Friday, June 24, 2022

post 3

#fbshare  ! 
......
आता वर्क फ्रॉम होममुळे घरूनच काम असतं पण एका वेळेला तसं नव्हतं. सलग दोन, तीन, चार महिने पुण्यातच जायचे आणि मग घरची गावची आठवण यायला लागायची. कधीतरी MH०७ पासिंगची गाडी पुण्यात दिसली की एकदम बरं वाटायचं, कुठला का माणूस असेना, तो देवगडचा असेना कि बांद्याचा. आपण एकाच जिल्ह्यातले, आपल्या आवडीनिवडी एकच,  त्यालाही चायघावणे, आंबोळीचटणी आवडतच असणार, तोही माझ्यासारखाच काजीआंब्याला पिसाच असणार, देवळाचं पालखीचं जत्रेचं दशावताराचं त्यालाही माझ्यासारखंच अप्रूप असणार. "खयले तुम्ही" अशी हाक घातल्यावर तोही खुश होऊन उत्तर देणारच असं वाटत राहायचं. साधारण २०१४ मध्ये टिळक रोडच्या इथे गाडी थांबवून चहा पित असताना दोन मुलांनी बाईकची नंबरप्लेट बघून हाक मारली,  "काय ओ, खयचे तुम्ही". "मी कणकवलीचो, तुम्ही खयचे?", ह्यावर त्यांचं "आम्ही फोंड्याचे" असं उत्तर आलं, फक्त १४ किलोमीटर अंतर आमच्या गावात. म्हणजे आपलीच माणसं ती. एकदम हायसं वाटलं. 

एकदा विकेंडला संध्याकाळी झोपेतून उठलो तेव्हा रूमवर कोणीच नव्हतं, उठून बाहेर येऊन बसलं तरी काही हुरूप वाटत नव्हता. अरविंद गोखले कथा लिहायचे त्यातल्या काहूर मन:स्थितीसारखं वाटायला लागलं. जरा चालून येऊ म्हणून बाहेर पडलो तर वाटेत एक माणूस भेटला, बोलता बोलता समजलं कि ते सावंतवाडीचे गावडे आहेत. गाडी रुळावरून घसरावी तसं आम्ही पुढच्या क्षणाला मराठीवरून मालवणीवर घसरलो आणि मीही तिकडलाच म्हटल्यावर तेही उत्साहाने बोलू लागले. गप्पा होत गेल्या, पुढे चालता चालता वळणावर दत्त आश्रम आला तिथे ते या म्हणाले. तिथे गेलो तर लक्षात आलं कि इथे सिंधुदुर्गातले बरेच जण होते, त्यांच्या इकडच्या तिकडच्या गजाली ऐकता ऐकता मन गावातल्या तिठ्यावरून, सडयावरून, गोरवांच्या पाठीवरून, व्हाळातून धावायला लागलं आणि बघता बघता उगाचच काळवंडलेलं मन लख्ख दिव्यासारखं झालं. 

एसटी रात्रीच्याच असायच्या, एसटीत बसलं कि ती ह्या स्टॅन्डमधून त्या स्टॅन्डवर जात राहायची, फक्त पणजी गाडी असल्यामुळे गाडीत मालवणी, कोकणी ऐकू यायला लागायचं. मागे वळून बघितलं तर नऊवारीतल्या म्हाताऱ्या बायका दिसायच्या, टिपिकल ढगळ शर्टपॅन्ट घातलेले बाप्ये दिसायचे. वाटायचं कि आपली ओळख नसली तरी आपली भाषा सारखी आहे, भुकेला हात पसरला तरी कोणी नाही म्हणायचं नाही, "मका पण देवा जरा वायच " एवढं म्हटलं कि डबा सरकवला जाईल याची खात्री वाटायची. गाडी कात्रज, सातारा, कराड, कोल्हापूरमधून जाताना अध्येमध्ये झोप येत राहायची, मधेच जाग यायची पण एकदा का एसटी गगनबावडा घाट उतरली कि मग ओळखीच्या खुणा दिसायला लागायच्या, लाल माती दिसायला लागायची, डांबरी काळे रस्ते, त्याच्या बाजूला मळे, मळ्यातली तरव्यांची खुट, अध्येमध्ये लागणाऱ्या वाड्यांचे बोर्ड, डोक्यावर कौलं घेतलेली घरं, देवळं दिसायला लागली कि आपण आपल्या जागेत आलो याची खात्री पटायची, वाटायचं - एसटी थांबवून इथेच कुणाकडे उतरलं तरी आपल्या घरात आणि इथे काही जास्त फरक वाटणार नाही, आपण सगळे एकाच जमिनीवरचे आहोत. तेव्हा माझ्या लक्षात आलं कि अगदी काटा खोलवर रुतावा तसं कोकण माझ्यात रुतलेलं आहे. 

   © रोहित भिडे


Sunday, June 19, 2022

post 2

कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे नवीन पुस्तक ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’
लेखक- श्रीनिवास हवालदार
********************************************************************
- ओळख-
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
- सुधीर मोघे
मराठी साहित्यातील गूढरम्य कवी ग्रेसच्या १७० कविता दोन पुस्तकांच्या माध्यमाने ‘धुक्यातून प्रकाशाकडे’ आणल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की ग्रेसच्या कविता सखोल विश्लेषण करून रसिकांसमोर आणण्याचे साहस तर अन्य समीक्षकांनी केले नाहीच परंतु बा.सी.मर्ढेकर, आरती प्रभू, बालकवी, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे काही समीक्षकांनी केलेले विश्लेषणही कवींच्या अभिप्रेत भावांशी जुळणारे नाही.काही प्रथितयश समीक्षक त्यांच्या कवितांच्या भोवती घिरट्या घालत बसले आणि काहींने तर अर्थ निर्णयात विक्षिप्ततेची सीमा गाठली.कविततेचे संदर्भ आणि अभिप्रेत प्रतिमांची उकल ना झाल्यामुळे असे प्रसंग उद्भवणे अपरिहार्य होते.
माझ्या मते कवितेतील गूढता चांगल्या कवितेचे एक वैशिष्ट्य असते.आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११व्या शतकात ' ध्वनिआत्मा काव्यस्य' म्हणजे ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे हा सिद्धांत मांडला.वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून त्याने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे.त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.याचे स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनाने उदाहरण दिले आहे की ज्या प्रमाणे स्त्रीच्या ठिकाणी तिच्या शरीराहून वेगळे असे लावण्य दिसून येते त्या प्रमाणेच महाकवींच्या काव्यात वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ प्रतीयमान किंवा व्यंग्यार्थ असतो.आनंदवर्धंनाच्या मते या ध्वनीचा प्रत्यय येण्यासाठी रसिकाजवळ विशिष्ट प्रकारची योग्यता लागते.केवळ शब्दार्थ ज्ञानाने तो कळत नाही.त्यासाठी वाचक काव्यार्थ तत्वज्ञ हवा.कवीला महाकवित्व मिळते ते या ध्वनीच्या उचित वापरामुळेच.
कवी ग्रेस हेच तथ्य काही निराळ्या शब्दात असे मांडतात "जीवन,निसर्ग आणि अध्यात्मसत्ता यातील कोणत्याही अनुभवाच्या चक्रव्यूहात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेशकर्त्याजवळ त्या अनुभवात प्रवेश करण्याची एक प्रकारची किमान इयत्ता लागत असते आणि यालाच मी प्रवेशपत्रिका म्हणतो. केवळ इच्छा, लहर म्हणून अशी प्रवेशपत्रिका कुठल्याही अनुभवधारकाला स्वतःजवळ बाळगता येत नाही.एखाद्या कैफात, एखाद्या पोटतिडिकीच्या आविर्भावात अशी पत्रिका अळेबळे घेऊन जर अनुभवधारक त्या अनुभवात शिरला तर त्याच्यावर तो ओढवलेला, त्याने ओढवून घेतलेला दुरापास्त प्रसंगच म्हटला पाहिजे.”
या बाबतीत मर्ढेकरांसंबंधी ही आठवण प्रसिद्ध आहे.श्री.पु.भागवतांनी एकदा गप्पा मारताना मर्ढेकरांना विचारले तुमची ‘झोपलीं ग खुळीं बाळें ' ही कविता मला नीटशी कळली नाही.ती कशाबद्दल आहे? त्यावेळी मर्ढेकर नुसतेच ’ हूं' करून थांबले नाहीत.त्यांनी एका संपूर्ण वाक्यात उत्तर दिले! म्हणाले, “Then the poem does not exist for you at all !”
साहित्य समीक्षा सामान्यतः प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण, सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा या तीन वर्गात विभक्त केली जाते.दुर्बोध, गूढ अथवा गूढतेच्या सीमारेषे वर असणाऱ्या कविता सामान्य रसिकांस सुबोध करण्यासाठी मला प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण करणे हाच एक योग्य मार्ग वाटतो.सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा हे प्रकार शैक्षणिक[ Academic] असल्यामुळे सर्वसामान्य रसिक वर्गासाठी उपयुक्त नाहीत आणि कविता समजल्याशिवाय अनुभवण्याचा आव आणणे ही तर निव्वळ पळवाट आहे कारण निर्मिति करणारा कलाकार केवळ अनुभवण्यासाठी निर्मिति करत नसतो.त्याला आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.
गूढ किंवा गूढतेच्या सीमारेखेवर असलेल्या कविता सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चोखंदळ समीक्षकांचे आहे.या बाबतीत त्यांची भूमिका कवी आणि रसिक यांच्यातील सेतुबंधाची आहे.एका लेखकाने साहित्य समीक्षकांसाठी प्रस्तावित केलेली खालील आचार संहिता मला उपयुक्त वाटते परंतु दुर्दैवाने ह्याचे पालन फार कमी समीक्षकांनी केले आहे आणि त्यामुळे काही मूळ निर्मितीकारांचे साहित्य विकृत अवस्थेत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचून ते अधिकच दुर्बोध झाले आहे:
“A critic must have a sound commonsense and clear thinking in order to judge or evaluate the works of literature in an efficient way. He is well-read person to exercise judgment on literary works in a way as it should be. He must know the fact that to understand the works of literature; he needs to put himself in the place of a writer so to that he can appraise the work from the viewpoint of a writer as well. In order that the excellence or shortcomings may be examined properly, he does not preform opinion, but interprets literary values on the basis of his knowledge and experience without an aggressive and unreasonable belief or without any prejudice.”
या पुस्तकात गूढ अथवा गूढतेच्या सीमा रेषेवर असणाऱ्या ज्या रम्य कवितांचे विश्लेषण केले आहे त्यांची पृष्ठभूमि प्रस्तुत करणे उपयुक्त होईल.
केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर१, १९०९-मार्च२०, १९५६) यांचा उल्लेख केला जातो.त्यांनी कवितेची पूर्वपरंपरा मोडून तिला नवीन दिशा देण्याचे काम केले.कविते प्रमाणेच समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही त्यांनी महत्वाचे योगदान केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जाते.त्यांनी परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला हे त्यांच्या काव्यातील आशय आणि दुरूह असल्याचे कारणही आहे परंतु त्यांची नवकविता पूर्व परंपरेशी दुभंगून न राहाता अनेक ठिकाणी अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारात आपल्या समोर येते. संतकवितेतील सांसारिक वैफल्य आणि अर्थशून्यता आधुनिक यंत्रयुगात आणि जगातील विज्ञान प्रगतीच्या संदर्भातही किती खोलवर रुजली आहे याची प्रचीती त्यांच्या नवकवितेत प्रकर्षाने येते.
त्यांच्या' शिशिरागम' या कवितासंग्रहातल्या कविता सुबोध आहेत परंतु नंतरच्या लेखनकालातील ' काही कविता' आणि' 'आणखी काही कविता‘तील अनेक कविता अत्यधिक गूढ असून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटनांशी, व्दितीय महायुद्धाशी, मानवनाशास कारणीभूत विज्ञानाच्या दुरुपयोगाशी, माणसाच्या अज्ञानमूलक धारणांशी आणि काही अध्यात्म विषयक संकल्पनांशी संबंधित आहेत.या पुस्तकात त्यांच्या १८ कविता सम्मिलित करून त्या सर्व कवितांवर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे मराठी साहित्यक्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या ‘पिपात मेले ओल्या उंदिर ' या कवितेचे विस्तृत आणि सखोल विश्लेषण नवीन संदर्भात केले आहे. प्रसिद्ध अष्टपैलू साहित्यक प्रल्हाद केशव अत्रे यांनी या कविते बद्दल म्हटले होते "मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर' ह्या कवितेचा प्रत्यक्ष परमेश्वराला तरी अर्थ लावता येईल का? उंदीर ते काय,ते बिळात कां जगले, पिपात कशाला न्हाले अन उचकी देऊन कां मेले? आणि मेले तर मेले!त्यांची दुर्गंधी इतक्या रसिकतेने हुंगीत बसण्याचे कवीला काय कारण? ह्याच ह्या पिपात मेलेल्या उंदरांच्या पाठीवर बसून नवकाव्याचा प्लेग आपल्या महाराष्ट्रात आला"
.“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी श्रद्धा व धारणा ठेवणारे पुरुषोत्तम शिवराम रेगे [२ ऑगस्ट, १९१०- १७ फेब्रुवारी,१९७८] हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते.पु.शि.रेगे यांनी स्वतः म्हटलंय की ‘जीवनात विविध रूपांनी वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषत: तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप त्यांच्या कविमनाला मोहवीत आले आहे.‘त्रिधा राधा’ ही रेग्यांची प्रसिद्ध कविता या पुस्तकात सम्मिलित केली आहे.
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स.१९३०-एप्रिल २६, इ.स.१९७६) एक अग्रगण्य कवी आणि लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांना आर्ततेच्या शोधातला एक शब्दयात्री म्हणतात. ही आर्तता त्यांच्याच शब्दात अशी व्यक्त झाली आहे:
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
त्यांनी ‘जोगवा’, ‘ दिवेलागण’,‘ नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातल्या कवितेतून अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या.त्यांच्या ‘गेले द्यायचे राहून, ‘ती येते आणिक जाते, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ‘तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी’ या संगीतबद्ध झालेल्या आणि रसिकांत प्रिय असणाऱ्या कविता गूढतेच्या आवरणात असून समजण्यास थोड्या कठिण असल्यामुळे मी या पुस्तकात सम्मिलित केल्या आहेत.
कवी बा.भ.बोरकर (३० नोव्हेंबर १९१०- ८ जुलै १९८४) यांना सर्व महाराष्ट्र 'आनंदयात्री कवी' म्हणून ओळखतो.त्यांच्या कवितात पसरलेल्या निसर्गाच्या देखण्या लावण्यात ठिकठिकाणी सृष्टीत भरलेल्या सौंदर्याची अनुभूती होते परंतु हा निसर्ग मानवासाठी लौकिक पातळीवर निर्हेतुक प्रेम आणि समर्पणाच्या भावनेचा संदेश घेऊन येतो.त्यांच्या काही आशयघन कवितांचे विश्लेषण आपणास आवडेल.
कवि ग्रेस [१० मे १९३७-२६ मार्च २०१२] यांच्या १७० गूढरम्य कवितांचे रसग्रहण २०१४ आणि २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे’ पुस्तकाच्या दोन खंडात मी केले होते.ग्रेसच्या काही प्रातिनिधिक नवीन कविताही या पुस्तकात आपणास सापडतील.
बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे [१३ ऑगस्ट १८९०- ५ मे १९१८]’ फुलराणी’, ‘निर्झरास, ‘आनंदी आनंद गडे, ‘श्रावणमास, ‘औदुंबर’ अशा अनेक कविता लिहून निसर्गाच्या सुंदर निराळ्या विश्वात वावरणारे आणि रसिकांना ही भूल पाडणारे बालकवी यांच्या ' औदुंबर' या कवितेवर अनेक समीक्षा झाल्या आहेत.या कवितेने अनेक वर्षानंतर ही आपले आकर्षण कायम ठेवले आहे.ही विख्यात कविता लोकप्रिय तर आहेच परंतु एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे.प्रा.एस एस नाडकर्णी यांनी बालकवींच्या या कवितेवर अनेक समीक्षकांनी लिहिलेल्या ‘समीक्षांवर’ एक संपादित पुस्तकच लिहिले आहे.काही समीक्षकांनी पांढरी वाट म्हणजे गोरीपान स्त्री वा विधवा, औदुंबर म्हणजे सन्यस्त योगी,क्रीडामग्न बालक, प्रेयसीची प्रतीक्षा करणारा पुरुष आणि प्रियकराकडे संकेत स्थानी भेटायला निघाली विधवा स्त्री किंवा समाजाला झिडकारून बेभान करून डोहात विलीन होणाऱ्या प्रेमिकेची कहाणी वगैरे तर्कशून्य अर्थ कवितेतील प्रतिमांना बहाल केले आहेत.काही समीक्षक ही कविता अपूर्ण लिहिलेली मानतात परंतु अन्य समीक्षकांच्या या 'भटकेगिरीत' सामील ना होता मी या कवितेचे आणि अन्य कवितांचे मला भावलेले विश्लेषण केले आहे.
'सौंदर्यचि काव्य’ ही काव्याची व्याख्या करणारे कवी 'बी’ म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते [जून १, १८७२-ऑगस्ट३०,१९४७) म्हणतात,”अंतरंग ओथंबुन ओसंडे ती सुंदरता.” त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इत्यादि नानाविध विषयांवर कविता केल्या.त्यांच्या प्रसिद्धीपराङ्‌मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. कवी ‘बी’ यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.त्यात ११कविता होत्या.त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना' ही अंतरंग ओथंबून ओसंडणारी सुंदर कविता अजूनही रसिकांना प्रिय आहे.
कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील एक बहुमुखी प्रतिमा-सम्पन्न कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते.त्यांनी कवितेत साकार केलेली पृथ्वी आणि सूर्याची पुरातन अजरामर रम्य प्रेमकथा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
सुधीर मोघे [८ फेब्रुवारी, इ.स.१९३९-१५ मार्च, इ.स.२०१४] सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन करणारे आणि ६ कविता संग्रहाचे लेखन करणारे लोकप्रिय कवी यांची एक सुंदर कविता ‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा’ मधील चांदण्या गूढ असूनही रम्य आहेत.
आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३- डिसेंबर ७, १९४१) एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे.ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते.’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांच्या कविता सन १९३५ मध्ये प्रकाशित झाल्या आहेत.त्यात एकुण २२५ कविता आहेत.या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.गान सम्राज्ञी लता मंगेशकर तांबे यांच्या कवितांबद्दल म्हणतात की ग्वाल्हेरचे राजकवी असलेले भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. तांबे, माझे अतिशय आवडते कवी.माझ्याकडे त्यांच्या कवितांचं पुस्तक होतं.त्यातल्या अनेक कविता मी लहानपणी गुणगुणत असे.त्यांच्या कवितेतला नाद, त्यातली लय आणि गेयता मला भुरळ घालत असे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कवितांमधला आशय मला सतत खुणावायचा.तांबे यांच्या कवितांतले शब्द तर सुंदर होतेच, मात्र त्या शब्दांना अनेक अर्थछटा होत्या.वरवर सरळ साध्या आणि सोप्या वाटणाऱ्या त्यांच्या कवितेच्या गर्भात काही गूढ दडल्यासारखं वाटायचं.मला वाटतं, तेच मला खुणावायचं. म्हणूनच मी त्यांच्या काही कविता गाणीरुपात गायचा निर्णय घेतला.
तांबे यांच्या गूढतेकडे कळलेल्या 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी ' , रिकामे मधुघट' आणि 'कशी काळनागिणी' या कविता या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
मराठी साहित्यात विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घालणाऱ्या गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' (२३ऑगस्ट १९१८-१४ मार्च २०१०) यांच्या गूढतेकडे वळणाऱ्या कविता एक नवा अनुभव रसिकांस देतील.
मराठी साहित्यास अनेक सुंदर भावकविता कविता लिहून समृद्ध करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवियित्री इंदिरा संत [४ जानेवारी१९१४-१३ जुलै २०००] यांनी पन्नास वर्षांच्या अवधीत नऊ स्वतंत्र कवितासंग्रह रसिकास दिले.त्या म्हणतात "माझ्या  बहुसंख्य कवितांतून प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे.निसर्ग सुद्धा पुष्कळदा निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे." त्यांच्या ४ प्रसिद्ध कविता ‘मृण्मयी’,‘कुब्जा’, ‘किती लुटावे डोळ्यांनी’ आणि ‘आषाढ’ यांचे रसग्रहण एका वेगळ्या स्वरुपात या पुस्तकात आपणास दिसेल.
शांता शेळके (ऑक्टोबर१२, १९२२-जून ६, २००२) या बहुमुखी प्रतिभा संपन्न लेखक आणि मराठी कवयित्री यांनी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले परंतु कविता हा त्यांच्या आवडीचा साहित्य प्रकार होता.या पुस्तकात सम्मिलित केलेल्या त्यांच्या वेगळ्या धर्तीच्या ३ कविता रसिकास त्यांच्या भावविश्वाचा निराळाच अनुभव देतील.
अरुण कोलटकर [१नोव्हेंबर१९३२-२५ सप्टेंबर २००४] हे कोल्हापुरात जन्मलेले एक सर्जनशील कवी आणि कलाकार होते.त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता केल्या. मर्ढेकरांप्रमाणे यांच्या कवितेनेही आधुनिक मराठी कवितेला एक नवे वळण मिळवून दिले. ‘भिजकी वही ' या काव्यसंग्रहाला त्यांना २००५ चा साहित्य अकादमी अवार्ड मिळाला होता. त्यांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या कविता सहज बोलल्यासारख्या साध्या असतात परंतु कोलटकरातला सुप्त कलाकार कवितेतच एक गूढ अर्थ दडलेले चित्र रेखाटून आपणास बुचकळ्यात टाकतो. त्यांच्या ' भिजकी वही', 'आरसे' आणि 'वामांगी' या ३ प्रातिनिधिक कविता पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत आहेत.
मराठी साहित्याच्या या नवीन कालखंडातील खालील प्रतिभावंत कवी आणि कवयित्रींच्या रचना आणि माझ्या पूर्वीच्या समीक्षेप्रमाणे वेगळेपण असणारे पृथगात्म रसग्रहण या पुस्तकातही आपणास सापडेल.
कवी- बा.सी.मर्ढेकर
१ पिपात मेले ओल्या उंदीर
२ पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी
३ अजून येतो वास फुलांना
४ नाही कोणी का कुणाचा
५ झोपलीं ग खुळीं बाळें
६ बन बांबूचे पिवळ्या गाते
७ बोंड कपाशीचे फुटे
८ आहे बुद्धीशी इमान
९ जगाचा लिप्ताळा
१० दवांत आलीस भल्या पहाटीं
११ जे अज्ञानांत जन्मले
१२ आग अंधाराची जीवा
१३ अंधाऱ्या जगाची
१४ फुटेल [होती वेडी आशा]
१५ ह्या गंगेमधि गगन वितळले
१६ शिवलिंग माझे लिंग
१७ पळापळातील जोर मनगटी
१८ वावडी वाह्यात माझी
कवी-पु.शि. रेगे
१९. त्रिधा राधा
कवी-आरती प्रभू
२० गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
२१ समईच्या शुभ्र कळ्या
२२ तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
२३ ती येते आणिक जाते
कवी-बा. भ. बोरकर
२४ तव नयनांचे दल हलले ग !
२५ झिणि झिणी वाजे बीन
२६ नाही पुण्याची मोजणी
२७ झाड गूढ झाड गूढ
२८ लावण्य रेखा
२९ रस्त्यांत कोणसा आंधळा गातो
कवी-ग्रेस
३० केतकी दल
३१ नवी द्यूतकांता
३२ काळा घोडेस्वार
३३ सारंगा
३४ ज्ञानेश्वरीय वर्षा
३५ सूर्यास्ताचे पाणी- इथे गंगेपाशी
३६ अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला
३७ पाण्याची भूल
३८ चाफा
बालकवी- त्र्यंबक बापुजी ठोंबरे
३९ औदुंबर
४० गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
कवी 'बी' ऊर्फ नारायण मुरलीधर गुप्ते
४१ चाफा बोलेना, चाफा चालेना
कवी- कुसुमाग्रज
४२ पृथ्वीचे प्रेमगीत
कवी- सुधीर मोघे
४३ रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
कवी-विंदा करंदीकर
४४ ओशट रात्र, वषट प्राण
४५ भुते झाडांची
४६ डोळ्यातल्या डोहामध्ये
४७ वेडी
कवी- भास्कर रामचंद्र तांबे.
४८ घन तमीं शुक्र बघ राज्य करी
४९ रिकामे मधुघट
५० कशी काळनागिणी
कवयित्री-इंदिरा संत .
५१ मृण्मयी
५२. कुब्जा
५३. किती लुटावे डोळ्यांनी
५४. आषाढ
कवयित्री-शांता शेळके
५५ जाईन विचारित रानफुला
५६.हे रान चेहऱ्यांनचे माझ्या सभोवती
५७ घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे .
कवी- अरुण कोलटकर
५८ भिजकी वही
५९ आरसे
६० वामांगी

https://www.facebook.com/groups/1788863474722340/permalink/3251372801804726/




Post 1

गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे-  कवी आरती प्रभू  
[माझ्या 'मराठीतील काव्यरंग' या नवीनतम पुस्तकातून]
प्रस्तुती - श्रीनिवास हवालदार   
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
 'नक्षत्रांचे देणे' ची पहिली ओळख एका दूरदर्शन वाहिनीवर बरेच वर्षांपूर्वी झाली. मराठीच्या  अनेक प्रसिद्ध कवी , संगीत नियोजक इत्यादिंच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल निर्मित केलेला हा धारावाहिक कार्यक्रम फार लोकप्रिय होता. त्यावरून असा अनुमान  केला की नक्षत्राप्रमाणे चमकणारे जे व्यक्ती समाजास भरभरून योगदान करतात त्यांना आपण ही काही देणे लागते. परंतु  'गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे'  ही आरती प्रभूं ची संगीतबद्ध कविता बरेच वेळा ऐकल्यानंतरही त्यातील धागे दोरे माझ्या पूर्व अनुमानाशी तंतोतंत जुळत नव्हते. कविता कोणाला उद्देशून आहे, त्याला काय द्यायचे राहिले आणि नक्षत्रांशी त्याचा काय संबंध असावा या बद्दल काही स्पष्ट चित्र समोर येत नव्हते. तेंव्हा आकाशातील सुदूर नक्षत्रांशी जवळीक साधणे आवश्यक होते.अंतर्जालावर नक्षत्रांबद्दल खालील माहिती मिळाल्यामुळे आरती प्रभूंची कविता उलगडण्यास मदत झाली-   
     “ पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. उदा. १) अश्विनी- कुचला २) भरणी- आवळा ३) कृत्तिका- उंबर ४) रोहिणी- जांभूळ वृक्ष वर्षांतून एकदा तरी नक्की लावावी. आयुर्वेदानुसार संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते.,” 
   आरती प्रभू आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या आपराधिक भावना आणि पश्चात्ताप  व्यक्त करत आहेत की माझ्या हलगर्जीपणा मुळे मी तुझ्या जन्मानंतर तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या जन्म नक्षत्राचा एक साधासा आराध्यवृक्ष ही लावून शकलो नाही आणि पालन पोषण करण्यासाठी वेळही देऊ शकलो नाही इतके वर्ष गेल्यानंतर आता मी इतका दरिद्री झालो आहे की तुझा संरक्षणासाठी माझ्याकडे वृक्षा ऐवजी फक्त काही कळ्या आणि ओली पाने शिल्लक आहेत.त्याने कदाचित तुझे प्राण वाचू शकतील.  
  मी तुझ्या भेटीसाठी हसत आलो होतो.मला माहित नव्हते की ही भेट शेवटचीच आहे. आणि आता दिवसरात्र मला पश्चात्तापाच्या अग्नीत जळावे लागणार आहे.मी आता पर्यंत दगडासारखा भावनाहीन होऊन तुझ्याशी वागलो हे शल्य मला रात्रंदिवस टोचत राहील
मला आता जाणीव होते आहे की माझ्या अशा भावनाहीन वागण्यामुळे बालपणामध्येच तुला अकाली मृत्यू येत आहे.


Sunday, June 12, 2022

post 3

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


post 2

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


Tuesday, June 7, 2022

post 2

#fbshare 
वाफाळलेला चहा आणि बाहेर कोसळणारा पाऊस.. हा पाऊस असतो..

आपल्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहायला लावणारा ,
सळसळणारा वारा , विजांचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट,
वातावरणात एक सुखद गारवा , वेगळीच धुंदी घेऊन येणारा ,
सर्वांनाच वेडावणारा , सुखावणारा ,
सगळीकडे नवचैतन्याची उधळण करणारा ,
आपल्या टपोऱ्या थेंबांनी पानांवर दवाबिंदुंच्या मोत्यांची पखरण करणारा ,
व्यवहाराची गणितं न मानणारा ,
सगळ्या चौकटी मोडून मुक्तपणे बरसणारा ,
वेळकाळाचं कुठलंही बंधन न जुमानता मनसोक्त बागडणारा ,
कधी उग्र , विराट तर कधी सौम्य रूपाचं दर्शन घडवणारा ,
आपल्या जवळचं सर्व संचित मुक्तपणे उधळणारा ,
कधीकधी मनाला अनामिक हुरहूर लावणारा ,
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक मनात वेगळेच विचार , आठवणी , स्वप्नं जागवणारा ,
आपल्या आयुष्याशी एक वेगळंच नातं जोडणारा ,
असताना अथवा नसतानाही आपलं आयुष्य मात्र व्यापून टाकणारा..

हे सगळं लिहितांनाच आठवांचा पाऊस मात्र डोळ्यांत कधी साचला हे कळलंदेखील नाही. या पावसाची हि अशीही एक वेगळीच अनुभूती..

- Sammy


post 1

#news 

"नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर..." अशी ज्यांची सहज शब्दफेक ऐकत आपण सारेच मोठे झालो, ते महाराष्टाच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
दूरदर्शनवरील बातम्या हाच ज्या काळात  सर्वांच्या माहितीचा आधार होता, तेव्हापासून वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात उतरलेल्या भिडे यांची मराठी बातम्यांवर अमीट छाप पडली होती. काळ कितीही बदलला तरी ती कायम राहील. 
१९९४-९५ पासून दूरदर्शनवर, सह्याद्री वाहिनीवर काम करताना मला त्यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले, मार्गदर्शन लाभले.
सदैव हसरा चेहरा, हस्तांदोलनासाठी पुढे असणारा हात आणि "काय रे कसा आहेस" हा आपुलकीचा आवाज म्हणजे भिडे साहेब. 
आज दूरदर्शनमधील त्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या आहेत... 
भिडेसाहेब... भावपूर्ण श्रद्धांजली !
#महेश_म्हात्रे 

...............

DD सह्याद्री वर चे माझ्या आवडते वृत्त निवेदक होते !
😢भावपूर्ण श्रद्धांजली ! 

जसं जसं वय वाढत जातंय तसं तसं नश्वर जगाची आठवण करून देते ! 

ॐ शांती !  🙏
........
ई अक्षरमन 
......

दूरदर्शनचा आवाज असलेले प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन. 
..
सूत्रसंचालन, मुलाखत आणि वृत्तनिवेदन यांच्या धीरगंभीर आणि सुस्पष्ट आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
..
दूरदर्शनरून ज्यांच्या ७ च्या बातम्या ऐकत लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या भारदस्त आवाजानं कायम भुरळ घातली. ज्यांनी वृत्तविवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात, मनामनात स्थान निर्माण केलं असे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे.
.
Tejas K