Saturday, March 26, 2022

Blog share 1

आपण सगळेच प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो . सगळी नाती जोडतो ती प्रेम मिळवण्यासाठीच. त्यातून आनंद मिळावा यासाठी. पण प्रत्येक वेळी आनंद मिळतोच असं नाही. काही वेळा प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करायची आपली तयारी नसते. प्रेम, आनंद आणि  स्वच्छ, मोकळ जगणं हे सगळ किती छान आहे.  आज मी दोन अप्रतिम कलाकृतींचा आनंद घेतला. तेव्हा मला प्रकर्षानी हे जाणवलं.
 एक म्हणजे उमा त्रिलोक यांचं अमृता आणि इमरोझ हे पुस्तकं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती लेखिका आणि एक चित्रकार यांची प्रेमकहाणी. प्रतिभा आणि प्रतिमा, मैत्री आणि प्रेम यांचा विलक्षण अविष्कार म्हणजे हे नातं. चाळीस वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवलेले दोन जीव. म्हणायला दोन पण खरं तर एकच. ज्यांना प्रेम ही एक भ्रामक कल्पना वाटते, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा.  समाजाच्या सो कॉल्ड चौकटीत बसणारं त्यांच हे प्रेम नव्हतं. पण अमृता आणि इमरोझ मोकळ्या मनानी जगले. प्रेमाची खात्री असली की अडथऴे जाणवत नाहीत. हे सगळ अमृता यांनी  नुसतं लिहून ठेवलं नाही तर त्या तसं जगल्या. इमरोझदेखील अमृतांच्या आजारपणात  सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. एक विलक्षण नातं. शब्दात बांधता न येणारं
शांता गोखले यांचं रीटा वेलिंगकर या पुस्तकानी आणि सिनेमानी  एका वेगळ्या मोकळ्या जगण्याविषयी सांगितलं. जगायचं पण आनंदानी ही थिअरी उषीरा का होईना कऴलेल्या एका स्त्रीची गोष्ट आहे यामध्ये. अमृता आणि इमरोझच्या निखळ आणि सुंदर प्रेमापेक्षा एकदम वेगळी कथा. जे मोकळ नातं त्या दोघांमध्ये होतं आणि समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्वीकारलं होतं त्याला छेद देणारी ही गोष्ट. समाजाची चौकट न मोडता, गुडी गुडी संबंध जपणा-या साळवीची आणि रीटाची गोष्ट. रीटाला हवय मोकळ नातं आणि साळवी जपतोय चौकट. यातून झालेला संघर्ष. रीटाला मिळालेलं शहाणपण. सुंदर आहे सगळ. 
स्वच्छ आणि मोकळ जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तसं जगलो तरच आनंदी रहाता येईल. एक तर आपण करत असलेल्या गोष्टी मोकळेपणानी स्वीकारायचं धैर्य हवं,  नाही तर असं काहीही करू नये ज्यामुळे आपल्या आयुष्यातला मोकळेपणाच संपून जाईल. निर्मळ , मोकळं, स्वच्छ असं जगता यायला हवं. हे सगळ अवलंबून आहे आपल्या  नात्यांमध्ये असलेल्या प्रामाणिकपणावर. हा प्रामाणिकपणा तेव्हाच ठेवता येईल जेव्हा आपुलकीनी आणि प्रेमानी एकमेकांना समजून घेतलं जाईल. विधात्यानी माणसं निर्माण केली, माणसानी निर्माण केली नाती, नातं कोणतही असो, हे बंध जोपासण्यासाठी आणि ते घट्ट करण्यासाठी धडपड करायला हवी...... 






0 comments: