Tuesday, March 3, 2020

व्याकरण १.२

व्याकरण भाग (२)

-हस्वदीर्घाची गंमत...

शुद्धलेखन म्हटले की सर्वात मोठी समस्या असते की अमुकअमुक शब्द  -हस्व लिहावा की दीर्घ ..ब-याचदा मग कागदावर लिहून पाहिल्या जाते ..डोळ्यांना जे योग्य वाटेल ते मग आपण स्वीकारतो. -हस्वच्या ठिकाणी दीर्घ आणि दीर्घाच्या ठिकाणी  -हस्व लिहले तर गोंधळ तर उडतोच, पण त्या शब्दाचा मूळ अर्थही बदलतो..फार गंमतीजमती होतात..खरं म्हणजे कधीकधी संदर्भानुसार तो शब्द -हस्व लिहावा की दीर्घ  हे ठरवावे लागते. आणि  आपला हा गोंधळ का उडतो माहीत आहे का? कारण मराठीत तोच शब्द -हस्वही असतो..आणि  दीर्घही असतो. पण दोन्ही शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात बरं का!
  आता हेच बघा ना..अनेक लेखक /कवी लेखन करीत असतात..कवींच्या कवितेत तर एक शब्द हमखास येतोच..तो म्हणजे  ' मिलन' . पण मिलन हा शब्द जसा -हस्व आहे तसा तो दीर्घ म्हणजे  ' मीलन ' असाही आहे..
उदा.- ' तुझे नि माझे व्हावे --- ' इथे नेमके कुठले मिलन लिहावे असा प्रश्न नक्कीच पडला असेल. 'मिलन' म्हणजे ' भेट' . तेव्हा  'तुझे नि माझे व्हावे मिलन असेच योग्य  राहील..
 आता दीर्घ  शब्द 'मीलन' याचा अर्थ होतो ' मिटणे' उदा.- 'तुझ्या पापण्यांचे मीलन माझ्या हृदयाचा ठोका चुकवतो' किंवा 'तुझ्या पापण्यांचे मीलन, घायाळ होई माझे मन' इथे पापण्यांचे मिटणे हा अर्थ येतो. जर आपण तुझे नि माझे व्हावे मीलन असे लिहिले तर तू आणि  मी मिटावे असा अर्थ होईल..आहे ना गंमत? ( मीलन यापासून उन्मिलीत हा शब्द आपल्याला परिचित आहे.याचा अर्थ अर्धवट मिटलेले.)
असाच दुसरा शब्द बघा ..हा 'सुशीला' ./ 'सुशिला'  असाही लिहतात. तेव्हा नेमका कोणता योग्य  असेल..पडलाच ना प्रश्न ? जर शिला असा -हस्व शब्द असेल तर  त्याचा अर्थ होतो 'दगड ' आणि  शीला असा दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ होतो चारित्र्यवान. 'सु' या उपसर्गाचा अर्थ होतो चांगला/चांगली. तेव्हा  सुशिला म्हणजे चांगली दगड आणि  सुशीला म्हणजे  चांगली चारित्र्यवान.आता तुम्हीच ठरवायचं की सुशिला लिहावे की सुशीला ..
  उदाहरणदाखल आणखी बरेच शब्द आहेत..ते असे..
पाणि-हात.........पाणी- जल 
पिक-कोकीळ.....पीक-धान्य
सलिल-पाणी.......सलील-लीलेने
शीर-नस/धमनी.....शिर- डोके
दिन- दिवस ........दीन- गरीब
सुर - देव ...........सूर- स्वर /आवाज 
सुत-मुलगा...........सूत- धागा

असे मराठीत बरेच शब्द आहेत. संदर्भानुसार -हस्व दीर्घाचे भान ठेवून आपले लेखन केले तर अधिक चांगले..शब्दकोश जवळ बाळगावा..म्हणजे शंका आलीच तर अर्थ शोधता येईल. कालांतराने ही सवय झाली की आपले लेखन आपोआप शुद्ध होऊ लागते. तेव्हा करा प्रयत्न ..कारण,
शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. बरोबर ना ?
आणि  हो..जरा काही नियम लक्षात ठेवले तर...ते पुढील भागात....

डॉ वसुधा वैद्य

0 comments: