Saturday, May 9, 2020

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

या लेखाचा संपादित अंश आजच्या eSakal मधे प्रसिध्द झाला आहे.

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर
 -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी
भ्रमणध्वनी : 9960487995

सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... वाचन हा तसा एकमेव आनंद त्या
काळात उपलब्ध होता. अर्थात्, त्या वेळेच्या आमच्या पिढीला आजही हाच ‘एकमेव आनंद
वाटतो’ हे कदाचित आमच्या पिढीचे माहिती आणि तंत्रज्ञान युगातले अज्ञान असावे.  असेल ते
असो - पण आजही वाचनाचा आनंदच खरा आनंद वाटतो! त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी
तर रेडिओ ऐकणेही चैनीची बाब होती. साथीला होती ती ग्रंथसंपदा! ती सुद्धा ग्रंथालयाच्या
कपाटात! खरे तर त्या काळी अभ्यासक्रमाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर वाचन करणे म्हणजे शुद्ध ‘उडाणटप्पूपणा'च होता! तो उडाणटप्पूपणा आमच्या पिढीने भरपूर केला. स्वत:चे एखादे आवडते पुस्तक असणेही दुरापास्तच! अशा काळात आमच्या गळतग्यासारख्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात माझ्या हाती ‘पॅपिलॉन’ पडले! पुस्तक नावापासूनच आगळेवेगळे. हेन्री शॅरियर नावाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फ्रेंच व्यक्तीचे आत्मचरित्र. मराठीत त्याचा अनुवाद करणारे श्री. रवींद्र गुर्जर! इतकाच तपशील ज्ञात होता. पुस्तक एका झपाटलेल्या आघाशीपणाने वाचून काढले. पुन्हा वाचले, पुन:पुन्हा वाचले... ह्या प्रवासात हे पुस्तक परभाषेतली अनुवादित पुस्तक आहे हे देखील विसरून गेलो. लक्षात राहिले ते पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर!

तसा आजच्या दृष्टीने तो स्वस्ताईचा काळ होता असे म्हणतात. (आम्हाला ही स्वस्ताई कधी
भेटलीच नाही. प्रत्येक काळ आम्हाला महागाईचाच वाटतो!) चांदोबा 50 पैसे आणि अमृत
(मासिक) 1.50 पै. इतके स्वस्त!. ते सुद्धा विकत घेणे कठीणच होते! सत्यकथा लायब्ररीत बसून आधी मुखपृष्ठावरून हात वगैरे फिरवून मग उघडायचे! आपण सत्यकथा वाचतो म्हणजे कुणी मोठे ज्ञानी आहोत असे वाटे! अशा काळात पॅपिलॉनने झपाटले होते!

वाटावळणांचा प्रवास चालूच राहिला. वाचनातही अनेक संस्मरणीय ठिकाणे भेटली; पण
त्यावेळेच्या पॅपिलॉनच्या वाचनाचा ठसा मात्र अमीट राहिला. नोकर्‍या बदलत-बदलत
अखेरीस गोव्यात शिक्षक झालो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोवा-कोकण भागात भ्रमंतीही झाली. एक-दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणात- देवरुखला जाण्याचा योग आला. आयोजकांनी आम्हा पाहुण्यांची सोय एकत्र केली होती. बदलापूरचे ‘ग्रंथसखा’चे शिल्पकार श्री. श्याम जोशी प्रमुख पाहुणे होते. आदल्या दिवशीच्या रात्रीच्या वेळी आम्ही शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. श्याम जोशींनी आपल्याबरोबर आलेल्या स्नेह्यांची ओळख करून दिली. शांत, मितभाषी असे एक गृहस्थ श्याम जोशींच्या मागून पुढे आले. श्याम जोशी म्हणाले, ‘‘हे पुण्याचे प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर!’’ - झाले माझ्या डोळ्यांसमोरून
पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ झपाट्याने सरकू लागला. ‘पॅपिलॉन’ आणि ‘रवींद्र गुर्जर’ हे अद्वैत
असे अचानक नजरेसमोर साकारावे, त्या आश्‍चर्याच्या धक्क्यात मी होतो.

बघता-बघता पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे अंतर तुटले आणि गुर्जरांशी खूप वर्षांची मैत्री असावी,
तशा गप्पा झाल्या. स्वत:विषयी अत्यंत कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व, पण वाचन प्रवासात
‘पॅपिलॉन’नंतरही ते अनेक ठिकाणी भेटतच होते. तो सारा आलेख आठवत राहिलो. नंतरच्या
वाचनयात्रेत गुर्जरांची किती तरी पुस्तक वाचनात आली. ‘पॅपिलॉन’चा दुसरा भाग म्हणून
‘बँको’, पुझोचे 'गॉडफादर’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅपलीन’, ‘सेकंड लेडी’, ‘आईनस्टाईन’, ‘हाईनरिश
श्लीमान’वर लिहिलेले ‘सुवर्णयोगी’ अशी किती तरी...! नव्याने झालेल्या या भेटीला संवादांचे
धुमारे फुटले. रवींद्र गुर्जर हे अत्यंत साधे, सरळ, शांत, मितभाषी, पण सतत काही ना काही
उपक्रमांत गुंतलेले आढळले. वास्तविक पाहता त्यांचे शिक्षण बी.ए. (गणित), बी. जे.
(वृत्तपत्रविद्या), एम.ए.पीएच्.डी. (पुरातत्त्व) अशा वैविध्याने साकारले आहे. आयुर्वेद रसशाळा, विशाल सह्याद्री पुरवणी संपादक, संतकृपा/धर्मश्री प्रकाशन, डेक्कन कॉलेजमध्ये  पुरातत्त्व विभाग - संगणक विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे; पण खर्‍या अर्थाने ते रमले ते अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या कामात. गेली चाळीस वर्षे ते ‘गायत्री साहित्य’ हे प्रकाशन चालवितात. या माध्यमातून कथा, कादंबर्‍या, धार्मिक, संस्कृत- अनुवाद. अशी सुमारे 100 हून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इंग्रजी वाचनाचा आणि इंग्रजी सिनेमांचा प्रचंड नाद! अक्षरश: हजारो चित्रपट पाहिले आहेत. ह्या व्यासंगाबरोबरच पर्यटन, आपले स्वास्थ्य, संतकृपा, विश्‍व पांथस्थ, समर्थ संदेश, ग्रंथ भारती यांसारखी अनेक नियतकालिके आणि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ग्रंथ आणि वाचन यांच्यावरील प्रेमामुळे ‘स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर' या वाचन संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेचे ते मार्गदर्शकही आहेत.

माझ्यासारख्या इंग्रजी वाचनाची ‘फ्युएन्सी’ नसलेल्या वाचकावर रवींद्र गुर्जरांचे अनंत उपकार
आहेत. अन्यथा, ‘गॉडफादर’, ‘सेकंड लेडी’, ‘कोमा’, ‘पेलिकन ब्रीफ’, ‘आईनस्टाईन’, ‘चॅपलीन’,
‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’.... यांसारख्या अभिजात इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाला मुकावे लागले
असते. भाषांतर ही साहित्याची एक वेगळी शाखा आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारपद्धतींशी,
जीवनशैलीशी अत्यंत अपरिचित असलेल्या परप्रांतीय, परभाषिक वाङ्मयाचा वेध घेऊन त्या
साहित्य-संस्कृतीचे मराठीत साधे, सरळ, सुबोध आणि ओघवते भाषांतर करणे म्हणजे केवळ
भाषा-अंतर नव्हे! इंग्रजीमधल्या लेखनातील सर्व कंपने, संवेदना आणि अर्थछटांचा संवेदनशील
वेध घेऊन पुन्हा मराठी भाषेत लिहिणे म्हणजे एक नवसृजनच आहे, असे मला वाटते. खरे तर
स्वलिखित साहित्यकृतीमध्ये आणि सुंदर, ओघवत्या, आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण अशा
भाषांतरामध्ये कोणताही दर्जात्मक फरक करावा, असे मला वाटत नाही. आज मराठी भाषा
विविध अंगाने समृद्ध होत आहे. इतर भाषांतून मराठीमध्ये आलेल्या भाषांतरित साहित्याने
आपले स्वत:चे असे एक समृद्ध दालन सजविले आहे. ह्या दालनामध्ये अनेक चमकून
दिसणार्‍या कलाकृतींची भर रवींद्र गुर्जरांना घातली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध आणि
विकसित होण्याच्या ह्या प्रवासास गुर्जरांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रवींद्र गुर्जर येत्या २९  एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने
त्यांच्या कार्याचा, विविध व्यासंगांचा, त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचा वेध घ्यावासा वाटतो.
आयुष्याच्या त्या टप्प्यावरही त्यांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची यादी मोठी आहे. संगीत व
नाट्यकलेचे चाहते असलेल्या गुर्जरांनी अक्षरश: हजारो कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे.
त्यांच्या अनुवादाचे हजारो वाचक देशात, परदेशात विखुरलेले आहेत. आजही अनेक
कार्यशाळा, मुलाखती, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला ह्या निमित्ताने समस्त मराठी विश्‍वात
त्यांचा संचार सुरूच आहे. बदलापूरच्या ग्रंथसखाचे निर्माते श्री. श्याम जोशी यांच्या समवेत
महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धी योजनांमधून ते कार्यरत आहेतच. ह्याच योजनेचा एक भाग म्हणून अगदी परवा ते गोव्यात येऊन गेले. वाचन संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी
फोंड्याजवळच्या बोरी (बा. भ. बोरकरांचे गाव) ह्या छोट्याशा गावात आम्ही चालवीत
असलेल्या लहानशा वाचनालयाला भेट देऊनही गेले. वाचन संस्कृती सर्वदूर पसरावी, अगदी
खेड्यापाड्यांतही सुजाण वाचक निर्माण व्हावेत, ह्या तळमळीतून वाचनसंस्कृतीला जे-जे पोषक आणि साह्यभूत आहे, त्यात भाग घेण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे. गेल्या 100 वर्षांत गाजलेल्या मराठी पुस्तकांचे त्यांचे संकलन आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रभर
किमान 500 सांस्कृतिक केंद्रे आणि घरगुती वाचनालये सुरू व्हावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परभाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत यावे व मराठी
अनुवादाचे दालन अधिक समृद्ध व्हावे, या दृष्टीने ‘अनुवाद’ या विषयावर ते बहुमोल मार्गदर्शन
करतात. सुमारे 500 हून अधिक अनुवादक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

आज वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावरही रवींद्र गुर्जरांचा वाचन-लेखन प्रवास त्याच वेगाने
चालला आहे. जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्याच्या आस्वादाने त्यांचे मन अधिकच
आत्मलक्ष्यी बनते. मग 'मम आत्मा गमला' सारखी छोटी पण ‘स्व’चा शोध घेणारी पुस्तिका
आपसूकच साकार होते. गुर्जरांनी आपल्या भोवतीच्या साहित्याचा, संगीताचा, नाट्यसृष्टीचा,
चित्रपटसृष्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावंतांचा सहवासही त्यांना लाभला.
मनात येईल, त्या उपक्रमांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. डोळ्यांसमोर मात्र ‘वाचन
संस्कृतीची अभिवृद्धी’ हाच ध्यास ठेवला. आजही त्याच ध्यासाने ते कार्यरत आहेत. अशा अनेक
उपक्रमांत ते जरी ते मग्न असले, तरीही त्यांची हजारो वाचकांच्या मनातील प्रतिमा मात्र
‘पॅपिलॉन’कार गुर्जर! हीच आहे. एखाद्याच कलाकृतीच्या वाट्याला असे भाग्य येते. इतकी वर्षे
होऊन गेली.  रवींद्र गुर्जरांची 35 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, तरीही माझ्या मनातले
‘पॅपिलॉन’ पंख मात्र रवींद्र गुर्जरांच्या नावाबरोबरच लयबद्ध हलल्यासारखे वाटतात!  पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे  ते पुस्तक आजही मी हाताळतो आहे, असे वाटते आणि जागतिक साहित्यातील पैलपाखरे मराठी माणसाच्या अंगणात उतरविण्याचे श्रेय रवींद्र गुर्जरांचे आहे, ह्याची साक्ष पटते.

0 comments: