सुरात लिहीत आहेत,' असंही वाटायला लागलंय काहींना. काही जण तर "पुरुषांविरुद्ध किती कविता लिहिल्या,' असाही प्रश्‍न विचारू लागले आहेत. मध्यंतरी "कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमा' या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान'तर्फे मला बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललं होतं. अर्थात हा खुला कार्यक्रम नसल्यामुळं प्रेक्षक नव्हते. केवळ मी, प्रश्‍नकर्ता, रेकॉर्डिंग करणारे गृहस्थ आणि "प्रतिष्ठान'च्याच एका मीटिंगच्या निमित्तानं माझ्यासोबत आलेले माझ्याच पिढीचे मराठीतले एक महत्त्वाचे कवी होते. कुसुमाग्रजांच्या कवितेतली आई, पत्नी, प्रेयसी आणि एकूण स्त्री याविषयी जवळजवळ अर्धा तास माझी मतं मांडल्यानंतर शेवटी त्यांच्या "मुक्तायन' या संग्रहातल्या "आम्ही सारे' या कवितेतल्या स्त्रीविषयी मी बोलले. या कवितेत खरं तर स्त्रीपेक्षाही स्त्रीकडं पाहण्याच्या पुरुषाच्या दृष्टिकोनावर कुसुमाग्रजांनी प्रहार केला आहे. अशी कविता कुसुमाग्रजांनी स्वतः पुरुष असूनही लिहिली, याचं कौतुक करून मी रेकॉर्डिंग संपवलं. ते संपल्या संपल्या माझ्याबरोबर असलेले आमचे कविमित्र माझ्यावर गरजले ः "झालं बोलून पुरुषांच्या विरोधात? किती दिवस तेच ते बोलणार? तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत? अर्धा वेळ केवळ पुरुषांच्या विरोधातच बोलत होतीस तू. फक्त शोषणच होत असतं का बाईचं? बाकी काही नसतंच का तिच्या आयुष्यात?... आम्हीही बायकांच्या सोसण्याविषयी लिहितोच की..' वगैरे वगैरे... इथपर्यंत ठीकच होतं; पण कविवर्यांचा राग टिपेला पोचला. माझी मुलाखत घेणाऱ्याला ते म्हणाले ः ""हिच्या संग्रहाची नावं पाहा ः "स्त्रीगणेशा', "वेणा'. दुसरी चांगली नावं सुचत नाहीत यांना. या सगळ्या स्त्रीवादी बायका बाहेर स्त्रीवादावर भाषण करतात आणि ते संपलं, की मग नवरा जेवायला थांबला असेल म्हणून घरी पळ काढतात. यांना निसर्ग दिसत नाही, यांना प्रेम दिसत नाही. बाकीच्या कवयित्री काय सोसत नाहीत? पण तरी त्या लिहितात ना प्रेमाविषयी? मग यांनाच काय झालं आहे? शोषणाशिवाय दुसरं काही नाहीच का लिहिण्यासारखं?'' वगैरे वगैरे... बरंच काही बोलले ते.

कसला राग होता तो? व्यवस्थेविरुद्ध बोलणाऱ्या स्त्रियांविषयी राग होता की आणखी काही, माहीत नाही; पण खरंच एवढा कर्कश झाला आहे का आमचा आवाज, असा प्रश्‍न पडला मला. असा प्रश्‍न अलीकडं अनेकदा पडतो. रोज बलात्काराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या ऐकत असतो आपण, कधी नवऱ्याकडून फसवल्या गेलेल्या, तर कधी "आपल्याला विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा अधिकारच आहे', अशा गुर्मीत वावरणाऱ्या पुरुषांसमोर हतबल झालेल्या स्त्रिया पाहत असतो आपण आपल्या आजूबाजूला. एखादी स्त्री नवऱ्याच्या लाथा-बुक्‍क्‍या खाऊन सुजल्या तोंडानं येऊन बसते आपल्यासमोर ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, तेव्हा त्या मुकाट बसलेल्या स्त्रीकडं पाहिल्यावर आम्ही काय करावं, अशी अपेक्षा आहे या समाजाची? माझ्या एका कवितेत मी म्हटल्याप्रमाणे ः "गावीत का गाणी फळा-फुलांनी बहरलेल्या तृप्त संसाराची आणि मानावेत त्यांचे आभार आमच्या डोळ्यांत चंद्र, फुलं-पाखरं पाहिली म्हणून?'

हे असे प्रश्‍न मनात असतानाच संजय पवार यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं "ठष्ट' हे नाटक पाहण्याचा योग आला आणि वाटलं ः "नाही, आमचा आवाज कर्कश झालेला नाही.' "तो कर्कश होत आहे,' अशी हाकाटी देऊन तो दाबण्याचा प्रयत्न मात्र होत आहे.
गेली कित्येक वर्षं बायका जिवाच्या आकांतानं त्यांच्या जगण्याचा पट उलगडून दाखवत आहेत...त्याकडं लक्ष वेधू पाहत आहेत...

कधी वेदनेचा सूर लावून, तर कधी आक्रमक होऊन त्यांच्या शोषणाचं गाणं गात आहेत; पण तरीही या व्यवस्थेनं बंद केलेले कान उघडून शांतपणे ऐकण्याची आणि त्यावर विचार करण्याची आमच्या पुरुषांचीच तयारी नाही. अशा वेळी "ठष्ट' या नाटकानं केलेलं काम महत्त्वाचं वाटलं. लग्न या एकाच गोष्टीवर अडकलेल्या स्त्रीच्या आयुष्याची गाडी पवार यांनी एका वेगळ्या वळणावर आणून ठेवली आहे. व्यवस्थेनं दिलेली भूमिका करून करून दमलेली स्त्री स्वतःचं आयुष्य स्वतःला हवं तसं जगण्याचा विचार करू शकते, हे तर त्यांनी दाखवलं आहेच; पण पुरुषी मानसिकतेवर कोरडेही ओढले आहेत. या नाटकातली अनामिका म्हणते ः "स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटची आता गरज नाही, तर पुरुषांच्या ओरिएन्टेशनची गरज आहे.' हे वाक्‍य स्त्रीपात्राच्या तोंडी असलं तरी पुरुषानं लिहिलं आहे, हे जास्त दिलासा देणारं होतं. पवार यांनी मांडलेला हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटला.

बायकांना सांगून झालं आहे. त्या स्वतःला या चौकटीबाहेर काढण्यासाठी उत्सुक आहेत; पण त्यांची ही उत्सुकता मारण्याचं काम पारंपरिक मुशीत घडवला गेलेला पुरुष आणि त्याच्या आजूबाजूच्या स्त्रियाही करत आहेत. त्यामुळं बदलू पाहणाऱ्या स्त्रियांना बदलता येईल, अशी परिस्थितीच निर्माण होत नाही आणि ती होत नसल्यानं आपल्याकडची मुलं आजही व्यवस्थेच्या त्याच आरशातल्या आपल्या प्रतिबिंबावर प्रेम करत आहेत. त्यामुळंच आता खरी गरज आहे, ती त्यांचे वर्ग घेण्याची!

आणि असे वर्ग घेण्याचं काम आज स्वतः पुरुष करत आहेत, ही आणखी समाधानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या नव्हे; तर देशाच्या कानाकोपऱ्यात असे लोक आपल्याला भेटतात. "मावा'सारख्या संघटना स्थापन करणारे पुरुष असोत, की "नारी समता मंच' किंवा स्त्रीमुक्ती संघटनांसारख्या अनेक संघटनांतून स्त्रियांसोबत काम करणारे पुरुष असोत, त्यांची संख्या कदाचित कमी असेल; पण गेली काही वर्षं स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती अशा शब्दांच्या झंझावातानं भेलकांडून गेलेल्या समाजात राहताना स्त्री-पुरुष नात्यात जो ताण निर्माण झाला आहे, तो ताण कमी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

केवळ बाईचंच नव्हे; तर साऱ्या माणूसजातीचं दुःख जाणणाऱ्या पुरुषांची संख्या अशीच वाढत गेली, तर कदाचित स्त्रीच्या शोषणाच्याच नव्हे; तर सर्व पातळ्यांवर होणाऱ्या शोषणाचा विचार केला जाईल. स्त्री-पुरुषांमधलं सामंजस्य वाढेल, मालकी हक्काची भावना जाऊन केवळ आदराची भावना निर्माण होईल...पण हे एवढं सोपं नाही. आपल्या मैत्रिणीकडून "टोटल डिझास्टर'ची अपेक्षा करणारे पवार यांच्यासारखे आणखी संवेदनशील लोक तयार व्हायला हवेत. आजही कथा-कवितेतून स्त्रीशोषणाचा विचार करणारे लेखक, कवी आणि सामाजिक चळवळीच्या व्यासपीठावरून स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे पुरुष आपल्या घरातल्या बाईला मात्र गृहीत धरत असतात. अशा काळात गरज आहे, ती आतून-बाहेरून पारदर्शक असणाऱ्या पुरुषांची. असे पुरुष असलेला आदर्श समाज निर्माण होईलच; फक्त घराघरातून त्या प्रकारचं शिक्षण मात्र दिलं गेलं पाहिजे. पुरुष स्त्रीपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण करू पाहणाऱ्या समाजानं बदलायला हवं. हे जर झालं तर खऱ्या अर्थानं बदल झाला, असं म्हणता येईल!

http://epaper.esakal.com/esakal/20130818/5743924621013138966.htm
नीरजा  neerajan90@yahoo.co.in
संग्रहित :  http://ashokbuddhivant.blogspot.com/2013/09/blog-post_29.html

Tuesday, December 11, 2018

बालसाहित्य पुरस्कार

मित्रांनो आनंदाची गोष्ट.....
मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, काव्यकोडी लिहिणं आणि लिहिलेलं मुलांपुढे सादर करणं , हाच माझा प्रांत. मुलांना त्यातून झालेला आनंदच माझ्या  पुढील लेखनासाठी ऊर्जेचा स्त्रोत बनत गेला .खरंतर, याच प्रक्रियेतून माझ्या लेखनाची वाटचाल गेली २६ वर्षे  सुरु आहे. आजमितिस २५ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या ब्रेल लीपी आवृत्या निघाल्या. हिंदी, इंग्रजीत अनुवाद झाले. पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील बालदोस्तांनी माझ्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम केलं. 
आज याच टप्प्यावर माझ्या एकूणच प्रयोगशील लेखनासाठी मातोश्री स्नेहप्रभा तौर बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय. बुलडाणा येथे संपन्न होणाऱ्या बालसाहित्य परिषदेत हा पुरस्कार  मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तौर परिवाराचे यासाठी मनापासून आभार.
https://www.facebook.com/eknath.avhad.3

Friday, December 7, 2018