Saturday, February 29, 2020

Friday, February 28, 2020

मराठी अभिमान गीत

मराठी अभिमानगीत : एक आनंदयात्रा
 
२८ फेब्रुवारी, २०१०! सकाळी ७ वाजता बिग एफ् एम् या रेडिओ वाहिनीवर कविवर्य सुरेश भटांचे शब्द निनादले.  ‘मराठी अभिमानगीत’ वाजलं आणि खाजगी रेडिओ वाहिन्यांवर मराठी गाणी वाजायला सुरूवात झाली. आनंदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. ज्या प्रश्नापासून हा प्रवास सुरू झाला होता, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचून एक वर्तुळ पूर्ण झालं.
 
मराठी अभिमानगीताचं लोकार्पण झालं २७ फेब्रुवारी, २०१० - त्या सोहळ्याला काल दहा वर्षं पूर्ण झाली. सव्वा वर्षं लागलं या गाण्याच्या निर्मितीला. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर उभारलेला भव्य मंच! आठ हजारांचा जनसमुदाय! दिग्गजांच्या हस्ते मराठी अभिमानगीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन होत होतं. डोळ्यांमधून आनंद ओसंडून वाहत होता. कौशलची सव्वा वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत होती आणि ते पाहताना मंदार आणि मी आनंदाने नि:शब्द झालो होतो. जे कुणाच्या कल्पनेतही नव्हतं, ऐकतांनाही जे अशक्यप्राय वाटत होतं, ते कौशलने पूर्ण करून दाखवलं, साकार करून दाखवलं. त्याची सगळी जिद्द, कल्पकता, आत्मविश्वास - सगळं मूर्त रूपाने हजारो लोकांना पाहायला - ऐकायला मिळालं.  

या गाण्याच्या आणि प्रकल्पाच्या निर्मितीच्या पहिल्या क्षणापासून कौशलने मला यात सामावून घेतलं. त्यामुळे माझ्यासाठी तर हा सगळा प्रवास अधिक जिव्हाळ्याचा होता आणि आजही आहे. मी, मंदार, महेशदादा, उन्मेषच नव्हे;  तर अनेकजण यात आपणहून सहभागी झाले.  हा प्रकल्प ‘माझा’ आहे, ही ‘माझी’ जबाबदारी आहे, या भावनेने प्रत्येकजण आला. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात  हा आपलेपणा निर्माण करायचं श्रेय अर्थातच कौशलला जातं. सव्वा वर्षं इतर कोणतंही व्यावसायिक काम न करता, कौशलने या एका गाण्यासाठी तन-मन-धन झोकून दिलं. हे  खरोखरंच सोपं नव्हतं. अतिशय धाडसी निर्णय होता तो. मंदार सावलीसारखा कौशलच्या पाठीशी उभा होता. महेश वर्देंसारखा अत्यंत शिस्तबद्ध मार्गदर्शक सोबत होता, तसेच  प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या प्रवासात अनेकजण सहभागी झाले.
 
तीन शहरांतल्या वेगवेगळ्या नऊ ध्वनिमुद्रणालयांत ‘मराठी अभिमानगीत’ आणि इतर दोन गाणी, वाद्यसंगीत आवृत्ती आणि समूहगान आवृत्ती ध्वनिमुद्रित झाली.  बारा ध्वनिमुद्रक, पासष्ट वादक, एकशे बारा प्रस्थापित गायक, तीनशे छप्पन समूहगायक आणि चौदाशे लोकांच्या सकारात्मक सहभागातून साकारलं ‘मराठी अभिमानगीत’! एखाद्या गाण्याची जन्मकथा, त्याची निर्मिती, त्याचा प्रवास कुतुहलाचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, चर्चेचा, अभिमानाचा विषय ठरू शकतो आणि लोक अत्यंत प्रेमाने त्यासाठी एकत्र येतात असा अनुभव देणारं हे गाणं आहे ‘मराठी अभिमानगीत’! कविवर्य सुरेश भटांच्या ‘मायबोली’ कवितेचं ‘मराठी अभिमानगीत’ का झालं? कसं झालं? या गाण्याने नेमकं केलं तरी काय? -  गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या निमित्ताने हे सांगितलं गेलं. मराठी अभिमानगीत झाल्यानंतर ‘हा सगळा प्रवास लिहून काढ’, असा अतिशय मोलाचा सल्ला कौशलने दिला होता. प्रत्यक्ष त्या कामात सहभागी असणे वेगळं आणि तटस्थपणे ते सगळं मांडणं, हे ही खूप जबाबदारीचं आहे, असं वाटत राहिलं. दडपणंही आलं आणि अशा अनेक कारणांनी ते लिहिणं मागे पडलं. 

आज मराठी अभिमानगीताच्या शतपट मोठा भव्य प्रकल्प आम्ही हातात घेतला आहे. या नव्या प्रकल्पाची सुरूवात होत असताना मराठी अभिमानगीताच्या आठवणींचा प्रवास नव्याने बळ देईल, प्रेरणा देईल, आत्मविश्वास देईल, असं वाटलं. म्हणून हा लेखनप्रपंच.  कौशल म्हणतो - ‘उत्तम करण्याचा नुसता विचार करत बसण्याच्या नादात प्रत्यक्ष  करणं राहून जातं, त्यापेक्षा सुरूवात करावी, वाट सापडत जाते.’  या नव्या वाटेवरून मराठी अभिमानगीताच्या आनंदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचं स्वागत!

शब्दांकन - अस्मिता पांडे.
छायाचित्र सौजन्य - संजय पटवर्धन

https://www.facebook.com/marathiabhimaangeet/

Thursday, February 27, 2020

मराठी भाषा दिन ४

मराठी भाषा दिन 
व्याकरण ?
भाषा संवाद ?
शुद्धलेखन?
अभिमान ?
मराठी संस्कृती??
मराठी व्यवहारात वापर? 

आज काल मराठी चित्रपटांची नाव इंग्रजी मध्ये असतात !
आज काल मराठी वाहिनी वरील कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी शब्द आणि हिंदी गाणी असतात! 

प्रमाण भाषेचं अस्तित्व तिचा वापर किती करतो यावर अवलंबून असतं!

मराठीत बोली भाषा ही आहेत ज्यांच व्याकरण ही लिहिलं नसेल पण त्याचं अस्तित्व टिकून राहिलं आहे आणि राहणार ते आवडी मुळे उदाहरण मालवणी कोकणातली बोली भाषा !

भाषा संवाद, कलाकृती ,नाटक ,चित्रपट ,साहित्य  आणि संस्कृती च दर्शन करते  आणि तेव्हाच तिचा प्रसार होतो !

🚩🚩 मराठी भाषा चिरायू होवो ! 🙏🚩🚩

 विद्या मनस्वी
२७ फेब्रुवारी २०२०

मराठी भाषा दिन ३

*मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार..*

आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी हा संवाद होतोय. माऊली ज्ञानेश्वरांपासूनची साहित्य परंपरा असलेल्या आपल्या मायमराठीच्या आपण कायमच ऋणात आहोत. तिचं उतराई होण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत राहुया. तुमच्यासोबतचा हा संवाद तुमच्या माध्यमातून अनेकांसोबत होणारा संवाद आहे. आजचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, पाहताय.. ह्या पोर्टलवर तुम्ही आहात. ह्याचाच अर्थ तुम्हाला आपल्या भाषेविषयी, आजच्या दिवसाविषयी प्रेम आणि आदराची भावना आहे. म्हणूनच तुमच्याशी हा संवाद, जो तुम्हीही, इतरांसोबत करायचा आहे.

२७ फेब्रुवारी हा खरंच मराठी राजभाषा दिवस आहे की, केवळ एक सरकारी सोपस्कार?.. हो, सोपस्कारच.. कारण ज्या पद्धतीने प्रतिवर्षी तो राबवला जातो. त्याला अभियान वगैरे तर अजिबातच म्हणवत नाही. मग त्यातला मराठी 'अभिमान' वगैरे फार दूरची गोष्ट. १ जुलैला दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात नवीन रोप लावण्याच्या प्रघाताप्रमाणेच २७ फेब्रुवारी ह्या राजभाषा दिवसाची अवस्था झालेली आहे.

माझा शिक्षकांवर रोष नाहीय. पण, कित्येक शिक्षकांनाच हा दिवस का, कुणामुळे आणि कशासाठी साजरा केला जातो, हेच माहीत नसते. पुढे मग कुसुमाग्रज कोण, त्यांचं नाव काय, त्यांचं साहित्य, एकूण योगदान ह्याबद्दल तर बोलायचंच नाही. मागच्याच वर्षी मी व्याख्यानाला गेलो होतो एका महाविद्यालयात. तिथे कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर यांची जयंती एकाच दिवशी असण्याचा आविष्कार तेथील प्राध्यापिकेने केला होता. प्राध्यापिका विज्ञानाची असली तरी असा शोध लावावा, हे नक्कीच अभिप्रेत नव्हते. माझ्या सवयीनुसार मी त्यांना थांबवले. चूक सांगितली. ती सांगताना वातावरण गंभीर न होऊ देता, ते हलकंफुलकं होईल, ह्याची काळजी घेतली. तरीही ते त्यांच्याच विद्यार्थ्यांसमोर त्यांना कमीपणा वगैरे आला. पण, माझे भाषाविषयक सूत्र काही मी सोडले नाही.

शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ सरकारी आदेशाचं पालन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. साजरा होण्यापेक्षा तो दिवस पाळला जातो, म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही. किंबहुना तेच अधिक सयुक्तिक ठरेल. इतपत वाईट अवस्था आहे. ह्याला काही मोजके अपवाद असू शकतील. पण, त्या अपवादांची संख्या फारशी समाधानकारक नक्कीच नाही. कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्याने ह्या निमित्ताने अनेकदा शाळा महाविद्यालयांना भेट देण्याचा संबंध येतो. दहा कॉलेजांमागे एखाद ठिकाणी अरविंद दोडे, प्रा. दीपक पवार, प्रा. नितीन आरेकरांसारखा मराठी भाषेविषयी आस्था असणारा कुणी अभ्यासू प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवून भाषेचा लळा लावणार्‍या प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. वृषाली विनायक क्वचितच गवसतात. प्रा. दीपक पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे. त्यांची भाषेविषयीची रुची अभिमानास्पद आहे. अर्थात ही नावे प्रातिनिधिक असून ती केवळ उदाहरण म्हणून दिली आहेत.. प्रमाण सांगण्यासाठीच त्यांचे प्रयोजन आहे. महाराष्ट्रात अनेक सजग शिक्षक माझ्याही परिचयाचे आहेत. इथे सर्वांचीच नावे लिहिण्याला मर्यादा आहेत. मूळ मुद्दा हाच की, भाषेविषयी आस्था असणार्‍या शिक्षकांचे प्रमाणही यथातथाच आहे.

बरं, जे शिक्षक खरंच उत्सुक असतात, सक्षम असतात, त्यांना अनेकदा सरकारी उपक्रमांना (जनगणना, निवडणुका वगैरे) जुंपले जाते. त्याव्यतिरिक्त कार्यालयीन अथवा वैयक्तिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या बाबींकडेही गांभीर्याने पहायला हवे आहे. असे अपवाद बाजूला सारले तरी एरव्ही मात्र शाळामहाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाविषयीचा उत्साह आणि भाषेविषयीची उदासीनता असंच चित्र सर्रासपणे पहायला मिळतं. शिक्षकांमधली ही उदासीनता हीच आपल्या भाषेपुढील मुख्य अडचण आहे. उदाहरणासाठी पुन्हा पु.ल. आठवतीलच. पण, त्यांनी रेखाटलेले चितळे मास्तर मराठी भाषेला हवेच आहेत. स्वतःमध्ये भाषेविषयीची वत्सलता जपणारी शिक्षिका, भाषेकडे जबाबदारीने पाहणारा शिक्षकच पुढच्या पिढीकडे मराठीची पालखी नेऊ शकेल. असे शिक्षक, शिक्षिका महाराष्ट्रात आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकरवी भाषाविषयक उपक्रमांचे, कार्यशाळांचे आयोजन करवले पाहिजे.

वृक्षारोपण, भाषादिवस यांचे महत्त्व सणांपुरते मर्यादित रहायला नकोय. मी तुलना करणार नाहीय. पण, व्हेलेंटाईन ह्या एका दिवसासाठी सात दिवस आधीपासून वेध सुरू होऊन सात दिवस नंतरपर्यंत ते नेले जाऊन व्हेलेंटाईन पंधरवडा साजरा केला जाऊ शकतो. तर भाषा दिवसाचा पंधरवडा का होऊ शकत नाही? तरुणाईमध्ये ह्याविषयीची जागरुकता निर्माण करणे, ही खरी गरज आहे. भाषा टिकवण्यासाठी काय करावे, ह्या उपाययोजनांमध्ये तसे कुणाला फारसे स्वारस्य नसते. मात्र आहे ती भाषा, बोली लिहिण्याची तरी किमान काळजी आपण घेतो आहोत का?

आता आपण किमान काय करायला हवं, ह्या विषयी एक मुद्दा. २०२० सालात आज आपण आहोत. प्रगत तंत्रज्ञान, नवनवे शोध असं सगळं वातावरण आपल्या अवतीभवती आहे. वीसएक वर्षांपूर्वी मराठी लिहिण्यासाठी हस्तलिखिता व्यतिरिक्त टाईपरायटर, कॉम्प्युटर यावर मराठी लेखनासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असे. आता मात्र आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईलमध्ये आपल्याला मराठी लेखन सहज उपलब्ध आहे. समाजमाध्यमे आज प्रत्येक भाषेची झाली आहेत, तशी ती मराठी देखील झाली आहेत. भाषेसाठीची लेखन साधने सुलभ सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. पण, ह्या सोपेपणात आपण भाषा जपण्यात यशस्वी होतो आहोत का?

ह्या प्रश्नाचं उत्तर खरंतर १००% होय, असंच यायला हवं. पण, ते तसं होत नाही. आपली भाषा, मातृभाषा म्हणून आपण तिला अगदी गृहीत धरतो. इतर कोणतीही भाषा लिहीत किंवा बोलत असताना त्या भाषेतील शब्दांची आपण किती काळजी घेत असतो? खरंतर ती काळजी आपल्याला कुणी चुकीचं म्हणू नये, ह्यासाठीची असते. पण, तीच काळजी आपण आपल्या मातृभाषेची घेत नाही. इतर कोणत्याही भाषेपेक्षा वेलांटी, उकार, काना, मात्रा यांचं सौंदर्य मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या भाषांना लाभलेलं आहे. केसांचा भांग कधी बिघडू नये, ह्याची काळजी घेणारे आपण, भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत खरंच दक्ष असतो का? आपण आपल्या दिसण्याची जितकी काळजी घेतो, तशीच आपल्या भाषेचीही काळजी घेतलीच पाहिजे. मग ती काळजी लिहिण्यातली असो की बोलण्यातली.. आपण दक्ष असलंच पाहिजे.

हिंदीपेक्षा तुलनेने आपल्या मराठी भाषेचे व्याकरण अधिक बारकावे असणारे आहे. एवढ्या कमी वेळात, कामी शब्दात फार उदाहरणे देता येणार नाहीत, तरीही हे एक उदाहरण.. 'पाणी' हा शब्द आपल्या नित्याच्या वापरातला आहे. आता त्यातही 'पानी' की 'पाणी' ह्यावरून होणारे उच्चारवाद बाजूला ठेवूया. कोणत्याही शुद्धतेला होणारा विरोध ही खरेतर शुद्धतेपासून काढलेली पळवाटच असते. केवळ शुद्धतेलाच नव्हे तर तो अभ्यासालाही केलेला विरोध असतो. हे माझे अगदी ठाम मत आहे. असो.. पण, ह्या 'पाणी' मधील 'णी' ची वेलांटी 'दीर्घ' म्हणजे दुसरी आहे. ती जर र्हस्व म्हणजेच पहिली दिली, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'पाणी' ऐवजी 'पाणि', असं लिहिलं तर त्या शब्दाचा अर्थ 'हात' असा होतो. आता लक्षात घ्या अशा किती शब्दांचे उकार, वेलांटी आपण चुकवत असतो. जे थोड्याशा प्रयत्नाने सुधारता येऊ शकतात.

ह्या लेखात अनेक मुद्दे राहून गेले आहेत, ह्याची मला नम्र जाणीव आहे. लेख संपवतानाही एक मुद्दा स्मरतो आहे. 'सुलेखनाचा' ह्या बाबतीत, अच्युत पालव, निलेश गायधनी, नंदू गवांदे, संजय शिंदे ह्या आणि अशा अनेक सुलेखनकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे. तितकेच जबाबदारीचे स्थान प्रकाशकांचे आहे. त्यांनीही साहित्य प्रकाशित करताना मर्यादा, दर्जा यांचा विचार करायला हवा आहे. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रानिक मिडिया यांना तर मराठी भाषेची कोणतीही काळजी नसल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

भाषा सहज उपलब्ध आहे, पण तिच्यातली सुलभता आपण शोधून तिचं सौंदर्य जपलं पाहिजे. इंग्रजीतलं मराठी लिहिणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. केवळ एका क्लिकवर इंग्रजीसारखं टाईप करून मराठी अक्षरे उमटण्याची सुविधा उपलब्ध असताना आपल्याच तंत्रआलस्याने आपण एकप्रकारे भाषेची गळचेपीच तर करत असतो. विशेषतः लिहित्या हातांनी, म्हणजेच लेखक, कवींनी ह्या बाबत जागरूक राहून अत्यंत जबाबदारीने आपलं लेखन केलं पाहिजे. शुद्धलेखनापासून तर फारकत घेऊच नये. कळत नाही, वेळ नाही अशी क्षुल्लक कारणे देताना आपण स्वतःला मराठीचे लेखक म्हणवून घेत आहोत, ही बाब ध्यानात असू द्यावी.

राजभाषा दिनाच्या निमित्ताने किमान एवढी काळजी घेण्याचा संकल्प केला, तरी माय मराठीच्या आपल्यावरील ऋणांचे आपण थोडे तरी उतराई होऊ शकू..

*- जनार्दन केशव*

तळटीप : *कृपया प्रतिक्रिया देताना इंग्रजीतली मराठी लिहू नका.. आणि किमान आज तरी इमोजी, जीआयएफ, फोटो यांचा वापर करू नका किंवा वापर केलात तरी सोबतीने मराठीतूनच प्रतिक्रिया लिहा, ही विनंती.

मराठी भाषा दिन २

रोज सकाळ-संध्याकाळ Good Morning आणि Good Evening चे संदेश पाठविणारे, प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द मिरवणारे जेव्हा २७ फेब्रुवारीला "गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा" किंवा "एवढ्या जगात माय मानतो मराठी" असे संदेश पाठवतात तेव्हा अगदी मनापासून मायबोलीत शिव्या हासडण्याचे मन करते. 
पण ठीके... निदान आजच्या दिवशी तरी हे तथाकथित ( so called ) मराठीजन "माज" दाखवतात हे हि नसे थोडके... 
आपल्या देशात इंग्रजी म्हणजे आई आणि मातृभाषा म्हणजे सावत्र आई असा समज रूढ आहे... 
उगीच प्रत्येक वाक्यात wow, cool, great असे शब्द वापरून किंवा जड जड इंग्रजी शब्द वापरून आम्ही किती सुशिक्षित किंवा किती पुढारलो आहोत हे दाखविण्याचा मूर्खपणा जगाला दाखवू नका...   
इंग्रजी हि एक भाषा आहे अन तिला त्याइतकेच महत्व द्या. अगदीच गरज असेल तिथेच तिचा "वापर" करा... 

असो... असंही पु.ल. म्हणून गेलेत... "आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल."

राजभाषा - ज्ञानभाषा मराठीदिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ..
कुसुमाग्रज यांना मानाचा मुजरा...!!!
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यस्मरण ...!!!

-: मनु :- 
२७ फेब्रुवारी २०२०

मराठी भाषा दिन १

" मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती 

"मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन याच्या दिवशी , मी सर्व मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती करीत आहे .

मराठी भाषिकांना  हे बहुतेक सांगावे लागू नये कि " मराठी " हि तुमची / मराठी भाषिकांची मातृभाषा आहे . 

" मराठी संभाषणात ( अव्यावसायिक ) , लिखाणात इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर करणे टाळावे . शक्यतो शुद्ध मराठीत संभाषण करावं . मराठीवर इंग्रजीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण रोखणे अत्यंत निकडीचे आहे .

मराठी भाषा स्वतःचे अस्तित्व गमावत चालली आहे . मराठी भाषेत शब्द , वाक्ये , म्हणी , वाक् प्रचार यांची अजिबात वानवा नाही .इतर व्यक्ती साजरा करतात म्हणून " मराठी भाषा दिवस , जागतिक मराठी भाषा दिन " इंग्रजीत शुभेच्छा देऊन साजरा करू नकात .

उठा , तुम्ही मराठी भाषिक आहात . मराठीत बोला , मराठीत लिहा , मराठीला " मराठी भाषा " म्हणून मानाने जगू द्या .जर तुम्हाला मराठी शब्द माहित नसतील तर मला संपर्क करा , माझ्याकडे अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द तयार आहेत .

हे मी फक्त लोका सांगे ब्रम्ह ज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण .... या म्हणीप्रमाणे वागत नाही . मी स्वतः गेली अंदाजे ५ वर्षे , अव्यावसायिक मराठी संभाषणादरम्यान इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी म्हणी , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर कटाक्षाने टाळतो .

सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८ , satyajitshah64@gmail.com

http://fightofacommonman.blogspot.in/

Wednesday, February 26, 2020

स्वा सावरकर पुण्यतिथी

तात्या गेले !

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की, 
                               
 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
 लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने|
 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे
 बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे||

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, " देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !" वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की ,”१० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल.! “ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते. 

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ' मोरिया ' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच 'भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ‘आझाद हिंद’ चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे 'पाया’ आणि सुभाषचंद्र हे 'कळस' आहेत! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें ,पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले. 

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत “हे कृष्ण, हे श्याम” असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा "आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा!" असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम । 
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम 

✍🏻आचार्य अत्रे.
 'दैनिक मराठा'
दिनांक २७ मार्च १९६६
 


#स्वातंत्र्यवीर_सावरकर #आत्मार्पण_दिन

कविता

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून घेणारे , अपरंपार हालअपेष्टा सोसणारे त्यागमूर्ती , क्रांतिकारकांचे मुकुटमणी , थोर साहित्यिक , महाकवी , नाटककार , समाजसुधारक , विज्ञानवादी विचारवंत आणि मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणादायक स्मृतींना विनम्र अभिवादन !! जगातील क्रांतीकारकांमध्ये माझ्या भारतमातेचा हा सुपुत्र , महामानव त्याच्या हिमालया एवढ्या उत्तुंग त्यागाने उठून दिसतो . आजही कोट्यावधी युवकांना प्रेरणा देतो .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक लखलखते सोनेरी पान , एक धगधगते अग्निकुंड , कोट्यावधी युवकांना क्रांतिकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देणारे
अदभूत व्यक्तिमत्व क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २६ फेब्रुवारी हि पुण्यतिथी !!! त्यानिमित्त हि रचना !!!

******" स्वातंत्र्यवीर " ******
*****************************
अष्टभुजा देवीला स्मरूनी , शपथ घेतली मोठी
चला तोडू या सर्व शृंखला , समर्थ भाषा ओठी

अभिनव भारत हेच मानले , तुम्ही सदा गणगोत
कोट्यावधी युवकांच्या मनीचे , तुम्ही प्रेरणास्त्रोत

भोगूनी तुम्ही मरण यातना , दिला अमर जो लढा
मुजोर इंग्रज हबकून गेला , असाच भक्कम धडा

काळकोठडी अंदमानची , केलीत तुम्ही पवित्र
दगडाच्या भिंतीत ,कोरले स्वतंत्रतेचे चित्र

समुद्रासही धडकी भरली , पाहून तुमची छाती
तुमच्या स्पर्शे पुलकित झाली , भारतभूची माती

हसत भोगले देशासाठी , तुम्हीच काळे पाणी
तरुणांनाही स्फूर्ती ठरली , तुमची अमोघ वाणी

रत्नागिरीच्या राम मंदिरी , केलीत प्रेमळ क्रांती
पतित पावन करून दिधली , लक्ष मनांना शांती

बंदूक येथे हतबल झाली , पाहुनी तव लेखणी
जीवनयात्रा यज्ञकुंड अन , पारदर्शी देखणी

विचार बैठक भक्कम तुमची , उपमा नाही धीरा
पुन्हा पुन्हा मी झुकतो चरणी , स्वातंत्र्याच्या वीरा !!
*****************************************
मुरारी देशपांडे
*****************************************

#Fb share

Sunday, February 23, 2020

चाणक्य

एक समय की बात है। चाणक्य अपमान भुला नहीं पा रहे थे। शिखा की खुली गांठ हर पल एहसास कराती कि धनानंद के राज्य को शीघ्राति शीघ्र नष्ट करना है। चंद्रगुप्त के रूप में एक ऐसा होनहार शिष्य उन्हें मिला था जिसको उन्होंने बचपन से ही मनोयोग पूर्वक तैयार किया था।

अगर चाणक्य प्रकांड विद्वान थे तो चंद्रगुप्त भी असाधारण और अद्भुत शिष्य था। चाणक्य बदले की आग से इतना भर चुके थे कि उनका विवेक भी कई बार ठीक से काम नहीं करता था।

चंद्रगुप्त ने लगभग पांच हजार घोड़ों की छोटी-सी सेना बना ली थी। सेना लेकर उन्होंने एक दिन भोर के समय ही मगध की राजधानी पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया। चाणक्य, धनानंद की सेना और किलेबंदी का ठीक आकलन नहीं कर पाए और दोपहर से पहले ही धनानंद की सेना ने चंद्रगुप्त और उसके सहयोगियों को बुरी तरह मारा और खदेड़ दिया।

चंद्रगुप्त बड़ी मुश्किल से जान बचाने में सफल हुए। चाणक्य भी एक घर में आकर छुप गए। वह रसोई के साथ ही कुछ मन अनाज रखने के लिए बने मिट्टी के निर्माण के पीछे छुपकर खड़े थे। पास ही चौके में एक दादी अपने पोते को खाना खिला रही थी।

दादी ने उस रोज खिचड़ी बनाई थी। खिचड़ी गरमा-गरम थी। दादी ने खिचड़ी के बीच में छेद करके गरमा-गरम घी भी डाल दिया था और घड़े से पानी भरने गई थी। थोड़ी ही देर के बाद बच्चा जोर से चिल्ला रहा था और कह रहा था- जल गया, जल गया।

दादी ने आकर देखा तो पाया कि बच्चे ने गरमा-गरम खिचड़ी के बीच में अंगुलियां डाल दी थीं।

दादी बोली- 'तू चाणक्य की तरह मूर्ख है, अरे गरम खिचड़ी का स्वाद लेना हो तो उसे पहले कोनों से खाया जाता है और तूने मूर्खों की तरह बीच में ही हाथ डाल दिया और अब रो रहा है...।'

चाणक्य बाहर निकल आए और बुढ़िया के पांव छूए और बोले- आप सही कहती हैं कि मैं मूर्ख ही था तभी राज्य की राजधानी पर आक्रमण कर दिया और आज हम सबको जान के लाले पड़े हुए हैं।

चाणक्य ने उसके बाद मगध को चारों तरफ से धीरे-धीरे कमजोर करना शुरू किया और एक दिन चंद्रगुप्त मौर्य को मगध का शासक बनाने में सफल हुए।

मराठी शब्दकोश १

व्वा रे मराठी--
*लुसलुशीत*- पोळी/ पुरणपोळी 
*खुसखुशीत*- करंजी
*भुसभुशीत*- जमीन
*घसघशीत*- भरपूर
*रसरशीत*- रसाने भरलेले
*ठसठशीत*- मोठे
*कुरकुरीत*- चकली, कांदा भजी
*चुरचुरीत*- अळूवडी
*झणझणीत*- पिठले, वांग्याची भाजी
*सणसणीत*- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
*ढणढणीत*- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
*ठणठणीत*- तब्येत
*दणदणीत*- भरपूर 
*चुणचुणीत*- हुशार
*टुणटुणीत*- तब्येत
*चमचमीत*- पोहे, मिसळ
*दमदमीत*- भरपूर नाश्ता
*खमखमीत*- मसालेदार
*झगझगीत*- प्रखर
*झगमगीत*- दिवे
*खणखणीत*- चोख
*रखरखीत*- ऊन
*चटमटीत/ चटपटीत*- खारे शंकरपाळे, भेळ
*खुटखुटीत*- भाकरी/ दशमी
*चरचरीत*- अळूची खाजरी पाने
*गरगरीत*- गोल लाडू
*चकचकीत*- चमकणारी गोष्ट
*गुटगुटीत*- सुदृढ बालक
*सुटसुटीत*- मोकळे
*तुकतुकीत*- कांती
*बटबटीत*- मोठे डिझाइन
*पचपचीत*- पाणीदार
*खरखरीत*- रफ
*खरमरीत*- पत्र
*तरतरीत*- फ़्रेश
*सरसरीत/सरबरीत*- भज्यांचे पीठ
*करकरीत*- सफरचंद, पेरूच्या फोडी
*झिरझिरीत*- पारदर्शक
*फडफडीत*- मोकळा भात
*शिडशिडीत*- बारीक
*मिळमिळीत*- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
*गिळगिळीत*- मऊ लापशी
*बुळबुळीत*- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
*झुळझुळीत*- साडी
*कुळकुळीत*- काळा रंग
*तुळतुळीत*- टक्कल
*जळजळीत*- टिळकांचे अग्रलेख
*टळटळीत*- दुपारचे रणरणते ऊन
*ढळढळीत*- सत्य
*डळमळीत*- पक्के नसलेले
*गुळगुळीत*- स्मूथ
*गुळमुळीत*- स्पष्ट न बोलणे

Fb post@ Leena Mehendale

https://www.facebook.com/leena.mehendale

पत्र

प्रिय अबक ,
मला तुझे नाव माहित नाही . तुझे लिंग माहित नाही . तुझे वय माहित नाही . तुझे मासिक उत्पन्न माहित नाही . तुझे लाईफ स्टाईल माहित नाही . पण मला तू माहित आहेस ! मला तुझ्यातली नकारात्मकता माहित आहे . तुझी बदललेली मानसिकता माहित आहे . मला झाकलेला तू माहित आहेस . तुला मी माहित असायलाच हवा असे नाही . मी खुर्चीवर बसतो तेव्हा वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे असतो . खुर्चीवर नसताना अंकुर असतो . खरं सांगतो . . दोन्ही भूमिकांत मी आनंदी असतो . तसा तू मला दिसत नाहीस . सेल्फी मधे आनंद शोधणारी तू मला दमलेली दिसतेस . म्हणून तुझ्यासाठी थोडे शब्द . . 

आपण पैशाने खूप वाढलोय . आनंदाने किती वाढलोय हे कधी तू पाहिले आहेस ? बरं आपल्या आनंदी व्हायच्या संकल्पना या वर्षात किती बदलल्यात रे .. नवीन फोन ,शूज , गाडी , हॉटेल , फॉरेन ट्रिप , इन्व्हेस्टमेंट , नवीन डील , नवीन व्यवसाय याने आपल्याला आनंद मिळतो . सकाळी उपमा मस्त झाला होता म्हणून शेवटचं आनंदी तू कधी झाला होतास रे ? आठवतंय . . कट्ट्यासमोर आई असेल किंवा बायको . . स्वयंपाक सुरु असताना कुडमुडे पणा करत शेवटच्या गप्पा कधी मारल्या होत्यास ? आठवतंय . . नाही आठवत ! आपण आयुष्यात खूप पुढं आलोय . . जीवनात मात्र बकाल झालोय . तू महागड्या हॉटेल मधे जातेस , पब मधे थिरकतेस , दोन चार अल्कोहोल शॉट्स पचवतेस . . हे सगळं करून तू घरी काय नेतेस ? एकटेपणा . . तुझ्या एन्जॉयमेंट ला सोशल मीडिया वर २००-४०० लाईक्स नाही आले तर तुझा मूड जातो ! अजून लाईक्स यायला अजून धडपड , अजून मोठी जागा . . अजून चांगले फोटो . . ही धडपड  कधी संपणार गं ? या धडपडीचा भाग व्हायला का आपण मोठे झालो ?

तूला आठवतंय . . लहान असताना ,नंतर शाळेत जाताना रस्त्यावर सापडलेल्या फुलापासून ते कुत्र्याच्या पिलापर्यंत सगळं उचलून आपण घरी आणायचो . फुलपाखरं पकडायचो . हवेत भिरभिरणाऱ्या म्हातारीला पकडायला बेभान होऊन पळायचो . रुपयाला १६ या हिशेबाने मिळणाऱ्या मसाला , लिम्लेट च्या गोळ्या आनंदाने खायचो . आज हजारो रुपयांचे चॉकलेट फ्रिज मधे पडलेले असतात पण उत्साहाने खायची भावना होत नाही . का ? आपला उत्साह कोठे हरवलाय ? एका फोटोत एक कपडा आला की आपला त्यातला इंटरेस्ट संपतो . . दरवेळी नवीन कपडा आपल्याला लागतो . नात्यांचे पण असेच झाले आहे का ? अल्टर आणि रफ़ू करणारी पिढी भिकारी नव्हती रे . . त्यांच्या भावना प्रत्येक धाग्यात अडकल्या होत्या . आपले तागे आणि आपले धागे खूप क्षणभंगुर आहेत . शिलाई खूपच तकलादू . . आपले कपडेही लवकर खराब होतात आणि नातीही . . . आपण सतत नवीन शोधत असतो . . कपडाही नातेही . . 

नवीन काय नसतं अरे . . तुझ्या टेबल वरचा पेन स्टेन्ड तू उजवीकडून डावीकडे ठेवलास की टेबल नवीन होते . केसांची बट तू मोकळी सोडलीस की तू नवीन होतेस . चेहेऱ्यावरचे भाव बदलेलेस की तू नवीन होतोस . यात शून्य खर्च आहे . पण तू बदलत नाहीस . तू अडकला आहेस .एका सोन्याच्या पिंजऱ्यात . तुला वाटणाऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात . ज्यात प्रवेश सहज होतो . सुटका होत नाही . तू शेवटची आनंदी कधी होतीस ? याच्या आठवणी तुला फारतर कॉलेज पर्यन्त नेतील . . त्या नंतर आपण व्यवहारी झालो . आपण हसायला सुद्धा 'मॅनर्स' ने लागलो . खरं सांगू . . इथंच आपण संपलो . आपल्या प्रत्येकाकडे सांगायला भरपूर आहे पण ऐकायला कोणीच नाही . . का ? आपले कान आणि मन फार लवकर बोअर होते . . आपण सगळेच खूप मोठे ओझे ओढत आहोत . . सतत . . 

शाळेचे दप्तर कधीतरी रिकामे व्हायचे . . मनाचे दप्तर कधी रिकामे होणार ? उसवलेल्या नात्यांचे हिशोब तू मनात करत राहतेस . हुकलेल्या संधींची गणिते तू मनात सोडवत बसतोस . . त्याची उकल कधीच होत नाही . प्रश्न अजून गुंतागुंतीचे होतात . नात्यात करिअर येते . करिअर मधे नाते येते . तुला भरपूर पैसा मिळवायचा आहे . पैसा आपल्या मागील पिढ्यानी मिळवलाच नाही का ? अर्थात त्यांची स्वप्नं कधी आयफेल टॉवर खाली वाईन चे ग्लास पकडून किंवा किस करतानाचे फोटो काढण्याची नवती . सुट्टी म्हणजे नरसोबावाडी ,औदुंबर , पन्हाळा टोक म्हणजे महाबळेश्वर यातच संपली . ते या ठिकाणी जाऊन रिफ्रेश होत राहिले . तू अमेरिका पालथी घालून कधी जेट लेग तर कधी दमलो म्हणून झोपून राहिलास . . खरं सांग . . सुखाची बेरीज कोणी केली ?

मी पैसा मिळवूच नकोस म्हणत नाही . पैशा सोबत जरासे समाधान सुद्धा मिळव. थोडासा आनंद मिळव. थोडीशी शांतता मिळव .तुला एकटं राहायची भीती वाटते . . तुला संडासात पेपर लागतो , गाडीत एफ एम लागतो , बस मधे व्हाट्सअप लागतो . . का ? तुझ्यासमोर मोठा प्रश्न आहे . . मोकळं बसून करायचं काय ? खरं आहे . . आपण मोकळं बसून करणार काय ? आठवून आनंदी व्हावे असं आपल्याकडे आहे काय ? आपण बकाल आहोत . . . आपली ओळख फसवी आहे . आपल्या भावना आणि भावनांची गुंतवणूक तात्पुरती आहे . . यावर तू कधी विचार करणार आहेस ?? किंवा कधी विचार करुही नकोस . . त्याची काहीच गरज नाही .

तू जेव्हा माझ्या समोर खुर्चीत बसतोस /बसतेस तेव्हा तुझा एकटेपणा मला जाणवतो . तुझी तक्रार वेगळी असते .  पण वेदना खूप खोलवर कोठेतरी असते . तुझे महाग कपडे , बाहेर थांबलेली चार चाकी , इंपोर्टेड घड्याळ , ओपीडीत पसरलेला तुझ्या परफ्युम चा मंद वास , तुझा बेस्ट ब्लेझर , कडक सन ग्लासेस , कल्पनेच्या पलीकडची महागडी चेष्मा फ्रेम , खिशातून डोकावणारे सोन्याचे कोटिंग असलेले पेन इत्यादी इत्यादी च्या पलीकडचा तू मला दिसतोस . घुसमटलेली तू मला दिसतेस . . शुष्क . . कोरडी! हे बघून मला वाटतं . . तुझ्या हातावर खडीसाखरेचा एखादा मोठा खडा ठेवावा , एखादा चिरमुऱ्याचा लाडू द्यावा , गुळाचा खडा द्यावा , रावळगावचे एखादे चॉकलेट द्यावे पण . . . . या गोष्टी हातावर पडल्या की लहानपणी जसे आपण खुलायचो तसे आता आपण खुलणार नाही . हातावरच्या गुळाच्या आनंदापेक्षा चिकट तळहात कसा साफ करायचा . . रुमाल खराब होईल आणि इथे टिशू तर दिसत नाही या भयंकर समस्येत तू गुरफटणार म्हणून मी कधीच काही देत नाही . . . तू आनंदात रमण्यापेक्षा समस्येत गुरफाटायची सवय मनाला लावली आहेस . . . . यावर तू निरुत्तर आहेस . मी हतबल !! 
---
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे 
एम डी (आयुर्वेद )
सांगली -पुणे 
7276338585
https://www.facebook.com/ankur.deshpande4444

Wednesday, February 19, 2020

Friday, February 14, 2020

श्लोक

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥


Wednesday, February 12, 2020

सुभाषित

को हि भारः समर्थानां किं दूर व्यवसायिनाम्।
को विदेश सुविद्यानां को परः प्रियवादिनम्॥

शक्तिमान व्यक्तीला कोणतीही वस्तू जड नसते, व्यापार्‍यांना कोणतेही ठिकाण दूर नसते, विद्वानाला कोणताही विदेश नसतो, मधुर बोलणार्‍याला कोणी परके नसते.

Tuesday, February 11, 2020

रांगोळी

मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी येथील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये सत्यनारायण पुजेनिमित्त सौ. मनाली गिरप यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  प्रतिमा रांगोळी काढून साकारली होती.

Wednesday, February 5, 2020

श्रद्धांजलि


केवळ श्रद्धांजली वाहण्याकरता हत्तींचा एक कळपच्या कळप वीस किमीचा प्रदीर्घ प्रवास करून त्यांच्या घरी आला. 
पण, त्यांना त्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं कसं असेल? 
कुणी आणि कसं सांगितलं असेल?
मनुष्यमात्राच्या समजुतीच्या बाहेरच्या अतार्किक अशा काही गोष्टी ह्या जगतात आहेत काय?

लॉरेन्स अँथनी म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आता एक लोककथा बनून राहिली आहे. लॉरेन्सनी आतापर्यंत ३ पुस्तक लिहिली आहेत. त्यापैकी The Elephant Whisperer हे एक होय. वनचर प्राण्यांना वाचवून त्यांनी जगभर त्यांच्या पुनर्वसनाचं मोठंच कार्य केलं आहे. २००३ मधील अमेरिकेच्या आक्रमणातून बगदाद प्राणि संग्रहलयातील वाचवण्याचं धाडसी काम त्यांनीच केलं. मार्च ७, २०१२ ह्या दिवशी लॉरेन्स मरण पावले. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि दोन नातू आहेत. आणि त्यांचे सखे… शेकडो हत्ती!

त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तींचा एक कळप, दोन पुढारी हत्तिणींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी आले. आणि त्यांनी आपल्या प्रिय मानव-मित्राला अखेरचं निरोपाचं वंदन केलं. त्या अखेरच्या निरोपाकरता द. आफ्रिकेतील त्यांच्या घरी पोचायचं म्हणून त्या ३१ हत्तींनी अत्यंत शांतपणं, थोडाथोडका नव्हे तर २० किलोमीटरचा प्रवास केला.

ते विलक्षण दृश्य पाहून आसपासचे लोक थक्क झाले. केवळ त्या हत्तींनी दाखवलेल्या अफाट बुद्धित्तेमुळंच नव्हे. तर लॉरेन्स यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं तरी कसं ह्यामुळं, हे स्थान त्या हत्तींच्या लक्षात राहिलं कसं ह्यामुळं आणि हत्तींच्या कृतज्ञतेच्या भावनेमुळं लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पुन्हा इतक्या शिस्तशीरपणं अगदी एका रांगेत चालत येणं त्यांना कसं जमलं असेल, ते कोण सांगणार!

लॉरेन्सची पत्नी फ्रान्स्वाज (Francoise) अगदी हेलावून गेली. कारण, गेल्या तीन वर्षांत ते हत्ती त्यांच्या घरी एकदाही आले नव्हते! तरीही आपण कुठं जात आहोत, ह्याची त्यांना नेमकी माहिती होती. आपल्याला संरक्षण देणाऱ्या आपल्या मित्राला अखेरची मानवंदना देण्याकरताच केवळ त्यांनी हा प्रदीर्घ प्रवास केला होता. 
तसेच आदरांजली वाहण्याकरता दोन दिवस आणि दोन रात्री ते सगळे हत्ती काहीही अन्नपाणी वर्ज्य करून घराच्या अंगणात बसून राहिले. आणि दोन दिवसांनंतर आले तसेच परत गेले.

कुणाही माणसाच्या समजशक्तीच्या आवाक्यात न येणारी ही सत्यकथा वाचून आपलंही मन भरून आल्याविना राहणार नाही.

या बातमीचा स्त्रोत...
: http://www.nativevillage.org/

Source : fb 

Monday, February 3, 2020

वपु विचार


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही..
पण गगनभरारी च वेड रक्तात असाव लागते...
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही... व.पु.काळे 
#vapu

मराठी भाषेचे सौंदर्य

मराठी भाषेचे सौंदर्य पहा:

कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल.

न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल.

कळलं ?  

वपु

वपुर्झा - व. पु काळे (भाग २)

माणसाला काही न काही छंद हवा, स्वप्न हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी, त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं प्रत्येकाच निराळ असत. नवरा बायकोचं एकच मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. नवरा बायकोच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुखःचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अश्या जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृतीधर्मानुसार ते स्वाभाविक आहे पण तो एकमेकांचा टिंगलीचा विषय होऊ नये, इतपत भान संसारामध्ये ज्यांना टिकवता येईल त्यांना संसारसुखाचं मर्म सापडलं. ज्यांना असे ठरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बळी होतात आणि रिकामा वेळ हा सैतानाचाच असतो.

किती दमता तुम्ही? या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईलापण एव्हढ एकच वाक्य हवं असत आणि कामावरून आलेल्या पुरुषालापण. इतर कितीही गरजा असोत पण हे एव्हढ एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे, त्या पुरुषानं आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक करता येऊ नये आणि बायकोला नोकरी करता येऊ नये. एकमेकांचे कर्तुत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कर्तुत्व टिकत. त्यात काय आहे हे मी पण करीन इथ अर्पणभाव संपला स्पर्धा आली, कौतुक संपल तुलना आली, साथ संपली स्वत्वाची जाणीव आली.

संसार... संसार या शब्दाबरोबरच संघर्ष आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही, नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारामध्ये या संघर्षाचे खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकच. पण असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुडनाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचे ताज्या मनानं स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी काहीही वेगळ करावं लागत नाही. अरे नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनानं सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत जरूर असतो.

बायको... बायको म्हंटल ना मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही कारण संशय हा नेहमी दुष्ट बुद्धीने घेतला जातो असं मला वाटत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावरच प्रेम असावं ही भावना त्या मागं असते. महत्व त्याला नाहीये, तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा मात्र उबग येतो. ‘अति सर्वत्र वर्जेयीत’ म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा बायकोने एकमेकांवर प्रेम करण सुद्धा वाईट. प्रेम माणसाला दुबळ बनवत. प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे, त्याला त्याच स्वतःच स्वतंत्र अस्तित्त्व आहे, जीवन आहे. केवळ स्वतःचा उत्कर्ष आहे इतकच नाही तर स्वतंत्र असा अध्धपातही आहे. ह्याचा विचार, ह्याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही. प्रेमान माणूस ताकतवान बनला पाहिजे. नवराबायकोंच एकमेकांवर अमर्याद शेवटी गुलाम बनवाण्याची शाळा ठरतं. त्यात व्यक्तित्त्वाचा विकास करायची ताकत नसते. कलाकाराला असलं प्रेम नको असत, त्याची कला ही त्याची संजीवनी असते, डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं. ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या सौ. ला कधीच धक्का लागायचा नाही. प्रत्येक कलावंताच्या पत्नीन आपल्या जोडीदारासाठी आपण हे करत आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जिला जमत नाही तिला मग आपलाच पराभव झाला असं वाटायला लागत. कलाकाराशी संसार हा ह्या अर्थाने सुळावरची पोळी असते. 

न मावणार दुखः नेहमीच जीवघेणं असतं, कारण तुमचा जीवच तिला दुखःपेक्षा लहान झालेला असतो. त्या माणसाने नेहमीच दुखःपेक्षा मोठ व्हायचं ध्येय ठेवावं. दुखः मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहिलं इतकं मोठ व्हाव. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठ भांड वापरायच पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही ते भांड ओसंडून जाईल इतकं ते छोट ठेवायचं.

ताकत स्पर्शाची असते की आपल्याच मनात जी अनिवार ओढ असते तीच हे सामर्थ्य. जादू शरीरामध्ये असते की नावात. चार सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटत त्यापेक्षा दुसऱ्या गायकाने पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळ वाटत. श्रोत्यांच्यामध्ये एखादीजरी नावाजलेली व्यक्ती आढळली तर घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो, का? नावाची महती. फक्त नावाचीच महती असते? नाही असं मुळीच म्हणता येणार नाही. चार सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात, भक्तीने ऐकतात, विभूतीपूजाही त्यात डोकावत असते. अशी माणस फक्त समोर चाललेली मैफिलच ऐकत असतात पण ज्या माणसाने संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरास्वरामागे रियाज ऐकू येत असतो. तो कदाचित मैफिल ऐकतच नसतो. तो मागची तपश्चर्या पाहत असतो. एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवत असतो. स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो, साम्य शोधत असतो. स्वरांच्या प्रवासाची सगळी वळण त्याला तानेतानेतून दिसतात. वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घ श्वास घ्यावा लागतो ती स्पंदन जाणकार प्रेक्षकाला कळत असतात. त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळ चैतन्य देतो. कौतुक कुणी केलं याला महत्त्व प्राप्त होत. जे संगीताच्या बाबतीत तेच प्रेमाच्या. तसच प्रेम आणि स्पर्शाच नात असावं. कातडीचा स्पर्श दुसऱ्या कातडीसारखाच असतो. नव काही असेल तर त्या स्पर्शामागे तात्काळलेली अनेक अनेक वर्षांची प्रतीक्षा त्यातून उफाळलेला आवेग, उत्कटतेच तोरण आणि व्यक्तीच नावही. तो स्पर्श प्रतीक्षेला असतो आणि प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही.

संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. अरे तो होतो भक्तीतून, प्रेमातून, प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीन व्यवहायिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यांच्यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःच निराळ अस्तित्त्व मानलेल नसतं, तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एव्हढीच तिची एकमेव इच्छा असते आणि मग तेव्हढ्यासाठीच तिला प्रेमामध्ये भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावनापण स्वभाविक आणि कुणीतरी कलावंतावर भाळत राहण हेही स्वभाविकच. तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला अकारण नालायक समजायला लागते, कल्पनेचे इमले रचायला लागते. नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोचला असणार असं बायको गृहीत धरते. तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव वाटतो, अपमान वाटतो आणी मग नवऱ्याची कलासाधना हा तिला ताप वाटतो. अशी बायको नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटत का? बायको एकवेळ शरीराने दूर झाली तर चालेल पण मनानं, विचारानं दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काहीकाळच अस्वस्थ करणारा असतो पण दुसऱ्याबाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटल तरी सहजी फुटत नाही. पुरूषांच निम्म अधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा शरीरसुखासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही अशीच त्यांची गोड समजूत आहे आणि त्याला तसच कारणही आहे. शरीर सुखासाठी स्त्री राबवली जाते पुरुष फायदा घेतात ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आलेला आहे.

एकदा केव्हातरी शांत बसावं आणि वयानुसार आपण काय काय सोडल्यात याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येत गाभोळलेली चिंच अनेक वर्ष खाल्ली नाही, जत्रेमध्ये मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही, चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असे आता वाटत नाही कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलीडोस्कोप कधी आपणहून पाहिल्याचे आठवत? सर्कसमधला जोकर आपले मन रिझवू शकत नाही तसेच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीच्या सुखाचा काळ कधी नेला हे आपल्याला कळलच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत, दोनदोन मुलांच्या जोड्या करून चालण नाही, विटीदांडू नाही, साबणाचे फुगे नाही, प्रवासात बोगदा आला की अनामिक हुरहूर नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्दक्य तिने आपल्याला दिले म्हणून ती उडू शकते आपण जमिनीवरच आहोत. 

कुंकू, मंगळसूत्र, पांढर कपाळ ह्या खुणांच्यावरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले सायबा. हल्ली संपूर्ण मोत्यांचा माळेत मानेमागे वेणीखाली लपेल असा एकच काळा मणी असतो. नवऱ्याचे संसारात स्थान किती हे या फॅशनवरून समजत पण हिला नवरा आहे की नाही हे समजत नाही. स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे. तो प्रेमाचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा. जातायेता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते, रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कनं तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ओंफिसरने फाईल देताना तेच, हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटात चिकटून जाते, वर पुनः सॉरीच गुलाबपाणी शिंम्पडायचं आणि एक ओषट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो, नजरा दुसर काही ओकतच नाहीत. स्त्री देहावरती या ज्या अर्थपूर्ण नजरांची पुट चढलेली असतात पुट. भारतीय युद्ध समाप्तीनंतर कृष्णाने अर्जुनाला प्रथम रथातून उतरायला सांगितले. अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचे ऐकून तो उतरला. त्यानंतर कृष्ण उतरला आणि अर्जुनाचा रथ जळून गेला. तेव्हा कृष्णाने सांगितले कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा प्रभाव रथावर झालेला होता. आगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता. आयुष्यभर स्त्री देहाचं सौरक्षण करणारा कुणी अजाद कृष्ण असलाच पाहिजे, नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.

Youtube@
http://www.youtube.com/watch?v=jaa58LYgz6I