Friday, March 31, 2017

पिवळ्या कोरड्या नदीपात्रात

पिवळ्या कोरड्या नदीपात्रात
खड्डे खणून
पाणी काढाणारे लोक
जसे
सुरकुतल्या ओघळत्या
लोंबत्या स्तनातून
जीव खाउन
पाणी शोषणारे तान्हे पोर
आपली आई मरून गेलीये
हे पोराला कळत नाही
तसंच
त्या पाणी उकरणार्‍या
माणसांनाही
– अनिल अवचट

Thursday, March 30, 2017

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी
गीतकार :अनिल कांबळे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

Wednesday, March 29, 2017

बालपण

कुठे गेले ते बालपण ?

ते अंगणात धुडूधुडू धावणे |
देवघरासाठी फूले गोळा करणे |

शाळेत न जाण्यासाठी नको ती नाटके |
आणि गेल्यावर बाईँच्या छडीचा मार खाणे |

शाळेतल्या मित्रांबरोबर खेळायला जाणे |
लवकर आलो नाही म्हणून आईचे रागावणे |

बाबांचा खांद्यावरून फेरफटका मारणे |
रस्त्यावरील खेळण्यासाठी नुसता हट्ट धरणे |

रात्रीत रंग भरणाऱ्या त्या आजीचा गोष्टी ऐकणे |
गोष्टींतल्या शंका न राहून विचारणे |

सायंकाळी ताईबरोबर अभ्यासाला बसणे |
नाही केला म्हणून तीचे ते ओरडणे |

दमल्यावर आईच्या मांडीवरच झोपणे |
नाही येत म्हणून तीचे ते बोबडे गुणगुणने |

खरचं कुठे गेले ना ते बालपण ?
***

ओळखलत क सर माला

‘ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !
– कुसुमाग्रज

Tuesday, March 28, 2017

आई म्हणोनी कोणी,

आई म्हणोनी कोणी,
आईस हाक मारी
ती हाक येई कानी,
मज होय शोककारी

नोहेच हाक माते,
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?
आई घरी न दारी
चारा मुखी पिलांच्या
चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना
ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी
व्याकूळ जीव होई
येशील तू घराला
परतून केधवा गे?
रुसणार मी न आता
जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी,
आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
यशवंत दिनकर पेंढरकर

Monday, March 27, 2017

त्या व्याकुळ संध्यासमयी

त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो
तू आठवणींतुन माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी
पदराला बांधुन स्वप्‍ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई
तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा,
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा
_ ग्रेस

Sunday, March 26, 2017

Clapping therapy, टाळ्या वाजवणे आणि आरोग्य

देवाची आरती करतांना आपण सहजपणे टाळ्या वाजवतो. पण आता आपण त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून आरोग्य दृष्टीने महत्त्व समजून घेउया..
👏  👏  👏  👏
"क्लँपिंग थेरपी"
देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात.
मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात.
त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.
क्लॅपिंग थेरपी – :
खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.
सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो.
रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. देतात.
टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते :
1. Hand valley point
2. Base of thumb point
3. Wrist point
4. Inner gate point
5. Thumb nail point
या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात-
1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.
10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्‍यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

देवळा बाहेरचा माणूस ~ व पु

देवळाबाहेरचा माणूस

मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही.  निरपेक्ष  भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट.  आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात  जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी?

म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी जास्त हलका होतो. मागण्या नाहीत म्हणून नवस बोलल्याची खंत नाही. फेडायची धास्ती नाही. माझी देऊळ- भेट म्हणजे, न मागता जे जे मिळालं, त्याची ती ACKNOWLEDGEMENT सारखी पावती असते.  देवळाच्या समोर तो बसलेला असायचा. जेमतेम आठ बाय दहाच बैठं कौलारू घर. समोर एक कट्टा. म्हणजे वाढवलेला PLINTH. तिथं एक कापडी फळा. त्यावर कोणतं ना कोणतं संतवचन. संतवचनं फार परिचयाची झाली की रक्तात मुरत नाहीत. “हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी । । ” अशा वचनांकडे मी चित्र बघावं, तसं बघतो.

एक दिवस मात्र थबकलो.

“ हम खोज रहे है उसे, जो आसपास है!

यह जिंदगी अपने लिये घर की तलाश है! ”

ते वाचलं आणि फकिरासमोर जाऊन बसलो.

नमस्कार केला.

“ काय सेवा करू?” त्यानं विचारलं

“ या ओळींचा अर्थ हवाय. ”

“ तो अर्थ अनेकजण शोधताहेत. ”

“ अनेक? म्हणजे कोण कोण?”

“ एअरकण्डिशण्ड गाड्यांतून कैक भिकारी वर्षभर येतात. मला साधू समजतात. न मागता काही ना काही देतात. न मागताच भरपूर मिळतं. उरलेलं वाटून टाकतो. ”

“ भिकारी का म्हणता?”

“ तुमचं भिक्षापात्र मोठं आहे, रत्नजडित आहे, म्हणून तुम्ही सम्राट नव्हेत, सिकंदर पण भिकारी होता. जेवढी मोठी मागणी तेवढा मोठा भिकारी. घर हरवलेला भिकारी, सगळा जन्म घर शोधण्यात जातो. सिकंदराचाही. ”

“ माझ्या लक्षात आलं नाही. ”

“ खूप सोपं आहे, म्हणून समजलं नाही. सगळं जग जिंकलं म्हणजे काय? – दगड, माती, विटा. कारण घराचा अर्थ समजला नाही. माणसाला हवं असतं प्रेम, त्याऐवजी तो घर बांधतो. तीन तीन गाड्या घेतो. कमिशनरपासून मंत्र्यांना खिशात ठेवतो. ती चटावलेली माणसं करोडो रुपये खिशात घालतात, जमिनी तोडून देतात, पण त्या माणसाला आपलं मन देत नाहीत. सत्ता बदलली की नवे उंबरे. आजूबाजूला वावरणारी जिवंत मनं, खळाळणारे प्रेमाचे झरे त्यांना दिसत नाहीत. तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. भक्तीच्या अलीकडची प्रेमाची पायरी जिंका, पुढच्या पायरीवर परमात्मा आहे. ”

“ परमात्मा म्हणजे नेमकं कोण?”

“ परमात्मा हा माझ्याही प्रचीतीचा भाग नाही. पण शांत मन म्हणजे परमात्मा. शांत मन म्हणजेच देऊळ. ”

“ माणूस शांत आयुष्य का जगू शकत नाही?”

“ त्याला स्वतःचं आयुष्य नसतंच. ”

“ म्हणजे?”

“ जो भी मिला वो एक उस टुकडा ले गया ।

जुडता नहीं किसीसे भी, यह मन उदास है । ”

“ आता याचा अर्थ सांगतो. आपल्या आयुष्याचे सातत्यानं तुकडे होतात. आई, बाप, भावंडं, पुढे पती किंवा पत्नी, मुलं आणि शिवाय तुम्ही जोडाल तेवढी माणसं. अखंड मन शांत असतं. तुम्ही जोडलेली माणसं एकेक तुकडा घेऊन जातात. खंडित मन शांत कसं राहील सांग?”

“ नातेवाईक, समाज यांच्यात राहून मन शांत ठेवायचा उपाय आहे?”

“ प्रत्येक माणूस म्हणजे एकेक अपेक्षा. स्टेशनवरच्या हमालाशी नातं किती मिनिटांचं असतं? पण तेवढ्या मिनिटांतही तो मनस्ताप देतो. मग आयुष्याच्या शेवटी माणसं जोडूनही मन अशांत राहतं. ”

“ उपाय सांगता ना?”

“ दुसऱ्यानं कसं वागायचं, हे तुम्ही ठरवायला गेलात की तेवढा तुकडा गेला. आयुष्य खंडित, उदास झालं. तुम्ही देणारे व्हा. घेणारे झालात की प्रवाह खंडित झाला. न मागता, देणारे व्हा. मग आयुष्य वाढत राहतं. पात्र मोठं होता होता, किनारे नसलेला सागर होतो. समुद्राला कधी उदास पाह्यलंत? मागणारे देवळात येतात. न मागणारे स्वतःच्याच गाभाऱ्यात कृपा असतात. ”

जेवढ्या माणसांना संसारात विसंवादी साथीदार मिळाले, त्या सगळ्यांचं होमकुंड आठवून मी विचारलं,

“ माणूस खरंच कुणासाठी जीव टाकत नाही?”

प्रेम आणि भक्तीच्या वर नेणाऱ्या ओळी फकिरानं ऐकवल्या.

“ जितने भी उज्वल ख्याब थे, रात बन गये । ”

फिर भी न जाने, कौनसे सुबह की आस है । ”

“ किती उज्वल भविष्याची स्वप्न पाह्यलीस?”

“ अगणित. ”

“ त्यांचं काय झालं?”

“ पुन्हा रात्रीच्या अंधारात त्यांचं रूपांतर झालं. ”

“ तुमचं सुप्त मन, एक दैवीशक्ती, तू कोण होऊ शकशील, त्याची झलक दाखवतं. सूर्यप्रकाशात ती स्वप्न साकार करायची जिगर हवी. आणि ही जिगर देवळांच्या रांगेत मिळत नाही.”

“ तुम्ही देवळासमोर राहता. याच परिसरात. कधी देवळात जाता?”

“ एकदाही नाही, पण त्या कृष्णाच्या मूर्तीची मी खडान्‌खडा माहिती सांगू शकेन. ”

“ आपलं नाव?”

“ सम्राट शहेनशहा – म्हणशील ते. ”

“ खरं नाव?”

“ हीच खरी नावं. ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तो सम्राटच. ”

आणि त्यानंतर खरोखरच त्या सम्राटानं माझ्यासमोर शब्दातून शिल्प उभं केलं. मूर्तीची उंची, मुकुट, दागदागिने, भावमुद्रा, हातातली बासरी, त्यावरची बोटं त्यानं प्रत्यक्ष पोज घेऊन दाखवली.

“ इतकं अचूक सांगताहात, प्रत्यक्ष देवळात का नाही गेलात?”

“ मला मूर्तीकडे पाह्यलं की चैतन्यशून्य संगमरवरी दगड दिसतो. त्या मूर्तीपेक्षा, समोरचं तळं, कारंजी, मासे, बदक, फुलं, वाऱ्यानं  हलणारी झाडं आणि मघाशी मी ज्यांना एअरकण्डिशण्ड भिकारी म्हणालो ना तिथंच तो चैतन्यानं दिसतो. ”

“देवळात येणाऱ्यांना आपण भिकारी का म्हणता?”

“ त्याच्याजवळ देण्यासारखं प्रचंड आहे. यांच्या – मागण्या क्षुद्र आहेत, म्हणून न मागता किती मिळालंय, हे त्यांना दिसत नाही. ”

“ वर्णन कसं केलंत मूर्तीचं?”

“ मीच त्या मूर्तीचा शिल्पकार आहे. ”

मी उडालोच.

“तरी तुम्ही असे, इथे?”

“ मी ही मूर्ती घडवली. पण ती विकली जाईना. माझं सगळं चैतन्य मूर्तीत ओतून मी रिकामा झालो होतो. मग ती मूर्ती मी एके ठिकाणी पुरली. फकीर झालो. एका साखरसम्राटाला भेटलो. तुला साक्षात्कार होईल, म्हणून सांगितलं. त्यानंतर हे देवस्थान त्या साखरसम्राटानं बाधलं. तो दानशूर झाला.” ‘ साखरेच खाणार तोच देव घडवणार ‘ असं मी म्हणतो. मला त्या मूर्तीत दगडच दिसतो आणि इथं रांगा लावणाऱ्यांत चैतन्य दिसतं. आता शेवटचं सांगतो.

“ पूजा के वख्त देवता पत्थर बना रहा ।

वैसे तो जर्रेजर्रेमें उसका निवास है । ”

“ तुम्हाला साक्षात्काराचा खोटा आधार का घ्यावासा वाटला?”

“ उरलेल्या दगडात, म्हणजे मूर्ती साकार झाल्यावर, उरलेल्या तुकडे करून फेकलेल्या संगमरवरातही मला देवच दिसला. त्याचा हा चौथरा, साखरसम्राटानंच बांधून दिला. निर्मितीलाही साक्षात्काराचा शेंदूर फासल्याशिवाय, परंपरेचा, धर्माचा चिखल फासल्याविना, मूर्तीचं देवस्थान होत नाही. ”

आता मी अॅकनोलेजमेंट रिसीट फाडण्यासाठीही देवळात जात नाही. रिसीट कुणाला देऊ? – माझी मलाच?

मी आता जातो. सम्राटाला भेटतो. जिथं प्रेम दिसतं तिथं चैतन्य दिसतं. मन अपार करुणेनं वाहू लागलं, वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्याचं दर्शन घडलं, की माझ्याच शरीराचं देऊळ होतं.

कृष्णाची बासरी ऐकू येते.

 –  व.पु. काळे  (कालनिर्णय, फेब्रुवारी १९९६)

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी

जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे

तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी

गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

_ मंगेश पाडगांवकर
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी

जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे

तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी

गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

_ मंगेश पाडगांवकर

Saturday, March 25, 2017

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?


वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी

अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा?
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा?
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

Friday, March 24, 2017

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई


तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई

गीत: ग. दि. माडगूळकर

Thursday, March 23, 2017

Marathi Digital Library


'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांसाठी प्रथम प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा एक महत्वकांक्षी प्रकल्प मंडळाने हाती घेतला आहे. यानुसार सदर प्रकल्पांतर्गत मंडळाच्या पुस्तकाचे ई-बुक मध्ये रूपांतर करून त्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम चालू असून ते साधारणतः एक वर्षभर चालणार आहे, त्याबरोबरोबरच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-पुस्तकांमधील शुध्दलेखनाच्या चुकांच्या दुरूस्त्यांचे कामदेखील समांतररित्या चालू असणार आहे तरी कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.'


मराठी पुस्तके

मोफत पुस्तके

Marathi Digital Library

esahity

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर


अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥



अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥

अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥

ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥

अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥

अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥
__ बहीणाबाई चौधरी

Wednesday, March 22, 2017

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी
चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी
शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे
चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला
आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे
चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली
वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती
चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?
आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?
__बा.सी.मर्ढेकर

Tuesday, March 21, 2017

निदा

निदा
- आल्हाद काशीकर

निदा फाजली हा एक मोठा अध्याय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रत असे अध्याय असतात. तो कालखंड त्या माणसांचा असतो. त्यांच्या अवतीभोवती घटना, माणसं, कथा फिरत असतात, बनत असतात. नुकताच शरद जोशी नावाचा एक अध्याय संपला. तसेच निदा होते. अतिशय निर्भय माणूस. कुठल्याही गोष्टीबद्दल मत व्यक्त करताना त्याचे काय बरेवाईट परिणाम होतील, याचा विचार निदा करीत नसत. अगदी स्वत:च्या खासगी जीवनाबद्दलसुद्धा जगाला सारं काही सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली.                                      
माझं त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालं त्यावेळी त्यांना मी त्यांचा पत्ता विचारला. ते म्हणाले, ‘मधुबन बार के सामने मेरा घर है वर्सोवा में.’ मी मनात म्हटलं, शायरचा हाच योग्य पत्ता असू शकतो! मी अनेकदा त्यांच्या घरी जायचो. साधारणत: संध्याकाळी. अनेक विषयांवर ते बोलत.
निदा एक अंतर्दृष्टी होती. फार मोठी किंमत जीवनात चुकवलेला तो माणूस होता. आपल्या भूमिकेवर ते कायम ठाम राहत. त्याचमुळे फाळणीनंतर पाकिस्तानातही जाण्याचे  त्यांनी नाकारले.
पुढे त्यांच्या आईचे पाकिस्तानात निधन झाले. मात्र आईच्या आजारपणात व मृत्यूनंतरदेखील निदा व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानात जाऊ शकले नाहीत. निदांचा एक दोहा या प्रसंगावरच आहे.
मैं रोया परदेस में  भिगा माँ का प्यार,
दुख ने दुख से बात की  बिन चीठ्ठी बिन तार
निदांनी अशी बरीच दु:खं पचवली. मुंबईच्या फुटपाथवर आयुष्य काढण्यापासून ते अत्यंत प्रतिष्ठित व्यासपीठांवर आपले विचार व्यक्त करण्यार्पयतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. निदांचे चाहते जगभरात आहेत. अमेरिका, ब्रिटन, दुबई इत्यादि अनेक देशांमध्ये त्यांना मुशाय:यांसाठी बोलावले जायचे. भारतात अनेक मुशाय:यांमध्ये त्यांचा सहभाग होता. निदांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता, पद्मश्री मिळाली होती. मला नेहमी वाटायचे की निदांना ज्ञानपीठ मिळायला हवे. मात्र दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. कमालीच्या सोप्या भाषेत सगळं आकाश ते उलगडून दाखवित.
त्यांचे एक पुस्तक आहे. ‘तमाशा मेरे आगे’. मराठीत मी त्याचे भाषांतर केले आहे. विविध व्यक्तिरेखांवर व आठवणींवर आधारित असे सुंदर लेख निदांनी लिहिले. विविध शायर, त्यांचे भावविश्व व त्या त्या वेळेचा कालखंड, संस्कृती, मानवी चेहरे, स्वभाव इत्यादि सगळं त्यांनी या लेखांमध्ये लिहिलं. मानवी स्वभावाविषयीची त्यांची जाण अफाट होती. ते माणसांना वाचू शकत होते पुस्तकांसारखे.
निदांचे एक मित्र अंत्यविधीच्या वेळी मला म्हणाले की निदा कबीरपंथी होते. निदांचे काही दोहे जगजितसिंगांनी गायले आहेत. ‘इनसाइट’ या अल्बममध्ये ते दोहे आहेत. त्यामध्ये निदांचं एक दार्शनिक रूप दिसतं. तत्त्वज्ञ निदा त्यात जाणवतात.
दो और दो का जोड हमेशा
चार कहा होता है,
सोच समझ वालों को थोडी
नादानी दे मौला,
बच्चा बोला देखकर मस्जीद आलिशान
अल्ला तेरे एक को इतना बडा मकान.
त्यांच्या काही गजलासुद्धा अप्रतिम आहेत.
दुनिया जिसे कहते है  जादू का खिलौना है,
मिल जाये तो मिट्टी है  खो जाये तो सोना है.
त्यांची आणखी एक गजल.
अपनी मर्जी से कहॉँ  अपने सफर के हम है,
रुख हवाओंका जिधर का है  उधर के हम है.
निदांच्या लेखनात शब्द जिवंत होऊन यायचे. ‘होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है’, ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता’, ‘तु इस तरहा से मेरी जिंदगी मे शामील है’.  
जगजितसिंग आणि निदा फाजली यांची प्रदीर्घ काळ दोस्ती होती. निदांच्या अनेक गजला जगजितजींनी गायल्या. अनेक कार्यक्रम दोघांनी सोबत केले. अशा कार्यक्रमांमध्ये निदा स्वत:च्या गजलांचा अर्थ समजावून सांगत व जगजितजी त्या गजला गात. निदा फाजली व जगजितसिंग या दोघांनी मिळून अनेक अप्रतिम रचना निर्माण केल्या, त्या मैफली, तो काळ लाखो लोकांच्या भावविश्वाचा एक भाग बनलेला आहे.
निदांचं खरं मोठेपण त्यांच्या मानवतेशी असलेल्या बांधिलकीत होतं. जीवनभर त्यांनी ही बांधिलकी मानली. अगदी 1992 च्या मुंबई दंगलीत त्यांना त्यांच्या धर्मामुळे एका हिंदू मित्रच्या घरी आसरा घ्यावा लागला. त्यावेळीदेखील त्यांचे मत पूर्वग्रहदूषित झाले नाही. ते मानवतेची गाथा जीवनभर गातच राहिले. त्यांच्या एका दोह्यामध्ये त्यांनी लिहिले.
चाहे गीता बाचीये,  या पढीये कुराण,
तेरा मेरा प्यार ही,  हर पुस्तक का ज्ञान
त्यांच्या सुधारक व मानवतावादी विचारांमुळे कट्टरपंथी मुस्लिमांची प्रचंड नाराजी त्यांनी ओढवून घेतली. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील गरिबी, शोषण, बकालपणा बघून ते नेहमी विचारायचे की, जर हेच कायम राहणार होतं तर मग ही फाळणी का केली गेली? मानवता हाच निदांचा खरा धर्म होता, पूजा होती.
घर से मस्जीद है बहोत दूर,  चलो यु करलो,
किसी रोते हुए,  बच्चे को हसाया जाये.
त्यांच्या या ओळी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतात. ‘जिंदगी हिसाबों से जी नही जाती’ हे निदांच्या एका लेखाचं शीर्षक होतं. निदांचं जीवनदेखील असंच चाकोरीबाहेरचं व अफाट होतं. जगताना त्यांनी कधी हिशेब केले नाहीत आणि नियतीनेदेखील त्यांना सर्व काही भरभरून दिले.
निदांनी आयुष्य बघितलेलं होतं. त्यांच्या डोळ्यांत कारुण्याची छटा होती, दुस:याचं दु:ख समजून घेण्याची इच्छा होती. दुस:याच्या अडचणी, वेदनांना आपलं समजण्याची भूमिका होती. जगभरातल्या विचारवंतांची पुस्तकं निदा वाचायचे. जागतिक, सामाजिक व राजकीय अंत:प्रवाहांची त्यांना सखोल जाण होती. निदांनी अनेक विषयांवर असंख्य पुस्तकं लिहिली. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घटनांवर ते अभ्यासपूर्ण बोलायचे व वेगळाच दृष्टिकोन आपल्या लक्षात आणून द्यायचे.
एकदा ते म्हणाले, कुठल्याही देशाची फाळणी केवळ धर्म वेगळे असल्यामुळे होत नाही. तसे असते तर पाकिस्तान व बांगलादेश वेगळे झाले नसते. धर्म सारखा असूनदेखील संस्कृती वेगळी असणं हेदेखील या देशांच्या फाळणीसाठीचं महत्त्वाचं कारण होतं. एखाद्या समाज शास्त्रज्ञासारखे ते बोलत असत.
पण हे सगळं होतं तरीही मला निदा फाजलींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक एकाकीपण नेहमी दिसलं. गर्दीत असूनही एकटे विचारात हरवलेले. अगदी बोलतानादेखील ते विचार करीत, चिंतन करीत बोलत आहेत, असं जाणवायचं. अतिसंवेदनशील माणसांचं असं होतं. ज्यांनी जीवनात अफाट दु:ख बघितलेलं असतं त्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं, ज्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं तेवढी त्यांची जगाचं दु:ख समजून घेण्याची क्षमता विस्तारत जाते.
निदांचं हृदय असं ज्ञानेश्वरांसारखं, तुकारामांसारखं होतं. निदा या शब्दाचा अर्थ ‘हाक’ असा होतो. निदा एक आकाश होते. निदा एक फकीर होते, निदा मानवतेचे वारकरी होते. निदांचं जीवन, निदांचं साहित्य, निदांच्या आठवणी आम्हाला हाच संदेश देतात की वातावरण कितीही गढूळ झालं तरी तुमचं अंत:करण गढूळ होऊ देऊ नका. मानवतेवरची श्रद्धा कायम ठेवा.
निदांसारखा शायर पुन्हा होणार नाही. निदांच्या अंत्यविधीला मी गेलो, त्यावेळी तिथे अभिनेते रजा मुराद भेटले. मी त्यांना म्हटलं, आज आपण एका महान शायराला अखेरचा निरोप द्यायला आलेलो असताना मला तुमच्यावरच चित्रित झालेलं ते गाणं तीव्रपणो आठवतंय.
मैं शायर बदनाम, मैं चला. मैं चला..

निदांचे जीवन हाच एक कादंबरीचा, चित्रपटाचा विषय आहे. फाळणी झाली तेव्हा त्यांचे सगळे कुटुंब पाकिस्तानात गेले तरीही निदा हट्टाने भारतातच राहिले. त्यावेळी ते म्हणाले, ‘एका कागदाच्या नकाशावर तुम्ही रेषा ओढाल आणि म्हणाल, की देशाची फाळणी झाली! मला हे मान्य नाही. फाळणी झाली हे मी कधीही मान्य करणार नाही.’ फार मोठी किंमत त्यांनी त्यांच्या या मतासाठी दिली. खरं तर निदा ज्यावेळी मुंबईत फुटपाथवर राहत होते, त्यावेळी त्यांचे भाऊ व सगळे कुटुंब पाकिस्तानात आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले होते. काही वर्षानी कुटुंबीयांनी पुन्हा निदांची समजूत काढली, मात्र निदा पाकिस्तानात गेले नाहीत.