Tuesday, March 3, 2020

व्याकरण १.४

व्याकरण भाग (४)     ऱ्हस्वदीर्घ

      ऱ्हस्वदीर्घाच्या पुढील नियमाचा विचार करण्यापूर्वी 'अकारान्त' ही संकल्पना समजून घेऊ या. ज्या शब्दाचा उच्चार करताना वा लिहताना शेवटी 'अ' हा स्वर येतो, म्हणजेच ज्या शब्दाच्या शेवटी (अंती) 'अ' स्वर असतो तो 'अकारान्त' शब्द होय, उदा.-'नियम' या शब्दात शेवटी म्+अ असा वर्ण आहे . म्हणून  तो अकारान्त....तर आता अकारान्त समजले.
       मराठीत  अशा अकारान्त शब्दांच्या आधी जो इकार (वेलांटी) आणि  जो उकार असतो तो कायम दीर्घच लिहावा. मग तो शब्द कितीही अक्षरी असो.
उदा.-  कठीण   या शब्दात ण हे अक्षर अकारान्त (ण्+अ) आहे. म्हणून  त्या आधीची ठ ची वेलांटी (ठी) ही दीर्घ झालेली आहे. याप्रमाणेच...
उदा.--  पुढील, नीट, रतीब, विहीर, ऊस, पाऊस, तूप, फूल, पीठ, अनूप, खडूस, अवीट वगैरे. वगैरे..
परंतु हा नियम फक्त  मराठीतील शब्दांसाठीच लागू होतो. पण संस्कृतमधून मराठीत  जसेच्या तसे स्वीकारलेले जे तत्सम शब्द असतात ते त्याच्या मुळाप्रमाणे ऱ्हस्व /दीर्घ  लिहावेत. 
उदा.-  विष, गुण, समुह,अकल्पित, अवचित,  पिक(कोकीळ) [ हं...इथे पिक हा तत्सम शब्द असल्यामुळे तो तसाच म्हणजे ऱ्हस्व  लिहिलाय..पण कोकीळ हा मराठीतला शब्द म्हणून  नियमाप्रमाणे  दीर्घ  'की' लिहिलीय]    ., न्यायाधीश, व्यूह, रूप, गणित वगैरे..वगैरे
           म्हणून  कोणते शब्द मराठीतले आणि  कोणते संस्कृतमधून आलेले ते एकदा  माहीत असले की हे नियम आणि  त्यानुसार लेखन करणे अतिशय सोपे काम असते..त्याविषयी म्हणजे  तत्सम आणि  तद्भव , मराठी आणि  पारभाषिक शब्दांविषयी स्वतंत्र पोस्ट देईलच.
  तोपर्यंत  या नियमानुसार लिहायचं..कारण..
  शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
            होय ना .!

डॉ वसुधा वैद्य 

0 comments: