Tuesday, March 1, 2011

खंत

खंत

आसवांचे केव्हढे उपकार झाले ,
मारेकरी कणवेस साक्षीदार झाले !

( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र
कणवेस पात्र ठरला !)

जाधवांचे दु:ख जाणावे कसे?
साथ ते सोडून .....दावेदार झाले !

( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले,
आणि हात जायबंदी असल्याने समोर बंदूक असूनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही हा
आपल्याच त्या साथीदारांचा दावा असल्याची खंत आजही जाधवांच्या डोळ्यात जाणवते !)

बघ पुन्हा झाले निखारे शांत आता ,
कालचे ते शेंबडे....."सरदार" झाले !

( ज्या कारणासाठी असमर्थपणे राजीनामा द्यावा लागला , तेच आज परत त्याच पदावर
आले ! लोक पण हे सारे विसरले , एकदा "शहीद" अशी पदवी दिली आणि हारतुरे घातले की
आपले - माझे-तुमचे सार्‍यांचेच कर्तव्य संपले , इतकीच आमच्या निखार्‍यांची धग
असावी ना?)

चिलखते चोरीस केंव्हाचीच गेली ,
बार म्हणुनी फुसकेसुद्धा.....दमदार झाले !

(काही स्पष्टीकरण आवश्यक आहे का यावर?)

अफझल्या बघ आपल्या गुर्मीत आहे
रुतंबरा सारखे ...."गद्दार" झाले !

( आमची माणसे मारून अफझल अजून जीवंत आहे आणि चिथावण्या दिल्या वगैरे आरोप ठेवून
आमचीच माणसे साध्वी रुतंबरा सारख्या लोकांना जातीवादी आणि गद्दार ठरवले जाते
आहे !)

हाय ! झाकोळून गेले तेज अन.....
चेहेरे पुन्हा, अळणी , कसे ?.....चवदार झाले !

( जे शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी काय गमावले ? चार पैसे
फेकून सगळीकडे या मागे राहिलेल्या माणसांची जाहिरात करून आपलीच पाठ थोपटत सारे
वर्तमान्पत्र वगैरे तथाकथित "मीडिया"वाले मात्र "थंडा"वले ! )

दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
....स्मारकांचे बस् इथे हक्क्दार झाले !

(छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम रयतेसाठी , एका दीन माणसासाठी कधीही "राजा"
असून ऐश्वर्याचा उपभोग घेतला नाही ! अश्या या "श्रीमंत योगी" महाराजांचे "
स्मारक" बनवण्यासाठी कोट्यानोकोटी रुपये खर्च करणे ....हा एव्हढाच हक्क आता
छत्रपतींचा एका साध्या रहाणीच्या भारतीय माणसावर राहिला हा केव्हढा
दैवदुर्विलास !)

उदय गंगाधर सप्रे-ठाणे

0 comments: