Tuesday, December 13, 2011

स्त्री गर्भाचा गर्भपात



स्त्री गर्भाचा गर्भपात
-वृषाली मगदूम , शनिवार , १०  डिसेंबर २०११
(सौजन्य : लोकसत्ता)

मुलगी असल्याने जन्मल्यावर खड्डय़ात गाडल्या गेलेल्या पण जगलेल्या सुनीता असो की सासू-सासऱ्याचा मार खाऊनही गर्भजल चाचणीला नकार देणारी अर्चना वा मंगल असो. स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला जन्माला घालण्यासाठी आजही तिला प्रचंड यातना भोगायला लागत आहेत. अशिक्षित कुटुंबात आणि अगदी सुशिक्षित कुटुंबातही. पण तरीही लढणं सुरूच आहे. नकाराला होकारात बदलणाऱ्या अशाच काही स्त्रियांच्या या सत्यकथा...
चोवीस वर्षांची अर्चना. अनदूर तालुक्यातली. फारसं शिकलेली नसली तरी बचत गटात सक्रिय असणारी. आधीच्या दोन मुली आणि आता पुन्हा गर्भवती असल्याने घरातलं तणावाचं वातावरण सहन करणारी. तिचा नवरा एकुलता एक असल्याने आता मुलगाच व्हायला हवा म्हणून तिच्यावर गर्भजल परीक्षेची सक्ती होतेय. तिने त्याला ठाम नकार दिलाय. सासू तर भांडून निघूनही गेली होती. पण तिचा निर्णय ठाम आहे. मी कोणतीही चाचणी करणार नाही. मुलगा असो की मुलगी ते माझं बाळ आहे. मी ते जगात आणणारच ..
सोलापूरला राज्यस्तरीय लिंग निवड चाचणी प्रतिबंध कार्यशाळेत गेले होते. तिथे लातूरच्या सुनीता अरळीकर भेटल्या. आज त्या ५६ वर्षांच्या आहेत. मुलगी झाली म्हणून त्यांच्या वडिलांनी जन्मत:च खड्डा खणून त्यांना पुरलं होतं. आजोबांना हे कळताच त्यांनी त्यांना खड्डय़ातून काढून आपल्या घरी आणलं. आजोबा एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी सुनीताला स्वत:चे नाव दिले. सुनीताचे शिवकांता असे नाव आजोबांनी (आईचे वडील) ठेवले व स्वत:चे कुंडलिकराव हे नाव वडील म्हणून दिले. सुनीता लग्न होईपर्यंत शिवकांता कुंडलिकराव माने हे आजोबांचे नाव तर लावत होतीच, पण तिथेच ती शिकली. आज सामाजिक कार्यकर्ती म्हणून विविध चळवळींत तिचा सक्रिय सहभाग असतो.
माझी एक उच्च विद्याविभूषित मैत्रीण, गर्भलिंग निदान व मुलींची घटती संख्या यावर पोटतिडीकीनं बोलायची. उच्चभ्रू घरातल्या या मैत्रिणीला त्याबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘पहिल्या मुलीनंतर मला घरच्या लोकांनी चार वेळा मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करायला लावला. मुलगा झाल्यावरच हे थांबलं. माझ्या मनात या साऱ्यांची टोचणी व अपराधी भावना आणि खूप काही साचलं आहे गं! डोक्यातून जातच नाही. त्यावेळी मी फक्त गृहिणी होते. घरातल्यांवर अवलंबून होते. हातात पदवी नव्हती. विरोध करण्याचं बळ नव्हतं, पण म्हणूनच मग  अर्धवट शिक्षण पुरं केलं. पदवीधर झाले. कायद्याची पदवी घेतली. हे शिक्षण व आर्थिक बळ त्यावेळी असतं तर माझ्या छकुलींना मी जन्माला येऊ दिलं असतं.. कशाकरिता गं मुलाची हाव. ते जीव गेलेच. माझं आयुष्यही पणाला लागलं. आज सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी असे अनेक आजार शरीरात घर करून आहेत.’’
या मैत्रिणीनं आपलं मन मोकळं केलं, पण अशीच व्यथा घेऊन वावरणाऱ्या आजूबाजूला कितीतरी भेटतात. वंशाचा दिवा फक्त श्रीमंत घरातच हवा असतो, असं मला परवा-परवापर्यंत वाटत होतं. पण सारसोळे विभागात आमच्या कचरावेचक भगिनची बैठक घेत होते. कोण, कोठल्या विभागातून आले यावर गप्पा सुरु होत्या. परभणी, औरंगाबाद, लातूर, बीड, परळी वैजनाथ अशा भागांतून या महिला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असल्यामुळे मुंबईत आल्या व कचरा वेचू लागल्या. बीडमध्ये मुलींची संख्या किती कमी आहे, असं मी विचारताच त्या भडाभडा बोलायला लागल्या. माया म्हणाली, ‘‘ताई, मी खिल्लारीची आहे. मला पहिल्या चार मुली झाल्या. प्रत्येक मुलीच्या वेळी सासू व नवऱ्याच्या शिव्या व मार खाल्ला. पाचव्या वेळी सासूनं मला ती टेस्ट करायला लावली. टेस्टमध्ये मुलगा आहे, असं सांगितलं; पण काय झालं माहीत नाही. मुलगी झाली. मला, ओल्या बाळंतिणीला चार मुलींसह घरातून हाकलून दिलं. तिकीटसुद्धा न काढता मी इथं बहिणीकडे येऊन धडकले. ‘कचऱ्यावर’ जायला लागले. काही दिवसांनी नवरा आला. तोपण बिगारी काम करायला लागला. आता पोरी चांगल्या शिकताहेत बघा. चांगलं वाटतंय. मुलगा नाही म्हणून काही वाईट वाटत नाही बघा.’’
मंगला काटे म्हणाली, ‘‘ताई, मला पण सगळ्या  मुलीच आहेत.’’ मंगलच्या दोन मुलींनी नर्सिगचं शिक्षण घेतलंय. एक माझ्या कॉलेजात बारावीला आहे. एक शाळेत शिकतेय. सात वर्षांची प्रिया दोन वर्षांपूर्वी ब्लड कॅन्सर होऊन गेली. मंगल दिवस-रात्र मुलीसाठी खपत होती. प्रियाला डी. वाय. पाटीलला मोफत उपचार मिळालेच, पण ती इतकी लाघवी होती की, डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला होता. मला हे सारं आठवलं. मंगला म्हणाली, ‘‘ताई मुलीच होताहेत म्हणून नवऱ्यानं व सासूनं खूप त्रास दिला. पण माझी आई म्हणायची, असली चाचणी करायची नाही व मूल पाडायचंही नाही. माझी तिसरी मुलगी वर्षांची असताना नवऱ्यानं तिचं डोकं जमिनीवर इतक्या जोरात आपटलं होतं की, सात टाके पडले होते. पण आज घरात तीच सगळ्यात हुशार आहे व बापाची लाडकीपण आहे.’’ मंगलच्या स्वरात सार्थकता होती.
परभणीची नंदा फार चुणचुणीत आहे. ती व तिची सासू दोघीही गटात आहेत. तिची सासू तिला त्रास देते. बैठकींना येऊ देत नाही, पण यावेळी साासू बाहेर गेली होती. त्यामुळे नंदा हजर होती. ‘‘तुझं काय नंदा?’’ मी विचारलं तर इतरजणीच म्हणाल्या, ‘‘तिला मुलगी झाली असती तर तिच्या सासूनं पोरीसकट तिला उचलून फेकूनच दिलं असतं.’’
‘‘हो ताई, मला दोन मुलगे झाले, पण पहिल्या वेळी सासू रोज धमकी द्यायची. मुलगा झाला नाही तर बघ म्हणायची.’’
मीरानं बचत गटातून कर्ज काढून मुलीचं लग्न केलं होतं. जावई बऱ्यापैकी नोकरीत आहे. मीरा म्हणाली, ‘‘माझा जावई या दिवाळीच्या आधी मुलीला घेऊन मुलगा की मुलगी बघायला (सोनोग्राफी) निघाला होता. मी दोघांनाही सांगितलं, असं काय करणार असाल तर मी तुमच्या दोघांचंही तोंड बघणार नाही. मग लेकीचं बाळंतपण वगैरे लांबच. असं म्हटल्यावर गुपचूप घरी बसला.’’
बराच वेळ चर्चा चालू होती. मुलगा हवाच ही मानसिकता गरीब घरातूनही आढळते, पण लिंगनिदानाचे प्रमाण कमी आहे. मुलगी झाल्यावर काही दिवस राग व्यक्त होतो, पण मग तिचा स्वीकार केल जातो. हेही वास्तव आहे.
आज स्त्रियांच्या चळवळी स्त्री भ्रूणहत्या शब्द वापरू नका, असा आग्रह धरीत आहेत. हत्या हा शब्द स्त्री हक्कासाठी अयोग्य आहे. त्यामुळे ‘स्त्री गर्भाचा गर्भपात’ हा शब्द वापरावा, असं वारंवार सांगूनही स्त्रीभ्रूणहत्या शब्द सहजपणे वापरला जातो. गर्भपाताचा कायदा १९७१ साली अतिशय सहज संमत झाला. सुरुवातीला हा प्रश्न कुटुंबनियोजनाशी संबंधित आहे, असं साऱ्यांनाच वाटलं. सुरक्षित गर्भपात हा अधिकार असून त्यावर बंधन येऊ नये, हा स्त्रीवादी चळवळीचा आग्रहही रास्त आहे. गर्भपात हा प्रजनन व मानवी हक्कांशी जसा निगडित आहे तसा तो नैतिकतेशीही जोडलेला आहे. पण आज हा प्रश्न लिंग निवडीसाठी जोडला जातोय. ही अतिशय गंभीर समस्या आहे. हे सारं किती नकळत होत होत असतं याचं उदाहरण म्हणजे १९७१ साली एका कंपनीनं महिलांसाठी आरोग्यविषयक एक प्रकल्प घेतला. प्रकल्पाचा भाग म्हणून १० हजार महिलांची गर्भजल परीक्षा करण्यात आली. यात महिलांना लिंग निवड कळली आणि अनेक महिलांनी गर्भपात कायद्याचा दुरुपयोग केला. ज्या स्वयंसेवी संस्थेनं हा प्रकल्प घेतला त्यांना हे फार उशिरा लक्षात आले. आज कुटुंब नियोजनामुळे लिंग निवड (मुलगाच हवा) ही
प्रवृत्ती वाढीला लागली आहे. सरकार प्रलोभनं किंवा शिक्षा असा सूर असल्याने पळवाटा काढल्या जात आहेत. तंत्रज्ञानाची होणारी जलद प्रगती आपण थांबवू शकत नाही. वैद्यकीय व्यवसायातलीही घसरलेली नितिमत्ता थांबवण्यासाठी काय करायचे, हाही प्रश्न आहेच.
नुकतीच रुजू झालेली आमची एक कार्यकर्ती सांगत होती की, तिच्या घरात ती चौथी मुलगी होती. ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती झाली तेव्हा आजी तिला बघायला दवाखान्यात आली नाही. वडिलांनीही तिला बघायचे नाकारले. आई तिला घरी घेऊन आली. आईनं नोकरी शोधली व दोन महिन्यांच्या तिला घरात टाकून आई नोकरीवर जाऊ लागली. आजीला नाईलाजानं हिच्याकडे बघायला लागायचे. मी नसल्याने तरी सासू मुलीकडे बघेल हा तिचा उद्देश होता. आईने आपला हट्टीपणा सोडला नाही. शेवटी वडील म्हणाले, ‘‘बाई गं, तुझ्या पाया पडतो, पण हे थांबव. तुला व आपल्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही, हे वचन देतो.’’ त्यानंतरच आईनं नोकरी सोडली.
अशा नकुशीच्या किती कहाण्या आजूबाजूला पूर्वी घडत होत्या. आजही घडताहेत. किंबहुना पूर्वीपेक्षा आज या प्रमाणात वाढ होतेय. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून आपण ओळखतो. महाराष्ट्रात प्रथम ‘प्रसवपूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान कायदा’ PCPNDT १९८८ साली झाला. पण आज मुलीच्या घसरत्या प्रमाणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय. पहिला क्रमांक जम्मू व काश्मीरचा आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्य़ात सर्वात कमी मुली आहेत. सध्या तिथली संख्या आहे हजाराला ८४८. या जिल्ह्य़ातल्या शिरुर, कासार आणि धारुर या तालुक्यात सर्वात कमी मुली आहेत.
या वर्षीच्या एका दिवाळी अंकात एका डॉक्टरांचं संपादकीय आहे. ज्यात त्यांनी डॉक्टरांची बाजू मांडली आहे. त्यांच्या मते, गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकीच आहे. डॉक्टरांना सतत सुळावरच द्यायचं का? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. हा एक छुपा दहशतवाद असंही ते म्हणतात. त्यापुढे जाऊन गर्भलिंग निदानासाठी पेशंटच आले नाहीत. तर डॉक्टर कोणाची सोनोग्राफी करणार, असं विचारून डॉक्टर किती निरपराध, नीतीमान आहेत, हे सांगितलं आहे. मग त्यांना असं विचारावंसं वाटतं की, या दशकात चार लाख ७० हजार मुली जन्माला येऊ दिल्या नाहीत ते कोणी? कुठे?
सातत्याने घडत असलेल्या या घटना पाहून महिला चळवळींनी जेव्हा सरकारला वेठीला धरले तेव्हा गेल्या चार महिन्यांत स्टेट मेडिकल कॉन्सिलनं महाराष्ट्रातील ८१२५ नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरवर धडक मोहीम सुरू केली. ३५२ ठिकाणी मशिन्स सील केल्या. आज १६३ केसेस न्यायालयात दाखल केल्या आहेत. पूर्वीच्या १३८ केसेसचा निकाल लागायचा आहे. ३१ डिसें. २०११ च्या आत या साऱ्या केसेस निकालात लावण्याचा आदेश दिला आहे. प्रत्यक्ष कृती होते का कागदी घोडे नाचवले जातील, हे काळच ठरवेल.
पण आजही मुलगा हवा याचं वेड प्रचंड आहे. त्यासाठी भावनेच्या भरात स्त्रिया स्वत:वर कोणतेही उपचार करवून घेतात. कितीही रक्कम खर्च केली जाते. मध्यंतरी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये ‘मुलगा हवा का?’ अशी जाहिरात होती. मोबाइल नंबर दिला होता. या नंबरवर संपर्क करून ‘डेकॉय’ (रुग्ण असल्याचे भासवून चौकशी करणं) केली असता तेथील डॉक्टरांनी ३०० बायकांना मुलगे दिल्याचे अभिमानाने सांगितले. न्यायलयात हे प्रकरण दाखल झाले आहे. मात्र प्रत्येकवेळी हा डॉक्टर गैरहजर रहातो. आणखी एका प्रकरणात नागपूरहून एक मुलगी नवी मुंबईत आली. दोन सोनोग्राफी सेंटर्समध्ये तिची सोनोग्राफी करून लिंग निवड करण्यात आली. मुलगी आहे म्हणताच तिला कायमचं माहेरी पाठविण्यात आले. दोन्ही सोनोग्राफी सेंटर्सनी कानांवर हात ठेवून आम्ही असं काहीही न केल्याचं छातीठोकपणे सांगितलं. मुलगी साक्षीदार म्हणून यायला घाबरते. एवढंच नव्हे तर एका प्रख्यात मोबाइल कंपनीनं मुलगा व्हावा म्हणून बाईनं काय खावं, हे आपल्या साईटवर चायनीच कॅलेंडर तयार करून दिलं. दिल्लीतील निवृत्त न्यायाधीशांनी हे निदर्शनास आणले असता मोबाइल कंपनीनं साईट डीलीट तर केलीच, पण ही साईट तयार करणाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले, हे कौतुकास्पद आणि अपवादात्मक.
आजूबाजूला दिसणाऱ्या या घटना, माणसांचे अनुभव अस्वस्थ करतात. कायदा सक्षम आहे. तरीही पळवाटा काढल्या जाताहेत. मुलीची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन रणनीती ठरविण्याची गरज आहे. सुटे सुटे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ‘मुलगा हवा’ या मानसिकतेवर साऱ्यांनीच आत्मपरीक्षण करायला हवं. व्यवस्था ही नेहमीच बळकट व चिवट असते. आपल्याला बदल हवाय. त्यासाठी वेळ पडल्यास धक्कातंत्राचा वापर करून जे कोणी मुलींना जगण्याचा अधिकार नाकारतेय वा नाकारतोय त्यांना वेठीस धरलेच पाहिजे. कोणत्याही मार्गाने अगदी साम-दाम-दंड-भेद वापरून.
(लेखिका स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यां तसेच पीसीपीएनडीटी समितीच्या सल्लागार सदस्य आहेत. )

0 comments: