Tuesday, March 3, 2020

व्याकरण १.८

व्याकरण.... भाग (८)......जोडाक्षर
----------------------------------------------
   कधीकधी उच्चारांतला सारखेपणा लेखनात दोष निर्माण करतो. आता हेच बघा ना....श व श्य आणि ज व ज्य यांच्या उच्चारात थोडा सारखेपणा आहे. इथेच बरेच जण घोटाळा करताना दिसतात. ते जास्त ऐवजी ज्यास्त आणि राजाला ऐवजी राज्याला असे चुकीचे लिहितात. हं.... पण प्रदेश या अर्थाने लिहिताना  मात्र  राज्याला असेच लिहावे..... 
    दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे मूळ शब्द आहे 'कसे'...'कसा '  पण या शब्दाला जेव्हा  विभक्ती प्रत्यय ( ला, स, ने, शी, तून, हून, चा,ची,चे, आत ) लागतात तेव्हा मात्र  लिहिताना हीच गडबड होते. आणि लिहिले जाते -कश्याला, कश्याने, कश्यात, कश्याचे/ची/चा..वगैरे...तसेच असे..असा या शब्दाचेही...इथेही अश्याने, अश्याचा, अश्यांना असे लिहिले जाते..... आणि हे सर्रास चूक आहे. लेखन सदोष  होते अशाने...कसे /असे/तसे , कसा /असा/तसा ..या शब्दांना जेव्हा  विभक्ती प्रत्यय लावायचे असतात तेव्हा  तिथे श्य हे जोडाक्षर नसते..मूळ शब्दांत नाही तर आपण बळेच का आणायचे ? फक्त  स चा श करायचा नि प्रत्यय लावायचा. म्हणजे कशाला, कशाने, कशातून, कशाचे,कशात , अशाने, अशांचे, तशांचे वगैरे लिहावे. तसेच मासा ,ससा, घसा, यांनाही हाच नियम लागू होतो. ...पण हं, मुळात माशी /मिशी असेल तर मात्र  माश्यांनी, माश्यांचे, मिश्यांचे, मिश्यांना असे श्य लिहावे..... 
कसे/असे / या शब्दांत स आहे .म्हणून  स चा श होताना त्याला आपण य हा आगाऊचा जोडू नये.. आणि श्य असे लिहूच नये..... 
आता  जे जे कश्याला वगैरे लिहित असतील ते ते आपले लेखन बदलतील असे समजू या...
कारण शुद्धलेखन  हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे....

डॉ वसुधा वैद्य

0 comments: