Thursday, February 3, 2022

post 4

#सावरकर_समजून_घेताना..
भाग पहिला..

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे म्हणजे अनेक , रहस्यमय व रोमांचकारी प्रसंग , अनपेक्षित घटना यांनी भरलेला एकच आयुष्याचा जीवनपट आहे ..एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती गोष्टी घडू शकतात ! असा व्यक्ती की  ज्याच्या एकाच आयुष्यात किती प्रकारच्या भूमिका वाट्याला येतात ! आणि ती प्रत्येक भूमिका तो समरसून जगतो व त्या प्रत्येक भूमिकेला नुसता न्याय देत नाही तर त्याला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतो ..असे भव्य-दिव्य  चरित्र निर्माण केलेला नेता क्वचितच भारतीय इतिहासात सापडेल !

पण माझा आजचा विषय जे तुम्हाला व आपल्या सर्वांना माहीत आहे ते चर्चा करणे नसून ,  वीर सावरकरांचे एक वेगळे दर्शन तुम्हाला दाखविणे आहे , मला खात्री आहे की या लेखाच्या शेवटी मी ते करण्यात यशस्वी होईल 🙏.

सावरकर लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमान होते ..त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती ..त्यांची  निर्णयक्षमता तेव्हापासून अफाट अशी होती ..लेखक व कवी म्हणून एखादा विषय कुणालाही समजून सांगणे यात त्यांचा हातखंडा होता , वक्ते म्हणून ते अगदी काही क्षणात ते समोरच्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे .त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा होता ..एक प्रकारे कुणालाही आपल्या विचारांकडे खेचून घेण्याची चुंबकीय शक्ती लहानग्या विनायकामध्ये देखील होती ..ते स्वतः  शिवाजी महाराज , वासुदेव बळवंत फडके , चाफेकर यांच्या चरित्रापासून प्रेरित होते ..

असा हा व्यक्ती त्या काळात जी पदवी मिळविणे खूप प्रतिष्ठित समजले जायचे ती बॅरिस्टर देखील झाले ..त्या काळात ही अशी लोक खोऱ्याने पैसे कमवायचे ...एक सुरक्षित व श्रीमंतीचे आयुष्य जगणे म्हणजे त्यांना अगदी सहज शक्य होते आणि त्यांनी तसे जर केले असते तर ते त्या काळात एकदम साहजिक गोष्ट होती ....पण या माणसाने क्रांतिकार्याच मार्ग स्वीकारला  जो अतिशय खडतर असा मार्ग , का तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे व या  भूमीला परत गतवैभव मिळवून द्यावे ...आज ही गोष्ट वाचताना किंवा मी लिहताना खूप सहज लिहतोय पण त्या काळात हे तेव्हडे सोप्पे नव्हते ...मुळात सावरकर ज्या काळात जन्मले तो काळ म्हणजे ब्रिटिश सरकारचा सुवर्णकाळ होता आणि ते असे सत्ताधीश होते की ज्याच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळू शकत नाही, असे ठामपणे मानणारे सगळेच होते ...

हा क्रांतिकार्याचा मार्ग स्वीकारला म्हणजे काय कधीतरी झोपेतून उठून आपले त्यांच्या मनात विचार आला व त्यांनी ते सुरू केले असेही नव्हते ...त्याच्या परिणामांचा विचार त्यांनी पुरता केलेला होता .. वीर सावरकर त्यांच्या वहिनी म्हणजे येसु वहिनी ..यांना काव्यमय पत्र , "माझे मृत्यूपत्र" यात लिहतात ,

' की घेतील व्रत न आम्हीं हे अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे
बुद्धयाची धरिले करी वाण हे सतीचे '

जे काही सावरकर करत होते त्याचे भयंकर परिणाम त्यांना आधीच माहीत होते , पण तरीही या अग्निकुंडात त्यांनी उडी घेतलीच होती ..तर असा परम निश्चय असलेला  मनुष्य भित्रा बिलकुल नव्हता ..त्यांना न्यायालयाने ५० वर्षे काळे पाणी ची शिक्षा दिल्यावर त्यांनी ठणकावून विचारले , " _इतकी वर्षं तुमचे राज्य तरी टिकणार आहे का ? "_

शिवाजी महाराज वीर सावरकरांचे आदर्श होते ..शिवचरित्र मध्ये आग्र्याची सुटका आठवते का ? जेव्हा आग्र्याच्या दरबारात अपमान झाला तेव्हा शिवरायांनी बाणेदारपणे उत्तर दिले व अपमान सहन केला नाही , पण त्यानंतर जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवले तेव्हा शिवरायांनी ओळखले की आता तो स्वाभिमान असा सारखा-सारखा  दाखवून उपयोग नाही तर आपल्याला वेगळे चतुराईचे हत्यार बाहेर काढावे लागेल ..तेव्हा तात्पुरतं आजाराचे सोंग घेऊन आपले लोकही परत स्वराज्यात पाठविण्याचे नाटक केले ...यातून आपण औरंगजेबाला घाबरलो असे नाटक केले ..ही एक प्रकारची तात्पुरती माघार होती ...कारण स्वराज्याचे खूप मोठे कार्य अजूनही बाकी होते , जे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते ..आपल्या मातेला दिलेली वचनपूर्ती अजून बाकीच होती ..

शिवरायांचा शत्रू औरंगजेब व  परतंत्र भारताचा शत्रू म्हणजे ब्रिटिश यांची ताकद खूप मोठी होती ..अशावेळी या ताकदीला ताकदीने उत्तर देणे किंवा देत राहणे म्हणजे स्वतःला कायमचे कैदेत अडकवून ठेवणे वा आपले जीवनकार्य (म्हणजेच स्वराज्य किंवा स्वातंत्र्य ) मिळविणे चे स्वप्न विसरून जाणे हे एकच होते .. दूर अंदमानात म्हणजे मूळ  भारत भूमी पासून दूर राहून हे कार्य असे कितीसे वीर सावरकरांना साधणार होते का ? तर नाही , खचितच नाही !! दूर दिल्लीत म्हणजे मूळ स्वराज्यभूमिपासून दूर राहूनही जसे शिवरायांना साधणार नव्हतेच ...तर तात्पुरती माघार हा अंतिम  जे युद्ध होणार आहे त्याच्या  पूर्वतायरीचाच भाग होता . तर मी इथे हा उहापोह थांबवतो  , जास्त काही न बोलता माझ्या चतुर वाचकांवर हे सगळे जे सांगितले त्यातून अर्थ कसा काढायचा ते सोपवतो .

असे हे वीर सावरकर मग जेव्हा मूळ भारतभूमीवर  परत आले .. ज्या माणसाचे मूळ पिंड क्रांतिकारी मनाचे आहे तो मनुष्य खरेच गप्प बसला असेल का ? ( वीर सावरकरांनी अनेक प्रकारे क्रांतीकारकांना गुप्तपणे मदत केली )  शिवाजी राजे कैदेतून युक्तीने सुटून परत आले तेव्हा त्यांनी बादशहाला पत्र पाठविले व त्यात त्यांनी तुमच्या आदेशानुसार राहतो असे खोटेच कळवले व पुढच्या काही वर्षांत स्वराज्य मजबूत करून घेतले ..

रत्नागिरीला असताना सावरकरांनी अनेक मोठी कामे केली .. अस्पृश्यता निवारण, वेगवेगळ्या जातीच्या लोकांची सहभोजने, पतितपावन मंदिराची स्थापना ( अवघ्या भारतातील _एकमेव मंदिर_ जे सर्व जातींच्या लोकांना  दर्शनासाठी खुले केले ) , कोकणातील पाचशे पेक्षा जास्त विहिरी सर्व जातींसाठी  खुल्या केल्या ( तो काळ खूप कठीण होता ,स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव  ) ..इथे बघा बरं का, सावरकर हे  स्वतः स्पृश्य (जातीने ब्राह्मण ) होते ,  त्यांच्या या जातिनिर्मूलनाच्या  कामामुळे तेथील मूळ ब्राह्मण समाजाने देखील त्यांना वाळीत टाकले होते ..तरीही श्री व सौ सावरकर यांनी हे कार्य सुरूच ठेवले ..यातून हिंदू समाज संघटित होत गेला ..

पुढचे एक मोठे काम वीर सावरकरांनी केले ते म्हणजे मराठी भाषा शुद्धीकरण !! मी खाली काही सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेत ते शब्द देतोय  , हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल हे केवढे थोर काम त्यांनी करून ठेवले आहे, 

 सावरकरांनी किंवा त्यांचे बंधू बाबाराव यांनी दिलेला शब्द(प्रचलित शब्द)

  हुतात्मा (शहिद)
  महापौर (मेयर)
 दिग्दर्शक  /दिग्दर्शन (डिरेक्टर)
  दिनांक (तारीख , Date)
 विधिमंडळ (Assembly)
ध्वनिक्षेपक ( Loudspeaker)
निर्बंध ( कायदा )
आणि असे अजून शब्द ..जागेच्या अभावामुळे इथे सगळेच सांगू शकत नाही असो कारण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे , असो 🙏.

जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा वीर सावरकर यांनी उघडपणे तरुणांना सैन्यात भरती व्हा असे सांगायला सुरुवात केले , त्यांच्यावर प्रचंड टीका झाली .पण सावरकर ठाम होते .त्यांना दूरदृष्टी होती , की हेच सैन्य व प्रशिक्षित झालेले सैनिक भारत जेव्हा स्वतंत्र  होईल तेव्हा देशाचे संरक्षण करू शकेल आणि ते सत्य ही झाले ( १९४७ ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले ) ..  असेच त्यांनी दूरदृष्टीने चीन भारतावर हल्ला करू शकतो हे खूप आधी सांगितले होते ( आणि हिंदी-चिनी भाई भाई म्हणणाऱ्या चीनने १९६२ साली आक्रमण केले )

त्यांनी जे जे काही आयुष्यात केले ते खूप ठामपणे केले .

स्वातंत्र्यवीर  सावरकर काय काय होते ते बघा ,

महाकवी सावरकर ( कमला , गोमंतक )

नाटककार सावरकर ( संन्यस्त खड्ग व इतर )

कादंबरीकार सावरकर ( काळे पाणी , मला काय त्याचे )

निबंधकार सावरकर

इतिहासकार सावरकर ( सहा सोनेरी पाने , १८५७ चे स्वातंत्र्यसमर )

क्रांतिकारक सावरकर

हिंदुसंघटक सावरकर

हे सर्व वाचताना आपणच अचंबित होऊन जातो की हा एकच  मनुष्य किती अद्भुत आणि विविध  प्रकारचे आयुष्य जगलाय !

वीर सावरकर कायम म्हणायचे , 'देश हा देव असे माझा ''  देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो  , व या देशाचे आपण देणे लागतो ' त्यांची देशभक्ती म्हणजे उच्च कोटीची होती ...आयुष्यात जे काही भयंकर अनुभव आले , त्यामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व   विचार कधीच बदलले नाही , उलट ते अजून दृढ होत गेले ( मी स्वतः त्यांच्या याच गुणाने अगदी लहानपणापासून प्रेरित होतो व आजही आहे ) . म्हणजे मी आजही कुठलेही संकट आले तरी सावरकरांच्या जीवनाकडे बघतो व विचार करतो या माणसाला सगळेच नकारात्मक अनुभव येऊनही हा मनुष्य कायम सकारात्मक राहिला ,मग आपले संकट तर त्यापुढे काहीच नाही 🙏.

आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे ..सावरकर काय किंवा इतर कुणीही महापुरुष असो जोपर्यंत आपण त्यांनी देशाला जितके दिले त्याच्या काही प्रमाणात सुद्धा देशाला परत देत नाही तोपर्यंत या महान लोकांविषयी वाईट किंवा चुकीचे बोलण्याचा कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही ..कुणावर किती विश्वास ठेवला पाहिजे हे बघताना हा निकष लावा की या बोलणाऱ्या व्यक्तीने देशाला किती दिले आहे , आणि मग पुढे जावे .

 _सावरकर समजून घ्यायचे असतील तर आधी सावरकर वाचले पाहिजे_ ..वीर सावरकरांनी पूर्ण आयुष्यात दहा हजार पानांचे लेखन केले , जे एकूण आठ खंडात विभागले आहे ..दुसऱ्या कुणाला  वाचण्याची गरजच नाही इतके सावरकरांनी स्वतः लिहून ठेवले आहे .

 महत्वाची सूचना - ज्यांना सावरकर वाचायला किंवा समजून घ्यायचे असतील  त्यांनी  त्यांचे  माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र  वाचण्यास घ्यावे . हे एकच पुस्तक वाचल्यावर नुसतेच तुम्ही सावरकरांच्याच  प्रेमात पडणार नाही तर इतर ही असंख्य क्रांतिकारक तरुणांच्या त्यागाची महानता तुमच्या लक्षात येईल ...देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अशा स्वतःचे आयुष्य भारतमातेवर उधळून देणाऱ्यांमुळेच मिळाले आहे हे लक्षात येईल .

हेमंत सदाशिव सांबरे
संपर्क-९९२२९९२३७०.

#सावरकरी_विचाररत्ने #vitthal_wagh #hindusthan #सावरकर #स्वातंत्र्यवीरसावरकर #VeerSavarkar #Savarkar #BharatMata #JaiShriRam


0 comments: